Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पेपरस्टॉलसाठी सुविधायुक्त जागा द्या

$
0
0

दररोज सकाळी वृत्तपत्र विक्रते हे संपूर्ण शहरात विविध भागात फिरत असतात. या व्यवसायामुळे त्यांचा घरोघरी संपर्क असतो. प्रत्येक भागात फिरत असल्यामुळे त्या भागाचे प्रश्न व समस्याही त्यांच्या तोंडपाठ असतात. इतकेच नाही तर त्यांच्याकडे काही प्रश्न वाचक सहजपणे सांगत असतो. त्यामुळे त्यांच्या चष्म्यातून नाशिक शहर कसे असावे व शहराचे नेमके प्रश्न काय आहेत, यावर वृत्तपत्र विक्रेत्यांचे मत ‘मटा जाहीरनामा’तून जाणून घेतले. या विक्रेत्यांनी शहराच्या प्रश्नाबरोबरच त्यांच्या व्यवसायसच्या समस्याही सांगत आपला जाहीरनामा समोर ठेवला.



आम्ही रोज प्रश्न सांगू शकतो

आमचे संपूर्ण शहरात सहाशेहून अधिक सदस्य आहेत. आम्ही सकाळपासून वर्तमानपत्र विकण्याच्या निमित्ताने सर्व शहर पादाक्रांत करत असतो. आम्हाला जर महानगरपालिकेने विश्वासात घेतले, तर आम्ही रोज त्यांना त्या भागातील प्रश्न व त्याची गरज सांगू शकतो. याबरोबरच शहरात अनेक विकासकामे झाली, पण सार्वजनिक प्रसाधानगृहाचा प्रश्न हा मोठा आहे. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. शहरातील गार्डन व इतर सार्वजनिक ठिकाणी हे बांधणे सहज शक्य आहे. त्याचप्रमाणे त्याची निगा व स्वच्छता होण्यालाही अग्रक्रम असावा. पार्किंगची समस्या सोडवावी व वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी मनपाने उपक्रम घेणे गरजेचे आहे. त्यातून बरेच प्रश्न सुटतील.

-चंद्रकांत पवार, अध्यक्ष, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना

पाण्याचे वाटप विषम स्वरुपात

शहरात मुबलक पाण्याचे प्रमाणे असले तरी वाटप मात्र विषम स्वरुपात आहे. काही ठिकाणी २४ तास पाणी असते तर काही ठिकाणी फक्त एक तास. त्यामुळे वितरणव्यवस्था सुदृढ करणे व समान वाटप करणे हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. पाणीप्रश्नाबरोबरच कचऱ्याचा विषयसुध्दा गंभीर आहे. वडाळा भागात तर कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो व मनपाही तो उचलते. पण त्यानंतर पुन्हा कचरा टाकला जातो. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी केवळ मनपावर विसंबून चालणार नाही. त्यासाठी नागरिकांचे प्रबोधनही महत्वाचे आहे. कचऱ्यामुळे त्याच भागाचे आरोग्य बिघडते त्यासाठी सर्वांनी या प्रश्नावर जागृत असावे.

-अजय बागूल, सिडको


उघड्यावर मांस विक्री नको

उघड्यार मांस विक्री सर्रास होते. त्यावर निर्बंध असावे. त्यासाठी प्रत्येक भागात सॉल्टर हाऊसची व्यवस्था मनपाने करावी. या मांसविक्रीमुळे दुर्गंधी तर येतेच, पण आरोग्याचेही अनेक प्रश्न उभे राहतात. त्याचप्रमाणे भाजी मार्केट हा सर्व उपनगरात असावे. तशी व्यवस्‍था करण्यात यावी व त्यासाठी पार्किंगची व्यवस्थाही हवी. त्यामुळे रहदारीला त्याचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक जागेवर निगा राखण्यासाठी रखवालदार असावेत. त्यामुळे जुगारी व इतर जण त्या जागेवर घाण करणार नाहीत.

-विनोद पाटील, सरचिटणीस, शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना


भटक्या कुत्र्यांना आवरा

शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मोठा आहे. आम्ही वृत्तपत्र घरोघरी देतो तेव्हा हा प्रश्न किती तीव्र आहे याची आम्हाला नेहमीच जाणीव होते. सामान्य माणसालासुध्दा त्याचा त्रास सहन करावा लागतो. या प्रश्नावर महानगरपालिका फारशी गंभीर नाही. जेव्हा हा प्रश्न तीव्र होतो, तेव्हा त्यावर काहीतरी उपाययोजना केली जाते. पण नंतर त्याकडे दुर्लक्षच केले जाते. त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल यासाठी सातत्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांप्रमाणेच आम्हाला पाण्याचे लिकेज हा प्रश्नही सकाळी सर्वत्र दिसतो. संपूर्ण रस्ता पाण्याने वाहत असतो. त्यामुळे हे लिकेज कसे बंद करता येईल, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

-दत्तात्रय ठाकरे, अध्यक्ष, सिडको वृतपत्र सेवाभावी संस्था


कव्हरेज नाही

खरं तर सर्व प्रश्न महानगरपालिकेशी संबंध‌ित असतात असे नाही. पण नगरसेवकांनी इतर प्रश्नांकडेसुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे. सातपूर शिवाजीनगर भागात मोबाइलला रेंजच नाही. एकीकडे ड‌िज‌िटल इंडियाचा नारा दिला जातो व खेड्यापाड्यात मोबाइल पोहचत असताना शहरात अशी समस्या असेल यावर कोणी विश्वास ठेवत नाही. पण ही समस्या आहे व त्याचा आम्ही नेहमी पाठपुरावा केला. पण त्यातून मार्ग निघाला नाही. त्याचप्रमाणे ड्रेनेज व कचरा ही मोठी समस्या आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्र्यंबकरोड व सातपूर या रस्त्यावर नेहमी अपघात होतात. त्यावरही कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

-विनोद कोर, अध्यक्ष, सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटना


स्पीड ब्रेकर हवे

संपूर्ण शहरात रस्ते करण्यात आले. पण स्पीड ब्रेकर नाही. त्यामुळे सुसाट जाणाऱ्या गाड्या व त्यातून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने स्पीड ब्रेकर करण्याची गरज आहे. त्यातून अपघाताचे प्रमाण कमी होईल. लहान मुलांना बाहेर पाठवणे यामुळे अवघड झाले आहे. स्पीड ब्रेकरप्रमाणेच स्वच्छतेचा विषयसुध्दा गंभीर आहे. कर्मचारी वेळेवर येत नाहीत. त्यांच्या दांड्याही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अस्वच्छेतेचे प्रमाण वाढले आहे. सातपूर विभागात एटीएम नाही. त्यामुळे आमची प्रचंड गैरसोय होते. त्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा करावा.

- राजू अनमोला, सातपूर


मनपाच्या शाळेकडे दुर्लक्ष

शहरात महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात शाळा आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतर खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पालक टाकतात. मनपाच्या शाळा जर दर्जेदार केल्या, तर येथे विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढेल व चांगले शिक्षण मिळेल. महानगरपालिकेने या शाळांसाठी स्वतंत्र बजेट करणे गरजेचे आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या तर या शाळांतही स्मार्ट विद्यार्थी तयार होतील. त्यामुळे अशा शाळांना दर्जेदार करणे हे गरजेचे आहे. खासगी शाळांत मोठ्या प्रमाणात देणग्या घेतल्या जातात. त्यातून नागरिकांची पिळवणूकच होते. त्यामुळे बदलत्या काळात या शाळांचे रुपडे बदलण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-भारत माळवे, नाशिकरोड


भरारी पथके हवीत

आम्ही जेवढे फिरतो तेवढे नगरसेवकही फिरत नाहीत. त्यामुळे आमचाच वृत्तपत्र विक्रेता जर नगरसेवक झाला तर तो सर्व प्रश्न चांगले मांडेल. खरंतर नगरसेवकांनासुध्दा जे प्रश्न माहीत नसतात, ते आम्हाला फिरताना पटकन कळतात. नगरसेवकही कधी संपूर्ण प्रभागात फिरत नाही. आमचे विक्रेते मात्र व्यवसाया निमित्ताने सर्वत्र जातात. शहरात आज पाण्याचा प्रचंड प्रमाणात गैरवापर केला जातो. काही ठिकाणी तर गाड्या व रस्ते पिण्याच्या पाण्याने धुतले जातात. त्यामुळे पाणीप्रश्न व पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येते. त्यासाठी महानगरपालिकेने भरारी पथके नेमण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोड येथे उड्डाणपुलाच्या खाली भाजी विक्रेते असतात. पण सायंकाळी येथे मोठा कचरा असतो. त्याकडे लक्ष दिले तर अस्वच्छता होणार नाही.

-विजय सोनार, नाशिकरोड


वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल द्य

पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल हवे. वृत्तपत्र विक्रेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर आमचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. विक्रेत्यांना खूप जागाही लागत नाही. छोट्या जागेत हा व्यवसाय आम्ही करतो. पुणे महानगरपालिकेने वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल दिले. आयुक्त पुणे येथे असताना त्यांनी याबाबत पुढाकार घेतला, तसाच नाशिक येथेही घ्यावा.

-किशोर सोनवणे, अध्यक्ष, वृत्तपत्र विक्रेता संघटना, नाशिकरोड


गोदावरीकडे लक्ष देणे गरजेचे

नाशिक हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. या ठिकाणी देशभरातून भाविक येतात व ते रामकुंडावर जाऊन दर्शन घेतात. पण या तीर्थक्षेत्रात सांडपाण्याचे नियोजन अजूनही महानगरपालिकेला व्यवस्थित करता आले नाही. त्यामुळे नाल्यांचे सांडपाणी गोदावरीत मिळते. त्यातून चुकीचा संदेश जातो. जो प्रश्न सर्वात प्रथम सोडवायला हवा, तोच प्रश्न सुटत नाही. याला प्राथमिकता देणे गरजेचे आहे.

- अनिल निंबाळकर


झोपडपट्टीत पाणी नाही

शहरात सर्वत्र मुबलक पाणी आहे. काही ठिकाणी त्याचा गैरवापरही केला जातो. पण झोपडपट्टीत पाणी नाही. दोन ते तीन किमी अंतर पार करुन लहान मुले पाणी जेव्हा वाहून आणतात, तेव्हा ही असमानता प्रकर्षाने दिसते. त्यामुळे नेमका काय विकास केला, असा प्रश्नही पडतो. सर्वांना समान हक्क आहे. त्यामुळे पाण्याचे वाटप सर्वत्र व्हावे. त्यासाठी वेगळे सांगण्याची गरजही भासू नये. पण तसे होत नाही. त्याचप्रमाणे महानगरपालिकेकडे मैदाने आहेत, पण तेथे कोणतेही खेळ होत नाहीत. त्यामुळे मुले आता मैदानी खेळ विसरू लागले आहेत. सायबर कॅफेत जाऊन ही मुले खेळत बसतात. त्यामुळे अशा प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-बाळू सूर्यवंशी, सिडको


अतिक्रमणापूर्वीच कारवाई व्हावी

अतिक्रमण झाल्यानंतर कारवाई केली जाते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. पण अतिक्रमण होण्यापूर्वीच जर कारवाई केली, तर त्यातून कोणीही अतिक्रमण करणार नाही व अतिक्रमण होण्याचेही प्रमाण कमी होईल. भाजी विक्रेते तर कुठेही मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण करुन दुकाने थाटतात. त्यामुळे रहदारीला अडचण तर होतेच, शिवाय त्यामुळे अतिक्रमणांचे प्रमाणही वाढते. शहरात काही ठिकाणी नगरसेवकांच्या पुढाकाराने सीसीटीव्ही बसवले आहेत. पण हे सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे ते कशासाठी बसवले असा प्रश्न पडतो.

- बापू जाधव



आमचाही ना हरकत दाखला घ्या

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून वेगवेगळ्या दाखल्यांची मागणी करत असतात. आता तर शौचालयाचा दाखला अनिवार्य केला. त्याचबरोबर कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखलाही महत्वाचा असतो. पण या दाखल्याबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यांचाही दाखला अनिवार्य करा. कारण राजकारणीच आमचे सर्वात जास्त बिल थकवतो. ज्या वर्तमानपत्रातून त्यांना राजकारणाची माहिती मिळते व शहराचे प्रश्न कळतात, त्याच वर्तमानपत्राचे बिल थकवणे ही गोष्ट खरेतर चुकीची आहे. त्यामुळे त्यांना हा दाखलाही अनिवार्य करा, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेची भाजपविरोधात, भाजपची काँग्रेस विरोधात तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असताना राजकीय पक्षांनी प्रचाराऐवजी तक्रारीचे अस्‍त्र एकमेकांविरोधात उपसले आहे. तिकीटवाटप करताना दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या भाजपच्या व्हिडीओ प्रकरणात काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी भाजपच्या विरोधात आचारसंहिता विभागाकडे तक्रार दाखल केली असून तिकीट वाटपासाठी पैसे घेतलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपनेही काँग्रेसच्या विरोधात उमेदवारी वाटपावेळी काँग्रेस नेत्यांनी पैसे घेतल्याचा आरोपाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असून प्रचाराची लगबग सुरू असताना आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यालयात इच्छुकाकडून दोन लाख रुपयांची मागणी करतानाचा व्हिड‌ीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे भाजपची अडचण वाढली असतानाच काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीवरून आचारसंहिता प्रमुखांनी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह उमेदवारांना नोट‌िसा पाठवल्या आहेत. आता या वादात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी भाजपविरोधात आचारसंहिता विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपने उमेदवारीसाठी दोन ते दहा लाख रुपये घेतल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन लाखांच्या व्हिडीओ प्रकरणावरून अगोदरच भाजप व काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. त्यामुळे या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतल्याने भाजप विरुध्द शिवसेना असा नवा वाद निर्माण होणार आहे. भाजपनेही काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या विरोधात पैसे घेऊन तिकीट वाटपाचे आरोप केले आणि त्यांच्याविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल केली आहे.


आहेरांची नार्को टेस्ट करा

भाजपनेही आता या वादात उडी घेवून काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसवर झालेल्या आरोपांचा संदर्भ देऊन भाजपचे अजित ताडगे यांनी शरद आहेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आहेर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केला आहे. शोभा बोडके यांच्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकल्याचे सांगत आहेर यांनी तिकीटवाटपात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली आहे.


राहुल आहेरांविरोधात तक्रार

प्रभाग क्रमांक ७ मध्ये एका उमेदवाराने भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या उमेदवार हिमगौरी आडके यांच्या प्रचारासाठी जनलक्ष्मी बँकेची वाहने फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आचारसंहिता कक्षाकडे ही तक्रार दाखल झाली असून, त्याची चौकशी सुरू केली आहे.

२२ पैकी १६ तक्रारी निकाली

महापालिका निवडणुकात आचारसंहिता कक्षाकडे आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत २२ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी १६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यात हळदी कुंकू वाटप, बॅनर्स लावणे, उमेदवारांकडून वस्तूंचे वाटप करणे अशा किरकोळ तक्रारींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील गोरक्षा समितीचे कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू रक्षा समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून बुधवारी मालेगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. किरकोळ घटना वगळता शहरातील बंद शांततेत पार पडला. बस वाहतूक पूर्णतः बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

शिर्के यांच्यावरील हल्ल्याने मंगळवारी शहरातील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. त्यामुळे जिल्हा पोल‌िस प्रमुख अंकुश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला, उप अधीक्षक गजानन राजमाने परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मोठा पोल‌िस फौजफाटा शहरात तैनात करण्यात आल्याने शहरास छावणीचे स्वरूप आले होते. या घटनेच्या निषेधार्थ विविध हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचे आवाहन केल्याने सकाळपासूनच शहरात बंदचा परिणाम पाहायला मिळाला. दिवसभर शहरात शुकशुकाट होता. नवीन बसस्थानक येथून सकाळी बाहेरगावी जाणारे प्रवाशी एसटीने रवाना झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव शहरातून होणारी बसवाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र अनेक प्रवाशांना यांची कल्पना नसल्याने त्यांचे हाल झाले. खासगी वाहतुकीने प्रवाशांना महामार्गावरील चाळीसगाव फाटा, मनमाड चौफुली येथे पोहोचावे लागले.

शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी, चौकाचौकात, मुख्य रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यात आले होते. कॅम्परोड, सटाणा रोड, जुना आग्रा रोड, कॉलेज रोड, नवीन बस स्थानक रोड अशा सर्व प्रमुख रस्त्यांवर व्यापारी गाळे, दुकाने, हॉटेल पूर्णपणे बंद होते. रस्त्यावरदेखील नागरिकांची तुरळक वर्दळ होती. खबरदारी म्हणून शहरातील बहुतांशी शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. पोल‌िस प्रशासनाकडून राज्य राखीव पोल‌िस दल, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक जागोजागी तैनात करण्यात आले होते. किरकोळ घटना वगळता दिवसभर शहरात तणावपूर्ण शांतता होती. पोल‌िस प्रशासनाकडूनदेखील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.

शिर्के यांचे व्हिडिओद्वारे शांततेचे आवाहन

मच्छिंद्र शिर्के यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोशल मीड‌ियावर त्यांच्यावरील हल्लाबाबत स्वतः शिर्के यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यात त्यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे.

‘तो’ गुन्हा खोटा?
मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेला हल्ला हा मंगळवारी त्यांनी जनावरांची गाडी पकडताना वाहनचालकास केलेल्या मारहाणीतून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र स्वतः शिर्के यांच्याकडून पत्रकाद्वारे याबाबत खुलास करण्यात आला असून त्यात त्यांच्यावर खोटा व बनावट गुन्हा नोंदवला आहे. तसेच जळगाव चोंडी गावनजीक झालेल्या घटनेसमयी मी घरी झोपलो होतो. याबाबत पोलिसांनी चौकशी करावी, असे म्हटले आहे. पोलिसांकडून जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला त्यांनी आहे. दरम्यान सुभाष मालू यांना न्यायालयासमोर हजर करून ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे


संशयितांपैकी दोघे अटकेत
दरम्यान, शिर्के यांनी नोंदविलेल्या फिर्यादीतील चार संशयितांपैकी जहीर खान मेहबुब खान (वय २६ रा. मोमीनपुरा), इम्रान खान हमीत खान उर्फ भुऱ्या ड्रायव्हर (वय २८ रा. मोमीनपुरा) यांना अटक करण्यात आली. कोर्टात हजर केले असतात या दोघांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी दिवसभरात बंदच्या दरम्यान प्रतिबंधात्मक कार्यवाइत संगमेश्वर भागातून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले.

मारहाण करणाऱ्यांना अटक करा!

नाशिक ः मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा विश्व हिंदू परिषदेने निषेध नोंदविला आहे. मालेगावमधील काही अज्ञातांनी गोवंशाच्या सुटकेच्या रागातून शिर्के यांच्यावर हल्ला केला असून, संबंधित ट्रक चालक, मालकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी परिषदेने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात म्हटल्यानुसार गोहत्येसाठी गायी घेऊन जाणारा ट्रक अडविल्यानंतर ट्रक मधील भाडोत्री कामगार पळून चालले होते. त्यापैकी एकजण पुलावरून पडून गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्या कामगाराला मारहाण करून शिर्के, मालू व अन्य काही जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी या घटनेचा योग्य पद्धतीने तपास करावा, अशी मागणी परिषदेचे प्रांताध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत उपाध्यक्ष उमेश जोशी, बाबू नाटेकर, एकनाथ शेटे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र आणि राज्य सरकार ‘फेकू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

हे सरकार पैसेवाल्यांचे सरकार आहे. हे गाडीत बसत नाहीत तर हेलिकॉप्टरने धुराळा करीत फिरतात. मात्र, यांच्यामुळे आज सर्वसामान्य शेतकऱ्यांचाच धुराळा होत आहे’ असा केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला चिमटा घेतानाच, शेतकऱ्यावर शेतमाल जाळण्याची वेळ येते हे अतिशय दुर्दैवी आहे. हे सरकार फेकू सरकार असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

ढासळणाऱ्या कांदा बाजारभावाने उदिग्न झालेल्या नगरसूल येथील शेतकऱ्याने काढणीला आलेला तब्बल अडीच एकर कांदा जाळल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याबाबत कळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सकाळी आपल्या येवला दौऱ्यात अचानक मोर्चा नगरसूल गावाकडे वळवला. सुप्रिया सुळे यांची तशी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ येवला तालुक्यातील अंदरसुल येथे सभा होती.मात्र, या सभेअगोदर त्या थेट डोंगरे या शेतकऱ्याच्या बांधावरच धडकल्या. बाबांनो कृपया असं काही करू नका. असला मार्ग पत्करू नका. जरा धिर धरा, अशा शब्दात त्यांनी सात्वन केले.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठीचा तुमचा आवाज तुमची बहीण दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचवेल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. सुळे यांनी सत्तारूढ भाजप सरकारच्या कारभारावर चांगलेच कोरडे ओढले. कांदा प्रश्नावर त्या म्हणाल्या, आज कांद्याची आवक जास्त असतानाही रेल्वेकडून राज्यातील कांदा बाहेर पाठवण्यासाठी वॅगन उपलब्ध करून दिली जात नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडील कांदा पडून आहे. हे सरकार म्हणजे फेकू सरकार आहे. हे फेकू सरकार शेतकऱ्याचे डोळे पुसायला येत नाही. या सरकारची भूमिका शेतकऱ्यांचा अपमान करण्याचीच असल्याचे दिसत आहे. अन्नदाता सुखी भव म्हणणारे आपण आहोत. मात्र, आज याच अन्नदात्यावर शेतमाल जाळण्याची वेळ का आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


इथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही का?

उत्तरप्रदेशमध्ये सध्या निवडणुका असल्यानेच कर्ज माफी म्हणतात. मग या महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवाला कर्जमाफीची गरज नाही का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने येथील शेतकऱ्यांच्या पाठ‌िशी उभे रहायला पाहीजे. त्यांनी कर्जमाफी दिलीच पाहीजे. हेलिकॉप्टर घेऊन गावभर मत मागण्यापेक्षा शेतकऱ्याला सरकारने न्याय देण्याची गरज आहे. मात्र, हे सरकार गरिबाचे नाही फक्त पैसेवाल्याचेच सरकार आहे. हे खाली बसत नाही.हेलिकॉप्टरचाच धुराडा करीत बसतात...गाडीत बसत नाही.माझ्या शेतकरी बंधुचाच या धुराळा या सरकारमुळे होतोय,अशा शब्दात देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला टोले लगावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मणगावात बच्छावांमध्येच ‘युद्ध’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जिल्हा परिषदचे ब्राह्मणगाव गटात शिवसेना-भाजपात सरळ लढत होत असल्याने या लढतीकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपसह शिवसेनेने वरिष्ठ मंत्री या गटात उतरवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

गट हा पूर्वी इतर मागास प्रवर्ग होता. या गटातून गतवेळी शिवसेनेचे प्रशांत बच्छाव विजयी झाले होते. नव्या गटरचनेनुसार व आरक्षणात हा गट आता महिला सर्वसाधारण राखीव झाला आहे. यामुळे या गटातून प्रशांत बच्छाव यांनी आपल्या राजकीय वारसा सुरू ठेवण्यासाठी पत्नी वर्षा बच्छाव यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. शिवसेना भाजपा युती झाली असती तरीही या गटात भाजप-सेनेत मैत्रीपूर्ण लढत रंगतदार ठरणारच होती.

भाजपचे उपजिल्हाध्यक्ष व मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव यांनी पत्नी जि. प. माजी सभापती लता बच्छाव यांना रिंगणात उतरविले आहे. यामुळे या गटात नेहमीच दळवी-बच्छाव असा चुरशीचा सामना बघावयास मिळत असतांना पहिल्यांदाच बच्छाव परिवार एकमेकांसमोर रिंगणात उतरले आहेत. पोलिस यंत्रणेने सर्वाधिक पोलिस बळ या मतदान केंद्रावर लावले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली. या गटातील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मंत्री दादा भुसे यांची जाहीर सभा दोन ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. तर भाजपकडून केद्र‌िय संरक्षणराज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या सभा होणार आहेत. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी गटाचा दौरा करून भाजपला ब्राह्मणगाव व लखमापूर या पंचायत समिती गणात देखील शिवसेना व भाजप उमेदवारांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. गट व गणात राष्ट्रवादी व काँग्रेस दोघांनी आपले उमेदवार न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब...! ८२१ उमेदवारांचे व्हिडीओद्वारे व्हिजन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग रोज नवनवीन फंडे काढून यंत्रणांना जेरीस आणत असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणूक प्रचारासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक असतानाच, निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराचे व्हिजन व्हिडीओद्वारे वेबसाइटवर टाकण्याचे नवीन फर्मान काढले आहे. त्यामुळे कमी कालावधीत ८२१ उमेदवारांचे व्हिडीओ अपलोड कसे करायचे, असा प्रश्न यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे. आयोगाचा आदेश म्हटल्यावर महापालिका प्रशासनानेही औपचारिकता म्हणून एका स्वयंसेवी संस्थेवर त्याची जबाबदारी ढकलत आपली मान सोडवून घेतली आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम विनामोबदला संस्थेला करावे लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून राज्य निवडणूक आयोगाकडून रोज नवनवीन आदेश काढले जात आहेत. यातील काही आदेश चांगले असून, मतदारांनीही त्याचे स्वागत केले आहे. उमेदवारांच्या कुंडल्या मांडणे, त्या मतदान केंद्रात लावणे, प्रसिद्धीला देणे आदींमुळे आयोगाची प्रतिमा चांगलीच उजळली आहे. मात्र, काही निर्णयांवर आता प्रशासकीय यंत्रणाही नाक मुरडत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोगाने नवीन सूचना महापालिकांना केल्या आहेत. महापालिकेने एक वेबसाइट सुरू करून निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांचे व्हिजन व्हिडीओद्वारे सादर करण्याचे फर्मान काढले आहे. प्रत्येक उमेदवाराचा दोन मिनिटांचा व्हिडीओ या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. आयोगाचाच आदेश असल्याने त्याच्या अंमलबजावणीशिवाय पर्याय नसल्याने यंत्रणेनेही मग खासगी स्वयंसेवी संस्थेवर याची जबाबदारी ढकलली आहे.

पालिकेने एका संस्थेवर हे काम सोपवले असून, या संस्थेकडून प्रत्येक उमेदवाराचे शूटिंग करून ते वेबसाइटवर अपलोड केले जाणार आहे. मात्र, प्रचाराला आता अवघे चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ८२१ उमेदवारांचे व्हिडीओ अपलोड कसे होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम संबंधित संस्थेला विनामूल्य करायचे आहे. त्यामुळे चार दिवसांत हे काम होणे अशक्य असले तरी प्रशासकीय यंत्रणा सोपस्कार पूर्ण करण्यात गुंतली आहे.

गैरवापराची प्रशासनालाच भीती

एकीकडे आयोगाने प्रसारमाध्यमांमध्ये एखाद्या उमेदवाराचे व्हिजन छापून आले, तर त्याला पेड न्यूज संबोधण्याचे फर्मान काढले आहे, तर दुसरीकडे याच उमेदवाराचे व्हिजन मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी दोन मिनिटांचे व्हिजन सादर करण्याचे फर्मान काढले आहे. विशेष म्हणजे संबंधित संस्थेला हे काम विनामूल्य करायचे आहे. पालिकेच्या आदेशानुसार हे काम केले जाणार असले, तरी संस्थेकडून त्याचा दुरुपयोग झाला किंवा उमेदवारांकडून पैसे मागण्याचे प्रकार होण्याची भीती प्रशासकीय यंत्रणेलाच आहे. मात्र, आयोगाचा आदेश असल्याने त्याला विरोध कसा करायचा, असा प्रश्न यंत्रणेसमोर आहे. त्यामुळे दुरुपयोग होवो की सदुपयोग, आपली मान सोडवून घेण्यात यंत्रणा व्यस्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्टेशनमध्ये पार्किंग घोटाळा

$
0
0

बनावट पावत्यांनी वाहनचालकांची लूट; पुरावे देऊनही कारवाई नाही

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड येथे महापालिकेच्या नावे सुरू असलेला पार्किंगचा घोटाळा उघड झाल्यानंतर आता रेल्वेचा चारचाकी वाहन पार्किंग घोटाळाही उघडकीस आला आहे. रेल्वेच्या नाशिकरोड आणि भुसावळ प्रशासनाला या गैरप्रकाराची पूर्ण कल्पना असून पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी ‘मटा’शी बोलताना केला.

नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात पार्किंगला जागा नसताना प्रचंड संख्येने दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे येणारे प्रवासी, वाहनचालकांना रेल्वेस्टेशनमध्ये येणे अवघड झाले आहे. रेल्वेने देवी चौकात दुचाकीसाठी पार्किंगची पेड सुविधा उभी केली. मात्र, ती जागाही आता कमी पडू लागल्याने रेल्वे सुरक्षा दलामागील तळावर दुचाकी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. सहा तासाचे दहा तर २४ तासाचे वीस रुपये शुल्क आकारले जाते. पार्किंगसाठी ठेकेदाराला ५५३ चौरसमीटरची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित जागेत सुभाषरोडमार्गे येणाऱ्या चारचाकी वाहनांना मोफत पार्किंगची सुविधा आहे.

चारचाकीची लूट

चारचाकी वाहनांसाठी पार्सल आफिसजवळ अधिकृत पार्किंग आहे. ती जागा कमी असल्याने आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालक रेल्वे सुरक्षा दलामागील जागेत वाहने उभी करतात. मात्र, या सुविधेमुळे गाडी उभी करणाऱ्या वाहनचालकांना तेथेच दुचाकीचे पेड पार्किंग असल्याने काही मंडळी गैरफायदा घेतात. चारचाकी वाहन उभे झाले की, चालकाकडून ते पैसे घेतात. तसेच, रेल्वेची (खोटी) पावती मिळत असल्याने आणि पार्किंगचा बोर्ड (दुचाकीचा) असल्याने चालकही मुकाट्याने पैसे देतात. ही मंडळी तीस ते चाळीस रुपये घेतात. यावर दुचाकी पार्किंग ठेकेदाराने ही आपली माणसे नाहीत, असे स्पष्ट सांगितले आहे.

लोकप्रतिनिधीचा हात?

सोमाणी गार्डन येथे महापालिकेच्या बनावट पावत्या छापून पार्किंग घोटाळा करण्यात आला होता. ‘मटा’ने तो उघडकीस आणला होता. त्यामध्ये लोकप्रतिनिधीचा हात असल्याचे लोकांचे म्हणणे होते. रेल्वे पार्किंग घोटाळ्यामागेही लोकप्रतिनिधी असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुभाषरोड परिसरातील टवाळखोर बेकायदेशीर शुल्क वसूली करत आहेत. देवी चौकातील पार्किंगचा ठेका तर एका नगरसेवकाकडे आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात चारचाकी वाहनांचे बेकायदेशीर शुल्क कोणी आकारत असतील तर नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करावी. समाजकटंकाविरुद्ध कडक कारवाई करून त्यांना धडा शिकवला जाईल.

जुबेर पठाण, वरिष्ठ निरीक्षक, आरपीएफ

रेल्वेस्थानकात पार्किंगचा घोटाळा सुरू असल्याची तक्रार मी, भुसावळ रेल्वे कार्यालयाकडे केली होती. माझ्याकडे बेकायदेशीर शुल्क मागितले गेले. हा गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने चारचाकी वाहनांचे अधिकृत पार्किंग त्वरित सुरू करावे.

राजेश फोकणे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खांबांचे अपघातांना निमंत्रण

$
0
0

वाहनचालकांच्या जिवाला धोका

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्ग व मुंबई-आग्रा महामार्गाला जोडणाऱ्या चेहेडी नाका ते पाथर्डी फाटा या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्यावरील विजेच्या खांबांचे स्थलांतर गेल्या चार वर्षांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे हे खांब अपघातांना निमंत्रण देणारे ठरू लागले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाचा फटका वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची वेळ येऊन ठेपल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

चेहेडी जकात नाका ते पाथर्डी फाटा दरम्यानच्या रस्त्याचे वडनेर मार्गे रुंदीकरण व डांबरीकरण गेल्या चार वर्षांपूर्वीच झालेले आहे. शहरातील द्वारका येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बायपास असलेल्या या रस्त्यावर मधोमध असलेले वीजेचे खांब स्थलांतरास अद्यापही मुहुर्ताच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे येथे जीवघेण्या अपघाताची शक्यता वाढली आहे.

चेहेडी पंपिंग स्टेशन भागात या रस्त्यावर मधोमध उभे असलेले विजेचे खांब स्थलांतरित करण्याकडे पालिकेच्या विद्युत विभागाने गेल्या चार वर्षांपासून डोळेझाक केली आहे. या स्टेशन भागातील विजयनगर, श्रीकृष्ण कॉलनी येथे या रस्त्यावरील विजेचे धोकादायक खांबांचे स्थलांतर करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका विद्युत विभागाकडे वारंवार केली होती. मात्र या मागणीला स्थानिक लोकप्रतिनिधीसह विद्युत विभागाने केराची टोपली दाखवली आहे.

डीपीचेही स्थलांतर आवश्यक

श्रीकृष्ण कॉलनी येथे या रस्त्याचे रुंदीकरण रखडलेले आहे. याठिकाणी रस्त्याला लागूनच डीपी आहे. ही डीपी रहदारीसाठी अत्यंत धोकादायक बनली असून वाहने या डीपीला लागूनच जातात. त्यामुळे ही डीपी सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरीत करण्याची आवश्यकता आहे.

विजयनगरजवळील रस्त्यावरील विजेच्या खांबांचे स्थलांतर काही वर्षांपासून रेंगाळले आहे. यास लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणाच कारणीभूत आहे. यावरून प्रशासनही अपघात होण्याची प्रतीक्षा करित असल्यासारखेच कामकाज करित असल्याचे दिसते.

-गणेश खर्जुल, स्थानिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंगा-गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याची गरज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भारत देशात गोवंश हत्या कायदा लागू झाला असून आता देशाला खऱ्या अर्थाने सुजलाम् व सुफलाम् करण्यासाठी गो-संवर्धनासह पवित्र गंगा, यमुना व गोदावरीसारख्या नद्यांचे प्रदूषण दूर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वारकरी शिक्षण संप्रदाय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर) यांनी केले. लहवित येथील वाडीचा मळा दारणा-कडवा प्रीति संगमांवर असणाऱ्या भैरवनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या (आळंदी) शताब्दी महोत्सव व संगीत गाथा पारायण सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सकाळी दारणा कडवा प्रीती संगमावर सदगुरू विठ्ठलनाथ महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या चरणपादुकांची महामंडलेश्वर विठ्ठलनाथ द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर, स्वामी शिवगिरी महाराज, महंत भक्तीचरणदास, स्वामी कृष्णचैतन्य, स्वामी गणेशगिरी, रामकृष्ण महाराज ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर जाधव, खासदार हेमंत गोडसे यांसह विविध महंतांच्या उपस्थितीत शाही स्नान घालण्यात आले.

भजन परंपरा वाढली

भगवान श्रीकृष्णच्या जीवनातील वर्णन व आजच्या समाजला गरज असणाऱ्या तत्वचिंतनावर संदीपान महाराज शिंदे यांनी काल्याचे कीर्तन केले. यावेळी त्यांनी, वारकरी शिक्षण संस्थेमुळेच आज कीर्तन व भजनसारख्या परंपरा वाढीस लागल्या असून अशा संस्थांमधून विद्यार्थी शिक्षण घेऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असल्याचे सांगितले. यानंतर नंदकिशोर महाराज वाघमारे, समाधान महाराज पाटील, मनोहर महाराज सायखेडे यांच्या मंजुळ वाणीतून तुकाराम गाथा संगीत पारायण केल्याबद्दल शिंदे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनानंतर पंचक्रोशीतील विविध गावांना लहवित ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळालेला कांदा मुख्यमंत्र्यांना देणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जेव्हा एखादा शेतकरी त्याच्या उभ्या पिकाला आग लावतो तेव्हा त्याला किती दुःख झालेले असेल, याची कल्पना करावी. हा जळालेला कांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन जाणार आहे. हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या या नेत्यांना हेलिकॉप्टरचा धुरळा दिसतो; पण सर्वसामान्यांचे दुःख दिसत नाही. त्यासाठी शेतात, ढेकळात जावे लागते. ते त्यांना माहीत नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी राज्य सरकारवर केली.

नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी पाच एकर क्षेत्रातील कांदा भाव नसल्यामुळे जाळला. त्यांच्या शेतात सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी भेट देऊन शेताची पाहणी केली. त्यानंतर नाशिकमध्ये आल्यानंतर सुळे यांनी परिषदेत ही माहिती दिली.

खासदार सुळे म्हणाल्या, की कांदा, मिरची, सोयाबीन अशा कोणत्याच शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे अश्रू व्हायला लागले आहे. सरकार यांना न्याय देणार का, असा प्रश्न त्यांनी केला. या वेळी त्यांनी भाजप, शिवसेनेवरही टीका केली. भाजपने महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा केला आहे. त्याचा समाचार घेताना त्यांनी, महिलांना वेगळा जाहीरनामा कशाला हवा, असा प्रश्न केला. त्यांनाही समान अधिकार मिळायला हवा, त्यांना मुख्य प्रवाहाच्या बाहेर काढायला नको, असे त्यांनी सांगितले.

‘भुजबळ लवकरच बाहेर येतील’

निफाड ः कांद्याचे पीक जाळून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणल्याने सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. निफाड येथे त्यांनी युती सरकारच्या कारभारावर टीका केली. माजी मंत्री छगन भुजबळ यांना अडकवणाऱ्यांना अद्दल घडवा, असे आवाहन करीत भुजबळ लवकरच बाहेर येतील, असे सूतोवाचही त्यांनी केले. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामानाट्यावर टीका करताना, हे फक्त कागदी वाघ असल्याचे त्यांनी म्हटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​भाजपने मार्केटिंग केले, शिवसेनेचे मांजर झाले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भाजपने मार्केटिंग करून जनतेची फसवणूक केली आहे. तर, उद्धव ठाकरे हे भाजपला राजीनाम्याची केवळ धमकी देण्याचे काम करीत आहेत. ते डरकाळी फोडणारे वाघ राहिले नाहीत. त्यांचे मांजर झाले आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

पंचवटीतील वालझाडे मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिल्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महिला शहराध्यक्षा सुनीता निमसे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, अर्जुन टिळे आदी उपस्थित होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार असताना महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले. महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला. भाजपने २०१४ ला वोट घेतले आणि २०१६ ला नोटा घेतल्या. आता सोन्याचा हिशेब ठेवायला पाहिजे, असे म्हणताहेत. पारदर्शकता हवी पण ती नियोजनबद्ध असायला हवी, असा टोलाही सुळे यांनी लगावला. संसदेत एटीएम चालत नाही. खासदारांचे हाल आहे तेथे सर्वसामान्यांचे किती हाल असतील. नोटाबंदीच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच केले. मात्र, त्यात सर्वांना सारखा न्याय मिळाला नाही. डिजिटल इंडियाचे करण्याची घोषणा केली जाते. जिथे संसदेतील बिल्डिंगमधील वायफाय चालत नाही तेथे सर्वसामान्य ठिकाणी ते कसे चालणार, असा प्रश्न त्यांनी केला. रंजन ठाकरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद आहेर यांनी आत्मपरीक्षण करावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या तक्रारीनंतर आचारसंहिता विभागाने दोन लाख रुपयांच्या व्हिडीओप्रकरणी भाजपच्या शहराध्यक्षांना नोटीस बजावल्यानंतर भाजपने आता काँग्रेसवर पलटवार केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यावरच तिकीट वाटप करताना पैशांचे आरोप झाले असून, त्यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले होते. त्यामुळे आहेर यांनी आधी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी दिला आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला भाजपवर आरोप करण्याची नैतिकता नसल्याचा दावाही सावजी यांनी केली आहे. संबंधित व्हिडीओ प्रकरण भाजपच्या अंगलट आले असून, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे भाजपच्या उमेदवारांसह शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे नेते संतप्त झाले आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेर यांच्यावरच तिकिटे विकल्याचा आरोप करीत पक्षातीलच लोकांनी काँग्रेस कार्यालयाला टाळे लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी भाजपवर आक्षेप घेवू नये, असा इशारेवजा सल्ला सावजी यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला दे धक्का, शिवसेनेला पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील भाजपप्रणित युती सरकारमध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप आम्हाला अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करीत या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात प्रचार करणार असल्याची घोषणा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीबुधवारी पत्रकार परिषदेत केली.

निवडणुकीनंतर एकाही मंत्र्याला नाशिकमधील रस्त्यांवर फिरकू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.सीबीएस परिसरातील हुतात्मा स्मारकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषद घेतली. वडघुले म्हणाले, की भाजप सरकारने लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. वर्षभरात कांदा तसेच भाजीपाला मातीमोल भावात विकला जातो आहे. त्यामुळे शेतकरी बेजार झाला असून, भाजपला धडा शिकविण्यासाठीच शिवसेनेला जिल्हास्तरावर विनाशर्त पाठिंबा देत असल्याची माहिती वडघुले यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निफाड तालुक्यातील देवगाव गटात शिवनाथ जाधव यांना, तर सिन्नर तालुक्यातील पांगरी गटात रवींद्र पगार यांना उमेदवारी दिली आहे. या गटांमध्ये शिवसेनेचे उमेदवार असले तरी तेथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ. अन्य गट, गण व महापालिका निवडणुकीत आम्ही भाजप विरोधी प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वडघुले यांनी दिली.

भाजप विश्वासघातकी!

एकीकडे गोंजारायचे तर दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसायचा अशी रणनीती भाजपकडून अवलंबण्यात येत आहे. त्यांनी घटक पक्षांचा विश्वासघात केल्याचा आरोप वडघुले यांनी केला. जागा वाटपात घटक पक्षांना सोबत घेतल्याचे भाजप सांगतो, तर दुसरीकडे घटक पक्षांची ताकद नगण्य असल्याने त्यांना जागा सोडल्या नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अन्य घटक पक्षांची देखील तशीच भावना असल्याचे वडघुले यांनी सांगितले.

‘सरकारमध्ये राहून विरोध नको’

स्वाभिमानी संघटना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे त्यांनी नाशिकमध्ये भाजप विरोधी पाऊल उचलायला नको होते. आम्ही स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढू, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दिली आहे. तर महापालिका निवडणुकीत हंसराज वडघुले यांना प्रभाग २४ मधून उमेदवारी हवी होती. त्यांनी नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली असती तर भाजपने निश्चितपणे त्यांना पाठिंबा दिला असता. त्यांनी राजकीय शिष्टाचार पाळला नाही. उलट शहराध्यक्षांशी दूरध्वनीवरून असभ्य भाषेत भाष्य केल्याचा दावा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात आमदारांसह इतरांवर गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील स्वामीनारायण मंदिराच्या ट्रस्टींनी मंदिराचे बांधकाम करताना डी. पी. प्लॅनमधील रस्ता आपल्या कंपाऊंडमध्ये सामावून घेत गेट लावत मागच्या बाजूला मोठी भिंत बांधली होती. मंदिराची ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने बुधवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास पाडल्याने धार्मिक भावना दुखावल्याने मंदिर परिसरातील नरेंद्र वसंत महाजन यांनी आमदार अनिल गोटेंसह ३० ते ४० कार्यकर्त्यांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरपालिकेकडून मंदिराच्या बांधकामाची परवानगी देताना मंदिराच्या आराखड्यामध्ये मूळ रस्ता हा मोकळा दाखविला होता. अशा परिस्थितीत आमदार अनिल गोटे यांनी शहरातील १९ अतिक्रमणांचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. त्यात स्वामीनारायण मंदिराच्या भिंतीचे अतिक्रमणाचा समावेश होता. या प्रकरणामध्ये तेजस गोटे, दिलीप साळुंखे, अमोल सूर्यवंशी, गणेश जाधव, मुन्ना वाडिले, प्रशांत भदाणे, मनोज वाल्हे, अमित दुसाणे यांचावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक के. बी. शिरसाठ हे पुढील तपास करीत आहेत.

या रस्त्यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांनी रस्ता मोकळा करावा यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा व पोलिस विभागाला पाठपुरावा करून अतिक्रमित भिंत काढण्यासाठी निवेदने दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दुसरीकडे या कारवाईला स्वामीनारायण ट्रस्टच्या भक्तांनी विरोध केला. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने भाविकांनी माघार घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विद्यापीठासाठी विद्यार्थ्यांचा सायकल मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा न देणे, कृषी विद्यापीठ स्थापनेस टाळाटाळ करणे, धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज बंद करण्याचा निर्णय याविरुद्ध युवा सेनेने गुरुवारी (दि. १६) जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांकडून सायकल मोर्चा काढण्यात आला.

भाजप सरकारचे निर्णय जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे असून याविरुद्ध भूमिकेतून युवा सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. देवपूरातील महाजन हायस्कूलपासून दुपारी बारा वाजता युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली सायकल मोर्चास आग्रारोडने सुरुवात झाली. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभाग नोंदविला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी हुलवळे यांना मोर्चेकरांनी निवेदन दिले. शासकीय तंत्रनिकेतन बंद न करण्याचे तोंडी आश्वासन देऊ नका तर लेखी पत्र प्राचार्याना देण्यात यावे, तसेच कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्याचा हक्क नाही तर अधिकार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा, जमीन, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आदी सर्व उपलब्ध आहेत. तरीदेखील कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यात स्थापन होण्यासाठी अनेकांचा विरोध का होत आहे, अशा सवालह‌ी यावेळी विचारण्यात आला. आंदोलनात ऐश्वर्या अग्रवाल, संदीप मुळीक, हरीष माळी, मनोहर जाधव, आकाश शिंदेसह विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिव्यांगांसाठी शाळांत आता ‘लेखनिक बँक’

$
0
0

ashwini.kawale
@timesgroup.com
Tweet : @ashwinikawaleMT
नाशिक : अंध, मतिमंद, बहुविकलांग यांना महत्त्वाच्या परीक्षांसाठी लेखन प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने शाळांमध्ये लेखनिक बँकांची स्थापना केली जाणार आहे. इयत्ता पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्याची योजना असली तरी प्रामुख्याने दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे मत माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, नाशिक विभागाचे सहसचिव एम. व्ही. कदम यांनी व्यक्त केले.
दिव्यांगांना लेखनिकांची आवश्यकता असूनही ते मिळत नसल्याची तक्रार वारंवार पुढे आली आहे. या अनुषंगाने शाळांमध्ये लेखनिक बँक असावी, हा विचार पुढे आला. या बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन व मूल्यांकनातील समस्या दूर करणे, या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देणे, लेखनिकांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असावी, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, अध्ययन प्रक्रियेतील अडथळा दूर करणे यासाठी ही बँक मदतीची ठरणार आहे. यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववीच्या विद्यार्थ्याची लेखनिक म्हणून नेमणूक केली जाणार असून इच्छुक विद्यार्थ्यांकडून नोंदणीपत्र भरुन घेतले जाणार आहे. अंशतः अंध, पूर्णतः अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, अध्ययन अक्षम, स्वमग्न, सेरेबल पाल्सी, मतिमंद अशा विद्यार्थ्यांसाठी या बँकेचा लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्थापित विरुद्ध नवख्यांचा सामना!

$
0
0


fanindra.mandlik

@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक ः महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस राहिले असताना नाशिकरोडच्या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत नागरिकांनी ज्यांना भरघोस मतांनी विजयी केले, त्यांच्या पारड्यात मतांचा कौल पडणार, की नवख्या उमेदवारांना मतदार पसंती देणार याबाबत चर्चा रंगत आहे. राज्यात युती न झाल्याने शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यातच घमासान सुरू असून, त्याचे पडसाद नाशिकरोडमध्येही दिसून येत आहेत. गेली अनेक वर्षे बरोबर असलेल्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले असून, त्याचा फायदा नक्की कुणाला होईल, हे येणाऱ्या काही दिवसांतच जनतेसमोर येईल.

नव्या प्रभागरचनेत नाशिकरोड विभागातील अनेक नगरसेवकांचे भाग वगळल्याने विद्यमान नगरसेवकच आमनेसामने उभे आहेत. प्रभागरचना आणि आरक्षण यामुळे सत्ताधारी नगरसेवकांपैकी काहींची प्रचंड अडचण झाली आहे. काही नगरसेवकांनी कुटुंबातील महिलांना उमेदवारी मिळवून सत्तेत सामील होण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय अनेक माजी नगरसेवकांचेही राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तविली जात असून, नाशिकरोड विभागाची निवडणूक सर्वाधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. नव्या रचनेनुसार या विभागात प्रभाग क्रमांक १७, १८, १९, २०, २१, २२ या प्रभागांचा समावेश झाला आहे. पूर्वीच्या प्रभागरचनेत प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक होते. त्याची संख्या २४ होती. नवीन रचनेनुसार प्रभाग क्रमांक १९ सोडल्यास नगरसेवकांची संख्या चार असणार आहे. त्यामुळे नाशिकरोड विभागात यापुढे एक नगरसेवक कमी होणार आहे.

प्रभाग क्रमांक १७

हा प्रभाग अनुसूचित जाती, महिला ओबीसी, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. अनुसूचित जाती गटासाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात असून, खरी लढत माजी महापौर अशोक दिवे यांचे पुत्र व शिवसेनेचे उमेदवार प्रशांत दिवे, भाजपच्या सुनंदा मोरे, कॉँग्रेसचे शशिकांत उन्हवणे व मनसेचे प्रमोद साखरे यांच्यात आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला गटात सहा उमेदवार उभे, असून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका मंगला आढाव व भाजपच्या ज्योती आढाव यांच्यात लढत आहे. सर्वसाधारण महिलांच्या गटात शिवसेनेच्या आशा पवार, राष्ट्रवादीच्या कुंदा सहाणे, भाजपच्या सुमन सातभाई यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. याच प्रभागात सर्वाधिक चुरस माजी नगरसेवक भाजपचे दिनकर आढाव व विद्यमान नगरसेवक शैलेंद्र ढगे यांच्यात पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीतील त्यांच्यातील चुरस नाशिकरोडकरांच्या चर्चेचा विषय झाली होती. माजी महापौर अशोक दिवे यांची राहुल व प्रशांत ही दोन्ही मुले वेगवेगळ्या पक्षांकडून लढत आहेत. प्रशांत दिवे अखेरच्या क्षणी शिवसेनेचे उमेदवार बनल्याने सगळी समीकरणे बदलली आहेत.

प्रभाग क्रमांक १८

या ठिकाणी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण असे आरक्षण आहे. अनुसूच‌ति जाती या वर्गामध्ये सहा उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या शोभना शिंदे, कॉँग्रेसचे मनोज रोकडे, भाजपचे शरद मोरे व अपक्ष उमेदवार नगरसेवक पवन पवार यांच्यात खरी लढत आहे. महिलांच्या गटात शिवसेनेच्या रंजना बोराडे या माजी नगरसेविका व व्यापारी बॅँकेवर संचालक असल्याने त्यांना या प्रभागात मताधिक्य मिळू शकते. भाजपतर्फे मंदा फड व राष्ट्रवादीतर्फे संगीता तुपे यादेखील नशीब आजमावत आहेत. सर्वसाधारण महिला गटात मीरा हांडगे, मनसेतर्फे रोहिणी पिल्ले व शिवसेनेच्या शीतल ताकाटे रिंगणात आहेत. या प्रभागातील खरी चुरस अपक्ष माजी नगरसेवक सुनील बोराडे, भारतीय जनता पक्षाचे विशाल संगमनेरे व शिवसेनेचे अशोक सातभाई यांच्यात आहे. विशाल संगमनेरे यांनी अनेक कार्यक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटवला आहे, तर पूर्वाश्रमीचे मनसेचे व सध्याचे शिवसेनेचे उमेदवार अशोक सातभाई हे व्यापारी बॅँकेवरही संचालक असल्याने त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो. सुनील बोराडे यांनीही राष्ट्रवादीतून प्रवेश केला होता. तथापि, एबी फॉर्मच्या घोळामुळे त्यांना अपक्ष लढावे लागत आहे. पक्षांतर करुनही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली असून, शिवसेनेला ती महागात पडू शकते.

प्रभाग क्रमांक १९

या प्रभागात संमिश्र वस्ती आहे. मागील निवडणुकीत या प्रभागात मतदारांची संख्या कमी होती. यंदा भौगोलिक स्थितीचा विस्तार झाल्याने परिस्थिती बदलली आहे. हा परिसर अनुसूचित जाती, नागरिकांचा मागस वर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. अनुसूचित जाती गटात या ठिकाणी हरीश भडांगे मागील वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यंदा ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. नगरसेवक कन्हैया साळवे भाजपकडून, तर माजी नगरसेवक संतोष साळवे शिवसेनेकडून रिंगणात आहेत. महिलांच्या गटातही चुरस आहे. यात राष्ट्रवादीच्या शोभा आवारे, भाजपच्या नंदा भोर, शिवसेनेच्या जयश्री खर्जुल यांच्यात खरा सामना होणार आहे. सर्वसाधारण गटात शिवाजी भागवत भारतीय संग्राम परिषदेतर्फे, मनसेतर्फे सचिन चव्हाण, राष्ट्रवादीतर्फे विक्की खेलूकर, तर शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे निवडणूक रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक २०

हा प्रभाग अनुसूचित जाती, नागरिकांचा मागस वर्ग प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण यासाठी राखीव करण्यात आला आहे. हा प्रभाग उच्चभ्रू असल्याने गेल्या दोन्ही वेळी तो भाजपचे संभाजी मोरुस्कर यांच्याकडे होता. या प्रभागात इतर प्रभागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या कमी असली, तरी तुल्यबळ लढत होईल अशी चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते असलेले अंबादास पगारे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याचप्रमाणे या गटात शिवसेनेतर्फे अशोक पगारे हेदेखील रिंगणात आहेत. मागास प्रवर्ग महिला गटात अवघ्या दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी नगरसेविका सीमा ताजणे या भाजपतर्फे, तर शिवसेनेतर्फे सुनीता गायकवाड उभ्या आहेत. सर्वसाधारण महिलांच्या गटात विद्यमान नगरसेविका संगीता गायकवाड भाजपतर्फे निवडणूक लढवित असून, त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेनेतर्फे योगिता गायकवाड या आहेत. या प्रभागात खरी चुरस आहे ती सर्वसाधारण गटामध्ये. यात भाजपचे विद्यमान नगरसेवक संभाजी मोरुस्कर, शिवसेनेचे गिरीश मुदल‌ीयार व मनसेचे विक्रम कदम यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. या प्रभागातील बालाजी मंदिर पाडण्याचा विषय चांगलाच तापला असून, त्याचे फायदे-तोटे नेमके कोणाला होतील यावर चर्चा झडत आहेत.

प्रभाग क्रमांक २१

या ठिकाणी स्लम वस्तीचा भाग अधिक असल्याने तेथील मतदारांवरच उमेदवारांची भिस्त राहणार आहे. त्याचप्रमाणे या प्रभागात मारवाडी, जैन व मुस्लिम समाज लक्षणीय असल्याने त्यांची मते कुठे झुकतात, यावर निकाल अवलंबून राहील. हा प्रभाग अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. या प्रभागात महिलांच्या अनुसूचित जाती गटात माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप या शिवसेनेतर्फे निवडणूक लढवित असून, त्यांना तुल्यबळ लढत देण्याचे काम शिवसेनेतून भाजपत गेलेल्या नगरसेविका कोमल मेहरोलिया यांना करावे लागत आहे. नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग गटात बहुजन समाजवादी पक्षातर्फे प्रतिभा भालेराव मैदानात असून, मनसेचे नगरसेवक रमेश धोंगडे यंदा शिवसेनेकडून निवडणूक लढवित आहेत. भाजपतर्फे नितीन खोले, मनसेतर्फे शिवसेनेचे माजी नगरसेवक अस्लम मणियार व ‘एमआयएम’चे सत्तार तांबोळी यावेळी एकमेकांसमोर उभे आहेत. सर्वसाधारण महिला गटात विद्यमान नगरसेविका वैशाली दाणी व शिवसेनेच्या ज्योती खोले यांच्यात चुरस आहे. सर्वसाधारण खुल्या गटात विद्यमान नगरसेवक सूर्यकांत लवटे यांची माजी नगरसेवक सतीश मंडलेच्या (भाजप) व रईस शेख (कॉँग्रेस) यांच्याशी चुरशीची लढत होत आहे.

प्रभाग क्रमांक २२

नाशिकरोडच्या मध्यवस्तीचा हा भाग असून, यात दिग्गजांची बाजी पणाला लागली आहे. अनुसूचित जाती विभागात शिवसेनेच्या उमेदवार व माजी महापौर नयना घोलप व त्यांच्या भावजय सुषमा रविकरण घोलप एकमेकांच्या समोर निवडणूक लढवित आहेत. नागरिकांच्या मागस वर्ग प्रभागात शिवसेना महिला विभागाच्या प्रमुख व माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर शिवसेनेतर्फे निवडणूक लढवित असून, त्यांना कॉँग्रेसच्या लंकाबाई हगवणे, भाजपच्या दीपाली कोठुळे, मनसेच्या पुष्पा रोकडे यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. सर्वसाधारण महिला गटात राष्ट्रवादीच्या स्नेहल देशमुख, शिवसेनेच्या सुनीता कोठुळे, भाजपच्या गौरी साडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वसाधारण गटात अपक्ष म्हणून चैतन्य देशमुख, भाजपतर्फे प्रभाकर पाळदे, शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक केशव पोरजे, राष्ट्रवादीचे चंद्रकांत साडे यंदाही नशीब आजमावून बघत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरंजन!

$
0
0

मनोरंजन!

प्रचार आता रंगात येऊ लागला होता... रायबा अन् सायबाच्या उमेदवारांसह डोअर टू डोअर भेटी झालेल्या होत्या... प्रचारगाड्या भोंगे घेऊन ओरडत होत्या... आता बारी प्रचारसभांची असल्यानं वर्कर मंडळी त्याच्याच तयारीत लागली होती... नाशकात बाणवाल्यांचं लक्ष त्यांच्या नेत्याच्या पहिल्या सभेकडं लागलं होतं... पाठोपाठ सगळ्याच पार्टीवाल्यांची नेतेमंडळी मैदानं गाजवणार होती...

रायबा : अरं, मुंबईत लई सामना रंगलाय बाणाविरुद्ध कमळाबाईचा... लई चिखलफेक झालीय... दोन्ही पार्टीवाल्यांनी तिसऱ्याला मंधी घुसूनच दिलेलं नाही म्हणे... आपल्याकडं बी लई मज्जा येणार आहे.

सायबा : होय होय... सामना रंगलाय अन् सामना पेपर बंद ठेवायची बी मागणी झालीय म्हणे...

रायबा : हा सामनाच कमळ वाल्यांच्या अंगावर येऊ शकतो बघ सायबा... मंडळी एकदम हमरीतुमरीवर आलीय... युती तोडण्याची घोषणा झालीय, आता सरकार पडलं तर डबल इलेक्शन लागायचं!

सायबा : आपल्याला बरंच आहे की... आपलं मीटर सुरू राहील... पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

वर्कर-३ : वेडे झाले का, इलेक्शन त्यांना बी परवडायचं नाही अन् आपल्यालासुद्धा... उद्या दोन रुपये मिळतील, पण लगेच दहा रुपये मोजावं लागतील बघा... लई अवघड काम होईल...

रायबा : बरोबर आहे भाऊ तुझं... इलेक्शन सोपं नव्हं... ह्ये मतदान पार पडलं की घेतील दमानं दोन्ही पार्ट्या... त्यांना बी ते कळतंच की... आता फुगवायच्या तेवढ्या बेटक्या फुगवतील...

वर्कर-३ : आपला टॉपिक सभेवरून थेट सरकारवर जाऊन पोचला मंडळी... आपल्याकडं घड्याळवाल्या सुप्रियाताईंनी शेतकऱ्यानं जाळलेला कांदा सीएमना भेटणार देणार असल्याची घोषणा केलीय... सरकारला लई झोडपलं त्यांनी... बाणवाल्यांना बी मांजर म्हणाल्या...

सायबा : आमचं इजिनवालं राजाभाऊ आलं की त्ये बी झोडपंल सगळ्यांना... एकदम हॉट फेवरिट माणूस आहे आपला... नुसत्या शिट्या अन् टाळ्या पडत्यात... पब्लिक वेडं होतंय राव त्यांना पाहिल्यावर... त्ये कोणला काय म्हणतंय, ते बघू...

रायबा : लोक सभेला गर्दी करत्यात... नेत्यांना, त्यांच्या भाषणांना एन्जॉय करतात... पण, मत त्यांनाच टाकतील याचा काही नेम नसतो राव...

वर्कर-३ : ह्ये अगदी खरं आहे... एका पार्टीसाठी गोल्फ क्लब मैदान भरवलं अन् दुसरीकडं त्याच पार्टीचं उमेदवार पाडल्याचं आपण पाहिलंय राव...

(कुणी किती बी हायटेक प्रचार केला, तरी मतदारांनी त्यांचा विचार पक्का केलेला असतो, या मतावर सगळ्या वर्करच एकमत झालं होतं... पार्टीवाल्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली असली, तरी सरकार पडणार नाही, याची बी खात्री तिघांना पटली होती... सगळ्या नेत्यांच्या सभांकडे मनोरंजन म्हणून पाहायचं, त्या एन्जॉय करायच्या, हे त्यांनी आता ठरवून टाकलं होतं...)

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारसाठी नवीन पार्किंग

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील रेल्वे स्टेशनकरिता सुभाषरोड भागात लवकरच चारचाकींसाठी नवीन पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. हे नवीन पार्किंग सुरू करण्यासाठी रेल्वेच्या भुसावळ मुख्यालयाला पुढील आठवड्यात प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिकरोड स्टेशनचे मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी यांनी ‘मटा’ला दिली. रेल्वे स्टेशनच्या चारचाकी वाहन पार्किंग घोटाळ्याचे वृत्त गुरुवारी ‘मटा’मध्ये मध्ये प्रसिद्ध होताच बेकायदेशीर वसुली थांबली असून, प्रशासनाने त्वरित दखल घेत नवीन पार्किंगसाठी कार्यवाहीस प्रारंभ केला आहे.

रेल्वे स्टेशनमध्ये दुचाकीच्या दोन अधिकृत पार्किंग आहेत. चारचाकी पार्किंग पार्सल कार्यालयामागे अडगळीत आहे. त्यामुळे असंख्य वाहनचालक रेल्वे पोलिस कार्यालयामागील सिमेंटच्या पटांगणात गाड्या लावतात. तेथे दुचाकीचे पार्किंग असले, तरी काही व्यक्ती चारचाकींच्या चालकांकडूनही बेकायदेशीररीत्या शुल्क वसूल करीत होते. विशेष म्हणजे त्याच्या पावत्याही दिल्या जात होत्या.


प्रशासन झाले सतर्क

याबाबतचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, सहाय्यक निरीक्षक संजय गांगुर्डे, तसेच रेल्वे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन पवार यांनी याची दखल घेतली. पठाण यांनी ‘मटा’ च्या वृत्ताचे क्लिपिंग आणि पत्र स्टेशनप्रमुख, रेल्वेचे बांधकाम विभागाचे अभियंता आदींना दिले. पार्किंगचा प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी पत्रात केली. त्यानंतर त्वरित बेकायदेशीर शुल्क वसुलीही थांबवली.


जागेची केली पाहणी

रेल्वे स्टेशनचे मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी यांनी सांगितले, की नवीन पार्किंगसाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल पुढील आठवड्यात भुसावळ मुख्यालयाला पाठविण्यात येईल. लवकरच सुभाषरोड मार्गावर अधिकृत चारचाकी पार्किंग होऊन बेकायदेशीर शुल्क वसुलीला आळा बसेल. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी सांगितले, की नवीन पार्किंगची मागणी आपण भुसावळ कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत गेल्या जुलै महिन्यातील बैठकीत केली होती. रेल्वे पोलिस कार्यालयामागील मोकळ्या जागेत बॅरिकेडिंग लावावेत, हा परिसर सुशोभित करावा, पार्किंग सुरू करावी, अशीही मागणी केलेली आहे.


पार्किंगचा प्रश्न गंभीर

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. बस, रिक्षा व टॅक्सी, तसेच व्यावसायिकांचा गराडा रेल्वे स्टेशनला पडल्याने रेल्वे स्टेशन येथे वाहने नेताना नाकी नऊ येतात. रेल्वे प्रवाशांना वाहने कोठे लावावीत, असा प्रश्न पडतो. दुचाकी वाहनचालक तिकीट विक्री केंद्र, रिझर्व्हेशन कार्यालय, रेल्वे कॅन्टिन, देवी चौक, पार्सल कार्यालय येथे वाहने उभी करतात. मात्र, चारचाकी वाहनचालकांना स्थानकाच्या आवारात, रेल्वे पोलिस कार्यालयामागे किंवा सुभाषरोडला वाहनांचे पार्किंग करावे लागते. वाहनचालकाने बेकायदेशीर शुल्क देण्यास विरोध केला, तर तो गेल्यानंतर वाहनाच्या चाकांची हवा सोडून दिली जाते. काचा फोडून सीटवर ब्लेड मारले जाते. सिन्नर फाटा तिकीट बुकिंग येथे वाहनतळ आहे. परंतु, बिटको उड्डाणपुलावरून तेथे जाणे परवडत नसल्याने सिन्नर फाटा वाहनतळ रिकामाच असतो.


गरिबांना रोजगार

सूत्रांनी दावा केला, की रेल्वे पोलिस कार्यालयामागील दुचाकी पार्किंगचे टेंडर तीस लाखांच्या आसपास गेले आहे. रोजचा सरासरी खर्च सात हजार रुपये आहे. वाहनांची देखभाल करण्यासाठी पाच कर्मचारी नेमावे लागले आहेत. त्यामुळे परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. देवी चौक आणि पार्सल ऑफिसजवळील अधिकृत चारचाकी पार्किंगमुळेही रोजगारनिर्मिती झाली आहे. नवीन पार्किंग झाल्यानंतर बेरोजगारांना दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २५३ केंद्रे संवेदनशील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत २६४६ मतदान केंद्रांपैकी तब्बल २५३ केंद्रे हे संवेदनशील तर १५ मतदान केंद्रे हे अतिसंवेदनशील आहेत. अतिसंवेदनशील केंद्रात सुरगाणा तालुक्यातील १३ तर निफाडचे २ मतदान केंद्राचा समावेश आहे. संवेदशीनल केंद्रात मालेगाव तालुक्यात सर्वाधीक ९४ केंद्र आहे. तर त्या खालोखाल नांदगाव तालुक्यात ३४ व निफाड तालुक्यात ३१ केंद्र आहेत. विशेष म्हणजे देवळा, चांदवड, नाशिक, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यात एकही संवेदनशील केंद्र नाही.

जिल्ह्यात चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुका १५ तालुक्यात होणार असून, त्यासाठी १,०३१ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३५३, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ६७८ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी एकूण ६९० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले, तरी उमेदवारांची संख्या जास्त आहे. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे अटीतटीच्या होणाऱ्या या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होवू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी २६४६ मतदान केंद्राची तपासणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली असून, त्यातून ही यादी तयार केली आहे. या संवेदशील केंद्रावर आता अतिरिक्त पोलिस बंदोबस्त दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images