प्रा. डॉ. विवेक खरे
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे मागील वर्षभरात विविध नाट्य तसेच एकांकिका स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळविलेल्या राज्यातील सर्वोत्तम सहा एकांकिकांचा महोत्सव राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये मागील दोन दिवसांपूर्वीच या महोत्सवातील एकांकिका बघण्याचा आनंद घेता आला.
मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, औरंगाबाद आणि नागपूर येथील तरुण नाट्यकर्मींनी निर्माण केलेल्या या एकांकिका विषय-आशय आणि सादरीकरण या सर्वच बाबतीत आपले वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या होत्या. मानव आणि मानवाच्या सामाजिक पर्यावरणातील विविध प्रश्नांचे दर्शन त्यातून घडविण्याचा स्तुत्य प्रयत्न तरुण नाट्यकर्मी गंभीरपणे करू पाहत आहेत हे आशादायक चित्र आहे.
मागील ३०-३५ वर्षांत मराठी नाट्यवाङमयात 'एकांकिका' या नाट्य प्रकाराने मोलाची भर घातली आहे. कलात्मकता आणि प्रयोगशीलता यामुळे हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीवर सर्वस्वी वेगळा ठरला आहे. एकांकिका हा नाटकासारखाच पण स्वतःच स्वतंत्र अस्तित्व असणारा असा वाङमय प्रकार आहे. एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक असे म्हणता येते, पण ती एक अंकी जरी असली तरी तिच्या त्या एका अंकामध्ये संपूर्णतः आणि स्वयंपूर्णतः असते. एखादी घटना, एखादी स्थिती किंवा एखाद्या घटनेचा एक भाग तिच्यात सादर करता येतो. एकेरी कथानक, पात्रांची मर्यादित संख्या, कमीत कमी कालावधीत साधलेली आशयघनता, विषयाचे वेगळेपण, संवाद आणि संवादभाषेतील सामर्थ्य अशी तिची गुण वैशिष्ट्ये असतात. विजय तेंडूलकर, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवार, पु. ल. देशपांडे, सतीश आळेकर, चं. प्र. देशपांडे, प्रेमानंद गज्वी अशा मराठी साहित्यातील दिग्गज नाट्यलेखकांनी एकांकिका या नाट्यप्रकाराला उंचीवर नेऊन ठेवले. मध्यमवर्गीय जाणिवांचे विषय, आशय विभिन्नता, शैलीची विविधता, प्रयोग तंत्रातील नाविन्यता अशा वैशिष्ट्यांनी मराठी एकांकिकांचे दालन या सर्वांनीच समृद्ध करून नवीन लेखक, दिग्दर्शक यांच्यासाठी एक सुपीक जमीन तयार करून ठेवली.
महाराष्ट्रात आज घडीला एकांकिकांच्या विविध स्पर्धा आयोजित होत आहेत. पुरुषोत्तम करंडक, सवाई महोत्सव, झी गौरव, लोकसत्ता लोकांकिका, पु. ल. करंडक, आय. एन. टी. इत्यादी स्पर्धांना
विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये या सर्व स्पर्धांमधून भाग घेण्याची व बक्षिस मिळविण्याची कायम चुरस असते. मागील काही वर्षांपासून महाविद्यालयीन तसेच विविध नाट्य संस्थांतर्फे सादर होणाऱ्या या स्पर्धांमधील एकांकिका रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊ लागल्याचे दिसते. सर्वोत्तम एकांकिका या उपक्रमातील एकांकिकाही याला अपवाद नव्हत्या.
वर्तमान स्थितीत मानवी समाज असंख्य प्रश्नांनी बेजार झालेला आहे. बेरोजगारी, आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, स्त्रीभ्रूण हत्या, महिलांचे शोषण, भ्रष्टाचार, हरवत चाललेली माणुसकी, माणसाचे आत्मकेंद्री होत शतखंडीत जगणे, दहशतवाद, अस्थिर जगण्याचे सतत मनावर असलेले सावट, विचारांची घुसळण, जागतिकीकरणाच्या रेट्यातून निर्माण झालेले प्रश्न तसेच मानवी वर्तणुकीतून निर्माण झालेले प्रश्न या सर्वांतून येणारी हतबलता, निराशा एकीकडे जोर धरत आहे, तर दुसरीकडे या सगळ्यांतून वाट काढीत, संघर्ष करीत जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती बाळगत माणूस करीत असलेले जीवनक्रमण असे दुहेरी वास्तव आपल्याला बघायला मिळते आहे. साहित्य, कला या मधूनही हे सगळं जिवंत होतांना दिसते आहे. भवतालाच्या या अस्वस्थ परिस्थितीचा वेध कलावंत घेऊ पाहतो आहे. कथा, कविता, नाटक, एकांकिका यांच्यामधून त्याचे हे प्रश्न मांडणे तसेच भवतालच्या समस्यांचा शोध घेणे चालूच आहे. सर्वोत्तम एकांकिकांमधूनही असाच तो घेण्याचा प्रयत्न केला गेलाय असे वाटते.
या महोत्सवात सादर झालेली 'जून जुलै' ही एकांकिका एचआयव्ही बाधित तरुण तरुणीच्या भावविश्वाचा उलगडा करणारी एकांकिका आहे. कोणाच्यातरी चुकीमुळे एड्स या भयानक रोगाला सामोरे जावे लागणारे हे दोघेजण जगण्याची जिद्द मात्र कायम ठेवतांना दिसतात. एकमेकांशी लग्न करून मरेपर्यंत तरी आधार होऊ या, असा आशावादी सूर व्यक्त करतात. प्रतिकात्मक शीर्षक, प्रभावी आणि मार्मिक संवादाद्वारे ही एकांकिका प्रेक्षकांबरोबरच संपूर्ण समाजाने एचआयव्ही बाधितांकडे तुच्छतेने नव्हे तर प्रेमाने बघायला सांगते. 'ड्रायव्हर' ही एकांकिका आयुष्यात संघर्ष करीत नवीन स्वप्न पाहणाऱ्या ड्रायव्हरची कथा सांगते. सरकारी नोकरी मिळवायची पण त्यासाठी दहावीची परीक्षा पास होण्याची जिद्द मनाशी बाळगणारा ड्रायव्हर बायको आणि मुलीच्या स्वप्नासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो, पण अपयश पदरात पडल्यावर निराश होतो. 'विश्वनटी' ही एकांकिका स्त्रीप्रश्नांची चर्चा करते. शरीर विकणारी वेश्या, तिची शिक्षण घेऊ पाहणारी मुलगी, समाजाचा त्या दोघींकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रेमाची फूस लावून शरीरसुख घेणारी पुरुषी मानसिकता आणि त्यातून त्या स्रीला राहिलेला गर्भ आपला नाहीच, असे सांगणारी दांभिकता अशा अनेक अंगाने ही एकांकिका स्त्रीच्या हालअपेष्टांचे, तिच्यावरील अनन्वित अत्याचाराचे वर्णन करते. काव्यात्मकतेने स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडत जाते. 'भक्षक' ही एकांकिका पर्यावरण संदेश देणारी आहे. वन्य प्राणी, त्यांचे नष्ट होणारे निवारे, त्यातून त्यांचे मानवी वस्तीत होणारे आगमन, त्यामुळे माणसांचेही धोक्यात आलेले जीवन, शहरांचा विकास, औद्योगिकीकरण, भुईसपाट होणारी जंगले, प्राणी तर प्राणी पण माणसांच्याही जीवन मरणाचा निर्माण झालेला प्रश्न ही एकांकिका मांडते. 'दृष्टी' ही अनंत सामंत यांच्या कथेवर आधारित एकांकिका दृष्टीहीनांचे प्रश्न, त्यांचा जगण्यासाठी चाललेली धडपड, दृष्टीच्या पलीकडील सृष्टीकडे सकारात्मकरित्या बघण्याची मानवाची गरज अधोरेखित करते. 'कस्टमर केअर' ही नाशिकच्या नाट्यकर्मींची एकांकिका माणसातील हरवत चाललेल्या संवेदनशीलतेवर भाष्य करते. शेतकऱ्याचे दु:ख, कॉल सेंटरवर लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या तरुणीचे दु:ख यांचा उलगडा करते.
या सर्वच एकांकिका वयाने तरुण असणाऱ्या लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी निर्माण केलेल्या आहेत. आशावाद हा त्यांचा स्थायीभाव आहे. आजचा तरुण हा समाजातील प्रश्नांबाबत सजग असलेला दिसतो. आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण ही तरुण पिढी करीत आहे. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्य निर्मिती आणि सादरीकरणातून प्रकर्षाने पुढे येते.
नवनवीन अचाट कल्पना वापरून, वास्तवाची त्याला जोड देऊन आपले म्हणणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अर्थात यात ते सर्वस्वी यशश्वी होत आहेत हा भाग जरी गौण असला तर कलेच्या माध्यमातून ते सातत्याने काहीतरी करीत आहेत हेही नसे थोडके!
(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट