Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बांधकामात येणार आता फेरोसिमेंट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विविध प्रकारच्या इमारती, धरणे, रस्ते, महामार्ग इत्यादी बांधकाम करण्यासाठी आता राज्य सरकार फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यासाठी एक हस्तपुस्तिका काढण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्याचे काम नाशिकच्या मेरीमध्ये होणार आहे. त्यासाठी एका समितीची स्थापनासुध्दा करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद मेरीचे चिफ इंजिनिअर रवींद्र उपासनी यांच्याकडे देण्यात आले असून, दहा सदस्यांची ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.

राज्यातील सरकारी बांधकामात ही पध्दत वापरली जाणार आहे. त्यासाठी या तंत्रज्ञानाची माहिती सर्व सरकारी अभियत्यांना व्हावी यासाठी मार्गदर्शक ठरणारी पुस्त‌िकाही नाशिकमध्ये तयार होणार आहे. त्यात फेरोसिमेंट तंत्रज्ञान, फेरोसिमेंट बांधकाम व दर विश्लेषण, पध्दती इत्यादी माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी ही समिती काम करणार आहे.

साधे-सोपे तंत्रज्ञान

विविध प्रकारच्या इमारती, धरणे, रस्ते महामार्ग इत्यादी बांधकाम करताना कुशल कारागीर अद्यावत बांधकाम साहित्य व योग्य गुण नियंत्रण यांची आवश्यकता असते. परंतु, प्रत्येक ठिकाणी या सर्वांची उपलब्धता होणे शक्य नसते. फेरोसिमेंट तंत्रज्ञान वापरल्यास या सर्व बाबींची आवश्यकता अल्प प्रमाणात असते. फेरोसिमेंट तंत्रज्ञान साधे व सोपे असून हे स्थापत्य अभियंत्यांसाठी पूरक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे बांधकाम अधिक मजबूत होऊन खर्चही वाचवता येवू शकतो.


काय आहे फेरोसिमेंट तंत्रज्ञान

फेरोसिमेंट म्हणजे लोखंडी सळ्यांच्या वेल्ड केलेल्या सांगाड्यांवर घट्ट ताणून बसविलेल्या लोखंडाच्या बारीक तारांच्या जाळ्यात दाबून भरलेले मोयक्रो काँक्र‌िट होय. जगभर पारंपरिक बांधकामाची पध्दत पूर्णपणे बदलून फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या बांधाकामाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानात आधी फ्रेमस्ट्रक्चर उभे करून त्यानंतर वीटकामाच्या भिंती उभ्या करण्याच्या एकदम विरुध्द आहे. आधी भिंती उभारुन त्यांच्या पोटात फ्रेमवर्क उभे करणे ही अत्यंत नाव‌िण्यपूर्ण पध्दत आहे.

तंत्रज्ञानाची उपयुक्तता

खडी, सिमेंट, माती, मुरुमाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यावर उपाय शोधत फेरोक्रिट तथा फेरोसिमेंटचा शोध लावण्यात आला आहे. वापरण्यास सोपे व सर्वत्र वापर होत असलेले हे तंत्रज्ञान आहे. प्रचलित आरसीसी बांधकामाला योग्य पर्यावरणपूरक पर्याय म्हणून फेरोसिमेंट तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. किफायतशीर अशा या बांधकाम पद्धतीचा प्रसार सर्वत्र वेगाने होत असून, त्यामुळे सरकारने त्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सिमेंटच्या कमी वापरामुळे कार्बनच्या उत्सरणात व लाकूड, मातीच्या विटांपासून मुक्तता होणार आहे.

फेरोसिमेंट बनवण्याचे प्रकार

फेरोसिमेंट बनविण्यास तीन प्रकारचे बांधकाम साहित्य लागते. एक सांगाडा वेल्ड करण्यासाठी लोखंडी सळ्या, दुसरे म्हणजे त्यावर बांधण्यासाठी बारीक तारांच्या जाळ्या, वेल्डमेश, चिकनमेशच्या स्वरुपात आणि तिसरे जाळ्यात दाबून भरण्यासाठी उच्च दर्जाचे घट्ट सिमेंट मॉर्टर.


तीनच कामगार लागतात

फेरोसिमेंट बनविण्यासाठी तीनच प्रकारचे कुशल कामगार लागतात. एक म्हणजे सांगाडा वेल्ड करणारा वेल्डर, दुसरा जाळ्या बांधणारा फिटर आणि तिसरा मॉर्टर भरणारा गवंडी. त्यामुळे कुशल कामगारांचा प्रश्नही या तंत्रज्ञानामुळे निकाली निघणार आहे.

समितीत नाशिकचे सहा जण

अकरा जणांच्या समितीचे अध्यक्ष मेरीतील रवींद्र उपासनी आहेत. त्यांच्याबरोबर सदस्य म्हणून नियोजन व जलविज्ञानचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मेरीचे अधीक्षक अभियंता रा. वि. श्रीगिरीवार, म. श. बेंद्र, व्ही. पी. रामगुडे व वैज्ञानिक संशोधन अधिकारी अ. शा. महिरे हे पदसिध्द सदस्य सचिव असणार आहेत.

समितीची आताच स्थापना झाली आहे. त्यामुळे विविध सूचना घेवून कामाचा दर्जा, व्यावहारिकता याचा अभ्यास करुन फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर हस्तपुस्तिका तयार होईल. ती सर्वांना मार्गदर्शक ठरावी यासाठी ही समिती काम करेल.

-रवींद्र उपासनी, अध्यक्ष, फेरोसिमेंट तंत्रज्ञान अभ्यासगट समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुणवत्ता सुधारण्यासाठी आता गुरुजींचेही उड्डाण!

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

राज्याच्या घसरत्या शैक्षणिक गुणवत्तेला पुन्हा उचल देण्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या आशियातील पाच देशांमध्ये महाराष्ट्रातील गुरुजी अन् शिक्षण अधिकारी आता आंतरराष्ट्रीय दौरा करणार आहे. आतापर्यंत राज्यभरातून ३४० शिक्षकांनी शासनाच्या या प्रस्तावास तयारी दाखविली आहे. विशेष म्हणजे शासकीय उद्दीष्टांच्या पूर्तीसाठी असणाऱ्या या दौऱ्यासाठी शिक्षक स्व-कमाईतून खर्च करणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून घसरत्या गुणवत्तेला सावरण्यासाठी आता फडणवीस सरकारने शिक्षण विभागाला महाराष्ट्रास गुणवत्ता स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन क्रमांकात आणण्याचे उद्द‌िष्ट दिले आहे. या उद्द‌िष्टाच्या पूर्तीसाठी राज्यात आंतरराष्ट्रीय स्तराच्या १०० शाळांच्या निर्मितीचाही संकल्प सरकारने सोडला आहे. या संकल्पपूर्तीसाठी आशियातील पाच देशांमध्ये उड्डाण करण्याची संधी आता गुरुजींना मिळणार आहे. मात्र, त्यांचे हे उड्डाण स्व-खर्चानेच होणार असल्याची तरतूद करून हुश्शार फडणवीसांनी ‘कॉस्ट कटींग’ ही साधले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या राज्य पिछाडीवर पडत असल्याची बाब काही सर्वेक्षणांनी अधोरेखित केली. हे चित्र बदलण्यासाठी ज्ञानरचनावादावर आधारित काही उपक्रमांना शासनाने पाठबळ दिले. यात शासकीय शाळांवरील समाजाचा विश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला होता.


शाळांच्या निर्मितीचा संकल्प!

प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट (पिसा) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चाचणीमध्ये सन् २०२१ साठी मुलांची सरासरी उत्तम वर्गात येण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या वेबसाईटवर संकल्प पत्र व ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा उपयोग १०० दीपस्तंभ शाळांच्या निर्मितीसाठी होणार आहे.

‘पिसा’ मध्ये आशिया खंडातील सिंगापूर, तैवान (चीन), जपान, शांघाय (चीन) आणि साऊथ कोरिया व फिनलँड ही सहा आंतरराष्ट्रीय शहरे व देश आघाडीवर आहे. या उपक्रमांतर्गत या देशांना शिक्षकांना भेट देता येईल. यातही सिंगापूरला प्राधान्य देण्यात आले आहे.


फडणवीसांचं ‘कॉस्ट कटिंग’

राज्याचा ढासळता शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी स्थानिक गुरूजींना आशियातील पाच देशांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याची सुवर्णसंधी देताना मुख्यमंत्र्यांनी चतुराईने कॉस्ट कटिंगही केले आहे. ४० शिक्षकांची एक बॅच याप्रमाणे इच्छुकांना हे दौरे घडविले जातील. मात्र, शिक्षकांच्या स्व खर्चाने हा दौरा असणार आहे. यासाठी शासन कोणताही निधी उपलब्ध करून देणार नाही. या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना www.research.net/r/teachersstudytour या लिंकवर माहिती अपडेट करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​वयोवृध्द कलाकारांची मानधनाअभावी हेळसांड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध कला जिवंत ठेवणाऱ्या वयोवृध्द कलाकारांना सरकारतर्फे मिळणारे मानधन रखडल्याने उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये चकरा मारून हाती काही मिळत नसल्याने वयोवृध्द कलाकार हतबल झाले आहेत.

कीर्तन, भरुड, गोंधळ, शाहिरी अशा लोककला जिवंत रहाव्यात म्हणून अनेक कलाकारांनी आपली हयात घालविली आहे. या कला जिवंत ठेवण्याचे काम केले. पुढील पिढीला आपली कला अवगत व्हावी, यासाठी काही कलाकार आजही धडपडत आहेत. अशा ज्येष्ठ कलाकारांना मानधन देण्याची प्रथा काही वर्षापूर्वी राज्य सरकारने सुरू केली. सुरुवातीला यातून अनेक कलाकारांना नियमित मानधन मिळू लागले. त्यामुळे त्यांचे जगणे काही अंशी सुसाह्य झाले. सुरुवातीला मिळणारी रक्कम तुटपुंजी असली तरीही ते वेळेवर मिळत असल्याने घरखर्चाला हातभार लागत असे. सरकारतर्फे मिळणारे मानधन मिळवून घेण्यासाठी प्रत्येक कलाकाराला आपण केलेल्या कार्याचा अहवाल द्यावा लागत असे. हा अहवाल तलाठी, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पंचायत समितीत येऊन सरकारतर्फे नेमलेल्या समिती समोर ठेवला जातो. त्यानंतर त्या वयोवृध्द कलाकाराला मानधन सुरू होते. मानधनासाठीची समिती गठीत होणे अपेक्षित असते. ती समिती गेल्या काही वर्षांपासून गठीत न झाल्याने अनेक कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित आहे. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात अशी समिती गठीत झाली होती. परंतु, राज्यात युतीचे नवीन सरकार आल्यानंतर अशी समिती गठीत करण्यात आलेलीच नाही. समिती गठीत होत नाही तोपर्यंत हा प्रश्न प्रलंबित रहाणार, अशी चिन्हे आहेत. समिती अहवाल देत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, अशी भूमिका पंचायत समिती अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे.

..

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष्य

समिती गठीत करण्याचे काम पालकमंत्र्यांचे आहे. समितीच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. परंतु, पालकमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत फारसे लक्ष घातले नाही. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले तर कलाकारांचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

अनेक कलाकारांची उपासमार होत असून घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. लवकरच त्याबाबत काही तरी तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

- बी. मेघराज, शाहीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज खान्देशात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११/५२, धुळे ते औरंगाबाद या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ करण्यासाठी आज (दि.५) केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे धुळ्यात येत आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या कामांसाठी नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

धुळे ते औरंगाबाद नवीन राष्ट्रीय आणि धुळे ते नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा दुपारी अडीच वाजता जिल्हा पोलिस कवायत मैदानावर पार पडणार आहे. त्यानंतर गडकरी हे नाशिककडे प्रयाण करतील. या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजन सोहळ्यानंतर सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली. धुळ्यातील कार्यक्रमापूर्वी गडकरी हे नंदुरबारमधील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. दरम्यान, नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. पोलिस कवायत मैदानावर आकर्षक मंडप उभारण्यात आला आहे. गडकरी ज्या रस्त्याने कार्यक्रमस्थळी येणार आहेत, त्याच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. दुभाजकांना रंगरंगोटी केली जात आहे. केंद्र किंवा राज्यातील मंत्र्यांच्या दौराकाळात शहरात अशारितीने विकासकामे होणार असतील, तर या मंत्र्यांचा दौरा दर सहा महिन्यांनी व्हावा. यानिमित्ताने अनेक रस्ते सुस्थितीत येतील, असा सूर आता धुळेकरांमधून उमटू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसीबीच्या प्रलंबित खटल्यात नाशिक तिसरे

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : अॅण्टी करप्शन ब्युरोचे (एसीबी) राज्यभरात तीन हजार २५१ खटले प्रलंबीत आहेत. परिक्षेत्रनिहाय प्रलंबित खटल्यांचा विचार करता नागपूरचा प्रथम क्रमांक लागतो. यापाठोपाठ पुणे आणि नंतर नाशिकचा तिसरा क्रमांक लागतो. प्रलंबीत खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी न्याय विभागासह एसीबीने आधुनिक कार्यपध्दतीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. प्रलंबित खटल्यांचा ताण कमी झाल्यास तपासाची गुणवत्ता सुधारण्यास वाव मिळू शकतो.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एसीबीची भूमिका महत्वाची आहे. एसीबीने रचलेले सापळे यशस्वी होणे तसेच संशयित दोषी ठरला जाणे महत्वाचे आहे. आजमितीस ७० ते ८० टक्के संशयित आरोपींची निर्दोष सुटका होते. हे चित्र नाशिकमध्येच नाही तर राज्यभरात दिसून येते. गेल्या काही वर्षांत खास एसीबीच्या खटल्यांसाठी विशेष कोर्टांची जास्त संख्येने नियुक्ती करण्यात आली आहे. आजमितीस नाशिक परिक्षेत्रात तब्बल ३१ विशेष कोर्टांत एसीबीचे खटले चालवले जातात. नाशिक परिक्षेत्रातील ४४३ खटले प्रलंबीत आहेत. यात अगदी १९९०पासूनच्या खटल्यांचा समावेश आहे. प्रलंबीत खटल्यांचा दबाव तपासाधिकाऱ्यासह न्यायपालिकेवरदेखील पडतो. ज्या खटल्यांचा निपटारा होतो त्यात निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे या कायद्यासह एकूण उठाठेवीचा फायदा होताना दिसत नाही. गृह विभागासह राज्य सरकारने या खटल्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी आणखी मजबूत व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले.


नाशिकमध्ये ३१ विशेष कोर्ट

नाशिक परिक्षेत्रात नाशिकमध्ये सात, मालेगावात दोन, निफाड दोन, धुळे येथे पाच, जळगावला तीन, अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील दोन ठिकाणे असे नऊ, धुळे जिल्ह्यासाठी पाच तर नंदूरबारसाठी तीन अशा ३१ विशेष कोर्टांत एसीबीच्या खटल्यांची सुनावणी होते. नाशिक परिक्षेत्रात जानेवारी ते सप्टेंबर या काळात १२३ सापळे एसीबीने रचले असून, अन्य भ्रष्टचाराचे चार असे मिळून १२७ गुन्हे दाखल झाले आहेत. सापळ्यांच्या दृष्टीने नाशिकचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो.



परिक्षेत्र- प्रलंबीत खटले

नागपूर- ५६३

पुणे-४७७

नाशिक-४४३

ठाणे-४२२

औरंगाबाद-४३९

अमरावती-३८३

नांदेड-३३३

मुंबई-१७१



नाशिक परिक्षेत्रातील खटले निकाली

वर्ष- २०१४-२०१५-२०१६

गुन्हे सिध्द-१७-२६-१४

निर्दोष सुटले-२३-६७-४५

एकूण-४०-९३-५९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडित दसककर यांना कलागौरव पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे पंडित सुभाष दसककर व शिवानी मारुलकर दसककर यांचा आग्रा येथील मानाच्या कला गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या पंडित रघुनाथ तळेगावकर फाऊंडेशन ट्रस्ट द्वारा, संगीत कला केंद्र आग्रा व प्राचीन कला केंद्र चंदिगढ आयोजित संगीत महर्षी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत संमेलनात हा पुरस्कार देण्यात आला. निनाद असे कार्यक्रमाचे शीर्षक होते. यात नाशिकचे पं. सुभाष दसककर यांचे हार्मोनिअम वादन व शिवानी मारुलकर-दसककर यांच्या शास्त्रीय गायनाने सकाळच्या मैफलीत अप्रतिम रंग भरले.

तीन दिवस चाललेल्या या संगीत महोत्सवात सकाळच्या सत्रात पं. सुभाष दसककर यांनी अहिर भैरव या रागाने सुरुवात केली. गायकी व तंत्रकारी या दोनही अंगांचा योग्य समन्वय साधत आपले वादन रंगवत नेले. त्यानंतर मिश्र शिवरंजनीची धून वाजवून कार्यक्रमाची सांगता केली. हार्मोनिअम वादनावर त्यांच्या आलापीपासून झाला प्रकारापर्यंत लिलया बोटे फिरण्यावर व अफाट तयारीवर सर्व रसिकांनी भरभरुन दाद दिली. त्यांच्याबरोबर तबला संगत, युवा कलाकार अनुरत्न रॉय यांनी तितक्याच प्रभावीपणे केली.

त्यानंतर शिवानी मारुलकर-दसककर यांच्या गायनाची सुरुवात नटभैरव या रागाने झाली. त्यातील बडा ख्याल- ‘लालन तुमसे भली ना होत’ हा विलंबीत तीनतालात व मध्य लयीत तराणा सादर केला. त्यानंतर शुध्द सारंगमध्ये मुरवा करत ही रुपकमधील बंदिश गायली. शेवट खमाज रागातील दादरा सादर करुन त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. भारदस्त आवाज, उत्तम तयारी, दमसास व गायनातील नजाकतीने सर्व रसिक तृप्त झाले. तबलासंगत पं. सुरेश हरिदास व हार्मोनिअम संगत सुभाष दसककर यांनी केली. नाशिकच्या या दोन्ही कलाकारांना संगीत महोत्सवात अतिशय मानाचा कलागौरव पुरस्कार राणी सरोज गौरीहर यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांचा उडणार बार

$
0
0

गडकरींच्या उपस्थितीत आज विविध कामांचे भूमिपूजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आज (५ नोव्हेंबर) केंद्रीय भूपृष्ठ, परिवहन व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. विविध राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण, तसेच नूतनीकरणाच्या या कामांमुळे येत्या काळात जिल्ह्यातील रस्त्यांचे नेटवर्क अधिक गतिमान आणि सशक्त होणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक परिक्षेत्रातील विविध विकासकामांचा कोनशिला समारंभ केंद्रीय भूपृष्ठ, परिवहन व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा हस्ते ५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता के. के वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या पटांगणात होणार आहे. या सोहळ्यात विविध पक्षाच्या नेत्यांची मांदियाळी अवतरणार असल्यामुळे या सरकारी कार्यक्रमात पक्षीय रंग फिका पडणार आहे. या सोहळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार व आमदारांमुळे हा सोहळा लक्षवेधी असणार आहे. या सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, या कामात नाशिकसह पालघर व शिर्डी मतदारसंघातील विविध कामांचा शुभारंभही यावेळी करण्यात येणार आहे. श्रेयवादावरून पॅचअप झाल्यामुळे भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हजेरी या कार्यक्रमात असणार आहे. त्याचप्रमाणे या सोहळ्यात सन्मानीय अतिथी म्हणून आमदार बाळसाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. सुधीर तांबे, हेमंत टकले, जयंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, अनिल कदम, शेख असिफ शेख रशीद, योगेश घोलप, नरहरी झिरवाळ, डॉ. राहुल आहेर, छगन भुजबळ, निर्मला गाहवत, पंकज भुजबळ, जीवा पांडू गावित, दीपिका चव्हाण, राजाभाऊ वाजे, स्नेहलता कोल्हे तसेच महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे हे उपस्थित राहणार आहेत.

या कामांचे भूमिपूजन

या समारंभात नाशिक जिल्ह्यातील के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज ते आडगाव व ओझर ते पिंपळगाव महामार्गावरील उड्डाणपुलासह विविध कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पालघर येथील रस्त्याचे काम, सिन्नर-शिर्डी पालखी मार्गाचे चौपदरीकरण, नाशिक-जव्हार रस्ता, त्र्यंबकेश्वर मोखाडासह विविध रस्त्याचे कामाचाही शुभारंभ होणार आहे. त्यामुळे विशेष उपस्थिती म्हणून पालखरचे खासदार चिंतामन वंगा व शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती या सोहळ्यात राहणार आहे.

जागेच्या वादाचेही सावट

द्वारका सर्कलला बायपास करून नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक थेट जिल्हा बँकेसमोरील उड्डाणपुलावर नेण्याचे काम वादात सापडण्याची चिन्हे असल्यामुळे त्याचेही सावट या कार्यक्रमावर असणार आहे. या बायपाससाठी घेतली जाणारी जागा महापालिकेची असून, सध्या या जागेवरील एक मंदिर स्थलांतरणासह ३३ जागा मालकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतल्याने संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबाबत मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

ट्रॅफिक नॉलेज हबचाही शुभारंभ

गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिडके कॉलनीतील चिल्ड्रन ट्रॅफिक हब एज्युकेशन पार्कमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता या हबचे उद्‍घाटन होणार आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी भावी पिढीलाच प्रशिक्षित करणारे धडे या हबमध्ये दिले जाणार आहेत. यामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंटचे शिक्षण पुस्तक, ऑडिओ, व्हिडीओ डीव्हीडी सीडीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. देशातील ही पहिली संकल्पना असून, त्यासाठी नाशिक फर्स्टच्या अॅडव्हान्टेज नाशिक फाउंडेशनने प्रयत्न केले आहेत.

नाशिकला आज मंत्र्यांची वर्दळ

सहा मंत्री व एक विरोधी पक्षनेत्याबरोबरच चार खासदार व १९ आमदारांच्या उपस्थितीमुळे शासकीय विश्रामगृहातही नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी असणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणाऱ्या कृषी परिषदेसाठी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे हे उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय मंत्र्यांचे विविध खासगी व काही सरकारी अधिकारी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. फुंडकर नाशिकच्या कार्यक्रमाबरोबरच पिंपळगाव येथे सायंकाळी ५ वाजता ग्रामसमृध्दी कृषी गौरव सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे द्राक्ष व भाजीपाला पॅकिंग शेडलाही ते भेट देणार आहेत. सदाभाऊ खोत हे कृषी व पणन विभागातील जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रचाराचा करणार श्रीगणेशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सध्या होत असलेल्या नगरपरिषद निवडणुका आणि तोंडावर येऊन ठेपलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ भाजपच्या वतीने शनिवारी अप्रत्यक्षपणे फोडला जाणार आहे.

भाजपने उड्डाणपुलाच्या कामासह विविध कामांचा शुभारंभ करून या सोहळ्याला कॅश करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी भाजपने विशेष तयारी केली असून, या कार्यक्रमातूनच प्रचाराचा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न आहे. शहरात गडकरींच्या स्वागताचे बॅनर लावतानाही त्यात भाजपची वचनपूर्ती, उड्डाणपुलाची होतेय स्वप्नपूर्ती असा मजकूर टाकला आहे. महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा जिंकून भाजपने सर्वच पक्षांना धक्का दिला आहे. त्यामुळे आता पंचवार्षिक निवडणुकीतही मनपा ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखून सर्व पक्षांना धोबीपछाड करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. उड्डाणपुलाच्या श्रेयवादाचा प्रयत्नसुध्दा त्याचाच एक भाग असल्याचे त्यातून समोर आले. पण गडकरी यांच्या उपस्थितीत गडबड नको म्हणून ४८ तासांत पॅचअपही करण्यात आले. तरीसुध्दा हे काम अखेर गडकरींनीच केले ना असा खोचक प्रश्न विचारून भाजपने हे श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीचीही तयारी भाजपने सुरू केली आहे. पदवीधर मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी जोरदार फिल्डिंगही लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातात मोपेडस्वार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उभ्या रिक्षाला मागून धडकलेल्या मोपेडस्वाराचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ हा अपघात झाला. मोहमद फिरोज अहमद (वय ५८, रा. सावरकरनगर, गंगापुर रोड) असे मृताचे नाव आहे. डॉ. उज्वल कांगुने यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ते गुरुवारी दुपारच्या सुमारास गंगापूरकडून अशोक स्तंभाकडे चालले होते. प्रसाद सर्कलजवळ त्यांची मोपेड रिक्षावर जाऊन आदळली. त्यामुळे त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

पंचवटीत घरफोडी

बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने दागिने चोरुन नेले. पंचवटीतील कृष्णनगरमध्ये घरफोडीची ही घटना घडली. गुरुवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संदीप प्रभाकर बागूल (वय ३६, रा. सुंदरबन को ऑपरेट‌िव्ह हौसिंग सोसायटी, कृष्णनगर, पंचवटी) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. बागूल कुटूंब बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरट्याने बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून १७ हजार ५०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले. बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी सकाळी सव्वासात या कालावधीत चोरीची ही घटना घडली.

युवतीचा विनयभंग

भांडी घासणाऱ्या युवतीचा हात पकडून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी रात्री आठच्या सुमारास काजीगढी परिसरातील जुन्या कुंभारवाड्यात घडला. एका १७ वर्षीय युवतीने या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याच परिसरात राहणाऱ्या दुर्गेश पोटे या संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. युवती घराबाहेरील नळावर भांडी घासत असताना संशयित तेथे आला. तुझे आई वडील कोठे आहेत अशी त्यांना विचारणा केली. तुला काय करायचे आहे, तू माझ्याशी बोलायचे नाही असे तिने त्याला सुनावले. त्यावेळी संशयित पोटे याने तिचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोखंडी रॉडने मारहाण

तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारका परिसरात मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. जुनेद इब्राहिम शेख (वय २२, रा. देवळाली कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. आबिद शेख याच्यासह आणखी दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद शेख कामावरून घरी परतत असताना सारडा सर्कलजवळ आबिद शेख याने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

घरातून मोबाइल चोरीस

घरातील व्यक्तींचे लक्ष चूकवून अज्ञात चोरट्याने १० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. नाशिकरोड परिसरातील चव्हाण मळा परिसरात हा प्रकार घडला. सीमा झेव्ह‌ियर मिनीझेस (वय ४८, रा. दिगंता सोसायटी) यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास बहिणीच्या घरात मोबाइल ठेवला होता. बहिणीच्या शेजारी अंत्यविधीकरीता आलेल्या इसमांपैकी कोणीतरी हा मोबाइल उघड्या घरातून चोरून नेला असावा असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेतू’व्दारे मिळणार डिजिटल दाखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेतू कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड आता थांबणार आहे. सेतू कार्यालय ऑनलाइन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अर्जदाराचा अर्ज स्कॅन होणार असून, डिजिटल दाखले दिले जाणार आहेत. दाखला तयार झाल्याचा संदेश अर्जदाराच्या मोबाइलवर मिळणार असल्याने विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना सेतू कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

नागरिकांना सातत्याने महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात धाव घ्यावी लागते. मात्र तेथे अनेकदा दाखले तयार नसतात. दाखल्यांसाठी त्यांना हेलपाटे मारावे लागतात. हे प्रकार टाळता यावेत यासाठी सरकारने डिजिटल पध्दती अस्तित्वात आणली आहे. जिल्हा प्रशासनाने या पध्दतीचा अवलंब सुरू केला आहे. डिजिटल स्वाक्षरीनिशी दाखले देण्याचा प्रशासनाचा मानस असून, प्रायोगिक तत्त्वावर मालेगाव आणि सिन्नर येथे डिजिटल दाखले देण्यात येत आहेत. नागरिकांना घरबसल्या ई पध्दतीने विविध प्रकारचे दाखले मिळावेत, तसेच दाखले वाटपास होणार विलंब कमी होऊन त्यात पारदर्शकता यावी आणि गैरप्रकारांना आळा घालता येणे यामुळे शक्य होणार आहे.

दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जात दाखला, उत्पन्न, क्रिमिलेअर आणि अधिवास असे विविध दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांमध्ये विद्यार्थी पालकांची गर्दी होते. अल्पावधीत हजारो अर्ज येत असल्याने जिल्हा प्रशासनाचीही दाखले देताना धांदल उडते. काही वेळा स्वाक्षरीसाठी अधिकारी उपलब्ध नसतात. अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित राहत असल्याच्या तक्रारी होतात. मात्र आता नागरिकांना विनातक्रार घरबसल्या अर्ज मिळू शकणार आहेत. पुढील आठवड्यापासून ही योजना कार्यान्वित होणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी सांगितले.

दाखल्यांवर आता अधिकारी डिजिटल स्वाक्षरी करतील. त्यामुळे सर्व दाखले ई डिजिटल होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सिन्नर आणि मालेगावात डिजिटल दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. अर्जदाराचा अर्ज घेतानाच तो स्कॅन करून त्याला प्रिंटेड पोहोच दिली जाणार आहे. प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर अर्जदाराला त्याच्या मोबाइलवर संदेश प्राप्त होईल. त्यामुळे सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज फोडणार विकासकामांचा नारळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी (११ नोव्हेंबर) नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अनेक राजकीय समीकरणांबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

राज ठाकरे हे ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शहरात येणार असून, त्या दिवशी निवडक पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. पांडवलेण्याच्या पायथ्याशी १२ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या बॉटनिकल गार्डनच्या कामाची पहाणी करणार असून, याबाबत शहरातील वास्तू विशारद व तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहेत. गंगापूर रोडवर असलेल्या श्रीरंगनगर येथे शस्त्र संग्रहालय साकारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी राज ठाकरेंसमवेत भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी मुंबईचे काही वास्तूविशारद राज ठाकरेंसमावेत हजर होते. येत्या निवडणुकीपूर्वी हे संग्रहालय तयार झाल्यास विकासकामांच्या यादीत भर पडेल व निवडणुकीला फायदा होईल त्या उद्देशाने शस्त्र संग्रहालयाच्या जागेची पहाणी करून तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. नाशिक शहरात कचऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. दिवसेंदिवस घंटागाड्या अपुऱ्या पडत असल्याने महापालिकेने नवीन घंटागाड्यांसाठी निविदा काढल्या. त्यानुसार लवकरच नवीन १९७ घंटागाड्या नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार असून, याच दिवशी नवीन घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

अगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या उद्घाटनातून नाशिक शहराचा विकास कसा झाला हे दाखवण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. भारतीय जनता पार्टीनेही नितीन गडकरींना विकासकामांच्या उद्घाटनाला बोलावून आघाडी घेतली आहे. यामुळे नाशिक शहरातील राजकीय वातावरण तापणार असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या नाशिक भेटीने तर्कवितर्क लावले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्जुन पगारेचा जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव अंजनेरी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर उसळलेल्या दंगलीतील संशयित व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ‍) चा शहराध्यक्ष अर्जुन पगारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. बी. भोस यांनी शुक्रवारी (दि.४) फेटाळला. याच प्रकरणात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेला नगरसेवक पवन पवार याच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. ९) सुनावणी होणार आहे.

तळेगाव येथील एका बालिकेवर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केला. आठ ऑक्टोबरला ही घटना घडली. या घटनेनंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. काही वाहनांच्या तोडफोडीच्या तसेच जाळपोळीच्याही घटना घडल्या. या घटनेचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अर्जुन पगारे याच्यासह शांताराम बागूल याच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी कामात अडथळा तसेच मुंबई पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पगारे याने न्यायाधीश भोस यांच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर शुक्रवारी युक्तिवाद झाला. जिल्हा सरकारी वकील अजय मिसर व पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी जोरदार युक्तिवाद केला. न्यायाधीश भोस यांनी अर्जुन पगारेचा जामीन अर्ज फेटाळला.

पवन पवारच्या अर्जावर बुधवारी सुनावणी

पोलिस संचलनावेळी जेलरोड परिसरात दगडफेक झाली. पोलिस अधिकाऱ्यांवर चाकूहल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी अपक्ष नगरसेवक तथा सराईत गुन्हेगार पवन पवार याला अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत दोन कट्टे, काडतुसे तसेच हत्यारे सापडली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तो नाशिकरोड कारागृहात असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर.शर्मा यांच्या कोर्टात त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंचलित केंद्रच धक्क्यावर!

$
0
0

देशातील पहिले वाहन तपासणी केंद्र

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशातील पहिले स्वयंचलित वाहन केंद्राची गाडी वर्षभरातच फसल्याचे चित्र आहे. तपासणीसाठी येणाऱ्या वाहनांना नाकारण्याचेच काम अधिक होत असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील हे एकमेव केंद्र जवळपास बंद असल्यासारखेच आहे. या केंद्राच्या प्रश्नाकडे गडकरी आणि त्यांचे मंत्रालय लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशातील पहिले केंद्र अशा गाजावाजात सुरू झालेल्या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राने वाहनधारकांची निराशाच अधिक केली आहे. या केंद्रामुळे सोय होण्याऐवजी गैरसोयींचाच पाढा अधिक वाचला जाऊ लागल्याने हे केंद्र वर्षभर वादात राहिले. त्यामुळे कधी बंद पाडल्या जाणाऱ्या, तर कधी व्यवस्थित कार्यान्वित असणाऱ्या या केंद्राची गाडी केव्हा रूळावर येणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. वर्षानुवर्षे वाहन चालविण्याचा अनुभव असूनही सहजासहजी लक्षात न येणारे आणि अपघातांना कारणीभूत ठरणारे दोष शोधण्याच्या उद्देशाने स्वंयचलित वाहन तपासणी यंत्रणा गतवर्षी ऑक्टोबरमध्ये नाशिकमध्ये कार्यान्वित करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या यंत्रणेचे उद्घाटन केले. ही यंत्रणा कार्यान्वित होऊन एक वर्ष उलटले. परंतु, ही यंत्रणा अद्याप नाशिककरांच्या पचनी न पडल्याने ती वादात राहिली आहे. रस्त्यांवर धावणारी वाहने खऱ्या अर्थाने फिट असावीत आणि वाहनांमधील दोषांमुळे होणारे अपघात रोखण्यास मदत व्हावी हा यंत्रणेचा प्रामाणिक उद्देश असला तरी अन्य नावाजलेल्या ठिकाणांहून तपासणी करून आणलेली वाहनेही येथे अनफिट दाखविली जात असल्याचे प्रकार सातत्याने घडले आहेत. परिणामी वाहनधारक आणि संबंधित यंत्रणा चालविणाऱ्यांत गत वर्षभरात अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण झाले.

भारतातील पहिले स्वयंचलित वाहन चाचणी आणि परिक्षण केंद्र नाशिकमध्ये होणार याचा बराच गाजावाजा करण्यात आला. केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतरही काही दिवस तेथे प्रत्यक्ष वाहन तपासणीला सुरुवात होऊ शकली नव्हती. वाहन तपासणी सुरू झाली मात्र वाहनधारक आणि केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांत वादाचे प्रसंग निर्माण झाले. चोपडे टायर असलेली, खूप जुनी तसेच टायर फुगलेल्या वाहनांना केंद्रामध्ये प्रवेश नाकारला जाऊ लागल्याने वाहनधारकांचा रोष बळावला. मात्र केंद्रामध्ये अपघाताची शक्यता आणि तेथील महागड्या यंत्रसामग्रीचे नुकसान यामुळे व्यवस्थापनाने सुरुवातीपासूनच अशी वाहने तपासणीस असमर्थता दर्शवली. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही याचे धोरण राबविले जात असले तरी यामुळे वाहनधारक आणि अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

आरसी बुकचीही प्रतीक्षाच

वाहनधारकांना घरपोच आरसी बुक देण्याची व्यवस्था प्रादेशिक परिवहन विभागाने केली आहे. परंतु, आरटीओ कार्यालय आणि टपाल कार्यालयातील असमन्वयामुळे हजारो वाहनधारकांना आरसी बुक वेळेत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच हजारहून अधिक वाहनधारक आरसी बुकच्या प्रतीक्षेत असल्याचे आरटीओ विभागाकडून अधिकृतपणे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृता, श्रेयाला सुवर्ण; नचिकेतला रौप्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर येथे सीबीएससीच्या पश्चिम विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या संस्कृता ठाकूर, श्रेया मुत्तुकुमार यांनी सुवर्णपदक मिळवले, तर नचिकेत गंगाखेडकरने रौप्यपदक पटकावले. नागपूरच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये ही स्पर्धा झाली.

स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील सीबीएससी शाळांचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत मुला-मुलींच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटांचा समावेश होता. वैयक्तिक प्रकारात १४ वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिकच्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या संस्कृता ठाकूरने अंतिम फेरीत नागपूरच्या जुई पेंढारकरचे आव्हान ३-१ असे मोडीत काढत विजेतेपद मिळविले. १९ वर्षांखालील वयोगटात नाशिकच्या सिम्बॉयसिस स्कूलच्या श्रेया मुत्तुकुमारनेही नागपूरच्याच संस्कृती सरकारवर ३-० असा विजय मिळवत सुवर्णपदक मिळविले. १७ वर्षांखालील गटात नाशिकच्या सिम्बॉयसिस स्कूलच्याच नचिकेत गंगाखेडकरने उपांत्य फेरीत मुंबईच्या प्रणित आखुडेचा ३-२ असा पराभव केला. मात्र, अंतिम फेरीत त्याला ठाण्याच्या जितेंद्र यादवकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला. संस्कृता ठाकूर, श्रेया मुत्तुकुमार आणि नचिकेत गंगाखेडकर या तिन्ही पदकविजेत्या खेळाडूंची सीबीएससीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २३ ते २८ नोव्हेंबरदरम्यान बडोदा (गुजरात) येथे होणार आहे. प्रशिक्षक शशांक वझे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका चित्रा जोशी, तर सिम्बॉयसिस स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरिंदर सबरवाल, को-ऑर्डिनेटर सी. आर. पाटील यांनी, तर शिवसत्य क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष अनिल सोनवणे, आमदार डॉ. राहुल आहेर, प्रशिक्षक मकरंद देव, आनंद खरे यांनी अभिनंदन केले. बडोदा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या खेळाडूंबरोबर प्रशिक्षक म्हणून राज्यस्तरीय खेळाडू स्वरूपा मुत्तुकुमार, तर व्यवस्थापक म्हणून कविता ठाकूर या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय फुटबॉल लीग नोव्हेंबरमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टतर्फे नोव्हेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल लीग स्पर्धा होणार आहे.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्टेट डेव्हलपमेंट प्रोजेक्टअंतर्गत महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, त्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे.

या कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील फुटबॉलपटूंना संधी मिळावी, यासाठी नोव्हेंबर महिन्यात १४ वर्षांखालील मुलांसाठी जिल्हा स्तरावर फुटबॉल लीग स्पर्धा घेण्यात येणार आहे. २०१६- १७ या वर्षातील स्पर्धांचे आयोजन ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करावयाचे आहे. १ जानेवारी २००३ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या मुलांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. इच्छुक संघांच्या व्यवस्थापकांनी, क्रीडाशिक्षकांनी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता दिल्ली पब्लिक स्कूल, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बाजूला, मानोरी, नाशिक येथे उपस्थित राहावे.

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या वतीने यंदा अखिल भारतीय स्तरावर कोका कोला स्कूल फुटबॉल स्पर्धा होणार आहे. स्पर्धेंतर्गत १ जानेवारी २००० ते ३१ डिसेंबर २०११ या कालावधीत जन्म झालेल्या मुलांसाठी जिल्हास्तरावर फुटबॉल लीग स्पर्धा होणार असून, ती १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान होईल. या स्पर्धेतील विजयी संघ राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र असतील.
इच्छुक संघांनी ९ नोव्हेंबरपूर्वी htpp://administrator.the-aiff.com/cocacola या वेबसाइटवरील माहितीनुसार नोंदणी करावी. नोंदणीनंतर बी. डी. रॉय (९८२३५८७५५८) यांना माहिती द्यावी, असे आवाहन फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे सूर गवसेना!

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

नाटकाच्या क्षेत्रात भरजरीपण लाभलेल्या आणि मखमलीचा शेला अंगभर परिधान करून अवघ्या नाट्यसृष्टीला ललामभूत होणाऱ्या संगीत राज्य नाट्य स्पर्धा अद्याप नाशिकला होत नसल्याने रंगकर्मींचा हिरमोड झाला आहे. नाशिक शहर कलेच्या बाबतीत अत्यंत पुढारलेले असूनही संगीत राज्य नाट्य स्पर्धा घेण्याच्या बाबतीत मागासलेपण का, असा सवाल अनेक ज्येष्ठ रंगकर्मींकडून केला जात आहे. अशाने नव्या दमाच्या कलाकारांना संगीत राज्य नाट्य समजेल कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पारंपरिक कलांचे आश्रयदाते म्हणविणाऱ्या नाशिकमध्ये संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र नसावे ही मोठीच शोकांतिका असल्याची रंगकर्मींची भावना झाली आहे. अगदी छोट्या एकांकिका महोत्सवापासून अगदी राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत अनेक स्पर्धा नाशिकमध्ये यशस्वी होतात. मात्र, ज्या संगीत नाटकांनी रंगभूमीला कलावैभव प्राप्त करून दिले, त्यांच्या स्पर्धेसाठीच नाशिकला केंद्र नसावे ही नामुष्कीची बाब ठरत आहे.

शहराला संगीत नाटकांची दीर्घ परंपरा आहे. नाट्यसेवाचे राजेंद्र जाधव पूर्वी संगीत नाटकांचा महोत्सव भरवीत. जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार नाट्यसंगीताचे धडे देण्यासाठी नाशिकला येत असत. ज्येष्ठ रंगकर्मी व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष नेताजी भोईर यांनी अनेक संगीत नाटके लिहिली. मात्र, त्यांना ते सादर करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणच्या केंद्राचा शोध घ्यावा लागला. रामदास कामत, शुभदा दादरकर यांच्या माध्यमातून शहरात सलग नाही, परंतु नाट्यसंगीताचे वर्गही सुरू आहेत. या जमेच्या बाजू आहेत. संगीत स्पर्धा झाल्यास त्याला एन्ट्री व प्रेक्षकही उपलब्ध होईल. मात्र, असे असताना अद्याप नाशिकला संगीत राज्य नाट्य स्पर्धा होत नाहीत. राज्य नाट्यसाठी केंद्र मिळते, मग संगीत नाट्यसाठी का नाही, असा सवालही ज्येष्ठ रंगकर्मींकडून उपस्थित होत आहे.

पूर्वीपासून केवळ सांगलीलाच संगीत राज्य नाट्य स्पर्धा होत असत. विष्णुदास भावे यांनी सांगलीला रंगभूमीची स्थापना केल्याने तेथेच संगीत नाट्यप्रेमी आहेत, असा सरकारचा समज असावा; मात्र पाच वर्षांपासून केवळ संगीत राज्यनाट्य स्पर्धेची ठिकाणे बदलण्यात येत आहेत. त्यात नाशिकला अद्याप यजमानपद मिळालेले नाही. यंदाची स्पर्धादेखील फिरून सांगलीलाच होणार आहे.

नाशिकला संगीत राज्यनाट्य स्पर्धा व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संस्थेतर्फे तसे बोलणेही झाले होते. येथे स्पर्धा होणार असतील तर आम्ही यजमानपद स्वीकारायला तयार होतो. परंतु जे नाटक पहिले येईल तेथे स्पर्धा होतील, असे जाहीर केल्याने यंदाच्या वर्षी सांगलीला संगीत नाट्य स्पर्धा होणार आहे. लवकरच त्या नाशिकलाही होवोत, अशी अपेक्षा.

- सुरेश गायधनी, ज्येष्ठ रंगकर्मी, दीपक मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटींमध्ये अडकले ड्रायव्हिंग लायसन्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘हेल्मेट घालूनच ड्रायव्हिंग करा आणि वाहतुकीचे नियम पाळतानाच ड्रायव्हिंग लायसन्स बाळगा’, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी करीत असले तरी याच आवाहनाला छेद देणारे काम महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) करीत असल्याची बाब समोर आली आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणेच सर्वसामान्यांना शक्य होत नसल्याने विनालायसनच वाहने चालविण्याची नामुष्की अनेकांवर आली आहे. सर्वत्र वेबपेज ओपन होईल यासाठीची कार्यपद्धती स्वीकारण्याऐवजी विभागाने विविध अटी घातल्याने ठराविक ठिकाणीच हे वेबपेज ओपन होत आहे.

पारदर्शक कारभाराची कास धरत आरटीओने ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडला आहे. तसेच, टॅबद्वारे ग्रामीण भागात लर्निंग लायसन देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारची टिमकी आरटीओकडून वाजवली जात असली तरी प्रत्यक्षात विभागाचा कारभार हा लायसन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय त्रासदायक ठरत आहे. आरटीओने लर्निंग लायसन काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे बंधनकारक केले आहे. या अर्जाद्वारेच अर्जधारकांना त्यांना हवी असलेली वेळ (अपॉइंटमेंट) परीक्षेसाठी निवडता येते. मात्र, विभागाची www.sarathi.nic.in या वेबसाईटवर इच्छुकांना अर्जच करता येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. हे वेब पेज ओपन करण्यात एरर येत असल्याचा संदेश वारंवार दिला जातो. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक जण लायसनपासून वंचित राहत आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, अर्जच करता येत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. सर्वत्र वेबपेज ओपन होईल यासाठीची कार्यपद्धती स्वीकारण्याऐवजी विभागाने विविध अटी घातल्याने ठराविक ठिकाणीच हे वेबपेज ओपन होत आहे.

एजंट, ड्रायव्हिंग स्कूलचे फावते

सायबर कॅफे किंवा घरातील ब्रॉडबँडवर विभागाचे वेबपेज ओपन होत नाही. तसेच, अर्जही करता येत नाही. मात्र, ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडे गेले तर तेथे तत्काळ वेबपेज ओपन होते. त्यामुळे अनेकांना ड्रायव्हिंग स्कूल किंवा एजंटकडे येऊनच लर्निंग लायसनसाठी अर्ज करावा लागत आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जाते.

या आहेत तांत्रिक अडचणी

www.sarathi.nic.in या वेबसाईटवर अर्जासाठीचे वेबपेज ओपन करण्यासाठी विविध प्रकारच्या अटीच विभागाने घातल्या आहेत.
इंटरनेट एक्स्प्लोरर हे व्हर्जन नऊपेक्षा अधिक असावे. मोझिला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोममध्ये हे वेबपेज ओपन होणार नाही. अॅडोबे रिडर हे ११ आणि त्यापेक्षा वरचे असावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय महामार्गावर ‘ब्रिज कम बंधारा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक पूल हा ‘ब्रिज कम बंधारा’ असेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात केले. धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ चे चौपरदीकरण आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे, महापौर कल्पना महाले, खासदार हिना गावित, आमदार काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, अमरिश पटेल, अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे आदी उपस्थित होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, धुळे ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. हा रस्ता पुढील ५० वर्षे खराब होणार नाही अशा पद्धतीने त्याचे काम केले जाईल. शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महामार्गावर ब्रिज कम बंधारे बांधण्याचा प्रयत्न आहे. त्यात अडविलेले पाणी हे शेतीसाठी उपयोगात आणले जाणार असल्याचे गडकरींनी सांगितले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात येत्या काही वर्षांत सात नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार होणार आहेत. शिवाय तापी नदीला जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवीन रोजगार उपलब्ध होऊन विकासाला गती लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविकात डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, केंद्र शासनाने मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढा मोठा निधी धुळे जिल्ह्याला मिळाला आहे.

सहा महिन्यांत रेल्वेमार्गाचे काम

येत्या सहा महिन्यांत मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गाचे भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री धुळ्यात येतील, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. देशभरात ठिकठिकाणी जलमार्ग विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे दळणवळणाची सुविधा सोयीस्कर होणार आहे. धुळे जिल्ह्यातील तापी नदीला जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले.

आरक्षणाचा फलक झळकला

गडकरी यांच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांमधून काहींनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे फलक हातात धरून सर्वांच लक्ष वेधले. काही वेळाने पोलिसांनी हे फलक ताब्यात घेतले.

अमरावती-सुरत महामार्गाचा कोनशिला समारंभ

नंदुरबार : अमरावती ते सुरत या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिलेचा समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते नवापूरला झाला. आदिवासी गोरगरीब जनतेला दिलेला आश्वासनाची पूर्तता करताना मला मनापासून आनंद होत असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. या रस्त्यासाठी पाच हजार कोटींचा खर्च आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीधर’ची नोंदणी सव्वादोन लाखांवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदारसंघासाठी शनिवारी हजारो मतदारांनी नावनोंदणीकरिता गर्दी केल्याने नोंदणीच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात विक्रमी नोंदणी झाली. त्यामुळे नोंदणीत आतापर्यंत आघाडीवर असलेला नगर जिल्हा मागे पडला असून, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ७८ हजार पाच पदवीधरांनी नोंदणी केली, तर नगर जिल्ह्यात एकूण ७२ हजार ९२० पदवीधरांनी नोंदणी केली आहे. उत्तर महाराष्ट्रात एकूण दोन लाख २२ हजार ६०३ पदवीधरांनी नोंदणी केली आहे.

नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात शेवटच्या दिवशी मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात ४३ हजार मतदारांनी नोंदणी केली होती. शनिवारी सायंकाळी ही संख्या ७८ हजारांवर पोहोचली. जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ३५ हजार मतदारांनी विक्रमी नोंदणी केली आहे. याउलट अहमदनगर जिल्हा शुक्रवारपर्यंत आघाडीवर होता. ५० हजार ६ अर्ज अहमदनगर जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. शनिवारी दिवसभरात सुमारे २३ हजार पदवीधरांनी अर्ज भरून दिले. त्यामुळे ही संख्या ७२ हजारांवर पोहोचली आहे. शुक्रवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात एक लाख ४० हजार ७०१ पदवीधरांनी मतदार नोंदणी केली होती. अखेरच्या दिवशी ही संख्या दोन लाख २२ हजार ६०३ पर्यंत पोहोचल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी नववर्षाच्या पहिल्या एक-दोन महिन्यांतच निवडणूक होण्याची शक्यता आहे. जुन्या मतदारयाद्या रद्द ठरविण्यात आल्याने या निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणीचे काम १ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आले होते. नावनोंदणीसाठी ५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सुरुवातीला काही दिवस या मोहिमेला थंड प्रतिसाद होता. अधिकाधिक पदवीधरांना मतदार नोंदणी करता यावी यासाठी २२ आणि २३ ऑक्टोबरला प्रशासनाद्वारे विशेष मोहीमदेखील राबविण्यात आली. मात्र, तिलाही फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. उत्तर महाराष्ट्रात या मोहिमेत १० हजार १६ अर्ज जमा झाले. अधिकाधिक पदवीधरांनी जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये, तसेच मंडल अधिकारी कार्यालयांमध्ये पोहोचून मतदार नोंदणी करावी, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत होते. शेवटच्या टप्प्यात या मोहिमेला जिल्ह्यातच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातही दिवाळीनंतर अधिक प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. शुक्रवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात एक लाख ४० हजार ७०१ पदवीधरांनी मतदार नोंदणी केली होती. सर्वाधिक ५० हजार ६ अर्ज अहमदनगर जिल्ह्यात, तर ४३ हजार २०५ अर्ज नाशिक जिल्ह्यात जमा झाले होते. मात्र, शनिवारी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे ५८ हजार पदवीधरांनी नावनोंदणी केली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पदवीधर मतदारांची संख्या सुमारे सव्वादोन लाखांवर पोहोचली आहे.

झालेली नोंदणी

जिल्हा मतदार नोंदणी

नाशिक ७८,००५

अहमदनगर ७२,९२०

जळगाव ३२,१५५

धुळे २४,४७६

नंदुरबार १५,०४७

एकूण २,२२,६०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात भरारी पथके तयार ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, माघारीच्या दिवशी उमेदवारांवर दबाव आणून किंवा त्यांना पैशांचे आमिष दाखवून अर्ज माघारीसाठी प्रवृत्त केले जाते. आचारसंहितेचा भंग ठरणाऱ्या अशा गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक शाखेने भरारी पथके तैनात करावीत, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शनिवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा प्रशासनाला दिल्या.

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकांचा बिगुल वाजला असून, त्यासाठीची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात भगूर, सिन्नर, नांदगाव, मनमाड, येवला आणि सटाणा या सहा नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबरला निवडणूक होणार असून, कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी शनिवारी व्हीडीओ कॉन्फरन्स घेतली.

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी सुमारे १ हजार २४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यंदा ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची सक्ती आयोगाने केली होती. मात्र पह‌िले दोन दिवस तांत्रिक दोषांचा अनुभव आल्याने आयोगाने अखेरच्या दिवशी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली. त्यामुळे मोठया प्रमाणावर अर्ज दाखल झाले.

गैरप्रकारांवर राहणार लक्ष

ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले असले तरी हे सर्व अर्ज स्कॅन करून त्याच दिवशी आयोगाच्या संकेतस्थळावर लोड करावेत असे आदेश आयोगाने दिले होते. नाशिक जिल्ह्यात ११५२ पैकी ८५५ अर्ज ऑनलाइन पद्धतीने तर ३५५ अर्ज ऑफलाइन स्वीकारण्यात आले. यापैकी ४५ अर्जांचे डिजीटलायजेशन बाकी असून, ते त्वरीत करा, असे आदेश आयोगाने दिले आहेत. उमेदवारांकडून विरोधी उमेदवारांवर दबाव आणला जातो. पैशांचे आमिषही दाखविले जाते. अशा प्रकारांवर नजर ठेवा, अशी सूचना आयोगाने जिल्हा प्रशासनाला केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>