म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
'देशहितासाठी सावरकरांनी मांडलेले विचार जातपात विरहित असून, त्यामुळेच आजचा विचारवंत माणूस व समाज त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी धडपडत आहे. स्वा. सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस व डॉ. आंबेडकर एकत्र असते तर भारत पूर्वीच महासत्ता झाला असता', असे प्रतिपादन पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस. झेड. देशमुख यांनी केले. भगूर येथील स्वा.सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ते बोलत होते.
अभिनव भारत व जॅक्सन वधाची कहाणी या विषयावर संमेलनातील बीजभाषणातून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. सावरकारांची जन्मभूमी अर्थात भगूर येथील तुळसा लॉन्स येथे भगूर शिक्षण मंडळ, मुंबईची स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक समिती, औरंगाबाद येथील स्वा.सावरकर प्रेमी मंडळ, ठाणे येथील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व भगूर नगरपालिका यांच्यावतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सावरकर जन्मस्थानकात ध्वजारोहण करण्यात आले. येथील शिवाजी चौकातून शहरातील प्रमुख मार्गावरून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. नाशिकच्या तालरुद्र ढोलताशा पथकाने यात सहभाग घेतला. विविध क्रांतीकारकांची माहिती असलेल्या १८ पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
त्यानंतर डॉ. मंगला वैष्णव, मेधा कुलकर्णी, स्नेहल पाठक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्यिक योगदान, या विषयावर परिसंवादात आपले विचार व्यक्त केले. तिसऱ्या सत्रात हिंदुत्व आणि सावरकरांची विज्ञाननिष्ठा, या विषयावर प्राचार्य डॉ. रमेश जलतारे, डॉ. वि. ल. दारूरकर यांनी आपले मनोगत मांडले. चौथ्या सत्रात सावरकर एक विचार, या विषयावरील चर्चेत पार्थ बाविस्कर, प्रियंका सोनवणे यांनी सहभाग घेत सावरकरप्रेमींना वैचारिक मंथन घडविले.
नूतन प्राथमिक विद्यामंदिर, नूतन हायस्कूल व तिजाबाई झंवर विद्यामंदिराच्या अडीच हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस वंदे मांतरम्..., जयोस्तुते... तसेच ने मजसी ने... या गीतांचे सादरीकरण केले. दीपा शेंबेकर या युवतीने पुणे ते भगूर असा सुमारे २२० किमीचा सायकल प्रवास करीत संमेलनात सहभाग घेतला. नाशिकच्या बागेश्री वाद्यवृंदातर्फे यावेळी सावरकरांना संगीतमय आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष चंद्रकांत शहासने, मार्गदर्शक एकनाथ शेटे, निमंत्रक भाऊ सुरवडकर, कार्यवाह मिलिंद रथकंठीवार, प्रख्यात व्याख्याते वा. ना. उत्पातशास्त्री, विजय करंजकर, नगरध्यक्षा अनिता करंजकर, उपनगराध्यक्षा शैलजा कापसे, मुख्य अधिकारी संगीता नांदुरीकर यासह विविध मान्यवर, उपस्थित होते. दिवसभर हे संमेलन सुरू राहिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट