कागदाचा तुटवडा निर्माण झाल्याने दोन ते अडीच महिन्यांपासून वाहनधारकांना आरसी बुक (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) देण्याची प्रक्रिया ठप्प पडली आहे. तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त वाहनधारकांना आरसी बुकविना वाहने हाकावी लागत आहेत. मात्र, दुसरीकडे वाहनाची कागदपत्रे नसतील तर कारवाई करावीच लागते, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. आरटीओच्या लेटलतीफ कारभारचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, फक्त आरसी बुकसाठी दंडात्मक कारवाई झाली, तर ही रक्कम आरटीओ कार्यालयाकडून वसूल व्हावी, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यासह राज्यातील आरटीओ कार्यालयात देण्यात येणारे आरसी बुक काही वर्षांपूर्वी पुस्तकांच्या स्वरुपात देण्यात येत होते. मात्र, ते सांभाळणे जिकरीचे असल्याने त्यात बदल करण्यात आला. स्मार्टकार्ड तयार करण्यासाठी एका खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. सरकार व ठेकेदारातील करार संपल्यानंतर स्मार्ट कार्ड योजना गुंडाळण्यात आली. सध्या, संबंधित ठेकेदार व सरकारमध्ये तह सुरू असून, त्यावर कधी निर्णय होईल, हे सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाने जुन्याच पध्दतीने आरसी बुक देण्यास सुरुवात केली आहे. छपाईसाठी हा कागद परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, १६ फेब्रुवारी २०१६ पासून हा कागदच नाशिक परिवहन विभागाला प्राप्त झालेला नाही. नाशिक आरटीओ कार्यालयात दररोज सरासरी अडीचशे वाहनांचे रजिस्ट्रेशन होते. म्हणजेच, १६ फेब्रुवारीपासून सुमारे १० हजारांपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे. मात्र, रस्त्यावर फिरणाऱ्या या वाहनांना आरसी बुकच नाही. दरम्यान, कारणे काहीही असली तरी वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत असावी, असे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त देवीदास पाटील यांनी सांगितले. वाहनांचे कागदपत्रे नसतील, तर वाहनमालकावर कारवाई करावीच लागेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. आरटीओच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. जानेवारी ते चालू महिन्यापर्यंत वाहतूक विभागाने एकूण ४२ हजार ४६१ वाहनमालकांवर विविध नियमांनुसार कारवाई केली आहे. यात वाहनाची कागदपत्रे नाहीत म्हणून पाच हजार २९९ वाहन मालकांकडून दंड वसूल करण्यात आला. आरटीओ विभागाकडून आरसी बुक केव्हा उपलब्ध होईल, हे सांगता येत नाही. पोलिसांच्या कारवाईमुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. विशेषतः वाहनास टोईंग केले गेले तर वाहनचालकाच्या समस्या खूपच वाढतात. वाहनचालकास होणाऱ्या त्रासास आरटीओ कार्यालय कारणीभूत असून, त्यांनीच दंडाची रक्कम भरावी, अशी मागणी ग्राहक म्हणून वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
आरसी बुकसाठी कागदाची उपलब्धता नाही. त्यामुळे आरसी बुक देण्याचे काम ठप्प झाले आहे. ही समस्या नाशिकमध्येच नाही तर संबंध राज्यात आहे. यावर लवकरच तोडगा निघेल. वाहनचालकाकडे रजिस्ट्रेशन पावती असते, ती त्यांनी पोलिसांना सादर करावी. - जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी
आरसी बुकच मिळत नसल्याने वाहनचालक त्रस्त आहेत. आरटीओ कार्यालयात संपर्क केला की पोस्ट ऑफीसचे कारण पुढे करण्यात येते. नागरिकांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. परिवहन विभागाच्या सावळ्या गोंधळाबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येणार आहे. - गोविंद लोखंडे, शिवसेना पदाधिकारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट