विश्वकवितेत भारतीय कविता मला कोठेच दिसत नाही. कारण भारतीय कविता व्यापक नाही. तिला विषयांची बंधने आहेत. विज्ञानासारखा महत्त्वाचा विषय तिच्यात कुठेच डोकावताना दिसत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी विष्णू खरे यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तरी अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विष्णू खरे यांचे हिंदी कविता वाचन व संवाद झाला यावेळी ते बोलत होते.
खरे पुढे म्हणाले की, विश्वकवितेत शब्दसंपत्ती, विषयाचे वैविध्य अनेक प्रकाराने असते. त्यामुळे तेथे टिकण्यासाठी या गोष्टी आपल्या कवितेने आत्मसात करायला हव्यात. सवर्णांमध्ये किमान २० ते २५ नामदेव ढसाळांसारखे कवी असतील तरच ही कविता स्थान मिळवू शकेल. कवितेविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, माझी कविता गद्याच्या टोकापर्यंत जाते. परंतु तिचे गद्य होत नाही. हे कसे झाले, ते इतके प्रसिध्द कसे झाले ते मला कळलेच नाही. या कार्यक्रमात खरे यांनी वृंदावन की विधवाएँ, बेटी, कोशिश, डरो, प्रतिरोध अशा काही गाजलेल्या कविता यावेळी सादर केल्या. यावेळी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, कवी प्रफुल्ल शिलेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुरेश गायधनी यांनी केले. मराठीतील नामवंत कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी विष्णू खरे यांना अनेकविध विषयांवर बोलते केले. मराठी भाषा ही अनेकविध बाबींनी नटलेली असून मला त्यापुढे हिंदी भाषा खुजी वाटते असे मत ज्येष्ठ कवी विष्णू खरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, माझी संस्कृती ही मराठी आहे म्हणून मी बोलत नाही तर मी आयुष्यभर हिंदीत लिखाण केल्याने तसा अधिकार प्राप्त झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट