Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महामार्ग ठप्प; लांबवर रांगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधाचे पडसाद इगतपुरी तालुक्यातही उमटले. गोंदे, वाडीवऱ्हे येथे रस्त्यावर येऊन नागरिकांनी निषेध व्यक्त केला. मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी-सिन्नर चौफुलीवर संतप्त शेकडो युवकांनी जवळपास सकाळी १२ पासून जवळपास पाच तास महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. महामार्गावर १० किमीपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. सर्वच वाहने ठप्प झाली होती. घोटी शहरातही काही काळ दुकाने बंद करण्यात आली.

सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घोटी शहरात तणाव निर्माण होताच काही काळ शहरातील दुकाने बंद करण्यात आली होती. संबंधित नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देत महामार्गाकडे रवाना झाले. दरम्यान एक वाजेच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी- सिन्नर चौफुलीवर बाहेरून आलेल्या काही युवकांनी महामार्ग रोखून धरला. यामुळे नाशिक व मुंबईकडे जाणारी वाहने ठप्प झाली होती. घोटी-सिन्नर महामार्गावरील वाहने दूरपर्यंत ठप्प झाली होती. दरम्यान मुंबईहून शिर्डीकडे जाणारी अनेक वाहने घोटी शहरातून शिरल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने वातावरण तणावपूर्ण होते.

प्रवाशी वेठीस

महामार्गावर जवळपास चार ते पाच तास भरउन्हात उभे राहिल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. शिर्डीला जाणाऱ्या व परतणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. घोटी येथे महामार्गावर घोटी-सिन्नर चौफुलीवर घोटीचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी नगरसेवकाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

मालेगाव : माजी नगरसेवक शकील हमद हाजी अब्दूल रऊफ उर्फ मगा मेम्बर (वय ५०) यांचा रविवारी संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सकाळी महामार्गावरील चंदनपुरी शिवारातील शालिमार हॉटेलजवळील अरशबा बाबा दर्ग्याजवळ संशयास्पदरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती चंदनपुरी येथील भरत बापू अहिरे यांनी पोलिसांना दिली.

शकील हमद हाजी अब्दूल हे शनिवार सायंकाळपासूनच बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. मृतदेह मिळून आल्याचे कळताच कुटुंबीय व नागरिकांनी सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती. किल्ला व आझादनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, मगा मेम्बर यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या कुटुंबीयांनी सामान्य रुग्णालयाबाहेर आंदोलन करीत आरोपीस त्वरित अटक करण्याची मागणी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातं अन् सुखाची सरमिसळ...

$
0
0

नातं अन् सुखाची सरमिसळ...

---

धनश्री क्षीरसागर

---

साधारण तिसरीत वगैरे असेन मी, गल्लीत खेळत असताना वाड्याच्या दारात एक रिक्षा येऊन थांबली अन् आमच्याच वाड्यात राहणारे जोशी काका रिक्षातून उतरले आणि मग रिक्षातून बाहेर आला तो जोशींचा ब्रँड न्यू टीव्ही. मग खेळ वगैरे सगळ बाजूला ठेवून आम्ही सगळे जोशी काकांच्या मागे. मोठ्या थाटात आम्ही जोशी काकांचा टीव्ही त्यांचा घरी पोहोचवला. शेवटी वाड्यात आलेला पहिला टीव्ही होता तो. काकांचा चेहेरा साधारण एखादा राजा लढाई जिंकून आल्यावर कसा दिसत असेल तसा दिसत होता. जोशी काकू आधीच वाड्यातल्या सगळ्या मैत्रिणी गोळा करून दारात वाट बघत बसल्या होत्या. मग टीव्हीची स्थापना करण्यात आली, त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढण्यात आले, सगळ्या मोठ्या मंडळींनी मिळून भरपूर कोडकौतुक करून झालं त्या टीव्हीचं. आरती तेवढी बाकी ठेवली होती. काकूंचा तर आनंद गगनात मावत नव्हता आणि का नसावा, दोन वर्षे मागे लागल्यावर काकूंसाठी काकांनी घरात आणलेली पहिली वस्तू होती म्हणे ती.

हे सगळ आठवलं कारण, परवा शूटिंग करत होते, माझ्या सीनला थोडा उशीर होता म्हणून मेकअप रूम मध्ये बसले असताना एक मुलगी आत आली. तरुण, सुंदर, कॉन्फिडन्ट पण जरा अस्वस्थ. ओळख झाली, मग गप्पा सुरू झाल्या. तिचा फोन सारखा वाजत होता. पण, ती तो कट करत होती. न राहून मी म्हटलं, अगं घे की तो फोन, बोल कोण आहे त्याचाशी. तर म्हणाली, नाही गं दीदी मला नाही बोलायचं त्याच्याशी. प्रेमप्रकरण होतं हे वेगळ सांगायची गरज नव्हती. मग काही वेळाने तीच सांगायला लागली, अगं भांडण झालंय माझं ‘बीएफ’शी. मी एक गिफ्ट मागितलं होतं त्याचाकडे, पण नाही दिलं त्याने. आम्ही जरा हसलोच तिला आणि मग प्रत्येक जण आपापल्या परीने सल्ले देत समाजावत होता. मग मी तरी कशाला मागे राहू, मीही म्हटलं, अगं होतात भांडणं म्हणून इतकं थोडंच रूसायचं असतं. आता नाही दिलं, तर नंतर देईल गिफ्ट. इतकं मनाला नाही लावून घ्यायचं आणि अजून तर काहीच नाही, लग्नानंतर काय कराल तुम्ही? तेव्हा तर खूप जबाबदाऱ्या असतात, खूप तडजोडी असतात, तेव्हाही असेच भांडणार की काय तुम्ही, असं म्हणून आम्ही हसलो. त्यावर तिचं उत्तर, हो गं दीदी तोच विचार करतेय मी, जो मुलगा मला १५०० ची लिपस्टिक नाही घेऊन देऊ शकत तो काय मला आयुष्यभर सांभाळणार. नको बाई आताच ब्रेकअप करते!!! मेकअप रूम शांत. काही वेळ आम्ही सगळ्या जणी फक्त एकमेकींकडे बघत होतो.

नाही नाही मला तुलना अजिबात करायची नाहीये. पिढी बदलली त्याप्रमाणे त्यांच्या गरजा, त्यांच्या आवडी नक्कीच बदलणार यात काहीच गैर नाही आणि अपग्रेड होत राहणं चांगलंच असत. पण, अपग्रेड झालेल्या भावना बघायला मिळाल्या. कुठंतरी ऐकलं होत समज व्यक्तीला घडवते आणि व्यक्ती समज घडवते म्हणे. म्हणून प्रश्न पडला, जोशी काकू पण अस म्हणू शकत होत्या खरंतर, पण त्यांना म्हणावसं नाही वाटलं. म्हणजे त्यांना आनंद महत्त्वाचा नव्हता असं नाही, पण त्यांना त्यापेक्षा महत्त्वाचं वाटलं ते त्यांचं नातं आणि आपल्या पार्टनरवरचा विश्वास. अर्थात, काकूंच्या त्या भावनेला हल्ली ओर्थोडॉक्स असं म्हटलं जातं. पण, आम्ही

करणार तरी काय, जग बदललंय, स्पर्धा वाढलीय, आम्हाला टिकून राहायचंय, खूप काम करायचंय, स्टेटस मेंटेन ठेवायचंय, मग थोड्या सोयी गरजेच्या आहेतच आणि त्यासाठी आपल्या गरजा ओळखून आधीच काही निर्णय घेतले तर हरकत काय?

इकोनॉमिक्सचा अभ्यास करताना शिकले होते, माणसाच्या गरजा तीन प्रकारच्या असतात. एक जीवनावश्यक म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. दुसऱ्या सुखकारक म्हणजे आपली कामं सोपी करणाऱ्या आणि तिसऱ्या असतात चैनीच्या म्हणजे हेच १५०० ची लिपस्टिक. पण, या प्रसंगानंतर या तीन प्रकारांची आपण भेळ करतोय की काय असं वाटलं. केवळ प्रलोभनांना बळी पडून निव्वळ चैनीच्या वस्तूंना आम्ही जीवनावश्यक तर बनवत नाही ना? म्हणजे होतं काय बघाना, या मोठमोठ्या कंपन्या आम्ही तुम्हाला अपग्रेड करतोय या नावाखाली फक्त त्यांचं सामान आम्हाला विकत असतात. म्हणजे ज्याला आम्ही आमची लाइफस्टाइल म्हणतो ती खरंतर असते कुठल्या तरी कंपनीची मार्केटिंग पॉलिसी आणि आमची अवस्था अशी असते की ते घ्याव तर कंपनी आम्हाला वेड्यात काढतेय आणि नाही घेतलं तर लोक आम्हाला मागासलेले म्हणतात. घरातल्या माळ्यावर पडलेला व्हॅक्युम क्लीनर किवा गॅलरीत पडलेल्या ट्रेडमिल (ज्यावर आम्ही हल्ली कपडे वाळत घालतो.) ते पाहिल्यावर याची जाणीव होते आम्हाला. हे म्हणजे असं झालं, की काही मॅगझिन, जाहिराती, टीव्ही चॅनलने आम्हाला लाइफस्टाइल या शब्दाशी ओळख करून दिली. मग आमच्या स्वयंपाक घराचं किचन झालं, मग त्या किचनचं मॉड्युलर किचन झालं. पण, फायनली आमचा त्या सर्व सोयींयुक्त मॉड्युलर किचनवर राज्य कोणाचं असतं, तर स्वयंपाकवाल्या मावशींचं! असो, या सगळ्या गोष्टी आवश्यक असल्या, तरी नात्यांची किंमत मोजून तर आम्ही त्या मिळवत नाही आहोत ना, याचा विचार करणं गरजेचं झालंय. अर्थात, आपलं सुख कशात आहे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपपत्र तातडीने दाखल करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव येथील बालिकेवरील अतिप्रसंगाच्या प्रयत्नाची घटना घृणास्पद असून, या प्रकरणी तातडीने कारवाईच्या सूचना पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आरोपपत्र (चार्जशीट) तातडीने दाखल केले जाईल. आंदोलकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी केले.

महाजन यांनी पीडित मुलगी तिच्या आईवडिलांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली. या गुन्ह्यात न्याय देण्यासाठी तातडीने आरोपपत्र दाखल करण्यात येईल, तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नेमणूक केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या संतप्त नागरिकांची महाजन यांनी भेट घेतली. त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या वेळी आमदार सीमा हिरे, विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, तहसीलदार राजश्री अहिरराव उपस्थित होते.

ही घटना संतापजनक असून, या प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करू. मुलीची शारीरिक तपासणी स्त्री रोगतज्ज्ञामार्फत करण्यात आली आहे. तिच्यावर अतिप्रसंग झाला नसून, अतिप्रसंगाचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणाचे चार्जशीट महिन्याच्या आत दाखल करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाईल.

- गिरीश महाजन, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

पीडित बालिकेच्या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे. मात्र तरीही सोशल मीडिया व अन्य माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रयत्न होत असतील तर अशा व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस आयुक्तांनी एका निवेदनाद्वारो लोकांना आवाहन केले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, तळेगाव अंजनेरी येथे शनिवारी अल्पवयीन बालिकेच्या संदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करीत अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले. पीडित बालिकेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या घटनेच्या अनुषंगाने शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रयत्न होत असून त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. पीडित बालिकेच्या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे. मात्र तरीही अफवा पसरवण्याचे प्रयत्न होत असून अशा व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ज्यांना तपास अथवा घटनेबाबत शंका असेल त्यांनी पोलीस उपायुक्त (परिमंडळ एक आणि दोन) यांच्याशी अथवा पोलीस आयुक्त कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये मोबाइल, इंटरनेट सेवा बंद

$
0
0

विनोद पाटील । नाशिक

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर नाशिक जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोबाइल डेटा व इंटरनेट सेवा दोन दिवसांसाठी खंडित करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून फिरणाऱ्या चिथावणीखोर पोस्ट व अफवा थांबवण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील तळेगाव-अंजनेरी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ जमावाकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी झाली. रास्ता रोको करणाऱ्या लोकांनी अनेक ठिकाणी पोलिसांच्या व एसटी बसगाड्या पेटवून दिल्या. या आंदोलनाची छायाचित्रे व व्हिडीओ व्हॉट्‌सअॅपसह सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळं तणाव आणखी वाढला होता. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला होता. मात्र, तरीही अफवांचा धूर निघतच राहिल्यानं नाशिक पोलिसांनी मोबाइल सेवा खंडित करण्याची विनंती गृहविभागाला केली होती. त्यानुसार आज व उद्या, असे दोन दिवस मोबाइलवरील डेटा सेवा खंडित करण्यात आली आहे. तशा सूचना नाशिकमधील मोबाइल ऑपरेटर्सना देण्यात आल्या आहेत. फक्त मोबाइलवरील डेटा सेवा बंद असून ब्रॉडबँड सुरू आहे, अशी माहिती नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली.

दरम्यान, पोलिस आयुक्तांनी आज सकाळी मराठा आणि दलित समाजातील प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.

शाळा, सार्वजनिक वाहतूक बंद

काल झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश शाळा बंद ठेवण्यात आल्या असून एसटीसह सर्व सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद ठेवण्यात आहे.

१५ दिवसांत आरोपपत्र

नाशिकमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. या प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात येईल, असं आश्वासन केसरकर यांनी यावेळी दिलं. सरकारच्या वतीनं अॅड. उज्ज्वल निकम हे या खटल्याचं काम पाहतील, असंही केसरकर यांनी सांगितलं.

पालकमंत्री गिरीश महाजन गायब

मुलीवर अतिप्रसंग झाला नसून, तसा प्रयत्न करण्यात आला आहे, असं वक्तव्य काल नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण चिघळून निषेध आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर पालकमंत्री महाजन यांच्याविरोधात प्रचंड रोष असल्यानं ते जिल्ह्याबाहेर गेल्याचं समजतं. नाशिकमधील परिस्थितीला पालकमंत्रीच जबाबदार आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावच्या घटनेचे धुळ्यात पडसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तळेगाव-त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथील बालिकेवरील अत्याचाराची घटना आणि त्या संदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या बेताल विधानाचे पडसाद सोमवारी धुळे शहरात उमटले. मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध करत गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा तत्काळ झाली पाहिजे या मागणीसाठी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या बेताल विधानामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर गेल्याने आरोपींना बळ मिळत आहे. आरोपीला मदत करणारा हा देखील आरोपीच असतो. त्यामुळे या घटनेत पालकमंत्री अशी विधाने करत आहेत. त्यांना देखील आरोपी करण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव-त्र्यंबकेश्वर घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा तत्काळ झाली पाहिजे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. अन्यथा सकल मराठा समाजातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील दांडिया बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

तळेगाव (अंजनेरी) येथील बालिका अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने सोमवारीदेखील सायंकाळी गरबा-दांडिया रास नृत्याचे कार्यक्रम बंद ठेवण्यात आले. त्यामुळे शहरात दररोजचा डीजे, लाऊड स्पिकर्सचा दणदणाट ऐकू आला नाही.

शहरातील अनेक सार्वजनिक नवरात्री मंडळांनी रविवारीदेखील दांडिया रद्द केले होते. त्याची पुनरावृत्ती सोमवारी शहरात सर्वत्र दिसून आली. रस्त्यांवर देवी भक्तांची गर्दीही आढळून आली नाही. समाजात अशा अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने लढण्यासाठी जात विसरून सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.


पाथर्डी परिसरात तणावपूर्ण स्थिती

सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमाराला पाथर्डी फाटा परिसरात एका मोटारसायकल स्वारावर जमावाने हल्ला करून त्याला जखमी केले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झेंडूची फुले घेऊन घरी परतणाऱ्या मोटारसायकलस्वारास जमावाने लक्ष्य केले. त्याची गाडी अडवत त्याच्या डोक्यावर जड वस्तूचा प्रहार केला. या जखमीला उपचारांसाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या दुसरा जमाव रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांची कुमक येऊन धडकल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या परिसरात दुपारी दोन वाहनेही जाळण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन् झेंडूची फुले कोमेजली!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

संपन्नता आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेली झेंडूची फुले कोमेजली होती. चार महिने तळहातासारखी जपून वाढवलेली झेंडूची फुले दसऱ्याला मातीमोल भावाने विकावी लागली. त्यातच रास्ता रोको, दगडफेक, तणाव यामुळे अपेक्षित भावही मिळाला नाही. त्यामुळे यंदा झेंडू घेऊन पस्तावलो, अशी प्रतिक्रिया शेतकरी आणि विक्रेत्यांनी व्यक्त केली.

तळेगाव अंजनेरी येथील अत्याचार प्रकरणामुळे शहरासह जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. काही ठिकाणी व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. नाशिकरोड पोलिस स्टेशनजवळ सिन्नर, एकलहरा, लहवीत, भगूर, शिंदे, पळसे, ओढा आदी भागातून शेतकरी येतात. जीपमधून आणलेल्या मालाचा येथे जाळीच्या भावाने लिलाव होतो. एका जाळीत ४०० फुले असतात. केसरी झेंडू १७० रुपये जाळीने, तर पिवळा झेंडू २७० रुपये जाळी या भावाने विकण्यात येत होती.

आंदोलन व दगडफेकीच्या भीतीने अनेक शेतकरी यंदा आलेच नाहीत. तसेच किरकोळ विक्रेत्यांची संख्याही कमी होती. नाशिकरोड, जेलरोडवर नेहमी झेंडू विक्रेत्यंची गर्दी असते. झेंडूच्या राशी असतात. झेंडूचा मळा अवतरल्याचा भास होतो. यंदा मात्र, हे चित्र दिसले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडितेच्या कुटुंबाला मनोधैर्यंतर्गत मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव (अंजनेरी) येथील पीडित मुलीच्या देखभाल व पुनर्वसनासनाठी सामाजिक न्याय विभागाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित कुटुंबाला मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत करून धीर दिला.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव-अंजनेरी गावात एका बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्याचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटले. या घटनेनंतर सोशल मीडियावरून पसरविण्यात येणाऱ्या अफवा रोखता याव्यात, यासाठी जिल्हाभरातील मोबाइलवरील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन दिवस ही सेवा बंद ठेवण्याचे विचाराधीन असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

तळेगाव परिसरात सोमवारी कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. याखेरीज पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळवून देता यावी, यासाठी देखील प्रशासन सरसावले. बलात्कार व तत्सम घटनांमधील पीडितेला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व महिला बाल विकास विभागाच्या आधिकाऱ्यांनी तातडीने ही मदत मिळवून दिली. त्यापैकी ७५ टक्के रक्कम ठेव स्वरुपात, तर २५ टक्के रक्कम हातखर्चासाठी धनादेश स्वरुपात देण्यात आल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी रविवारी उमटलेल्या पडसादांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी जिल्हाभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. चांदवड, येवला, सिन्नर, वाडीवऱ्हे, नांदगाव अशा विविध ठिकाणी शांततेच्या मार्गाने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनेक भागात आजही त्या घटनेचा निषेध व्यक्त झाला. मात्र तो शांततामय मार्गाने करण्यात आला. नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे. जिल्हाभरातील स्थिती हळूहळू पूवर्पदावर येत आहे.

- राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर संरक्षणासाठी सज्ज

$
0
0

शांतता कमिटीत पोलिस आयुक्तांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव येथे घडलेली घटना दुर्दैवी असून, त्याचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. जातीय सलोखा कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. पोलिस कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस अर्लट असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी व्यक्त केली.

गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालयात सोमवारी सकाळी पोलिस आयुक्त सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेनंतर सुरू झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन केले होते. सदर घटना दुर्दैवी असून, त्या संदर्भातील सखोल तपास पोलिस करीत आहेत. संशयितास ताब्यातदेखील घेतले आहे. परंतु, त्या घटनेचे पडसाद रविवारी ग्रामीण भागासह नाशिक शहरातही उमटले. मुंबई-आग्रा हायवेवर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. वाहनांची तोडफोड, दगडफेक केली. यामुळे ग्रामीण भागासह शहरातील वातावरण चिघळले. हिंसक आंदोलनाच्या घटनांची पोलिस चौकशी करीत आहेत. यातील काहींची नावेही निष्पन्न झाली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले. शांतता समितीतील सदस्यांनीही तरूण कार्यकर्त्यांना आवर घालावा. शहराच्या शांततेसाठी समितीच्या सदस्यांनीही पोलिसांना सहकार्य करावे. गुन्हेगारांना जात-धर्म नसतो तसे कारवाई करताना पोलिस जात-धर्म पाहत नाही. शांतता व जातीय सलोखा-एकोपा टिकून राहण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही पोलिस आयुक्त सिंघल यांनी केले.

दरम्यान, शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी व जातीय सलोखा-एकोपा टिकून राहण्यासाठी राजकीय पक्ष, संघटनांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आणखी कठोर कारवाई करावी, अशी सूचना केली. शहरात पोलिस सातत्याने हे काम करीत असल्याचे पोलिस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सर्वांना शांततेचे आवाहन करीत तरुणांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले. बैठकीला आमदार सीमा हिरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, शशिकांत जाधव, हरिष भडांगे, शिवाजी चुंभळे, राजेंद्र बागुल, संजय साबळे, कविता कर्डक, शाहू खैरे, विनायक खैरे, माजी मंत्री शोभा बच्छाव, नाना महाले, दत्ता पाटील, पवन क्षीरसागर, माजी महापौर अशोक दिवे, अजिंक्‍य साने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनीसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे

$
0
0

अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीची दुरवस्था करण्याबरोबरच तिचे नामांतर नासर्डी या नावाने झाल्याने खुपच दुःख होते. चांगली नदी आज एका नाल्यासारखी झाल्याने या नदीला पूर्ववत सुधारण्यासाठी आता विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी केले.

इंदिरानगर येथील डे केअर सेंटर शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री गिरिजा जोशी, ऋतुजा बागवे, राधिका देशमुख, सुनीर सबनीस आदींसह राजेश पंडित, नितीन जुईकर आदी उपस्थित होते. शाळेचे सचिव गोपाळ पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

शाळेतील विद्यार्थी तसेच पालकांशी संवाद साधताना उदगीरकर यांनी, कचरा करणे हे चुकीचे आहे. कचरा अस्ताव्यस्त टाकला की, परिसरात दुर्गंधी पसरते व नागरिकांना विविध रोगांना सामोरे जावे लागत असते, असे सांगितले. त्यामुळे मुळातच कचरा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर नाशिक शहरातून वाहणारी नंदिनी ही नदी खरोखरच नाशिकची शान होती. मात्र आता तिचे रुपांतर एका नाल्यात झाल्याने खूप दुःख होते, अशी त्यांनी व्यक्त केली.

…नाहीतर मोदीकाका रागवतील

पूर्वी या नदीच्या पाण्यावरच परिसरातील शेती होत असल्याचेही उदगीरकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचबरोबर बागवे यांनी ‘कचरा करू नका व कचरा करू देऊ नका’ असे आवाहन केले. त्याचबरोबर कोणी कचरा करीत असेल तर त्यांना सांगा, ‘काका, कचरा करू नका नाहीतर मोदीकाका रागवतील’ असे सांगा. या घोष वाक्यामुळे मुलांनीसुद्धा कचरा करणार नाही व करू देणार नाही असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संतांच्या मार्गदर्शनामुळे आपली संस्कृती टिकून’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, अमृतधाम

निसर्ग सृष्टीचा दाता असून संस्कृतीचा नाही, त्यामुळे संस्कृती ही साधू, संतांच्या मार्गदर्शनामुळे टिकून आहे, असे विचार भाऊ पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या जयंती उत्सवानिमित्त तपोवन येथील आश्रमात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याचा समारोप मृत्यूंजय यागाच्या पुर्णाहूतीने करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी माधवगिरी महाराज, स्वामी रमेशगिरी, स्वामी मधुगिरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते.

भाऊ पाटील म्हणाले, भारतीय संत परंपरेच्या अशा संस्कृतीचे सर्व बाजूने आक्रमण आणि विरोध होऊनही संकृतीत जे चैतन्य टिकून आहे. ते संताच्या माध्यमातूनच आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या आध्यात्मिक मार्गाने सर्वांनी प्रवास केल्यास जीवन यशस्वी होते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मृत्युंजय यागाची पूर्णाहुती, सत्संग प्रवचन आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमास सर्व साधू, संत, विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी अणि पंचक्रोशीतील जय जनार्दन परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेसाठी भाजपने कसली कंबर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र व राज्यात सरकार असल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी केली आहे. या निवडणुका जिंकायच्याच अशा निर्धाराने आम्ही ग्रामीण भागात लक्ष केंद्रीत केल्यामुळे आता सर्वत्र सकारात्मक चित्र आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दिली.

जिल्ह्यात ग्रामीण भागात भाजपची ताकद नव्हती पण आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही सर्व १५ तालुके पिंजून काढले व संघटनात्मक कामावर भर दिला. त्यामुळे आता जिल्ह्यात १५ हजार कार्यकर्त्यांचे फौज तयार झाली आहे. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटामध्ये फक्त तीन सदस्य होते. आता त्यात मोठी वाढ होणार असून संपूर्ण जिल्ह्यात चित्र आहे. गेल्या सात-आठ महिन्यात आम्ही प्रत्येक गावात गेलो व तेथे केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवायचे काम केले. जिल्हा परिषदेच्या ७३ गटात आम्ही ३७५० बूथ तयार केले असून, त्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे.

नगरपालिकेवरही लक्ष

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींबरोबरच सहा नगरपालिकेतही आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे नियोजन केले आहे. नगर परिषदेमध्ये सुद्धा या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असे संकेतही जाधव यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेंडूच्या फुलांनी सजली बाजारपेठ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठ झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी फुलून गेल्या आहेत.

दसरा सणाच्या निमित्ताने शहरात चैतन्यमय वातावरण झाले असून, या दिवशी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने कालपासूनच शहरातील मोसम पूलचौक, सटाणा नाका, रावळगाव नाका आदी ठिकाणी झेंडूच्या खरेदी विक्रीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली आहेत. मात्र या दिवशी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने किमतीत देखील वाढ झाली आहे. ४० ते ५० रुपये शेकडा दराने बाजारात फुलांची विक्री होत आहे.

झेंडूच्या फुलांसोबतच आपट्याची पाने अर्थात सोने खरेदीसाठी देखील नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आपट्याच्या झाडांची पाने तसेच फांद्या विक्रीस बाजारात आणल्या आहेत. शहर परिसरात आपट्याची पाने दुर्मिळ असल्याने नागरिकांकडून त्याची खरेदी केली जाते आहे.

दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी गर्दी

दसरा निमित्ताने खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी शहरातील दुचाकी चारचाकी वाहनांच्या शो रूम तसेच गृहोपयोगी वस्तू व सोने बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. दसरा असल्याने खरेदीसाठी बाजारात अनेक ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास स्टॉल लावण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड दहशतीखाली

$
0
0

दगडफेक अन् जाळपोळीच्या घटनांमुळे धास्तावले रहिवासी

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

तळेगाव (अंजनेरी) येथील एका चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्हाभरात निर्माण झालेल्या तणावाचा गैरफायदा उठवत रविवारी रात्री व सोमवारी दुपारी समाजकंटकांनी जेलरोड भागात दगडफेक, गाड्यांची तोडफोड करण्याबरोबरच टायर्स पेटवून दहशत निर्माण केली. या दगडफेकीत पोलिसही लक्ष्य झाले. सोमवारी दुपारी परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनीच रस्त्यावर उतरून दंगेखोरांची धरपकड केली. यावेळी पोलिसांनी जेलरोड परिसर पिंजून काढत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यावेळी पोलिसांच्या लाठ्याही चालल्या. सुमारे १० संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. या घटनेत नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख हेही जखमी झाले. कलम १४४ खाली यावेळी जेलरोडला जमावबंदी लागू करण्यात आली होती. गेल्या ४० वर्षांनंतर प्रथमच अघोषित संचारबंदी जेलरोडला बघायला मिळाली.

तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेमुळे शनिवारपासून जिल्हाभरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. त्याचा परिणाम रविवारी नाशिकरोड परिसरातही दिसून आला. या तणावपूर्ण वातावरणात काही समाजकंटकांनी सोमवारी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी आठ वाजेदरम्यान दसक येथून ५०-६० जणांचा जमाव हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी, शिवीगाळ करीत छत्रपती चौकापर्यंत चालून आला होता. यावेळी पोलिसांनी या जमावाची समजूत घातली. त्यानंतर दुपारी पुन्हा परिस्थिती बिघडली.

समाजकंटकांचा धुडगूस

जेलरोडवरील छत्रपती चौक, बोराडे मळा, राजराजेश्वरी चौक, वज्रेश्वरीनगर, भीमनगर, पाण्याची टाकी या भागात समाजकटकांच्या अक्षरशः झुंडीच्या झुंडी दुचाकीवरून फिरत होत्या. गाडीला निळे झेंडे असलेले तरुण जोरदार घोषणाबाजीबरोबरच रस्त्यावरील लोकांना शिवीगाळ करताना दिसले. वाहनांवर दगडफेक केली. वज्रेश्वरी नगरात दुपारी २.४५ वाजता सुमारे शंभर ते दीडशे जणांचा जमाव रस्त्यावर उतरला. या जमावाने एक दुचाकी (क्र.एम.एच.१५ इ.क्यू.०५८८) रस्त्यावर ओढून आणत या गाडीचा दगड टाकून अक्षरशः चुराडा केला. या प्रकारामुळे या भागात प्रचंड दहशत निर्माण झाल्याने सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद करून घेतली.

कारवाईला दिरंगाई

रविवारी रात्री भीमनगर येथे शेकडोंचा जमाव जमला होता. यावेळीही तुफान दगडफेक झाली होती. याचवेळी छत्रपती चौकातही मोठा जमाव जमला होता. यावेळी पोलिसांनी धडक कारवाई करून सामाजिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणाऱ्यांना ताब्यात घेतले असते, तर सोमवारचा तणाव निर्माण झाला नसता.

सणांवर सावट

दसरा आणि आनंदाला तोटा असे म्हटले जाते. मात्र, यंदाच्या दसऱ्यावर दहशतीचे सावट कायम असून, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंगळवारी संचलन, तसेच बौद्ध धम्मप्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत या उत्साहावर दहशतीचे सावट असून, शहरातील आर्थिक उलाढालीलाही यामुळे ब्रेक लागला आहे.


वाहनांची जाळपोळ व तोडफोड

जेलरोडला छत्रपती चौक, भीमनगर, इंगळेनगर, वज्रेश्वरी चौक व चेहेडी येथे वाहनांवर दगडफेक झाल्याने मोठे नुकसान झाले. शिवसेनेचे नाशिकरोड संपर्कप्रमुख शिवा ताकाटे यांची झायलो (एम. एच.१४ बी. एक्स. ३९४३) गाडी समाजकंटकांनी पेटवून दिली. शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख नितीन चिडे यांचीही सफारी ही चारचाकी गाडी फोडली. रविवारी रात्री १०.४५ वा चेहेडी येथे नाशिक-पुणे महामार्गावर पारगाव खंडाळा डेपोची बस समाजकंटकांनी अडवून चाकांची हवा सोडत बसही फोडली. नाशिकरोड पोलिस येथे वेळीच पोहोचल्याने ही बस जाळपोळीपासून वाचली.

बसस्थानकात शुकशुकाट

नाशिकरोड बसस्थानकावर सोमवारी एकही बस आली नाही. बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसही शहरात आल्या नाही. रात्री ११ वाजता चेहेडी गावाजवळ एका बसवर दगडफेकीची घटना घडल्याने त्यानंतर सिन्नरकडून नाशिककडे पुणे-सटाणा ही सटाणा डेपोची बसही पोलिस बंदोबस्तात चेहेडी येथून नाशिकरोड बसस्थानकात रात्री आणण्यात आल्याची माहिती नाशिकरोड बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यू. आर. घुगे व एस. इ. सोनवणे यांनी दिली. शहरातील परिस्थिती चिघळल्याने ही बस सोमवारी दिवसभर नाशिकरोड बसस्थानकातच उभी होती. शहर व ग्रामीण या दोन्हीही बससेवा बंद राहिल्याने सोमवारी दिवसभर नाशिकरोड बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला.


पोलिस आयुक्तही रस्त्यावर

जेलरोडला परिस्थिती हातबाहेर गेल्याने दुपारी तीन वाजता स्वतः पोलिस आयुक्तच रस्त्यावर उतरले. त्यांनी छत्रपती चौक ते वज्रेश्वरीनगर, बोराडे मळ्यापर्यंत स्ट्रीट पोलिसिंग करून परिस्थितीची माहिती घेतली. त्यांच्यासोबत शीघ्र कृती दलाचीही एक तुकडी होती. यानंतर मात्र पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली. यावेळी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, अतुल झेंडे, नाशिकरोडचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, आडगावचे संजय सानप, उपनगरचे अशोक भगत, गुन्हे शाखा युनिट तीनचे नारायण न्याहाळदे, हनुमंत गाडे आदी पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५० ते ३०० पोलिस कर्मचाऱ्यांनी जेलरोडच्या छत्रपती चौकाच्या आजूबाजूच्या नगरांचा परिसर अक्षरशः पिंजून काढला. पोलिसांची कुमक वाढताच वाहनांची तोडफोड करणारे समाजकंटक पसार झाले.


तरुण जखमी

माल धक्का रस्त्याने गायकवाड मळ्याकडे जात असताना हितेंद्र अनिल गायकवाड (२७) याला व त्याच्या कुटुंबियांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. जमावाने हितेंद्र याला त्याच्या चारचाकी गाडीवर चिकटवलेले स्टीकर काढण्यास सांगितले. त्याने नकार दिल्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी सळई मारण्यात आली. गाडीत असलेल्या त्याच्या आईलाही मारहाण झाली. हितेंद्रला सुरुवातील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो गंभीर जखमी असल्याने त्याला सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले.

स्टीकर्स, लोगो पाहून वाहने लक्ष्य

विशिष्ट समाजाची ओळख म्हणून वापरत असलेल्या स्टीकर्स अथवा लोगो पाहून दोन्ही बाजूंच्या आंदोलनकर्त्यांकडून वाहनांना लक्ष्य केले जात आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांनी सांगितले, की वाहनावर कोणत्याही स्वरूपाचे स्टीकर्स अथवा लोगो लावणे हेच बेकायदा आहे. आता आमचे लक्ष्य कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे असून, त्यानंतर अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.

लॉजची तपासणी

वाहनांची तोडफोड व दगडफेक करून दहशत निर्माण करणारे छत्रपती चौकालगतच्या कुबेर लॉजमध्ये लपून बसल्याचा संशय आल्याने पोलिसांनी या लॉजची तपासणी केली. परंतु, येथे संशयास्पद काही आढळून आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तणावाच्या भीतीपोटी कॅम्पस पडले ओस

$
0
0

तळेगाव येथील घटनेचे पडसाद; विद्यापीठ परीक्षा सुरळीत

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

शहरात निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीचे पडसाद कॉलेज कॅम्पसमध्येही पडले. या तणावाच्या भीतीपोटी शहरातील सर्वच कॉलेजेसचे कॅम्पस ओस पडले होते. कॉलेजच्या स्टाफने नाममात्र हजेरी लावली असली, तरीही या कॅम्पसला सोमवारी अघोषित सुटीच जाहीर झाली होती.

त्र्यंबकेश्वरमधील तळेगाव येथील घटनेचे पडसाद रविवारी शहरात उमटले होते. शहराबाहेर झालेल्या वाहनांची तोडफोड व जाळपोळीचे लोण रात्रीच्या सुमारात शहरातही पसरले होते. यामुळे संभाव्य परिस्थितीचा अंदाज बांधत शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सोमवारसाठी सुटी घोषित केली होती. मात्र कॉलेजांतून अशी कोणतीही सुटी जाहीर करण्यात आली नव्हती. तरीही सोमवारी विद्यार्थी सिनीअर कॉलेजकडे फिरकले नाहीत. ज्यूनिअर कॉलेजेसना तर सोमवारी सकाळी सुटी जाहीर करण्यात आली. शहरातील काही कॉलेजेसमध्ये तुरळक विद्यार्थी आले असले तरीही सर्वच कॉलेजमधील लेक्चर्स बंदच ठेवण्यात आले होते.



कॉलेजबाहेरही बंदोबस्त

शहरातील कॉलेजमध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्रित होण्याचे ठिकाण शहरातील सध्याच्या स्थितीत प्रसंगी संवेदनशील होऊ शकते हे लक्षात घेऊन प्रमुख कॉलेजेसबाहेरही पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. विविध कॉलेज कॅम्पसमध्ये राजकीय पक्ष प्रेरीत विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत. पक्षांकडून या संघटनांचा उपयोग अशांतता माजविण्यासाठी होऊ नये , यासाठी विविध नेत्यांनाही पोलिसांच्या वतीने तंबी देण्यात आली. यामुळे कॅम्पसचे वातावरण सोमवारी सुनेसुनेच राहीले.


कॉलेजस्तरावरील परीक्षा रद्द

दरम्यान , शहरात काही सिनिअर वर्गातील अभ्यासक्रमांच्या विद्यापीठीय परीक्षा अगोदरपासून नियोजन होत्या. या परीक्षा सुरळीत पार पडल्या. यातही ज्या परीक्षा कॉलेज स्तरावरून नियंत्रित करता येणे शक्य होत्या त्या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील तारीख व वेळेचा तपशील विद्यार्थ्यांना कॉलेजकडून कळविण्यात येणार आहेत.

इंटरनेट बंद; विद्यार्थ्यांचा हिरमोड

मोबाईल डाटा इंटरनेट वापरणारे सर्वाधिक लाभार्थी कॉलेजियन्स आहेत. मोबाईल व इंटरनेट कंपन्यांचा हाच प्रमुख लक्ष्यगट आहेत. तर इंटरनेटच्या माध्यमातून अफवांना बळी पडून युवक अशांततेत भरकटले जाऊ नयेत, यासाठी मोबाईल इंटरनेट डाटा पोलिसांच्या सूचनांनुसार दोन दिवसांसाठी बंद केला. त्यामुळे व्हॉट्स अॅप किंवा इतर सोशल मीडियावर सेकंद सेकंदाला अपडेट बघण्याची सवयच जडलेल्या तरूणाईचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच पोलिसांचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचेही मत अनेक कॉलेजियन्सने व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दिवसभर मोर्चे, निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यात तळेगाव (अंजनेरी) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेचे पडसाद सोमवारीदेखील उमटले. संतप्त जमाव शांत झाला असला तरी आता ठिकठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक रोष व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात विंचूर येथे सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला, तर अनेक ठिकाणी रास्तो रोको करून निषेध नोंदविण्यात आला.

सोमवारी निफाड तालुक्यातील विंचूर पूर्णत: बंद ठेवण्यात आले. त्यामुळे दसऱ्याच्या पूर्वदिनी तेथील व्यवहार ठप्प झाले. लासलगाव, नांदगाव, कळवण, अभोणा, चांदोरी, येवला, मालेगाव तालुक्यातील टेहरे तसेच ढवळेश्वर येथेही स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको करून या घटनेचा निषेध केला.

सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन गट आमने सामने आल्याने सोमवारी सकाळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सिन्नर तालुका प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने हा तणाव निवळला. इगतपूरी तालुक्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षकांनी पाडळी देशमुख अन्य जवळपासच्या गावांमध्ये सकाळी शांतता समित्यांची बैठक घेतली. तसेच शांतता बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

सटाणा आगाराचे

पाच लाखांचे नुकसान

सटाणा : तळेगाव अंजनेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी एसटी महामंडळाच्या बसेस फोडल्याने खबरदारीचा उपाय सटाणा बस आगाराने संपूर्ण आगार बंद ठेवून ३५४ बस फेऱ्या रद्द केल्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तसेच सटाणा आगाराचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगाराचे व्यवस्थापक कैलास पाटील यांनी दिली.

नाशिक शहर आणि परिसरात रविवारी मोठा उद्रेक झाला. आंदोलकांनी एसटी महामंडळाच्या बसेस लक्ष करून जाळपोळ, दगडपेक केली. परिणामी महामंडळाच्या नाशिक आगारातून थेट जिल्हाभरात बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवार सायंकाळपासूनच जिल्हाभरासह परराज्यात जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या. यामुळे सोमवारी सकाळी शाळा, महाविद्यालये व शासकीय निमशासकीय कार्यालयात जाणाऱ्या येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यामुळे सटाणा आगारातील सुमारे ८० बसेससह कर्मचारी, वाहक, व चालक यांनी विश्रांती घेणे पसंद केले.

त्र्यंबकमध्ये शुकशुकाट

त्र्यंबकेश्वर : तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेच्या उद्रेकाने विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येत असून, नाशिक-त्र्यंबक रस्ता शांत झाला होता. तथापि बस सेवा पूर्णत: ठप्प असल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.

त्र्यंबकेश्वर बस स्थानकात दररोजच्या २५० बस ये-जा करतात. त्यामध्ये दररोज नाशिक-त्र्यंबक जादा बस सोडाव्या लागतात व त्यांच्याही ५० पेक्षा अधिक फेऱ्या होतात. नवरात्रोत्सव आणि सलग आलेल्या शासकीय सुट्यांमुळे गर्दीचा उच्चांक या आठवड्यात अपेक्ष‌ीत होता. मात्र वातावरणातील तणाव आणि बंद बससेवा यामुळे येथे शुकशुकाट जाणवत होता. रविवारी बससेवा थांबलेली आणि त्र्यंबक बंद यामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळी बसस्थानक परिसरात अत्यंत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. येथील हॉटेल ओम गुरूदेव संचालक संतोष नाईकवाडी, विजय नाईकवाडी, नगरसेवक ललीत लोहगावकर, आरोग्य निरीक्षक शाम गोसावी, अमोल दोंदे आदींनी भुकेल्या प्रवाशांना खिचडी तयार करून दिली. पिण्याचे पाणी उपलबब्ध करून दिले. त्याच बरोबर रात्री मुक्कामासाठी येथील अमृतकुंभ निवासस्थानात निवाऱ्याची सुविधा दिली.

प्रवाशांची लूट

बससेवा बंद असल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी पर्वणी साधली. नाशिक-त्र्यंबक दरम्यानच्या २८ किमी प्रवासासाठी प्रती व्यक्ती १०० ते २०० रुपये दर आकारत कमाई केली. दरम्यान सोमवारी बस बंद होत्या. तसेच बाहेरगावाहून येणारे आणि जाणारे प्रवासीदेखील कमी होते. एरवी मंदिरात नेहमी दर्शनासाठी चार पाच तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र सोमवारी शुकशुकाट दिसत होता.

दसऱ्यावर सावट

तळेगाव (अंजनेरी) घटनेने बाजारपेठेतील उलाढाल थंडावली आहे. याचा थेट परिणाम बँकींग क्षेत्रावर झाला आहे. दसरा सण असूनही पाहीजे तसा उत्साह जाणवत नाही. शहर आणि परिसरात देवीमंदारांमध्ये नवरात्रोत्सव संपन्न होत आहे. मात्र या घटनेनंतर दांड‌िया तर थांबलाच. त्याचबरोबर येथे होत असलेल्या महाप्रसादाच्या जेवणावळीदेखिल झाल्या नाहीत. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी पावसाचा भडीमार तर अंत‌िम चरणात दंगलसदृष्य वातावरण यामुळे हा उत्सव आनंदाला पारका झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

कळवणला रास्ता रोको

कळवण : कळवण येथे मराठा समाजाच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व समस्त मराठा समाज बांधवामार्फत तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कळवण बसस्थानकासमोर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात तळेगाव घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. घटनेतील नराधमास तत्काळ फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे हिरामण पगार, मनसेचे शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, शिवसेनेचे नेते कारभारी आहेर, माकप सरचिटणीस हेमंत पाटील, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, दीपक हिरे, रामा पाटील, प्रदीप पगार, प्रकाश आहेर यांनी निषेध केला. पीड‌ित मुलीला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. या आंदोलनाप्रसंगी आंदोलकांच्या वतीने सायली पगार, ऋतुजा निकम या दोन अल्पवयीन मुलींच्या हस्ते कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.

अनर्थ टळला

कोपर्डी व आता तळेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण न होऊ देत कळवणकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रास्ता रोको आंदोलनाची सांगता शांततेत पार पडल्यानंतर सटाणा आगाराच्या एका एस. टी. चालकाने जमावाला चिथावणीखोर वक्तव्य केल्याने तरुणांनी कळवण आगाराकडे मोर्चा वळवत त्या चालकाची कानउघाडणी केली. बाका प्रसंग उद्भवण्याच्या आत तहसीलदार कैलास चावडे, पोल‌िस उपनिरीक्षक विनोद जाधोर यांनी मध्यस्थी केली. त्या चालकाने उपस्थितांची माफी मागितल्याने पुढील अनर्थ टळला.

दिंडोरीत मूक मोर्चा

दिंडोरी : शहरातून मूकमोर्चा काढण्यात आला. नाशिक-कळवण रस्त्यावर रास्ता रोको करत आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दिंडोरी शहरात बंद पाळण्यात आला. दिंडोरी येथील पालखेड चौफुली येथून मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चात नगराद्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगरद्यक्ष सचिन देशमुख, नगरसेवक कैलास मवाळ, माधव साळुखे, दिलीप जाधव, सूर्यकांत राजे, बाजार समिति उपसभापती अनिल देशमुख उपस्थित होते.

येवल्यात आंदोलन स्थगित

येवलाः शहरात सोमवारी सकाळी रास्ता रोकोचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील स्फोटक परिस्थिती लक्षात घेत रास्ता रोको आंदोलन स्थगित करून तहसीलदार व पोल‌िस निरीक्षकांना केवळ निषेधाचे निवेदन देण्यात आले. येथील मराठा समाजाने सोमवारी आयोजित केलेला रास्ता रोको अचानक स्थगित केला. मात्र, या रास्ता रोको आंदोलनासाठी नियोजित स्थळी विंचूर चौफुलीवर हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलक सैराट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव (अंजेनरी) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेला आता जातीय रंग प्राप्त झाला असून, नाशिकरोड परिसरात सोमवारी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत जमावावर नियंत्रण मिळवले. शहराच्या सीमेवर सुरू असलेली धुसफूस शहरात सुरू झाल्याने पोलिसांनी सकाळपासून मोबाइल, इंटरनेट सेवा खंडित केली. शहरात कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी पीडित मुलीची, तसेच तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शनिवारी रात्री झालेल्या या प्रकरणाचे पडसाद रविवारपासून उमटत आहेत. या घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर अनेक वाहनांची तोडफोड करीत एसटी बसेस, तसेच पोलिसांच्या वाहनांना आग लावली. रविवारी सायंकाळी हे आंदोलन काही प्रमाणात थंड झाले होते. मात्र, रात्रीनंतर शहरात पुन्हा त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. दलित विरुद्ध मराठा असा थेट संघर्ष दिसून येत असून, पोलिस त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाशिकरोड भागात दुपारपासून ठीकठिकाणी आंदोलनकर्त्यांनी वाहनांची तोडफोड केली. विहितगाव येथेही पोलिसांनी बळाचा वापर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. दिवसभरात येथे दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पाथर्डी गाव परिसरातही तणावाचे वातावरण होते. येथे जमावाने दोन दुचाकी जाळल्याची माहिती समजते. रविवारी दुपारपासून बंद झालेली एसटी बससेवा मंगळवारी सुरू होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर तालुका, तसेच मुंबई- आग्रा हायवेवर हिंसक आंदोलन करून प्रवाशांना लुटणाऱ्या सात ते आठ जणांना पोलिसांनी पाडळी येथून ताब्यात घेतल्याचे समजते. रविवारी झालेल्या आंदोलनाविरोधात ग्रामीण पोलिसांनी दोनशेपेक्षा अधिक आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

स्टीकर्स, लोगो पाहून वाहने लक्ष्य

विशिष्ट समाजाची ओळख म्हणून वापरत असलेल्या स्टीकर्स अथवा लोगो पाहून दोन्ही बाजूंच्या आंदोलनकर्त्यांकडून वाहनांना लक्ष्य केले जात आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी सांगितले, की वाहनावर कोणत्याही स्वरूपाचे स्टीकर्स अथवा लोगो लावणे हेच बेकायदा आहे. आता आमचे लक्ष्य कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे असून, त्यानंतर अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.

दसरा सणावर दहशतीचे सावट

दसरा आणि आनंदाला तोटा असे म्हटले जाते. मात्र, यंदाच्या दसऱ्यावर दहशतीचे सावट कायम असून, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंगळवारी संचलन, तसेच बौद्ध धम्मप्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत या उत्साहावर दहशतीचे सावट असून, शहरातील आर्थिक उलाढालीलाही यामुळे ब्रेक लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तश्रृंगी गडावर चुकून गोळीबार; ८ जखमी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिक येथील सप्तश्रृंगी गडावर बोकडबळी दिला जात असताना एका सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून अपघातानं झालेल्या गोळीबारात आठ सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वणी व कळवण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विजयादशमीच्या निमित्तानं सप्तशृंगी गडावर प्रतिवर्षी बोकडबळी दिला जातो. बोकडबळी देताना सुरक्षारक्षक हवेत गोळीबार करतात. गोळ्यांच्या फैरींबरोबरच बोकडाची मान एका घावात उडवली जाते, अशी प्रथा आहे. आजही सालाबादप्रमाणे बोकडबळीसाठी सुरक्षारक्षक १२ बोअर रायफलमध्ये राउंड लोड करून उभा होता. त्याचवेळी गर्दीतील एकाचा धक्का लागल्यानं बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी वरच्या छपराला धडकली आणि उडालेले छर्रे लागून ८ सुरक्षारक्षक जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी यांनी तात्काळ जखमींना वणी व कळवण ग्रामीण रुग्णालयात हलवले. या घटनेनंतर दर्शन सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवल्या जाऊ नये, असं आवाहन सप्तशृंगी गडाच्या विश्वस्तांनी केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images