खुटवडनगर भागातील कार्तिकेय नगरातील रहिवाशी महिन्याभरापासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत. याकडे कुणी लक्ष देत नसल्याने महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाला जाग आणण्यासाठी महिलांना हंडा मोर्चा काढावा लागला. यावेळी महिलांचा रोष पाहून पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
सध्या शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाणीटंचाईची दाहकता वाढीस लागल्याने कपातीवर भर देण्यात आला आहे. मात्र, आता एकवेळही पुरेसे पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कार्तिकेय नगरातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे महिलांनी हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. पाण्याची समस्या लक्षात घेता पोलिसांनी मध्यस्थी करीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना कार्तिकेय नगर येथे बोलावून निवेदन स्वीकारण्यास सांगितले. यावेळी महिलांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
एक वेळ का होईना परंतु, पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केला. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी बच्छाव व दादाजी आहेर यांनी धरणात पाणीसाठा कमी असल्याने पाणी कमी येत असल्याचे उत्तर दिले. यानंतर महिलांनी पुन्हा अधिकाऱ्यांना लक्ष करीत शहरात केवळ खुटवडनगर भागासाठी धरणात पाणीसाठा कमी झाला का असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे अधिकारीही निरुत्तर झाले. यानंतर महिलांना शांत करीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मकरंद वाघ, संजय पटेल, अतुल झोपे यांनीही महिलांसमवेत मोर्चात सहभाग घेतला.
चार घरांना पाणीच नाही महिनाभरापासून पाण्याची समस्या भेडसावत असताना कार्तिकेय नगरातील चार घरांना तर पिण्याचे पाणीच मिळत नाही. शेजारून अथवा हातपंपावरून पाणी आणण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. याबाबत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना माहिती असून देखील पाणी समस्येकडे काणाडोळा करीत असल्याचा आरोप चारही रहिवाशांनी केला.
पाणीपुरवठा अधिकारी नावालाच! सिडकोतील पाणीपुरवठा अधिकारी केवळ नावालाच असल्याचे प्रभाग बैठकीत नगरसेवक नेहमीच आरोप करीत असतात. प्रभागाच्या बैठकीत देखील अधिकारी नेहमीच उपस्थित राहत नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी नगरसेवकांनी वेळोवेळी केली आहे. परंतु, महापालिका आयुक्त नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नगरसेवक करतात. यात सिडकोच्या विस्तारलेल्या भागात सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व नगरसेवक यांच्याकडे कार्तिकेय नगरातील पाण्याच्या समस्येबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु, याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. अखेर महापालिकेच्या सिडको विभागाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढावा लागला. - मकरंद वाघ, रहिवाशी, कार्तिकेय नगर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट