म. टा. वृत्तसेवा, निफाड
बागायती शेतीसाठी प्रसिद्ध निफाड तालुक्यात गेल्या ५ वर्षांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. त्यावर आता येथील शेतकऱ्यांनी शेततळे हा परिणामकारक पर्याय वापरत पाणीटंचाईवर मात केली आहे. तालुक्यात सद्यस्थितीत २८७ शेततळ्यांचे काम झालेले असून राज्य सरकारकडे एकूण २,१५३ शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले आहे. त्यामुळे शेततळ्यांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय असल्याने पाणीटंचाईवर याने एक चांगला उपाय समोर आला आहे.
या शेततळ्यांना सरकारी अनुदान असल्याने शेतकऱ्यांचा कल तिकडे वाढला आहे. निफाड तालुक्यात आतापर्यंत २८७ शेततळ्यांचे काम पूर्ण होऊन त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. दुसरीकडे गेल्या ४ वर्षांपासून सरकारने त्यासाठी असणारे अनुदान बंद केले होते. यावर काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक खर्चाने शेततळे केले होते. मात्र या वर्षापासून राज्य सरकारने 'मागेल त्याला शेततळे' ही घोषणा केल्याने २,१५३ शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये १,५६८ अर्ज ऑनलाइन तर कृषि विभागाकडे सामूहिक शेततळे योजनेसाठी २८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. फळबागांना जीवदान असणाऱ्या या शेततळ्यांचे प्रमाण तालुक्यात वाढले असून विशेष करुन तालुक्याच्या उत्तर पट्टयात जास्त शेततळी आहेत. त्या खालोखाल पश्चिम भागात आहे, मात्र गोदावरी नदी भागात एक किंवा दोन गावे सोडल्यास अद्याप शेततळे दिसत नाही.
शेततळे उपयुक्त पर्याय
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव, उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव आदि उत्तर भागातील गावांमधे याचा फायदा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यामुळे या भागातील द्राक्ष बागा जगल्या व त्यातून उत्पादनही मिळालेले आहे. सद्यस्थितीत पाण्याची जाणवणारी कमतरता आणि भविष्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेततळे हा उपयुक्त पर्याय स्वीकारल्याचे निफाड तालुक्यात होत असलेल्या निर्मितीतून समोर येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट