गोदावरीसह संपूर्ण राज्यातील पूरपरस्थितीला अनधिकृत बांधकामेच जबाबदार आहेत. तरीही राज्यसरकार अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यासारखे मूर्खपणाचे निर्णय घेत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. नाले बुजवले गेल्यानेच ही आपत्ती आल्याचे सांगून सर्वच शहरांची ती समस्या बनल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले. गोदावरीला आलेल्या पुरासंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली असून, आवश्यक ती मदत करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महापुरानंतर महापालिका प्रशासनाचे काम उत्तम चालू असल्याचे प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिले. घनकचरा व डेब्रसि शहरातून पूर्णपणे बाहेर काढण्याची सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गोदावरीला आलेल्या महापुराच्या स्थितीची बुधवारी पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक वर्षांनंतर अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे झालेले नुकसान पाहून वाईट वाटले. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जात आहे. महापौर व आयुक्तांसोबतच महापुरासंदर्भात चर्चा केली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरात अनधिकृत बांधकामांवर सर्वाधिक हातोडा मारला गेला. परंतु, तरीही नाल्यांवर बांधकाम झाले. नदीकाठावरही अतिक्रमण होऊन ही बांधकामे सरसकट अधिकृत केली जात आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांमुळे आज पूरस्थिती ओढावली आहे. परंतु यातून सरकार काही शिकण्याऐवजी अशी बांधकामे सरसकट अधिकृत करून मूर्खपणाचे निर्णय घेत आहे. शहरातील नाले व नदीवरील अतिक्रमित बांधकामांसह घनकचरा व बांधकामाचे डेब्रिसही पुराच्या घटनेला जबाबदार आहे. घनकचरा पूर्णपणे उचलण्यासह डेब्रिसचे स्वतंत्र टेंडर काढून काम देण्याच्या सूचना आपण केल्याचे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. असे केले नाही तर अशीच परिस्थिती कायम राहील, असेही ते म्हणाले.
हा आनंदाचा विषय नाही गोदापार्कच्या दुरवस्थेवर माध्यमांनी टीका केल्याने ठाकरे चांगलेच संतापले होते. गोदापार्कची दुरवस्था होणे हा आनंदाचा विषय नाही, असे सांगून येथे माझी नव्हे, तर नाशिककरांची मुलेच खेळायला येणार होती, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. महापुराने नुकसानच होते असे सांगून त्यांनी महापूर येणार म्हणून अजून किती वरती बांधकाम करायचे, असा उलट सवाल केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट