टीम मटा, नाशिक
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी 'अहिंसा परमो धर्मः'चा संदेश देत आणि यंदाच्या दुष्काळाचे भान राखत पाणीबचतीबाबत प्रबोधन करून शहर परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले. शहरातील सर्वच जैन मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम होऊन शोभायात्रा, चित्ररथांमुळे चैतन्यदायी झालेल्या वातावरणात विविध उपक्रम पार पडले. विविध जैन संघटनांनी समाजोपयोगी, तसेच धार्मिक उपक्रमांद्वारे भगवान महावीरांना वंदन केले. जैन सोशल ग्रुपतर्फे 'मिशन जलसेवा'
भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुपतर्फे आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याचे टँकर पुरविण्यात येणार असून, ही अत्यंत भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंगळवारी केले. जैन सोशल ग्रुप नाशिकतर्फे मिशन जलसेवा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० पाड्यांमध्ये १३ एप्रिल ते १५ जून या कालावधीत पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठविले जात अाहेत. लोकसंख्येप्रमाणे रोज किंवा एक दिवसाआड याचा पुरवठा होत आहे. एकूण ३५० टँकर पाठविण्यात येणार असून, हे अतिशय मोलाचे काम असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या मिशनच्या औपचारिक उद््घाटनावेळी ते बोलत होते.
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून गंगापूर धरण्यातून गाळ काढण्यासाठी जैन सोशल ग्रुपने सहकार्य करावे, अशी सूचना केली. त्यास त्वरित प्रतिसाद देत ग्रुपचे अध्यक्ष विजय लोहाडे व सचिव संदीप कटारिया यांनी या उपक्रमामधील सहभागाची हमी दिली दिली. ते म्हणाले की, जैन सोशल ग्रुप ही गत ३३ वर्षांपासून कार्यरत असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था असून, ग्रुपद्वारे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पू. रमणिक मुनीजी महाराज साहेब, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा व विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले यांनीही मिशन जलसेवा उपक्रमाचे कौतुक केले. जीवदया कार्यक्रमांतर्गत स्थानकवासी संघ संचालित खंबाळा गोशाळा, मंदिरमार्गी संघ संचालित विल्होळी गोशाळा, पिंपळगाव येथील गोशाळेला प्रत्येकी ५ टन चारा पाठविण्यात आला. अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने झालेल्या मेगा रक्तदान शिबिरात ३७० रक्तपिशव्यांचे संकलन झाले.
दरम्यान, सकाळी ७ वाजता नाशिक सेवा संघातर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेद्वारे जैन सोशल ग्रुपतर्फे संत गाडगे महाराज पुतळा, महाबळ चौक, रविवार कारंजा, अशोक स्तंभ व चोपडा लॉन्स येथे पाणीबचत व स्वछता यावर सप्तसूर ग्रुपतर्फे जनजागृतीपर पथनाट्ये सादर झाली. त्यासाठी आमोद मेहता, जयचंद पटणी, नावीनजी चौकसी, सचिन शाह, म्हसरूळ बालमंडळ, सतीश पारख, कांतिलाल चोपडा, अभय तातेड, अजय ब्रह्मेचा, प्रणय संचेती, दिलीप पहाडे, प्रवीण संचेती, अमित कोठारी, हेमंत दुगड, नीलेश भंडारी, ललित मोदी, सचिन गंग, हर्षवर्धन गांधी आदींनी सहकार्य केले.
सिडकोत शोभायात्रेने फेडले पारणे
भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त सिडको येथील सकल जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सिडकोवासीयांच्या नेत्रांचे पारणे फेडले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक कलांच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीचा हा सोहळा देखणा ठरला. मिरवणुकीद्वारे विश्वशांती आणि सदभावनेचा संदेश देतानाच भगवान महावीरांचा जयजयकार करण्यात आला.
सिडको परिसरातील जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आकर्षक रथ, त्यावर विराजमान भगवान महावीरांची प्रतिमा, ढोल-ताशा पथकाला आलेले उत्साहाचे भरते यामुळे मिरवणुकीची श्रीमंती अधिकच वाढली. महावीरांच्या दया, क्षमा, शांतीच्या संदेशांचे फलक घेऊन समाजबांधव सहभागी झाले होते. राणाप्रताप चौक येथील जैन स्थानकातून शोभायात्रेला सुरुवात झाली. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते शोभायात्रेचे उदघाटन झाले. भगवान महावीर यांनी दिलेल्या सत्य, अहिंसा, संयम, क्षमा व तप या विचारांचे आचरण प्रत्येकाने केल्यास भारताचेच नव्हे तर विश्वाचे कल्याण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजयनगर, उत्तमनगर, पवननगर, रायगड चौक, सावतानगरमार्गे सकाळी अकराच्या सुमारास ही शोभायात्रा त्रिमूर्ती चौकातील जैन स्थानकात पोहोचली. मालवकेशरी सौभाग्यमरूजी म. सा. यांचे सुशिष्य प. पू. उपप्रवर्तक श्री प्रमोदमुनीजी म. सा. यांच्या अमृतवाणीचा लाभ यावेळी भाविकांना मिळाला. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जयंती कार्यक्रमात त्रिमूर्ती चौक, पवननगर, राणाप्रताप चौक येथील श्री वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक श्राविका संघांशी संलग्न शेकडो जैन बांधव, तसेच राणाप्रताप चौकातील नवकार ग्रुप, पवननगर येथील महावीर युवक मंडळ, त्रिमूर्ती चौक येथील जय जिनेन्द्र ग्रुप, उंटवाडी येथील आनंद ग्रुप आणि भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी सतिश सुराणा, पंकज चतुरमुथा, दुर्गेश पारख, माणिकचंद लोढा, भवरीलाल दुगड, संजय ओस्तवाल, अशोक चोपडा, नंदा चोरडिया, वैशाली नहाटा, ललिता चोरडिया, गणेश साखला, अनिल कर्नावट, राजू लोढा, पंकज साखला, प्रकाशचंद नहाटा आदींनी प्रयत्न केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट