म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
विंचूर वाइन पार्कमध्ये विकसित करण्यात आलेल्या भूखंडावर पतंजलीचा संभाव्य फूड पार्क येण्याची दाट शक्यता आहे. सद्यःस्थितीत वाइन पार्कमध्ये तुरळक प्रमाणात वायनरी कार्यरत आहेत, तर उर्वरित विकसित भूखंड पडून आहेत. या जागेवर कृषी प्रक्रिया उद्योगाला यापूर्वीच मान्यता देण्यात आल्याने पतंजलीचा प्रकल्प तेथे होण्याची चिन्हे आहेत.
रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योगसमूहाचा फूड पार्क नाशिकला होणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या पार्कसाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा केला होता. आता हा पार्क होणार असल्याच्या शक्यतेने नाशिकच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींत सध्या भूखंड शिल्लक नाहीत. दिंडोरी येथे सध्या भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी तेथील भूखंड विकसित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, औरंगाबाद हायवेवरील विंचूर वाइन पार्कमध्ये सध्या विकसित भूखंड आहेत. केवळ तुरळक वायनरी तेथे कार्यरत आहेत. याच ठिकाणी तिसऱ्या फेजमधील ५० हेक्टर (१२५ एकर) जागा औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केली आहे. या जागेवर पायाभूत सोयी-सुविधा विकसित होऊ शकतात, तर याचलगत तब्बल १०० हेक्टर जागा संपादित होऊ शकते. वाइन उद्योग बहरत नसल्याने तेथील जागेवर कृषी प्रक्रिया उद्योग यावा यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले. त्यास मान्यताही देण्यात आली. त्यानुसार पतंजलीचा पार्क विंचूर येथे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विंचूर वाइन पार्कमधील तिसऱ्या फेजमधील ५० हेक्टर जागा सध्या पडिक आहे. ही जागा संपादित असून, त्यावर सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकतात. तेथे कृषी प्रक्रिया उद्योगाला यापूर्वीच हिरवा कंदील देण्यात आलेला आहे.
- जगदीश होळकर, वाइन उद्योजक
पतंजलीच्या पार्कसाठी अद्याप जमिनीची मागणी करण्यात आलेली नाही. येवला, दिंडोरी आणि विंचूर येथे जागा उपलब्ध आहेत. प्रस्ताव आला, तर तातडीने कार्यवाही करण्यात येईल.
- हेमांगी भामरे-पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक, एमआयडीसी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट