महापालिकेच्या रणसंग्रामासाठी अर्ज भरण्यास अखेरचे दोन दिवस उमेदवारांच्या हाती उरलेले असताना अद्याप अवघे शंभरच अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. अर्ज भरण्याच्या उद्याच्या (३ फेब्रुवारी) अखेरच्या दिवसापर्यंत अधिकृत अर्ज दाखल करण्यास उमेदवारांच्या हाती अवघे आठ तास शिल्लक आहेत. या कालावधीत उर्वरीत काही शे उमेदवारांचे अर्ज दाखल होणार असल्याने प्रशासनाची तर कसोटी लागणार आहेच, शिवाय सर्व कागदपत्रांसह उमेदवारांपुढेही निर्दोष अर्ज सादर करणे आव्हान ठरले आहे.
नाशिक महापालिकेसाठी निवडणूक अर्ज भरण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. या मुदतीपासून ऑनलाइन अर्जांचा मारा असला, तरीही प्रत्यक्षात अधिकृतपणे सुरुवातीचे पाच दिवस अपवादानेच अर्ज दाखल झाले. गणेश जयंतीचा मुहूर्त साधत ३१ जानेवारीला २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ही संख्या ३० वर पोहचली होती. बुधवारी आणखी ७० अर्जांची भर यात पडल्याने आता महापालिकेसाठी एकूण १०० अर्ज दाखल झाले आहेत. शहरात एकूण १२२ जागांसाठी ही रणधुमाळी रंगणार आहे. यात अर्ज दाखल करण्यास उद्याची अंतिम मुदत आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ असे अवघे चारच तास उमेदवारांच्या हाती असतात. दोन दिवस मिळून केवळ ८ तासांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यामुळे या दोन दिवसांमध्ये इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे.
महापालिकेच्या मैदानात १२२ जागांसाठी प्रमुख चार पक्षांकडून उभे राहणारे उमेदवार गृहीत धरल्यास किमान साडेचारशे अधिकृत उमेदवार, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणारे, याशिवाय लहान पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष असे उर्वरित शेकडो इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी या दोनच दिवसांत गर्दी होणार आहे.
यंत्रणेची होणार धावपळ
महापालिकेची ही निवडणूक प्रत्येक इच्छुक उमेदवारासाठी प्रतिष्ठेची असल्याने यात बहुतांश उमेदवारांकडून सर्वस्व पणाला लावले जात आहे. यात काहींची राजकीय कारकीर्द नव्याने सुरू होणार आहे, तर काही प्रस्थापितांपुढे आपले वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान आहे. यामुळे अतिशय सूक्ष्म गोष्टींचाही विचार उमेदवारांकडून केला जात असल्याचे चित्र आहे. याचाच परिणाम म्हणून अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अमावास्या असल्याने अर्ज दाखल करण्यास उमेदवार धजावले नव्हते. गणेश जयंतीच्या दिवशी मात्र अवघ्या चार तासांत २७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. आता उर्वरित अर्ज भरण्याच्या दोन दिवसांमध्ये राजकीय डावपेच किंवा दबावतंत्र म्हणून अखेरपर्यंत रोखून ठेवलेले अर्ज दाखल होणार आहेत. उर्वरित शेकडो जणांचे अर्ज या कालावधीत दाखल होणार असल्याने यंत्रणेचा चांगलाच कस लागणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट