October 15, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
जेलरोडला ऐन परीक्षांच्या काळात रोडरोमिओंनी शाळेच्या मुलींना टारगेट करून त्यांची छेडछाड सुरू केली आहे. त्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली असून रोड रोमिओंवर कारवाईची मागणी केली आहे. परिसरात र. ज. बिटको, कोठारी कन्या, के. एन. केला, के. जे. मेहता, होली फ्लावर आदी मोठ्या शाळा आहेत. सध्या परीक्षांचे दिवस सुरू असल्याने मुली परीक्षेला जाताना रोडरोमिओ गल्लीतील कॉर्नरला, शाळेजवळ किंवा निर्जन रस्त्यावर बसून त्यांची छेड काढतात. बेस्ट ऑफ लक देण्याच्या नावाखाली मुलींना त्रास देतात.
इमोशनल ब्लॅकमेलिंग
यामध्ये मुलांनी दबाव टाकून इमोशनल ब्लॅकमेल केले असल्याने मुली घरीही लवकर घडलेला प्रकार सांगत नाहीत. नंतर मुले छळ करू लागल्यावर आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर जाहीर वाच्यता होते. तेव्हा पालकांना खरी गोष्ट माहिती पडते. पोलिसांची कटकट नको म्हणून तडजोड करण्याची पालकांची मनोवृत्ती असल्याने रोडरोमिओंचे फावते.
तीन महिन्यांपूर्वी जेलरोडच्या आरंभ शाळेसमोर शालेय मुलांचे गॅंगवार झाले होते. मुलगा-मुलगी रस्त्यावर बोलत बसलेले असताना नागरिकांनी हटकल्यावर त्यांना घरात घुसून दमदाटी करण्यासही रोडरोमिओ मागे-पुढे पहात नाहीत. चार महिन्यांपूर्वीही करन्सी प्रेसच्या शेजारी उभ्या युवा जोडप्याला हटकल्यानंतर युवकाने रात्री टोळके आणून मारहाण केली होती. त्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रकारांनंतर पोलिसांनी यावर वचक निर्माण करत यांना आळा घालणे आता आवश्यक झाले आहे. नाशिकरोड आणि उपनगरच्या पोलिसांनी शाळा परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर गस्त घालावी, अशी मागणीही पालक व शाळांनी केली आहे.
नाशिकरोड, जेलरोडच्या शाळा परिसरांमध्ये रोडरोमिओंचा जाच शाळा सुरू झाल्यावर होतो. त्यांच्या जाचाला कायमचा आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. पालकांनीही न घाबरता पोलिसांना साथ दिल्यास निर्भय वातावरण होईल.
शाम गोहाड, मनविसे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 15, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, निफाड
येथील नांदुर्डी रोडवरील वस्तीतील एक शेळी बिबट्याने शनिवारी पहाटे फस्त केली. सुरेश जाधव हे नांदुर्डी रोडवर असलेल्या रेल्वे गेटजवळील त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराजवळ बांधलेल्या गोठ्यात दोन गायी, दोन वासरे, एक शेळी बांधलेली होती. शुक्रवारी रात्री ११ ते १२ च्या सुमारास बिबट्याने या गोठ्याच्या भिंतीवरून उडी शेळीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. शनिवारी सकाळी जाधव यांना बिबट्याने शेळीला ठार केल्याचे लक्षात आले. त्यांनी ही घटना येवला वनविभागाला कळवली. वनरक्षक विजय टेकणर, वन सेवक दिलीप अहिरे, विजय लोंढे, भय्या शेख हे तातडीने घटनास्थळी गेले व पंचनामा केला.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. तसेच वांरवार हानी पोहोचविणाऱ्या या वन्य हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
निफाड तालुक्यात कोळवाडी रोड, नांदुर्डी रोड, सोनेवाडी रोड परिसरातील शेती क्षेत्राच्या भागात काही महिन्यांपासून बिबट्यांनी थैमान घातला आहे. अधूनमधून ह बिबटे शेतकऱ्यांना दर्शन देत असल्याने या भागातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने जास्तीचे पिंजरे लावावेत, अशी मागणी निफाडचे नगरसेवक मुकुंद होळकर यांनी केली आहे. गेल्या काह महिन्यांमध्ये बिबट्याने अनेकदा थैमान घातले असून वस्तीवर राहणाऱ्यांमध्ये भीती पसरविली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 15, 2016, 3:15 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तळेगाव प्रकरणी केलेले वक्तव्य चुकीचे असून, असे वक्तव्य त्यांनी करायला नको होते. बलात्काराचा प्रयत्न करणे आणि बलात्कार हा एकच प्रकार आहे. त्यामुळे त्याला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. तळेगावच्या प्रकरणावरून शिवसेना व भाजपात राजकारण सुरू झाले आहे. युतीच्या नेत्यांनी या प्रकरणात राजकारण न करता समाजकारण करावे असा टोला आठवले नाशिक दौ-यावेळी लगावला.
...तर भाजपसोबतच युती
आगामी दहा महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांनी एकत्र येणे गरजेचे आहेे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. लवकरच शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचीही भेट आपण घेणार आहोत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होऊ द्यायचा नसेल, तर महायुती होणे गरजेचे आहे. मात्र काही कारणास्तव युती तुटलीच, तर भाजपसोबत आमची युती कायम राहील, असे स्पष्टीकरणही आठवले यांनी दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात निर्माण झालेली दंगलसदृश परिस्थिती निवळल्याने संवेदनशील सात गावांमधील संचारबंदी रविवारी सकाळी मागे घेण्यात आली. गेले पाच दिवस बंदीस्त जीवन जगणाऱ्या गावकऱ्यांनी रविवारी मोकळा श्वास घेतला. गावांमधील जनजीवन पूर्वपदावर आले असून, परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी म्हणून संवेदनशील गावांमध्ये पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
तळेगाव अंजनेरी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर इगतपुरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी दगडफेक, तसेच वाहन जाळपोळीचे प्रकारही घडले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्ह्यातील नऊ संवेदनशील गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी घेतला होता. बारा ऑक्टोबरपासून ही संचारबंदी लागू करण्यात आली होती. सुरुवातीला ४८ तासांसाठी म्हणजेच शुक्रवारी दुपारी बारापर्यंत संचारबंदी लागू राहणार होती. विल्होळी येथील तणाव निवळल्याने शुक्रवारी दुपारनंतर तेथील संचारबंदी मागे घेण्यात आली. मात्र, उर्वरीत आठ गावांमध्ये ती कायम ठेवण्यात आली. संवेदनशील गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याने ग्रामीण पोलिसांच्या विनंतीनुसार जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी वाढविला. शनिवारी शेवगेडांग येथील संचारबंदी मागे घेण्यात आली. उर्वरित गावांमध्ये ती दिवसभर काहीशी शिथिल करण्यात आली. मात्र, सायंकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा अशा १२ तासांसाठी वाडिवऱ्हे, तळेगाव, तळवाडे, महिरावणी, सांझेगाव, गोंदे आणि अंजनेरी या गावांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली होती. रविवारी सकाळी सहानंतर संचारबंदी शिथिल करण्यात आली. दुपारनंतर ती पूर्णत: मागे घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, या संवेदनशील गावांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तेथे पोलिस बंदोबस्त राहणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. वाहतूकही सुरळीत सुरू आहे. संवेदनशील सर्व गावांमधील संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या गावांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे.
- अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक
विल्होळी, शेवगेडांग ही गावे वगळता अन्य सात संवेदनशील गावांमध्ये रविवारी सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू होती. संचारबंदीचा कालावधी वाढविण्याबाबत पोलिसांकडून विनंती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रविवारी सकाळपासून गावांमध्ये संचारबंदी शिथिल झाली आहे.
- राहुल पाटील, प्रांताधिकारी इगतपुरी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कोजागिरीच्या तेजोमयी चंद्रास साक्षी ठेवून एकाच व्यासपीठावर दोन दिग्गज कवींचा संवाद बहरत गेला अन् ‘शब्दांच्या पलिकडले’ या कार्यक्रमास नवा अर्थ आला.
असेच काहीसे चित्र होते ते गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानात आयोजित ‘शब्दांच्या पलिकडले’ या शब्दमयी कार्यक्रमाचे. दिशा फाऊंडेशन आणि भाजपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दोन दिग्गज कवी सौमित्र आणि गुरूदेव ठाकूर यांच्या शब्दांची जुगलबंदी श्रोत्यांना ऐकावयास मिळाली.
प्रतिभासंपन्न माणसांच्या अभिव्यक्तीमागील प्रेरणा कोणती असावी, अशा काहीशा अनोख्या संकल्पनेची निवड कवी सौमित्र आणि कवी गुरू ठाकूर यांनी करत हा कार्यक्रम नाशिककरांसाठी नाशिकमध्ये पहिल्यांदाच सादर केला. ‘रसिक हो रंग चढू दे ...’ ही नटरंग चित्रपटातील नांदी दमदारपणे सादर करत या कार्यक्रमास सुरूवात झाली. तोच कवी सौमित्र तथा किशोर कदम यांना त्यांच्या शब्द सुचण्याविषयीचा एक प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले ,
‘पहाटेस तांबडे फुटावे, तसे कुणाला शब्द सुचावे,
कधी शुभ्र आभाळ बोलते, कधी मनाशी तेच दाटते ,
कधी मृगाचे जलद भरावे, तसे कुणाला शब्द सुचावे’
स्फूर्तीमागची प्रेरणा त्यांनी कवीतेतच मांडून चेंडू गुरू ठाकूरांच्या कोर्टात टोलावला. त्यावर गुरू ठाकूर उत्तरले,
‘तुझा स्पर्श झाला असा जीवनाला,
जणू लाभले पंख वेड्या मनाला,
रित्या ओंजळीला दिले तूच तारे,
मलाही न कळले कसे गीत झाले !’
अशा दोन दिग्गजांमध्ये रंगलेल्या शब्द जुगलबंदीने कार्यक्रम बहरत गेला. सुरूवातीस दिशा फाऊंडेशनच्या वतीने स्वाती भामरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आमदार देवयानी फरांदे, सीमा पवार, विद्युल्लता गद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कलावंतांच्या वतीने नाटककार दत्ता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर कवी गुरू ठाकूर आणि कवी सौमित्र यांच्या जुगलबंदीस निवेदन व गायनातून योगिता चितळे, की-बोर्डवर प्रशांत महाले, गायक म्हणून नचिकेत देसाई, तबल्यावर गौरव तांबे, ऑक्टोपॅडवर उमेश खैरनार यांनी साथ दिली. ध्वनीव्यवस्था पराग जोशी यांनी पाहिली. रसिकांचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 16, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
निफाड साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्जाची हमी घेऊन कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मागणी करण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ विधीज्ञ व निफाड कारखान्याचे सभासद अॅड. दौलतराव घुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वाताहतीस जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असून, निफाड पोलिस स्टेशनमध्ये लेखा परीक्षकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविला होता. तथापि या ३१ आरोपींमध्ये जिल्हा बॅँकेचे संचालक आमदार असल्याने त्यांच्यावर पुढे कोणतीही कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे या गैरव्यवहाराची माहिती येत्या १८ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सादर केली जाणार असल्याचेही घुमरे म्हणाले.
या गुन्ह्याबाबत तपशील देताना ते म्हणाले की, ५ जुलै २००७ रोजी गुन्हा रजि नं ७६-२००७ याअन्वये विशेष लेखा परीक्षक रवींद्र वाघ यांनी फिर्याद दिली आहे. भादंवि ४२०, ४०८, ४०९, ४६५, १२० ब अन्वये गुन्हा दाखल होता. परंतु कुठलाही तपास झाला नाही. जिल्हा बँकेने व्यापाऱ्यांकडून १२८ चेक घेतले ते चेक निफाड कारखान्याच्या खात्यावर वटविण्यात आले नाही. ते चेक ७-८ महिने बँकेत पडून होते. त्यामुळे साखर विक्रीचे पैसे जिल्हा बॅँकेला न दिल्याने निफाड कारखान्याचे कर्ज व त्यावरील व्याज वाढतच राहिले, असेही घुमरे यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
‘विज्ञानातील संशोधनावर जगातील प्रगत देश विशेष तरतूद करताना दिसत आहेत. या तुलनेत भारताची या विषयावरील तरतूद ही अत्यल्प आहे. ही खंतावणारी बाब असली तरीही नॅनो मटेरिअलसारख्या जगाच्या मुख्य प्रवाहातील विषयात भारत जगातील पहिल्या दहा प्रगत देशांच्या स्पर्धेत आहे ’ , या मुद्द्याकडे कोरिया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. डी. पी. अंमळनेरकर यांनी लक्ष वेधले.
चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या कर्मवीर आबड, लोढा व जैन आर्ट , कॉमर्स व सायन्स कॉलेजात ‘नॅनो मटेरिअल इम्पॅरिटिव्ह अॅण्ड न्यू मिलेनियम’या भौतिकशास्त्र विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी डॉ.अंमळनेरकर यांनी बीजभाषण करताना भूमिका मांडली.
ते म्हणाले, कोरियाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी ४.५ टक्के रक्कम केवळ संशोधनावर खर्च केली जाते. तर भारतात हेच प्रमाण अवघे ०.८२ टक्के आहे. परिणामी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ६६ व्या क्रमांकावर येतो. तर कोरियाचा या यादीत अकरावा क्रमांक लागतो.
या परिषदेच्या अध्यक्षपदी संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा उपस्थित होते. डॉ. जी. एच. जैन यांनी प्रास्ताविक केले.
भारताच्या संरक्षण व संशोधन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. मुनीरत्नम यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ तंत्रज्ञानाची सांगड जीवनाशी घातली पाहिजे. सद्यस्थितीत स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होऊन त्यांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढीला लागला आहे. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे. यासारख्या आव्हानावर प्रभावी उपचार पध्दती शोधण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा काय उपयोग होऊ शकतो , यासारख्या दृष्टीने केलेले संशोधन मानवजातीस उपकारक ठरेल.
यावेळी डॉ. गणेश पाटील यांनी संपादीत केलेल्या ‘नॅनो मटेरिअल’ या विषयावरील ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
कुरुडगाव शाळेच्या भेटीत शिक्षण सचिवांचे प्रतिपादन
म. टा. वृत्तसेवा, निफाड
सरकार चालवत असलेल्या सर्व शाळांना येत्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जा देणार असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्यातील २८६ शिक्षकांनी स्वखर्चाने सिंगापूर येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली. ते कुरुडगाव (ता. निफाड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यालयातील ज्ञानरचनावाद आणि शिक्षण पद्धत जाणून घेतली.
शिक्षण विभागाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्यासाठीची कारवाई सुरू झाली असून त्यासाठी राज्यातील शंभर शाळांची निवड करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात या शंभर शाळांना हा दर्जा प्राप्त करून दिल्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित सर्व शाळाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली.
राज्यातील सरकारी शाळांची शैक्षणिक प्रगती मागील वर्षाच्या तुलनेत सुधारत असून पुढील दोन वर्षांत ही प्रगती शंभर टक्के होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्ञानरचना वाद शिक्षण पद्धतीत सुधारणा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत मुलांना फळ्यावर लिहिलेल्या शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष जीवनात लागणारे शिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिक्षण अधिकारी आहीरे, पंचायत समिती सभापती सुभाष कराड, पंढरीनाथ थोरे, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, स्नेहा शिरोरे आदींसह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जातीव्यवस्था ही समाजव्यवस्थेला लागलेली कीड असून, ती जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत जात निर्मूलन होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके यांनी केले. बौध्द साहित्य प्रसार केंद्राच्या वतीने आयोजित धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.
कालिदास कलामंदिरात ‘जातीचे निर्मूलन काळाची गरज’या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भीम स्मृतीगीताने झाली. यावेळी बौध्द साहित्य प्रसार केंद्राचे अध्यक्ष अतुल भोसेकर, शामराव विठ्ठल बॅँकेचे संचालक रवी पगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नरके पुढे म्हणाले की, शाहू-फुले-आंबेडकरांची साहित्य संपदा प्रत्येकाच्या घरात आहे. मात्र, ती शोकेसमध्ये आहे. तिचे जोपर्यंत वाचन होऊन आचरण होणार नाही, तोपर्यंत समाज परिवर्तन होणार नाही. शाहू-फुले-आंबेडकरांनी जातीव्यवस्था नष्ट व्हावी म्हणून सवार्थाने प्रयत्न केले. बाबासाहेबांच्या प्रत्येक ग्रंथात समाज व्यवस्थेचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी भेदभावाच्या चार जागा समाजाला दाखवून दिल्या. या चार जागा नष्ट झाल्याशिवाय समाजातील भेदभाव नष्ट होणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. जोपर्यंत स्त्री-पुरुष हा लिंगभेद नष्ट होत नाही, तोपर्यंत जातीनिर्मूलन होणार नाही. भारतात ४ हजार ६३५ जाती आहेत. त्यातील प्रत्येक जातीला साडेबारा पोटजाती आहेत. ही जात शिडीसारखी आहे. प्रत्येक जात हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. त्यामुळे भारतात ४ हजार राष्ट्र आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचप्रमाणे गरीब आणि श्रीमंत असे वर्ग आहेत, ते नष्ट झाले पाहिजे. धर्म ही संकल्पनादेखील नष्ट होणे गरजेचे आहे. हा धर्म शोषणाला मान्यता देत असतो. जगातील २२० देशांमध्ये स्त्रियांना समान संधी देण्यात भारत १०५व्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. जातीव्यवस्था नष्ट करायची असेल, तर शिक्षणाला महत्व देणे गरजेचे आहे. संपत्तीची निर्मिती ही कौशल्यावर आधारित असली पाहिजे. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाह झाले तर जातीय व्यवस्था नष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रास्ताविक अतुल भोसकर यांनी केले. दोन दिवसीय विचारमनंथनाचा समारोप प्रयोगशील विद्यार्थी निर्मित ‘जातीचे निर्मूलन’ या नाट्यअभिवाचनाने झाला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 16, 2016, 3:30 pm
जिल्हा सहकारी संघाच्या विशेष सभेत एकमताने मंजुरी
म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे भाग भांडवल वाढविण्याबाबतचा ठराव मालेगाव येथे झालेल्या जिल्हा संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव संर्वसंमतीने करण्यात आल्याने जिल्ह्यातील संस्था, विविध कार्यकारी सोसायटी व इतरही संस्थांना जिल्हा संघाचे सभासद होण्याची संधी मिळणार आहे. यासाबरोबरच जिल्हा संघाच्या भाग भांडवलात मोठी वाढ होऊन व्यवहाराची व्याप्तीही यामुळे वाढणार आहे.
नाशिक जिल्हा कृषी औद्यागिक संघाचे जाळे जिल्हाभर पसरवण्याच्या हेतूने व संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेतोपयोगी वस्तू मिळवून देण्यासाठी चेअरमन अद्वय हिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. येथील सयाजीराव गायकवाड कॉलेजच्या सभागृहात ही सभा झाली. या वेळी व्हाइस चेअरमन संदीप गुळवे, संचालक बापूसाहेब कवडे, राजेंद्र डोखळे, शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.
यावेळी अद्वय हिरे यांनी, जिल्हा संघाची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगत, सध्याला संघाला वार्षिक एक कोटी नफा मिळत असल्याची माहिती दिली. संघाच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे या हेतूने संघाची भाग भांडवल मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला असून सभासदांच्या पाठबळामुळे याला मंजुरी देण्यात आली, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या निर्णयानंतर जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी संघाची शाखा स्थापन करून शेतकऱ्यांसाठी अल्पदरात खत, बियाणे, पत्रे, पाइप व उपयोगी वस्तू दिल्या जाणार आहे, असे अद्वय हिरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी मालेगाव शाखेच्या गोदामाचे उद््घाटनही करण्यात आले. सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन दिलीप गाडेकर यांनी केले. तर आभार प्रमोद गडाख यांनी मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
आनंदी संखी मंचच्यावतीने प्रदर्शन
म. टा. प्रतिनिधी, सातपूर
गंगापूररोड भागातील पाइपलाइन रोडला असलेल्या नक्षत्र लॉन्स येथे आनंदी सखी मंचच्यावतीने दीपावली पदार्थांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आमदार सीमा हिरे, नगरसेवक विक्रांत मते यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रदर्शनात विविध ठेवण्यात आलेल्या पदार्थ खरेदीचा आनंद महिलांनी लुटला.
आनंदी सखी मंचच्या सदस्यांनी दिवाळी सणाच्या पदार्थांच्या विक्रीसाठी खास व्यवस्था महिलांना उपलब्ध करून दिली असल्याचे आमदार सीमा हिरे यावेळी म्हणाल्या. तर नगरसेवक मते यांनी महिलांनी दिवाळीच्या सणासाठी तयार केलेल्या वस्तूंना त्यात फराळ व घरसजावटीच्या वस्तूंना योग्य
व्यासपीठ उपलब्ध झाल्याने नक्कीच त्याचा फायदा महिलांना होणार असल्याचे सांगितले. दरवर्षी दिवाळी सणाच्या अगोदर महिलांनी तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी आनंदी सखी मंच पुढाकार घेत असल्याचे अध्यक्षा साधना गिलालकर यांनी सांगितले. याप्रसंगी फ्रवशीच्या व्हाईस चेअरपर्सन शर्वरी लथ, माजी नगरसेवक अरूण काळे, मंचच्या सदस्या सीमा पछाडे, आदिती अग्रवाल, प्रभा तालीकोट यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
यात दीपावली सणाच्या अगोदर महिलांनी सणासाठी तयार केलेले विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. पाइपलाइन रोड येथील नक्षत्र लॉन्स येथे नुकतेच महिलांना दिवाळी सणात तयार करण्यात आलेल्या पदार्थांना बाजार पेठ उपलब्ध व्हावी, हा हेतू प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीच्या अगदी मधोमध महापालिकेने रुग्णालयासाठी जागा आरक्षित केली आहे. परंतु कोट्यवधी रुपयांचे बाजारमूल्य असलेली जागा रुग्णालयाअभावी पडून आहे. याबाबत प्रभागाचे नगरसेवकांनी या जागेवर कामगार, कष्टकरी वर्गासाठी रुग्णालय उभारावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. अनेक वर्षांपासून आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्यास यास जबाबदार कोण असा सवालही नगरसेवक सचिन भोर यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहर विकासाच्या दृष्टीकोनातून सहाही विभागात भूसंपादन केल्यानंतर आरक्षणे टाकण्यात आली होती. परंतु वीस वर्षांहून अधिक काळापासून आरक्षित असलेली करोडोंची आरक्षित जागा रुग्णालयाअभावी पडून आहे. दरम्यान प्रभाग ५० चे नगरसेवक भोर यांनी आरक्षित असलेल्या रुग्णालयाच्या जागेवर महापालिकेने अद्ययावत रुग्णालय उभारावे अशी मागणी महापालिकेकडे केली होती.
रुग्णालयासाठी आरक्षित जागेची पाहणी महापालिकेचे माजी आयुक्त संजय खंदारे यांनी केली होती. यानंतर माजी आयुक्त खंदारे यांनी प्रस्तावदेखील सादर करण्याचे सुचवले होते. याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करूनही रुग्णालयाची जागा पडून आहे.
सचिन भोर, नगरसेवक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
विविध प्रकारच्या रंगीत कागदांची विशिष्ट आकारात केलेली कटिंग, त्यांना आकार देत त्यांची केलेली जोडणी, त्यातून आकार घेत असलेली विविध फुले स्वतःच्या हाताने तयार करण्याचा होणारा आनंद मटा क्लचरल सभासदांच्या महिला आणि युवतींनी घेतला. विविध प्रकारची आर्टिफिशिअल फुले तयार करण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वतःच्या हाताने आकर्षक फुले बनविण्याचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.
देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या दुर्गा मंगल कार्यालय यासाठी व्हेन्यू पार्टनर होते. या कार्यशाळेत पुणे येथील उमा सरपोद्दार यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने कागदांपासून फुले कशी बनवायचे याची माहिती दिली. त्यासाठी ड्युप्लेक्स, क्रेप, टिशू पेपर यांचा वापर करून जर्बेरा, क्रिस्टल, कार्नेशियन, गुलाब ही फुले बनविण्यात आले.
यावेळी फुले तयार करण्यासाठी कोणत्या पेपरचा वापर करायचा. कैचीच्या सहाय्याने कशा प्रकारे काप घ्यायचे, ते कसे चिटकवायचे, फुलाची दांडी तारेच्या सहाय्याने कशी बनवायची. साध्या वस्तूंचा सहजतेने वापर करण्याचे कौशल्य सहभागींनी आत्मसात केले. फुलांचा आकार साकारत असताना ते बनविणाऱ्यांची आनंद ओसंडून वाहत होता. बनविलेल्या फुले कशी झाली हे एकमेकांना दाखवित प्रशंसा मिळवित होते.
दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या या फुले बनविण्याच्या प्रशिक्षण वर्गातून आपणही आपल्या कल्पनेतील फुले बनवू शकतो. असा आत्मविश्वास सहभागी झालेल्या महिला आणि युवतींना मिळाला. यंदा दिवाळीत सजावट करण्यासाठी स्वतः बनविलेल्या फुलांचा उपयोग करण्याचा संकल्पही त्यांनी महिलांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 16, 2016, 3:30 pm
भंगार बाजाराची नोंदणी झाली, पुढे काय?
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
नाशिक महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेल्या भंगार बाजाराची चौथ्यांदा महापालिकेने नोंदणी केली आहे. यात भंगार बाजाराची नोंदणी झाली पुढे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भंगार बाजाराचा निर्णय कधी लागणार असा सवाल नाशिककरांसह उद्योजकांकडूनदेखील उपस्थित केल जात आहे.
सातपूरला नगरपालिका असताना नंदिनी नदीकिनारी भंगाराची दुकाने थाटण्यात आली होती. यानंतर सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत कारखान्यांचे मोठे जाळे पसरले होते.
यात रहिवाशी भाग असलेल्या अंबड-लिंकरोडवर सर्वाधिक भंगारांची अनधिकृत दुकाने थाटण्यात आली होती. परंतु आर्थिक देवाणघेवाणीतून आजतागायत अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न सुटलेला नाही. महापालिकेने तब्बल चारवेळा दुकानांचे रेखांकन केले आहे. दरवेळी शेकडोने दुकानांची संख्या वाढली असल्याचे समोर आले.
नगरसेवकांचाही पाठपुरावा
भंगार बाजार हटवावा यासाठी नगरसेवक दिनकर पाटील, माजी नगरसेविका अॅड. वसुधा कराड, माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी अनेकदा आंदोलने केली. परंतु महापालिकेने केवळ पोलिस संरक्षण मिळत नसल्याचे कारण सांगत चालढकल केली. आता यावर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नवीन रेखांकन केल्यानंतर तरी अनधिकृत भंगार बाजार हटवावा, अशी मागणी जोर धरत आहे.
अंबड-लिंकरोडवर नागरी वसाहतींच्या जागेवर अनधिकृतपणे वसलेल्या भंगार बाजारात एकाच मालकाने स्वतःचे दुकान ठेवत इतर जागा दुसऱ्या भंगार व्यावसायिकांना भाड्याने दिल्या आहेत. यात माजी नगरसेवकांचेदेखील भंगार दुकानांना जागा भाड्याने दिल्याचे समोर आले आहे.
उद्योगांचे काम होते भंगार बाजारात
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना एमआयडीसीकडून भूखंड नसल्याचे सांगितले जाते. परंतु अनाधिकृत भंगार बाजारात कारखान्यांमध्ये लागणाऱ्या सुटे पार्टचे काम घेतले जाते. यामुळे केवळ भंगाराचीच दुकाने नव्हे तर उद्योगांचे काम आता भंगार बाजारात अनेकांनी सुरू केले आहे. विशेष म्हणजे महागड्या अशा लेथ मशिनच्या सहाय्याने भंगार बाजारात कारखान्यांना लागणारे सुटे पार्ट बनविण्याचे काम घेतले जाते.
भंगार बाजाराबाबत अनेकदा महापालिका व पोलिस प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. परंतु महापालिका व पोलिस प्रशासन यांच्यात एकमत होत नसल्याने भंगारांची दुकाने दिवसागणिक वाढलेली पहायला मिळतात. महापालिका आयुक्तांनी अनधिकृत भंगार बाजाराबाबत गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
- दिलीप दातीर, माजी नगरसेवक
एमआयडीसीत भूखंड घेतल्यावर सरकारच्या अनेक परवानग्या घेऊन कारखाना सुरू करावा लागतो. परंतु भंगार बाजारात कारखान्यांचे सुटे पार्ट बनविण्याचे उद्योग बिनदिक्कतपणे सुरू आहेत. यामागे शासन व विविध कर गोळा करणारे विभाग करतात काय हा आमचा सवाल आहे.
- सुधाकर देशमुख, उद्योजक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
मनपा आयुक्त, नगरसेवकांचे मौन; चौकशी संथ गतीने
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
मुक्तिधाम येथे वाहन पार्किंगचा बोगस ठेका चालवून पालिकेला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या बोगस ठेकेदाराने केलेला पार्किंग कर घोटाळा ‘मटा’ ने उजेडात आणला होता. मात्र त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधारापर्यंत पोलिस व मनपा प्रशासन पोहचले नाही. यामुळे या सर्व घोटाळ्यावर आता पांघरुण घातले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्त तसेच लोकप्रतिनिधीही यामध्ये बघ्याची भूमिका घेतली आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात मुक्तिधाम येथे पार्किंग कर वसुलीचा बोगस ठेका कार्यरत असल्याचा प्रकार ‘मटा’ ने उघडकीस आणला होता. यानंतर महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. शहरातील मुक्तिधाम येथे देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक दर्शनसाठी येत असतात. पालिकेकडून पार्किंग करापोटी येणाऱ्या भाविकांकडून प्रत्येक तासासाठी प्रत्यक्षात १५० ते २०० रुपये वसूल केले जात होते. विशेष म्हणजे तशी पालिकेच्या नावाची छापील पावतीही भाविकांना दिली जात होती.
प्रत्यक्षात मात्र महापालिका प्रशासनाने येथे पार्किंग कर वसुलीचा ठेका कुणालाही दिलेला नव्हता. असे असतानाही येथे बोगस पार्किंग कर वसुलीचा ठेका सर्रासपणे सुरूच होता. या पार्किंग घोटाळ्याबाबत उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्या आदेशानुसार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्याचा तपास अद्यापही जागेवरच आहे. दक्ष अधिकारी व कर्मचारी या पोलिस ठाण्यात असूनही घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध लागलेला नाही. याचेच परिसरातील नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.
आयुक्तांची बघ्याची भूमिका
या घोटाळ्याचे पुरावे महापालिका प्रशासनाला प्राप्त होऊनही दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी ही जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर टाकण्यात आली. यावरून पालिका प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेतल्याचे एका अर्थाने स्पष्टच झाले. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा बचावच केला आहे. याशिवाय पालिकेच्या नावाखाली लाखो रुपयांची माया जमवून पालिकेची बदनामी व आर्थिक नुकसान झाल्याचे उजेडात येऊनही अद्याप नाशिकरोड प्रभागातील २४ पैकी एकाही नगरसेवकाने या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविण्याचे धाडस केले नाही. किंवा पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची तसदीही घेतली नाही.
या प्रकरणी आयुक्तांनी मलाच नोटीस दिली होती. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल असून पोलिसांना आम्ही सहकार्य करित आहोत. परंतु या प्रकरणी हाती काही लागल्याचे पोलिसांकडून समजलेले नाही.
-रोहिदास बहिरम, उपायुक्त
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 16, 2016, 3:30 pm
तळेगाव घटनेनंतर जनजीवन पूर्वपदावर; पीडित कुटुंबांना मदत
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
तळेगावात दुर्देवी घटना घडली आणि सोबत काम करणारे, एकत्र फिरणारे एकमेकांचे हाडवैरी झाले. तब्बल सहापेक्षा अधिक दिवस दहशतीत गेले. सध्या, जीवाच्या भीतीने मिळेल ती वाट पकडून शहराच्या दिशेने गेलेल्या कुटुंबांना परत आणून त्यांचा अस्तव्यस्त संसार उभा करण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे काम सुरू आहे. साफसफाई करण्याबरोबर सदर कुटुंबाना उभे राहण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असून, कायदा व सुव्यवस्था कायम झाली असल्याचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास समोर आली. यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावे, वाड्या दहशतीच्या छायेत लोटली गेली. कायदा व सुव्यवस्था कायम करता करता आठ दिवस लोटले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडलेल्या अनेक घटनांना तर वाचाही फुटलेली नाही. रात्रीच्या काळोखात त्या दडपल्या गेल्या. अनेक कुटुंबांनी जीवाच्या भीतीने स्थलांतर केले. आता संचारबंदी हटवण्यात आली असून, गावा-वाड्यांमधील दैनंदिन कामकाज सुरू झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा अजूनही या परिसरात तैनात आहे. पोलिस दंगलीचा फटका बसलेल्या कुटुंबाना सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत बोलताना पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले की, नागरिकांनी पोलिसांच्या संपर्कात राहावे. काही माहिती द्यायची असल्यास किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधवा. संचारबंदी हटविण्यात आल्यानंतर घर सोडून गेलेल्या कुटुंबांना परत आणण्याचे काम सुरू आहे. साफसफाईपासून अगदी घरातील भांडे लावण्यापर्यंत पोलिस सदर कुटुंबांना सहकार्य करीत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दसऱ्यादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असल्याने अनेक कुटुंबांनी देवी विसर्जन केलेले नव्हते. त्यामुळे गावांमधील सर्व समाजाच्या व्यक्तींची कमिटी बनवून त्यांची बैठक घेत हे कार्य पार पाडण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जनजीवन पूर्ववत झाले आहे. पोलिस कर्मचारी तैनात असून, ते पीडित कुटुंबांना मदत करीत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. काही शंका असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधवा.
- अकुंश शिंदे, पोलिस अधीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2016, 3:30 pm
म. टा प्रतिनिधी, नाशिक
केबल व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटायजेशनची प्रक्रीया सरकारने सुरू केली असून, नाशिक शहरासह मोठी गावे आणि नगरपालिका हद्दीत सेट टॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आले आहेत. आता फेज ४ अंतर्गत ग्रामीण भागात डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०१६ ही त्यासाठी अखेरची मुदत असून, अडीच महिन्यांत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे दीड लाख सेट टॉप बॉक्स बसविण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे.
धकाधकीच्या जीवनात काही क्षण विरंगुळ्याचे मिळावेत यासाठी मनोरंजन ही गरज बनू पहात आहे. केबलद्वारे वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचे पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात. मात्र अशा ग्राहकांची नेमकी संख्या आणि प्राप्त होणारा महसूल यांचा ताळमेळ बसत नसल्याने सरकारचा महसूल बुडत होता. ग्राहकांची खरी आकडेवारी समोर यावी आणि सरकारचा करमणूक कर चुकविणाऱ्यांना लगाम बसावा यासाठी सरकारने केबल डिजीटायजेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केबलचा वापर करणाऱ्या संबंधित ग्राहकांना सेट टॉप बॉक्सची सक्ती करण्यात आली आहे. केबल ग्राहकांची नेमकी आकडेवारी थेट सरकारकडे नोंद होण्यास त्यामुळे मदत होत आहे. जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये फेज ३ अंतर्गत सेट टॉप बॉक्स बसवण्यात आले आहेत. नाशिक शहरात ८० टक्के, धुळ्यात ७०.८३ टक्के, नंदुरबार आणि अहमदनगर शहरात १०० टक्के तर जळगावात ६५.३७ टक्के सेटटॉप बॉक्स बसविण्यात आले आहेत. नाशिक विभागात सरासरी ८२.२१ टक्के केबल डिजीटायजेशनचे काम झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश भागात डिजिटायझेशन पूर्ण झाल्याने आता फेज ४ अंतर्गत प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत सेट टॉप बॉक्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ ही अखेरची मुदत आहे. नाशिक विभागात १ लाख ३७ हजार ९४५ सेटटॉप बॉक्स बसविण्याचे आव्हान महसूल प्रशासन आणि केबल ऑपरेटर्ससमोर आहे. जे ग्राहक ३१ डिसेंबरपूर्वी सेटटॉप बॉक्स बसविणार नाहीत त्यांचे केबल प्रेक्षेपण बंद करण्यात येणार असल्याचे करमणूक कर विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक व धुळे जिल्हा वगळता अन्य ३ जिल्ह्यांमध्ये चवथ्या फेजमधील सेटटॉप बॉक्स बसविण्यास सुरूवात झाली आहे. नंदुरबारमध्ये एक हजार ५०, जळगावमध्ये ७३९, अहमदनगर जिल्ह्यात दोन हजार ९८४ असे एकुण ४ हजार ७७३ सेटटॉप बसविण्यात आले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 17, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, सिडको
मालकीणच्या सांगण्यावरून पत्नीने आपल्याला सोडून दिले. या गोष्टीचा राग मनात ठेवून अरविंद सुदाम लाटे याने अश्विननगर येथील अरुणा जर्नादन कापसे यांच्यावर ब्लेडने वार करीत जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. हा प्रकार घडल्यानंतर पाथर्डी फाटा येथे वाहतूक पोलिसांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी पाठलाग करून संशयित आरोपी अरविंद यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले.
अरुणा जनार्दन कापसे (वय ५८, रा. अश्विननगर) यांच्या बंगल्यात अरविंद सुदाम लाटे (वय ३२, मूळ रा. टिटवाळा) याची पत्नी काम करीत होती. मात्र काही दिवसानंतर त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली. मात्र अरविंद याने कापसे यांच्या सांगण्यावरूनच ती गेल्याचा राग मनात ठेवून अरुणा कापसे यांच्यावर ब्लेडने वार केले. यात जखमी झालेल्या कापसे यांच्या गळ्यातील सोन्याची चेनसुद्धा त्याने लंपास केली. या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्यांना समजल्यावर त्यांनी तातडीने अंबड पोलिसांना दिली. पोलिसांनासुद्धा अरविंद हा पाथर्डी फाट्याकडे पळत असल्याची माहिती मिळाली. यावेळी वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश भाले यांच्यासह वाहतूक शाखेचे कमलेश आवारे, संजय पगारे यांनाही मिळालेल्या माहितीनुसार सदर युवक पाथर्डी गावाकडे जात असल्याचे लक्षात आले. वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पाथर्डी गावाजवळील एका हॉटेलजवळून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे सोन्याची चेन आढळून आली. त्यांनी तातडीने त्यास अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी कापसे यांच्या फिर्यादीवरून अरविंदविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, येवला
नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी हागणदारी मुक्त शहरासाठी प्रभावीपणे राबवलेल्या योजना अन् शहरवासीयांची भरभरून मिळालेली साथ यातून येवला नगरपालिकेस राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हगणदारीमुक्त शहराचे पारितोषिक मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका सोहळ्यात हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत येवला नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात समितीने शहरातील वैयक्तिक तसेच पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी करतानाच शहरातील विविध भागातील नागरिकांशी संवाद देखील साधला होता. या सर्वेक्षणात समाधानकारक बाब समोर आल्याने सर्वेक्षण अहवालानुसार येवले शहरास हागणदारीमुक्त शहर घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हे पारितोषिक नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, उपाध्यक्ष पंकज पारख, पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ, स्वच्छता विभागाचे अभियंता सत्यवान गायकवाड व कामगार प्रमुख श्रावण जावळे यांनी स्वीकारले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
खते, कीटकनाशके खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून सबसिडी दिली जाते. सबसिडीच्या या प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता आणता यावी यासाठी केंद्र सरकारने ‘पाइंट ऑफ सेल’ हा उपक्रम हाती घेतला आहे. केंद्राच्या या पायलट प्रोजेक्टसाठी राज्यात नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून या उपक्रमाला सुरुवात होणार असून, ही सर्व प्रक्रिया आधार लिंकिंग केली जाणार आहे.
केंद्र सरकारचा दरवर्षी खते आणि कीटकनाशकांच्या सबसिडीवर कोट्यवधींचा खर्च होतो. मात्र, तरीही शेतकऱ्यांना खते व कीटकनाशके वेळेत आणि मुबलक प्रमाणात मिळतात की नाही, याबाबत ठोस माहिती उपलब्ध होत नाही. म्हणूनच सरकारने या खते वितरण प्रणालीत सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसेच राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर विभागामार्फत हा उपक्रम राबविला जाणार असून, त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे. मान्यताप्राप्त खते व कीटकनाशक विक्रेत्यांना विशिष्ट मशिन्स दिले जाणार आहेत. खते खरेदी करण्यासाठी जाताना शेतकऱ्यांनाही सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. नोंदणीकृत दुकानदारांना मशिन्स देण्यात येणार असून, सात-बारावर नोंदणी केलेल्या क्षेत्रानुसारच शेतकऱ्यांना खते व कीटकनाशके उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे आपसूकच या क्षेत्रातील अनागोंदीला चाप बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
जिल्ह्यात खते व कीटकनाशक विक्री करणारे तीन हजार ३०० दुकाने आहेत. त्यापैकी एक हजार ६०० दुकाने नोंदणीकृत असून, त्यांनाच उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केले जाणार आहे. खतांच्या विक्रीवर सरकारला नियंत्रण ठेवता येणे, तसेच खत कंपन्यांना सबसिडी देताना त्याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ९२ मंडळ अधिकारी व ४५० तलाठ्यांमार्फत या उपक्रमासाठी आधार क्रमांक जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. एकदा दुकानदारांकडील मशिन्सला हे क्रमांक जोडले की प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना खते- किटकनाशके घेतेवेळी आधार क्रमांक सांगावा लागेल. भविष्यात शेतकऱ्यांची बायोमेट्रिक नोंदणी केली जाणार असून, थंब केल्यानंतरच त्याला खते व कीटकनाशके मिळू शकतील. आपल्याकडील शेती निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान गृहीत धरून शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यावर मर्यादा नसावी, असाही या उपक्रमाचा मानस आहे.
१ नोव्हेंबरपासून प्रायोगिक तत्वावर या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. १ डिसेंबरपासून तो नियमितपणे राबविण्यात येईल. हा उपक्रम आंध्रप्रदेशात यशस्वीरित्या राबविला जात असून, त्याचाच अभ्यास करण्यासाठी कृषी तसेच राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर विभागाचे नाशिकमधील काही अधिकारी आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत.
या उपक्रमासाठी राज्यात नाशिकसह रायगडची निवड करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला तो कार्यान्वित करण्यात येणार असून, एक दोन महिन्यांत त्याचे फायदे लक्षात येतील. हा उपक्रम यशस्वी झाल्यास तो राज्यभर लागू होऊ शकेल.
-राजेश साळवे, डीआयओ एनआयसी, नाशिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧