Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मालेगावला ‌तिघांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पाटीलवाडा, संगमेश्वर भागातील तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मालेगाव-सटाणा रस्त्यावरील रोकडोबा मंदिर परिसरातील बंधाऱ्यानजीक ते पोहण्यासाठी गेलेे असताना रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

पाटीलवाडा परिसरात राहणारे पीयूष चंद्रशेखर हिरे (वय १७), प्रशांत सुरेश हिरे (वय २४) निखिल पद्माकर हिरे (वय १८) हे तिघेही सुटी असल्याने रोकडोबाजवळच्या केटीवेअर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. पीयूष पोहण्यासाठी उतरला असता त्यास पाण्याचा अंदाज आला नाही. त्याला बुडताना पाहून प्रशांत आणि निखिल हे दोघेही त्याला वाचविण्यासाठी घाईघाईने पाण्यात उतरले. मात्र दुर्दैवाने तेही बुडाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. अग्निशामक दलाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. तिघेही तरूण एकाच कुटुंबातील तसेच एकुलते एक असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवीदास पिंगळेंची सेंट्रल जेलमध्ये रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना रविवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. अॅण्टी करप्शन ब्युराने (एसीबी) तपासासाठी आणखी कोठडीची विनंती केली होती. मात्र, कोर्टाने सरकारी पक्षाची ही विनंती फेटाळून लावली. पिंगळेंच्या वतीने आज, सोमवारी जामीन अर्ज सादर होऊ शकतो.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसीबीने पाच दिवस पिंगळेंची चौकशी केली. तपास काम अद्याप बाकी असून, ते पूर्ण करण्यासाठी पिंगळेंना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. मात्र पिंगळेंच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. रविवार असल्याने पिंगळेंच्या वतीने जामीन अर्ज सादर झाला नाही. आज, सोमवारी जामीन अर्ज कोर्टात सादर होण्याची शक्यता असून, त्यावर निर्णय होईपर्यंत पिंगळेंची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीसीप्रकरणी आरोपपत्र दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या केबीसीचे संचालक व एजंटांविरोधात तपास पथकाने न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या कोर्टात २८९ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दहाही संशयितांविरोधात महाराष्ट्र ठेवीदार व गुंतवणूकदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल असून, त्यांनी २१२ कोटी १८ लाख ३९ हजार ९८० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

केबीसीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण यांनी केबीसी मल्टिट्रेड कंपनीची स्थापना करून गुंतवणूकदारांना तिप्पट व्याजाचे आमिष दाखविले. चव्हाणचे नातेवाईक, तसेच चव्हाणसाठी काम करणाऱ्या एजंटांनी गुंतवणूकदारांना जादा पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीचे काही महिने हा व्यवहार जोरात सुरू होता. कालांतराने गुंतवणूकदारांना परतावा मिळणे बंद झाले. गुंतवणूकदार त्रस्त झाल्याने ११ जुलै २०१४ रोजी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान भाऊसाहेब व आरती चव्हाण सिंगापूरला फरार झाले. पोलिसांनी कंपनीचे इतर संचालक बापूसाहेब छबू चव्हाण, पंकज राजाराम शिंदे, नितीन पोपटराव शिंदे, संजय वामनराव जगताप, नानासाहेब छबू चव्हाण, साधना बापू चव्हाण, भारती मंडलिक शिलेदार, कौशल्या संजय जगताप यांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त केली. दरम्यान, पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे कंपनीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण परत येण्यास तयार झाले. मे २०१६ मध्ये चव्हाण दाम्पत्यास आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावरून अटक केली होती. केबीसी संचालकांविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून, त्या संदर्भात या दोघांची चौकशी करण्यात आली. सद्यःस्थितीत ते कारागृहात आहेत, तर आरती चव्हाणने प्रकृतीच्या कारणास्तव जामिनासाठी अर्ज केला असून, यावर जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळे बांधून शिवशाही येत नाहीः राज

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

राज्य सरकार फक्त शोबाजी करतंय. तिजोरीत पैसे नाहीत आणि हे स्मारक बांधायला निघालेत. त्यापेक्षा राज्यातील गड-किल्ले दुरुस्त करा. फक्त पुतळे बांधून शिवशाही येत नाही, असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध दर्शवला आहे.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. मुंबईतील समुद्रात१६ हेक्टर क्षेत्रफळाच्या खडकावर हे स्मारक उभं राहणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा बहुप्रतीक्षित विषय मार्गी लावून भाजपनं खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून सुरू झालेल्या वाक्-युद्धात आज राज ठाकरे यांनी उडी घेतली.

मुख्यमंत्री फक्त घोषणाबाजी करत आहेत. जनतेची दिशाभूल केली जातेय. शिवस्मारक बांधायला सरकारकडे पैसे आहेत का? मुंबईला निधी देण्याची घोषणा सरकारने केली होती, तो निधी कुठे गेला?, असा सवाल करत त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. फक्त पुतळे बांधून शिवशाही येत नाही. त्यापेक्षा, ३ हजार ७०० कोटींमध्ये महाराष्ट्रातील किल्ले दुरुस्त करा, असंही त्यांनी सुनावलं.

नाशिक शहरासारखा विकास कुठेच झाला नसल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी स्वतःची पाठ थोपटली. आजपासून दोन दिवस ते नाशिकमध्ये असून विविध कामांची पाहणी आणि लोकार्पण करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात अतिक्रमणाविरोधात कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीकिनारी लागून दुतर्फा साडेपाच कि.मी.चे नवीन रस्ते साकारण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी पांझरा नदीकिनारी वीर सावरकर पुतळ्याजवळील तत्त्वज्ञान केंद्राचे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्त होता.

धुळे शहरातील नवीन विकासकामांना अडथळा निर्माण करणारी एकूण १९ ठिकाणे असून, त्यात शिवसेना महानगर कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र, जयहिंद जलतरण तलाव आदी ठिकाणांचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने या सर्व अतिक्रमणांवर मनपा कारवाई करणार आहे. आज अतिक्रमण काढताना मनपाचे सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, अपर तहसीलदार ज्योती देवरे, मनपा व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतील ठाकरे उद्यानाचा प्रारंभ

$
0
0

आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान व नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाचे लोकार्पण सोमवारी (दि. २६) युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी, विरोधी पक्षात असतांनाही मोठ्या प्रमाणावर विकास कामे शिवसेनेकडून होत आहेत. त्यामुळे शिवसेना सत्तेवर आल्यावर हा जोर अजूनच वाढेल व नाशिककरांचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाकरे यांच्या हस्ते फित कापून उद्यानाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार दादा भुसे यांनी, नाशिक शहरात व जिल्ह्यात शिवसेनेचे काम अतिशय योग्य पद्धतीने व जोरदार सुरू आहे. अनेकजण पक्षात येण्यासाठी तयार असून आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही संस्थांवर भगवा फडकणारच, असे त्यांनी सांगितले.

या वेळी व्यासपीठावर शिवसेना नेते आदेश बांदेकर, संपर्कप्रमुख अजय चौधरी, खासदार हेमंत गोडसे, राज्यमंत्री दादा भुसे, विजय करंजकर, अजय बोरस्ते, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे, शिवाजी चुंभळे, मामा ठाकरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचनेस पुन्हा स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवरील हरकतीबाबत न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या कोर्टात २ जानेवारी रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. तोपर्यंत प्रभाग रचनेच्या कार्यवाहीबाबत कोर्टाने मनाई हुकूम केला आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात हर्षल जाधव यांनी नाशिकच्या दिवाणी कोर्टात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रभाग रचना हरकती संदर्भांत सुनावणी घेण्याचा दिवाणी कोर्टाला अधिकारच नसल्याचा निर्वाळा देत कोर्टाने तक्रारदारास वरिष्ठ कोर्टात जाण्यास मुदत दिली होती. अपीलासाठी देण्यात आलेल्या वेळेपर्यंत प्रभाग रचनेसंदर्भात कोणतेही कार्यवाही करण्याबाबत दिवाणी कोर्टाने मनाई केली आहे. वरिष्ठ कोर्टात अपील करण्यासाठी तक्रारदारास २८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत तात्पुरता मनाई हुकूमदेखील लागू असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर तक्रारदाराच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात अपील करण्यात आले. एस. आर. शर्मा यांच्या कोर्टासमोर सदर अर्ज आला असून, त्यावर सोमवारी (दि. २६) सुनावणी झाली.

त्यानंतर कोर्टाने दिवाणी कोर्टाने दिलेला मनाई हुकूम २ जानेवारीपर्यंत कायम केला. या बाबत बोलताना अॅड. सुधीर कोतवाल यांनी सांगितले की, सदर अर्जावर दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झालेला नाही. काही तांत्रिक कारणांमुळे मनाई हुकूम वाढवण्यात आला असल्याचे अॅड. कोतवाल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मारकाऐवजी गड-किल्ल्यांची दुरुस्ती करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे सरकार केवळ पोकळ घोषणा करतानाच, स्मारकांवर खर्च करण्याऐवजी राज्यातील गड किल्ल्यांची दुरुस्ती करावी, असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकावर होणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. सरकारकडे पैसा नसताना केवळ पोकळ घोषणा केल्या जात आहेत. राज्यातील युती सरकारची वाटचाल काँग्रेस सरकारप्रमाणेच सुरू असल्याचा टोलाही राज यांनी लगावला.

शहरातील विविध विकासकामांच्या पाहणीसाठी राज दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी (दि.२६) त्यांनी गोल्फ क्लब विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. आम्ही म्हणत होतो तेव्हा पाचशे कोटी रुपये खर्च येणार होता. आताचे सरकार ३ हजार ७०० कोटी रुपये खर्च करायला तयार झाले आहे. इतका खर्च करणे खरोखर गरजेचे आहे का? असा सवाल उपस्थितीत करतानाच हा केवळ कागदावरचा खर्च असून, प्रत्यक्षात काम करताना किती पैसे लागतील लागतील याचा भरवसा नाही, असे राज यांनी सांगितले. महाराष्ट्रातील गड किल्ले आज अखेरची घटका मोजत आहेत. हाच त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरला तर त्यांना ऊर्जितावस्था मिळू शकेल. स्मारकाची घाईघाईने घोषणा तर केली, मात्र ही दिशाभूल आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पंचायत समितीने दर्जेदार सेवा द्यावी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण जनतेला पायाभूत सोयी-सुविधा देणाऱ्या पंचायत समितीने नागरिकांच्या गरजा ओळखून दर्जेदार सेवा द्यावी, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. पंचायत समितीच्या अत्याधुनिक इमारतीसह सय्यदपिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद््घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

सय्यदपिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत विंचूरगवळी, सुलतानपूर, ओढा, माडसांगवी, लाखलगाव, शिलापूर या गावांतील लोकसंख्येला आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. सद्यस्थितीत दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सहाय्यकांसह १४ कर्मचारी येथे उपलब्ध असून कुटुंब नियोजन, अंधत्व निवारणासह विविध आजारांवर उपचार केले जातील, असे उपसभापती अनिल ढिकले यांनी सांगितले. याप्रसंगी युवा सेनेचे आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार योगेश घोलप, माजीमंत्री बबन घोलप उपस्थित होते.

अत्याधुनिक पंचायत समिती

अल्प लोकसंख्या असतानाही अत्याधुनिक इमारत साकारणारी नाशिक पंचायत समिती ही राज्यभरात नावाजली आहे. गेल्या दीड वर्षात ४ कोटी रुपये खर्चून ही इमारत साकारण्यात आली आहे. या इमारतीत सुसज्ज सभागृह, महिलांसाठी विशेष दालन, विशेष कॅबिन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रुम, ट्रेनिंग सेंटर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. अतिशय देखण्या या इमारतीची पाहणी करण्यासाठी नागपूर पंचायत समितीचे पदाधिकारीही येऊन गेले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळेच नाशिकप्रमाणेच नागपूरातही अशीच इमारत साकार होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबिर तयारीला वेग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकार, सिव्हिल हॉस्पिटल आणि नाशिक महापालिका यांच्यावतीने येत्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या तयारीने वेग घेतला आहे. त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब मैदानाच्या शेजारी असलेल्या ईदगाह मैदानाच्या ठिकाणी या शिबीराच्या भव्य मंडप उभारणीचे काम सध्या सुरू आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन संकल्पनेतून येत्या १ जानेवारी रोजी महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. यापूर्वी, जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारे झालेल्या शिबिरांना उदंच प्रतिसाद लाभला आहे. आता हे शिबिर नाशकात प्रथमच होत आहे. या शिबिरामध्ये दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी व औषधोपचार मोफत केला जाणार आहे. या शिबिराची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा दुर्धर अथवा गंभीर आजार असेल, हृदयरोग, किडनीचे आजार, मेंदूचे आजार, कॅन्सर, डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार, कानाचे आजार, पोटाचे आजार, संधीवात अशा कुठल्याही आजाराबाबत या शिबिरात उपचार केले जाणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी व नोंदणीची मोहिम सुरू आहे.
येत्या ३० डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेद्वारे वितरित करण्यात येणारी नोंदणी चिठ्ठी घेऊन रुग्णांना शिबिरात सहभागी होता येणार आहे. शिबिरामध्ये दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी व औषधोपचार पूर्णत: मोफत केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांची निदर्शने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने करीत आहेत. मागण्यांचा कुठलाही विचार अद्याप करण्यात आलेला नाही. आशा कर्मचाऱ्यांना मानधनही नाही, या साऱ्याच बाबतीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘सिटू’च्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. आमच्या मागण्या त्वरित मान्य करा, असा टाहो यावेळी निदर्शक महिलांनी फोडला.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी आदींद्वारे राज्य सरकार मोठ्या प्रमाणात काम करून घेत आहे. मात्र, या सर्वांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. सिटू आणि अखिल भारतीय अंगणवाडी सेविका, मदतनीस फेडरेशन यांच्यावतीने सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दरतीन वर्षांनी केंद्र सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करते. त्यानुसार, २००८ आणि २०११ साली सरकारने वाढ केली. मात्र, त्यानंतर २०१४ साली अपेक्षित मानधनवाढ झालीच नाही. याउलट, केंद्र आणि राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आयसीडीएसवरील बजेटमध्ये कपात केली. शिवाय संप, मोर्चे काढल्यानंतर सरकारने मानधनवाढ व एकरकमी सेवासमाप्ती लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्यक्षात सेवासमाप्ती लाभाची अंमलबजावणी झालेली नाही.

प्रमुख मागण्या अशा

केंद्र सरकारने आयसीडीएस केवळ तात्पुरती योजना म्हणून न राबवता, त्याचे नियमितीकरण करावे
‘आयसीडीएस’ला महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत उपखात्याचा दर्जा देऊन सरकारचा कायमचा उपक्रम म्हणून राबवावा.
सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा.
सेविकांना १० हजार व मदतनिसांना ७ हजार ५०० मानधन लागू करा.
सेविका, मदतनिसांना भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन, आरोग्यविमा, घरकुलासाठी अनुदान इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा.
सेविका, मदतनिसांना वर्षातून १५ दिवसांची पगारी वैद्यकीय रजा व उन्हाळ्याची सुटी मंजूर करावी.
मानधन दरमहा १० तारखेच्या आत नियमितपणे अदा करण्यात यावे.
आशा वर्कर्स, स्त्री परिचर यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या
आशांचा कामाचा मोबदला व मिटींग भत्ता दुप्पट मिळावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारवर गुन्हे दाखल करू

$
0
0

विखे-पाटलांचा इशारा; उद्दिष्टपूर्तीच्या श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

म.टा प्रतिनिधी, नाशिक

काळे धन बाळगणाऱ्या एक टक्का लोकांसाठी सरकारने ९९ टक्के जनतेला वेठीस धरले आहे. नोटा बंदीच्या निर्णयाला लवकरच ५० दिवस पूर्ण होणार असून लोकांचे हाल सुरूच आहेत. आपले पैसे बँकांमध्ये अडकून पडल्याने लोकांच्या संतापाचा कडेलोट होत आहे. ही परिस्थिती नववर्षातही कायम राहिली तर सरकारवर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी (दि. २६) नाशिकमध्ये दिला.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी विखे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, एकीकडे नोटा बंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील नवसारीसारख्या ठिकाणी एका कार्यक्रमात नवीन नोटा उधळण्यात आल्या. यावरून नोटाबंदी होणार असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना होती, हे आता सिद्ध होऊ लागले आहे, असे ते म्हणाले.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने तब्बल ५८ वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढले. त्यातील अनेक आदेश मागे घेण्याची नामुष्कीदेखील सरकारवर ओढावली. काही आदेशांसाठी शुद्धिपत्रक काढावे लागले. नोटा बंदीबाबत मोदी एकटेच बोलत आहेत. केंद्र सरकारचा सर्व बिनभरवशाचा कारभार सुरू असून लोकांना आणखी किती काळ मुर्ख बनविणार आहात, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

सध्या सरकार कॅशलेसचा डंका वाजवत असून १५ लाख कोटींच्या नवीन नोटा छापल्या जात असल्याच्या विरोधाभासाकडे त्यांनी लक्ष वेधले. चलनात होता तेवढा पैसा आता पुन्हा आला तर काळा पैसा गेला कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांची कर्ज माफ करायला हवीत. तसेच ३१ डिसेंबरनंतर नागरिकांचे हाल कमी झाले नाहीत तर सरकार विरोधात गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण होताच सरकारने उद्दिष्ट्यपूर्तीच्या श्वेतपत्रिका काढाव्यात, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

महापुरुषांना तरी सोडा…

शिवस्मारकाच्या मुद्दयावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू राजकारणावरही विखे पाटील यांनी टीका केली. महापुरुषांना राजकारणापासून बाजूला ठेवा. त्यांचे पावित्र्य कमी करू नका, असे आवाहन केले. कार्यक्रमाला आलेले शिवभक्त शिवरायांचे मावळे असतील तर ते खाली बसतील, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना करावे लागल्याबद्दल त्यांनी खिल्ली उडविली. सरकार इव्हेंट मॅनेजमेंटच्यापलिकडे जात नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पुतळ्यांना ‘अच्छे दिन’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर त्याचे पडसाद नाशिक शहरातही उमटू लागले आहेत. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पुतळ्यांना ऊर्जितावस्था आणण्याचे काम सुरू असून, काही ठिकाणी नव्याने पुतळ्यांची उभारणी करण्यात येत आहे.

सत्यशोधक समाजाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच आगरटाकळी येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते झाला. हे दोन्ही पुतळे मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री असतांना माजी महापौर अशोक दिवे यांच्या समतानगर येथील समाज मंदिरालगत बसवण्यात आले होते. तेव्हा ते अर्धाकृती होते आता त्याचे नूतनीकरण करण्यात आले असून ते पूर्णाकृती करण्यात आले आहे. पुतळ्यांच्या माध्यमातून विचारांची प्रेरणा समाजाला मिळत असते. डॉ. आंबेडकरांनी आपल्या विचारांचे गुरू म्हणून महात्मा फुले यांना मानत होते. या शिल्पकृतीच्या माध्यमातून गुरुशिष्याचे विचार समाजाला प्रेरणा देतील असे मान्यवरांनी स्पष्ट केले. दोन्ही पुतळ्यांची उंची १२ फुट व चबुतरे ३५ फुटांचे असल्याची माहिती नगरसेवक राहुल दिवे यांनी दिली.

वडाळा नाका येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मंगळवारी (दि. २७) उद्‍घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता वडाळानाका येथे होणार आहे. त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. शालिमार जवळील नेहरू उद्यानाजवळील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याही पुतळ्याचे नुतनीकरण करण्यात आले आहे. तो पुतळा पूर्णाकृती करण्यात आला आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून हा पुतळा कपड्याने बांधलेल्या अवस्थेत असून नागरिक पुतळा खुला होण्याची वाट पहात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते पुतळ्याचे अनावरण व्हावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने उद्‍घाटन समारंभ रखडला आहे.

विचारांचे आचरण कधी?
नव्या पिढीला महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्या विचारांची गरज आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार होण्यास भव्यदिव्य स्वरुपात असणारे पुतळे नक्कीच मार्गदर्शक ठरतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, खरी गरज या बड्या व्यक्तींचे विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरणात आणण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्कवाढप्रश्नी ‘तारीख’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पालक शिक्षक संघ कार्यकारिणी आणि शिक्षण खात्याला न जुमानता शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी शिक्षण शुल्कामध्ये वारेमाप वाढ केली आहे. ती रद्द करण्यासह संबंधित शाळांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हरकतींवर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण शुल्क नियमन समितीपुढे सोमवारी सुनावणी झाली. मात्र, संबंधित शाळांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. या समितीने पुढील महिन्यात पुन्हा सुनावणी होईल, असे आदेश दिले.

शहरातील केंब्रीज, अशोका, सेंट फ्रान्सिस या इंग्रजी माध्यमांच्या बड्या शाळांच्या मनमानी कामकाजाबद्दल त्याच शाळांतील पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह काही पालकांनी शिक्षण खात्यासह कोर्टातही तक्रारी दाखल केल्या आहेत. या शाळा शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित पालक प्रतिनिधींनी विभागीय शिक्षण शुल्क नियमन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख यांच्यापुढे केला. यावेळी समितीचे सदस्य सनदी लेखापाल उल्हास बोरसे, निवृत्त शिक्षण सहसंचालक अरुण ठाकरे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. या सुनावणीदरम्यान उपस्थित पालक व पालक प्रतिनिधींनी संबंधित शाळांनी केलेली शिक्षण शुल्क वाढ ही पालक शिक्षक संघ कार्यकारिणीच्या व शिक्षण खात्याच्या मंजुरीशिवाय केलेली आहे. त्यामुळे ती शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने रद्द करण्याची मागणी केली. याशिवाय यापैकी काही शाळांकडून विद्यार्थ्यांना मानसिक व शारिरीक छळही केला जात आहे. या प्रकाराचीही शहानिशा करून कारवाईची मागणी केली.

सुनावणीला राणेनगरच्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अॅड. सिमना अकील आयुब, तिडके कॉलनी शाखेचे मकरंद वाघ, हरीश वाघ, एलियास खान, अशोका स्कूलचे पालक-शिक्षक संघाचे अमोल कलंत्री, तृप्ती ठाकूर, केंब्रीज स्कूलचे पालक-शिक्षक संघाचे राजेश बडनखे, योगेश पालवे, शेखर कुलकर्णी यांच्यासह इतर पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

गैरहजेरीत निर्णय घेणे अनुचित
पालक व पालक प्रतिनिधींनी या समितीसमोर काही न्यायालयीन आदेशांचे कागदपत्रेही सादर केली. त्यानंतर या समितीने या पालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर येत्या जानेवारीमध्ये संबंधित शाळांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पुन्हा या विषयावर सुनावणी घेण्याचा अंतिम निर्णय या पालकांना दिला. या पालकांनी पुढील सुनावणीपेक्षा आताच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. यावर संबंधित शाळांच्या वतीने या सुनावणीस कोणीही उपस्थित नसल्याने त्यांच्या गैरहजेरीत अंतिम निर्णय घेणे अनुचित ठरेल असे मत समितीने नोंदविले. मात्र, पुढील सुनावणीस संबंधित शाळांचे जबाबदार प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास समिती अंतिम निर्णय घेईल. हा निर्णय मात्र संबंधित शाळांना बंधनकारक राहील, असेही मत या समितीने यावेळी नोंदवले.

सेंट फ्रान्सिस स्कूलकडून शिक्षण खात्याचे नियम व आदेश धाब्यावर बसविले जात आहेत. या शाळेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या चौकशी समितींच्या अहवालातही या शाळेने नियमांचे उल्लंघन केल्याचे नमूद आहे. आजच्या सुनावणीस काहीतरी ठोस निर्णय होणे अपेक्षित होते.
- अॅड. सिमना अकील आयुब, उपाध्यक्ष, पालक-शिक्षक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यावे, पक्षात स्वागतच आहे!

$
0
0

डॉक्टर, इंजिनीअर, वकील आणि आता शेवरे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजकारणात शब्दाला नाही तर परिस्थितीला किंमत असते. परिस्थितीनुरूप जसे निर्णय घेता येईल, तसे घ्यावे लागतात. याचा सर्वांत मोठा अनुभव आजमितीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेत आहेत. २०१२ मध्ये डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांची परीक्षा घेऊन उमेदवारी देणारे ठाकरे आज गंभीर गुन्हे नावावर असलेल्या योगेश शेवरेला आवताण देत आहेत. या पक्षात आपले स्वागतच आहे, अशी राज ठाकरे यांची भूमिका थोडीफार आशा असलेल्या मतदारांना रूचणार काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेला १२२ उमेदवार मिळवताना नाकी नऊ येण्याची शक्यता आहे. फक्त आऊटगोईंग सुरू असलेल्या मनसेत आज कोणी प्रवेश करणार म्हटले तर पदाधिकाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. मग, त्याच्यावर खून, दरोडे, हाणामारी असे गुन्हे दाखल असले तरी बेहत्तर!

सातपूरमधील कुख्यात गुंड योगेश शेवरे याच कलाने जाणारा. काही दिवसांपूर्वी त्याने मनसेत प्रवेश केला. प्रवेश सोहळा पार पडताच पोलिसांनी शेवरेची उचलबांगडी करीत पोलिस स्टेशनला आणले. याच शेवरेने आज प्रथमच पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरेंची भेट घेतली. उच्च शिक्षितांच्या पक्षात शेवरेलाही स्थान मिळाल्याचा ‘आनंद’ या भेटीत मात्र दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवख्यांसह दिग्गजांचीही घालमेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

चार सदस्यीय प्रभाग पद्धती, प्रभागांची मोडतोड, नोटाबंदीच्या निर्णयाने झालेली आर्थिक नाकेबंदी, जिल्हाभरातील सहा नगरपालिकांचे निकाल या पार्श्वभूमीवर या विभागातील प्रभागांत नवख्या इच्छुकांसह दिग्गजांचीही घालमेल वाढली आहे. निवडून येण्यासाठी तडजोड करण्याची तयारीही विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांकडून दाखविली जात आहे. पक्षांतर, परंपरागत शत्रूंशी हातमिळवणी, मित्रांशी गद्दारी अशा अनेक घटना राजकीय पटलावार वेगाने घडू लागल्या आहेत.

निष्ठावंतांमध्ये वाढली अस्वस्थता
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्याप्रमाणात पक्षांतर सुरू झाले आहे. याचा फटका पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बसू लागला आहे. भाजप व शिवसेनेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. पक्षाला आता चांगले दिवस आल्यानंतर आपल्याला नगरसेवक बनण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा धरून वर्षानुवर्षे पक्षाचे एकनिष्ठ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षांतरामुळे मोठा धक्का बसला आहे. पक्षांतराच्या विरोधात सोशल मीडियावर मोहीम उघडली आहे, तर आयत्या वेळी प्रवेश करणाऱ्यांना प्रवेश देऊ नये, असे मेसेज व्हायरल केले जात आहेत.

पॅनलनिर्मितीचीही चाचपणी सुरू
प्रभागांमध्ये पक्षांतर व प्रभाग विकास आघाडी अशा वेगवेगळ्या मार्गाने चांगले पॅनल तयार करून संपूर्ण पॅनलच निवडून आणू, अशी अपेक्षा ठेवून अनेक जण कमाला लागले आहेत. मात्र, मतदारांकडून चारही मते एकाच पक्षाला देण्याचा उदारपणा दाखविला जाणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक प्रभागांमध्ये क्रॉस वोटिंग करून एकाच प्रभागातून वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून दिले जातील, असाही अंदाज कार्यकत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, नेत्यांचे मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू असतांना आपल्याला सोयीच्या ठरू शकणाऱ्या नवख्या उमेदवारांना हाताशी घेण्याची कसब काही मातब्बर नगरसेवकांसह बड्यां नेत्यांनी साधले आहे. मात्र, या नवख्यांना निवडणून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे.

पक्षांतर अन् तडजोडी
महापालिका निवडणुकीसाठी काही विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांचे आस्तेकदम सुरू आहे, तर काही इच्छुकांकडून कार्यकर्त्यांच्या भावना आणि विविध पद्धतीने सर्वे करून चाचपणी केली जात आहे. शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गजांच्या पक्षबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नव्या चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अनेकांची अडचण झाली आहे. एकट्याच्या बळावर निवडून येणे जिकिरीचे वाटत असल्याने पक्षांतर आणि तडजोड करण्याची तयारी सुरू आहे. या सोबत जातीय समीकरांचादेखील अभ्यास केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चकटफूची आतषबाजी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नगरसेवकांची विविध विकासकामांच्या उद्‍घाटनांची लगीनघाई सुरू आहे. या माध्यामातून ते प्रभागातील नागरिकांना वचनपूर्ती केल्याची जाणीव करून देत आहेत. तर दुसरीकडे, अन्य इच्छुक उमेदवार मतदारांना विविध मोफत सेवा देण्याचा उपक्रम राबवित जनसंपर्क मोहिमेला गती देत आहेत.

मोफत जिओ मोबाइल सिमकार्ड, प्रभागात मोफत वाय-फाय, आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देण्यासाठी शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, धार्मिक सहली, कार्यक्रम, भंडारे, आनंदमेळा,आदी विविध माध्यमातून इच्छुकांनी नागरिकांची काळजी घेतली जात आहे. नववर्षासाठी ३१ डिसेंबरचे ही खास आकर्षणाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपापल्या वोटबँकची खास दक्षता घेत विविध मोफत सेवा देण्याचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जुने नाशिकमधील मुस्लिम बहुल इलाख्यात शनिवारी, ३१ डिसेंबर निमित्त नामवंत कलावंतांचा कथडा परिसरात खास कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

इच्छुकांच्या हालचालींवर लक्ष
निवडणूक काळात मिळणाऱ्या मोफत सेवांमुळे नागरिकही भारावून जात आहेत. दर दिवशी एक नवीन इच्छुक उमेदवार एक नवा उपक्रम व मोफत सेवा देण्यासाठी आपले परिचयपत्रक घेऊन मतदारांच्या दारी धडकतोय. प्रभागाचे मावळते नगरसेवकही या प्रतिस्पर्धी इच्छुकांच्या हालचालींवर खास लक्ष ठेवून आहेत. नगरसेवकांनाही प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विविध विकासकामांचे उद्‍घाटन कार्यक्रमांद्वारे पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडून वचनपूर्ती करून दिल्याची नागरिकांना जाणीव करून देत आहेत.

सुविधा लाभासाठी उसळतेय गर्दी
जुने नाशिमधील यापूर्वीच्या प्रभाग क्रमांक २५, २६, २६, ३८, २९, ३०, ३१, ३७, ३८, ३९, ४०, ५४, ५७ या भागांमध्ये नगरसेवकांनी विकासकामांच्या उद्‍घाटन कार्यक्रमांचे बार उडविले आहेत. यातून मतदारांशी संपर्क वाढविण्यावर त्यांनी भर दिला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांची विकासकामांच्या उद्‍घाटनांची लगीनघाई तर दुसरीकडे अन्य इच्छुक उमेदवारांचे मोफत विविध सेवांचे फंडे वापरत असल्याने निवडणुकीचे वातावरण तापण्यास सरुवात झाली आहे. मोफत मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधा पदरात पाडून घेण्यासाठी नागरिकही पिछाडीवर नाही, हे विशेष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडकर पुन्हा थंडीने गारठले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड परिसरातील तापमानात चढ उतार सुरू असून, सोमवारी ८.१ असलेले तापमान मंगळवारी दोन अंशाने खाली आले. त्यामुळे निफाडकर गारठले आहेत. मंगळवारी या हंगामात दुसऱ्यांदा तापमानात ६ अंशापर्यंत घसरण झाली आहे.

तालुक्यात थंडीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी जास्त होत आहे. मंगळवारी कुंदेवाडी (ता. निफाड) येथील गहू संशोधन केंद्रात ६.४ इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळा निरीक्षक मानकर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत तापमानात कधी वाढ तर कधी घट होत आहे.

मागील पधरवड्यात १० डिसेंबरला ६.४ पर्यंत तापमान खाली आले होते. आणि नंतर ७, ८ इतक्या तापमानाची नोंद होत होती. मात्र थंडीची ही तीव्रता पुन्हा कमी होऊन गेल्या ३ ते ४ दिवसांत ८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचले होते. गेल्या दोन दिवसात पुन्हा थंडीचा तडाखा जाणवत आहे. सायंकाळी हवेत गारवा असल्याने बोचरी थंडीने नागरिक हैराण झाले आहेत. तर पहाटेच्या वेळी थंडीचे प्रमाण अधिक असते. त्यातच पालखेड डाव्या कालव्याला पाण्याचे रोटेशन सुरू असल्याने या भागात थंडी वाढली आहे, असे कुंदेवाडी येथील वेधशाळा प्रमुख मानकर यांनी सांगितले.

आणखी घसरण होणार

कुंदेवाडी येथील या संशोधन केंद्रात सकाळी साडेसातच्या दरम्यान तापमान मोजले जाते. गेल्या चार दिवसात तापमान थेट ६.४ इतके खाली आले आहे. त्यामुळे येत्या काळात तापमान आणखी खाली येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकाऊंटचा अभ्यासक्रम अद्ययावत होण्याची गरज

$
0
0

अकाऊंटचा अभ्यासक्रम अद्ययावत होण्याची गरज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड काळाची गरज असून, या विषयाचा अभ्यासक्रम अद्ययावत होणे आवश्यक आहे. यादृष्टीने शिक्षणक्षेत्रात प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हरियाणा येथील एमडी विद्यापीठातील डॉ. जितेंद्र शर्मा यांनी व्यक्त केले.

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बीसीयूडी विभाग यांच्यातर्फे अकाऊंटिंग, ऑडिटिंग व टॅक्सेशन या विषयांवर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन मंगळवारी कॉलेजमध्ये करण्यात आले. त्यावेळी डॉ. शर्मा बोलत होते. ते म्हणाले, की सीएचा कोर्स विद्यापीठ स्तरावर सुरू करून त्यास सरकारी पातळीवरील सर्व सुविधा देण्यात यावी. तसेच, कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी पातळीवरील ऑडिटिंग करण्याची संधी मिळण्याची गरज आहे. वाणिज्य क्षेत्राविषयी विचारविनिमय करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील १७ प्राध्यापक व ७७ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. डॉ. सुहास धांडे, डॉ. नागराज मसनानी यांचे व्याख्यानही यादरम्यान पार पडले. प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांचे संशोधन पेपर वाचन सत्रदेखील झाले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक अध्यक्षस्थानी होते. डॉ. धर्माजी बोडके, संचालक संपत वाघ, भगवान सानप, प्राचार्य डॉ. वसंत वाघ, उपप्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, विभागप्रमुख डॉ. रुपाली शिंदे आदी उपस्थित होते.


हे करणार आज मार्गदर्शन

आज, बुधवारी (दि. २८) डॉ. हरीश आडके, डॉ. इंद्रकांती शेखर, डॉ. रावसाहेब शिंदे, डॉ. धीरज झाल्टे, डॉ. व्ही. एम. गोवीकर, डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. अरुण गायकवाड यांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांजाविक्रेत्यांवर होणार थेट पोलिसी कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नायलॉन मांजा विक्री आणि वापराला बंदी असतानाही शहरात पतंगबाजीसाठी या मांजाचा वापर होत असल्याची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांचा आदेश धाब्यावर बसवून चोरी छुप्या पध्दतीने नायलॉन मांजाची विक्री तसेच वापर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी मंगळवारी दिला.

‘नायलॉन मांजाची राजरोस विक्री’ या शीर्षकाखाली महाराष्ट्र टाइम्सने मंगळवार (दि. २७) डिसेंबर रोजी वृत्त प्रसिध्द केले. ‘मटा’च्या प्रतिनिधीने त्रिमूर्ती चौक ते पवननगर परिसरातील काही दुकांनांना ग्राहक या नात्याने प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी काही विक्रेत्यांनी नायलॉन मांजा काही मिनिटांत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. याबाबतचा ‘ऑन दी स्पॉट रिपोर्ट’ ‘मटा’ने प्रसिध्द केला. शहर पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाने या वृत्ताची दखल घेऊन नायलॉन मांजा विक्रेते आणि त्याच्या वापरकर्त्यांवर कठोर कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

नायलॉन मांजा पशु, पक्षी आणि मनुष्यालाही घातक ठरत असून नायलॉन मांजाची विक्री करणारे तसेच त्याचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा आदेश पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढला आहे. मकर संक्रांतीनिमित्त शहरात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा (दोरा) निर्मिती, विक्री व वापरावर २० जानेवारी २०१७ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

नायलॉन मांजाविक्री तसेच त्याचा वापर करणाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातील. बाजारपेठेत विक्रेत्यांकडे बनावट ग्राहक पाठवून नायलॉन मांजा विक्रीबाबत खात्री केली जाईल. तो उपलब्ध झाल्यास विक्रेत्यावर कठोर कारवाई करू.
- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images