जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, या दोन्ही निवडणुकांसाठी तब्बल १,०२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३५२, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ६७५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी एकूण ६९० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. जिल्हा परिषदेसाठी ८२५, तर पंचायत समितीसाठी १,४४० अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीअंती जिल्हा परिषदेसाठी ६०४, तर पंचायत समितीसाठी १,१२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अर्ज माघारीची प्रक्रिया सोमवारी (१३ फेब्रुवारी) सर्वच तहसील कार्यालयांमध्ये राबविण्यात आली. माघारीसाठी अवघ्या चारच तासांची मुदत असल्याने तहसील कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होती. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी २५१ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ७३ जागांसाठी ३५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १४६ गणांसाठी ४३९ उमेदवारांनी माघार घेतली असून, ६७५ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
निफाडमध्ये १५१ उमेदवार मैदानात
निफाड तालुक्यात १० गट आणि २० गण अशा एकूण ३० जागांसाठी तब्बल १५१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पंचायत समितीसाठी ९२, तर जिल्हा परिषदेसाठी ५९ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. दिंडोरीत पंचायत समितीसाठी ६४, तर जिल्हा परिषदेच्या गटांसाठी ३३ अशा एकूण ९७ उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. त्याखालोखाल मालेगावात अनुक्रमे ६३ आणि ३१ असे ९४ उमेदवार राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
जनमत चाचणीस बंदी
मुंबई ः मुंबई, पुण्यासह १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असल्यामुळे १४ फेब्रुवारीपासून जनमत चाचणीचा कौल अथवा मतदानोत्तर चाचणीचे निकष जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. तसेच, जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार हा निर्णय घेतल्याचे सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी स्पष्ट केले.
कपबशी फोडणार सेनेला घाम
जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात बंडखोरीचे निशाण फडकावणाऱ्या बहुतांश उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. नाशिक तालुक्यात पळसे आणि एकलहरे गटात काही इच्छुकांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. पळसे नागरिक विकास आघाडी आणि राजाभाऊ गोडसे विकास आघाडीच्या माध्यमातून अनुक्रमे संजय तुंगार आणि शंकर धनवटे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधात दंड थोपटले आहेत. या दोन्ही गटांत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे धनुष्यबाणाला कपबशीने आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी गटातही शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या उत्तम गडाख यांच्या पत्नी लीलाबाई गडाख यांना कपबशी हेच चिन्ह मिळाले आहे. आम्ही कपबशी चिन्हाची मागणी केली होती. अन्य कुणी या चिन्हाची मागणी न केल्याने आम्हाला हे चिन्ह मिळाल्याची माहिती संजय तुंगार यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट