September 5, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शिक्षक हा विद्यार्थ्याच्या आचार-विचारातून पुढची पिढी घडवत असतो. त्यांना चांगले नागरिक बनवितो, तसेच नीतिमत्तेचे पालन करत जगायलाही शिकवतो. शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांमधील माणूस जागा करून त्यांच्यावर उच्च संस्कार केले पाहिजे, असे प्रतिपादन कर सल्लागार सी. जे. गुजराथी यांनी केले.
प्रौढ नागरिक मित्रमंडळातर्फे ताराबाई साळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी शिक्षक सन्मान सोहळा झाला. प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या समाजमंदिरात हा कार्यक्रम झाला. ते म्हणाले, की प्राचीन परंपरेपासून शिक्षकांचे स्थान गुरूसमान आहे. ज्या देशात शाळा असतात त्या देशाचे भविष्य उज्ज्वल असते, अशी इंग्रजीत म्हण आहे. कारण शाळांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेला शिक्षक ती पिढी घडविण्यात मदत करीत असतो. जो चालत राहतो तो परिस्थितीचा स्वामी असतो. जो थांबतो तो परिस्थितीचा दास असतो. त्यामुळे सतत चालत राहा, असा सल्ला त्यांनी दिला. आशा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत जामदार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अनंत साळी, उपाध्यक्ष शरद पाटील, विजया पंडित, सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुरस्कारार्थी शिक्षक
सुनंदा परदेशी, नेहा मुळे, अर्पिता घारपुरे, शोभा आरोटे, अर्चना टांकसाळे, सदाशिव मसलेकर, तुळशीराम साळुंके, मृदुला पिंगळे, युगंधरा पुणतांबेकर, कीर्ती सावंत, शिल्पा भामरे, उषा कर्पे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 5, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गेल्या वर्षी गंगापूर, गोवर्धन शिवारात गणेशमूर्ती विसर्जनामुळे झालेला धार्मिक व भावनिक तणाव पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी यंदा या भागात गणेशमूर्ती विसर्जित न करू देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या उपस्थितीत या संदर्भात नुकतीच बैठक झाली. गेल्या वर्षी गंगापूर धरणात पाणी कमी होते. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले नव्हते. तरीही गंगापूर, गोवर्धन शिवारातील गोदापात्रात मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली. सुमारे साडेसात हजार मूर्ती येथेच टाकून देण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी हा प्रकार पुढे आल्याने काही रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणारा हा प्रश्न हाताळणे जिल्हा प्रशासनालाही जिकिरीचे ठरले. गोदापात्रातील या मूर्ती तब्बल २० मालट्रकमधून हलवून त्यांची विधिवत विल्हेवाट लावण्यात आली. गोदापात्रात जेथे पाणी आहे, अशाच ठिकाणी भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत यंदा गंगापूर, गोवर्धन शिवारात, त्याचबरोबर धरणातही गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमेश्वर धबधब्यापासून रामकुंड व त्याही पुढे भाविक कोठेही विसर्जन करू शकणार आहेत. यासाठी सोमेश्वर धबधब्यापासूनच बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. शहरातील एकही मूर्ती गोवर्धनच्या पुढे जाऊ देणार नसल्याचे निश्चित करण्यात आले आहे. गंगापूर, गोवर्धनवासीय, तसेच धरणाच्या पुढील गावांनीदेखील याच ठिकाणी विसर्जन करावे, यासाठी आग्रह धरला जाणार आहे.
मूर्तिदानासाठी आग्रह
अधिकाऱ्यांनी सोमेश्वर, आनंदवल्ली, आसारामबापू पूल, घारपुरे घाट, रामवाडी, रामकुंड या गोदाकाठच्या स्थळांची पाहणी केली आहे. भाविकांनी मूर्ती विसर्जन करण्याऐवजी शक्यतो त्या दान कराव्यात, यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी काही खासगी संस्था, संघटनांची मदत घेण्यात येणार आहे.
नदीपात्र खोल असेल तर त्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करता येते. मात्र, पात्र उथळ असेल तर मूर्तींचे विसर्जन व्यवस्थित होत नाही. गंगापूर, तसेच गोवर्धन येथील पात्र उथळ आहे. गेल्या वर्षी साडेसहा ते सात हजार मूर्ती तेथे पडून होत्या. म्हणूनच यंदा तेथे मूर्ती विसर्जन न करू देण्याचा निर्णय पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
- राजश्री अहिरराव, तहसीलदार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 5, 2016, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जलसंपदा विभागात गैरव्यवहार रोखण्यासाठी इस्टीकॉम ही नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचा गंभीर विचार सुरू आहे. या प्रणालीचा अभ्यास व अंमलबजावणी करण्यासाठी या विभागाने एक समिती नियुक्त केली आहे. त्यात सात अधिकाऱ्यांची नावे निश्चित केली आहे. ही समिती या प्रणालीचा अभ्यास करून त्यात तांत्रिक बदलही सुचवणार आहे. एक महिन्याच्या आत या समितीला कृती आराखडा तयार करण्याचेही सांगण्यात आले आहे.
नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्थेचे (मेरी) निवृत्त अभियंता विजय पांढरे यांनी जलसंपदा विभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणल्यानंतर हा विभाग चर्चेत आला. त्यामुळे जलसंपदा विभागाने ऑनलाइन इस्टीमेट अँड काँट्रॅक्ट मॅनेजमेंट (इस्टीकॉम) ही प्रणाली विकसित करण्याचा विचार सुरू केला. सध्या ही प्रणाली राज्यातील एमआयडीसी व पुणे महापालिका वापरते, तर इतर राज्यांत सार्वजनिक बांधकाम विभाग याचा वापर करत आहे.
जलसंपदा विभागांतर्गत पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्पांची कामे सुरू असून, शासनाने ई प्रशासनाचे धोरण स्वीकारल्यामुळे जलसंपदा आता त्या दिशेने जाणार आहे. या प्रणालीत कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, कामास तांत्रिक मान्यता देणे, प्रारूप निविदा प्रपत्रे तयार करून त्यास सक्षम स्तरावर मान्यता देणे, करारनामा व्यवस्थापन आदी अंतर्भूत असणार आहे. विशेष म्हणजे करारनामा व्यवस्थापनात कंत्राटदारांची माहिती, कार्यारंभ आदेश, कामाची मोजमापे, देयक तयार करणे, देयकांची माहिती यासह संपूर्ण प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे कंत्राटदारावर अंकुश ठेवणे शक्य होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 5, 2016, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या मानाच्या श्रीगणेशाची आयुक्त अभिषेक कृष्णा व सौम्या कृष्णा यांच्या हस्ते सपत्निक पूर्व विभागीय कार्यालयात सोमवारी स्थापना करण्यात आली. पालिकेच्या मुख्यालयातही कृष्णा दाम्पत्याच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. 'रामायण' या महापौरांच्या निवासस्थानी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते गणेश स्थापना करण्यात आली आहे.
महापालिकेचा गणपती मानाचा असतो. मेन रोडवरील पूर्व विभागीय कार्यालयात त्याची दरवर्षी प्रतिष्ठापना केली जाते. आयुक्त कृष्णा दाम्पत्याच्या हस्ते सोमवारी सकाळी श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. मेन रोडसोबतच पालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रामायण या महापौरांच्या निवासस्थानीही दरवर्षी गणेशाची स्थापना केली जाते. शहराची व पालिकेची सर्व कामे निर्विघ्न व चांगली व्हावी यासाठी आयुक्तांनी गणरायाकडे प्रार्थना केली. या वेळी शिक्षण समितीप्रमुख संजय चव्हाण, प्रभाग सभापती नीलिमा आमले, नगरसेवक सचिन महाजन, अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, आर. एम. बहिरम, डी. टी. गोतिसे, शहर अभियंता सुनील खुने, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, अग्निशमन दलप्रमुख अनिल महाजन, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, कार्यकारी अभियंता गौतम पगारे, एस. वाय. पवार, शरद बनकर, नितीन वंजारी, सहाय्यक आयुक्त जयश्री सोनवणे, विभागीय अधिकारी नितीन नेर, जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, मधुकर झेंडे आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 5, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांचे खंदे समर्थक व निष्ठावान समजल्या जाणाऱ्या एका कार्यकर्त्याने आपल्या गणेशोत्सव मंडळाचा परिसर भगवामय केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराची मोठी उलाढाल होणार की काय, याबाबत तर्कविर्तक काढले जात आहेत.
राजीवनगर येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतोष कमोद दरवर्षी गणेशोत्सव साजरा करीत असतात. यंदाही त्यांनी गणेशोत्सवाची तयारी केली आहे. मात्र या ठिकाणी छगन भुजबळ यांच्या प्रतिमांचे गेट तयार करण्यात आले असले तरी हे गेट व परिसर पूर्णपणे भगवामय केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. कमोद यांच्या पत्नीने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. यंदाही कमोद यांच्या कुटुंबातील कोणी ना कोणी निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चितच आहे. मात्र, अचानकपणे राष्ट्रवादीचे फलक लावण्याऐवजी भगवामय वातावरण केल्याने नक्की कोण पक्षांतर करणार, याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. या नव्या संकल्पनेमुळे भुजबळ स्वतःच शिवसेनेत जाणार की काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
राजीवनगर येथे श्री साईबाबा मंदिराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेत असतो. त्यामुळे भगवा रंग वापरण्यात तसा काहीही विचार नाही. आम्ही भुजबळ साहेबांचे समर्थक आहोत. जेथे साहेब तेथेच आम्ही. भगवा रंग वापरण्यावरून कोणताही राजकीय उद्देश नसल्याचे संतोष कमोद यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 5, 2016, 3:49 pm
Vinod.patil@timesgroup.com
नाशिक : राष्ट्रवादीचे मातब्बर नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीचे मूल्यांकन एसीबी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे भुजबळ फार्ममधील पुरातन वस्तूंसह स्विमिंग पूलच्या मूल्यांकनाचे कामाचे आऊटसोर्सिंग केले जात आहे. महालांमधील मौल्यवान वस्तुंच्या मूल्याकंनाचे काम मुंबईतील एका खासगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२२ ऑगस्टपासून भुजबळ फार्मच्या मूल्यांकनाचे काम सुरू आहे. तसेच येवला व मनमाडमधील संपत्तीचेही मूल्यांकन केले जात आहे. एसीबीने वस्तूंची यादी करीत पंचनामा केल्यानंतर त्यांच्या मूल्यांकनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. परंतु, बांधकाम विभागाकडे या वस्तुंच्या मूल्यांकनासाठी तज्ज्ञच नाहीत. त्यामुळे एकूणच महाल व वस्तुंच्या मूल्याकंनाचे काम एसीबीने मुंबईतील एका बड्या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून आता फार्महाऊसमधील जागा, वस्तूंचे मूल्यांकन सुरू आहे. कंपनीकडे विविध प्रकारचे एक्स्पर्ट असून, ते आपला संपूर्ण अहवाल बांधकाम विभागाला सादर करणार आहेत. त्यानंतर बांधकाम विभाग हा अहवाल एसीबीकडे सादर करणार आहे.
तरच चार्जशीट!
भुजबळांचे गेल्या दहा वर्षांतील उत्पन्न, त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेली माहिती याची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीत भुजबळांची मालमत्ता व प्रत्यक्ष उत्पन्नाचा ताळमेळ बसला नाही तरच कोर्टात चार्जशीट दाखल केले जाईल. समजा उत्पन्न व सपंत्तीचा ताळमेळ बसला, तर मात्र चार्जशीट दाखल होणार नाही, अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
वैद्यकीय व सामाजिक कार्यात आपल्या उपक्रमशीलतेमुळे वेगळा ठसा उमटविणारे सर्जन डॉ. रवी वानखेडकर यांची 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून डॉ. रवी वानखेडकर यांच्या रूपाने धुळ्याला राष्ट्रीय पातळीवरचा बहुमान मिळाला आहे.
वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. वानखेडकर यांना अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्राला फक्त दोनवेळा, तर खान्देशला प्रथमच डॉ. वानखेडकर यांच्या रूपाने बहुमान मिळाला आहे. आयएमए संघटनेचे तीन लाख डॉक्टर सभासद आहेत. ही संघटना जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था आहे. या संघटनेच्या भारतभर दोन हजार शाखा आहेत. डॉ. वानखेडकर हे २०१६-२०१७ आयएमए नॅशनल प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून आणि २०१७-२०१८ या वर्षासाठी नॅशनल प्रेसिडेंट म्हणून जबाबदारी सांभाळतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
'पालिकेच्या सर्वच सभा घंटागाडी, ठेकेदार आणि निविदांच्या निमित्ताने गाजतात; पण् आज शाळाबाह्य प्रवाहात अडकलेल्या चिमुरड्यांच्या मुठीत उद्याच्या देशाचे भविष्य दडले आहे, ही संवेदना कोणाला अस्वस्थ करते का? ही मुले आज शिक्षणाच्या प्रवाहात आणता आली नाहीत तर उद्या याच समाजाला ती दोषी धरतील. मात्र, तेव्हा वेळ हातची गेलेली असेल..! ' हे बोल आहेत महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांचे.
चाके शिक्षणाची, कलम टीम आणि मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या संदर्भातील उपक्रमास अभिषेक कृष्णा प्रमुख पाहुणे होते. त्रिमूर्ती चौकातील इस्पॅलिअर शाळेच्या व्यासपीठावरून ते बोलत होते.
कृष्णा यांच्या शिक्षणविषयक चिंतनाने उपस्थित गुरूजी अवाक् तर झालेच; पण पुढे त्यांनी शिक्षण मंडळाला दिलेल्या कानपिचक्यांची चर्चा कार्यक्रमाच्या अखेरीला चांगलीच रंगली. 'आयडेंटिफाय कीड्स' या अॅपद्वारे शहरातील शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला गेला. यातून हाती आलेल्या निष्कर्षांवर आधारित अहवालाचे प्रकाशनही कृष्ण यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी केवळ उद््घाटनाची औपचारिकताच न ठेवता कृष्णा यांनी शिक्षण आणि आरोग्य हा आपला आवडता अन् चिंतनाचा विषय असल्याचे सांगताच सभागृह अवाक् झाले.
कृष्णा यांच्या संवादात स्पष्टवक्तेपणाशी कुठलीही तडजोड जाणवली नाही. मनपा शाळांविषयी बोलताना त्यांनी स्वत:ला खासगी शाळेचे प्रॉडक्ट अशी उपमा देत मनपा शाळांबाबत सखोल चिंतन मांडले. मुलांच्या शाळाबाह्यतेवर चिंता व्यक्त करताना त्यांनी प्रशासनालाही कानपिचक्या दिल्या. 'कुठल्याही मोहिमेची सुरुवात हा तिचा शेवट नसतो, तर शाळाबाह्य जगतातून आलेली मुले आता ज्या वेळी या शाळेच्या आवारात वर्षानुवर्षे टिकतील, जिद्दीने पुढे शिकतील.' तेच या मोहिमेचे खरे यश असेल, असे चिंतनही या वेळी त्यांनी मांडले. 'प्रशासनाची कुठलीही सुरुवात मोठी असते; पण त्याच्या शेवटाचा थांगपत्ता नसतो', अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
मुलांबाबत बोलताना त्यांना शिक्षण, आरोग्य आणि कौशल्याचे धडे द्या, अशी त्रिसूत्रीही त्यांनी दिली. शिक्षण अन् आरोग्याबाबत अजिबात उदासीनता दाखविलेली मला खपणार नाही. मग मी संबंधित अधिकाऱ्यांचा पाठपुरावा सोडनार नाही, असा इशाराही कृष्णा यांनी दिला. शिक्षकांनाही कानपिचक्या देताना त्यांनी, आता तरी चौकटीबाहेर पडावे, असे सांगितले. कारण एकविसाव्या शतकात असूनही आपण आज शाळाबाह्यतेसारख्या प्रश्नांशी झगडतो आहोत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पिंपळगाव (निपाणी) येथे केजीएस शुगर साखर कारखान्याच्या यंदाच्या ऊस गळीत हंगामाचा तृतीय बॉयलर प्रज्वलन सोहळा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर झाला. कारखान्याचे व्यवस्थापकीय व उपाध्यक्ष संतोष बोडके या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, की परिसरात ऊस उत्पादन वाढावे यासाठी उपप्रकल्प म्हणून खत प्रकल्पातून दर्जेदार खताचे उत्पादन केले. या खतामुळे कमी पाणीवापरातून भरघोस ऊस उत्पादन होण्यास मदत होऊन पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करून दिली. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील तांत्रिक त्रुटी दूर करून व्यवस्थापन, नियोजन करून उत्पादन कसे दर्जेदार होईल याबद्दलही बोडके यांनी माहिती दिली.
प्रल्हादराव कराड अध्यक्षस्थानी होते. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस गळतीसाठी होणारी गैरसोय, अडचणी, कारखान्याची स्पर्धा, उसाचा दर, उसाचे पेमेंट याबाबत सविस्तर माहिती दिली. ऊसतोडणी, कामगार कंत्राटदार, वाहतूकदार व शेतकरी बांधवांना वेळोवेळी सहकार्य, सुविधा देण्याचे सूचित करून केजीएस कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत सरस असल्याचा दावाही कराड यांनी केला. संचालक मंजुषा बोडके, गणेश कराड, रतन पाटील वडघुले, हरिभाऊ गाभणे, देबाशिष मंडल, सुनील कुंदनानी या वेळी उपस्थित होते. बाळासाहेब कराड, मोहन बोडके, विश्वास कराड आदी उपस्थित होते. गणेश कराड यांनी आभार मानले. प्रकल्पप्रमुख गोपाळ आरखडे यांनी सूत्रसंचालन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 6, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, निफाड
गेल्या तीन वर्षांपासून बंद पडलेल्या आणि थकबाकीमुळे जप्ती करावी लागलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्यातील लाखो रुपये किमतीच्या यंत्रसामग्रीच्या सुट्या भागांची चोरी झाली असून, या चोरी प्रकरणी कारखाना प्रशासन कोणतीही हालचाल करीत नसल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. एवढी मोठी चोरी पचवायच्या डावात असलेल्या संबंधितांना या वृत्ताचा चांगलाच झटका बसला असून, सोमवारी निफाड पोलिस स्टेशनमध्ये बँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. बी. भंडारे यांनी निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
खरेदीच्या पावत्या आणल्याशिवाय फिर्याद न घेणाऱ्या निफाड पोलिस स्टेशनने अखेर फिर्याद नोंदवून घेतली. आता पोलिस किती सचोटीने या प्रकरणाचा तपास करतात, यावर या चोरीचा तपास लागेल. पोलिसांनी मनापासून शोध घेतला तर इतरही चोऱ्या उघडकीस येऊ शकतात.
सुमारे १३६ कोटी ५८ लाख रुपये कर्ज असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्यावर २९ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्हा बँकेने थकबाकीपोटी जप्ती करून सील लावले होते. तत्पूर्वीच २७ ऑगस्ट रोजी चोरीची ही घटना कारखान्याचे सहाय्यक अभियंता धनंजय शंखपाळ यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कार्यकारी संचालक भंडारे यांनी निफाड पोलिस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दाखल केली. फिर्यादीत नमूद केले आहे, की अज्ञात व्यक्तीने कारखान्याच्या पॉवर हाऊसमधील पॅनल बोर्ड, तांब्याच्या धातूच्या पट्ट्या, रॉड असे साहित्य लंपास केले आहे. १९६५ मध्ये खरेदी केलेले हे साहित्य १२४० किलो वजनाचे असून, त्याची रक्कम ८६ हजार ८०० रुपये, १९७२ मध्ये खरेदी केलेले ४५० किलो वजनाचे ३६ हजार रुपये असे एकूण एक लाख रुपयांचे साहित्य जागेवर नाही.
फिर्याद मात्र किरकोळ चोरीची!
निसाकाच्या काही विभागांतून साहित्याची चोरी झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून निसाका कार्यस्थळावर आहे. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही होत नव्हती. 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला ही फिर्याद दाखल करावी लागली आहे. मोठ्या प्रमाणात साहित्य चोरीला गेले आहे; पण सध्या कारखान्यावर अधिकृत जबाबदार प्रशासन नसल्याने ही मोठी चोरी पचवण्याच्या प्रयत्नात काही लोक आहेत. आता जिल्हा बँकेने जाणकार आणि अभ्यासू व्यक्तींकडून कारखान्याच्या सर्व विभागांची साहित्य मोजायला हवे. त्याशिवाय या चोरीचे स्वरूप स्पष्ट होणार नाही.
सुरक्षा रक्षक काय करत होते?
बंद असलेल्या निसाकाच्या मशिनरींच्या सुट्या भागांची चोरी होत असताना सुरक्षा रक्षक काय करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एप्रिलमध्ये वीजपुरवठा खंडित केल्याने अंधाराचा फायदा घेऊन ही चोरी झाली. त्यानंतर सुमारे साडेतीन महिने झाले तरीही ही बाब लक्षात आली नाही. मात्र, जिल्हा बँक जेव्हा २९ ऑगस्ट रोजी जप्तीची कारवाई करणार होती, त्याच्या दोन दिवस आधीच ही घटना का लक्षात आली? मरणासन्न अवस्थेत नेऊन ठेवलेल्या निसाकाचे लचके तोडण्याचाच हा प्रकार आहे. यातील सूत्रधारांना शोधण्यासाठी आता जिल्हा बँकेनेच पुढे येण्याची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:30 pm
त्र्यंबकेश्वरला तहसीलदारांकडून दिलगिरी; निवासी नायब तहसीलदारांची मध्यस्थी
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
तहसीलदारांनी अवमानकारक भाषा वापरत गाडून टाकण्याची धमकी दिली म्हणून त्र्यंबकेश्वरच्या पालिका कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन मंगळवारी (दि. ७) अखेर निवासी नायब तहसीलदार ए. पी. कनोजे (शिसोदिया) यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. यावेळी कचराडेपोचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी सांगितले.
नगरपालिका कर्मचारी वर्गाच्या या कामबंद आंदोलनात शहर अभियंता, विभाग प्रमुख आदींसह अगदी शिपाईपर्यंत सर्व सहभागी झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. प्रारंभी मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी वर्तमानपत्रात तहसीलदारांनी दिलगिरी व्यक्त केल्याने हे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. यावेळेस त्यांच्या समवेत प्रभारी नगराध्यक्ष संतोष कदम, यशवंत भोये, योगेश तुंगार, दीपक लढ्ढा उपस्थित होते. मात्र तरीही संघटना ठाम होती. या चर्चेत अध्यक्ष बाळासाहेब फसाळे, सचिव भाऊराव सोनवणे सहभाग घेतला.
दरम्यान तहसीलदार महेंद्र पवार शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याने निवासी नायब तहसीलदार कनोजे यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. तहसीलदार यांच्याकडून चुकून शब्द गेले असतील. त्यांचा कर्मचाऱ्यांना दुखावण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता, असे ते म्हणाले. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व घडामोडीनंतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
सुविधांपासून वंचित
या आंदोलनाबाबत दोन दिवसांपासून समजले होते. तरीही समझोता घडविण्यास मंगळवारचे दुपारचे बारा वाजले. यामुळे त्र्यंबकच्या नागरिकांना पाणी, स्वच्छता आदी सुविधांपासून वंचित रहावे लागले. यात प्रशासनाने वेळीच हालचाल करून निर्णय का घेतला नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यात प्रशासन अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना अपयश येत असल्याची चर्चाही शहरात सुरू होती.
पथदीप दिवसाही चालूच
नगरपालिका प्रवेशद्वारी ठिय्या मांडलेल्या कामगारांकडे नायब तहसीलदार यांनी तहसीलदारांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा कर्मचारी कामावर रवाना झाले. मात्र मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कर्मचारी प्रवेशद्वारी ठाण मांडून बसले होते. त्यामुळे शहरातील सर्व नागरीसेवा ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्याचबरोबर शहरातील हायमास्टसह सर्व पथदीप दुपारपर्यंत लखलखत होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:30 pm
येवल्यात मानाच्या गणपतीची सवाद्य मिरवणूक
म. टा. वृत्तसेवा, येवला
कुठे ढोल ताशांचा गजर तर कुठे येवल्याच्या सुप्रसिद्ध हलकडीचा कडकडाट, कुठे बँजोच्या तालावर थिरकणारी तरुणाईची पावले तर कुठे पारंपरिक कसरतींचे प्रदर्शन अशा वातावरणात सोमवारी (दि. ६) येवलेकरांनी विघ्नहर्ता बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. शेकडो वर्षांची महान परंपरा असलेल्या दिवंगत धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या शहरातील प्रथम मानाच्या गणरायाची सवाद्य मिरवणूक लक्ष वेधून गेली.
शहरात सकाळपासूनच घरच्या गणपतीची स्थापना करण्यासाठी सोमवारी सर्वांचीच लगबग दिसत होती. शहरातील सर्वच रस्ते दिवसभर बाप्पामय झाल्याचे चित्र दिसत होते. अनेक मंडळांनी दिवसभर सवाद्य मिरवणुका काढत बाप्पा गणरायाची प्रतिष्ठापना केली.
शहरातील १२९ वर्षांची परंपरा असलेल्या प्रथम मानाच्या दिवंगत धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या गणरायाची सवाद्य मिरवणूक लाठीकाठी, बनाट फिरवणे आदी पारंपरिक मर्दानी कसरती करून काढण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, माजी नगराध्यक्षा सुंदराबाई लोणारी आदी मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते.
सकाळपासूनच येवला शहर गणेशमय झाले होते. 'गणपती बाप्पा मोरया' चा जयजयकार व हलकडीच्या निनादाने आसमंत दुमदुमले होते. शहरात दिवसभरात मोठ्या ६५ व छोट्या ५० अशा ११५ मंडळांनी वाजत-गाजत 'श्री' ची प्रतिष्ठापना केली. यंदा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही दुपारचा मुहूर्त साधून मोठ्या मूर्ती नेण्यास सुरुवात केली होती. रस्त्यारस्त्यांवर गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयजयकार केला जात होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध शहरात मराठा समाजाचे विराट मोर्चे आयोजित केले जात आहेत. मराठवाड्यातील हे लोण आता नाशिक जिल्ह्यातदेखील पसरले असून मालेगाव शहर व तालुक्यातील मराठा समजाच्या विराट मोर्चाच्या आयोजनासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
नाशिक शहरात होणाऱ्या मराठा मूक क्रांती मोर्चासाठी मालेगाव तालुक्याची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक येत्या शुक्रवारी येथील भाग्यालक्ष्मी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या मोर्चाद्वारे अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आदी मागण्या मांडण्यात येणार आहेत. हा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील मराठा समाजबांधावांना सहभागी होण्याचे आवाहनदेखील केले जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 6, 2016, 3:30 pm
बारामतीच्या मुली व पुण्याच्या मुलांच्या संघाला विजेतेपद
म. टा. वृत्तसेवा, येवला
प्रामाणिकपणे सतत परिश्रम आणि कष्ट घेतल्यास शेवटी विजय आपलाच असतो. त्यामुळे यश हवे असेल तर परिश्रमाच्या बाबतीत कुठलीही तडजोड करू नका, असे प्रतिपादन ऑलिंपिकपटू दत्तू भोकनळ यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येवल्यातील एसएनडी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर दोन दिवस रंगलेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत तो बोलत होता.
या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत मुले व मुलींच्या ६० संघांचा सहभाग होता. स्पर्धेत मुलींच्या गटातून बारामती तर मुलांच्या गटातून पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या संघाने बाजी मारत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दत्तू भोकनळ यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
येवला तालुक्यातील जगदंबा संस्थेच्या बाभुळगाव येथील कृषि महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवस रंगलेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंनी जोरदार पकडी अन् चौफेर चढाया करत शानदार खेळाने उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. या स्पर्धेत जैनापूर (जि. कोल्हापूर) कृषि महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. तिसरा क्रमांक पुणे येथील कृषि महाविद्यालयाच्या संघाने मिळवला. मुलांच्या गटातून बारामती कृषि महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. मदडगाव (जि. नगर) येथील कृषी महाविद्यालयाचा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
या वेळी जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे सचिव लक्ष्मण दराडे, प्राचार्य डॉ. सतीश राऊत, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजेंद्र लोणारी, शरद पाटील, हरी पाटील, बंडू क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. विक्रांत पाटील व प्रा. प्रदीप पुजारी यांनी केले.
'रोइंग' अर्थातच 'नौकानयन' मध्ये थेट ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत चमकदार कामगिरी करणाऱ्या दत्तू भोकनळ याची प्रत्यक्ष भेट यावेळी खेळाडूंना झाली. त्यामुळे स्पर्धेत सहभागी कबड्डीपटू भारावल्याचे चित्र दिसून आले. अत्यंत सरळमार्गी असलेल्या दत्तूशी हस्तांदोलन करत संवाद साधता आल्याने खेळाडूंचे चेहरे उजळले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:30 pm
नागरिकांसाठी पोलिसांकडून सेवा सुरू
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार करता यावी म्हणून शहर पोलिसांनी ९७६२१००१०० हा नंबर उपलब्ध करून दिला आहे. आजपासून कोणत्याही व्यक्तीला या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करता येऊ शकते.
आपल्या आजूबाजूला एखादी घटना घडल्यानंतर ती पोलिसांना कळवली, तर नसता उद्योग मागे लागेल, अशी सर्वसामान्यांची धारणा असते. किंबहुना असेच अनुभव सर्वांना येतात. पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत निर्माण झालेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे सर्वसामान्य नागरिक पोलिसांना टाळू पाहतात. रस्त्यावर होणारे छेडछाडीचे प्रकार, पती पत्नीचे भांडणे, मद्यपींचा त्रास, अवैध धंदे याबाबत माहिती असून, देखील नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही. याचा सर्वांत शेवटी ताण पोलिसांवरच येतो. या पार्श्वभूमीवर माहितीचा स्त्रोत वाढावा, यासाठी शहर पोलिसांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉट्स अॅप सेवा सुरू केली आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी ९७६२१००१०० या व्हॉट्स अॅप क्रमांकावर द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पुढील कार्यवाही करतील.
नियंत्रण कक्षात स्वतंत्र कक्ष
या माहितीची दखल पोलिस आयुक्त स्वतः घेणार असून, यासाठी नियंत्रण कक्षात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना आपली तक्रार लेखी, फोटो किंवा व्हीडिओच्या स्वरूपात देता येईल. या क्रमांकामुळे नागरिकांना थेट पोलिस आयुक्तांशी संपर्क साधता येणार आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यास मदत मिळू शकते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:02 pm
pravin.bidve@timesgroup.com
नाशिक : हद्दपारी आजवर फक्त गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठीच होती. पण, आता हद्दपारी चक्क महसूल अधिकाऱ्यांवर येण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकार आणू पाहत असलेल्या नव्या धोरणामुळे स्वत:चा जिल्हा सोडून निवृत्तीपर्यंत इतरत्र भटकंती करण्याची वेळ महसूल अधिकाऱ्यांवर ओढवणार असल्याने होम डिस्ट्रिक्टला अधिकारी पारखे होणार आहेत.
सेवाकाळात किमान काही वर्षे तरी होम डिस्ट्रिक्टमध्ये सेवा करण्याची इच्छा अधिकारी बाळगून असतात. त्यांच्या या इच्छेलाच सुरुंग लावण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. नायब तहसीलदार ते अपर जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना त्यांचा स्वत:चा जिल्हा सोडून राज्यातील अन्य कुठल्याही जिल्ह्यात बदली देण्याचा मसुदा राज्य सरकार तयार करीत आहे. विशेष म्हणजे महसूल विभागासाठीच हा जुलमी निर्णय घेतला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, अशा सापत्न वागणुकीमुळे महसूल विभागात संतापाची लाट पसरली आहे.
एकेकाळी सरकारी तिजोरी भरणाऱ्या महसूल विभागावर राज्य सरकारची मेहेरनजर असायची. मात्र गैरप्रकार, अपहार, लाचखोरीसारख्या कारणांमुळे या विभागाकडे राज्य सरकारची वक्रदृष्टी झाली आहे. सरकारी नोकरी स्वीकारल्यानंतर आवडी आणि अपेक्षांना वाव नसला तरी पोलिस, तसेच अन्य विभागांना वेगळा तर महसूल विभागाला वेगळा न्याय देण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा महसूल विभागात रंगू लागली आहे.
निवडणूक आयोगाचे नियम आणि राज्य सरकारच्या कायद्यांमुळे महसूल अधिकाऱ्यांची कुचंबणा होत आहे. अधिकाऱ्यांना होम डिस्ट्रिक्टमध्ये ठेवले की, पंचायत समितीपासून महापालिकांपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका प्रभावित होऊ शकतात. म्हणूनच महसूल अधिकाऱ्यांना होम डिस्ट्रिक्टपासून दूर ठेवले जाते. नियुक्तीला मॅटमध्ये आव्हान देण्याचे अन् सरकार विरोधात निर्णय गेल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महसूल अधिकाऱ्यांना सरसकट होम डिस्ट्रिक्टपासून दूर ठेवण्याच्या निर्णयापर्यंत राज्य सरकार येऊन ठेपले आहे. हा निर्णय अंमलात आला, तर निवृत्तीपर्यंत महसूल विभागातील अधिकारी त्यांच्या जिल्ह्यात कामच करू शकणार नाहीत. नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कैदी वार्डात उपचार घेणाऱ्या एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा कैदी मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
सचिन कन्हैय्या चावरे (वय ३६) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. चंदनचोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या चावरेविरोधात कोर्टात गुन्हा सिध्द झाल्याने सध्या तो नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. याचाच उपचार करण्यासाठी त्याला काही दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या कैदी वार्डात ठेवण्यात आले आहे. मात्र, रविवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास चावरेने बाथरूममधील बेसिनच्या लोखंडीपट्टीला डावा हात घासून नस कापण्याचा प्रयत्न केला. ही बाब ड्यूटीवरील पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला दूर केले. या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक भानुदास हादगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी सांगितले की, या बाबत त्याच्या दोन भावांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. सचिनची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत तो मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्याला अटक केली जाणार नाही. या बाबतचा सविस्तर अहवाल सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात येईल. यानंतर, सिव्हिल सर्जन यांनी दिलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 6, 2016, 3:30 pm
सरकारने तोंडाला पुसली पाने; मुंबईतच होतेय डाळ फस्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
तूरडाळीचे भाव पुन्हा वाढू लागले असताना सरकारतर्फे ९५ रुपये किलो दराने देण्यात येणारी डाळ अद्याप नाशिककरांना पहावयासच मिळालेली नाही. ही डाळ मुंबईतच फस्त होत असल्याने मागणी नोंदवूनही नाशिककरांसाठी अद्याप ही तूरडाळ उपलब्धच होत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नाशिककरांना तूरडाळ मिळेल की नाही याबाबत पुरवठा विभागच साशंक आहे.
दरवर्षी या हंगामात तूरडाळीचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे तूरडाळीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातात. यामध्ये व्यापारी आपले उखळ पांढरे करून घेतात. सामान्यांच्या खिशाला झळ बसू नये, ती सर्वांना माफक दरात खरेदी करता यावी, यासाठी यंदा केंद्र आणि राज्य सरकारनेच पावले उचलली. खुल्या बाजारात किफायतशीर किमतीत तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. साठेमारीला आळा बसावा यासाठी शहरात स्वस्त तूरडाळ विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा विभागाने घेतला. शहरात बिगबजारसह सुमारे ३० केंद्र त्यासाठी निश्चित करण्यात आली होती. तेथे प्रत्येक ग्राहकाला ९५ रुपये प्रति किलोदराने एक किलो पॅकिंगमध्ये तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येणार होती. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटना आणि मॉल्सचालकांची पुरवठा विभागाने बैठक घेतली. त्यांना स्वस्त तूरडाळ विक्री केंद्र सुरू करण्याबाबत विनंती करण्यात आली. ही विनंती संबंधितांनी मान्यही केली. केंद्राकडून राज्य सरकारला तूरही प्राप्त झाली असून, तिची डाळ बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आठ दिवसांत ही तूरडाळ उपलब्ध होईल असे सांगितले जात होते. मात्र सव्वामहिना उलटूनही ती अद्याप नाशिकमध्ये उपलब्ध होऊ शकलेली नाही. मुंबईमध्येच मागणी अधिक असल्याने ही डाळ मुंबईतच फस्त होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नाशिककरांना ही डाळ केव्हा आणि किती उपलब्ध होईल याबाबत पुरवठा विभागच साशंक आहे.
तहसीलदार लागले कामाला
तूरडाळीचे कमी झालेले दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. विशेष म्हणजे या दरांवर कुणाचेच नियंत्रण नाही. गेल्या एक दोन दिवसांपासून जिल्ह्यात तूरडाळीचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रात किती दर आहेत याची माहिती तातडीने कळवावी, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. तपासणीदरम्यान आढळून आलेली निकृष्ट तूरडाळ परत पाठविण्यात आली असून, त्याबदल्यात चांगल्या दर्जाची तूरडाळ प्राप्त होते आहे. ही डाळ संबंधित तालुक्यांना वितरीत करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:03 pm
Prashant.bharvirkar@timesgroup.com
दूरस्थ शिक्षणपध्दती म्हणून नावारूपास आलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सध्या घोटाळ्यांचे पेव फुटले आहे. कामांचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने कुलगुरूंना पदमुक्त व्हावे लागल्याचे प्रकरण ताजेच असताना प्रथम ते तृतीय वर्ष प्रवेशाचे लाखो रुपये अद्यापही मुक्त विद्यापीठात जमा न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना मध्यस्थ कंपनीकडे भरलेले फीचे पैसे कंपनीने अद्याप मुक्त विद्यापीठात जमाच केले नसल्याचे समोर आल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पध्दत अस्तित्वात आली तेव्हापासून साऱ्या कामाचा बोजवारा उडाला असून, एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे. परंतु यात विद्यार्थ्यांचा हकनाक बळी जात असून, त्यांच्या प्रवेशाची निश्चितीच न झाल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. मुक्त विद्यापीठात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी प्रवेश घ्यावयाचे असल्यास ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो; मात्र कितीही प्रयत्न केले तरी हा फॉर्म विद्यार्थी स्वत: भरू शकत नसल्याने मुक्त विद्यापीठाने एका कंपनीला हे काम दिले. हजारों विद्यार्थ्यांनी तेथे फॉर्म भरून घेतले; मात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची रक्कम अद्याप वर्ग झालेली नसल्याने या विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले आहेत.
मुक्त विद्यापीठात अद्यापही रक्कम न भरण्यात तेथील अनेक बड्या धेंडांचा फायदा असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे असून, गेल्या वर्षीदेखील असेच घडल्याचा दाखला काही जणांनी दिला आहे.
गेल्या वर्षीचाच कित्ता गिरवला
मुक्त विद्यापीठ प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांवर टांगती तलवार पहिल्यांदाच आलेली नाही. यापूर्वीदेखील असाच प्रकार घडला होता. गेल्यावर्षी हे पैसे उशिरा भरले गेल्याने पुस्तके छपाईला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना पुस्तके उशिरा मिळाली. परीक्षा उशिरा होणे तसेच रिझल्टही उशिरा लागणे अशी साखळी तयार होत आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यावर माजी कुलगुरूंनी त्याची चौकशी लावून तात्काळ पैसे जमा करण्याची सूचना केली होती.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे पैसे मध्यस्थ असणाऱ्या कुठल्याही व्हेंडरद्वारे न भरता विद्यापीठाच्या आवारातील कॅम्पसमध्ये थेट आणि वेळीच भरले जातात. तरीही याबाबत काही तक्रारी असल्यास पूर्ण तपशील घेऊन त्वरित कार्यवाही करू.
- प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रभारी कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 6, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महादेव वैकुंठधाम मुक्तिद्वार आखाड्याच्या (परी) पीठाधीश्वर त्रिकाल भवंता यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्यावर अखेर विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भवंता यांनी कोर्टाकडे खासगी फिर्याद दाखल केली होती.
सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण कार्यक्रम १४ जुलै रोजी रामकुंड परिसरात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री व पोलिस उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना त्रिकाल भवंता यांनी माईक हातात घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, यास आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी आक्षेप घेतला. यानंतर, भवंता यांनी ग्यानदास यांच्याविरोधात विनयभंगाची व दमदाटी केल्याबाबतची तक्रार पंचवटी पोलिस स्टेशनला दिली. मात्र, ही तक्रार दाखल झाली नाही. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळा जोर पकडत असताना दुसरीकडे साध्वी व महंतांमध्ये वाकयुध्द रंगले. पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा मंत्रीही दखल घेत नसल्याने भवंता यांनी अॅड. मंदार भानोसे यांच्यामार्फत थेट कोर्टात खासगी फिर्याद दाखल केली. प्रथम न्यायदंडाधिकारी पेकळे यांच्या कोर्टात याबाबत सुनावणी झाली. भानोसे यांच्यावतीने अॅड. एस. व्ही. तरसे यांनी युक्तिवाद मांडला. फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद मान्य करीत कोर्टाने ग्यानदास यांच्याविरोधात विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश ३ सप्टेंबर रोजी दिले. याबाबत बोलताना तरसे यांनी सांगितले की, ही खासगी फिर्याद असून, कोर्टाच्या आदेशानंतर आता महंत ग्यानदास यांना नोटीस देण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल. नोटीस देणे, महंतांनी जामीन घेणे या कायदेशीर बाबी असून, त्याची पूर्तता झाल्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू होईल, असे तरसे यांनी स्पष्ट केले.
असा होता वाद
साधुग्राम परिसरात वैष्णव पंथीयांच्या तीन आखाडे व त्यांच्या खालशांसाठी जागा राखीव असते. यंदाच्या कुंभमेळ्यासाठी पहिल्यादांच महादेव वैकुंठधाम मुक्तिद्वार आखाड्याच्या (परी) पीठाधीश्वर त्रिकाल भवंता यांचा आखाडा आला. त्यांनी प्रशासनाकडे हक्काची जागा मिळावी, म्हणून मागणी केली. अर्थात, वैष्णव आखाड्यांच्या सर्वच महंतांनी ही मागणी फेटाळून लावली. यातूनच महंत ग्यानदास आणि भवंता यांच्यात सुरुवातीपासून वाद सुरू झाला. ध्वजारोहणावेळी तर हा वाद संबंध जगासमोर आला. स्वतंत्र जागा व घाटाच्या मागणीसाठी भवंता यांनी कोर्टातदेखील धाव घेतली होती.
महंत ग्यानदास यांनी केलेल्या कृत्याची ही फळे असून, ते या प्रकरणात दोषी ठरतील, अशी अपेक्षा आहे. महिला म्हणून त्या लोकांनी आमचा छळ केला. त्यांच्या पापाचा घडा भरला असून, आम्हाला नक्कीच न्याय मिळेल.
- त्रिकाल भवंता, फिर्यादी साध्वी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧