पाचोराबारीत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये
म. टा. वृत्तसेवा, धुळे
नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी परिसरात रविवारी, (दि. १०) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील नाल्याला आलेल्या पुरात चारजण वाहून मृत्यूमुखी पडले तर दोन जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी, (दि. १२) भेट देऊन पाहणी केली असून राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली. अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या खासदार डॉ. हीना गावित यांनीदेखील तत्काळ मायदेशी परतत पाचोराबारीत पाहणी केली. केंद्राकडून अतिवृष्टीत मृत व जखमींच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या अतिवृष्टीत सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील रूळ खचल्याने रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी पहाटेपासून रेल्वेमार्ग सुस्थितीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तर बुधवारी दुपारनंतर हे काम सुरळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रविवारी (दि. १०) झालेल्या अतिवृष्टीने पाचाेराबारी भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच या पावसाने रेल्वेसेवाही ठप्प झाली असून ती सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर पाचोराबारी गावाचे जनजीवन पुन्हा सुरळीत होण्याच्या मार्गावर असून गावातील लोकांना सर्व सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येत आहेत. यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पाचोराबारीच्या नुकसानग्रस्त भागास पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जी. सी. मंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रांताधिकारी सुनिल गाडे, तहसीलदार नितीन पाटील, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता वर्षा अहिरे, जिल्हा परिषदेचे बी. एन. पाटील, मध्यम प्रकल्पाचे गिरवीरसिंग सुखमणी आदींनी भेटी देत पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राज्य सरकारकडून मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तत्काळ चार लाख रुपये देण्यात आले. तसेच ज्यांची गुरे-ढोरे, जनावरे वाहून गेली त्यांना तीस हजारांची मदत देण्यात आली. या मदतीपासून एकही जण वंचित राहणार नाही याबाबत त्यांनी सूचना दिल्या. घटनेतील नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना वेळेत मदत करण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी दिल्या. पुरामुळे चार जणांचा मृत्यू तर दानजण बेपत्ता आहेत. तसेच एकूण १७३ छोटी व मोठी जनावरे मृत झाली असून त्यांच्या मृत शरीराची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात आले. या गावातील एकूण ३२ घराचे पुर्णत: व १३९ घराचे अंशत: नुकसान झाले आहे. रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्यामुळे अंदाजे ३ किलोमिटर लांबीचा रेल्वेमार्ग बाधित झाला आहे. त्यांच्या दुरुस्तीबाबत रेल्वे विभागामार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मलिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
गाड्यांच्या मार्गात बदल
भुसावळ : नंदुरबार येथ झालेल्या अतिवृष्टीने मंगळवारी, (दि. १२ जुलै) रोजी ११ गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे. तर गाडी क्र. ५९०१४ सुरत-भुसावळ ही रेल्वे रद्द करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये चैन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस (गाडी क्र.१२६५६) ही गाडी मनमाड, कल्याण, भोईसरमार्गे वळविण्यात आली आहे. सुरत-भागलपूर (गाडी क्र.१९०४७) ही दीड तास उशिराने निघेल. तर उधना-धनपूर (गाडी क्र. १९०६३) ही गाडी १० तास ४५ मिनिटे उशिराने सुटेल. सुरत-पुरी एक्स्प्रेस (गाडी क्र.२२८२६) ही गाडी ३ तास ३५ मिनिटे उशिराने धावेल. जोधपूर-चैन्नई (गाडी क्र.१६१२६) ही भोईसर, कल्याणमार्गाने धावेल. तसेच भागलपूर-सुरत (गाडी क्र.१९०४८) ही गाडी भुसावळ, इगतपुरीमार्गे धावणार आहे. अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस
(गाडी क्र.१२८४४) ही गाडी कल्याणमार्गे धावेल. सुरत-पुरी
(गाडी क्र.२२८२८) ही गाडी १९ तास उशिराने सुटेल. अहमदाबाद-हावडा (गाडी क्र.१२८३३) ही गाडी दहातास उशिराने धावेल, तर अहमदाबाद-चैन्नई एक्स्प्रेस (गाडी क्र.१२६५५) ही गाडी १३ तास १५ मिनिटे उशिराने सुटेल. तसेच गाडी क्र.19263 पोरबंदर दिल्ली रोहिला (गाडी क्र.१९२६३) ही गाडी २० तास १० मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट