मराठा समाजबांधवांचे लोंढेच्या लोंढे तपोवनाच्या दिशेने येऊ लागले आणि सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर तपोवन परिसर पुन्हा गर्दीने गजबजला. तपोवनाच्या कोणत्याही दिशेला नजर टाकली असता फक्त भगवे ध्वज आणि मराठा बांधवांची गर्दी एवढेच दिसत होते. या गर्दीला समावून घेण्यासाठी शहरातील रस्त्यांची रुंदी कमी पडली.
तपोवन परिसरात सकाळी सहापासून जिल्ह्यातील मराठा बांधव जमा होत होते. मोर्चामध्ये सर्वप्रथम मुलींना स्थान देण्यात आले. मुली आणि महिलांची गर्दी वाढत गेली. ही रांग लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत पोहोचली.
औरंगाबाद रोडकडून येणारा लोंढा प्रचंड होता. मालेगाव, नांदगाव, येवला, सटाणा, लासलगाव, पिंगळगाव बसवंत, ओझर येथून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था औंरंगाबाद रोडलगतच्या भागात केल्याने हा रस्ता समाज बांधवांच्या गर्दीने भरला. मोर्चाची सुरवात तपोवनातून असली तरी नांदूर नाक्यापासून पार्किंग लागल्याने तेथून समाज बांधव पायी तपोवनाकडे येते होते. त्यांच्या मोर्चाला नांदूर नाक्यापासूनच सुरुवात झाली होती.
तपोवनात मोर्चाला सुरवात झाली तेव्हा मुली आणि महिला सर्वांत पुढे होत्या. त्यांची गर्दी प्रचंड असल्याने मुले आणि पुरुषांना मोर्चाच्या मार्गात जाण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. मोर्चा पुढे जाऊ लागला तशी गर्दी वाढत गेली आणि नाशिक शहराचे रस्ते एवढ्या मोठ्या गर्दीला समाविष्ट करून घेण्यास कमी पडायला लागले. औरंगाबाद रोडच्या एकाच बाजूने मोर्चाला सुरुवात झाली होती. मात्र, गर्दीमुळे दोन्ही बाजूने मोर्चा पुढे निघाला आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूही कमी पडायला लागल्या.
चटणी भाकरीने भागवली भूक
तपोवनाच्या प्रवेशद्वाराजवळच मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडतर्फे सोलापुरी भाकरी, चटणी, पुरीभाजी यांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांची भूक भागविण्याचे काम या मोफत अल्पोपाहारामुळे झाली.
वाहनांची भगवी रांग
अमृतधाम ः शनिवारी सकाळी सातपासून सटाणा, मालेगाव, चांदवड,मनमाड, कळवण आदी भागांतून वाहनांतून नागरिक मोर्चासाठी आले होते. प्रत्येक वाहनावर भगवे ध्वज फडकत होते. महामार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ध्वजांमुळे या रांगाही भगव्यामय दिसत होत्या. अनेकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणी पार्क केली होती, तर काहींनी नातेवाइकांच्या घरासमोर उभी केली. अमृतधाम, रासबिहारी, हॉटेल जत्रा आणि आडगाव परिसर भगवा झाला होता. वाहनांची शिस्त, महिलांना दिली जाणारी संधी आणि स्वयंसेवक यांची कामाची पद्धत कौतुकास्पद होती. आडगाव शहरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आडगावमधील नेहमी गजबजलेले छोटे भाजीपाला मार्केटदेखील बंद होते.
सातपूरमध्ये उत्साह
सातपूर ः मोर्चात सातपूर पंचक्रोशीतून समाजबांधवांची गर्दी झाली होती. पहाटेपासूनच मिळेल त्या वाहनाने समाजबांधव तपोवनच्या दिशेने निघाले होते. एसटी महामंडळाच्या बस, खासगी वाहने, तसेच आयशर गाड्यांनी मराठा समाजबांधव मेळाव्यासाठी तपोवनच्या दिशेने निघाला होता. हातात भगवे झेंडे व काळ्या रंगाचा गणवेश परिधान केलेल्या समाजबांधवांनी थेट तपोवनाकडे कूच केले.
परतीचा प्रवास पायीच
मोर्चाचा समारोप झाल्यावर समाज बांधवांनी कुठल्याही वाहनाची वाट न पाहता पायीच प्रवासाला सुरुवात केली होती. यावेळी महामंडळाच्या बसेसदेखील उपलब्ध झाल्या नसल्याने गटागटाने मराठा समाज बांधव पायी घरी परतला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट