म. टा. वृत्तसेवा, धुळे
वाढत्या स्पर्धेत वकिली क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वकिलांनी चौकस दृष्टिकोन ठेऊन या क्षेत्रात पदार्पण करण्याची आवश्यकता आहे. स्पर्धात्मक जगाची गरज म्हणून प्रत्येकाने या दृष्टीने विचार करूनच या क्षेत्रात उतरले पाहिजे, असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एच. काळे यांनी व्यक्त केले.
शहरातील पश्चिम खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. बाबासाहेब स्मृती विधी महाविद्यालयात ‘वकिली व्यवसायातील संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद््घाटन न्यायमूर्ती काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी अॅड. जितेंद्र निळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयातील अॅड. राहुल सावंत, प्राचार्य व्ही. वाय. बहिरम, अॅड. महेंद्र निळे उपस्थित होते.
न्यायमूर्ती काळे यांनी, वाढत्या विस्तारीकरणात प्रत्येक वकिलांनी आपल्या ज्ञानकक्षांमध्ये वाढ केली पाहिजे. दररोज आपले ज्ञान वृद्धिंगत करावे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांचा अंगीकार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. अॅड. सावंत यांनी, वकिली व्यवसायात पदार्पण करणाऱ्या तरुणांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत पदार्पण करावे, असे सांगितले. त्यांनी अथक परिश्रम, संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, उच्च न्यायालयात कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी या संधीला सामोरे जाण्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात अॅड. एस. डी. पाटील यांनी ‘दिवाणी दावे आणि प्रक्रिया’ या संदर्भात तर जिल्हा सरकारी वकील सुनील जैन यांनी ‘फौजदारी खटले आणि कामकाज’ या संदर्भात मार्गदर्शन केले. परिषदेच्या समारोपप्रसंगी पोलिस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट