Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

प्लंबरने जोडले विनापरवानगी नळकनेक्शन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर महापालिकेची मंजुरी न घेता परस्पर कनेक्शन जोडून देणाऱ्या प्लंबर विरोधात सातपूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची प्राथमिक तक्रार कनेक्शन घेणाऱ्या व्यक्तीनेच महापालिकेकडे केली होती.

सातपूर पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, सातपूर परिसरातील भूवनेश्वरी भवनसमोरील सप्तशृंगी मंदिराजवळ राहणाऱ्या ज्वाला केदार मानसिंह यांनी २०१३ मध्ये महापालिकेचे नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयटीआय कॉलनी, श्रमिकनगर येथील प्लंबर गौतम श्रीराम गांगुर्डे याने कनेक्शन मिळवून देण्याची हमी दिली. तसेच, काही दिवसांनी कनेक्शन सुध्दा मिळवून दिले. नळाचे कनेक्शन मिळाले, पाणी ही सुरळीत होते. मात्र, पाणी बिलच मिळत नसल्याने मानसिंह यांनी महापालिकेकडे तक्रार अर्ज सादर केला. या तक्रार अर्जाची सविस्तर चौकशी केली असता मानसिंह यांना कनेक्शन दिल्याची कोणतीही नोंद महापालिका प्रशासनाला आढळून आली नाही. प्लंबर गांगुर्डेने परस्परच महापालिकेच्या पाइपलाइनवरून कनेक्शन घेतले असल्याचे समोर आले. त्यानुसार, महापालिका कर्मचारी अरविंद वामन जाधव यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गांगुर्डेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या माहितीपटांनी आणली रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नीफ फेस्टिव्हलमध्ये नाशिकच्या आठ व मालेगावची एक अशा नऊ माहितीपटांनी दुसरा दिवस गाजवला. सामाजिक संदेश देणाऱ्या या डॉक्यूमेन्ट्री दोन ते एकोणीस मिनिटे अशा वेळेच्या तयार करण्यात आल्या होत्या. अभिनेत्री सुरेखा कुडची स्मिता गोंदकर आणि ईशा परूळेकर या शुक्रवारच्या महोत्सवाच्या आकर्षण होत्या.

कुसुमाग्रज स्मारकातील मुक्तायन व विशाखा सभागृहात हा नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. नाशिक फोकस या शीर्षकाने झालेल्या सेशन तीनमध्ये नाशिक व मालेगाव येथील डॉक्यूमेन्ट्रीज दाखविण्यात आल्या. 'गोदावरीचे भविष्य हे आपलेच कर्तव्य' या प्रवीण पाटील दिग्दर्शित फिल्मने सुरुवात करण्यात आली. यात राकेश वाणी दिग्दर्शित व्हॉट नेक्स्ट, सिध्दान्त सावंत दिग्दर्शित यादें, शिमोन दिग्दर्शित शिक्षा, स्वप्नील अहिर दिग्दर्शित सिग्नल, अभिषेक दुबे दिग्दर्शित फिल्म मेकर, मिताली सेक्युरा दिग्दर्शित डेड एण्ड, प्रदीप देशमुख दिग्दर्शित इफ यू हॅव ब्रेन यूज हेल्मेट या नाशिकच्या डॉक्यूमेन्ट्रीज होत्या. तर, द लाफ्टर जर्नी ही एम. डी. मुर्तूजा दिग्दर्शित फिल्म मालेगावची निर्मिती होती. सेशन चारमध्ये पुण्याची भालचंद्र गायकवाड दिग्दर्शित 'बाजार' तर सेशन पाचमध्ये मुंबईची राजू पारसेकर दिग्दर्शित 'पोलिस लाईन : एक पुराना सत्य' ही फिल्म दाखविण्यात आली. या सर्व फिल्म विशाखा सभागृहात झाल्या. मुक्तायन सभागृहात दुपारी दोन वाजेपासून काही फिल्म दाखविण्यात आल्या. कुसुमाग्रज स्मारक येथे मोकळ्या जागेत लावण्यात येणारा रशियन डोम या नीफ फेस्टिव्हलचे खास आकर्षण ठरणार आहे.

आज प्रदर्शित होणाऱ्या फिल्म्स

विशाखा सभागृहात कॉर्न्व्हसेशन, मोक्ष, टू फेस, फिशरवूमन अॅण्ड टूक टूक, मिसाईल मॅन, कोती या फिल्म्स दाखविण्यात येणार आहेत. मुक्तायनमध्ये रेडरॅफ्ट, प्लेबॉय, फिर से, सुंदर, बेसिक, आयडेंटिटी, स्याही, टोलक, धन्य, इन ब्रॅकेट, नॉट म सीसीटिव्ही, राणी, घुसमट, स्केच ऑफ लाइफ, वैष्णवी, अनादर डे इन पॅराडाईस, बुध्दी के बल, सिक्का, संतूलन, साठवण, सुरुवात, हवा के पंख या फिल्म्स दाखविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीत रंगपंचमी रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात पाणीटंचाईचे सावट असताना नाशिक शहरात यंदा रंगपंचमी कोरडी साजरी होणार असल्याचे चिन्ह आहे. शहरात सर्वत्र शिवसेनेच्या वतीने पाणी बचतीचा संदेश दिला जात असून, सेनेचे बहुतांश नगरसेवक कोरडा रंग खेळावा, असे जनतेला आवाहन करीत आहेत.

दरवर्षी शिवसेनेच्यावतीने शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र, सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता अनेक नगरसेवकांनी टीकेचे धनी नको म्हणून रंगपंचमीच साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. भद्रकालीत गाडगे महाराज पुतळ्याजवळ माजी महापौर विनायक पांडे यांच्या वतीने रंगपंचमी साजरी करण्यात येते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचे कृत्रिम कारंजे लावले जातात. तसेच, कोरड्या रंगांची देखील उधळण केली जाते. दरवर्षी रंगपंचमीसाठी वापरण्यात येणारे पाणी विहिरीतील असले तरीही पाण्याचा अपव्यय नको म्हणून विनायक पांडे यांनी रंगपंचमीच साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना देखील सूचना देण्यात येत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी पाणी बचत करावी, असा संदेश देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भद्रकाली कारंजावर नवजीवन मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी रेन डान्सचे आयोजन केले जाते. यंदा मात्र दुष्काळामुळे रंगपंचमी कोरडी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवजीवन मित्र मंडळाचे पदाधिकारी माधव निमकर यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन प्रभागासाठी नव्हे; शहरासाठी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी सपत्नीक सुरू केलेले सभागृहातील ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे. पाटील यांच्या प्रभागात कोट्यवधीचें काम करण्याचा दावा करणाऱ्या प्रशासनावरच पाटील यांनी दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. तर आयुक्तांसह उपमहापौरांवर त्यांनी आगपाखड केली. दरम्यान, आपण प्रभागासाठी नव्हे तर शहराच्या प्रश्नांसाठी आंदोलनाला बसल्याचा दावा त्यांनी केला.

पाटील दाम्पत्याच्या ठिय्या आंदोलनावरून महापालिकेच उलटसुलट चर्चा सुरू असतांनाच, प्रशासनाकडून पाटील यांच्या आंदोलनात उपस्थित केलेल्या प्रश्नांना कागदोपत्री पुरावे देण्यात आले आहेत. त्यात पाटील यांच्या वॉर्डात कोट्यवधीची कामे केल्याचा दावा केला. मात्र, पाटील यांनी प्रशासन‍ दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. केवळ १४ कोटीची कामे झाली आहेत. तसेच आपण कोणतेही बेकायदा काम करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडे गेलो नसल्याचा खुलासा केला आहे. प्रशासनाने जनतेचे प्रश्न तत्काळ प्रश्न सोडवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे खोटे बोलत असून उपमहापौर गुरूमीत बग्गा वेळोवेळी भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आंदोलनामुळे भाजपची कोंडी

आपण प्रभागासाठी नव्हे शहरासाठी आंदोलन करत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. परंतु शहरसाठी आंदोलन आहे तर दिनकर पाटीलच का? अन्य नगरसेवक आंदोलनाला का बसले नाहीत? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आहे. शहरातील समस्यांसाठी आंदोलन आहे तर भाजपचे गटनेता व नगरसेवक असलेले भाजपचे शहराध्यक्ष सुद्धा यात सहभागी व्हायला हवेत, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

पाटील यांनी महिनाभर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपचीच कोंडी झाली आहे. येत्या २३ मार्च रोजी महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक आहे. तर पाटील स्थायीचे सदस्य असल्याने त्यांना मतदानासासाठी जावे लागेल. परंतु, पाटील यांचे ठिय्या आंदोलन असल्याने त्यांना सभागृह सोडता येणार नाही. त्यामुळे भाजपच्याच अडचणी वाढल्या आहेत. यावर कसा तोडगा काढायचा असा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅग्रीकल्चर हब वळाले थायलंडकडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक कृषी क्षेत्राला वरदान ठरेल अशा अॅग्रीकल्चर हबच्या निर्मितीसाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या राज्यातील १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर उद्योजकांच्या उदासीनतेमुळे पाणी सोडावे लागले आहे. ही गुंतवणूक थायलंडकडे वळाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी समर्थ पर्याय असल्याचा दावा करीत राज्य सरकारने जगभरातील कंपन्यांसाठी पायघड्या घातल्या आहेत. एकीकडे उद्योग क्षेत्राला आकर्षित केले जात असताना, कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला मात्र ग्रहण लागल्याचे चित्र आहे. भाजीपाल्यासह द्राक्ष, डाळिंब, कांद्याच्या निर्यातीत अग्रेसर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात 'अ‍ॅग्रीकल्चरल हब' निर्मितीसाठी आशियाई विकास बँकेचे अर्थसहाय्य घेतले जाणार होते. बँकेने १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी दर्शविली होती. सरकार आणि उद्योजकांच्या भागिदारीतून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार होता. पिंपळगाव बसवंत येथे अ‍ॅग्रीकल्चरल हब तयार केले जाणार होते. त्यासाठी बाजार समितीची १० एकर जागा भाडे कराराने ३० वर्षांसाठी घेण्याचे नियोजन होते. हब निर्मितीसाठी सुमारे २९ कोटी रुपये खर्च केला जाणार होता. या हबमध्ये कोल्ड स्टोअरेज, द्राक्ष आणि डाळिंबाचे पॅक हाऊस, वेअर हाऊस, फळ पिकविण्यासाठीचे चेंबर, भाजीपाला पॅक हाऊस आणि कांदा साठवण केंद्र निर्माण करण्यात येणार होते. या हबलाच संलग्न असे ८ स्पॉक मॉडेल्स प्रत्येकी दोन एकर जागेत उभारले जाणार होते. त्यांतर्गत सिन्नर येथे भाजीपाला पॅक हाऊस, कांदा साठवण केंद्र, द्राक्ष आणि डाळिंब पॅक हाऊस, तर देवळ्यात द्राक्ष, डाळिंब व कांदा पॅक हाऊसची निर्मिती करण्याचे विचाराधीन होते.

काय होता प्रकल्प? नाशिकबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथेही अशा प्रकारचे पॅक हाऊस, कांदा साठवण केंद्र केले जाणार होते. तर जळगाव जिल्ह्यात चार ठिकाणी केळी पॅक हाऊस केंद्र उभारण्यात येणार होते. ही सर्व केंद्रे ३० वर्षांनंतर बाजार समितीकडे हस्तांतरीत केली जाणार होती. शेतमालाची गुणवत्ता आणि साठवण क्षमता वाढविण्यासाठी या सुविधांचा फायदा होणार होता. मात्र, उद्योजकांचा पाठिंबा न मिळाल्याने आणि बाजार समित्यांनीही जागा उपलब्ध करून देण्यास उदासिनता दाखविल्याने हा प्रकल्प कागदावरच राहिल्याची माहिती कृषी पणन बोर्डच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीतील कलाकुसरीची पॅरिसवासीयांना भुरळ!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com नाशिकरोडच्या आम्रपाली झोपडपट्टीत तयार होणाऱ्या कापडी पिशव्या आता थेट पॅरिसच्या मॉलमध्ये जाणार आहेत. या पिशव्यांवरील वारली पेंटिंगची फ्रान्सवासियांना भुरळ पडली आहे. पिशव्यांची मोठी ऑर्डर झोपडपट्टीतील महिलांना प्राप्त झाली आहे. याद्वारे नाशिक हे पॅरिसशी जोडले जातानाच, झोपडपट्टीतील महिलांच्या सबलीकरणालाही मोठे बळ मिळणार आहे. आम्रपाली झोपडपट्टीमध्ये गेल्या काही वर्षांपासून कापडी पिशव्यांची निर्मिती केली जाते. स्नेहल एकबोटे या तरुणीने वारली पेंटिंगची जोड दिल्याने या उद्योगाला नवा आयाम प्राप्त होऊन पिशव्यांची मागणी वाढली आहे. चित्रांची आवड असलेल्या स्नेहलने नाशकात बीव्हीए तर मुंबईत एमव्हीएचे शिक्षण घेतले. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढल्याने तिने अॅड. राजपाल राणा यांच्या मदतीने काच, कचरा गोळा करणाऱ्या स्त्रियांसाठी वेगळे काही तरी करावे, त्यांना शिकवावे या हेतूने पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. पिशव्या सजवल्या तर त्यांचा खप वाढेल असे त्यांच्या मनात आले. मग स्नेहलच्या मदतीने वारली चित्रकलेचे ट्रेनिंग सुरु झाले. स्नेहलला त्यांना फक्त चित्र शिकवायचं नव्हतं, तर एक वेगळी चित्रभाषा द्यायची होती. स्त्री अन् पुरुष यांचे वेगवेगळे फॉर्म समजावून देताना माणूस शिकवायचा होता. म्हणून गाणे, खेळ यातून त्यांचा मोकळेपणा हवा होता, जवळीक, विश्वास हवा होता. या सगळ्या भगिनी विषयाच्या जवळ आल्या. कागदानंतर कापडावर वारली चित्र रंगवू लागल्या. आनंद घेत होत्या. आपल्या शिवलेल्या पिशव्या अधिक सुशोभित करू, अशा विश्वासाने एकमेकींशी बोलत होत्या. आम्रपालीमधील महिला सुंदर बॅग शिवायला शिकल्या. आता त्या बॅग स्वतः सजवून विकत आहेत. या बॅग म्हणजे त्यांचे कमवायचे सेकण्ड ऑप्शन नसून फर्स्ट ऑप्शन झालाय. पॅरिस येथील स्नेहलच्या मैत्रीणी अॅनी सलोनी आणि अॅलन सेनी यांनी नुकतीच या महिलांनी तयार केलेल्या पिशव्यांवरील कलाकुसर पाहून तेथील मॉलसाठी चांगली ऑर्डर दिली आहे. सध्या तेथील महिला ती ऑर्डर पूर्ण करण्याचे काम करीत आहे.

कचरा वेचणाऱ्या हातांनी साधली किमया कचरा वेचतांना पेन्सिल कचऱ्यात सापडली होती. पण त्या पेन्सिलचा उपयोग कागदावर काही तरी उमटवण्यासाठी होतो हा वेगळा अनुभव त्या दिवशी तेथील महिला घेत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अवर्णनीय होता. मध्येच चुकताना त्यांना येणारे हसू, शिकलो नाही याची खंत, पोरांना शिकविण्याची धडपड अशा अनेक गप्पांतून वर्ग चालू होता. स्नेहलला हे सर्व आव्हानात्मक वाटत होते. पण घरी निघतांना त्यांनी काढलेले वारली चित्रांचे फॉर्म चांगले जमले होते. ज्या हातांनी पेन्सिल कधी हाती धरली नाही, त्यांनी ही किमया केलेली होती.आम्रपालीतील महिलांनी बनवलेल्या पिशव्या अत्यंत सुबक कलाकुसरीच्या असून, पॅरिसच्या ऑर्डरनंतर अनेक लोकांनी संपर्क साधला आहे.

स्नेहल एकबोटे, वारली प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या परीक्षेत सापडले आठ बोगस विद्यार्थी

$
0
0

इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये दहावीचा पेपर सुरू असतांना आठ बोगस (डमी) विद्यार्थ्यांना नाशिक येथील शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

गुरुवारी इतिहास, राज्यशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना शहरातील महात्मा गांधी हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर बोगस (डमी) विद्यार्थी पेपर लिहीत असल्याची तक्रार नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे आली. भरारी पथकातील उपशिक्षण आधिकारी एस. जी. मंडलीक यांनी परीक्षा केंद्रावर धाड टाकली असता आठ बोगस विद्यार्थी सापडले. या बोगस विद्यार्थ्यांनी लिहलेले पेपर सील करून शिक्षण विभागाकडे जमा करण्यात आले आहेत. इगतपुरी पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयीत विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानाचा उपयोग समाजासाठी, देशासाठी करा

$
0
0

पूनम अहिरे, कॉलेज क्लब रिपोर्टर

विद्यार्थ्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी, देशासाठी करावा. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊ असे नाही, परंतु अपयशाला न घाबरता सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले. के. के. वाघ इंजिन‌िअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल विभागाकडून आयोजित 'मेकहेवन' या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर विभागप्रमुख मिलींद मुरुगकर व मेकहेवनचे समन्वयक प्रा. प्रवीण सुरवाडे उपस्थित होते. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहे.

यांत्रिकी क्षेत्रातील कल्पकतेचा आविष्कार म्हणून 'मेकहेवन' या स्पर्धेकडे पाहिले जाते. दोन दिवसीय या स्पर्धेत लेझर मेज, लेथ वार, गुगलहंट, बाईक मेनिया, पिक्सेल इन, ट्रेजर हंट, बेग बॉरो स्टील, रोबो सॉकर, रोबो रेस, क्लॅश ऑफ कॅनॉन, पेपर प्रेझेंटेशन आदी स्पर्धा घेण्यात आल्या.

टेक्नोशेल कंपनीचे सीईओ अब्बास आबुजीवाला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शुभम महाजन, शर्वरी सोनार यांनी केले. विभागप्रमुख मुरुगकर यांनी आभारप्रदर्शन केले. गोकार्ट व बाजा स्टुंडट यांनी बनविलेल्या मोटारीचे व मेकहेवनच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. विद्यार्थी समन्वयक हर्षल गोरे, ईश्वरी टेभुर्णीकर, संजय सिंग, मयूर महाजन, निखिल लभडे आदींनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२१ गावांची जबाबदारी येणार पाटलीण बाईंकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात एकूण ६५ गावांमध्ये पोल‌िस पाटील भरतीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्यांदाच सरळ भरती होत असल्याने सर्व उमेदवारांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. महिला आरक्षण धोरणाप्रमाणे यावेळी २१ गावात महिला पोल‌िस पाटील नेमण्यात येणार आहे.

तालुक्यात पोल‌िस पाटील भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातून अवचितवाडी, कुऱ्हेगाव, जानोरी, शेणीत, खेड, साकुर, ठाकूरवाडी, टाकेद खुर्द, वाकी, घोटीखुर्द, कोरपगाव, भंडारदरावाडी या गावात खुल्या प्रवर्गातील पाटलांची भरती होत आहे.

तालुक्यात एकूण अठरा गावात प्रथमच महिला आरक्षण धोरणानुसार महिला पोलिस पाटील निवड होणार आहे. यात खुल्या प्रवर्गातून गोंदेदुमाला, तळोशी, अधरवड, निनावी, अडसरे खुर्द, उभाडे, खैरगाव, गडसांगवी, परदेशवाडी, इतर मागास प्रवर्गातून दौडत, बलायदुरी, पिंपळगाव घाडगा, मायदरा, कावनई, काळुस्ते, धारगाव तर मोडाळे येथे भटके विमुक्त प्रवर्गातून तर वाघेरे येथे विमुक्त जाती (अ) या प्रवर्गातील महिला पोल‌िस पाटलांची निवड होणार आहे.

पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ झाल्याने अनेकांचे नियुक्तीकडे लक्ष लागले आहे. लेखी परीक्षा होणार असल्याने काही प्रमाणात का होईना या पदावर सुशिक्षित व्यक्तीची नेमणूक होणार आहे.



अठरा गावांत महिलाराज

तालुक्यातील अठरा गावात महिला पोल‌िस पाटील नियुक्त होणार असल्याने आता सरपंच, उपसरपंच पाठोपाठ पाटीलकीही महिलांकडे जात आहे. तालुक्याचे वैशिष्ट्ये म्हणजे महत्त्वाच्या व पुढारलेल्या दौंडत, पिंपळगाव घाडगा, कावनई, काळुस्ते ,धारगाव, गोंदेदुमाला, तळोशी, अधरवड, निनावी, उभाडे, गडगडसांगवी, मोडाळे, वाघेरे या गांवाची जबाबदारी पाटलीन बाईंच्या हाती जाणार आहे.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ स्टेशनांमध्ये नाशिकरोड सहावे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

देशातील पहिल्या १० स्वच्छ स्थानकांमध्ये नाशिकरोड रेल्वेस्टेशनने सहावे स्थान मिळवले आहे. अशी कामगिरी करणारे मध्य रेल्वे विभागातील एकमेव स्थानक आहे. रात्रंदिवस राबणारे स्वच्छतेचे दूत हे या यशाचे रहस्य आहे.

नाशिकरोड रेल्वेस्टेशन कुंभमेळा काळात चौथे स्थानक उभारण्यात आले. कुंभच्या दरम्यान विविध सुविधा स्थानकात निर्माण करण्यात आल्या. त्याचाही वाटा नाशिकरोडच्या यशात आहे. चौथे स्थानक वाढले परंतु, स्वच्छता कर्मचारी तेवढेच असतानाही हे यश मिळाले आहे.

स्वच्छता दुतांना श्रेय

ठेकेदारीवर २६ कर्मचारी आणि रेल्वेचे १० सफाई कर्मचारी स्वच्छतेचे कार्य पार पाडतात. आरोग्य निरीक्षक जितेंद्र कोठावदे, सुपरवायझर गोपाल पथरोड यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदारीवरील मुकेश कागडा, जितेश सोहत्रे, अमर कर्डक, राहुल खरोसिया, निलेश पंडित, विजय पगारे, सुरेश पगारे, मंगेश भालेराव आदी तर रेल्वेचे फारुक कुरेशी, सुपडू गोविंद, खंडू निकम, कुसमबाई पगारे, सुमन पगारे आदी स्वच्छतेची जबाबदारी पार पाडतात.

असे चालते कार्य

स्वच्छतेसाठी ३६ कर्मचारी २४ तास राबतात. जनरल ड्युटीमध्ये १७ जण काम करतात. रात्री व पहाटेच्या ड्युटीत किमान ४ जण हजर असतात. रेल्वे रुळावर ब्लिचिंग पावडर तर स्टेशनवर माशांच्या प्रतिबंधासाठी प्लाईग कीटर औषध फवारण्याचे काम ते करतात. प्रत्येक गाडी गेल्यावर रुळावरील कचरा कर्मचारी उचलतात. त्यांना मास्क, हातमोजे आणि गमबूट दिले जातात. जेट मशिनने पाणी फवारून चारही स्टेशन सतत स्वच्छ ठेवली जातात.

पहिले दहा स्टेशन्स

१) बियास, २) गांधीधाम, ३) वास्को द गामा, ४) जामनगर, ५) कुंभकोणम, ६) नाशिकरोड, ७) सालेम, ८) अंकलेश्वर, ९) खाटगाव, १०) कोविलपट्टी

नाशिकरोडला देशातील दहामध्ये स्थान मिळाल्यामुळे अत्यानंद होत आहे. याचे श्रेय रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांना जाते. प्रवाशांनी स्टेशन स्वच्छ राहील यासाठी सहकार्य करावे.

- एम. बी. सक्सेना,

नाशिकरोड स्टेशन प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तम कामगिरी, तरीही बांधकामांवर बंदी

$
0
0

कचरा व्यवस्थापनात देशामध्ये नाशिक सहाव्या तर राज्यात दुसऱ्या स्थानी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या खत प्रकल्पावरून हरित लवादाने शहरातील बांधकाम परवानगी थांबवली असतांनाच, केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात कचरा व्यवस्थान विल्हेवाटमध्ये नाशिकचा देशात सहावा क्रमांक लागला आहे. विशेष म्हणजे कचरा व्यवस्थापनात नाशिक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे, अमरावती या महापालिकांचा क्रमांक नाशिकनंतर आहे. परंतु, तरीही हरित लवादाने नाशिकच्या बांधकामांवर बंदी घातली आहे. त्यामुळे नाशिकवर अन्याय झाल्याची भावना बिल्डर, आर्किटेक्ट यांच्यासह महापालिकेला आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांअर्गत नगरविकास विभागाने देशातील ७९ महापालिकांचे सर्व्हेक्षण केले. त्याचा निकाल १५ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात नाशिक हे ३१ व्या क्रमांकावर आले होते. परंतु, या सर्व्हेक्षणात कचरा व्यवस्थापन व त्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात स्वतंत्र निरिक्षकामार्फत या शहरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात नाशिकचे गुणांकन राज्यात अव्वल नोंदले गेले. स्वच्छता निरीक्षकांनी स्थानिक नागरिकांचे मते जाणून घेत, कचरा व्यवस्थापना संदर्भात स्वंतत्र गुणांकन केले. यात नाशिकला २०० पैकी १८५ गुण मिळाले. त्यानुसार नाशिक कचरा व्यवस्थापनात देशात सहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कर्नाटकातील म्हैसूर आहे. त्यापाठोपापाठ इंफाळ, दिल्ली, नवी मुंबई, हैद्राबाद या शहरांचा समावेश आहे. राज्यात नवी मुंबई प्रथम स्थानी असून त्यानंतर नाशिकचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्याच स्वच्छता अभियानात नाशिकचे कचरा व्यवस्थापन उत्तम असतांनाही याच कचरा व्यवस्थापनावरून हरित लवादाने तीन महिन्यापासून नाशिकच्या परवानग्या थांबविल्या आहेत. खत प्रकल्पासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर हरित लवादाने ही कारवाई केली आहे. केंद्राचाच्य सर्व्हेक्षणात नाशिकची चांगली कामगिरी असतांना हरित लवादाकडून घातलेल्या बंदीमुळे नाशिकवर अन्याय झाल्याची भावना आता व्यक्त होत आहे. नाशिकपेक्षा पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाणे यांचे गुणांकन कमी आहे. असे असतांनाही या शहरात सर्रास बांधकामे सुरू आहेत. हरित लवादाने नाशिकच्याच बाबतीत कठोर भूमिका घेतल्याने नाशिकचा विकास थांबल्याची भावना बिल्डर, आर्किटेक्ट यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे या सर्व्हेक्षणाच्या आधारे तरी हरित लवादाने आपल्या आदेशावर पुनर्विचार करावा अशी मागणी केली जात आहे. महापालिका देणार अहवाल

हरित लवादातील बांधकामावरील सरसकट बंदी उठविण्याच्या याचिकेवर आता २१ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी महापालिकेकडून केंद्राचा कचरा व्यवस्थापनातील हे सर्व्हेक्षणच सादर केले जाणार आहे. या सर्व्हेक्षणात नाशिकची कामगिरी उत्तम असल्याने बंदी उठविण्याची मागणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईत आयुक्तांचा पुढाकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य सरकारने निर्देशित केल्यानुसार नुकताच जलसप्ताह साजरा करण्यात येत आहे. मनपाने देखील आठवडाभर कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. याच पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. नामदेवराव भोसले यांनी कसलीही तमा न बाळगता शहरातील विविध नाल्यांमध्ये उतरून स्वत: गाळ काढून स्वच्छताही केली.
महापालिकेच्या वतीने शहरातील निरनिराळ्या भागात साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. भोसले यांनी आपल्या सफाई कर्मचाऱ्यांचे पथक सोबत घेवून स्वत: या मोहिमेत सहभागी झाले. या परिसरातील लेंडीनाल्यात वाहून येणारी घाण आणि गाळ यामुळे प्रवाह थांबला होता. परिणामी घाण पाणी साचल्याने दुर्गंधीसह आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.
डॉ. भोसले यांनी कसलीही तमा न बाळगता नाल्यात स्वत: उतरून हातात फावडे घेवून गाळ काढायला सुरुवात केली. त्यांना काम करताना पाहून इतर कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह संचारला आणि अवघ्या काही वेळातच नाल्यातील गाळ काढून प्रवाह मोकळा करण्यात आला. तसेच झाडाझुडपांमध्ये गडप झालेला नाला जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मोकळा करण्यात आला. महापौर जयश्री अहिरराव यांनी भेट देवून पाहणी केली.
कोरडी होळी साजरा करा

यंदा राज्यातील तब्बल पंधरा हजारांहून अधिक गावे दुष्काळी म्हणून सरकारने घोषीत केली आहेत. त्यापैकी ११ हजार गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. यामुळे यंदाची होळी साजरी करण्यासाठी पाण्याचा वापर होऊ नये अशीच अपेक्षा आहे. पाण्याचा अपव्यव झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. ही वेळ धुळेकर जनतेवर येऊ नये यासाठी नागरिकांनी कोरडी होळी साजरी करावी, त्यासाठी मंडळांसह संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी धुळेकरांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनाच निर्यातदार बनविण्याचा उद्देश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांनी पिकविलेला अधिकाधिक माल निर्यात व्हावा. त्यास चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, या उद्देशाने कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या कंपन्या बनविण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनाच निर्यातदार बनविणे हा आमचा उद्देश असून, त्यांना आठ दिवसांचे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये दिली. ताजी फळे व भाजीपाला निर्यातीक‌रिता हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. विभागीय कृषी सहसंचालक आणि संचालक फलोत्पादन यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब थोरात सभागृहात ही एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वास, कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन संचालक डॉ. एस. एस. अडसूळ, मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधक केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, शेतकरी मूळ उत्पादक आहे. त्यामुळे त्याचा माल कोणत्या साखळीतून जातो याची माहिती त्याला पारदर्शक पध्दतीने मिळायलाच हवी. ही माहिती त्याच्यापासून लपवून ठेवणे योग्य नाही. निर्यातीचा परवाना कसा मिळवावा, स्वत: माल कसा निर्यात करावा याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार करून एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांना ही माहिती देता यावी त्यांचे आठ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग घेणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. युरोप, जापान, अमेरिका आणि तत्सम देशांमध्ये जास्तीत जास्त शेतमाल निर्यात करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशातून परदेशात जेवढी द्राक्ष निर्यात होतात, त्यापैकी ९५ टक्के द्राक्ष महाराष्ट्रातून जातात. देशातून निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी ७७ टक्के आंबा महाराष्ट्रातील असतो. देशात परदेशात निर्यात होणाऱ्या कांदा आणि डाळिंबापैकी ४८ टक्के कांदा तर ८१ टक्के डाळिंब महाराष्ट्रातूनच पाठविले जातात, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

तालुकानिहाय कृषी ट्रेनर करणार तयार निर्यातक्षम माल कसा पीकवावा, तो परदेशात पाठविण्यासाठीची प्रक्रिया आदींबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कृषी प्रशिक्षक नेमण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्या त्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम हे प्रशिक्षक करतील, अशी माहिती या कार्यक्रमात देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा भाजपविरोधात आक्रोश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिकच्या प्रश्नांवरअन्यायाविरोधात राज्यात सत्तेत असूनही शिवसेनेचे ऐकूनघेणाऱ्या भाजप विरोधातील तीव्र संताप शिवसेनेने शनिवारी रस्त्यावर उतरून व्यक्त केला. शिवसेनेने धडक मोर्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत, भाजपविरोधात एल्गार पुकारला. हजारोच्या संख्येने शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून भाजपाला सडेतोड उत्तर देत, नाशिककरांवरील अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा दिला. पाणी, वीज, उद्योग, एकलहरे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनावरून शिवसेनेने भाजपला घेरत जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या भाजपचे स्थापत्य महासंघापाठोपाठ शिवसेनेच्या धडक मोर्चामुळे तोंडचे पाणी पळाले आहे.

भाजप सरकारच्या नाशिक संदर्भातील अन्यायी धोरणासंदर्भात शिवसेनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालवर धडक मोर्चा काढण्यात आला. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूका असल्याने शिवसेनेने एकाचवेळी धडकमोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शन करत, भाजपलाही प्रतिउत्तर दिले आहे. संपर्क प्रमुख अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात, माजी मंत्री बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह खासदार, आमदार सहभागी झाले होते. शालीमार येथून बारा वाजता या धडकमोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात बैलगाडी, चित्ररथ, कलापथके, रिकाम्या हंड्यांसह महिला व गाड्यांवर लावलेले कार्टून्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. भाजपविरोधातील तीव्र संताप व्यक्त करणारा मजकूर नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला होता. संपूर्ण मोर्चात शिवसेनेच्या वतीने भाजपलाच लक्ष करण्यात आले होते. भाजपने केलेल्या अन्यायाचे पोस्टर्स व छायाचित्र मोर्चात लावण्यात आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला असता, यावेळी शिवसैनिक व पोलीस आमने सामने आले. शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु पोल‌िसांनी तो हाणून पाडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लोटालोटी झाल्याने शिवसैनिकांनी गेट तोडले. त्यामुळे आंदोलकांना आवरण्यासाठी पोल‌िसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. त्यांनतर शिवसेनेनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिपेद्रसिंह कुशवाह यांच्याशी चर्चा करत, निवेदन दिले. सरकार नाशिकवर अन्याय करत असल्याच्या भावना नेत्यांनी व्यक्त केल्या, तर तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहचवतो असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

गिरीश महाजनांना शिव्याशाप संपूर्ण धडक मोर्चात शिवसेनेकडून भाजप आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना लक्ष करण्यात आले होते. मोर्चात सहभागी मोर्चेकऱ्यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल अश्लील घोषणा देत, त्यांची टिंगलटवाळी केली. नाशिकचे पाणी पळविणाऱ्या महाजनांच्या नावाने अक्षरश: खडी फोडण्यात आली. 'गिरीश महाजनचे करायचे काय, खाली डोके वरती पाय', 'भोंगळा कारभार भाजपचा, सत्यानाश नाशिकचा', 'धरण उशाशी नाशिककर उपाशी','नागपूरकरांना प्रकाश नाशिककरांना करून भकास' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसैनिकांच्या या घोषणा ऐकून रस्त्यावरील नागरिकसुद्धा आश्चर्यचकीत झाले होते.

नाशिककर वेठीस रम्यान, शिवसेनेच्या मोर्चाने शहरातील सर्व वाहतुकीचे नियोजन कोलमडले होते. मोर्चासाठी बाहेरून वाहने आल्याने सगळीकडे ट्रॅफिक जाम झाल्याने नाशिककरांना हालअपेष्टांचा सामना करावा लागला. शाल‌िमार, सीबीएस, रविवार कारंजा, जुने नाशिकच्या परिसरात हा मोर्चा असल्याने पोल‌िसांनी या भागातील वाहतूक बंद केल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे भाजपच्या अन्यायाविरोधात सेनेने काढलेला मोर्चा हा उलट नाशिककरांसाठी डोकेदुःखी ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौधरी यांच्या वकीलपत्राची शहानिशा

$
0
0

नाशिक : बाळासाहेब अनंत चौधरी हे वकील नसताना वकिली करतात अशी तक्रार अॅड. आर. डी. बाफना यांनी केली असून, त्याबाबतचा गुन्हा सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे.

या पार्श्वभूमीवर गोळे कॉलनी पोस्ट ऑफीस जवळ राहणाऱ्या बाळासाहेब अनंत चौधरी यांना कोणत्याही प्रकरणात वकील म्हणून हजर होण्यासाठी तसेच वकीलपत्र दाखल केसेसमध्ये प्रथम ते वकील म्हणून कामकाज करू शकतात, याबाबतची शहानिशा करावी, असा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अरुण ढवळे यांनी​ दिले आहेत. याबाबतचे माहिती पत्र नाशिक जिल्ह्यातील वकील संघांच्या अध्यक्षांना माहितीस्तव देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीटंचाईची सोसवेना झळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीकरांना अभूतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मार्च महिन्यातच पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. मार्चमध्येच चार टँकरने देवळालीकरांना पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, पाणी जपून वापरा, असे कळकळीचे आवाहन केले जात आहे. देवळालीसह लष्करी भागावर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. प्रशासनाने देवळालीच्या सहा चाळ, हाडोळा, कॅथे कॉलनी, स्टेशनवाडी, साठे नगर परिसरात चार टँकरने सकाळी ११ वाजेपासूनच पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ केला. त्यासाठी बोर्डाच्या ताब्यात असलेल्या चार विहिरींमधून टँकरद्वारे गरजू भागात पाणी पोहचविण्यात येत आहे. या टँकमधून किमान दिवसभरात १० लाख लिटर पाण्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक वार्डासाठी आज दि. २० पासून स्वतंत्र टँकरची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती बोर्ड प्रशासनाचे जलअभियंता आर. सी. यादव यांनी दिली. २७ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी. टंचाई काळात महत्त्व ओळखून पाणी जपून वापर करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी केले आहे.

स्वखर्चातून पाणीवाटप लामरोड युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोडसे व त्यांच्या पत्नी नगरसेविका आशा गोडसे यांनी स्वखर्चातून वार्ड क्रमांक चारमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने खासगी टँकरद्वारे ओम शांती नगर, ६ नं. नाका, साकूरकर चाळ, विठ्ठलवाडी, लामरोड आदी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.

सहाचाळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांसाठी टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापुढेही टंचाईत मदत करावी. - संगीता जाधव, नागरिक

पाणीटंचाई ओळखून बोर्डाने किमान प्रत्येक घराला २०० लीटर पाणी उपलब्ध होईल, अशी सोय करावी. यामुळे टंचाईची झळ कमी होईल. - सुनीता आडके, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज स्मारकात आज ‘नीफ’चा समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीन दिवस चाललेल्या नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा आज, सोमवारी समारोप होणार आहे. यावेळी कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा आणि मुक्तायन सभागृहात काही फिल्म्स दाखविण्यात येणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमात नामांकने जाहीर करण्यात येणार असून, नीफ मास्टर शेफ, नीफ टॉक शो हे कार्यक्रम होणार आहेत.

शनिवारी विशाखा सभागृहात कॉर्न्व्हसेशन, मोक्ष, टू फेस, फिशरवूमन अॅण्ड टूक टूक, मिसाईल मॅन, कोती या फिल्म्स तर मुक्तायन सभागृहात रेडरॅफ्ट, प्लेबॉय, फिर से, सुंदर, बेसिक, आयडेंटिटी, स्याही, टोलक, धन्य, इन ब्रॅकेट, नॉट म सीसीटिव्ही, राणी, घुसमट, स्केच ऑफ लाइफ, वैष्णवी, अनादर डे इन पॅराडाईस, बुध्दी के बल, सिक्का, संतूलन, साठवण, सुरुवात, हवा के पंख या फिल्म्स दाखविण्यात आल्या. सामाजिक विषयांबरोबरच काही रोमॅन्टीक विषयांवरही फिल्म्स होत्या.

रशियन डोम ठरला खास आकर्षण कुसुमाग्रज स्मारक येथे मोकळ्या जागेत लावण्यात आलेला रशियन डोम या नीफ फेस्टिव्हलचे खास आकर्षण ठरला. नाशिकमध्ये पहिल्यांदाच असा डोम उभारण्यात आला असून, आतमध्ये ३६० डिग्रीमध्ये चित्र दिसते. बच्चे कंपनीसाठी हा डोम म्हणजे उत्सवच ठरला असून, आतमध्ये थ्रीडी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. आतमध्ये ३५ माणसे बसू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपतराव काळे यांचे संचालकपद रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

पिंपळगाव मोर सहकारी सोसायटीचे संचालक नसल्याच्या कारणावरून सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपतराव काळे यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संपतराव काळे हे सत्ताधारी गटाकडून निवडून आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संचालक मंडळात मतभेद निर्माण झाल्याने संपतराव काळे यांनी आपला स्वतंत्र गट निर्माण केला. दरम्यान, या राजकीय मतभेदामुळे दोन्ही गटामध्ये हेवेदावे सुरू झाले. यात पिंपळगाव मोर येथील सोसायटीचे चेअरमन राजाराम काळे यांनी संपतराव काळे हे सध्य स्थितीत पिंपळगाव मोर सोसायटीचे संचालक नसल्याने त्यांचे बाजार समितीचे संचालक पद रद्द करावे, अशी मागणी सहकार विभागाकडे केली होती.

सहकार विभागाने पिंपळगाव मोर सोसायटी, घोटी बाजार समिती यांच्‍याकडून याबाबतचा खुलासा मागून खातरजमा केली. दरम्यान, संपतराव काळे यांनी सुनावणीमध्ये ते पिंपळगाव मोर सोसायटीचे संचालक असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे जिल्हा सहाय्यक निबंधक यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्नन पणन (विकास व नियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५/१ मधील तरतुदीनुसार संपतराव काळे यांचे घोटी बाजार समितीचे सदस्यत्व संपुष्टात आले असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांनी प्राप्त अधिकारानुसार घोटी बाजार समितीचे संचालक संपतराव संतू काळे यांना संचालक पदावरून दूर करीत असल्याचा आदेश दिला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती, उपसभापतींना ठरवा अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीला तसेच सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. या मागणीवर लागलीच कारवाई झाली नाही, तर सोमवारपासून कामबंद करण्याचा इशारा विविध कर्मचाऱ्यांनी संघटनांनी दिला आहे.

इगतपुरी पंचायत समितीचे सभापती गोपाळ दगडू लहांगे यांनी बदलीच्या कारणावरून मोबाइल फोनवरून अश्लिल शिवीगाळ केल्याची तक्रार विजयकुमार ढवळे यांनी दिल्यानंतर भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत कर्मचारी असलेल्या ढवळे यांना लहामगे यांनी काही दिवसांपूर्वी मोबाइलद्वारे कॉल करून बदलीच्या प्रकरणावरून शिवीगाळ केली होती. या संभाषणाचे ऑडिओ व्हॉटस अॅपवर व्हायरल झाले. दरम्यान, ढवळे यांच्याप्रमाणे इतर कर्मचारी सुध्दा पुढे आले असून, त्यांनीही तक्रारीचा पाढा वाचला आहे. महिला कर्मचाऱ्यांचा सार्वत्रिक अपमान केला जातो. महिला अधिकाऱ्यांना मॉडेल म्हणून हाक मारली जाते. एवढेच नव्हे तर थेट अॅट्रॉसिटीच्या तक्रारी दाखल करण्याच्या धमकी लोकप्रतिनिधींकडून दिली जाते. वेगवेगळ्या कामांआड पैशांची मागणी होते. यामुळे कर्मचाऱ्यांचे मा​नसिक संतूलन बिघडत असून, यास सभापती लहांगे आणि उपसभापती पांडूरंग वारूंगसे जबाबदार असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी निवेदनात नमूद केले आहेत. जिल्हाधिकारी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांना या निवेदनाच्या प्रती सादर करण्यात आल्या आहेत. गोपाळ लहांगे २००५ ते २००९ या कालावधीत वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीत संरपच म्हणून काम करीत असताना त्यांनी ग्रामनिधी व संपूर्ण ग्रामीण रोजगर योजना यात अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता अपघातांची संख्या वाढतीच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साडेचारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्चून शहरात चकाचक रस्ते तयार करण्यात आले. मात्र, याच रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून, जानेवारी आणि फेब्रुवारी २०१६ या दोन महिन्याच्या कालावधीत ३२ जीवघेण्या रस्ता अपघातांत ४४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तेच, २०१५ मध्ये जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये ३३ फेटल अपघात होऊन त्यात ३७ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे चकाचक रस्ते वाहनधारकांसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे स्पष्ट होते. शहरातील वाहनांच्या तुलनेत पुरेसे रूंद आणि गुळगुळीत रस्ते तयार करण्यात आले. रस्त्यांच्या चांगल्या दर्जामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन वाहनधारकांच्या वेळेत बचत होण्याची अपेक्षा होती. मात्र, आकडेवारी या वास्तवापेक्षा उलट असल्याचे दिसते. सन २०१५ मध्ये जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत एकूण २३० अपघात झाले. यात जीवघेण्या अपघातांची संख्या ३३ इतकी होती. यात ३७ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले. गंभीर अपघातांची संख्या ५२ इतकी होती. कामांमुळे साधारणतः मे २०१५ सरता सरता सर्वच रस्ते चकाचक झाले. रूंद रस्त्यांमुळे अपघातांचे किमान जीवघेण्या अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता फोल ठरली. जानेवारी व फेब्रुवारी २०१६ या ५९ दिवसांच्या कालावधीत ४४ नागरिकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. चालू वर्षात एकूण २२२ रस्ते अपघात झाल्याची नोंद शहर पोलिसांकडे आहे. यात ३२ जीवघेण्या अपघातांचा समावेश आहे. ३२ अपघातांमध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त ४८ गंभीर दुखापती वाहनचालकांना झाल्या. याबाबत बोलताना वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी सांगितले की, रूंद रस्त्याचा वापर कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार वाहनचालकाचा आहे. रस्ता रूंद असला तरी तो शहरी भागातील आहे, याची ​जाणीव वाहनचालकांनी ठेवणे आवश्यक आहे. रूंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीसारखे प्रकार घडत नाही. अपघातांचे प्रमाण वाढले की स्पीड ब्रेकरची मागणी केली जाते. ती सुध्दा संयुक्तिक ठरू शकत नाही. वाहनचालकांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले तर असे प्रसंगच उद्‍भवणार नाही, असा दावा बागवान यांनी केला.

वर्षे २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ - एकूण अपघात- ६०८ - ६०५ - ५४९ - ६१८ - २३८० जीवघेणे अपघात- १६५ - १२६ - १६८ -२२९ - ६८८ मृत्युमुखी- १७५ - १३० - १७४ - २४३ - ७२२ जखमी- ५५६ - ५७२ - ४४६ - ३९९ - १९७३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images