Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सभापती तुरुंगात, संचालक भाजपात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे तुरुंगात असतानाच त्यांचे काही खास समर्थक व विद्यमान संचालकांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यात विद्यमान सहा संचालक व दोन माजी संचालकांचा समावेश आहे. विद्यमान संचालकांत विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, युवराज कोठुळे, भाऊसाहेब खांडबहाले, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे यांचा समावेश आहे. तर माजी संचालकांमध्ये बाजार समितीचे उपसभापती सुरेश गंगापुत्र व माजी संचालक राजाराम धनवटे यांचा समावेश आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या खात्यातून धनादेशांद्वारे पैसे काढून ते बळकावल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कृउबा सभापती व माजी खासदार देवीदास पिंगळे यांना अटक केली. त्यानंतर ते तुरुंगातच आहे. त्यांच्या समर्थकांना कोणताच आधार नसल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची संधी शोधत आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, सोसायटीचे संचालक यांनीही प्रवेश केला. या संचालकांमध्ये काहींना भाजपकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी घाईत हा प्रवेश सोहळा करून घेतला. यातील बहुतांश संचालक हे राष्ट्रवादीत होते. त्यामुळे राष्ट्रवादीलाही यामुळे मोठा धक्का बसला आहे.

१५ संचालक समर्थक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर पिंगळे यांचे गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपासून वर्चस्व आहे. १८ संचालकांपैकी पिंगळेंचे १५ जण समर्थक आहेत. त्यांनी या निवडणुका विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेवून लढवल्या असल्या, तरी त्यात राष्ट्रवादी समर्थकांचेचे प्रमाण अधिक आहे. एकाच वेळी सहा संचालक भाजपात दाखल झाल्याने कृऊबात याच पक्षाचे वर्चस्व राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना, भाजपची बंडोबांसाठी कूटनीती

$
0
0

नाशिक : बंडखोरांकडे लक्ष ठेवून असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीला जेरीस आणण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून सध्या सुरू आहे. इच्छुक उमेदवारांना शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ३ फेब्रुवारीपर्यंत झुलवत ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आली असून, कमीत कमी बंडखोरी व्हावी, याची दक्षता या दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे.

मुलाखती पार पडून दोन दिवस उलटले तरीही कोणत्याही पक्षाने आपली यादी प्रसिद्ध केलेली नाही. महापालिका निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना एबी फॉर्मसह अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जासाठी शिवसेना-भाजपकडे एका जागेसाठी किमान चार ते पाच इच्छुक आहेत. एकालाच उमेदवारी अर्ज मिळणार असल्याने उर्वरित कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्याची कसरत पक्षाला करावी लागणार आहे. दुसरीकडे शिवसेना, भाजपमधील बंडखोरांवर मनसे, काँग्रेस राष्ट्रवादी लक्ष ठेवून आहे. बंडखोरांना सोबत घेऊन रिंगणात उतरण्याची व्यूहरचना या पक्षांनी आखली आहे. यादी प्रसिद्ध करण्यास टाळटाळ करीत इतर विरोधी पक्षांना शिवसेना- भाजपने शह दिल्याची चर्चा सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता इच्छुकांच्या हाती एबी फॉर्म देण्यात येणार आहे. फारच किचकट वाद असलेल्या जागांबाबत विचारविमर्श सुरू ठेवायचा आणि ३ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता इच्छुकांच्या हाती एबी फॉर्म देण्यात येणार आहे. उर्वरित कार्यकर्त्यांना काहीही करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही, याची दक्षता दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. शिवसेना, भाजपच्या या कूटनीतीमुळे मनसे, काँग्रेस- राष्ट्रवादी यांचेही घोडे अडले असून, राजकीय बाजारपेठ गरम राहणार असल्याचे दिसते.


माघी गणेश जयंती शांत
आज, मंगळवारी माघी गणेश जयंती असल्याने अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्त काढून ठेवला होता. मात्र, पक्षीय पातळीवरील राजकारणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला. आता नक्की कोणत्या दिवसाचा मुहूर्त काढायचा, हा इच्छुकांसमोर प्रश्न असून, नेमक्या मुहूर्ताला एबी फॉर्म मिळणार काय, याची प्रतीक्षाही कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविश्रांत मेहनतीतून फुलला ताटवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बाहेर तप्त ऊन पडलेले असताना ‘येथे’ आत मात्र प्रचंड गारवा आहे. येथे अनेकरंगी फुले आहेत, लाल, पिवळी, केशरी, गुलाबी इतकेच काय जांभळी फुलेदेखील येथे आहेत. फुलांचे शेकडो प्रकार या बागेत आहेत आणि ही सर्व फुले फुलवली आहेत एकाच माणसाने. त्याच्या अविश्रांत मेहनतीला फळ आले असून, यातून हा सुगंधी ताटवा बहरला आहे. त्यातून मनाला प्रसन्नता प्रदान करीत आहेत.
अतिशय रखरखीत असलेल्या नाशिकरोड रस्त्याने जाताना नासर्डी पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या नाशिक क्लबजवळ आल्यावर मात्र मनाला आल्हाददायक वाटते. तेथील हिरवाई मनाला भावते. अनेकविध रंगांची फुले येथे सध्या फुलली आहेत. सिनर, कार्वेशन, केल, टेटीयम अशी एकापेक्षा एक सरस फुले येथे आहेत. तब्बल ५५ जातीची फुले येथे सुखनैव नांदत आहेत. १४० प्रकारचे गुलाब तर १८० प्रकारचे अॅडेनियम येथे आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात केवळ एक दोन ठिकाणीच इतक्या प्रकारचे अॅडेनियम पहायला मिळतात, त्यातील एक ठिकाण म्हणजे ही बाग आहे. मनाला उल्हास देणारी ही फुले फुलवली आहेत रामेश्वर सारडा यांनी. एक फुल म्हणजे आनंद अशी त्यांची साधी सोपी व्याख्या आहे. फुले पाहण्यातून जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. तो आनंद नाशिककरांना विनामूल्य मिळावा या अपेक्षेने सारडा यांनी ही बाग फुलवली असून ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत येथे पुष्पोत्सव भरविण्यात आला आहे. या पुष्पोत्सवात ही सर्व फुले नाशिककरांना पाहता येणार आहे.
‘वर्षभरापूर्वी मनाशी ठरवून फुले लावली, बंगळूरू येथील प्रसिध्द लालबाग पुष्पोत्सव, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत येथील मोठमोठे पुष्पोत्सव नजरेखालून घातले आणि मनाशी ठरवले, नाशिककरांना आपण फुलांतून आनंद वाटायचा.’ रामेश्वर सारडा सांगत होते. ‘आपल्याला ज्यात आवड आहे ते काम करायला मिळाले तर आणखी काय हवे, मी बाग फुलवली.’ या पुष्पोत्सवासाठी सारडा यांनी प्रचंड मेहनत घेतली असून प्रत्येक फुलाला नाव देण्यात येणार आहे. बॉटनीच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. शहरातील विविध शाळांतील मुलांसाठी दुपारची वेळ ठेवण्यात आली आहे. सकाळी ९.३० पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
नाशिक शहरात पुष्पप्रदर्शनच होत नाही. मनपा, पीडब्ल्यूडी विभागाचा पुष्पोत्सव होत असे. परंतु सौंदर्यदृष्टी नसलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तो बंद पडला. लिलियमसारखी परदेशातील फुले नाशिककरांना दाखविण्यासाठी हाडाचा उद्योजक असणारा एक माणूस आपले ध्येय काही क्षणांसाठी बाजूला ठेवून आपल्या छंदाला वेळ देत दिवसरात्र फुलांसाठी झटत आहे. फुलांतून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो, हे सांगत एकटा हजारो फुले फुलवून दाखवतो आहे, ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.

माणसाला एकतरी छंद असावा. मला फुले फुलविण्याचा छंद आहे. मला त्यांची निगा राखायला आवडते. आज माझ्या बागेत हजारो फुले आहेत व त्यांनी मला संतुष्ट केलेले आहे. मला कोणत्याही झाडाच्या फांदीत त्याचे फुल दिसते. म्हणून मी फांदी वाढवतो, प्रेमाचे सिंचन करतो, त्यातून फुले उमलतात.
- रामेश्वर सारडा, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक संघटना मोठ्या उद्योगांना जागा देणार का?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहर व जिल्ह्यात उद्योगांचे मोठे जाळे पसरले असताना अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत. त्यातच नुकतेच नाशिकभेटीला आलेले टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाशकात मोठा उद्योग आणावा यासाठी साकडे घातले. परंतु, मोठ्या उद्योगांना औद्योगिक संघटना भूखंड उपलब्ध करून देणार का, असा सवाल उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. शेकडोहून अधिक बंद असलेल्या कारखान्यांची समस्या मार्गी लावणार कोण, असा सवालही उपस्थित होत आहे. अशा बंद कारखान्यांबाबत औद्योगिक संघटना दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

शहरातील उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या निमा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकभेटीला आलेल्या रतन टाटा यांच्याकडे मोठा उद्योग नाशिकला आणण्याबाबत मागणी केली. अनेकदा मोठे उद्योजक नाशिकला आल्यावर निमा व आयमाकडून असी मागणी केली जाते. परंतु, मोठ्या उद्योगांना लागणारी जागा औद्योगिक संघटना उपलब्ध करून देणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. काही वर्षांपूर्वी वोक्सवॅगन या कारनिर्मितीतील बड्या उद्योगाने नाशिक जिल्ह्यात कारखान्यासाठी जागा मिळावी यासाठी अथक प्रयत्न केले होते. परंतु, दलालांमुळे हजारो हातांना मिळणारे काम नाशिकमधून औरंगाबादला गेले. यावेळी संबंधित कारखान्याच्या प्रतिनिधींनी औद्योगिक संघटनांकडेदेखील धाव घेतली होती. परंतु, त्या कारखान्याच्या प्रतिनिधींना पाहिजे ती मदतच मिळाली नाही. दुसरीकडे जिल्ह्यात अनेक मोठे कारखाने गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. अशा बंद कारखान्यांची शेकडो एकर जागा धूळ खात पडून आहे. यात अनेक प्रोफेशन दलालांचे लागबंधे असल्याने मनासारखी किंमत मिळाल्यावरच बंद कारखान्यांची जागा लिलावात काढण्यात येत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बंद कारखान्यांच्या मोक्याच्या जागा पडून असल्याने शासनाचेदेखील मोठे नुकसान होत आहे. काही उद्योगांना जागा पाहिजे असूनही ती मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे एमआयडीसी व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी बंद कारखान्यांबाबत एकत्रित येऊन निर्णय घ्यावा, असे मत जाणकार उद्योजकांनी व्यक्त केले आहे.


एकत्रित उपाय शोधावेत

जिल्ह्यात अनेक मोठे कारखाने गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. एमआयडीसी व औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अशा बंद कारखान्यांबाबत विचारल्यास न्यायप्रविष्ट बाब, असे उत्तर देऊन ते मोकळे होतात. परंतु, शासनाची लीजवर असलेली बंद कारखान्यांची जागा धूळ खात पडून असल्याने कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. एमआयडीसी व औद्योगिक संघटनांनी एकत्रित उपाय का शोधू नयेत, असा सवालही उद्योगवर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक खर्च मर्यादा झाली दुप्पट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे रण आता चांगलेच तापू लागले आहे. ज्या मुद्द्यांकडे संभाव्य उमेदवारांचे लक्ष लागून राहीले होते ती निवडणूक खर्च मर्यादा अखेर निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. आयोगाने या खर्चासाठी घालून दिलेल्या बंधनानुसार नाशिक मनपासाठीच्या उमेदवारांना ८ लाख रुपयांपर्यंत तर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ६ लाखांपर्यंत आणि पंचायत समिती सदस्यत्वासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ४ लाख रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करता येणार आहे. अगोदरच्या तरतूदींमध्ये सुधारणा करत बदलांसह आयोगाने ही खर्च मर्यादा मंगळवारी जाहीर केली.

गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा आयोगाने उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ही दुपटीने वाढविली आहे. गत पालिका निवडणुकांमध्ये उमेदवारांसाठी ही खर्च मर्यादी ४ लाखांच्या घरात होती. ती वाढवून आता ८ लाखांवर नेण्यात आली आहे. तर जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी लढणाऱ्या उमेदवारांकरीता ३ लाखांहून ही मर्यादा आता ६ लाखांवर आणण्यात आली आहे. पं.स. साठी खर्च २ लाखांहून आता ४ लाखांवर आणण्यात आला आहे.


हिशेबाची जुळवाजुळव

निवडणुकीच्या आखाड्यात उतरणाऱ्या उमेदवारांनी साम दाम दंड आणि भेद या तंत्राचा उपयोग करण्याची रणनीती आखली आहे. हाय व्होल्टेज मतदारसंघात पेट्यांच्या भाषेत पैसा ओतण्याची तयारीही खासगी चर्चांमध्ये काही उमेदवारांकडून दाखविली जात आहे. त्या तुलनेत आयोगाने जाहीर केलेली मर्यादा ही अवघी सरकारी खर्चाच्या परिभाषेत मोडणारी आहे. मूळ खर्चाऐवजी हिशेब सादरीकरण करताना बहुतांश उमेदवारांना जुळवाजुळव करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज यादी, उद्या प्रचार शुभारंभ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने उमेदवारांची पहिली यादी बुधवारी (१ फेब्रुवारी) जाहीर केली जाणार आहे. तसेच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे गुरुवारी (२ फेब्रुवारी) नाशिकमध्ये सेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १२२ जागांसाठी ८१० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्याचा एकत्रित अहवाल संपर्कप्रमुख अजय जौधरी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. त्यावर उद्धव हे अंतिम निर्णय घेणार असून, उमेदवारांची यादी बुधवारी सादर होणार असल्याचे सेनेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

शहरातील प्रमुख पक्षांपैकी एकानेही अद्याप उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बुधवारी ही यादी जाहिर झाल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पक्षाच्यावतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे गुरुवारी करणार
आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सूर जुळले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आघाडी करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आघाडीसंदर्भातील बैठक तीन दिवसापूर्वी निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा या पक्षाचे सूर जुळले आहेत. तीन प्रभागांवरून आघाडीचे घोडे अडल्यानंतर हा तिढा आता स्थानिक पातळीवर सोडवला जाणार आहे. त्यासाठी स्थानिक नेत्यांची प्रदीर्घ बैठक नाशिकमध्ये झाली. त्यावर खलबत्ते व चर्चा रात्री उश‌िरापर्यंत करण्यात आले.

मुंबईत राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची चर्चा होती. या बैठकीनंतर हा प्रश्न पुन्हा स्थानिक पातळीवरच टोलावण्यात आला आहे. त्यामुळे यावर लवकरच निर्णय होईल असे सुत्रांकडून सांगण्यात आले. ४, १२, १६ या तीन प्रभागांवरून एकमत न झाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली होती.

शिवसेना व भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्यामुळे एकत्र लढवण्याचा दोन्ही पक्षांनी निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयंत जाधव यांच्यासह दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठकीत उपस्थित राहत एकमत करण्यावर जोर दिला आहे. भारतीय जनता पक्ष आणि ‌शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. त्यातच आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीसाठी सकारात्मक वातवरण तयार केल्यामुळे निवडणुकांमध्ये रंगत वाढणार आहे.

आम्ही स्थानिक पातळीवरच हा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेतली असून, आघाडीत सकारात्मक चर्चा झाली आहे. निर्णय घेवून तो प्रदेशकडे पाठवून आघाडी अंतिम केली जाईल.

-शरद आहेर, काँग्रेस शहराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची लागणार कसोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदारसंघासाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. शहरात यासाठी बहुतांश पोलिस स्टेशनच्या हद्दीत मतदान केंद्रे असणार आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पोलिसांसाठी पदवीधरची एक्झरसाईज महत्त्वाची ठरणार आहे. पोलिस स्टेशननिहाय रुटमार्च सुरू झाले असून, याच दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी पक्षांकडून उमेदवारी निश्चित केली जाणार असल्याने पोलिसांना दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

राज्यातील बदलत्या घडामोडींचा प्रभाव पदवीधर निवडणुकीवर पडतो आहे. युती फिस्कटल्याने निवडणुकीची गणितेही बदलली आहेत. या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदान पार होणार आहे. शहरातील एखाद-दुसरे पोलिस स्टेशनचा अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याच दिवशी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. पक्षाकडून दिला जाणारा एबी फॉर्म मिळणे, उमेदवारी नाकारणे यामुळे राजकीय पटलावरील वातावरण गरम राहण्याची चिन्हे आहेत. त्यातच पदवीदर उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने दुहेरी ताण पोलिसांना सांभाळावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची व्युहरचना आखली आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी याबाबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते.

पदवीधरसाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय रूटमार्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय संशयितांची धरपकड, नोट‌िसा बजावणे आदी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. याबाबत सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, राजकीय कार्यकर्त्यांविरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. १४९ नुसार नोट‌िसा बजावण्यात येत असून, प्रसंगी संशयितांना ताब्यात घेण्यात येत आहे. समाजकंटकांना कोणतीही मुभा नसून, पोलिस कठोर कारवाई करतीलच, असे संबंध‌ित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कळवण तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथील तरुण शेतकरी रंगनाथ रामदास निकम (वय ३२) यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ठप्प झालेली आर्थिक उलाढाल व कर्जाच्या परतफेडीत निर्माण झालेली अडचण यामुळे ते वैतागले होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

रंगनाथ निकम यांनी स्टेट बँकेकडून पावणेतीन लाख रुपये पीककर्ज, तसेच ट्रॅक्टरसाठी वित्तीय संस्थेकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुमारे पाच एकर शेती असलेल्या निकम यांना तीन वर्षांपासून असलेला दुष्काळ, तसेच बिगमोसमी पाऊस व गारपीट यामुळे नापिकीला सामोरे जावे लागले होते. त्यातच पीककर्ज व ट्रॅक्टर कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी बँकेकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाल्याने निकम अस्वस्थ होते. या कर्जाला वैतागून ३० जानेवारी रोजी ते बाहेर गेले. त्यांचा शोध घेतला असता, त्यांच्या भावाला झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत निकम यांचा मृतदेह आढळला. रंगनाथ निकम यांच्या मागे दोन भाऊ, वृद्ध आईवडील असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परप्रांतीयावर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिन‌िधी, नाशिक

शहरातील राजकीय वातावरण तापलेले असतांनाच सोमवारी (दि.३०) रात्री परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्यावर दोघांनी चाकू हल्ला करीत जखमी केले. ही घटना उपनगर परिसरात घडली. या प्रकरणी दोघा अज्ञात तरूणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोनू मदनलाल गनगोरीया (वय २७, रा. पंचशिलनगर,शिवाजीनगर, मूळ मध्यप्रदेश) या युवकाने तक्रार केली आहे. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास कन्हैया स्वीट जवळील मशीजवळ पाणीपुरी विक्री करीत असताना हा प्रकार घडला. पाणीपुरी खाण्यासाठी आलेल्या दोघांकडे त्याने पैसे मागितल्यानंतर वादास सुरूवात झाली. यावेळी दोघांपैकी एकाने त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला तर दुसऱ्याने डोक्यात वजनी वस्तू मारली. यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेचा अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.

प्रवाशास लुटले

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमधील तिघांनी एकास लुटल्याची घटना मुंबई आग्रा हायवेवरील दहावा मैल येथे घडली. मालेगाव येथील प्रवाशाकडील मोबाइलसह रोकड बळजबरीने काढून घेण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर पंजाबराव ठाकरे (वय ४४, रा. जलधारा कॉलनी, चर्च मागे, मालेगाव) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. रविवारी कामानिमित्त ठाकरे शहरात आले होते. रात्री काम आटोपून मालेगाव येथे जाण्यासाठी ते द्वारका सर्कल येथील बस स्टॉपवर पोहचले. बसची प्रतिक्षा करीत असताना एक एक लाल रंगाची कार त्यांच्या जवळ येऊन थांबली. मालेगावला जायचे का अशी कारचालकाने विचारणा केली. लवकर पोहचू या अपेक्षेने ठाकरे कारमध्ये बसले. मात्र आडगावपासून काही अंतरावर पुढे जाताच कारचालकासह अन्य दोघांनी ठाकरे यांना दमबाजी केली. दहावा मैल येथे मारहाण करीत कारमधील संशयितांनी त्यांच्याकडील मोबाइल व खिशातील पाच हजार रुपयांची रोकड काढून घेण्यात आली. कारमधून उतरल्यानंतर ठाकरे यांनी भद्रकाली पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.

मद्यपी चालकाची धडक

मद्याच्या नशेत बेफाम करा चालवून दोघांना धडक देणाऱ्या कारचालकाविरोधात गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दोघे पादचारी जखमी झाले आहेत. सागर सुरेश विसे (२१) असे संशयित कारचालकाचे नाव आहे. गंगापूररोडवरील गुप्ता लॉन्स समोर रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मद्याच्या नशेत संशयित आरोपी गंगापूर गावाकडून भरधाव वेगात कारने (एमएच १५ एफ एफ ४७७६) जात असताना हा अपघात झाला. गुप्ता लॉन्ससमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शब्बीर शेख या युवकास कारने धडक दिली. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात पुढे जावून संशयिताने आकाश बोडके यास धडक दिली. या अपघातात दोघे पादचारी जखमी झाले असून सागर विसे विरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास नाईक झनकर करीत आहेत.

सिडकोत घरफोडी

सिडकोतील विजयनगर भागातील घर फोडून चोरट्याने ६९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना सचिन मालविया (रा. मिश्रा दुकानामागे, मोरवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. २७ ते २९ जानेवारी दरम्यान मालविया कुटूंबिय बाहेरगावी गेले होते. या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच लोखंडी कपाटातून सुमारे ६९ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरी केले. अधिक तपास निरीक्षक खडके करीत आहेत.

महिला ठार

भरधाव वेगात जाणाऱ्या स्कुटरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रशांत चंद्रकांत देसाई या स्कूटर चालकाविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा सुभाष शिरोडे (५८ रा. धनश्री कॉलनी, डिजीपीनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भामरे सिडकोतील भामरे ट्रेंडर्स येथे किराणा घेण्यासाठी गेल्या होत्या. गणेश स्विट समोरून त्या पायी जात असताना भरधाव स्कुटर (एमएच १५ एफएल ५६७९)ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिरोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

मंगळसूत्राची चोरी

नाशिकरोड ः हळदीकुंकू कार्यक्रम करून घरी परतणाऱ्या महिलेची पाच तोळ्याची पोत मोटरसायकलस्वारांनी लांबवली. यामिनी दत्तात्रय चंद्रात्रे (४७, रा. फ्लॅट नं. १६, आभिष सोसायटी, शिवाजीनगर, दत्तमंदिराजवळ, नाशिकरोड) ही महिला मैत्रिणीसह क्षत्रिय मंगल कार्यालय येथे हळदी कुंकू कार्यक्रम आटोपून घरी परतत होती. मुक्ताई हॉस्पिटलजवळ काळ्या मोटारसायकलवर आलेल्या युवकाने त‌िच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची व एक लाखाची सोन्याची पोत लांबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरमध्ये शाळकरी मुलाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेच्या मैदानावर कवायतीचा तास सुरू असताना इयत्ता नववीतील अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्याच सहकाऱ्याचा भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. ओझर टाऊनशिपमधील एचएएल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा प्रकार घडला. सौरभ मनोजकुमार पाल (वय १५) असे मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

डोक्यात टपली मारून लपून बसण्याच्या कारणावरून सौरभचा वर्गातील संशयित अल्पवयीन विद्यार्थ्याशी दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. मंगळवारी दुपारी शाळेच्या मैदानावर कवायतीचा तास सुरू असताना दोघांमध्ये पुन्हा वाद उद््भवला. संशयित विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने सौरभच्या छातीत भोसकले. सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिल्यानंतर शिक्षकांनी त्याला एचएएल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ओझर पोलिसांनी संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. शाळेतील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाल्याची शक्यता असून, हे फूटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचे दिसते. अद्याप प्राथमिक चौकशी सुरू असून, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीवन उत्सव’मधून प्रेरणा घेऊन जातेय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘मी तुम्हाला काय संदेश देणार? उलट जीवनउत्सव सारख्या जगणं समृद्ध करणाऱ्या आणि सामाजिकता व पर्यावरणाची जाणीव करून देणाऱ्या जीवनशैली सप्ताहातून मीच प्रेरणेचा संदेश घेऊन चालले आहे. नाशिककरांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात सहभागी होण्याचे हे क्षण कायम माझ्यासोबत राहतील, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी दिली. निमित्त होते जीवनउत्सव महोत्सवातील प्रकट मुलाखतीचे.

गेले आठवडाभर नाशिककरांना साध्या सोप्या उपायांतून पर्यावरणपुरक आणि निसर्गप्रेमी जीवनशैली शिकविणाऱ्या जीवनउत्सव सप्ताहाचा ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या प्रकट मुलाखतीने समारोप झाला.

मुक्ता नावरेकर आणि डॉ. धनंजय अहिरे यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान आपला कलेचा प्रवास आणि सामाजिक जीवनाचा पटच ज्योती सुभाष यांनी उलगडून दाखविला. आईवडील सेवादलाच्या चळवळीत कार्यकर्ते होते. त्यांना पाहतच लहानाचे मोठे झालो. कलेची उर्मी लहानपणापासूनच अंगी होती. पुढे राष्ट्रसेवादलाच्या कला पथकांमधून अभिनयाची संधी मिळाली. निळूभाऊ (निळू फुले) वसंत बापट यांच्यासोबत काम करायला मिळाले. त्यातूनच पुढे नृत्य, नाटक, साहित्य, सिनेमा असा प्रवास घडला. मात्र या संपूर्ण प्रवासात माणसांशी, मातीशी नाळ जोडणारे सिनेमे, नाटक यांच्याशी नाते दृढ होत गेले, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरवात रुपाली काळे बेलगावकर आणि गौतमी बेलगावकर यांच्या सुरेल गायनाने झाली. प्रास्ताविक संगीता पानगव्हाणे यांनी केले. आभार ऋता नावरेकर हिने मानले. यंदाचा जीवनउत्सव श्रद्धा मॉल येथे घेण्यात आला. या उत्सवात शेकडो नाशिककरांनी पर्यावरणपुरक जीवनशैलीची प्रेरणा घेतली.


..म्हणूनच आडनाव सुभाष ठेवले

समाजात जात धर्म यांच्या पलिकडे जाऊन माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. म्हणूनच मी आडनाव न लावता पती सुभाष यांचे नाव लावले. त्यातूनच ‘ज्योती सुभाष’ असे नाव मी घेतले. या मुलाखतीत सुभाष यांना पर्यावरणपुरक जीवनशैलीसह त्यांची आवडीनिवडीबद्दलही त्यांनी मोकळेपणे भाष्य केले. या महोत्सवात आल्याचा मला फायदाच झाला आहे, असे सांगून ज्योती सुभाष यांनी उपस्थितांसह आयोजकांची मने जिंकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी शिक्षकांना निवडणूक कामातून दिलासा

$
0
0

अश्विनी कावळे, नाशिक

नाशिक : राज्यभरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खासगी शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. शालेय कामकाजाबरोबरच निवडणुकीचे कामकाज करणे अशक्य असल्याबाबतची ओरड यापूर्वीच शिक्षक आणि शाळा संस्थाचालकांनी उपस्थित केली होती. या संदर्भात ठाण्यातील ‘अनएडेड स्कूल फोरम’ने ठाणे महापालिका आयुक्तांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेनुसार राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शिक्षकांसाठी महत्त्वाचा ठरला आहे.

अशैक्षणिक कामांनी वैतागलेल्या शिक्षकांच्या डोक्यावर महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूक कामांची टांगती तलवार होती. फेब्रुवारी महिना सुरू झाला असल्याने एकीकडे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तयारी, तर दुसरीकडे निवडणूक कामकाजाची धास्ती या गर्तेत शिक्षक अडकले होते. यापासून दिलासा मिळण्यासाठी ठाण्यातील अनएडेड स्कूल फोरमने गेल्या आठवड्यात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई हायकोर्टाने मंगळवारी हा निर्णय दिला. यापूर्वीही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत असा प्रश्न उद््भवला होता. शाळांमधील शिक्षकांची सविस्तर माहिती निवडणूक कामकाजासाठी मागवण्यात आली होती. तेव्हादेखील ठाण्यातील विनाअनुदानित शाळा संघटनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून त्यावर शिक्षकांच्या बाजूने निर्णय झाला होता, तसेच पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे महापालिका निवडणुकांमधील कामकाजापासून मुक्तता मिळाली आहे.

राज्यभरातील शिक्षक टेन्शनलेस

या महिन्याच्या मध्यापासून दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांना, तसेच कलमापन चाचणीला सुरुवात होणार आहे. या परीक्षांच्या कामकाजाचा भार शिक्षकांवर असल्याने निवडणूक कामकाजाबाबत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकांचे कामकाज व या परीक्षांचे कामकाज यांचा समन्वय साधणे शक्य नव्हते. त्यामुळे हा निर्णय राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा देणारा ठरला आहे.

शालेय कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात घेऊ शकत नाही, या संबंधित नियमानुसार आम्ही याचिका दाखल केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय झाल्याने राज्यभरातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

- एस. सी. केडिया, सेक्रेटरी, विनाअनुदानित शाळा संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेसाठी आजपासून अर्ज स्वीकृती

$
0
0

म. टा. नाशिक, नाशिक

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज, बुधवारपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली असून, याबाबची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यामुळे ग्रामीण भातील कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये उत्साह संचारला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. बहुतांश पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असल्या तरी उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात (दि. २१ फेब्रुवारीला) मतदान प्र‌क्रिया राबविण्यात येणार असून, इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र गट आणि गणांमधील रंगतदार लढतींचे चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. खेडोपाडी आणि तालुक्याच्या गावांमध्ये प्रचाराचा धुरळा उडत असून १ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ अशी अर्ज स्वीकारण्याची वेळ असून,

पक्ष आणि उमेदवारांच्या सोयीसाठी रविवारी (दि. ५ फेब्रुवारी) रोजी देखील अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.

एका तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसह किमान सात कर्मचारी अर्ज स्वीकृतीच्या प्रक्रियेसाठी नेमण्यात आले आहेत. तर पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज स्वीकृतीसाठी किमान १० कर्मचाऱ्यांची प्रशासनाने नियुक्ती केली आहे.

अर्ज छाननीवेळी अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी अर्ज स्वीकृती करतानाच पुरेपूर दक्षता घ्या, असे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अर्जासोबत लगेचच एबी फॉर्म देण्याची आवश्यकता नसली तरी अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी (दि. ६ फेब्रुवारी) रोजी दुपारी तीनपर्यंत तो सादर करणे अपरिहार्य असणार आहे. उमेदवार स्वत: किंवा त्याचा कार्यकर्तो, किंवा पक्षाशी संबंधितांनी अर्ज आणून दिल्यास तो स्वीकारला जाणार आहे.

जिल्हा परिषदेसाठी बुधवारपासून तहसील कार्यालय स्तरावर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्रत्येक तहसील कार्यालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अर्ज स्वीकारण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असून, या दिवशी दुपारी ३ पर्यंत उमेदवारांनी एबी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

- शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

$
0
0

टीम मटा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली खरी, मात्र पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकाही उमेदवाराने अर्ज सादर केला नाही. पक्षांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतरच अर्ज भरण्यास वेग येणार आहे. निवडणूक कक्षांमध्ये शुकशुकाटच होता. ऑनलाइनवर मात्र २६ उमेदवारांनी माहिती भरल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
मालेगाव ः तालुक्यातील सात जि. प. गट व १४ गणांसाठी निवडणूक होत असून, अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. यावेळी प्रथमच इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचे असल्याने अनेक इच्छुकांचा पहिला दिवस ‘भाऊ ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?’ या प्रश्नांचे उत्तर शोधण्यातच गेला. प्रशासनकडून अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यात आली असून प्रांत कार्यालात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली गट-गणनिहाय एक मंडळ अधिकारी, दोन तलाठी असे २१ अधिकारी, १२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ६ फेब्रुवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

निवडणुकीसाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी पहिल्या दिवशी ऑनलाइन प्रक्रिया अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे येथील प्रांताधिकारी कार्यालायात बुधवारी दिवसभर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घेण्यातच अनेकांचा वेळ गेला. यासाठी निवडणूक शाखेकडून उमेदवारांना मार्गदर्शन केले जात आहे. अर्ज दाखल करण्याचे संकेतस्थळ, आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र, बँक खाते आदी कागदपत्रे याबाबत उमेदवारांना निवडणूक नायब तहसीलदार गिरीश वाखारे, जगदीश निकम यांच्याकडून मार्गदर्शन केले जात असून, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळाव करण्यासाठी प्रांत, तहसील, न्यायालय आदी कार्यालयांच्या आवारात बुधवारी इच्छुकांनी गर्दी केली होती. ऑनलाइन प्रक्रियेत काही त्रुटी राहून आपला अर्ज बाद होऊ नये यासाठी उमेदवार काळजी घेत आहेत. प्रांत आवारात तालुक्यातील उमेदवारांकडून मात्र ऑनलाइन प्रक्रियेबाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. अर्थात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने सर्वच इच्छुक कामाला लागले असून, महा ई-सेवा केंद्र, सायबर कॅफे याठिकाणी उमेदवारांनी गर्दी केली आहे. दोन दिवसात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढेल असा अंदाज आहे.

मनमाडमध्येही शांतता

मनमाड ः नांदगाव व चांदवड येथे एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही. जिप व पं स निवडणुकीसाठी उमेदवारी कोण करणार? कोणत्या पक्षाचे तिकीट कोणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली असून, आता गुरुवारी तरी उमेदवारी अर्ज भरण्याचा श्रीगणेशा होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारपासून दोन्ही तालुक्यांमध्ये वातावरण तापणार असून, पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुककांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

निफाडमध्येही चाचपणी

निफाड ः तालुक्यात बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. नाशिक जिल्हा परिषदेत सर्वात जास्त दहा गट निफाड तालुक्यात आहेत. पंचायत समितीसाठी २० गण आहेत. मात्र बुधवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाला नाही.

येवल्यातही पाटी कोरीच

येवला ः जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस बुधवारी सुरुवात झाली खरी, मात्र येवला तालुक्यातील कुठल्याही गट अन् गणातुन बुधवारच्या पहिल्या दिवशी कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या निवडणूक प्रक्रियेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांनी आपले अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर ऑनलाइन भरायचे असून, संकेतस्थळावर भरलेल्या या अर्जाची प्रिंट काढून संबधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करायची आहे. जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस बुधवारी (दि.१) सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी तालुक्यात कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल दाखल न झाल्याने पहिल्या दिवसाची पाटी कोरीच राहिली. येवला तालुक्यातील पाटोदा,मुखेड,नगरसुल,राजापुर व अंदरसुल या जिल्हा परिषदेच्या पाच गटांसह,येवला पंचायत समितीच्या पाटोदा,धुळगाव, मुखेड,चिचोंडी बुद्रुक,नगरसुल,सावरगाव,राजापुर, सायगांव,अंदरसुल व नागडे या दहा गणात पंचवार्षिक निवडणुक होत आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवाऱ्या जाहीर झाल्यावरच एकंदरीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस मोठा वेग येणार असल्याचे रागरंग दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पदवीधर’साठी नाही एकही केंद्र संवेदनशील

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी (दि. ३) होत असून, या निवडणुकीची प्रशासकीय पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. नाशिक
विभागातील पाच जिल्ह्यांतील एकूण ३५३ मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठीच्या मतदानाची सोय करण्यात आली असून, यापैकी एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे निवडणूक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिक विभागाची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १७ उमेदवार लढवीत असले, तरी खरी लढत भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांतच होत आहे. काँग्रेसला ही जागा आपल्याकडे राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत, तर भाजपनेदेखील ही जागा पुन्हा आपलाकडे खेचून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

यंत्रणा कामाला

या निवडणुकीसाठी विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. उपायुक्त (सामान्य प्रशासन) ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघत आहेत. याशिवाय विभागातील सर्व ५४ तालुक्यांचे तहसीलदार झोनल ऑफिसर म्हणून कामकाज पाहत आहेत.


मतदान केंद्रनिहाय कर्मचारी नियुक्त

या निवडनुकीसाठी एकूण ३५३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष, तीन पोलिंग ऑफिसर, एक शिपाई व एक सूक्ष्म निरीक्षक असे सहा कर्मचारी कामकाज बघणार आहेत. याप्रमाणे नाशिक विभागातील सर्व मतदान केंद्रांसाठी एकूण २,११८ कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय नियोजन पूर्ण झाले आहे. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी याप्रमाणे एकूण ३५३ पोलिस कर्मचारीही उपलब्ध असणार आहेत.

मतदानाची पद्धत अशी

पदवीधर मतदारसंघासाठी पसंतीक्रम पद्धतीने मतदान करावयाचे आहे. मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर मतदान अधिकारी मतदाराची ओळख पटवून मतदाराची स्वाक्षरी घेणार आहेत, तसेच मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावल्यानंतरच मतदाराला मतपत्रिका मिळणार आहे. मतदाराला आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावांसमोर अंकांतच पसंतीक्रम नमूद करावा लागणार आहे. जेवढे उमेदवार तेवढे पसंतीक्रम मतदारास देता येणार आहेत. त्याचप्रमाणे पसंतीक्रम लिहिला नसेल, पसंतीक्रमाचा बोध होत नसेल, एकाच उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रमाचे जास्त अंक असतील, पसंतीक्रमाशिवाय किंवा पसंतीक्रमासह कोणतीही खूण केलेली असल्यास, निवडणूक आयोगाने पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनव्यतिरिक्त इतर पेनने पसंतीक्रम लिहिल्यास, एक हा पसंतीक्रम एकापेक्षा जास्त वेळा लिहिल्यास मतदान बाद ठरविले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिटिक्स

$
0
0


देशाचं बजेट सादर झालं होतं... इतर ठिकाणी त्याच्यावर जोरजोरात चर्चा झडत होत्या.... नाशकात मात्र त्याच्याकडं लक्ष द्यायला कुणी तयार नव्हतं... म्युनिसिपाल्टी, झेडपी अन् पंचायत समिती एवढंच इच्छुक अन् वर्कर मंडळींना दिसत होतं... अनेकांनी तिकिटासाठी इभ्रतच पणाला लावली होती... हार-जीतपेक्षाही हाच टप्पा सगळ्यांनाच अवघड वाटत होता... अर्थात, तिकीट मिळालं म्हणजे अर्धं इलेक्शन जिंकल्यासारखच होतं... कधी एकदाची या त्रांगड्यातून सुटका होते, अशी सगळ्यांची भावना झाली होती... आधी जोशात असणारी बरीच मंडळी आता होश हरवून बसली होती...

रायबा : अरं हनुमानाची शेपटीही एवढी लांबली नसेल इतक्या लांबताय याद्या... पहिल्यांदाच असं घडलंय... अर्जाची मुदत दोन दिवसांवर आली, तरी पार्टीवाले तिकिटं सोडायला तयार नाहीत...

सायबा : होय की!... एवढं अवघड इलेक्शन आपण पाहिलंच नव्हत राव... नोटाबंदीचा तडाखा, चार जणांचं विचित्र पॅनल, तिकिटासाठी मारामारी, ऑनलाइन अर्ज, इलेक्शन कमिशनचा कडक वॉच, पोलिसांचा खडा पहारा असं सगळंच उमेदवारांना जड जाणार असंच दिसतंय... मी म्हणतोय लोकांनी इलेक्शन लढावं की नाही!... छोट्या पार्टीवाल्यांची तर पुरती पंचाईत झालीय...

रायबा : इच्छुकांचं बजेट आधीच कोलमडलंय... काल-परवा एका इच्छुकानं म्हणं पक्षाच्या एका नेत्यासमोर कोरा चेकच ठेवला. वाटेल तो आकडा टाका, पण तिकीट तेवढं द्या, असं तो सांगत होता...

सायबा : च्या मारी, एवढ्या मंदीतसुद्धा लोकांकडं पैसा आहे म्हणायचा...

रायबा : तिकीट आपल्यालाच मिळणार असं त्यानं साऱ्या प्रभागात सांगून ठेवलं होतं... म्हणून इभ्रतीचा प्रश्न असल्यानं काहीही करून तिकीट खेचून आणायचंच हा चंगच गड्यानं बांधला होता. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी होती त्याची...

सायबा : कुणी काय करेल त्याचा नेम नाही राव... आमच्या प्रभागातल्या चार स्ट्राँग अपक्ष उमेदवारांनी पॅनल बांधून घेतलं... चौघांच्याही उमेदवारीसाठी एका-एका पार्टीला ब्लॅकमेल केलं... शेवटी दोघा जणांच्या उमेदवारीवर तडजोड झाली... अरे आता आजच्या अन् उद्याच्या रात्रीत बघा काय काय घडतंय ते...

(सायबा बोलत असतानाच रायबालाही स्वतःच्या प्रभागाची आठवण झाली होती. तिथं एका उमेदवारानं तिकीट मिळालं नाही, तर पार्टीच्या सीनिअर मंडळींनाच धमकावलं होतं. दुसऱ्या एका उमेदवारानं विरोधकाचं तिकीट कापलं होतं... एकानं ताकदीचा वापर करून समोरच्याला रिंगणातून बाहेर घालवलं होतं...)

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..पण नेतेहो, दारूचे व्यसन लावू नका!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सध्या निवडणूकज्वर चांगलाच जोरात असून, त्यात सर्वसामान्यांसह तरुणाईदेखील राजकारण्यांसोबत सहभागी होताना दिसत आहे. मात्र, प्रचार आणि आनुषंगिक कामांपर्यंत सर्वकाही ठीकठाक होत असले, तरी रात्रीच्या वेळी रंगणाऱ्या दारू आणि मटणाच्या पार्ट्यांमुळे मात्र तरुणाईचे नुकसानच होत असल्याचे दिसून येत आहे. तरुणाईला गैरमार्गावर ढकलण्याच्या अशा प्रकारांवर सोशल मीडियाद्वारे सूज्ञ नागरिकांकडून टीकेची झोड उठविली जात आहे.

दारू पिण्याची मानसिकता सध्या आपणाला समाजात पाहायला मिळत आहे. त्यात आता महापालिका व जिल्हा परिषद यांच्या निवडणूक जाहीर झाल्या असून, जसजसा लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांना रंग चढत आहे, तसतसे कार्यकर्ते आपल्यासोबत राहावेत म्हणून काही राजकारण्यांकडून त्यांना विविध हॉटेल्स व ठरलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दारू आणि मटणाच्या पार्ट्या देण्यास काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अभिनेता नाना पाटेकर यांचे छायाचित्र वापरून ‘पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत. मात्र, पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला एकही माणूस जगात नाही!’ या ओळींचा संदेश सध्या मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसून येत आहे. अशा पार्ट्यांमुळे असंख्य गरीब कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी दारूचे व्यसन जडून त्यातून भविष्यात अनेक हिंसक घटना जन्म घेऊ शकतील. एकदा का दारूची सवय शरीराला लागली, की मग ती पिण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जात असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी काही राजकारण्यांकडून केले जात असलेले असे प्रयोग थांबविण्याची गरज आहे. याबाबतचे आवाहनही सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे.

सूज्ञांचे भावनिक आवाहन

निवडणुकांतील पार्ट्यांवर आता सोशल मीडियातून मोठी टीकेची झोड उठत असून, ‘विकास करा अथवा करू नका, पण नेतेहो, दारूचे व्यसन लावून गरिबांचे संसार उद््ध्वस्त करू नका...’ असे भावनिक आवाहन व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमातून सूज्ञ नागरिकाकडून केले जात असल्याचे सध्या दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी वाढवायचीय, गट नाही

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजकारणात बेरीज-वजाबाकी असेल, पण मला राष्ट्रवादी वाढवायची आहे. मी माझा गट वाढवायला आलेलो नाही. पक्षाची पडझड झाली आहे, त्यामुळे नवीन झळाळी द्यावी लागेल, असे सांगत आता आपल्याला जिंकायचे आहे, असा निर्धार व्यक्त करून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. यावेळी त्यांनी नेत्यांना खडेबोल सुनावत कच्च्या कानाचे राहू नका, असे सांगत चांगल्या इच्छुकांना उमेदवारी देण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रवादीत पडझड सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार बुधवारी सकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या आधीच कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी प्रमुखांच्या भेटी घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात बोलताना त्यांनी केंद्र सरकारपासून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महापालिकेत गेल्या वेळेस बहुमत नव्हते, त्यामुळे प्रमुखांना नीट कारभार करता आला नाही. वेगवेगळ्या लोकांना घेऊन कारभार करण्याची वेळ आली. त्यामुळे तो कसा होतो, हे सर्वांनी बघितले. ही महापालिका महत्त्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी काम करा. या निवडणुकीत मॅच फिक्सिंग होईल असे करू नका. जो उमेदवार इतरांना निवडून आणू शकतो, त्याला विचारून उमेदवारी द्या. नाही तर कच्चा-पक्का मध्ये संपूर्ण पॅनल पडतो, असेही त्यांनी सांगितले. जातपात घेऊन राजकारण करता येत नाही. अठरापगड जातींना बरोबर घेऊनच राजकारण करायचे आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या जागेत त्या प्रवर्गाच्याच माणसाला उमेदवारी द्यावी, शेवटी हा शाहू-फुलेंचा महाराष्ट्र आहे, हेही लक्षात ठेवा. राष्ट्रवादीकडे विकासाचे व्हिजन होते म्हणून जिल्ह्यात आघाडी सरकारच्या काळात मोठी कामे झाल्याचेही त्यांनी सांगितले.


अदानी, अंबानींचे सरकार

राज्याचे सरकार हे गोरगरिबांचे नाही, हे अदानी व अंबानींचे सरकार आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शहरी भागातही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. कांदा, टोमॅटोसह पिकांना भाव नाही. विकासदरही घटता आहे, त्यामुळे भाजप सरकारने जनसामान्यांची निराशा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

थेट फोन करा

चुकीचे काम होत असेल, तुमची काही तक्रार असेल, तर मला थेट फोन करा, असे सांगत अजित पवार यांनी आपला ९८५००५१२२२ हा नंबर कार्यकर्त्यांना लिहून घेण्यास सांगितले. यावेळी तीनदा हा नंबर सांगितला. त्याचप्रमाणे मी जर काही चुकत असेल, तर ते ज्येष्ठांना सांगण्यास सांगत त्यांनी श्रीराम शेटे व तुकाराम दिघोळे यांचे नाव घेतले.

पेहराव कसा असावा?

पवार यांनी राजकीय भाषण करताना कार्यकर्त्यांना पेहराव सुधारण्याच्यासुद्धा सूचना दिल्या. केशरचना कशी असावी, याच्या टिप्सही दिल्या. कंगवा नसेल तर मी देतो, असा चिमटा काढला. कपडे कसे असावेत याबद्दलही सूचना केल्या. महिलांना भीती वाटणार नाही असा पेहराव करा, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पेहरावाचे महत्त्व सांगितले.

नगरसेवक रिपीटची गरज नाही

बारामती असो की इतर ठिकाणी, विद्यमान नगरसेवकांना पुन्हा रिपीट केलेले नाही. चांगले काम असेल तर त्यांना जरूर तिकीट द्या, पण केवळ तो विद्यमान आहे म्हणून त्याला उमेदवारी देऊ नका, असे सांगत त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचेही आवाहन केेले. महिलांची शक्ती राष्ट्रवादीत मोठी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप सातपूर विभाग अनुसूचित जाती महिला अध्यक्षा कुंदा अहिरे, सातपूरचे शिवसेना विद्यार्थी उपविभागप्रमुख आकाश पवार, सामाजिक कार्यकर्त्या वृषाली अहिरे व बांधकाम व्यावसायिक दत्तू वामन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच समाजघटक नोटाबंदीने उद््ध्वस्त

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

मोदी सरकारचा कारभार हा तुघलकी प्रकारचा असून, नोटाबंदीने शेतकऱ्यांसह सर्वच समाजघटक उद््ध्वस्त झाले आहेत, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार यांनी त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना केली.

पवार म्हणाले, की सध्या विकसदर कमी झाला असून, शेतकरी, व्यापारी सर्व उद््ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण शेतकरी आणि शहरी व्यापारी दोन्हींना भाजप नकोसा झाला आहे. कॅशलेस व्यवहार करताना शेतातील मजुरांना कार्ड स्वॅप करून पैसे कसे देणार आणि जनावरांसाठी ढेप-पेंड घेताना शेतकरी कार्ड कसे स्वॅप करणार, अशी मार्मिक टिप्पणी करून हे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांवरही त्यांनी खरपूस टीका केली.

खासगी कमिट्यांचा घाट

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. सहकारी बँका व मार्केट कमेटी मोडीत काढून खासगी मार्केट कमिट्या निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत ३०० कोटी रुपये जुने चलन असून, ते आरबीआय घेत नाही. हा शेतकऱ्यांचाच पैसा असून, अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यांतही असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना-भाजपवर टीका

पवार यांनी शिक्षण, आदिवासी विकास, पोलिस आदींसंदर्भातील निर्णयांवरही टीका केली. शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडताना शिवसेना म्हणते २५ वर्षे सडली, तर मुख्यमंत्री थेट औकात काढतात, हा सर्व घसरलेल्या राजकारणाचा नमुना आहे, असे त्यांनी सांगितले. हे शासन फक्त स्मारकांचे भूमिपूजन करत असून, केवळ टिकाव मारून मते मागत असल्याची टीकाही त्यांनी केली.

टाळ्या व हशाने दाद

अजित पवार हे प्रथमच त्र्यंबकेश्वरला आले होते. जवळपास तासभर नेहमीच्या दादा स्टाइलने झालेल्या या भाषणाला उपस्थितांकडून टाळ्या व हशाची दाद मिळाली. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा विजश्री चुंबळे, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन परवेझ कोकणी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, दिलीप बनकर, आमदार जयवंत जाधव, शोभा मगर, सचिन पिंगळे, अर्जुन टिळे आदी पदाधिकारी, तसेच हिरामण खोसकर, विनायक माळेकर, भारती भोये, रवीद्र भोये आदी स्थानिक उमेदवार उपस्थित होते. तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे यांनी प्रस्ताविक केले. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिवा महाले आणि अन्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दिंडोरीतील काही जणांनीही प्रवेश केला आहे.

पुरोहितांनी घातली पगडी

अजित पवार यांचा त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाने सत्कार केला. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, डॉ. दिलीप जोशी आदींनी पुणेरी पगडी घालून आणि त्र्यंबकेश्वराची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला. राष्ट्रवादीने पुरोहितांवरील आयकर धाडीबाबत पाठराखण केली होती व शासनाचा निषेध केला हाता म्हणून हा ऋणनिर्देश असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images