नाशिक : गणेशोत्सवासाठी आवश्यक सगळ्याच साहित्याचे दर वाढले आहेत. सध्या मागणी वाढल्याने फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गणपतीला प्रिय असलेल्या जास्वंदीसाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत.
लिली, मोगरा, गुलाब, शेवंती, ग्लॅडोज या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मलेशियातून मुंबईत येणाऱ्या आर्किडलाही २० नगांमागे ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत. दुर्वांनाही मागणी असून, जुडी आता दोन ते पाच रुपयांना मिळत आहे. झेंडूची जाळी ११० ते १६० रुपयांना मिळत आहे. दमदार पावसामुळे लागवड वाढल्याने झेंडूची आवक वाढली आहे. यामुळे झेंडूच्या दरात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
हार व पुष्पगुच्छांना मागणी
गणराय व गौराईंना विविध प्रकारचे हार घातले जातात. जास्वंदीच्या कंठी माळेसाठी सध्या ८० ते १०० रुपये, तर सफारी हारसाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत. दहा रुपयांना मिळणारी झेंडूची साधी माळही २० रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर पुष्पगुच्छही सध्या तेजीत आहे. साधा पुष्पगुच्छ आता ७० ते ८०, तर मोठा पुष्पगुच्छ १२० ते १५० रुपयांना मिळत आहे.
गणेशोत्सवामुळे आम्हाला फुलांची खरेदी फार महागात पडते. मजुरीमुळे फुलांचे भाव आणखी वाढतात. सध्या जास्वंदी, झेंडू, दुर्वा, हार यांना मोठी मागणी आहे. गणेशोत्सवापर्यंत तरी फुलांचे दर चढेच राहतील.
- भूषण गायकवाड, फुलविक्रेते
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट