Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर; वडाळात तणाव

$
0
0

जुने नाशिकः व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रेषितांविषयी अवमानकारक व आक्षेपार्ह धार्मिक मजकूर आल्याने वडाळा गावात तणाव निर्माण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. धर्मगुरू व समाजबांधवांनी घटनेचा निषेध नोंदवून दोषींवर कारवाईची मागणी सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच त्यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केल्याने तणाव निवळला. या प्रकरणी वडाळा गावाच्या गणेशनगर भागात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी करत त्याचा मोबाइल जप्त केला. या मुलाचा मोबाइल नंबर हॅक करून त्यावरून आक्षेपार्ह धार्मिक मजकूर टाकला जात असल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे. मध्य प्रदेशातून हे आक्षेपार्ह मजकूर येत असल्याची माहिती पुढे येत आहे. मुंबई व स्थानिक सायबर सेल या प्रकरणी शोध घेत आहेत. वडाळा गावात शांतता प्रस्थापित झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धारणगावला बिबट्या जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे बिबट्याच्या मादीला शुक्रवारी पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

धारणगाव खडक येथील सुधाकर सोनवणे शेतात राहतात. त्यांच्या घराबाहेर बुधवारी रात्री बिबट्याने त्यांच्या शेळीला ओढून नेले. सोनवणे यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत बिबट्याचा पाठलाग केला. अखेर बिबट्याने शेळीला मृतावस्थेत सोडून पलायन केले. या घटनेची माहिती येवला वन विभागाला देण्यात आली.

येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी बी. आर. ढाकरे, वनपाल ए. पी. काळे, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, वन कर्मचारी दिलीप अहिरे, विजय लोंढे आदींच्या पथकाने सोनवणे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी गुरुवारी सापळा रचला. विशेष म्हणजे बिबट्याची मादी त्याच दिवशी रात्री आठ वाजता सोनवणे यांच्या वस्तीवर आली आणि पिंजऱ्यात जेरबंद झाली. बिबट्याची मादी दोन ते अडीच वर्षांची आहे. वन विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्रीच जेरबंद मादीला नाशिक येथे हलवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात शाळेची जाळपोळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पाच वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी संतप्त जमावाने मदर आयेशा प्राथमिक शाळेची तोडफोड करीत जाळपोळ केल्याचा प्रकार घडला. आयेशानगर भागातील खातून एज्युकेशन सोसायटीची ही शाळा आहे. संतप्त जमावाने पोलिस दलावरही दगडफेक करीत पाच वाहने जाळल्याने शहरात खळबळ उडाली होती. शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.

मदर आयेशा शाळेत शिक्षण घेत असलेल्या पाच वर्षीय बालिकेचा शाळेतील सफाई कामगार अजय दणके याने अश्लील वर्तन करून विनयभंग केला. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्याचे निलंबन करावे, अशी मागणी करीत संतप्त जमावाने शाळेतील साहित्याची तोडफोड, नासधूस केली. जमाव अधिक वाढल्यानंतर काहींनी शाळेला आग लावल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. शाळेच्या आवारात शिरलेल्या जमावाने दगडफेक, तोडफोड, जाळपोळ सुरू केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. अधीक्षक कडासणे, माजी आमदार रशीद शेख यांनी शांतता राखण्याचे आवाहन करूनही जमावाकडून दगडफेक सुरूच होती. यात पोलिसांची दोन वाहने, तीन दुचाकी जाळण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढचा मुख्यमंत्री खान्देशातून हवा- सबनीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्याचे मुख्यमंत्रिपद वेळोवेळी पश्चिम महाराष्ट्राच्याच वाट्याला आले. खान्देशवर मात्र, दरवेळी अन्याय करण्यात आला. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री हा खान्देशातून झाला पाहिजे, अशी जोरदार मागणी पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली. खान्देशात वैज्ञानिक महामंडळ स्थापन झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खान्देश विकास प्रतिष्ठानतर्फे धुळ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते शनिवारी, संमेलनाचा शुभारंभ झाला. मराठी साहित्य संघाचे कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, ओडिसातील साहित्यिक विजयालक्ष्मी महापात्र, चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला चव्हाण, खासदार ए. टी. पाटील, आमदार सतीश पाटील, काशिराम पावरा, शिरीष चौधरी, आसिफ शेख, चंद्रकांत रघुवंशी, गुलाबराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी भाषेसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन केले तर या भाषेचा प्रचार व प्रचार होण्यास मदत होईल. सरकारने अहिराणी साहित्य संमेलनाला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.

यानिमित्ताने अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे व ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. माजी मंत्री रोहिदास पाटील, पालकमंत्री दादा भुसे, ह. भ. प. सखाराम महाराज, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, युवराज करणकाळ, जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, महापौर जयश्री अहिराव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्रिपद खान्देशलाही मिळायला हवे

$
0
0

डॉ. श्रीपाल सबनीस यांची धुळ्यात मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्याचे मुख्यमंत्रिपद वेळोवेळी पश्चिम महाराष्ट्राच्याच वाट्याला आले. खान्देशवर मात्र, दरवेळी अन्याय करण्यात आला. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री हा खान्देशातून झाला पाहिजे, अशी जोरदार मागणी पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली. खान्देशात वैज्ञानिक महामंडळ स्थापन झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खान्देश विकास प्रतिष्ठानतर्फे धुळ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते शनिवारी, संमेलनाचा शुभारंभ झाला. मराठी साहित्य संघाचे कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, ओडिसातील साहित्यिक विजयालक्ष्मी महापात्र, चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला चव्हाण, खासदार ए. टी. पाटील, आमदार सतीश पाटील, काशिराम पावरा, शिरीष चौधरी, आसिफ शेख, चंद्रकांत रघुवंशी, गुलाबराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी भाषेसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन केले तर या भाषेचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. सरकारने अहिराणी साहित्य संमेलनाला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. यानिमित्ताने अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे व ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. माजी मंत्री रोहिदास पाटील, पालकमंत्री दादा भुसे, ह. भ. प. सखाराम महाराज, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, युवराज करणकाळ, जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, महापौर जयश्री अहिराव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपसोबत युती नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नसल्याचे संकेत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. भाजपसोबत युती होण्याची शक्यता नसल्याने कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. सोबतच शिवसेनेचा २४ एप्र‌िल रोजी होणारा उत्तर महाराष्ट्र मेळावा यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

शिवसेनेचा २४ एप्र‌िल रोजी होणारा मेळावाच्या तयारी संदर्भात ग्रामीण विभागाची बैठक शिवसेना कार्यालयत झाली. दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हा प्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, सत्यभामा गाडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना भुसे म्हणाले, भाजप व शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. भाजपकडून सेनेचा सन्मान केला जात नाही. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसोबत युती होण्याची शक्यता कमी आहे .त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. शिवसेनेची ताकद वाढव‌िण्यासाठी निवडणूक स्वतंत्रपणे आपण लढणार असून त्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले. भाजपच्या महिला मेळाव्यावरील हल्ला प्रकरणात जेलमध्ये गेलेल्या गाडेकरांसह अन्य शिवसैनिकांचा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांच्या सुट्यांमुळे कोटींचे व्यवहार ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सराफ बाजाराचा बंद, बाजारात असलेले मंदीचे सावट व त्यात बँकांना मिळणाऱ्या सलग सुट्यांमुळे नाशिक शहरात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले असून, व्यापार व उद्योजकांना याचा जबर फटका बसला आहे.

या आठवड्यात शुक्रवारी गुढीपाढवा, त्यानंतर सेकंड सॅटर्डे व त्यानंतर रविवारची सुटी आल्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद होत्या. आता पुढच्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रामनवमीची सुटी असल्यामुळे बँका दोन दिवस बंद राहणार आहेत.

या दोन आठवड्यांतच नाही, तर वर्षातून बुहतांश महिन्यांत अशा सलग सुट्या येतात. त्यामुळे व्यापारावर त्याचा परिणाम होतो. यात सामान्य व्यापाऱ्यांना मोठा फटका बसतो. चेकचे क्लिअरिंग न होणे, पैसे काढता न येणे, पैसे ट्रान्स्फर न होणे, ड्राफ्ट काढता न येणे आदी समस्यांना सामोरे जावे लागते.

व्यापारामध्ये अशा सुट्या नसल्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवहार बंद ठेवता येत नाहीत. त्यामुळे व्यवहार सुरू ठेवले तर बँकांचे व्यवहारही सुरू राहणे गरजेचे आहे. बहुतांश व्यापारी आता बँकेद्वारे व्यापार करतात, तर उद्योजकांचेही व्यवहार हे बँकेद्वारेच चालते. त्यामुळे बँकांच्या या सुट्यामुळे व्यवहार करता येत नाहीत व त्याचा तोटा सर्वांनाच होतो. आता नेट बँकिंग व एटीएममुळे बँका बंद असल्या तरी व्यवहार करता येतो; पण त्याचा वापर आजही तुलनेने कमी असल्यामुळे बँकांच्या सुट्या हा विषय कधी कधी व्यापारी व उद्योजकांमध्ये संतापजनक ठरतो.

बँकांच्या सुट्यांमुळे एटीएमवर मोठी गर्दी होते. त्यात सलग तीन दिवस बँका बंद असल्या तर कॅश संपते. बँकांच्या या सुट्यांवर आरबीआयने व सरकारने त्यातून उपाय शोधण्याची गरज आहे. काहींच्या मते बँकेने सुट्यांचे रोटेशन ठरवायला हवे.

सराफ बाजार बंद असल्यामुळे अगोदरच त्याचा परिणाम बाजारात अप्रत्यक्षपणे पडला आहे. त्यात बाजारात फारशी तेजी नाही. त्यामुळे बँकांच्या या सुट्यांचा फटका कोट्यवधीच्या व्यवहाराला बसत आहे.

सलग बँका बंद असल्यामुळे त्याचा व्यापारी व उद्योजकांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प होतो. चेकचे क्लिअरिंग होत नाही. त्यामुळे आरबीआने व केंद्र सरकारने यावर तोडगा काढायला हवा, असे ​महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले.

सलग सुट्या आल्या की मार्केटमध्ये चलन थांबते. व्यवहार न झाल्यामुळे सर्वांचे नुकसान होते. सामान्य लोकांनाही याची झळ बसते. रोटेशन पद्धतीने बँकांनी सुटी घेतल्यास त्याचा व्यापार व उद्योजकांना फायदा होईल, सीए चेतन लोढा यांनी सांगितले.

तीन दिवस सुटी, तीन दिवस बँक
एपिल महिन्यात आठ तारखेला गुढीपाडव्याच्या सुटीनंतर तीन दिवस बँका बंद होत्या. त्यानंतर आता पुढील आठवड्यात तीन दिवस बँका सुरू राहतील. त्यानंतर १४ एप्रिलला आंबेडकर जयंती व रामनवमीची दोन दिवस सुटी असेल. त्यानंतर शनिवारी बँक सुरू राहतील. पुन्हा रविवारी बँक बंद, सोमवारी बँक सुरू व नंतर मंगळवारी १९ एप्रिलला महावीर जयंतीची सुटी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांचा जोर; सर्वसामान्यांना घोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आम्ही तुमच्या फडतूस कायद्याला घाबरत नाही. माझ्यावर १९ केसेस आहेत आणि मी आताच मोक्क्यातून सुटलो आहे. जेल म्हणजे माझं सासर आहे. मी मनात आलं तेव्हा येतो आणि परत जातो, असे धमकावून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जया दिवे या सराईत गुन्हेगारामुळे एका महिलेसह पाच ते सहा सामाजिक कार्यकर्त्यांना भूमिगत व्हावे लागले आहे. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू असून, यामुळे पंचवटी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पीडित महिला आणि तक्रारदार कविता पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांचे मालेगाव स्टॅण्ड परिसरातील पंजाब हॉटेल शेजारी कार्यालय आहे. या कार्यालयातून मानवाधिकार व बालगुन्हेगारांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. पवार यांच्या कार्याची परिसरात दखल घेतली जाते. ६ एप्रिल रोजी रात्री पवार आपल्या कार्यालयातून घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत काही सामा​जिक कार्यकर्ते देखील होते. कार्यालयातून बाहेर निघाल्यानंतर पवार यांनी शेजारच्या एका दुकानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ​निमित्त फ्लेक्स बोर्ड तयार करण्यासाठी दिले. या दुकानातून त्या बाहेर पडल्या असता सराईत गुन्हेगार जया दिवे याने त्यांना हटकले. पवार यांनी त्यास विचारणा केली असता मद्यधुंद अवस्थेतील दिवेने त्यांना शिवीगाळ सुरू केली. दिवेच्या काही साथिदारांनी त्यांच्या दोन कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केला. कविता पवार यांना देखील मारहाण झाली. पवार व त्यांचे साथिदार लागलीच पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिथे काही पक्षांचे कार्यकर्ते सुध्दा पोहचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाद नको म्हणून ही तक्रार मागे घेण्यासाठी सर्वांनी गळ घातली. पवार यांनी सुध्दा त्यास होकार दिला. मोक्क्यातीलच आणखी सराईत राकेश कोष्टीने स्वतः पवार यांची समजूत काढत प्रकरणावर पडदा पाडला. मात्र, गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास दिवे, त्याचा साथिदार कुंदन परदेशी, अक्षय इंगळे व चार ते पाच जणांनी पवार यांच्या कार्यालयात धुडगूस घातला. देशी कट्टे दाखवत जीवे मारण्याची धमकी या संशयितांनी दिली. या प्रकरणी पोलिसांकडे दिलेला तक्रार अर्ज मागे घेण्याची धमकी त्यांनी दिली. या घटनेची माहिती पवार यांनी लागलीच पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना दिली. मात्र, त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिल्याचा आरोप पवार यांनी केला. या घटनेतील सर्व आरोपी सराईत असून, मागील दोन दिवसांपासून मला व माझ्या साथिदारांना भूमिगत रहावे लागत आहे.

किती दिवस लपायचे? गुन्हेगार जीव घेतील या भीतीने किती दिवस लपत फिरायचे, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे. १८ पेक्षा गंभीर गुन्हे दाखल असलेले संशयित सर्वसामान्यांना जगू देणार नसतील आणि पोलिस उफरटे सल्ले देणार असेल तर कोणाकडे दाद मागायची, असा सवाल पवार यांनी केला. सराईत गुन्हेगारांकडून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराची पंचवटीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पंचवटीच्या विभाजनाने साधले काय? पंचवटीतील गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने या पोलिस स्टेशनचे विभाजन करून म्हसरूळ हे नवीन पोलिस स्टेशन सुरू केले. तीन वाहनांच्या गस्ती ऐवजी आता या भागात सहा वाहने येथे गस्तीवर असतात. पोलिसांचे संख्याबळ दुप्पट झाले. अधिकाऱ्यांची संख्या वाढली. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. मात्र, यानंतरही पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही.

या प्रकरणी अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेने पहिल्या वेळी तक्रार देण्याऐवजी तडजोड केली होती. या गुन्ह्यात मोक्का असलेल्या संशयितांचा समावेश असून, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. सदर महिलेच्या तक्रारीनुसार सर्वांवर कारवाई करण्यात येईल. - प्रकाश सपकाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी

सराईत गुन्हेगारांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येतात. ते मनाला वाटेल त्यावेळी कार्यालयात येऊन कट्टे दाखवतात. पोलिस निरीक्षक मात्र सहकार्य करण्याऐवजी आम्हालाच मागे हटण्याचा सल्ला देतात. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा. पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी आदेश देऊनही पीआय सपकाळे यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातले. पंचवटी पोलिसांमुळे आम्हाला भूमिगत व्हावे लागले. - कविता पवार, पीडीत तक्रारदार महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ १७ कर्मचाऱ्यांबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सेवेत सहाय्यक पदावर घ्यावे या मागणीसाठी १७ कर्मचाऱ्यांच्या व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून कायदेशीर सल्ला घेण्याबाबतचा ठराव व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत शनिवारी संमत करण्यात आला.

मुक्त विद्यापीठाच्या सेवेत १७ कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यावरून आमदार सीमा हिरे, सुनील बागूल, विजय साने यांच्यासह अन्य पालकांनी दालनात घुसून कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना घेराव घातला होता. कुलगुरू आणि कुलसचिवांची कोंडी केल्यानंतर कुलगुरूंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या घटनेचे प्रचंड पडसाद उमटले होते. या घटनेचा विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता.

सहाय्यक पदावर वर्णी लावण्याच्या मागणीसाठी १७ कर्मचाऱ्यांनी २८ मार्चपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांना सामावून घेण्याबाबत सरकारने अध्यादेशही काढला होता. तथापि सरकारने विद्यापीठाच्या १०३ कर्मचाऱ्यांचे, तसेच निवृत्त झालेल्या व होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, त्यानंतर या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असा पवित्रा मुक्त विद्यापीठाने घेतला. मात्र, काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने या कर्मचाऱ्यांना लवकरच पदावर घेतले जाईल, असे आश्वासन कुलगुरूंन‌ी दिले होते. त्या संदर्भात शनिवारी झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून कायदेशीर सल्ला घेण्याबाबतचा ठराव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंड अन् भाविकांचीही तृप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल १३९ वर्षानंतर रामकुंड कोरडे पडल्यानंतर भाविक व पर्यटकांची संख्या रोडावली होती. मात्र, रामकुंडात पाण्याचा खळाखळाट वाढल्यानंतर शनिवारी भाविकांचीही गर्दीही वाढली. अनेकांनी देवदर्शन करीत रामकुंडात डुबकी मारण्याचाही आनंद लुटला. सेकंड सॅटर्डेची सुटी असल्यामुळे अनेकांनी रामकुंडावर जाऊन ती एन्जॉय केली. रामकुंड कोरडे पडल्यानंतर गुरुवारी महापौर अशोक मुर्तडक यांनी गोदाकाठी जाऊन रामकुंड, लक्ष्मणकुंड व परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर त्यावर काय उपाययोजना करता येईल याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी गांधी तळ्याचे पाणी घेण्यात आले तर रात्री दोन टँकरने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर गुढीपाडव्याला जलकुंभातून पाइपव्दारे पाणी सोडण्यात आले. या सर्व गोष्टीला गोदाप्रेमी व पर्यावरणवादींनी विरोध केला असला तरी रामकुंडावर पाणी आल्यामुळे अनेकांना आनंदही झाला आहे. पाणी सोडल्यानंतर २० लाख लिटरची क्षमता असलेल्या रामकुंड ७५ टक्के भरले असून त्यातून भाविक, पुरोहित व आजूबाजूचे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना आनंद झाला आहे. पूजा व विधीही रामकुंडावर सुरू झाल्या असून पुरोहित संघानेही त्याचे स्वागत केले आहे. रामकुंड कोरडे पडल्यानंतर त्यात असलेल्या घाणीची दुर्गंधी सुध्दा वाढली होती. मनपाने मात्र ती साफ करण्याची मोहीम घेतल्यामुळे हा परिसरही स्वच्छ झाला. गांधी तळ्यात अगोदरच पाणी असल्यामुळे येथील बोटींग चालू होती. त्यात रामकुंडावर पाणी आल्यामुळे सगळ्यांना हायसे वाटले.

लक्ष्मण कुंडावरील झरा बंद मनपाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष्मण कुंडावरील पायरीजवळ खोदल्यानंतर तेथून पाणी येऊ लागले होते. हे पाणी झऱ्याचे असलेले बोलले जात होते. पण, शनिवारी या झऱ्यातून पाणी येणे आता बंद झाले आहे.

केवळ गुढीपाडव्याचे निमित्त साधत मनपाने देखावा केला. त्यानंतर शनिवारी दिवसभर कोणीही फिरकले सुध्दा नाही. लक्ष्मण कुंडावरील झरा सापडला असे बोलले जात असले तरी पायरी खोदून असे झरे सापडू शकत नाही. मनपाने बुजवलेल्या विहिरीतून हे पाणी झिरपत असावे ते आज बंद झाले. या झऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. - देवांग जानी, गोदावरीप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधालाही महागाईचा चटका

$
0
0

प्रशांत धिवंदे, नाशिक
दुष्काळामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्यांना नागरिकांना आता दुधाच्या दरवाढीचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांत अनेकदा दुधाच्या दरात चढ-उतार होत आहेत. मागणीबरोबरच चाऱ्याचे दरही वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना येत्या काही दिवसांत दुधाच्या आणखी दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

दिवसागणिक बदलत्या ऋतुमानामुळे व तप्त उन्हापासून वाचण्यासाठी लस्सी, दही, पनीर व विविध प्रकारचे फालुदा यांसारख्या थंड पेयांना मागणी वाढली आहे. पर्यायाने या पदार्थांसाठी लागणाऱ्या दुधालाही मागणी वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या दरवाढीची चिन्हे आहेत. सध्या दूध बाजारातील दर ५५ ते ६० रुपये प्रतिलिटरप्रमाणे असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता दूध व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

मागणी वाढल्यास दरही वाढतील सध्या सकाळ व सांयकाळ अशा दोन सत्रांत नाशिकचा दूध बाजार भरतो. येथून दिवसाकाठी हजारो लिटर दूध विक्री होत असून, वाढत्या मागणीनुसार दुधाची दरवाढ होते. गायीचे दूध थंड असते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गायीच्या दुधाला मागणी वाढली आहे. हॉटेल व हातगाड्यांवर लस्सी, ताक, मठ्ठा आदींसारख्या पदार्थांसाठी दुधाला मागणी वाढल्याने दरही वाढण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाय, म्हशीसाठी लागणाऱ्या घास, ऊस बांडी, कडबा, ढेप, चुनी, तुरीच्या दरात वाढ होत असल्याने दुधाचेही दर अटळ असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाटा सेंटरमुळे अर्थव्यवस्थेला चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहिती तंत्रज्ञान विभागाला महाराष्ट्रात नेहमी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा मिळत आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून नाशिकच्या इएसडीएस क्लाऊड डाटासेंटरने त्यांचा उद्योग मुंबईत सुरू केला आहे. यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवी मुंबई येथील महापे येथे इएसडीएस क्लाऊड अॅण्‍ड डाटासेंटरच्या दुसऱ्या डाटा सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे डाटासेंटर अत्यंत आद्यायावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तसेच महाराष्ट्र सरकारसोबत सुमारे २०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे. ज्यामुळे या सेंटरसाठी वर्ष २०१७-१८ पर्यंत साधारणत: ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. हे सेंटर साधारणत: ८० हजार स्क्वेअर फुटात उभारले असून, याव्दारे ग्राहकांसाठी प्रायव्हेट क्लाऊड आणि ईनलाईट पब्लिक क्लाऊड सेवा देण्यात येणार आहे. सोबतच न्यू जनरेशनला समोर ठेवून तयार केलेल्या ईनलाईट ३६० ही नवीन सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे. इएसडीएस कंपनीला या सेवेचे पेटेंट मिळाले असून, याव्दारे माहिती तंत्रज्ञानाच्या जगात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच इएसडीएसच्या या नवीन सेवेमुळे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या अभियानाला हातभार लाभणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. यावेळी इएसडीएस कंपनीचे सीईओ आणि एमडी पीयूष सोमाणी यांनी सांगितले की, आमच्या नवीन क्लाऊड डाटा सेंटर आणि ईनलाईट ३६० या हायब्रिड क्लाऊड प्लॅटफॉर्ममुळे क्लाऊड डाटासेंटरसंदर्भात चांगल्या सेवा देत आहोत हे सिद्ध केले आहे. ईनलाईट क्लाऊड संशोधनाचे पेटंट एकमेव इएसडीएस कंपनीकडे आहे. आमच्या या नवीन सेवेमुळे आमच्यासोबत जोडल्या जाणाऱ्या भागीदारांना त्यांच्या उद्योगाला उंचावण्यासाठी चांगलाच हातभार लागणार आहे. तसेच सर्वोत्तम सेवा देऊन आयटी क्षेत्रात एक प्रकारे मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नवीन सेवेसाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार करून मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियासारख्या योजनांना आमचा हातभार लागून देशाच्या आर्थिक स्थितीला मजबूत करणार आहे. यावेळी खासदार अनुराग ठाकूर, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेटच्या वादावरून चाकू हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एकाने चाकू हल्ला केल्याची घटना सिडको परिसरातील पाटीलनगर परिसरात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पाटीलनगर येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मुलांच्या क्रिकेट खेळण्याहून वाद निर्माण झाला होता. मुलांचा वाद मोठ्यापर्यंत पोहचल्यानंतर संशयित आरोपी कैलास छबुराव डुंबरे यांनी फिर्यादी विलास सुधाकर वाघ यांच्यावर चाकू हल्ला केला. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.

सायकलस्वाराचा मृत्यू नाशिक : भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने सायकलस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची घटना वरचे चुंचाळे परिसरात बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झाली.

संतोष चिंतामण डोळस, असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंबड परिसरातील डायमंड पार्क येथील दत्तमंदिराजवळ राहणारे संतोष डोळस बुधवारी सकाळी सहा वाजून २० मिनिटांच्या दरम्यान चुंचाळे परिसरात सायकलने जात होते. यावेळी एका अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलीस जोराची धडक दिली. त्यात डोळस मृत्युमुखी पडले. या प्रकरणी प्रबुध्दनगर येथील चेतन सुरेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक इंगोले करीत आहे. शहरात अपघातांच्या घटनेत सातत्य आले असून यात दुचाकीस्वार, पादचारी व सायकलस्वार मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीय ठरते आहे.

तलवारीने वार मित्रांमधील मस्करीनंतर एका टोळक्याने युवकास हॉकीस्टीक व तलवारीने मारल्याचा प्रकार अंबड पोलिस स्टेशन हद्दीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी यतिन शिंदे, करण शिंदे व त्यांच्या साथिदारांविरोधात गुन्हा दाखल केला. आयटीआय अंबड लिंकरोडवरील कार्तिकेय नगर येथे राहणारा हर्षल शरद मोरे व संशयित आरोपी शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास केवल पार्क येथे होते. यावेळी संशयित शिंदे व त्याच्या साथिदारांनी मोरेला मस्करीत शिवीगाळ केल्याच्या कारणावरून हॉकीस्टीक व तलवारीने मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुचाकीची चोरी दिंडोरीरोडवरील चित्रकुट अपार्टमेंटमध्ये पार्क केलेली दुचाकी (एमएच ४१ जे ९८४८) चोरट्यांनी लंपास केली. चोरीची घटना २८ मार्च रोजी झाली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी भूषण संजय देशमुख यांनी फिर्याद दिली.

वाहनाची चाके काढली मोटरसायकल चोरी करणे शक्य नसल्याने चोरट्यांनी त्या दुचाकीची दोन्ही चाके ड्रमसह काढून नेल्याची घटना आडगाव परिसरातील मीरा दातार रोडवरील सर्वज्ञ अपार्टमेंट घडली. या ठिकाणी राहणाऱ्या नितीन रामभाऊ केदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. चोरीची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंज रिपोर्टविना बेकायदेशीर काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ चेंज रिपोर्टअभावी जिल्ह्यातील १९५६ संस्थांचे ट्रस्टी बेकायदापणे काम करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संथ कारभारामुळे संस्थांच्या बेकायदा कामकाजाला बळ मिळत आहे. त्यामुळे ठराविक दिवसांतच चेंज रिपोर्ट मिळणे गरजेचे बनले आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांचे पदाधिकारी बदलूनही त्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मंजुरी न दिल्यामुळे जिल्ह्यातील १९५६ संस्थांवर ९० टक्क्यांहून अधिक पदाधिकारी बेकायदा कामकाज करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण १८ हजार ९८८ संस्थांची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात करण्यात आली असून, त्यातील १९५६ संस्थांने चेंज रिपोर्ट मंजुरीसाठी दिलेले आहेत. या चेंज रिपोर्टमध्ये ९० टक्क्यांहून अधिक विषय संस्थांचे पदाधिकारी बदलाचे आहेत, तर इतर विषयांत संस्थांच्या घटनेत बदल किंवा संस्थेच्या नावात किंवा मालमत्ताबदलाचा संदर्भ आहे.

नाशिक जिल्ह्यात ए, बी, सी, डी, ई व एफ अशा वेगवेगळ्या प्रकारांत संस्था नोंदणी करण्यात आल्या असून, त्यात धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्था, महिला मंडळ, सांस्कृतिक व क्रीडा मंडळांसह अनेक संस्था आहेत. या संस्था घटनेप्रमाणे वेळोवेळी बदल करतात; पण या बदलाला धर्मादाय आयुक्त कार्यालय थेट मंजुरी देत नसल्यामुळे हे पदाधिकारी मंजुरीपर्यंत बेकायदा कामकाज करतात.

सार्वजिक विश्वस्त संस्थेमध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयात शेड्युल 'ब'मध्ये ज्या पदाधिकाऱ्यांची नोंद असते, त्यांना कायदेशीर पदाधिकारी समजले जाते. त्यामुळे या शेड्युल 'ब'मध्ये जोपर्यंत नोंद होत नाही, तोपर्यंत पदाधिकारी बेकायदा ठरतो. विश्वस्त संस्था म्हणजेच कोणत्याही ट्रस्टमध्ये जेव्हा पदाधिकारी बदलतात, तेव्हा त्याचा रिपोर्ट हा धर्मादाय आयुक्त कार्यालयात दिला जातो. त्यावर धर्मादाय आयुक्त सुनावणी घेतात. त्यात दोन- तीन तारखा पडल्यास हा काळ वर्षापेक्षाही जास्त असतो. केव्हा तर त्याचा काळ त्यापेक्षा अधिक असतो.

संस्थेचे पदाधिकारी बदलल्यानंतर चेंज रिपोर्ट सादर करून अनेक संस्थांत काम केले जात असल्यामुळे हे कामकाज बदल नामंजूर झाल्यास बेकायदेशीर ठरते. काही वेळा संस्थेत गैरप्रकार झाला व संस्थेचा चेंज रिपोर्ट नामंजूर झाला तर ट्रस्टी नसलेल्या पदाधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची हा प्रश्न पडतो. आपल्या कामकाजाविषयी जागृत असलेल्या अनेक संस्था चेंज रिपोर्ट पाठवतात; पण काही संस्था तर बदल करूनही तो पाठवत नाही. मात्र याची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयात नसते. चेंज रिपोर्टचे प्रकरण तत्काळ निकाली काढण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी स्पेशल ड्राइव्हची निर्मिती केली असली तरी जिल्ह्यातील पदाधिकारी बदलाची अनेक प्रकरणेही अद्याप प्रलंबित आहेत.

चेंज रिपोर्ट म्हणजे काय?
एखाद्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याची नवीन नियुक्ती, प्रॉपर्टीतील बदल, घटनेत बदल किंवा नियमात बदल अशा कारणांसाठी संबंधित संस्थेला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून संमती घेणे आवश्यक असते. त्यासाठीचा अर्ज संस्थेला करावा लागतो. चेंज रिपोर्ट या नावानेच त्यास मंजुरी मिळते. त्यानंतरच तो बदल ग्राह्य धरला जातो.

चेंज रिपोर्ट तातडीने निकाली काढण्याची गरज आहे. चेंज रिपोर्ट मंजूर न करताच कामकाज करणे बेकायदेशीरच ठरते. यातून अनेक गैरप्रकार होतात व त्याची जबाबदारी मात्र नंतर कोणी घ्यावी हा प्रश्न असतो. धर्मादाय आयुक्त कार्यालय धड न्यायालयही नाही व कार्यालयही नाही. त्यामुळे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात व दिरंगाईमुळे कामकाज रखडते, असे अॅड. भाऊसाहेब गंभिरे यांनी सांगितले.

चेंज रिपोर्टला तातडीने मंजुरी देण्यात यावी. यासाठी आम्ही स्पेशल ड्राइव्ह सुरू केला आहे. त्यामुळे बरीच प्रकरणे निकाली निघाली आहेत. चेंज रिपोर्टला लवकरात लवकर मंजुरी दिली जावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक विजय धाईंजे यांनी सांगितले.



जिल्ह्यातील प्रकारनिहाय धर्मादाय संस्था

ए - ११९०, बी- ५४, सी- ०१, डी- ११, ई- १३५४, एफ- १६,३७८, एकूण ः १८९८८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चॉईस नंबरसाठी मिळताहेत सव्वादोन लाख!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चॉईस क्रमांक किंवा व्हीआयपी क्रमांकासाठी वाहनधारकांची क्रेझ कायम असल्याचा फायदा यंदा नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या महसूल वाढीला झाला. नाशिक विभागात चॉईस क्रमांकासाठी सरासरी दररोज दोन लाख ३४ रुपये वाहनधारकांनी मोजले. वर्षाअखेरीस चॉईस क्रमांकाच्या माध्यमातून ८ कोटी ४४ लाख ९८ हजार ६८८ रुपयांचा महसूल आरटीओ कार्यालयास मिळाला. नाशिक प्रादेशिक विभागात नाशिक, अहमदनगर, श्रीरामपूर आणि मालेगाव या उपप्रादेशिक विभागांचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांपासून चॉईस क्रमांक किंवा व्हीआयपी क्रमांकाची क्रेझ वाहनधारकांमध्ये वाढली आहे. वाहनांच्या क्रमांकाचा थेट संबंध ज्योतीष तसेच अंकशास्त्राशी जोडला गेला असून, त्याला प्रतिष्ठेशी जोडून पाहिले जाते. नऊ, ९९, ९९९, ९९९९ किंवा १, ११, १११, ११११ तसेच १२३४ अशा वेगवेगळ्या क्रमांकासाठी वाहनधारकांची मागणी लक्षात घेऊन असे क्रमांक वाहनधारकांना देताना आरटीओ कार्यालय अतिरिक्त शुल्क आकारते. अगदी, १० हजारांपासून काही लाख रुपयांपर्यंत वाहनधारक पैसे मोजतात. नाशिक प्रादेशिक कार्यालयात २०१४-१५ या आर्थिक वर्षात चॉईस क्रमांकाद्वारे तीन कोटी ७४ लाख ७४ हजार ५५० रुपयांचा महसूल जमा झाला होता. सन २०१५-१६ या वर्षांत हाच आकडा चार कोटी ८५ लाख सात हजार ४३३ यावर स्थिरावला. चॉईस नंबरच्या महसुलात या आर्थिक वर्षात तब्बल ९.०३ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली. अहमदनगरमध्ये चॉईस क्रमांकाचा महसूल दोन कोटी ३६ लाख ६० हजार २५५ रुपये इतका राहिला. सन २०१४-१५ मध्ये दोन कोटी एक लाख ५३ हजार ५०० रुपये इतका महसूल अहमदनगर कार्यालयास मिळाला होता. श्रीरामपूर आणि मालेगाव या उपप्रादेशिक विभागांमध्ये चॉईस क्रमांकाचा महसूल मात्र अनुक्रमे १२ आणि १० टक्के घटला. श्रीरामपूर कार्यालयाचा २०१४-१५ मध्ये चॉईस क्रमांकाचा महसूल एक कोटी ६६ लाख ६३ हजार ५०० इतका होता. सन २०१५-१६ मध्ये मात्र यात घट होऊन हा आकडा एक कोटी ४५ लाख ७२ हजार ५०० वर स्थिरावला. मालेगाव कार्यालयाला २०१४-१५ मध्ये सहा कोटी दोन लाख नऊ हजार तर २०१५-१६ या आर्थिक वर्षांत पाच कोटी ४० लाख ८ हजार ५०० रुपये इतका महसूल मिळाला. संपूर्ण नाशिक विभागाचा विचार करता या महसुलात ५. २० टक्के वाढ झाल्याचे दिसते.

टार्गेटपेक्षा जादा महसूलकमाई नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने २०१५-१६ या आर्थिक वर्षात ३८७ कोटी ४४ लाख २१ हजार ४२० रुपयांचा विक्रमी महसूल संकलित केला. सुमारे ३७६ कोटी २४ लाख रुपयांचे नाशिक विभागाला टार्गेट देण्यात आले होते. या महसुलवाढीला चॉईस क्रमांकाच्या महसुलाने हातभार लावला.

चॉईस क्रमाकांच्या माहितीसाठी नाशिक कार्यालयाच्या आवारात दूरध्वनी संच बसवण्यात आला असून, आम्ही वेळोवळी नवीन सिरीजची तसेच क्रमांकाची माहिती देत असतो. चॉईस क्रमांकांना चांगली मागणी असून, त्यामुळे यंदा महसुलात वाढ झाली आहे. - जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रपट महामंडळ प्रचाराचा बिगूल नाशकातून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २४ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अध्यक्ष विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनलने नाशकातून प्रचाराचा नारळ फोडला. नाशिकनगरीत सात दिवसांच्या आत चित्रपट महामंडळाचे कार्यालय उभे केले असल्याने येथून सुरुवात करावी, अशी भावना असल्याचे पाटकरांनी सांगितले.

नाशिक हे शहर चित्रनगरी होण्यासाठी सर्वार्थाने योग्य असल्याने त्या कामी प्रयत्न करणार असून, नाशिकच्या कलाकारांना काम मिळावे, यासाठी झटणार असल्याचे पाटकर म्हणाले. राज्यातील बंद असलेले सिंगल स्क्रीन सुरू करण्यासाठी काहीही करण्याची तयारी त्यांनी दाखवली. एकूण ४०० थिएटर बंद असून, त्यातील ४० जरी आम्हाला मिळाली तरी तेथे ४० मराठी चित्रपटांचा शो लावता येईल, अशी कल्पना पाटकर यांनी मांडली. नाशिक, पुणे, कोल्हापूर या पलीकडे जाण्याची वेळ आली असून, खरे तर इतकी वर्षे का झाली नाही, याचाच शोध घेत असल्याचे सांगत ते म्हणाले, की चार वर्षांत महामंडळाने केवळ कोर्टकचेऱ्या केल्या. त्यापेक्षा काम केले असते तर आज कलाकारांना चांगले दिवस आले असते!

नाशिकमध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. काही दिग्दर्शकांना घेऊन मला शिबिरे घ्यायची आहेत. त्यात जे विनर्स असतील त्यांना घेऊन एक चित्रपटही काढायचा असल्याचे विजय पाटकर म्हणाले.

निवडणुकीत एकूण नऊ पॅनल उतरलेले असून, १४ जागांसाठी १४३ जण आपले नशीब आजमावत आहेत. ३९५४ मतदार असून, एकट्या नाशिकमध्ये १५० मतदार आहेत. ११ एप्रिल रोजी उमेदवार माघारीची मुदत असून, २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पुणे, कोल्हापूर व मुंबई ही तीन मतदान केंद्रे आहेत. २६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालय असलेल्या कोल्हापूरला मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा पोलिस ठाण्यात तुफान हाणामारी

$
0
0

विजय वाघ यांना मारहाण; माजी आमदार संजय चव्हाण यांच्यावर गुन्हा, आज शहर बंद

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येथील बसस्थानकाजवळील हॉटेल उपकार बंद करण्याच्या कारणावरून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विजय वाघ व पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांच्यात शाब्दिक चकमक होवून त्यांचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. याप्रकरणी माजी आमदार संजय चव्हाणांसह सुमारे १४ जणांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, विजय वाघ यांच्यासह चौघांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याच्या निषेधार्थ व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या कारणावरून रविवारी सटाणा शहर बंद ठेवत सकाळी मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. शुक्रवारी रात्री ११. ३० च्या सुमारास पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील गस्तीसाठी शहरात फिरत असतांना बसस्थानकाजवळ विजय वाघ हे हॉटेल उपकारच्या बाहेर ते बसलेले दिसले. पाटील यांनी त्यांना हॉटेल बंद करून घरी जाण्यास सांगितले. यावरून दोघांत बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान झटापटीत झाले. या झटापटीत वाघ यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ गहाळ झाला.

याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी वाघ काही कार्यकर्त्यांसह गेले असता त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, पालिकेतील गटनेते काका रौंदळ यांनी पोलिस निरीक्षक पाटील यांना समजावून सांगण्याच्या प्रयत्न केला. मात्र, वाघ व पाटील यांच्यातील शाब्द‌िक चकमक वाढतच गेली.

दरवाजा बंद करून मारहाण

पाटील आणि वाघ यांच्यातील वाद वाढत असतानाच मालेगाव येथून राज्य राखीव दलाची तुकडी दाखल झाली. या तुकडीने तहसील आवाराचा मुख्य लाकडी दरवाजा बंद करून आत असलेले तक्रारदार विजय वाघ, आनंद सोनवणे, सुमीत वाघ, नितीन सोनवणे, कुलदीप दहिदे, नितीन बब्बू सोनवणे यांना बेदम मारहाण केली. काहींनी अक्षरशः जीव सांभाळत पलायन केले.

गुन्हे दाखल

दरम्यान, पोलिस शिपाई विश्वनाथ झिरवाळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विजय वाघ, सुमित वाघ, कुलदीप दहीदे, माजी आमदार संजय चव्हाण, नितीन सोनवणे, दीपक सोनवणे, अमित शर्मा, दीपक रौंदळ यांच्यासह इतर ४० ते ५० जणांनी पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस निरीक्षक पाटील यांना व कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करून आवारातील वाहनांची जाळपोळ केली. तहसीलदारांच्या वाहनासह बिनतारी संदेश यंत्रणा, सीसीटीव्ही यांचे नुकसान केले. याप्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील यांच्या निलंबनाची मागणी

याप्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांची सटाणा येथे भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, पोलिस निरीक्षक पाटील यांचे निलंबन करावे या मागण्यांचे निवेदन सादर केले.

आज मूकमोर्चा

पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांचे निलंबन करून नोंदविलेल्या खोट्या गुन्ह्यांची शहानिशा करण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय पातळीवर सटाणा बंद व मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे यांनी दिली.

आयडॉल इशा गुप्ता बाईकवर देशाच्या प्रांताप्रांतात हिंडते आहे. महिला जागृती करण्याचा हा प्रयत्न अफलातून आहे. मोहीम भन्नाट असल्याने ती तरुणींची आयडॉल आहे. माझा बंगळुरूला असणारा भाऊ अंकितचे या उपक्रमात योगदान आहे. इशाच्या ध्येयवादी प्रवासाचा अभिमान आहे.

- डॉ. ममता गांधी, मनमाड

जखमींची विचारपूस

मारहाण प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांनी केली. मारहाणीत जखमी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रकृतीची पहाणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अॅड. पगार हे सटाणा येथील उपजिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरनार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकचा तिढा कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नको म्हणून पुरुष भाविकांनाच प्रवेश नाकारणाऱ्या देवस्थान ट्रस्टने आता महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयालाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शनि शिंगणापूर येथील चौथरा महिलांना खुला झाल्यानंतर त्र्यंबकराजाचा गाभाराही सर्वांसाठी खुला होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ग्रामस्थांनी मंदिर खुले करण्यास कडाडून विरोध केला आणि देवस्थाननेही त्यांचीच री ओढल्याने त्र्यंबकराजाचा गाभारा महिलांसाठी सध्यातरी बंदच राहणार आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी शनिवारी विश्वस्त मंडळाने ग्रामस्थांची सहविचार सभा आयोज‌ित केली होती. या बैठकीस त्र्यंबकमधील सर्व समाजाच्या व्यक्तींना प्रातिनिधीक स्वरूपात निमंत्रित करण्यात आले होते. देवस्थान विश्वस्तांनी महिलांना प्रवेश देता येऊ नये यासाठी भेदाभेदाचा आरोप टाळण्यासाठी पुरुषांवरही बंदी घातल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी विश्वस्तांविरोधात मोर्चे काढले होते. प्रकरण अंगलट येणार हे लक्षात आल्यावर विश्वस्तांनी सहविचार सभा बोलावून ग्रामस्थांनीच निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेतली. यावर बराच वेळ दोन्ही बाजूने चर्चा झाली.

नगरसेवक धनंजय तुंगार यांनी विश्वस्तांना धारेवर धरले. फुलनारळ बंदी, दिवसभर गाभाऱ्यात प्रवेश बंदी, पूर्व दरवाजा मंडप आणि काँक्रिटीकरण, २०० रुपयांचे पेड दर्शन असे अनेक निर्णय घेताना ग्रामस्थांना विचारले होते का, असा सवाल करून विश्वस्तांना घेरले. विश्वस्तांच्या मनमानी निर्णयामुळे त्र्यंबकेश्वरमधील अनेकांचा व्यवसाय बुडाला, त्याचा विकृत आनंद घेतला गेला. आता जबाबदारी टाळण्यासाठी ग्रामस्थांनी न्यायालयात जावे, अशी अपेक्षा कशी करता, असाही सवाल केला. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात समर्थन दिले. विश्वस्तांना जबाबदारी सांभाळता येत नसेल तर पदाचा राजीनामा देवून बाहेर पडावे असे आवाहन केले आहे. याच बैठकीत पुरूषोत्तम लोहगावकर, मोहन झोले, प्रकाश दिवे, अनघा फडके, देवेंद्र कदम, अनंत पाचोरकर, शांताराम बागूल, लोकेश अकोलकर, प्रश़ांत गायधनी, माधुरी जोशी, मनोज काळे आदिंनी आपले विचार मांडले. यावेळी अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी भूमिका मांडली. परंपरा मोडू नका मात्र ग्रामस्थांचा गाभाऱ्यात जाण्याचा अधिकारही हिरावू नका, असेही स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस विश्वस्त यादवराव तुंगार, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, अॅड. श्रीकांत गायधनी, ललीता शिंदे, जयंत शिखरे, सचिन पाचोरकर यांनीही आपली भूमिका मांडली. न्यायालयीन प्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगत विश्वस्त मंडळास दिलेले अधिकार जपण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले.

'स्वराज्य'च्या महिलांची धडक

पुणे येथील स्वराज्य महिला संघटनेच्या महिलांनी शनिवारी त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात धडक मारली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वराज्य महिला संघटनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनीता तानाजी गुट्टे, भाग्यश्री शांताराम नरवडे, सुरेखा राजेंद्र थोरात, मयुरी देशमाने, रंजना गणपत वाळुंज या महिला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी दाखल झाले. यावेळी गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश नसल्याच्या ३ एप्रिलच्या निर्णयाची प्रत देवस्थान विश्वस्तांनी महिलांच्या हाती सोपविली. मात्र महिलांनी उच्च न्यायालयाचे आदेश व शनिशिंगणापूरच्या घटनेचा हवाला दिला. परंतु वाद वाढू नये यासाठी पोलिसांच्या मदतीने त्यांना मंदिराबाहेर काढण्यात आले. काही वेळातच तेथे ग्रामस्थ गोळा झाल्याने त्यांची महिलांशी बाचाबाची होऊन परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूर मंदिरात प्र्रवेश करू पाहणाऱ्या तृप्ती देसाई यांचा विरोध करण्याचा इशारा हिंदू जनजागृती समिती प्रणित 'रणरागिणी' संघटनेने शनिवारी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशी बाणा !

$
0
0

धुळ्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात खान्देशातील शंभर कलावंतांनी 'खान्देशी बाणा' हा कार्यक्रम सादर केला. यात खान्देशातील कानबाई माता मिरवणूक, गवराई उत्सवावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांना शिवसेनेचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक केंद्र सरकारने सराफी व्यवसायावर लादलेला अबकारी कर पूर्णपणे रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सराफ व्यावसायिकांचे तीन दिवसांचे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला. शनिवारी सकाळी दहा वाजता या तीन दिवशीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणार्थींमध्ये राजेंद्र भावसार, रमेश वाखारकर, अनिल दुसाने, सुनील वाघ, इश्वर सोनवणे, दीपक शिऊरकर आदींचा समावेश आहे. गेल्या चाळीस दिवसांपासून सुरू असलेले सराफांचे अबकारी कराविरोधातील आंदोलन आता आणखी तीव्र होताना दिसून येत आहे. जोपर्यंत केंद्र सरकार संपूर्णतः अबकारी कर रद्द करत नाही, तोपर्यंत दुकाने उघडणार नसल्याचे स्पष्ट संकेत सराफांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने देण्यात आले आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पहावयास मिळाली आहे. आंदोलनाच्या चाळीस दिवसांनंतरही सराफांची मोठी एकजूट असल्याचे चित्र दिसून आले आहे. येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शनिवारी दिवसभरात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर, गिरीश टकले, राजेंद्र दिंडोरकर, संजय दंडगव्हाळ, राजेंद्र शहाणे, गिरीश नवसे, प्रसाद आडगावकर, किशोर दुसाने आदिंसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व सराफ व्यावसायिकांनी शनिवारी दिवसभर उपोषणार्थींची भेट घेऊन साखळी उपोषणात सहभाग घेतला. शिवसेनेच्या वतीने संपर्कप्रमुख अजय चौधरी, आमदार योगेश घोलप, विजय करंजकर, माजी महापौर विनायक पांडे, अजय बोरस्ते, नैय्या खैरे, डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images