म. टा. वृत्तसेवा, कळवण
पवार कुटुंबात कुठलेही मतभेद नसून, आम्ही एकसंध आहोत व कळवण तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सर्व तत्पर असल्याची ग्वाही रविवारी पवार कुटुंबीयांनी मेळाव्याद्वारे दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली कळवण येथील श्रीसाई लॉन्सवर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा झाला. त्यावेळी पवार कुटुंबीयांनी मत व्यक्त केले. मेळाव्यात पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकाच वेळी व्यासपीठावर उपस्थित असल्याने ते काय संवाद साधतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. आम्ही तालुक्याच्या विकासासाठी एकसंध असल्याची ग्वाही त्यांनी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
ज्येष्ठ विधिज्ञ शशिकांत पवार, जिल्हा परिषदेचे गटनेते रवींद्र देवरे, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, प्रवीण पवार, उपसभापती संजय पवार, पांडुरंग पाटील, पोपटराव वाघ, अशोक पवार, जितेंद्र पवार, योगेश पगार, शरद गुंजाळ आदी प्रमुख पाहुणे होते.
गेल्या चार दशकांपासून माजी मंत्री ए. टी. पवार यांनी कळवण तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व करून आपले संपूर्ण आयुष्य तालुक्याच्या विकासासाठी खर्च केले. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज व सिंचन या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून तालुका सुजलाम् सुफलाम् केला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तालुक्याचा विकास खुंटला असून, विकासकामे ठप्प झाली आहेत. खासदार, आमदाराला तालुक्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. भाजप सरकारने जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, नोटबंदीमुळे जनता त्रस्त झाल्याची टीका करतानाच पवार कुटुंबात मतभेद नसल्याचेही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नोटबंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यातील जनता आता पश्चात्ताप करीत आहे. आमच्या कुटुंबात कुठलाही वाद व भांडण नसून, भांडण करणे आमच्या कुटुंबाला माहीत नाही. तालुक्याच्या विकासासाठी पवार कुटुंबामागे उभे राहण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत पवार, गटनेते रवींद्र देवरे, नारायण हिरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी मनोगत व्यक्त करून ए. टी. पवार यांनी केलेला विकास जनतेला ज्ञात असून, त्यांच्या विकासकार्याचा या वेळी गौरव केला. दोन वर्षांपासून विकास खुंटला असून, विकासासाठी तालुक्यातील जनता पवार कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून, पवार कुटुंब एकसंध असताना कुणीही या कुटुंबाबाबत अपप्रचार करू नये, असे आवाहनही या वेळी केले.
जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांनी सांगितले, की तालुक्यात ए. टी. पवारांनी आपल्या कारकिर्दीत मंजूर केलेली कामे तालुक्यात सध्या सुरू असून, नवीन कामे करण्यात आमदार व खासदारांना अपयश आले आहे. सुरगाणा तालुक्यातील जनतेचा विकास ज्या खासदार व आमदाराला करता आला नाही ते काय कळवण तालुक्याचा विकास करतील, असा सवालही त्यांनी केला. तालुक्यातील जनता भरकटत चालली असून, अपप्रचाराला बळी पडल्याने विधानसभेत पक्षाला पराभव पत्करावा लागला. मधुकर भदाणे, कडू पाटील, मावंजी पाटील, रामा पाटील, केदा बहिरम, हरिभाऊ वाघ, अशोक पाटील, रामचंद्र गायकवाड, ज्ञानदेव पवार, देवेंद्र गायकवाड, शांताराम जाधव, विलास रौंदळ, प्रवीण रौंदळ, भिवा बागूल, उमेश वाघ, दीपक वाघ, आशुतोष आहेर, सनी बोरसे, मनोज पवार, विष्णू बोरसे, अशोक पाटील, रामदास देवरे, नरेंद्र वाघ, नितीन पवार, सुनील देवरे, सुनील जाधव, रमेश पवार, यशवंत पवार, श्याम भोये, लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते. विलास रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.
पवार कुटुंबीयाबद्दल विरोधकांचा अपप्रचार
तालुक्यातील पाणीप्रश्न महत्त्वाचा असून पाण्याचे आरक्षण, आवर्तन यासाठी तालुक्यातील जनतेला एकत्र यावे लागणार आहे. आमच्या कुटुंबात कलह असल्याचा विरोधक अपप्रचार करीत आहे. आम्ही सर्व एक आहोत आणि तुमच्यासमोर आहोत. केवळ तालुक्यातील जनतेच्या हिताची जोपासना करण्याची शिकवण आम्हाला ए. टी. पवारांनी दिली आहे. त्या हिताची जोपासना करण्याचे आमचे कर्तव्य असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पवार कुटुंब व राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन नितीन पवार यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट