Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

... तर वाचला असता जीव!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयितांसमवेत एवढ्या रात्री जाऊ नका असे मंगवाना यांची पत्नी, आई आणि मुलाने त्यांना सांगितले. मात्र, रणजीत मंगवाना यांनी ऐकले नाही. कुटुंबीयांचे ऐकले असते तर रणजीत यांचा जीव वाचू शकला असता अशी माहिती पुढे आली आहे.

बुधवारी रात्री पाऊणच्या सुमारास मंगवाना घराजवळ आले. त्याचवेळी घराबाहेर थांबलेले संशयित त्यांना आपल्या समवेत चालण्यास सांगत होते. त्यावेळी हे चौघे कशासाठी आले अशी विचारणा पत्नी गीता, आई कमलाबाई यांनी रणजीत यांना केली. या चौघांसोबत तुमचे अनेकदा भांडण झाले आहे. त्यांनी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. तेव्हा त्यांच्यासमवेत जाऊ नका असे त्यांना सांगूनही रणजीत यांनी ऐकले नाही, असे गीता यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

रणजीत कपडे बदलून घराबाहेर पडले. काही विपरीत घडेल या धास्तीने गीता व नणंद पूनम रिक्षातून मागोमाग गेल्या. त्यावेळी जैन भवनजवळ रणजीत यांना मारहाण सुरू होती. आरडाओरड करीत त्यांनी रणजीतच्या दिशेने धाव घेतली. मात्र, त्याचवेळी संशयितांनी गावठी कट्ट्यातून रणजीत यांच्या डोक्यात गोळी झाडली. मदतीसाठी दोघींनी आरडाओरडा केला. मात्र, तत्काळ मदत मिळू शकली नाही. कुटुंबीयांचे ऐकले असते तर रणजीत यांचा जीव वाचू शकला असता अशी चर्चा या घटनेमुळे सुरू आहे. रणजीत यांच्या पश्चात आई कमलाबाई, पत्नी गीता, मुलगा युवराज (वय ९), विराज (वय ७) आणि साईराज (वय ३) असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनविसे जिल्हा संघटकपदी गावंडे

0
0

म. टा.​ प्रतिनिधी​, देवळाली कॅम्प

आगामी मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण राज ठाकरे यांनी अवलंबले आहे.

यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी आदित्य शिरोडकर यांची निवड करण्यात आली असून संघटकपदी सचिन गावंडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारी सोडून सन्मानाने जगणार!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कालपर्यंत आम्ही पोलिसांपासून दूर धावत होतो. परंतु, पोलिसांनी वेळीच डोळे उघडल्याने आता स्वत:चे करिअर घडविण्यासाठी धावणार आहोत. कळत नकळतपणे आमचे पाऊल गुन्हेगारी क्षेत्रात पडत होते. परंतु, आता गुन्हेगारीची वाट सोडून सन्मानाने जगण्याचा संकल्प आम्ही करणार आहोत, अशी ग्वाही पोलिस अधिकाऱ्यांना देताना त्यांच्या डोळ्यांत होती पश्चातापाची आसवे.

शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत तसेच, कळत नकळतपणे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या १५ ते १७ वयोगटातील मुलांचे पोलिसांकडून समुपदेशन करण्यात आले. अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. केवळ सिडकोतच नव्हे तर शहरात दहशत निर्माण करणारी टिप्पर गँग, राक्या कोष्टी गँग, पाण्या बोरसे गँगशी संबंधित सुमारे १०० हून अधिक मुलांना समुपदेशनासाठी अंबड पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे पोलिस निरीक्षक बर्डेकर यांनी केलेल्या आवाहनाला या मुलांनीही उत्तम प्रतिसाद दिला. गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्याची कल्पना त्यांना देण्यात आली. तुम्ही सर्व कामगार आणि कष्टकऱ्यांची मुले आहात. तुमचे पालक कष्टाने आणि सन्मानाने जीवन जगत असताना तुम्ही गुन्हेगार असा शिक्का स्वत:वर मारून घेणार का? असा सवाल या मुलांना विचारण्यात आला. कळत नकळतपणे केलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य हा गुन्हा असतो. तुम्ही कितीही चांगले असाल तरी कायदा गुन्ह्याचे स्वरूप पाहून कार्यवाही करतो, याची जाणीव या मुलांना करून देण्यात आली.

डोळ्यांत होती पश्चातापाची आसवे

मैदानी खेळ खेळा, शरीर बलदंड करून पोलिस किंवा सैन्य दलात भरती व्हा. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही बर्डेकर यांनी या मुलांना दिली. तुम्हाला पुस्तके पुरविण्यापासून ते मान्यवरांचे मार्गदर्शन मिळवून देण्यापर्यंतचे उपक्रम राबविण्यात पोलिस पुढाकार घेतील, अशी ग्वाही ही दिली. मोबाइल, पैसे अशा किरकोळ स्वरुपाच्या आमिषांना भुलून गुन्हेगारांच्या पावलांवर पाऊल ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले. यापूर्वी झालेल्या चुका पुन्हा करणार नाही, असा शब्द देताना काही मुलांच्या डोळ्यांमधून यावेळी आसवे गळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मस्तकाभिषेक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

श्री मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे विविध धार्मिक उत्सव, महापूजा, जन्मकल्याणक, जन्माभिषेक, केवलज्ञान कल्याणक विधी संपन्न होऊन अंतिम मोक्ष कल्याणक पूर्णाहुती हवन व रथयात्रा उत्साहात होऊन भगवान ऋषभदेव यांची मूर्ती दर्शनाकरिता भाविकांसाठी खुली करण्यात आली. आज (१८ फेब्रुवारी) पासून ६ मार्चपर्यंत महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ऋषभगिरी पर्वतावर भाविकांना येण्या-जाण्यासाठी मार्ग खुला केला आहे.

जैन धर्मिय परंपरेनुसार भगवान ऋषभदेव यांना दैवत्व बहाल करण्याचा संपूर्ण विधी झाल्यानंतर अंतिम कार्यक्रम मोक्ष कल्याणक हा विधी बुधवारी सकाळी पार पडला. भगवान साक्षात मोक्ष अर्थात अनतांत विलीन होऊन अमिनिद्रय सुखात निमग्न राहून परत कधीही या पृथ्वीवर अवतार घेणार नाही. यामुळेच या विधीला जैन बांधव मोक्ष कल्याण विधी म्हणून संबोधित असतात. यासाठी आवश्यक विधीपूजा, महापूजा करण्यात आल्या.

दरम्यान, आज, गुरुवारी ऋषभगिरी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी उंच मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा होत आहे. हा महामस्तकाभिषेक समारंभ दि. ६ मार्च २०१६ पर्यंत सुरू असणार आहे. यासाठी ऋषभगिरी पर्वत न्हाऊन निघाला आहे. या पर्वताच्या मध्यापर्यंत वाहन ये- जा करू शकते. मात्र मूर्तीपर्यंत पोहचण्यासाठी सुमारे १५० पायऱ्या चढून जावे लागणार आहे. महामस्तकाभिषेक समारंभाच्या निमित्ताने लिप्टचे काम पूर्णत्वास आले असून, लोखंडी जिने व पायऱ्यांचे टप्पे देखील तयार करण्यात आले आहेत.

जि. प.च्या आरोग्य विभागाने या ११ केंद्रे स्थापन केली. सुमारे तीन रुग्णांनी या ठिकाणी सेवा घेतली असून, अत्यंत अवघड अशा तीन ते चार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेच्या तीन सुसज्ज बंबासह सटाणा, मालेगाव येथील अग्निशामक दलाचे पथक या सुरक्षितेतसाठी तैनात केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिलाने पळवले तोंडचे पाणी

0
0

बिलाने पळवले तोंडचे पाणी

म. टा. प्रतिनिधी, सिडको

अनियमितपणे मिळणारी पाण्याची बिले आणि बिलावर येणारा हजारो रुपयांचा आकडा यामुळे सिडको तसेच सातपूर परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन घेतल्यानंतरही जुन्या एकत्रित कनेक्शनच्या बिलाची भरपाई करण्याची वेळ या भागातील रहिवाशांवर आली आहे.

सिडको व सातपूरच्या अनेक भागात बांधकाम व्यावसायिकांनी रो-हाऊसेस उभारताना केवळ एकाच व्यक्तीच्या नावावर पाण्याचे कनेक्शन घेऊन अनेक घरांना पाणी पुरवठा केला. पुरेसा पाणी पुरवठा मिळण्यासाठी कालांतराने या रहिवाशांनी स्वतंत्र कनेक्शन घेतले. परंतु यावेळी जुन्या कनेक्शनधारकांचे बिल घेऊन ते कनेक्शन बंद करण्याचे काम महापालिकेने केले नाही. याचा मोठा फटका जुने कनेक्शन ज्या ग्राहकाच्या नावावर आहे त्याला बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन स्वतंत्र कनेक्शनच्या बिलासह जुन्या एकत्रित कनेक्शनच्या बिलाची भरपाई अनेकांना करावी लागत आहे. याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. पाण्याचे नवीन कनेक्शन देताना संबधित ग्राहकांनी मागील बिलाची रक्कम अदा केली आहे की नाही, याबाबत कुठलीच माहिती न घेता कनेक्शन देण्याचे काम महापालिकेमार्फत झाले आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी रहिवासी क‌रीत आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणात जलकुंभ, पण तहान भागेना!

0
0

अंगणात जलकुंभ, पण तहान भागेना! म. टा. प्रतिनिधी, पंचवटी 'आमच्या भागात नव्हे तर आमच्या अंगणात पाण्याचा जलकुंभ असूनही आमची तहान भागत नाही', असा सूर पंचवटीतील सिद्धेशवर नगरातील महिलांकडून उमटत आहे. या भागात अतिशय कमी दाबाने पाणी येत असल्याने लवकरात लवकर पुरेशा दाबाने पाणी मिळावे अशी मागणी महिलांनी केली आहे.

सिध्देश्वर नगरातील गणपती मंदिराच्या परिसरात पाण्याचा भव्य जलकुंभ असूनही परीसारतील नागरिक मुबलक पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात ही समस्या कायम आहे. यबाबात अनेकदा मागणी करुनही त्यावर कार्यवाही झालेले नसल्याचे सांगण्यात आले. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणी भरण्यास बराच वेळ लागतो, कित्येकदा पाणी पूर्ण भरुन होईपर्यंत पुरवठा बंद होतो अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली.

याबाबत अभ्यास करुन पाणीपुरावठा योग्य दाबाने कसा करता येईल याचे नियोजन करण्याची सूचना पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले. पाणी पुरवठा विभागाला सूचना मिळालेल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कधी होईल याबाबत मात्र नागरिकांमधून शंका उपस्थित होत आहे. तसेच या परिसरात खूप मोठा प्लॉट आहे व मंदिरही आहे. पण या भागात उद्यान नाही. या ठिकाणी उद्यानची निर्मिती करावी, मंदिराच्या समोर सभामंडप उभारावा आणि आमदार निधीतून ग्रीन जिम तयार करावी अशी मागणी देखील रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र गेले, फलक उरले!

0
0

केंद्र गेले, फलक उरले!

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने गोदावरी आपत्कालीन वैद्यकीय सेवा व प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची उभारणी केली होती. कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तीन तारखा झाल्यानंतर हे आरोग्य केंद्र बंद झाले होते. परंतु आरोग्य केंद्र बंद झाले असताना इथे लावलेले आरोग्य केंद्राचे फलक मात्र आजही तसेच आहेत. प्राथमिक स्वास्थ्य केंद्रआपत्कालिन वैद्यकीय सेवा असे फलक इथे असल्याने या भागात येणारे पर्यटक आरोग्य केंद्राची विचारणा करत असल्याचे पुजाविधी करणाऱ्या गुरुजींमार्फत सांगण्यात आले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण अहवालाची निर्मितीपूर्वीच दुर्दशा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून तयार होणारा पर्यावरण अहवाल यंदाही दुर्दशेच्या फेऱ्यात सापडला आहे. फेब्रुवारी महिना सरत आला असून, सदर अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेला अद्याप ठेकेदारच उपलब्ध झालेला नाही. ३१ जुलैच्या आत सदर अहवाल महासभेला सादर करणे बंधनकारक असून, दोन-तीन महिन्यांत ठेकेदार वस्तुनिष्ठ अहवाल तयार करणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहर परिसरातील वातावरण शुध्द ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे दरवर्षी शहरातील वातावरणात काय बदल होतात? शहरातील पाण्याची शुध्दता, कचरा, हवा तसेच ध्वनी प्रदूषण यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून त्यावर ठोस उपाययोजना महापालिकेने राबवणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका दरवर्षी या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करते. वर्षभरातील सण-उत्सव यासह इतर घडामोडींमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून अहवाल प्रशासनामार्फत महासभेला सादर केला जातो. हा अहवाल तयार करण्यासाठी सुमारे ४ लाख रुपये खर्ची पडतात. मात्र, बऱ्याचदा या अहवालातील जुनीच माहिती नव्याने सादर केल्याचे प्रकार उघडकीस येतात. त्यामुळे पर्यावरणीय स्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल समोर येत नाही. तसेच या अहवालातील दाव्यांबाबत गांर्भियाने विचार होताना दिसत नाही. सध्या, २०१६ या वर्षातील पर्यावरण स्थिती अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. मात्र, हा प्रकार वराती मागून घोडे दामटण्यासारखा असल्याची टीका केली जात आहे.


निष्पन्न काय होणार?

जुलै अखेरीस अहवाल महासभेत सादर होणे बंधनकारक आहे. अद्याप कार्यक्षम संस्था पुढे न आल्याने महापालिकेला दुसऱ्या वेळेस निविदा सूचना प्रसिध्द कराव्या लागल्या आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्जांची विक्री होणार असून पुढील प्रक्रिया २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, त्यासाठी सदर संस्थांनी रस दाखवणे आवश्यक आहे. साधारणतः पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत संबंधित संस्थेला आपला अहवाल तयार करावा लागणार असून त्यातून फारसे काही निष्पन्न होणार नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुशिलाबाईचा दवाखाना

0
0

धनंजय गोवर्धने
चांगल्या कापडाची मोठ्या आकाराची बाळाती दुपटी करुन, स्वच्छ धुवून वाळवून, घड्या करुन ठेवे, घरात किराणा सामान भरुन ठेवे आणि गरज भासेल तेव्हा कोणा तरी मोठ्या बाईला, मावशीला, काकूला बरोबर घेऊन सुशिलाबाईच्या दवाखान्यात जाई.

पंचवटीतल्या शनिमंदिरासमोर सुशिलाबाईचा दवाखाना होता. खरंतर हा एक मुंबईस्थित गुजराथी कुटुंबियांनी त्यांच्या ट्रस्ट मार्फत चालवलेला 'केलीबाई ट्रस्ट'चा धमार्थ दवाखाना होता. कोपऱ्यावरती एका भिंतीवर सिमेंटच्या काळ्या रंगात रंगवलेला फळा होता. बाजूला गाळ्यांमध्ये दुकाने होती. टेलर, किराणा, किरकोळ वस्तू अशी, मधोमध घडीचा लोखंडी दुमडणारा दरवाजा, रात्री बेरात्री तेथून आवाज देता यायचा. दरवाजा उघडला की आधार वाटायचा, सुशिलाबाई लगेच यायच्या गोऱ्यापान, उंच, भरपूर काळे केस, त्यांचा मोठा अंबाडा, मानेवरती रुळणारा गोल आकाराचा तपकिरी रंगाच्या फ्रेमचा चष्मा, पांढरी शुभ्र नऊवारी साडी, पांढराच ब्लाऊज, प्रसन्न चेहरा, प्रेमळ आवाज, त्यांच्या आवाजानेच बाईला धीर यायचा.

लाकडी व अरुंद पायऱ्यांवर चढून वर गेले की एक टप्पा, तिथं मोठी खिडकी, वरती सात-आठ पायऱ्या सहज सोप्या, उजव्या बाजूला लाकडी कपाटं, त्या कापाटावरती लहान मोठ्या आकाराच्या काचेच्या बाटल्या, त्यात तिळाच्या तेलासारखा पण जास्त घट्ट आणि लालसर द्रव पदार्थ त्यात तरंगणारे विविध आकाराचे आणि आरशातले लालसर गर्भ. मला त्यांच्याविषयी नेहमी उत्सुकता असे. पण धाडस होत नसे. एक भीती वाटायची. दवाखान्यात गंभीर वातावरण असायचे. बाई आल्या की, सर्वांशी आस्थेने बोलत. हवं नको ते औषधांची चौकशी करत. बाईला घरच्या माणसांची उणीव भासू नये याची दक्षता घेत. आईला आणलेला तुपाचा शिरा आई एक घास घे असं म्हणून डब्याच्या झाकणात गरम गरम शिरा काढून देई.

लहानपणी खेळतांना पडलं लागलं की गणेशवाडीच्या कोपऱ्यावरती असलेल्या दवाखान्यात जायचो. तीन दगडी पायऱ्या चढून आत गेलं की डाव्या हाताला कंपाऊंडरची केबिन, उजवीकडे एक मोठ्ठा टेबल त्यावर हिरवं वूलनचं कापड, डाव्या हाताला लाकडी त्रिकोणी पाटी त्यावर पांढऱ्या अक्षरात डॉ. देव असं लिहिलेलं, एक दोन पेन कागद आणि स्टेथस्कोप, किरकोळ लागलं की कंपाऊंडर काकाच काळपट, जांभळट असं आयोडीन कापसावर घेऊन जखमेवर लावत. फुंकर मारत आपण दोन्ही हातांनी गुडघा कितीही घट्ट धरुन ठेवला तरी डोळे फितूर व्हायचे. जखम जास्त असली तर काका एक डबा उघडायचे त्याचा भपकन वास यायचा. मग एक सुरी घेऊन ते डब्यातला मलम कागदावर काढून त्याची पूडी बांधून द्यायचे. एक दोन दिवसात जखम भरुन यायची.

थंडी वाजून ताप आला आणि एक दोन दिवस राहिलाच तर मग डॉ. बदलानींकडे जावं लागे. डॉ. लालचंद बदलानी मालवीय चौकात त्यांचा दवाखाना. ते पंजाब सिंध प्रांतातले. त्यांची डॉक्टरकीची पदवी, ग्रुप फोटो भिंतीवर लावलेला आणि शरीर शास्त्रातील पुस्तकात दिसणाऱ्या आकृत्या चित्र रंगीत मोठ्या आकारात भिंतीवर फ्रेम करुन लावलेली. बदलानी डॉक्टरांकडे आत तपासण्याची छोटी खोली टेबलाच्या वरती एक दिवा त्याला चिनीमातीचं कोटिंग असलेली पत्र्याची शेड आणि एक भोवऱ्याच्या आकाराच्या वरती छोटं चाक असलेला चिनी मातीचा गोळा दिव्याची वायर त्यावरुन फिरवलेली. डॉक्टर तपासतांना तो दिवा हाताने ओढून घेत आणि काम होताच हाताने सरकवून देत. ताप मोजून होईपर्यंत ते रमेशला सूचना देत इंजेक्शन द्यायचे असेल तर सिरींज उकळायला सांगत किंवा औषध सांगत. तोपर्यंत रमेशने केस पेपरच्या गठ्ठ्यातून नावाचा केस पेपर एकत्र टाचणी लावून ठेवलेले असत. कधीतरी एकदमच पैसे दिले जात चार किंवा पाच रुपये झाले की, डॉक्टरांची फी किरकोळ असे त्यांच्याकडे जाताना एक झाकण असलेली काचेची बाटली स्वच्छ धूवून न्यावी लागत असे. डॉक्टरांनी थंडी ताप याच्यावरती एक लाल रंगाचं औषध तयार करुन एका मोठ्या काचेच्या बाटलीत भरुन ठेवलेलं असे. रमेश कंपाऊंडर काचेच्या बाटलीत ते औषध भरे. त्यावरती एक कागदाची पट्टी त्याला तीन घड्या घालून एका विशिष्ठ आकारात कापून तो कागद बाटलीवर चिकटवून गोळ्यांच्या तीन पुड्या बांधून देई.

रात्रीतून दरदरून घाम येई आणि दुसऱ्या दिवशीच बरे वाटे. हे लाल औषध डॉक्टरांचे संशोधन होतं.

बायकांना मात्र त्यांच्या आजारपणात जास्तच हाल सोसावे लागत. आई बऱ्याच वेळा राममंदिरातून तूळस बेल आणायला सांगे. तूळस बेल, लवंग मिरे, याचा काढा करे आणि तो दिला जाई. जून्या साड्या पांढरं शुभ्र धोतर यांचे चौकोनी बारीक तुकडे करी, दोन टोक कर्णाच्या टोकाला जोडून त्याचा त्रिकोणी आकार करे उरलेल्या दोन्ही बाजूंच्या कडा आत दुमडून घेई, ओठ घट्ट मिटावे तशी घडी दाबून त्यावरुन हाताने शिलाई करी एक वरच्या बाजूला हूक तयार करुन ठेवे असे तीनचार छोटे लंगोट शिवून ठेवे.

आईच्या एका घासात किती पटकन पोट भरुन जाई. दवाखान्यात धोंड्याबाई आणि कोंड्याबाई अशा दोन मावशी होत्या. त्या सर्व दवाखाना दणाणून सोडत. लहान पोरांवर ओरडत त्यामुळे बाकड्यावर गुपचूप बसून रहावे लागे. दवाखान्यात लहान मुलांचे कपडे वाळत घालण्यासाठी मोठ्या शेगड्या होत्या. त्यात कोळसे पेटवले की त्यात काहीतरी टाकून त्यावरती बांबूची मोठी टोपली झाकली जाई. त्या टोपीवरती सर्व लहान मुलांचे कपडे वाळवले जाई. त्या धुराचा एक वेगळा ओलसर औषधी वास पसरुन राही. पंचवटीतल्या शेकडो बालकांचा जन्म इथं झाला असेल, अवघड प्रकरण असेल तर जुन्या नगरपालिकेच्या मागे दवाखाना होता तिथे जावे लागे. जुनं कुणी सापडत का? म्हणून पंचवटीत गेलो तर दवाखाना बंद झालेला, इमारत पडली आहे. नवं कॉम्प्लेक्स उभं राहतंय. दोन आजीबाई भेटल्या काही आठवत नाही पण सुशिलाबाई फार चांगल्या होत्या एवढंच म्हणाल्या. एका खासगी ट्रस्टचा धमार्थ दवाखाना बाईच्या सुस्वभाविक समर्पित सेवेमुळे सुशिलाबाईंचा झाला. त्या फक्त नर्स होत्या. आता तो समर्पित भाव संपलाय आता दवाखाना डॉक्टरांच्या नावापेक्षा सुपर स्पेशालिटी, सुखसोयींनी ओळखला जातो. रात्री बेरात्री दवाखान्यात जाताना आधार वाटण्याऐवजी भीती वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात रविवारी जाट संमेलन

0
0

अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते उदघाटन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील जाट समाज सेवा समिती ट्रस्ट व नवी दिल्ली येथील जाट बायोग्राफिकल सेंटरच्यावतीने रविवारी (२१ फेब्रुवारी) राष्ट्रीय जाट बौद्धिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धमेंद्र यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन होणार असून देशभरातील जवळपास एक हजार जाट बांधव त्यास उपस्थित राहणार आहेत.

जी. पी. फार्म, गिरणारे, गंगापूर रोड येथे राष्ट्रीय जाट बौद्धिक संमेलनाचे आयोजन होणार असल्याची माहिती जाट समाज सेवा समिती ट्रस्टचे अध्यक्ष श्रीचंद लक्ष्मणराव रणवा आणि सचिव बाबूलाल गोपाराम नारदानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनात विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय जाट महासभेचे अध्यक्ष अजय सिंह, अनिवासी भारतीय हर्ष कुमार, रोटरी इंटरनॅशनलचे डी. जी. अनिल बेनिवाल यांना आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये जाट समाजाला आरक्षण प्राप्त आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातही समाजाला राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे मत कोषाध्यक्ष अभयराम कादयान आणि संरक्षक दिलीपसिंग बेनिवाल यांनी व्यक्त केले आहे.

संमेलन यशस्वीतेसाठी चंद्रभान नैन, शीलसिह नेहरा, राम अवतार नैन, ईश्वरलाल धायल, राजेंद्र बुडानिया आदी प्रयत्नशील आहेत. संमेलनासाठी निमंत्रितांनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जाट समाज सेवा समितीने केले आहे.

संमेलनाचा उद्देश

संमेलनात प्रामुख्याने जाट समाजाचे संगठन अधिक बळकट करणे, राष्ट्रीय स्तरावर सामाजिक नेटवर्क तयार करणे आदी सामाजिक विषयांसह दिल्लीत जाट भवन कॉम्प्लेक्‍सचे बांधकाम, जाट इतिहास व सांस्कृतिक परंपरेवर चिंतन-मंथन, समाजातील बेरोजगारी, शिक्षण व ग्रामीण विकास यासारख्या विषयांवर चर्चा, तसेच सामाजिक कुप्रथा आणि आचार संहिता यावर परिसंवाद, चर्चासत्र आदींच्या माध्यमातून समाज जागृती करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष राजेंद्र पिलानिया आणि बनेसिंह झांझडिया यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट किन्नरांची शोध मोहीम

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

तृतीय पंथीयांबाबत अर्थात किन्नरांविषयी समाजात एक विलक्षण उत्सुकता असते. त्यांची देहबोली, हातवारे, राहण्याची पध्दत सगळंच निराळे. समाजाने बहिष्कृत केलेले किन्नर समोर येताच, भलेभले मार्ग बदलून घेतात. मात्र, या किन्नरांच्या वेशात काही भामट्यांनी लोकांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला. यामुळे खऱ्या किन्नरांची बदनामी होते आहे. या पार्श्वभूमीवर किन्नरांनीच पुढाकार घेत भामट्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी त्यांना योग्य साथ दिल्यास बनावट किन्नरांचा त्रास कमी होऊ शकतो.

तृतीय पंथीयांच्या त्रासाला अनेक लोक कंटाळतात. रस्त्यात अडवून पैसे घेणे, रेल्वेत प्रवासात विक्षित हावभाव करणे. घरात कुणी नसताना महिलांना त्रास असे प्रकार होतात. मात्र, नाशिकच्या तृतीय पंथीयांनी बनावट तृतीय पंथीय शोधून पोलिसांच्या हवाली करण्याची मोहीम उघडली आहे. त्यासाठी जिल्ह्यात पथके तैनात केली आहेत. सिन्नर येथे तृत्तीय पंथीय असल्याचे भासवून नागरिकांना लुबाडणाऱ्या काही युवकांना पकडण्यात या पथकाला यश आले. त्यांनी या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरात महिलांसह नागरिकांना तृतीय पंथीयांच्या त्रासाबद्दल अनेक तक्रारी येत होत्या. विरूध्द कारवाई करण्यासाठी सलमा गुरू यांच्या नेतृत्वाखाली ही पथके कार्यरत आहेत.

पोलीस आयुक्तांना निवेदन

खान्देशातील जळगाव, भुसावळ या भागातून काही युवक नाशिकमध्ये आले आहे. त्यांनी पंचवटीतील आडगाव नाका तसेच पाथर्डी फाटा येथे झोपड्या टाकल्या आहेत. सकाळी उठून स्त्रीवेश परिधान करीत मद्यपान करायचे आणि आणि लोकांना थेट घरामध्ये घुसून त्रास देणे सुरू करायचे, असा नित्याचा प्रकार सुरू आहे. नाशिकमधील स्थानिक तृतीय पंथीयांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नाशिकच्या तृतीय पंथीयांकडून कधीही पैशासाठी कुणाला त्रास दिला जात नाही. असे पैसे कुणी मागतांना आढळल्यास त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे सांगण्यात आले आहे.

तर पोलिसांशी साधा संपर्क!

खरे तृतीय पंथीय रस्त्यात कधीच कुणाकडे काही मागत नाहीत. कुणाच्या घरी बारसे, विवाह अशी शुभकार्य असतील तेव्हा समाजातील विविध स्तरावरील लोकांकडूनच तृतीय पंथीयांना मानाने बोलावले जाते. बिदागी देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद मागितले जातात. यासाठी त्यांना चांगली रक्कम मिळते. त्यामुळे खरे तृतीयपंथी कधीच कुणाला त्रास देत नाही. त्रास देणारे तृतीय पंथीय आढळल्यास नागरिकांनी त्यांना जवळच्या पोलिस ठाण्यात घेऊन जावे, असे आवाहन सलमा गुरू यांनी केले आहे.

''दिवाळी, होळी, जन्मदिवस अशाच वेळी आमचे लोक नागरिकांच्या घरी जातात. त्यांना तेथे व्यवस्थित बिदागी मिळते. त्यामुळे आमची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही ही मोहीम सुरू केली आहे.'' - सलमा गुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाकडून हक्कभंग

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधिमंडळाच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन होऊ नये यासाठी स्थापन झालेली समिती नाशिक दौऱ्यावर आलेली असतानाच नाशिकच्या प्रशासनाकडून 'हक्कभंग' झाल्याचा प्रकार समोर आला आहे. डिसेंबरमध्ये शिवसेना मंत्र्यांचा दौरा हा अधिकृत होता काय, अशी शंका प्रशासनाने उपस्थित केली. यातून विधिमंडळ सदस्यांच्या व त्यातही मंत्र्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाने केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मंत्र्यांनी भेट दिलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे प्रस्तावच रद्द करण्याची किमयाही प्रशासनाने साधलेली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या २२ आमदारांनी ग्रामीण भागात जावून शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन करीत जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत या शिष्टमंडळाने केली. राज्यभरात दौरे झाल्यानंतर शिंदे यांनी अहवाल तयार करुन तो शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यावर प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आल्याने शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना देण्यात आले असता, हा दौरा अधिकृत (सरकारी) होता काय, असा प्रश्नच जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. जिल्ह्याचे राजशिष्टाचार अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना या दौऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. मंत्र्यांच्या `ओएसडीं`कडूनच हा दौरा आल्याचे खेडकर यांनी सांगितले. त्यामुळे कार्यवाही नाही, तर किमान या बैठकीचे इतिवृत्त तरी द्या, असे आर्जव गोडसे यांनी केले. शिवसेना नेत्या तथा राजशिष्टाचार समितीच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी याबाबत माहिती घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीच्या क्रेटमधून बॅटरीजची चोरी!

0
0

अनिल रामलाल वर्मा (२३) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी चोरीच्या तब्बल ३२ बॅटरी हस्तगत केल्या आहेत. मूळ मध्य प्रदेश राज्यातील इंदूर येथे राहणारा वर्मा काही महिन्यापूर्वी नाशिकमध्ये आला. थोड्याच दिवसात त्याने सिडको परिसरातील सिंहस्थनगर येथे बस्थान बसवले. दरम्यानच्या काळात सिडको, उत्तमनगर, कामटवाडे, अंबड भागात बॅटरी चोरीच्या गुन्ह्यांनी कळस गाठला. दुचाकी, कार, ट्रक, टेम्पो, रिक्षा अशा वेगवेगळ्या वाहनांतील बॅटरींची सातत्याने चोरी होत असल्याने वाहनचालक धास्तवले.

वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे तसेच अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पो​लिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी बॅटरी चोरीच्या गुन्ह्याकडे लक्ष दिले. पवननगर ते मोरवाडी या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला असता संशयित अनिल वर्मा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. याबाबत बर्डेकर यांनी सांगितले, की चोरीसाठी घराबाहेर पडणारा अनिल आपल्यासोबत भाजी ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे क्रेट घ्यायचा.

अगदी दोन मिनिटात वाहनाची बॅटरी खोलून तो क्रेटमध्ये टाकयाचा. यानंतर कधी सायकल तर कधी मोटारसायकलने घरी पोचायचा. चोरी केलेल्या बॅटऱ्या त्याने भद्रकाली परिसरातील भंगार विक्रेत्यांना विक्री केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे बर्डेकर यांनी स्पष्ट केले. संशयित ​अनिल वर्माकडून एकूण ३२ बॅटरी हस्तगत करण्यात आल्या असून त्याची किंमत २ लाख १० हजार रुपये इतकी असल्याचे तपास अधिकारी हवालदार दत्तात्रय विसे यांनी स्पष्ट केले. वर्माला अटक करण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक इगोले, रवींद्र सहारे, अनिल दिघोळे, शंकर काळे, विजय वरंडळ, धनंजय दोबाडे, रावजी मगर, दत्ता गोरे आदींनी प्रयत्न केले.

सिडको सॉफ्ट टार्गेट सिडकोत नागरिकांकडून आपली वाहने उघड्यावर किंवा घरासमोरील रस्त्यावर उभी केली जातात. अशा वाहनांवर अनिललने लक्ष केंद्रीत केले होते. या गाड्यांमधील बॅटरी अगदी दोन मिनिटात काढण्याचे कसब वापरून तो घटनास्थळावरून फरार व्हायचा. भाजीच्या क्रेटमध्ये बॅटरी ठेवली जात असल्याने कुणाला संशय देखील येत नव्हता. मात्र, अखेर तो पोलिसांच्या ताब्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांची गर्दी; अभिषेकाचा मान पाटण्याच्या दांपत्याला

0
0

म. टा, वृत्तसेवा, सटाणा

श्री मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथील १०८ फूट उंच भगवान ऋषभदेव यांच्या मांगी पर्वतावरील मूर्तीचा महामस्ताकाभिषेक सोहळा सकाळी ११ वाजेच्या सुमारास धार्मिक व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. मुख्य अभिषेक सिद्धीकलश स्वरूपात सर्वाधिक बोली बोलणारे कमलकुमार जैन आहरा (बिहार) यांना सत्पनीक मिळाला. यानंतर २१ प्रकारच्या विविध अभिषेकाच्या बोलींनी गुरुवारी भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीवर १०८ प्रमुख इंद्र इंद्रायणीच्या सहाय्याने महामस्ताकाभिषेक सोहळा संपन्न झाला.

देवस्थानच्या वाहनाने ऋषभगिरीवर जाण्यासाठी सोय करण्यात आली होती. सुमारे दहा वाहनांद्वारे एका वेळी १५ ते २० जणांना जाण्याची सोय असल्याने सकाळपासूनच सर्वेतोभद्र महल येथे कुटुबीयांनी गर्दी केली होती. तत्पर्वी बुधवारी या अभिषेक सोहळ्यासाठी विविध प्रकारच्या बोली बोलण्यात येवून अभिषेकांचा बहुमान देण्यात येत होता.

सर्वप्रथम प्रथम कलश सिद्धी कलश या जलाभिषेकाचा बहुमान बिहार राज्यातील पाटणा जवळील आहरा येथील कमलकुमार जैन यांनी मिळविला. त्यांच्या वतीने सर्वप्रथम जलाभिषेक करण्यात आला. यानंतरचा बहुमान वीरेंद्र हेगडे, अनिल कुमार जैन, मूर्तीकार सी. आर. पाटील यांना देण्यात आला. अभिषेक सोहळ्यासाठी परमपूज्य गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी, अर्यिका श्री चंदनामती माताजी, कर्मयोगी पीठाधीश स्वस्तिश्री रवीद्रकिर्ती स्वामीजी व आचार्य अनेकान्त सागरजी यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक उत्सव व विधी संपन्न झाला. अभिषेकांनी भगवान ऋषभदेव यांना प्रसन्न करण्यात आले. यानंतर पुष्पवृष्टी होवून आरती व शांतीधारा करण्यात आला. दिवसभर ऋषभगिरी पर्वतावर अभिषेक करण्यासाठी जाणाऱ्या जैन भाविक व महिला भक्तगणांना प्रवेश देण्यात येत होता. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होवू नये याची काळजी व्यवस्थापनाने घेतली होती. मात्र, अभिषेक सोहळ्यासाठीही विशेष निमंत्रित असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. तर पर्वतावर जाण्यासाठी देवस्थानची वाहने असल्याने मोठी झुंबड दिसून येत होती. यावेळी देवस्थानच्या वतीने व शासनाने बांधण्यात आलेल्या लिप्ट तयार झाल्याने भाविकांना येजा करण्यासाठी मोठी सोय झाली होती. चारपैकी तीन बाजूच्या लिप्ट सुरू झाल्याने या लिप्टच्या सहाय्याने भगवान ऋषभ यांच्या माथ्यापासून महामस्तकाभिषेक करण्यात आला. संजय पापडीवाल, सुमेर काला, सुवर्णा काला, प्रमोद कासलीवाल, भूषण कासलीवाल, प्रमोद जैन, पारस लोहारे आदींनी महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. महामस्तकाभिषेक समारंभ ६ मार्च २०१६ पर्यंत सुरू असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुक उमेदवारांचा सिव्ह‌िलमध्ये गोंधळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस भरतीसाठी फिटनेस सर्टीफिकेट घेण्यासाठी सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये गर्दी केलेल्या उमेदवारांनी गुरूवारी सकाळी गोंधळ घातला. काही उत्साही मुलांनी शुल्क भरणा केंद्राच्या खिडकीची काच फोडल्यानंतर सिव्ह‌िल प्रशासनाने बाह्य रुग्ण तपासणी विभाग बंद करीत पोलिसांना पाचारण केले.

पोलिस दलातील शिपाई पदाच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी गुरूवारपर्यंत मुदत होती. दरम्यान, अर्ज भरताना शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याची माहिती उमेदवारांपर्यंत पोहचली. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याची बाब सरकारने यापूर्वीच स्पष्ट केली होती. स्वसाक्षांकित अर्जाद्वारे आपण मैदानी चाचणी परीक्षेत पात्र असल्याचे लेखी सुध्दा पुरे होते. मात्र, सिव्ह‌िल हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडील प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अफवा पसरल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली. बाह्य रुग्ण तपासणी विभागात प्रमाणपत्र वितरणासाठी एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने उमेदवारांना दिवसभर ताटकळत उभे राहवे लागत होते. त्यातच गुरुवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने सकाळपासून उमदेवारांनी गर्दी केली.

वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने काही उमेदवारांचा संताप अनावर झाला. त्यातील काहींनी शुल्क भरणा केंद्राच्या खिडकीची काच फोडली. यानंतर सिव्ह‌िल प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काही वेळातच सरकारवाडा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, बहुतांश उमेदवारांनी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगत तेथेच ठाण मांडले. सदर प्रमाणपत्र आवश्यक नसल्याचे पत्रक प्रशासनाने काढल्यानंतर सुध्दा उमेदवार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी उमेदवारांची समजूत काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्याभरात सापडले नऊ कॉपीबहाद्दर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुरुवारपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवशी कम्पलसरी विषय असणाऱ्या इंग्रजीच्या पेपरला जिल्ह्यात ९ कॉपी बहाद्दरांवर भरारी पथकाने कारवाई केली. तर, नाशिक विभागात हीच संख्या १३ वर गेली. पहिल्याच दिवशी कॉपीबहाद्दरांच्या इराद्याने बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानासमोर आव्हान उभे केले आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमक शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ८४ परीक्षा केंद्रांवर इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला. काही ठिकाणी भरारी पथकांमनी केलेल्या कारवाईत ९ विद्यार्थ्यांवर कॉपी केस दाखल करण्यात आली. विभागात नंदूरबार जिल्ह्यात २ तर जळगाव जिल्ह्यातही २ अशा एकूण १३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातून ६९ हजार विद्यार्थ्यांनी तर नाशिक विभागात नाशिकसह धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यांमधून १ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.

कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, महिला भरारी पथक अशी विविध स्तरावर भरारी पथके तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांच्या रोजच्या भेटींसह विविध परीक्षा केंद्रांवर पथकांच्या अचानक भेटी असणार आहेत. कुठल्याही परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना शंका असल्यास त्यांनी परीक्षा केंद्रातील कार्यालयाशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर पसरणाऱ्या परीक्षा विषयक वृत्ताची खात्री यंत्रणेकडून करूनच विश्वास ठेवावा, असेही आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, इंग्रजी पाठोपाठ आता शनिवारी (दि.२०) मराठी व इतर भाषांचा पेपर होईल. तर सोमवारी (दि.२२) रोजी हिंदी विषयाचा पेपर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांच्या इतिहासाचा अॅप्समधून जागर

0
0

राकेश हिरे, कॉलेज क्लब रिपोर्टर

तब्बल ४०० वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयावर विराजमान असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास त्यांच्या कर्तृत्वाची आणि असामान्यत्वाची प्रचिती देत आला आहे. आतापर्यंत पुस्तकांमधून वाचनात येत असलेला इतिहास आता स्मार्टफोनवर विविध अॅपमध्ये उपलब्ध झाल्याने शिवरायांच्या इतिहासाची इत्यंभूत माहिती तंत्रज्ञानाशी समरस असलेल्या तरुण पिढीपर्यंत पोचणार आहे. यातून शिवकालीन विचारांचा प्रसार होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व हे प्रत्येकासाठी स्फूर्ती देणारे आहे. कुशल प्रशासक, पराक्रमी योद्धा, आज्ञाशील पुत्र, जाणता राजा अशा अनेक अंगांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व महत्त्वाचे मानले जाते. एकाच वेळी अनेक बलाढ्य शत्रूंशी लढून रयतेसाठी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या शिवरायांनी जगाला आदर्श घालून दिला. गडकिल्ल्यांच्या मदतीने आणि निष्ठावंत सहकाऱ्यांच्या साथीने महाराजांनी स्वराज्यनिर्मिती करून न्याय, नीती, स्वातंत्र्य आणि समानतेचा मूलमंत्र जोपासला. शिवरायांचा हाच वैभवशाली इतिहास आजपर्यंत अनेक संदर्भ पुस्तके, कादंबऱ्यांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचला. सध्याच्या हायटेक पिढीपर्यंतही हा इतिहास पोचावा या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या अॅप्स मधून शिवरायांच्या कर्तृत्वाचा अभ्यास करता येणार आहे. या अॅप्समध्ये शिवरायांच्या जन्मापूर्वीची तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, परकीय राजसत्ता, शिवरायांनी जिंकलेले किल्ले, वेगवेगळ्या ऐतिहासिक घटना, स्वराज्यासाठी आखलेल्या मोहिमा अशा अनेक गोष्टींची माहिती मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातून शिवरायांचे आणि इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

असेे आहेत अॅप

शिवाजी महाराज हिस्टरी, स्वराज्य माझ्या राजाचं, गडवाट, जाणता राजा शिवाजी महाराज, रयतेचा राजा शिवछत्रपती, शिवाजी द ग्रेट किंग असे अनेक अॅप गुगलच्या प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. त्यातून शिवरायांच्या वैभवशाली इतिहासाची माहिती दिली जाते. या अॅप्सवर शिवरायांचे तसेच गड किल्ल्यांचे विविध फोटो सुद्धा उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेषाधिकारांची माहिती पोहोचवावी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'विधानमंडळ सदस्यांच्या विशेषाधिकारांबाबत माहिती आपल्या सहकाऱ्यापंर्यंत पोहचवावी,' असे आवाहन विधान परिषद विशेषाधिकार समिती प्रमुख तथा विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात उत्तर महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

समिती सदस्य तथा आमदार डॉ. अपूर्व हिरे, विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलीस आयुक्त् एस. जगन्नाथन, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, उपसचिव नंदलाल काले, डॉ. संतोष भोगले, जिल्हाधिकारी दीपेद्र सिंह कुशवाह

आदींसह विभागातील एकूण ४३१ अधिकारी उपस्थित होते. अशा स्वरूपाचा पहिला प्रयत्न असल्याचे सांगून डॉ. कळसे यांनी विधीमंडळाच्या विशेषाधिकारांबाबत सोदाहरण माहिती दिली. काले यांनी सादरीकरणाद्वारे 'विधानमंडळाचे विशेषाधिकार' या विषयावर विधानमंडळ सचिवालयाकडून तयार करण्यात आलेल्या माहितीचे सादरीकरण केले. तर डॉ. भोगले यांनी विधानमंडळ सदस्यांना द्यावयाच्या सौजन्य व सन्मानाच्या वागणुकीविषयी असणाऱ्या विविध परिपत्रकातील तरतुदींची माहिती दिली.

राजशिष्टाचाराबाबत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यात समन्वय प्रस्थापित करुन हक्कभंगासारखे प्रकार टाळता येणे शक्य असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले. शासकीय विभाग प्रमुखांबरोबर शासकीय विश्रामगृह येथे अनौपचारीक चर्चा करण्यात आली.



शिवसेनेची बांधिलकी जनतेशी

सत्तेत असूनही विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणे किंवा प्रशासनाला निवेदन द्यावे लागणे म्हणजे शिवसेनेची जनतेशी बांधिलकी असल्याचे शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे. सरकारमध्ये असतानाही शिवसेनेला भाजपकडून विश्वासात घेतले जात नाही का, या प्रश्नावर त्यांची घालमेल मात्र दिसून आली. अखंड महाराष्ट्र रहावा, असी शिवसेनेची भूमिका आहे, त्यामुळे राज्याच्या एखाद्या भागावर अन्याय होत असेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो.मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत केलेले विधान हे धक्कादायक याबाबत मुख्यमंत्र्यांनी शेट्टी यांच्याकडे विचारणा करावी, अशी आग्रही मागणी गोऱ्हे यांनी केली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांचे जन्मस्थान टाकतेय कात!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या भगूर येथील जन्मस्थानाला झळाळी देण्याचे काम महाराष्ट्र पुरातत्व विभागाने हाती घेतले आहे. यासाठी ५६ लाख रूपये खर्च केले जाणार आहेत.

भगूर येथील या वास्तूत २८ मे १८८३ रोजी वि. दा. सावरकरांचा जन्म झाला काही दिवसांनंतर ते ही वास्तू सोडून बाहेर गेले. त्यानंतर ही वास्तू दुसऱ्यांच्या ताब्यात होती. सरकारने विशेष प्रयत्न करुन तत्कालिन मालकाच्या ताब्यातून जागा घेत त‌चिा जीर्णोध्दार केला. तेव्हापासून या वास्तूला भेट देण्यासाठी भारतातूनच नव्हे; तर जगभरातून पर्यटक येत असतात. शाळेच्या सहली, सावरकर प्रेमी, इतिहास तज्ज्ञ येथे येऊन अभ्यास करतात. या वास्तूचे काम मातीतील असल्याने झालेली झीज भरुन काढण्यासाठी पुरातत्व विभागाने ५६ लाख रुपये मंजूर केले असून, जीर्णोध्दाराचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे.

सावरकराच्या वाड्यातील अंगण मातीचे होते. पाऊस जास्त झाल्यावर तेथे मोठ्या प्रमाणात चिखल साचत होता. साचलेल्या चिखलामुळे भिंतीत पाणी मुरुन ओल निर्माण झाली होती. त्याकरिता पुरातत्व विभागाने अंगणात पाणी साचू नये यासाठी दगडी फरशा टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी नगर जिल्ह्यातून विशिष्ट प्रकारचा दगड मागव‌ण्यिात आला असून, नाशिक व नगरच्या कारागीरांकडून तो घडवून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाड्यातील लाकडाला काही ठिकाणी वाळवी लागली होती. तसेच जूनी लाकडे झिजली होती. ती बदलून नवीन लाकडे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लाकडाच्या कामासाठी राजस्थानहून कारागिरांना पाचारण केले आहे. मजबूतीसाठी त्यावर रासायनिक प्रकिया करण्यात येत आहे.

पावसामुळे काही ठिकाणचे पत्रे गंजले होते ते काढून त्याजागी नवीन पत्रे टाकण्यात येत आहेत. तसेच धान्य साठवण्याची बळद आतल्या भागातून खराब झाली होती. त‌चिेदेखील काम करण्यात आले आहे. चारही बाजुच्या भिंतीतून पाणी झिरपत होते. यामुळे भिंतीतील खुंट्या खराब झाल्या होत्या. त्या खुंट्यांवर रासायनिक प्रक्रिया करुन नव्याने बसवण्यात येत आहे. तसेच भिंतीतील कोनाडे आढ्याचे लाकूड यावर देखील रासायनिक प्रक्रिया करण्याच काम सुरू आहे. संपूर्ण वाड्याच्या भिंती मातीच्या असल्याने त्यांना पोपडे पडले होते. जूनी माती काढून त्या जागी नव्याने मातीचा लेप लावण्याचे काम सुरू आहे. काही भागातील पाटई खराब झाली होती ती बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

कर्मचारी निवास

या ठिकाणी रात्रीच्यावेळी कर्मचारी राहात नसल्याने वास्तूकडे नीट लक्ष दिले जात नव्हते. यासाठी याच आवारात कर्मचाऱ्यांसाठी निवास बांधण्याचे काम सुरू करण्यात आले असून येथे दिवस रात्र पहारा असणार आहे.

चित्रफित दाखवणार

आलेल्या पर्यटकांना सावरकरांच्या जीवनाची माहिती व्हावी याकरता कमी मिनिटांची चित्रफित तयार करुन त्याद्वारे सावरकारांचा इतिहास उलगडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे जुने फोटो पुनरुज्जिवीत करुन त्याचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात येणार आहे.

सावरकारांच्या जन्मस्थानाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसंेदिवस वाढते आहे. वातावरणामुळे येथील काही भागाची डागडूजी करण्याची गरज होती. त्यादृष्टीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी विभागाने ५६ लाख रुपये मंजूर केले आहे.

श्री. श्री. घारपुरे,

अधिकारी पुरातत्व विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंडांच्या दहशतीने धास्तावला नागरिक

0
0

गुंडांच्या दहशतीने धास्तावला नागरिक



म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

वाढत असलेल्या गुंडगिरीच्या प्रकारांमुळे नाशिकरोड परिसरातील नागरिकांवर भीतीचे सावट पसरले आहे. खून, मारामाऱ्या, धमक्या यासारखे प्रकार नाशिकरोड भागात सातत्याने घडत आहेत. या गुंडगिरीचा लवकरच बिमोड करु असे अश्वासन पोलिस देत असले तरी सामान्य जनता मा‌त्र धास्तावल्याचे चित्र आहे.

नाशिकरोड परिसरात गेल्या वर्षभरात गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. येथील आर्टिलरीरोडवरील जैन भवनसमोर प्रॉपर्टी डिलर रणजित मंगवाना यांची मंगळवारी रात्री डोक्यात गोळ्या घालून पत्नीसमोर हत्या करण्यात आली होती. अगदी महिनाभरापूर्वीच जेलरोड प्रेस शेजारील रस्त्यावर बोलणाऱ्या प्रेमींना टोकले म्हणून प्रेमीने दोघांची लोखंडी पाईपने हत्या केली होती. रोकडोबावाडीत आर्केस्ट्राची वर्गणी दिली नाही म्हणून गरीब व्यावसायिकाची पिता-पुत्रांनी तलवारीने हत्या केली होती. देवळाली गावातील राजवाडा येथे एकाचा खून करुन त्याचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकण्यात आला होता. जेलरोडला रंगपंचमीदिवशी टोळक्याने युवकाचा खून केला होता. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला टाकळीत युवकाचा खून झाला होता. त्यानंतर उपनगरमध्येही गणेशोत्सवात एकाची भोसकून हत्या करण्यात आली होती.

शहराच्या विकासाला बाधा आणण्यासोबतच सामान्य माणसाला सुन्न करणाऱ्या अशाच या घटना असल्याची चर्चा या भागातील नाग‌रिकांमध्ये सुरू आहे. सातत्याने होत असलेल्या हत्यांमुळे आपलं कोणी बरं-वाईट तर करणार नाही ना?, अशी भीती वाटत असल्याचे अनेकांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. पूर्ववैमनस्य असेल, पैशांचे प्रकरण असेल किंवा प्रेमाची भानगड, या गोष्टी थेट हत्येपर्यंत पोहोचत असल्याने या भागातील रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी या गुंडगिरीवर वचक ठेवावा, अशी मागणी होत आहे.






















मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images