Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादीची वेगळी चूल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व निमंत्रितांची बैठक नाशिक येथील गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या सभागृहात सोमवार (दि. १०) रोजी सकाळी ११.३० वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली आहे.

बैठकीस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासह माजीमंत्री, आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपालिका यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच पक्षाचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती व इतर सहकारी बँकांचे संचालक, साखर कारखान्यांचे चेअरमन, संचालक, पक्षाचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भगवानगड वादाचे नाशकात पडसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बीड जिल्ह्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू देण्यास नामदेव शास्त्रींनी विरोध केल्यामुळे नाशिकमध्ये सुध्दा त्याचे पडसाद उमटले आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी शनिवारी व्ही. एन. नाईक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयात बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांचे भाषण व्हावे, असा ठराव करून जास्तीत जास्त संख्येने मेळाव्याला जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री सानप यांच्यातील वादामुळे भगवानगड पुन्हा चर्चेत आला आहे. या गडावर दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू देण्यास नामदेव शास्त्रींनी विरोध केला आहे. तर पंकजा मुंडे यांनी आपण गडावर जाणारच असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे येत्या दसरा मेळाव्याला भगवानगडावर वर्चस्ववादाचा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. त्यात आता नाशिक जिल्ह्यानेही उडी घेतली आहे.

शनिवारी झालेल्या बैठकीत या वादावर मात्र फारसे भाष्य न करता कोणतेही गालबोट न लावता सर्वांनी शांततेत या मेळाव्यात सामील व्हावे, असे आवाहन यावेळी प्रमुख वक्त्यांनी केले. त्याचप्रमाणे यावेळी कै. गोपीनाथ मुंडे यांच्या कामाचा गौरव करून त्यांनी समाजासाठी खूप काही केले आहे. त्यामुळेच अभियांत्रिकी महाविद्यालयाला त्यांचे नाव दिले. त्यांचे काम समाज कधीही विसरू शकणार नाही. समाजाची श्रध्दा मुंडेसाहेब व भगवानगडावर आहे. त्यामुळे हा मोर्चा शांततेत व्हावा, असे आवाहनही करण्यात आले. भगवानगड वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान आहे. पण हेच धार्मिक श्रद्धास्थान आज नेत्यांमधील राजकीय वर्चस्ववादाचं केंद्रस्थान बनलं आहे. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ देण्यास तीव्र विरोध दर्शवल्यानंतर तर पंकजा मुंडेंनी पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी गडावर चलाची हाक दिलीय. त्यामुळे मुंडे समर्थकांनी गडावर पंकजांचे भाषण झालंच पाहिजे असा आग्रह धरत असताना नाशिकमध्येही त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

या बैठकीला गोविंदराव केंद्रे, आमदार बाळासाहेब सानप, अखिल वंजारी समाज विकास परिषदेचे नाशिकचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, सरचिटणीस हेमंत धात्रक, कोंडाजीमामा आव्हाड, प्रभाकर धात्रक, अॅड. तानाजी जायभावे, बाळासाहेब गामणे, डॉ. धर्माची बोडके, विठ्ठलराव पालवे, शरद बोडके, भगवान सानप, संपतराव वाघ, उदय सांगळे, किशोर दराडे, दामू मानकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोंडाईचा ‘कृउबा’त रावलांची सरशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या भाजप शेतकरी विकास पॅनलला १२ जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनापुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलला ४ जागांवर विजय मिळाला आहे. या चुरशीच्या लढतीत कॅबिनेट मंत्री जयकुमार रावलांच्या पॅनलची सरशी झाली आहे.

या निवडणुकीत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बाजार समितीवर एकहाती सत्ता प्रस्थापित करण्याचा दावाच या विजयानंतर केल्याचे बोलले जात आहे. सोळा जागांपैकी बारा जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली आहे. दोंडाईचा बाजार समिती निवडणूक मंत्री रावल आणि माजी कामगार मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेची मानली जात होती.

त्यामध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या शेतकरी सहकार पॅनलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार होते. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी १-१ तर शिवसेनेला २ अशा एकूण चार जागा मिळाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ स्पा जागामालकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पाच्या आड अनैतिक व्यवसाय सुरू ठेवण्यात जागा मालकाचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. स्पा चालकाच्या अधिक चौकशीसाठी कोर्टाने त्याच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ केली असून, पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक स्पा दोन दिवसांपासून सुरूच झाले नसल्याचे दिसते.

भालचंद्र राजाराम सावळे असे स्पाच्या जागामालकाचे नाव आहे. इंदिरानगर परिसरातील गजानन महाराज मंदिरासमोर वास्तव्यास असलेल्या सावळेचा कॉलेज रोडवरील ठक्कर मॅजेस्टी इमारतीत गाळा आहे. या ठिकाणी मागील वर्षापासून हेमंत अशोक परिहार आणि त्याची साथीदार नीलोफर तय्यब शेख यांनी इंजी नावाने स्पा सुरू केला. हे दोघे त्याआड अनैतिक व्यवसाय करीत होते. पोलिसांनी चार ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास छापा मारून येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच मुलींची सुटका केली, तसेच परिहार, शेखसह अन्य एकास अटक केली. या गुन्ह्याचा सखोल तपास करावा म्हणून कोर्टाने परिहार आणि शेख या दोघांना पोलिस कोठडी सुनावली होती. शेखच्या कोठडीची मुदत आज संपली, तर स्पा मालक परिहारच्या कोठडीत कोर्टाने ९ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी काही एजंटाची नावे शोधून काढली आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी पोलिसांनी याच ठिकाणी छापा मारून स्पाच्या आड सुरू असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा उद््ध्वस्त केला होता. आता पुन्हा तसाच प्रकार घडल्याने पोलिसांना जागा मालकाबाबत संशय होताच. त्यांनी सावळेचा पत्ता शोधून त्याची चौकशी केली. त्यात सावळे याचा या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही जेरबंद केले. एवढेच नव्हे, तर पुन्हा या जागेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ही जागा सील करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

स्पा चालकांचे धाबे दणाणले

स्पाच्या आड अनैतिक व्यवसाय सुरू होणार नाहीत या दृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कॉलेज रोड, तसेच गंगापूर रोड यासह परिमंडळ एक हद्दीतील अनेक स्पा सेंटरची अचानक तपासणी केली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, तसेच भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, गंगापूर, मुंबई नाका, आडगाव आणि म्हसरूळ येथे पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा यासाठी नियुक्त करण्यात आला होता. वरील पोलिस स्टेशन हद्दीतील मसाज पार्लर व स्पा यांची अचानक तपासणी केली असता बरेचसे सेंटर बंद असल्याचे आढळून आले. सुरू असलेल्या सेंटरची तपासणी करण्यात आली. बंद आढळून आलेले सेंटर सुरू झाल्यास पुन्हा तपासणी करणार असून, अशा ठिकाणावर सुरू असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी पोलिस योग्य ती कार्यवाही करीत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेणींवर अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वत:च्या फायद्यासाठी अधिकाराचा गैरवापर करून सात लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सार्वजनिक वाचनालयाचे माजी कार्यवाह श्रीकांत गजानन बेणी यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये ४०६, ४०९, ४१७ व ४२० कलमान्वये फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेणींवर गुन्हा दाखल झाल्याने शहरातील साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह मिलिंद जहागीरदार यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तीस जानेवारी २०११ ते ५ मार्च २०१२ दरम्यान बेणी यांनी अपहार केल्याचे जहागीरदार यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बेणी यांनी अधिकाराचा गैरवापर करून परस्पर सात लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

३० जानेवारी २०११ रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या १५ सदस्यांपैकी आठ सदस्यांनी सह्या करून एकत्रित राजीनामापत्र कार्याध्यक्षांना सादर केले होते. घटनेतील नियमाप्रमाणे त्या वेळी निवडणूक घेणे बंधनकारक असताना तत्कालीन मुख्य कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी हे राजीनामे न स्वीकारता बेकायदेशीररीत्या काम सुरूच ठेवल्याचे तक्रार अर्जामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, तसेच २१ फेब्रुवारी २०११ रोजी नवीन सदस्यांची नेमणूक करून त्या रिक्त आठ जागा भरल्या. या जागा भरण्यास नाशिक कोर्टाने स्थगिती दिली होती. मात्र, श्रीकांत बेणी यांनी या स्थगितीस आव्हान देऊन जिल्हा न्यायाधीशांकडे प्रकरण नेले. मात्र, त्यांनीही ही स्थगिती कायम ठेवली. त्यावरून बेणी यांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर होत्या हेच स्पष्ट होत असल्याचे जहागीरदार यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. त्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नाशिक यांनी अल्पमतातील कार्यकारिणी कायदेशीर नाही असा निर्णय देऊन नवीन निवडणूक घेण्यास सांगितले. मात्र, बेणी यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. याचा अर्थ ३० जानेवारी २०११ ते ५ मार्च २०१२ या कालावधीत झालेले आर्थिक व्यवहार बेकायदेशीर असून, याच काळात बेणी यांनी एका कंपनीसोबत सात लाख रुपयांचा व्यवहार केला असून, करार करण्याचे अधिकार नसताना करारनामा केला व संस्थेच्या पैशांचा गैरवापर केला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लांडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात गोसावी समाजातील अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तसेच दोषी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी यांसारख्या मागण्या श्री दशनाम गोसावी समाजाने केल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

मोहरी गावात एका १४ वर्षीय मतिमंद मूकबधिर मुलीवर बलात्कार करण्यात आला. याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली तर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी या गुन्ह्यातील ५५ वर्षीय संशयिताने दिली. अशा अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी पंचवटीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. रामकुंडापासून मोर्चाला सुरुवात झाली. मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा आला. काही तरुणी निवेदन देण्यासाठी खेडकरांच्या दालनात गेल्या, तर उर्वरित मोर्चेकरी हुतात्मा स्मारकात गेले. तेथे मोर्चाचा समारोप झाला. मोर्चाच्या अग्रभागी विद्यार्थिनी, युवती, महिला, त्यापाठोपाठ तरुण, ज्येष्ठ नागरिक व शेवटी अन्य समाजबांधव होते. महिलांनी काळ्या साड्या परिधान करून या घटनेचा निषेध नोंदविला, तर भगव्या टोप्या परिधान करून सहभागी झालेल्या पुरुषांनी सर्वांचे लक्ष वेधले. गुन्हेगार कोणत्याही जातीधर्माचा नसतो. अशा सर्वच घटना निंदनीय असून, त्यावर अंकुश आणण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली. पोटासाठी भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्तांना कायदेशीर संरक्षण द्यावे, महिला अत्याचारातील सर्वच गुन्ह्यांमधील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. या वेळी श्रद्धा भारती, दर्शना गोसावी, अदिती भारती, मानसी गोसावी, निशा गोसावी आणि स्नेहा गोसावी या तरुणींनी खेडकर यांना निवेदन दिले. तत्पूर्वी, या निवेदनाचे वाचन करण्यात आले.

दशनाम गोसावी समाजाच्या मागण्या

- महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांतील आरोपींवर ४५ दिवसांत आरोपपत्र दाखल करावे.
- असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत.
- पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून संरक्षण मिळावे.
- दोषींना फाशीची शिक्षा व्हावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवर बलात्कार;त्र्यंबकेश्वरला तणाव

$
0
0

त्र्यंबकेश्वर : तळेगाव (अंजनेरी) येथे शनिवारी सायंकाळी पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. बलात्कार करणारा पंधरा वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, सुमारे २०० ते ३०० व्यक्तींचा जमाव त्र्यंबक पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसला होता. वातावरण चिघळल्याने एसआरपीची एक तुकडी येथे तैनात करण्यात आली आहे. मुलाची व पीड‌ित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मुलीची स्थिती गंभीर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित गावांमध्ये होणार रेशन दुकान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धान्य वितरणात अनियमतता आढळून आल्याने जिल्ह्यात पुरवठा विभागाने अनेक रेशन दुकानांवर कारवाई केली असून, या दुकानांचे नव्याने जाहिरनामे काढण्यात येणार आहेत. निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी हे जाहीरनामे काढण्यात येणार असून, ३११ रास्त भाव दुकाने तसेच किरकोळ केरोसीन परवाने स्वयंसहायता गटांना देण्यात येणार आहेत. त्यासाठी परवाने नसलेल्या गावांची माहिती पाठविण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना करण्यात आले आहे.

सुरगाणा येथे झालेल्या कोट्यवधींच्या रेशन धान्य घोटाळ्याने नाशिक राज्यभर चर्चेत आले. अशा घोटाळ्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. एकीकडे गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य अशा घोटाळ्यांच्या माध्यमातून फस्त केले जात असताना रेशन दुकानांवर धान्य न मिळणे, धान्याचा दर्जा सुमार असणे, दुकान नेहमी बंद असणे, धान्याचे वाटपच न करणे यांसारखे प्रकार घडत असतात. याबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा दुकानांवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

जिल्ह्यातील रेशन दुकानांची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात २ हजार ६०९ रेशन दुकाने आहेत. त्यापैकी १ हजार ९०५ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५२६ दुकानांमध्ये किरकोळ प्रकारचे दोष आढळून आले. सुमारे १८३ दुकानांमध्ये मध्यम स्वरुपाच्या, तर ४७ दुकांनांमध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुटी आढळून आल्या. अशा दोषी दुकानदारांवर त्यानंतरही जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी कारवाई केली असून, नव्याने रेशन दुकानांची गरज भासणाऱ्या गावांमध्ये नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणुकीपूर्वी निघणार जाहीरनामा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून नगरपंचायत, पदवीधर निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वीच जिल्ह्यातील ३११ रेशन दुकानांचे नव्याने जाहिरनामे काढण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या ३ नोव्हेंबर २००७ च्या निर्णयानुसार रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने स्वयंसहायता गटांना देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून परवाने नसलेल्या गावांची माहिती मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायालयीन प्रकरण; समन्वयासाठी समिती

$
0
0

संगणकीय प्रणालीव्दारे ट्रॅकर प्रणालीचा वापर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने न्यायालयीन प्रकरणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी विभागीय स्तरावरून समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीबरोबरच संगणकीय प्रणालीव्दारे ट्रॅकर प्रणालीसुध्दा विकसित केली जाणार आहे. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरणांत शासनाची बाजू मांडणे व त्यावर तातडीने निर्णय घेणे सोपे होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातही न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जप्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात ग्रामीण भागातील न्यायालयीतन प्रकरणाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शासनाच्या ग्राम विकास विभागाने न्यायालयीन प्रकरणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या जनहित याचिका, अवमान याचिका व इतर प्रकरणांमध्ये प्रभावी समन्वय करून कामकाजाच्या सोयीसाठी सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. आता ही समिती राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयातील प्रकरणांचा दरमहा आढावा घेणार आहे.

अशी असेल समिती आणि कामकाज

या समितीत सामान्य प्रशासनाचे विभागीय उपायुक्त अध्यक्ष असणार असून, सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनामधील सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य असणार आहेत. त्याचप्रमाणे सदस्य सचिव हे सर्व गटविकास अधिकारी असणार आहेत. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी ही समिती आढावा घेणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्याबाबतचा अहवाल दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे या समितीची बैठक दरमहा २५ तारखेला होणार आहे. त्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयीन प्रकरणास होणाऱ्या विलंबास, निष्काळजीपणा व दिरंगाईमुळे शासनास सहन कराव्या लागणाया नुकसानीस अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाहीचा अधिकार या समितीला देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यात पहिल्यांदाच परीक्षेत उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयांमधील तलाठीपदाच्या ४१, तर वाहनचालकपदाच्या एका जागेसाठी ११ सप्टेंबरला परीक्षा घेण्यात आली. तलाठी पदासाठी पेसा आणि पेसा क्षेत्राबाहेरील अशा वर्गवारीत अर्ज मागविण्यात आले होते. ४१ पैकी ११ पदे पेसासाठी, तर ३० पदे पेसा क्षेत्राबाहेरील उमेदवारांकरिता होती. तलाठीपदासाठी पेसा क्षेत्राबाहेरील २० हजार ३०३, तर पेसा क्षेत्रातून ३ हजार २२१ अर्ज प्राप्त झाले. वाहनचालकपदासाठी सरळसेवा पध्दतीने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. एकूण १९ हजार ८९२ परिक्षार्थिंनी ही परीक्षा दिली. उत्तरतालिका प्रसिध्द केल्यानंतर आता प्रशासनाने निकालही जाहीर केला आहे. निकालाच्या दोन याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असून, त्यामध्ये एक पात्र उमेदवारांची तर दुसरी यादी उमेदवारांच्या गुणांनुसार जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला किती गुण मिळाले हे प्रत्येक उमेदवाराला समजू शकणार आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी दोन वेगवेगळ्या दिवशी केली जाणार आहे.

कागदपत्र तपासणी

पेसा क्षेत्रातील ११ जागांसाठी २२ उमेदवारांची आणि वाहनचालकाच्या एका जागेसाठी पाच उमेदवारांची कागदपत्रे १८ ऑक्टोबरला तपासली जाणार आहेत. तर १९ ऑक्टोबरला पेसा क्षेत्राबाहेरील तलाठ्यांच्या ३० जागांसाठी ६७ उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत. कागदपत्रांच्या तपासणीनंतर दोन्ही क्षेत्रातील उमेदवारांची अंतिम यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पुढील दोन ते तीन दिवसांतच जाहीर केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवर बलात्कार; त्र्यंबकेश्वरमध्ये तणाव

$
0
0

त्र्यंबकेश्वर : तळेगाव (अंजनेरी) येथे शनिवारी सायंकाळी पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. बलात्कार करणारा पंधरा वर्षांचा मुलगा आहे.

सुमारे २०० ते ३०० व्यक्तींचा जमाव त्र्यंबक पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसला होता. वातावरण चिघळल्याने एसआरपीची एक तुकडी येथे तैनात करण्यात आली आहे. मुलाची व पीड‌ित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मुलीची स्थिती गंभीर आहे.

दरम्यान, तळेगाव येथील बालिकेवरील अत्याचाराचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत असून वाडीवऱ्हे, गोंदे, मुकणे फाट्यावर तीन तासांपासून महामार्ग संतप्त नागरिकांनी रोखला. दहा किमी लांब वाहनांच्या रांगा तिथे लागल्या असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेचा लैंगिक छळ; जनता उतरली रस्त्यावर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वरमधील तळेगाव (अंजनेरी) पेटलं आहे. आरोपीवर तातडीनं कारवाई करावी, या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून घोटीजवळ पोलिसांच्या तीन गाड्या पेटवून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या 'रास्ता रोको' आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्ग आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग ठप्प झाला आहे.

लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरलेली जनता आक्रमक झाल्यानं घोटीजवळ पोलिसांनी आधी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानंतरही कुणी मागे हटायला तयार नसल्यानं त्यांनी अश्रुधुराचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे आणखी मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे.



तळेगाव (अंजनेरी) येथे शनिवारी सायंकाळी पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडल्याचं वृत्त वाऱ्याच्या वेगानं पसरल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालें होतं. सुमारे २०० ते ३०० व्यक्तींचा जमाव त्र्यंबक पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसला होता. वातावरण चिघळल्याने एसआरपीची एक तुकडी येथे तैनात करण्यात आली होती. त्यानंतर आता वातावरण अधिकच चिघळलं आहे.

मुलीवर बलात्कार झालेला नाही, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणात कुठलीही दिरंगाई होणार नाही, पारदर्शी तपास होईल, फास्ट ट्रॅकवर तपास करू, असे आश्वासनही त्यांनी दिलं. परंतु, दोषी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करावा आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सकाळपासून ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येत असून संतप्त नागरिकांनी पोलीस महानिरीक्षक निलय कुमार चौबे यांच्या गाडीची काच फोडली. त्यानंतर हा जमाव अधिकच हिंसक झाला आहे.

पोलिसांच्या आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करत नागरिकांना आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली. त्याशिवाय दोन बस, दोन कार आणि इतरही गाड्या फोडण्यात आल्या. घटनास्थळी पोलीस नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या प्रकारानंतर वाहतूक घोटी-सिन्नरमार्गे वळवण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेसंदर्भात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् लागले हिंसक वळण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

तळेगाव येथे बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला, मात्र बलात्कार झाला नाही, असे विधान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने या घटनेला हिंसक वळण लागले. यामुळे पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, तळेगावमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर तळेगाव फाटा येथे दोन तासांपेक्षा अधिक वेळ रास्तारोको करून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. सकाळी ११.३० च्या सुमारास येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. त्यावेळेस अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला, असे विधान त्यांनी केले आणि जमाव भडकला. पालकमंत्री यांच्या निषेधाच्या घोषणा सुरू झाल्या. पालकमंत्री परत नाशिकच्या दिशेने रवाना झाले तेव्हा त्यांच्या पाठोपाठा पोलिसांचे वाहन जाऊ लागताच दगडफेक झाल्याने काच फुटली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूने दगडफेक सुरू झाली, तसे पोलिसांनी सांगितले. जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबाराच्या चार फैरी झाडल्या. अश्रुधुराची नळकांडीही फोडली.

दरम्यान, संतप्त जमावाने पोलिसांची वाहने उलटी करीत पेटवून दिली. यामध्ये वणी पोलिस ठाणे, वडनेरभैरव पोलिस ठाणे येथील दोन वाहने जळून कोळसा झाली. नाशिक पोलिस ठाण्याचे एक वाहन अर्धवट जळाले. दुसऱ्याच्या काचा फोडण्यात आल्या. खंबाळे फाटा येथे एक मोटरसायकल जाळून टाकली. केवळ या एकाच ठिकाणी ३२ पोलिस जखमी झाले. यामध्ये काही अधिकारीही आहेत.

त्र्यंबकमध्ये कडकडीत बंद

त्र्यंबकेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी येथे मोटरसायकल रॅली काढली होती. सकाळी दहा वाजेच्या सुमारास जव्हार फाटा येथून रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. तसेच, त्र्यंबकेश्वर येथील श्री गजानन महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, प्रांताधिकारी राहुल पाटील यांना दोन लहान मुलींनी निवेदन दिले. तीन तास आंदोलकांनी ठिय्या दिला होता. हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी रास्ता रोखून धरला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तळेगाव ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र त्यांच्या या घटनेतील वक्तव्याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. तळेगाव फाटा येथे आंदोलकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे तणाव निर्माण झाला होता.

तळेगावमध्ये तणाव

तळेगाव येथे तणावपूर्ण वातावरण आहे. तळेगावकडे जाणाऱ्या नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव फाटा आणि मुंबई महामार्ग येथून येणारा जातेगाव रस्ता अशा दोन्ही बाजूस कडेडोट बंदोबस्त आहे. एसआरपी आणि शिघ्रकृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गावास पुढारी भेट देत असल्याने राजकारण थांबवा पीडितेस न्याय द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्काराच्या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद

$
0
0

टीम मटा

तळेगाव अंजनेरी येथे शनिवारी दुपारी पाच वर्षीय चिमुरडीवर घडलेल्या बलात्काराच्या घटनेचे नाशिक जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. नाशिकसह विल्होळी परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासूनच अनेक ठिकाणी जाळपोळ, रास्ता रोको आंदोलनाने रविवारीही तणावाचे वातावरण होते. मुंबई- आग्रा महामार्ग, विल्होळी परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची जाळपोळ झाली. या घटनेचे तीव्र पडसाद नाशिक शहरात उमटल्याने नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण होते.

त्र्यंबकेश्वरमध्ये तणाव

त्र्यंबकेश्वर ः तळेगाव अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घटनेनंतर त्र्यंबक पोलिस ठाण्यात हजारोंचा जमाव जमला होता. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयितास तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पथक तपास करीत आहेत.

पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, पीडित मुलीस, तसेच संशयिताला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले. दरम्यान, या बालिकेवर अतिप्रसंग झाला नसून, अतिप्रसंगाचा प्रयत्न करण्यात आल्याचे विधान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने रविवारी आंदोलकांनी त्यांचा तीव्र निषेध केला. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद परिसरात तीव्रतेने उमटले.

तळेगाव परिसरात बंद

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर तळेगावसह परिसरातील सर्व गावांत दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. नवरात्रोत्सवाच्या अंतिम टप्प्यातच ही घटना घडल्याने या उत्सवावरही त्याचा परिणाम जाणवला.

अशी आहे तळेगावची घटना

त्र्यंबकेश्वरजवळील तळेगावात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडल्याचे पीडित मुलीच्या आईने त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. याच गावातील एका १६ वर्षीय संशयितावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, संशयिताने फिर्यादीच्या मोठ्या मुलीस पेप्सी देतो, असे आमिष दाखवून बाजूला पाठवून दिले. त्यानंतर तिच्या पाच वर्षीय लहान बहिणीला तो गावातील मारुती मंदिरामागील पडक्या खोलीत घेऊन गेला. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी संशयितावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेची वाच्यता होताच गावात आणि तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते, उपअधीक्षक वळवी यांच्यासह पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन संतप्त जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले.


ती मुलगी सुखरूप

पीडित मुलीचा मृत्यू झाल्याच्या अफवा सोशल मीडियावरून पसरविल्या जात आहेत. ही मुलगी सुखरूप असून, तिची तब्येत व्यवस्थित आहे. नागरिकांनी या घटनेशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.

- किशोर नवले, पोलिस निरीक्षक ग्रामीण गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावात बालिकेवर अत्याचार नाशिक पेटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे पाच वर्षाच्या बालिकेवर १६ वर्षाच्या मुलाने शनिवारी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे पडसाद रविवारी जिल्ह्याभरात उमटले. घटनेचा निषेध करणाऱ्या संतप्त आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी सात बस, चार पोलिसांची वाहने तसेच दोन कार आणि दोन दुचाकी पेटवून दिल्या. याशिवाय अनेक वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार संध्याकाळपर्यंत सुरू होते. पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज, हवेत गोळीबार व अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. मात्र महामार्ग तसेच शहर बंद केले गेल्याने नाशिककरांना दिवसभर दहशतीच्या छायेत राहावे लागले. आंदोलनामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

तळेगाव येथील पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. यानंतर, व्हॉटस अॅपवरून वेगवेगळे मॅसेजेस व्हायरल झाले. आंदोलनकर्त्यापुढे पोलिसांची संख्या नगण्य असल्याने शनिवारी रात्रीपासून रास्ता रोकोला सुरूवात झाली. तळेगाव येथे आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून बळाचा वापर करावा लागला. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे आंदोलन अधिक पेटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलकांपुढे पोलिस हतबल

$
0
0

नागरिकांचे हाल, संध्याकाळी वाहतूक पूर्ववत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव (अंजनेरी) येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे पडसाद रविवारी दिवसभर दिसून आले. विशेषतः मुंबई-आग्रा हायवेवरील परिस्थिती आटोक्यात आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. पोलिस पाहत होते आणि आंदोलकर्ते बस, कार तसेच दुचाकी पेटवत राहिले. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. संध्याकाळी उशिरा लोकप्रतिनिधींना सोबत घेत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना विनवणी केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे पाच वर्षांच्या मुलीवर १५ वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना रात्री नऊ वाजेनंतर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली. यात अतिशयोक्ती वर्णन करण्यात आले. यानंतर मात्र मराठा समाजाच्या तरुणांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली. रात्री १२ वाजेपासूनच इगतपुरी टोलनाका, वाडीवऱ्हे, गोंदे चौफुली तसेच विल्होळी येथे आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. विल्होळी येथे आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना मारहाण करीत त्याची पेट्रोलिंग व्हॅन पेटवून दिली. यानंतर, दिवसभरात विल्होळी येथेच पाच बसेस, दोन कार तसेच एक दुचाकी आंदोलकांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पाडल्या. कंटेनर, कार तसेच इतर वाहनांच्या काचाही मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आल्या. पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत पोलिस येथे फिरकलेच नाही. तसेच आलेल्या पोलिसांनी हतबलतेने पाहण्यापलिकडे काही केले नाही. पोलिस असताना येथे एक बस पेटवून दिली, तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासमोरच एक दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आली.

मीडियाच्या नावाने डांगोरा

आंदोलनकर्ते आक्रमक होते कारण तेथे पोलिसच नव्हते. पोलिसांना या आंदोलनाची तीव्रता समजेपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन चिघळण्यासाठी मीडियाला दोषी ठरवले. विल्होळी येथे काही पत्रकार वार्तांकनाचे काम करीत असताना ग्रामीण पोलिस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याने त्यास हरकत घेतली. आंदोलनकर्ते समोर असताना त्यांना पकडण्याचे सोडून तिवारी व त्यांचे सहकारी पत्रकारांना दमबाजी करण्यात मश्गुल होते. तुम्ही मीडियावाले असल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितले, तर ते तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशा वेळी आम्ही काहीही करू शकणार नाही, असे विचार तिवारी यांनी मांडले. वास्तविक, पोलिसांनी काहीच केले नाही. जळते ते जळू द्या, आपोआप शांत होईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.

चुंभळे येताच आंदोलक थंड

पोलिसांच्या मवाळ भूमिकेमुळेच आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या उपस्थितीत वाहनांची जाळपोळ केली गेली. संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हे स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना सोबत घेऊन विल्होळी येथे आले. चुंभळे येताच अवघ्या पाच मिनिटांत आंदोलन मागे घेण्यात आले.

दलितांमध्ये भीती

विल्होळी, वाडीवऱ्हे तसेच या परिसरात राहणाऱ्या दलितांमध्ये आजच्या प्रकरणामुळे भीतीची भावना निर्माण झाली आहे. विल्होळीसह वाडीवऱ्हे भागात दलित वस्त्यांवर हल्ला करण्याची तयारी केली जात होती. मात्र, आंदोलनकर्त्यांमधील काहींनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून पुढील अनर्थ ठळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सणासुदीत पाण्यासाठी वणवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन सणासुदीच्या दिवसांत जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर भागातील असंख्य रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठ्याची मोटर जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. रविवारी (दि. ९) पाणीपुरवठा झालाच नाही, परिणामी काही नागरिकांनी खासगी टँकर मागवून पाण्याची गरज भागविली.

महापालिकेकडून मिळणारे पाणी नारायणबापूनगर सोसायटीच्या टाकीत टाकून पाणीपुरवठा केला जातो. तथापि, जळालेली मोटर दुरुस्त करण्याची तत्परता सोसायटी व्यवस्थापनाने दाखविलेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला असून, शेकडो रहिवाशांना त्यामुळे गैरसोय सहन करावी लागत आहे.

मोटर जळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असली, तरी सोसायटीची पाणीपुरवठा यंत्रणाच सदोष असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिकेकडून दिवसातून दोन वेळा पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असला, तरी सोसायटी मात्र दिवसातून एकच वेळ पाणीपुरवठा करीत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या शुद्ध पाण्यात बोअरवेलचे पाणी मिश्रित करून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. अनेक नागरिक पिण्याचे पाणी जवळपासच्या सोसायट्या आणि कॉलनीतून आणतात. सोसायटी व्यवस्थापन मंडळातील बरेच सदस्य सोसायटीत राहतच नसल्याने त्यांना नागरिकांच्या आरोग्याशी आणि समस्यांशी काहीही देणे-घेणे नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

परिसरात अनेक ठिकाणी एका घरात पाणी मिळत असताना शेजारच्या घरात अत्यंत कमी पाणी मिळते, त्यामुळे काही कुटुंबांना दुसरीकडून पाणी आणावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना व्यवस्थापन करत नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिसरातील सर्वच सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत असताना नारायणबापूनगरला कमी पाणी मिळत असूनही महापालिका अथवा नगरसेवकांकडे हा प्रश्न सोसायटी व्यवस्थापन मांडत नाही, त्यामुळे दिवसेंदिवस समस्या गंभीर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

आरोग्याच्या तक्रारींत वाढ

महापालिकेकडून मिळणाऱ्या शुद्ध पाण्यात बोअरवेलचे पाणी मिसळून सर्वच पाणी दूषित केले जाते. हे पाणी प्यायले गेल्याने पोटदुखी, सर्दी, मळमळ असे त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच सोसायटीची पाणीपुरवठा व्यवस्था सदोष असल्याने अनेक इमारतींना पाणी मिळत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल रॅलीद्वारे आरोग्य संवर्धनाचा संदेश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट आणि पिंपळगाव सायकलिस्टतर्फे जागतिक हृदय दिनानिमित्त निरोगी हृदयासाठी रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. पहाटे साडेपाच वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथून ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ याच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली.

पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या रॅलीत नाशिक सायकलिस्ट असोसिएशन, पिंपळगाव सायकलिस्ट, इंदिरानगर सायकलिस्ट, भाभानगर सायकलिस्ट, जल्लोष ट्रेकिंग ग्रुप, मानवता हेल्प फाउंडेशन, पंचवटी मेडिकल असोसिएशन, नाशिक फार्मा ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. या रॅलीत ९ महिला, ६ मुले यांच्यासह १६० सायकलिस्ट सहभागी झाले.

सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून ही सायकल रॅली काढण्यात आली. समाजाला हृदयरोगापासून मुक्त करण्यासाठी नाशिककरांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांनी केले होते.

सायकल चालवण्यामुळे वजन प्रमाणशीर राहते, स्नायूंमध्ये शक्ती व डौलदारपणा येतो व अनावश्यक चरबीपासून सुटका होते. सुखी आयुष्यासाठी तंदुरुस्ती आवश्यक आहे व तंदुरुस्तीसाठी सायकलिंगचा व्यायाम करणे आवश्यक आहे, तसेच या उपक्रमामुळे इंधन वाचवण्याबरोबरच पर्यावरण चांगले राहते, असा संदेश ऑलिम्पियन विजेता दत्तू भोकनळ याने दिला. सद्यःपरिस्थितीत प्रत्येकाने स्वतःपासून इंधन बचतीला सुरुवात करावी व स्वतःही निरोगी राहावे, यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला.

रॅलीचे सकाळी ६.३० वाजता ओझर येथील दुर्गा देवी मंदिरात आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. सकाळी ७.३० वाजता पिंपळगाव येथील स्वयंवर लॉन्स येथे क्रीडाप्रेमींच्या हस्ते सायकलिस्टचा सत्कार करण्यात आला. सकाळी ८ वाजता वडाळीभोई येथील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत होऊन रॅली सकाळी ९ वाजता रॅली चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पोहोचली. येथून सायकलिस्टने रेणुका देवीचे दर्शन घेतले व रॅली नाशिककडे मार्गस्थ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाभरात रास्ता रोको

$
0
0

तळेगाव (अंजनेरी) घटनेचे पडसाद, जनजीवन विस्कळीत

टीम मटा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे पाच वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणाचे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करीत संशयित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, रास्ता रोकोमुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होऊन पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली.

बागलाणमध्ये रास्ता रोको

तळेगाव घटनेच्या निषेधार्थ सटाणा शहरासह तालुक्यातील नामपूर येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. सटाणा बसस्थानकासमोर मनसे व मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, मनोज सोनवणे, वैभव सोनवणे, डॉ. आशिष सूर्यवंशी, सुमित वाघ, अनिल सोनवणे, योगेश सोनवणे, अमोल पवार, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पंचायत समिती उपसभापती वसंत भामरे, ज. ल. पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

देवळावासीयांचा इशारा

देवळा येथील सकल मराठा समाजाच्या तरुणांनी पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. युवानेते संभाजी आहेर, सामाजिक कार्यकर्ते पंकज अहिरराव, शिवसंग्रामचे उदयकुमार आहेर, अतुल आहेर, राजेश आहेर आदींनी मराठा समाजाच्या भावनांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी लक्ष्मीकांत आहेर, जितेंद्र आहेर, सुनील आहेर, भाऊसाहेब पगार, जगदीश पवार, नानू आहेर, उमेश आहेर, प्रतीक आहेर, कौतिक पवार, बंडूनाना आहेर, प्रदीप आहेर, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी तळेगाव येथील नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन श्रुतिका आहेर व समृद्धी आहेर यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक सतीश माने, तलाठी राजेंद्र गुंजाळ यांना देण्यात आले. आंदोलनामुळे विंचूर-प्रकाशा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

निफाडमध्ये नागरिक रस्त्यावर

निफाड परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निफाड, नैताळे, पिंपळस, ओझर आदी ठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको केला. निफाड येथील शांतीनगर चौफुली यथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी यावेळी आंदोकानी केली. वाल्मीक कापसे, विक्रम रंधवे, मधुकर कापसे, भीमराज काळे, देवदत्त कापसे, संपतराव व्यवहारे, दीपक गाजरे, महेश चोरडिया आदी उपस्थित होते. नैताळे येथे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी अण्णा बोरगुडे, उपसरपंच अरविंद बोरगुडे, महेश बोरगुडे, दिलीप घायाळ, दादा बोरगुडे उपस्थित होते. पिंपळस रामाचे येथेही नाशिक-औरंगाबाद महामार्ग, ओझरजवळ दहावा मैल या मुंबई महामार्गावरही रास्ता रोको करण्यात आला.

कळवणला निवेदन

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कळवणमध्ये शांतता अबाधित राहावी म्हणून तहसीलदार कैलास चावडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मराठा समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले. पीडित मुलीला १० लाखांची शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी प्रदीप पगार, सुधाकर पगार, निंबा पगार, मोतीराम पगार, ललित आहेर, प्रकाश आहेर, कौतीक पगार, सुभाष शिरोडे, जितेंद्र पगार, शशिकांत पाटील, टिनू पगार, अतुल पगार आदी उपस्थित होते.

दिंडोरीत कारवाईची मागणी

जानोरी दहावा मैल मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर, जानोरी व जऊळके दिंडोरी येथील संतप्त नागरिकांनी अर्धा तास रास्ता रोको करून निषेध नोंदवला. या प्रसंगी निफाडचे तहसीलदार भामरे व ओझरचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन संशयित आरोपीला कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

चांदवडमध्ये वाहतूक ठप्प

चांदवडमध्ये तीव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ तसेच संशयितावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी रविवारी मराठा समाज बांधवानी एकत्रित येऊन चांदवड चौफुलीवर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. नाशिक-मालेगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. माजी आमदार शिरीष कोतवाल, बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, अनिल काळे, डॉ. गवांदे, संजय जाधव, दत्तात्रय गांगुर्डे, बाळासाहेब जाधव, रमाकांत जामदार आदी उपस्थित होते.

सिन्नरला आंदोलन

अत्याचार घटनेच्या सिन्नर येथे प्रतिक्रिया उमटल्या असून, मराठा क्रांती मोर्च्याच्या समितीच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. संध्याकाळी साडेसहा वाजता मराठा क्रांती मोर्चाच्या समितीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या नराधमावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे यांना निवेदन देण्यात आले. रास्ता रोको केल्यामुळे नाशिक पुणे महार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर विद्यार्थ्यांचा ताप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी राज्यभरात मोठी मोहीम राबविली जात असली, तरी दुसरीकडे सतत गैरहजर विद्यार्थ्यांची समस्या मुख्याध्यापकांसमोर उभी राहिली आहे. एकाच विद्यार्थ्याचे दुसऱ्या शाळेतही नाव असणे, कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे काम करावे लागणे, अशा अनेक गोष्टींमुळे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असून, त्यांना शाळेत टिकवून ठेवणे आव्हानात्मक बनले आहे.

सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे मुख्याध्यापकांना पटसंख्येची मांडणी करण्यात, शालेय पोषण आहाराचा ताळेबंद जुळवण्यास नेहमीच कसरत करावी लागते. त्यामुळे गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे गैरहजेरीचे नेमके कारण काय, हे शोधण्याचे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहिले आहे. याबाबत पेठरोडवरील उन्नती प्राथमिक विद्यामंदिर शाळेने सर्वेक्षणही केले आहे. या शाळेतही सतत गैरहजर विद्यार्थ्यांची समस्या सातत्याने समोर आल्याने शाळेचे मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी पंचवटी परिसरातील २२ शाळांमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये एक विद्यार्थी दोन शाळांच्या पटसंख्येवर असल्याचा प्रकार आढळून आला. त्यामुळे दोनपैकी एका शाळेत संबंधित विद्यार्थी सतत गैरहजरांच्या यादीत आला. हे चित्र स्पष्ट दिसत असूनही शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार अशा विद्यार्थ्यांबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने कोंडी होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे, तसेच सतत गैरहजर राहूनही या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलावे लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



प्रबोधनाचे आव्हान

सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांमध्ये प्रबोधन करण्याचे मोठे आव्हान शाळांपुढे उभे राहिले आहे. आर्थिक कारणांमुळे अनेक विद्यार्थी शाळेत येत नाहीत. कुटुंबाला आधार मिळावा म्हणून पालकच शाळांमध्ये न जाण्याचा सल्ला देत असल्याचे शाळाबाह्य सर्वेक्षणातही दिसून आले आहे. पालकांमध्ये प्रबोधन करूनदेखील अशा समस्या ओढावत असल्याने शाळांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

---

महापालिका शाळांमध्ये सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. खासगी शाळांमध्ये हे प्रमाण असू शकते. विद्यार्थी का गैरहजर राहत आहेत, याची कारणे शोधून त्यांच्या पालकांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.

-नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, शिक्षण समिती

---

काही शाळा विद्यार्थीसंख्येचा फुगवटा दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांची नावे आपल्या पटसंख्येत समाविष्ट करीत आहेत. पट टिकविण्यासाठी चाललेल्या स्पर्धेमुळे हे चित्र असल्याचे निदर्शनास आले. काही विद्यार्थी सातत्याने गैरहजर राहूनही त्याविरोधात आम्हाला शिक्षण हक्क कायद्यातील नियमांमुळे काहीही कारवाई करता येत नाही.

- नंदलाल धांडे, मुख्याध्यापक, उन्नती प्राथमिक विद्यामंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images