प्रा. डॉ. विवेक खरे
भारतातील एक अग्रगण्य विद्यापीठ असलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ मागील आठवड्यापासून सर्वच प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांतील चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. हैदराबादमधील केंद्रीय विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी चळवळीचे केंद्र असलेल्या 'जेएनयू'तील घटनाघडामोडींनी देशाच्या राजकारणाचा एक हिणकस चेहरा जगासमोर येतो आहे. देशप्रेम, देशद्रोह या शब्दांच्या नवीन व्याख्या आज जन्माला येत आहेत. भारताच्या समाजकारणावर आणि राजकारणावर दूरगामी परिणाम घडवून आणणाऱ्या या घटनांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
जगाच्या विविध भागातून 'जेएनयू'त विद्यार्थी शिकायला येतात. वेगवेगळ्या जाती धर्माच्या, विचारसरणीच्या तसेच सांस्कृतिक पृष्ठभूमी असलेल्या या विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे जगभरात अत्यंत आदराने पाहिले जाते. शिक्षणाबरोबरच समाजातील वैचारिक विश्वात या विद्यार्थ्यांचे योगदान आजवर महत्त्वपूर्ण राहिले आहे. भारतच नव्हे तर जगातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांसारख्या अनेक क्षेत्रात हे विद्यार्थी आपली चमकदार कामगिरी करीत आले आहेत. मुक्त वैचारिक अवकाश, देशातल्या तसेच जगातल्या सामाजिक प्रश्नांवर सातत्याने घडणाऱ्या चर्चा, विचार आणि वर्तन यातील सैलपणा, सर्व प्रकारच्या विचारसरणीचा आदर ठेवून आपली निश्चित अशी भूमिका तयार करण्यावर असलेला विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचा भर अशा अनेक गोष्टींमुळे वैशिष्टपूर्ण असलेले हे विद्यापीठ आहे. प्रकाश करात, सीताराम येचुरी, नीला सत्यनारायण अशी आज राजकारणात सक्रिय असलेली नेतेमंडळी याच विद्यापीठातून शिकून पुढे आलेली आहेत. या विद्यापीठात जर काही विद्यार्थी आपण ज्या देशात राहतो त्याच्या विरुद्धच घोषणाबाजी करीत असतील, कट -कारस्थाने रचत असतील तर ही बाब नक्कीच असमर्थनीय आहे. तिचा निषेध झालाच पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला राजकीय हेतूने प्रेरित होऊन विद्यार्थ्याना सत्ताधाऱ्यांनी वेठीस धरणे हे देखील चुकीचे आहे.
विद्यापीठांच्या नेमक्या कार्याविषयी सांगतांना पंडित नेहरू म्हणतात, की 'मानवतावाद, सहिष्णुता, विवेक, कल्पनांचे साहस आणि सत्याचा शोध घेणे व मानवी उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाणे हे विद्यापीठांचे काम आहे.' आज भारतातील विद्यापीठे ही उद्दिष्टे पूर्ण करतांना दिसतात काय असा प्रश्न पडतो. विद्यार्थी म्हणजेच युवक ही देशाची शक्ती आहे असे अभिमानाने आपण म्हणतो. भारत हा आज तरुणांचा देश आहे असेही उच्चरवाने सांगण्यात येते आहे. या तरुणांनीच देशातील विशिष्ट विचारसरणी माननाऱ्या राजकीय पक्षाला सत्तासोपानापर्यंत पोहचविले. सत्ता मिळाल्यावर मात्र विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा एककलमी कृतिकार्यक्रम सत्ताधाऱ्यांकडून हाती घेण्यात आला आहे असे चित्र निर्माण झाले आहे. विद्यार्थी चळवळी आणि त्यांच्या आडून होणारे राजकारण याचादेखील या अनुषंगाने विचार करायला हवा.
जगात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या काळात विद्यार्थ्यांच्या चळवळी जन्माला आल्या. पुढे या चळवळीतून त्या त्या देशाला काही चांगले नेतेही मिळाले. विद्यार्थी चळवळ आणि राजकारण यांच्यात नेहमीच घनिष्ट संबंध राहिला आहे. भारतात तर स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यापासूनच विद्यार्थी चळवळी निर्माण झाल्याचे चित्र दिसते. शहीद भगतसिंग यांनी विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्यांनी व त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांनी 'नौजवान भारत सभा' नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. स्वातंत्र्योत्तर काळात विविध पक्षांच्या भूमिकांवर आधारलेल्या युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संघटना जन्माला आल्या. 'युवक काँग्रेस' 'युवक क्रांतिदल' 'ऑल इंडिया स्टूडंटस फेडरेशन', 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद', 'ऑल इंडिया शीख स्टूडंटस फेडरेशन', यांसारख्या विद्यार्थी संघटना आपापल्या पक्षीय विचारसरणी बरोबर घेवूनच सक्रिय राजकारणात पुढे आल्या. या संघटनांमधून आणि चळवळीतूनच देशाला चांगले नेतृत्व करणारे नेतेही मिळाले. देशपातळीवर विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांसारखे तर राज्यासह देशपातळीवर आपल्या वक्तृत्वाची भुरळ घालणारे प्रमोद महाजन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांचा उल्लेख करता येईल. बदलत्या काळानुसार मात्र विद्यार्थी संघटनाचे आणि त्यांच्या मागे असलेल्या राजकीय पक्षांच्या राजकारणाचे स्वरूपही बदलू लागल्याचे दिसते.
वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आज शिक्षण घेणारी तरुण विद्यार्थ्यांची पिढी विचार करू लागली आहे. समाज व्यवस्थेची, धर्म व्यवस्थेची चिकित्सा करू लागली आहे. त्या व्यवस्थेला प्रश्न विचारू लागली आहे. जागतिकीकरणाच्या युगात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगातल्या मानवतावादी चळवळीशी आपल्याला जोडून घेवू लागली आहे. अशा या विचारी पिढीवर स्वार होऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करीत आहे. विद्यापीठीय विद्यार्थी संघटनांना आपल्या ताब्यात घेवू पाहत आहे. दिल्लीपासून ते अगदी नाशिकपर्यंतही हेच चित्र अनुभवायला मिळत आहे. अर्थात यात काही गैर असण्याचे कारणही नाही. मात्र यातून काही धोकेही निर्माण होत आहेत हे खरे! पक्षीय राजकारणाचा भाग झालेल्या या विद्यार्थी संघटनांमध्ये आज निकोप राजकारण राहिले नाही. त्यांच्या निवडणुकीत अपप्रवृतींचा शिरकाव झाला. महाविद्यालये, विद्यापीठांच्या वर्गाबाहेर असणारे राजकारण वर्गातल्या बेंचपर्यंत येवून ठेपले. डावा-उजवा, पुरोगामी-प्रतिगामी अशी बिरुदे लावून विद्यार्थ्यांमध्ये भेद केला जावू लागला. त्यांना विशिष्ट धर्म, विशिष्ट जातीत, पंथात आणि विचारसरणीत बंदिस्त केले जावू लागले. स्वत:हून विचार करण्याची, भूमिका ठरवण्याची त्यांची बौद्धिक शक्तीच नष्ट केली जावू लागली. राज्यघटनेने त्यांना दिलेल्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याला नख लावण्याचे काम सगळ्याच पक्षांनी करायला सुरुवात केली. त्यातूनच मग या विद्यापीठांमध्ये संघर्ष निर्माण होत गेले.'जेएनयू'तील वर्तमान संघर्ष हा देखील याला अपवाद नाही. मागील ५७ वर्षांपासून या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेवर डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टूडंटस फेडरेशन, ऑल इंडिया स्टूडंटस युनियन, स्टूडंटस फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांचे वर्चस्व राहिले. उजव्या विचारांच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने असंख्य प्रयत्न करून देखील त्यांना विद्यापीठाच्या संघटनेवर ताबा मिळविता आला नाही. देशात आपले सरकार असूनही आपण काहीच करू शकत नाही या म्हणून मग दमनशाहीच्या मार्गाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न ही संघटना आणि तिच्या मागे असलेले सरकार करू पाहते आहे. त्यामधूनच ही संघर्ष मालिका निर्माण झाली आहे. अर्थात सूडबुद्धीने केल्या जाणाऱ्या या राजकारणात विद्यार्थ्यांची देशनिष्ठा, देशप्रेम आणि त्यांचे विद्यार्थीपण हरवू नये ही अपेक्षा सर्वसामान्य माणसांना वाटणे स्वाभाविक आहे.
(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट