म. टा. वृत्तसेवा,धुळे
शहरातील माधवपुरा व पालाबाजार परिसरातील नागरिक पाण्याच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत. या समस्येमुळे बुधवारी मनपामध्ये महासभा सुरू असताना येथील नागरिकांनी सभागृहात प्रवेश करत हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी धुळे महापालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांना आपल्या परिसरात येणारे गढूळ पाणी पिण्यास भाग पाडले. यामुळे मनपामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दुष्काळाच्या छायेत धुळे शहरात सध्या पाणीपुरवठा साठ्यानुसार सुरू आहे. त्यासोबतच शहरात काही ठिकाणी गेल्या अडीख्च वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, असे या नारिकांचे म्हणणे होते. त्याचा संताप येऊन शहरातील माधवपुरा आणि पालाबाजारच्या नागरिकांनी बुधवारी मनपाच्या महासभेत येत हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी काही नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात येऊन विरोधात्मक घोषणाबाजी केली.
या गोंधळात काही नागरिकांनी मनपा प्रशासनाला परिसरात पाइपलाइनद्वारे येणारे घाण व दूषित पाणी दाखविण्यासाठी आणले होते. ते दूषित पाणी आंदोलकांनी आयुक्त नामदेव भोसले यांना पिण्यास भाग पाडले. अखेर पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप करुन आयुक्तांना सभागृहाबाहेर नेले. मात्र यावेळीही आयुक्तांना बाहेर काढताना काही नागरिकांनी धक्काबुक्की केली.
याप्रकरणी बुधवारी उशिरापर्यत शहर पोलिस ठाण्यात नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पाण्याची समस्या घेवून आलेल्या नागरिकांचे म्हणणे होते की, गेल्या माधवपुरा, पालाबाजार प्रभाग क्रमांक २१ मध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षापासून दुषित व मैलायुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या भागात गेल्याच वर्षी नवीन पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली होती. मात्र त्याची जोडणी ही मुख्य जलवाहिनीला न जोडता ती जुन्याच पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याचे नगरसेविका मायादेवी परदेशी यांना सांगितले.
यावेळी महासभेत महापौर जयश्री अहिरराव, स्थायी सभापती सोनल शिंदे, विरोधी पक्षनेता संजय जाधव, नगरसेवक, मनपा अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. मात्र समस्या घेवून आलेल्या नागरिकांमुळे महासभेत गोंधळ झाल्याने महासभा तहकूब करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट