नाशिक : काही वर्षांपूर्वी अंगणात दाणे टिपायला येणारी चिमणी आता दिसेनाशी झाली. चिऊ-काऊची गोष्ट सांगणाऱ्या आजीलाही आपल्या नातवांना दाखवायला चिमणी सापडत नाही. या चिमण्या गेल्या कुठे? असा प्रश्न मानवालाच पडायला लागला. परंतु, तिच्या अस्तित्त्वाला ठेच पोहोचवायला आपणच कारणीभूत ठरले आहोत. या वास्तवाकडेच त्यांनी जाणते-अजाणतेपणाने दुर्लक्षच केले आहे.
पूर्वी असणारे वाडे, कौलारू घरे म्हणजे चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी हक्काची जागा असायची. आता अशी घरे गेली. त्याजागी मोठमोठ्या बिल्डिंग्ज उभ्या राहिल्या. चिमण्यांना घरट्यासाठी असलेली ही हक्काची जागा त्यामुळेच हिरावली गेली. चिमण्यांच्या या नष्ट होणाऱ्या अधिवासास मानवी जीवनशैलीच जबाबदार असल्याचे 'जागतिक चिमणी दिवसा'निमित्त पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. छोटछोट्या गावांचा विस्तारही आता शहरीकरणाकडे झुकला आहे. अधिकाधिक सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी विकासाच्या दिशेने जाता-जाता निसर्गाचीच खोडी काढणे मानवाने सुरू केले. याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून या ना त्या नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून भोगावा लागत आहे. परंतु, जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असलेल्या चिमणी या छोट्याशा पक्ष्यावर त्याचा सर्वात मोठा परिणाम होत आहे. शहरीकरणाच्या अतिरेकापायी चिमणी या पक्ष्याचे दर्शनच दुर्मीळ झाले आहे.
बदललेल्या आर्किटेक्चरच्या पद्धती, काँक्रिटीकरण, मोबाइल रेडिएशन, शेतातील पिकांवरील घाटक कीटकनाशके या सर्व बाबी चिमणीच्या विनाशासाठी कारणीभूत ठरत असल्याचे चिमण्यांचे अभ्यासक डॉ. मोहत्तम दिलावर सांगतात. चिमण्यांना पिण्यास पाणीही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठी आपत्ती ओढावली आहे. हे चित्र बदलण्यासाठी चिमण्यांसाठी घरटे उपलब्ध करून देण्याची, त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा पुरविण्याची गरज पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
चिमणी गणना हाईना!
२० मार्च २०१०पासून जागतिक स्तरावर चिमणी दिवस साजरा केला जात आहे. ३० देशांपेक्षा जास्त देश हा दिवस साजरा करतो. युरोप व दक्षिण आशियाई देशांमध्येही या दिवसाचे मोठे आकर्षण आहे. भारतामध्ये रुस्सेट, स्पॅनिश, साईण्ड, हाऊस, ट्री चिमण्यांचे हे पाच प्रकार प्रामुख्याने आढळतात. 'एनएफएस' (नेचर फॉरेव्हर सोसायटी) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताशिवाय जगातील इतर देशांमध्ये एका ठराविक कालावधीत चिमणीगणना केली जाते. त्यामुळे चिमण्यांचे प्रमाण, वाढ यांविषयी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असते. भारतात मात्र दुर्दैवाने चिमणीगणना होत नसल्याने चिमण्यांच्या प्रमाणाविषयी माहितीही अधांतरीच राहते.
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम चिमण्यांवर झाला आहे. याच जीवनशैलीचा परिणाम चिमण्यांना भोगावे लागत आहेत. मात्र, हीच परिस्थिती कायम राहिली तर आपल्यालाही भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
- डॉ. मोहम्मद दिलावर, संस्थापक, नेचर फॉरेव्हर सोसायटी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट