म. टा. वृत्तसेवा, सटाणा
जैन धर्मियांच्या पवित्र श्री मांगीतुंगी परिसर विकासासाठी तब्बल २७० कोटी रुपयांच्या विकास कृती आराखडा तयार आहे. आगामी काळात या माध्यमातून परिसर विकास घडवून मांगीतुंगी परिसराला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
श्री मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीच्या पंचकल्याण महोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित सर्वतोभद्र महलमधील महासभेला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दीपिका चव्हाण, आमदार राजेंद्र पटणी, राज्याचे मुख्यसचिव स्वाधिन क्षेत्रीय, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जि. प. सीईओ मिलिंद शंभरकर, माजी खासदार जे. के. जैन, ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी, रवींद्रकिर्ती स्वामाजी, अनेकांतसागर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्याकडून निश्चित चांगले सत्कर्म झाल्याने या पवित्र ठिकाणी येण्याचा योग आला. भारतातील साधू-संत, ऋषीमुनी यांचे कार्य अत्यंत पवित्र व अतूलनीय असल्याने त्यांची नोंद कुठल्याही पुस्तकाने अथवा रेकॉर्ड होण्याइतके छोटे नाही. भगवान ऋषभदेव हे विद्वान, पंडित, कृषी पंडित, ध्वनंतरी, साहित्य व कला क्षेत्रासह सर्वच प्रातांतील त्यांना प्रचंड ज्ञान होते. आपल्या प्रजेचे संगोपन व पालन पोषण कसे करावे त्यांचा आदर्श मापदंड त्यांनी दिला असून, त्यांचा आदर्श आजच्या शासनकर्त्यांनी घेणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
जैन समाजाने व्यवसाय व व्यापारात संपन्नता संपादन करूनही अध्यात्म व दातृत्वाला आजही अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. यामुळेच श्रद्धा असलेल्या समाजाचे अस्तित्व हे कुणीही नष्ट करू शकत नाही. जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या, मात्र भारतीय संस्कृतीने श्रद्धेला महत्त्व दिल्यानेच तिचा सातत्याने सर्वत्र उत्कर्ष व उदोउदो होत आहे. आजच्या जगात भगवान ऋषभदेव यांचे कार्य सर्वांना आदर्शवादी व मार्गदर्शक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी या परिसराल ऐतिहासिक महत्त्व असल्याने परिसर विकासाला चालना मिळण्याचे स्पष्ट केले.
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मांगीतुंगीला जागतिक पर्यटन दर्जा देवून परिसरातील हरणबारी व तळवाडे भामेर कालव्याच्या कामांना गती देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना रवींद्रकिर्ती स्वामीजी यांनी मंगलकलश, मांगीतंगी ऋषभ भगवान देव यांची प्रतिमा व धर्मराजेश्वर पदवी देवून सन्मानित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मूर्तीचे शिल्पकार सी. आर. पाटील, चांदवड नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांना सन्मानित करण्यात आले.
नवा संदेश देणारे क्षेत्र
ग्रामविकास विभागाने या परिसर विकासासाठी १९ कोटी रुपयांचा निधी देवून पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आमागी काळात देखील शासन या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहे. देशातील जैन समाजाचे कार्य व महती सर्वांना विषद असून, मांगीतुंगी देशाला नवा संदेश देणारे क्षेत्र असल्याचे उल्लेख ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.
हेलिकॉफ्टरमधूनच पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे सकाळी साडेदहा वाजता आगमन होताच हेलिकॉप्टरमधूनच १०८ फूट उंच भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीची पाहणी केली.
भयाळे दुर्लक्षित
मुख्यमंत्री यावेळी शहीद जवान शंकर शिंदे यांच्या गावी भेट देतील ही अपेक्षा मात्र फोल ठरली.
ऋषभदेवांची आज विश्वविक्रमी महाआरती
सटाणा : जगातील सर्वात उंच मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीची आरती विश्वविक्रवी व्हावी, यासाठी सुमारे पाच हजार भाविक यात सहभागी होणार आहेत. आदिवासी भागामध्ये लख्ख उजेड व्हावा व जगाचे याकडे लक्ष जाऊन या परिसराचा विकास व्हावा, हा महाआरती मागचा उद्देश आहे.
आज (१७ फेब्रुवारी) सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्वतोभद्र महल सभामंडपाबाहेर सुमारे पाच हजार भक्तगण, इंद्र-इंद्रायणी महाआरतीकरिता सहभागी होणार आहेत. ही महाआरती अॅमेझिंग वर्ल्ड ठरणार असल्याची माहिती महाआरतीचे संयोजक सुवर्णा काला व पारस लोहाडे यांनी दिली. या उंच मूर्तीची महाआरती देखील विश्वविक्रमी ठरावी यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या महाआरतीस प. पू. आर्यिका ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी, स्वामी रवींद्रकिर्तीजी व आचार्य उपस्थित राहणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट