म. टा. प्रतिनिधी, इंदिरानगर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने शहरातील अनेक रस्ते रिंगरोड म्हणून विकसीत केले आहेत. त्यातच गोविंदनगर येथून जाणारा रिंगरोड कार्यान्वीत करण्यात आला आहे. परंतु सिडकोकडून येतांना हा रस्ता अर्धवट सोडल्याने वाहनधारकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मनोहर नगरकडून सिटी सेंटर मॉलकडे जाताना असलेल्या चौफुलीवरच हा रस्ता आहे. याठिकाणी रस्त्याला डांबरीकरण न केल्याने या रस्त्यावर आता खडी आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. जड वाहनांसह सर्वच प्रकारची वाहने या रस्त्यावरून दररोज ये-जा करीत असल्याने, आता रस्त्यावरील दगडसुद्धा बाहेर येऊ लागले आहेत. डांबरीकरण नसल्याने या रस्त्यावरून वाहनांची येजा होताना खूपच धूळ उडत असते. त्यातच याठिकाणी पथदिपांचीही सोय नसल्याने रात्रीच्यावेळी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सिटी सेंटर मॉलजवळील सिंग्नलजवळच हा रस्ता अर्धवट राहिला आहे की ठेवला आहे?, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या रस्त्याचे तातडीने काम करून इतर रस्त्यांप्रमाणे याठिकाणीही डांबरीकरण करावे तसेच पथदीप बसवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महापालिकने डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरपासून थेट गंगापूररोड किंवा पंचवटीकडे जाण्यासाठीचा हा रिंग रोड तयार केला आहे. या रस्त्याचा बराचसा भाग गोविंदनगरमधून जातो. मागील काही महिन्यांपासून इंदिरानगर येथील उड्डाणपुलाचा बोगदा बंद असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बरीचशी कमी झाली होती. मात्र मागील आठवड्यात हा बोगदा सुरू केल्याने गोविंदनगर व मनोहर नगरमधील वाहतूक पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. शहराला वळसा न घालता लवकरात लवकर इंदिराकडे किंवा इंदिरानगरहून सातपूर, सिडकोकडे जाता यावे म्हणून या रस्त्याचा वापर होत असतो. मात्र हा रस्ता अर्धवट असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट