Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे रविवारी भगूरला हेरिटेज वॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक व स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखले जाणारे विनायक दामोदर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे भगूर येथे रविवारी, २६ फेब्रुवारीला सकाळी ८.३० वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. भगूर येथील सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ‘मटा’ हेरिटेज वॉकच्या माध्यमातून स्वा. सावरकरांना अभिवादन तसेच त्यांच्या कार्याची माहिती करून देण्यात येणार आहे.

देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म २८ मे १८८३; मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६) हे आजही देशभक्तीच्या विचारांनी तरुणांच्या नसानसांत सळसळताना दिसतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदूसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. कवी व लेखक म्हणूनही प्रसिद्ध असलेल्या स्वा. सावरकरांनी पत्रकारिता ते समाजसुधारक म्हणूनही केलेले कार्य अनोखे आहे. असे अनेक पैलू मटा हेरिटेज वॉकच्या माध्यमातून थेट त्यांच्याच जन्मघर असलेल्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकात उलगडले जाणार आहेत. हेरिटेज वॉकमध्ये प्रा. रामनाथ रावळ, प्रशांत पाटील, न‌िखील देशमुख उपस्थितांना सावरकरांच्या विविध पैलूंविषयी माहिती देतील. सावरकांच्या घरातील स्वातंत्र्यलक्ष्मीची मूर्ती खंडोबा मंदिरात आहे हे मंदिर व स्वातंत्र्यलक्ष्मीचे दर्शनही घेण्याची संधी हेरिटेज वॉकच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच करंजकर गल्लीतील मुरलीधर मंदिरही पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

काय पाहता येणार?

हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होऊ इच्छ‌िणाऱ्यांनी सकाळी ८.३० वाजता सावरकर स्मारकात जमायचे आहे. स्वा. सावरकरांचे जन्म घर पाहिल्यानंतर करंजकर गल्लीतील मुरलीधर मंदिर व त्यानंतर अष्टभुजा स्वातंत्र्यलक्ष्मीची खंडोबा मंदिरातील मूर्ती पाहणार आहोत.

नावनोंदणी आवश्यक

मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी होऊ इच्छ‌िणाऱ्यांनी रमेश पडवळ यांच्या ८९९९००८५८८ या क्रमांकावर आपले नाव व सोबत येणाऱ्यांची संख्या व्हॉटसअप अथवा एसएमएस करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदगाव, चांदवडच्या उमेदवारांमध्ये धाकधूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड व नांदगाव जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला सत्तासंपादनाकडे घेऊन जातो आणि कोणाचा वारू थोपवतो याकडेच अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी मतदान झाल्यानंतर बुधवारी विविध तर्कवितर्क व अंदाजांना उधाण आले.

चांदवड व नांदगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजयाची खात्री असल्याचे दिसते. मात्र, शिवसेना व भाजप बरोबरच बंडखोर अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान असल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत नांदगावमध्ये सत्ता संपादन करणे आघाडीला जड जाईल, असे दिसते. गेल्या निवडणुकीत नांदगावमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. या वर्चस्वाला छेद देण्यासाठी शिवसेनेने केलेली तयारी या निवडणुकीत आघाडीसाठी अडचण ठरेल, असे दिसते. तर चांदवडमध्येदेखील शिवसेना भाजपसह अपक्षांचा मोठा प्रभाव जाणवल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे तुल्यबळ उमेदवार या प्रभावाला कसे दूर सारतात याचा फैसला गुरुवारी होणार आहे.

माजी आमदार शिरीष कोतवाल, उत्तमबाबा भालेराव, डॉ. सयाजी राव गायकवाड यांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागला असून, चांदवडमध्ये आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपलाही

मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचा विषय आहे. २०१२ मधील निवडणुकीत चांदवडमध्ये ६४.९० इतके मतदान झाले होते. ते यंदा २.८३ टक्क्याने वाढले आहे. तर नांदगावमध्ये यंदा गेल्या पंचवार्षिकपेक्षा मतदानात मोठी वाढ झाल्याने ५२.३८ पेक्षा १० ते साडे दहा टक्के जास्त म्हणजे ६३.५९ एवढे मतदान झाल्याने मतदानाचा हा वाढलेला टक्का कोणाला तारक ठरतो किंवा कोणाच्या अपेक्षांना सुरुंग लावतो हे पाहण्यासाठी उद्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. शिवसेना व भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून परस्परांना शह दिला आहे. त्याचा आघाडीला फायदा होतो, की वेगळे लढूनही दोघे आपली ताकद वाढवतात हेदेखील उद्या कळणार आहे.

माजी आमदार संजय पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने ज‌ि. प. व पं. स. निवडणुकीत ग्रामीण भागात निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विशेषतः भालूर गटात पवार बंधू बाजी मारून शिवसेनेचे आव्हान संपुष्टात आणतात की शिवसेना हा गड सर करते व नांदगावमध्ये आघाडीला पराभूत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चांदवडमध्ये तळेगाव रोही, दुगाव, वडनेर भैरव, वडाळी भोई या चारही गटात चुरस तर न्यायडोंगरीतील आहेर कुटुंबातील आजी विरुद्ध नात या चर्चेतील लढतीकडे, यासह साकोऱ्याची प्रतिष्ठेची लढाई, भालूरमधील प्रतिष्ठा व अस्तित्वाची निवडणूक आदींच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लाख मतदारांनी फिरवली पाठ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महानगरपालिकेच्या ३१ प्रभागांतून १२२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत साडेचार टक्क्यांच्या आसपास वाढ झाली. मात्र, तरीही चार लाख १२ हजार मतदारांनी या निवडणुकीत पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. गेल्या वेळी मतदानाची टक्केवारी ५७.१८ होती, तर यावेळी हीच टक्केवारी ६१.६० इतकी असून, त्यात ४.४२ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महिला व पुरुषांनी बरोबरीने मतदान केले असले तरी पुरुषांचा टक्का थोडा जास्तच आहे. ६०.५४ महिलांनी तर ६२.५२ टक्के पुरुषांनी मतदान केले. ही आकडेवारी गेल्या वेळच्या तुलनेत १.९८ टक्क्यांनी वाढली आहे. प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे मतदानाचा आकडा वाढला असला, तरी ३९ टक्के मतदार मात्र वेगवेगळ्या कारणांनी मतदानाला आलेच नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १० लाख ३ हजार मतदान असताना ५ लाख ७५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत १० लाख ७३ हजार ४०८ मतदारांपैकी ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी हक्क बजवला आहे. त्यात ५ लाख ७० हजार ६९९ पुरुष मतदारांपैकी ३ लाख ५६ हजार ८५५ मतदारांनी मतदान केले. महिलांमध्ये ५ लाख २ हजार ६३७ मतदारांपैकी ३ लाख ४ हजार ३४१ मतदारांनी हक्क बजावला.


तृतीथ पंथ‌ियांची तीन मते

मतदानाचा हक्क मिळूनही ७२ पैकी तीन तृतीयपंथ‌ियांनी मतदान केले. विशेष म्हणजे ही तिन्ही मते वेगवेगळ्या प्रभागांत होती. त्यात प्रभाग क्रमांक ९ व १० मध्ये प्रत्येकी एक मत तर प्रभाग क्रमांक २७ मध्ये एक मतदान झाले.

सर्वधिक मतदान प्रभाग दोनमध्ये

आडगाव, अमृतधाम व नांदूर-मानूर गाव हा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वाधिक मतदान झाले. या प्रभागात ३४ हजार ४९० मतदार होते. त्यापैकी २३ हजार ७८७ मतदारांनी आपला हक्क बजावला. याची टक्केवारी ६८.९७ होती. यात १२ हजार ७९० पुरुष, तर १० हजार ९९७ महिलांनी आपला हक्क बजावला. सर्वात कमी मतदान शिखरेवाडी परिसरात असलेल्या प्रभाग क्रमांक २० मध्ये झाले. यात ३२ हजार ७१ मतदारांपैकी १७ हजार ६६२ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यात पुरुषांची संख्या ९ हजार ३७२ तर महिलांची संख्या ८ हजार २९० होती.


सामाजिक संस्थांचा पुढाकार

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक सामाजिक संस्थांसह व्यावसायिक व संघटना पुढे आल्या. काहींनी चित्रपट तिक‌िटावर सूट जाहीर केली तर काहींनी हॉटेलमध्ये डिस्काऊंट जाहीर केला. यातून टक्केवारी वाढण्यात हातभार लागला. राज्य निवडणूक आयोग व महानगर पालिका प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले. त्यामुळे या टक्केवारीत वाढ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यश-अपयश कुणाच्या नशिबी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येवल्यात मंगळवारी अगदी चुरशीने मतदान झाल्यानंतर गुरुवारी (दि.२३) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोणाच्या नशिबी सात्वन येते आणि कोणाला गुलाल उधळण्याची संधी, याबाबतची उत्कंठता शिगेला पोहोचली आहे.

जिल्हा परिषदेच्या पाच गटांसह पंचायत समितीच्या दहा गणातील निवडणुकीसाठी मंगळवारी येवला तालुक्यातील १६७ मतदान केंद्रांवर एकूण १ लाख ५० हजार ६०४ मतदारांपैकी १ लाख ९ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सरासरी ७२.५० टक्के मतदारांनी ‘ईव्हीएम’च्या 'वरील कळ दाबली. गट-गणातील पंधरा जागांवर निवडणूक रिंगणात उतरलेल्या एकूण ६४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मंगळवारच्या मतदानात तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी अगदी उशिरापर्यंत मतदान झाले. मुखेड गटातील निमगाव मढ, चिचोंडी खुर्द, पाटोदा गटातील पाटोदा, अंदरसूल गटातील रास्ते सुरेगाव या मतदान केंद्रांवर मतदान संपण्याच्या अवघा तासभर मतदारांच्या रांगा लागल्याने सायंकाळी साडेपाच वाजेनंतरदेखील मतदान सुरू होते. चिचोंडी खुर्द व निमगाव मढ येथील केंद्रावरील मतदान पावणेआठ वाजेच्या सुमारास संपले. पाटोदा येथील एका मतदान केंद्रावर मतदान सव्वाआठ वाजेपर्यंत चालले. मतदान यंत्रातून नक्की काय बाहेर येणार, याची महाउत्कंठा लागली आहे. ‘झेडपी’च्या काही गटांचा अपवाद वगळता तालुक्यात अत्यंत अतितटीच्या लढती झाल्याची चर्चा मतदानानंतर झडू लागली. मतदानावरून एकंदरीत अंदाज बांधता येत नसल्याने बहुतांश गट-गणातील उमेदवारांची मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिला निकाल साडेअकराला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निकालाची हंडी आज फुटणार असून, राजकीय पक्षांसह उमेदवारांची अग्निपरीक्षा होणार आहे. १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. महापालिका प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून, शहरात दहा ठिकाणी मतमोजणी होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. मतमोजणीसाठी प्रत्येक ठिकाणी ११ टेबल राहणार असून, ४८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दहा वाजता मतमोजणी सुरू होणार असून, पहिला निकाल हा साडेअकरा वाजेपर्यंत येईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेला गालबोट लागू नये म्हणून सुरक्षेसाठी पोल‌िसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता नागरिकांना निकालाचे वेध लागले आहेत. मंगळवारी १२२ जागांसाठी ६१.६० टक्के इतके विक्रमी मतदान झाले. त्यामुळे टक्केवाढीचा फायदा नेमका कोणाला होणार, याची चर्चा सुरू असून, सर्वांचे लक्ष आता गुरुवारी येणाऱ्या निकालाकडे लागले आहे. महापालिकेने मतमोजणीसाठीची जय्यत तयारी केली आहे. शहरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकीसाठी तीन प्रभाग मिळून एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसारच सहा विभागांत दहा ठिकाणी मतमोजणीचे केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक केंद्रावर ११ टेबल ठेवण्यात आले असून, प्रभागानुसार मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतमोजणीसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी व ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातपूर क्लब हाऊस येथील मतमोजणी केंद्रावर चार प्रभाग असल्याने १२ टेबल लावण्यात येणार आहेत.


पाच ते सात फेऱ्या

प्रत्येक प्रभागात ३० ते ५० मतदान केंद्र आहेत. त्यामुळे एका प्रभाग, एक मतदान केंद्र यानुसार ११ टेबलवर मोजणी केली जाणार आहे. एका प्रभागाच्या पाच ते सात फेऱ्या होणार असून, पहिला निकाल येण्यास ११.३० वाजणार असून संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया तीन वाजेपर्यंत संपणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.


फेरीनुसार होणार घोषणा

प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर नागरिकांसाठी ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली आहे. फेरीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी हे कोणाला किती मते मिळाली, हे जाहीर करणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना हा निकाल ऐकता येणार आहे. अंतिम निकाल हा राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय जाहीर करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरच तो जाहीर होणार आहे.



प्रभाग- मतमोजणीचे ठिकाण

१ ते ३ - विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी

४ ते ६ - एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल, पेठ रोड, पंचवटी

७, १२, २४ - शिवसत्य क्रीडा मंडळ मैदान, माणिक नगर, गंगापूररोड

८ ते ११ -सातपूर क्लब हाऊस, सातपूर

१३ ते १५ - महात्मा फुले कलादालन, शालिमार

१७ ते १९- शासकीय तंत्रनिकेतन, सामनगावरोड

१६, २३, ३० - शर्मा मंगल कार्यालय, दीपाली नगर

२० ते २२ - विभागीय कार्यालय, नाशिकरोड

२५, २६, २८- प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड

२७, २९, ३१- राजे संभाजी स्टेडियम, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणमध्ये मातब्बरांना धक्का!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातही मतदानाची टक्केवारी वाढल्याने अनेक मातब्बरांना धक्के बसण्याची शक्यता आहे. तालुक्यात सर्वाधिक मतदान पठावे दिगर या आदिवासी गटात सर्वसाधारण जागेसाठी (७३.१४) झाल्याने येथील विजयाचे समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

पठावे दिगर जि. प. गटात राष्ट्रवादीचे संजय सोनवणे, भाजपचे मन्साराम गावीत तर अपक्ष उमेदवार गणेश अहिरे यांच्यात चुरस होती. सर्व आदिवासी समाजबांधव एकत्र आल्याने या ठिकाणी मतांची टक्केवारी वाढली आहे. जायखेडा या सर्वसाधारण गटात दुसऱ्या क्रमांकाचे मतदान (६९.४१) झाले. राष्ट्रवादीचे यतीन पगार, काँग्रेसच्या मनिषा भामरे तर अपक्ष डॉ. नवलसिंग पवार यांच्यात तिरंगी सामना झाला. ब्राह्मणगाव गटात शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या सरळ सामन्यात ६८.५८ टक्के मतदान झाले. या ठिकाणी बच्छावद्वयींमध्ये सामना रंगला आहे. ताहाराबाद गटात ५२.६३, नामपूर गटात ५५.४४, वीरगाव गटात ५८.८७, तर ठेगोंडा गटात ६१.५३ टक्के मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुकरी शोमध्ये मिळाल्या झटपट रेसिपी टिप्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉलभर दरवळलेला फोडणीचा सुंगध...बिया काढलेले हॉलो टोमॅटो वडे...गजरेला स्वीट डिश...डायटीश स्प्राऊट्स दहीवडा अशा एकाहून एक सरस अशा हटके रेसिपी...विविध डिश तयार करताना उपस्थितांच्या मनात पडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना मास्टर शेफ विष्णू मनोहर.. हे चित्र होते ‘टाइम्स ग्रुप’तर्फे आयोजित ‘द कुकरी शो’या उपक्रमाचे.

हॉटेल एमरल्ड पार्क येथे ग्रीन व्ह्युव्ह हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या पत्नी सौम्या कृष्णा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी मॉझिरीला चीज रोल्स राइस, गजरेला स्वीट डीशेस, डायटिंग स्प्राऊट दहीवडा आदी डिशेस बनवून दाखवल्या. उपस्थितांनी या रेसिपी लिहून घेतल्या, तर काहींनी कार्यक्रमाचे रेकॉर्डिंगही केले. या उपक्रमात मास्टर शेफ मनोहर यांनी कमी वेळेत कमी जिन्नसांपासून चटकदार हटके रेसिपी कशी बनवता येईल याची माहिती दिली.याप्रसंगी ‘टाइम्स ग्रुप’च्या नाशिक ब्रँच हेड मंजिरी शेख यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे सौम्या कृष्णा आणि मास्टर शेफ विष्णू मनोहर यांचा सत्कार करण्यात आला. ‘द कुकरी शो’चे व्हेन्यू पार्टनर द एमरल्ड पार्क, असो. स्पॉन्सर इंडोलाइन, कोपार्टनर सुवर्णनक्षत्र आणि बनिया बाजार, तर हॉलिडे पार्टनर दुर्वांकूर हॉलिडेज् हे होते. सूत्रसंचालन जया गोसावी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायकवाड पुन्हा प्राचार्यपदी

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : @jitendratartemt

पाच वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ (बीसीयूडी) च्या संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण होत आहे. यामुळे त्यांनी कर्मभूमी नाशिकमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकतीच मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम कॉलेजच्या प्राचार्यपदाची सूत्र पुन्हा हाती घेतली आहेत.

कर्तृत्ववान आणि कार्यक्षमतेने छाप पाडणारे प्राचार्य म्हणून डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचा लौकिक आहे. ७ जून २०१२ मध्ये त्यांनी केटीएचएमचे प्राचार्यपद सोडून विद्यापीठाच्या बीसीयूडी विभागाचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. दरम्यानच्या कालावधीत विद्यापीठाशी संबंधित अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. याशिवाय नाशिकच्या पुणे विद्यापीठ विभागीय उपकेंद्र निर्मितीसाठीही त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. गायकवाड यांच्या विद्यापीठातील संचालक पदाचा कार्यकाळ अद्याप तीन महिने शिल्लक आहे. विद्यापीठाचा नवा कायदाही प्रस्तावित आहे. या कायद्यात हे पद रद्द करण्याचेही प्रस्तावित आहे. या संदर्भातील अंतिम निर्णयावर अद्याप शासनाचा शिक्कामोर्तब नसला

तरीही सद्यस्थितीत तरी डॉ. गायकवाड यांनी स्वगृही परतणे पसंत केले. सध्या विद्यापीठाचा बीसीयूडी संचालक पदाचा पदभार आंतरप्रणाली अभ्यासकेंद्राचे प्रमुख (मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे) डॉ. राजा दीक्षित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पदाच्या जागी अधिकार मंडळ

नव्या सरकारने पुढे केलेला विद्यापीठ कायदा अनेक दृष्टीने चर्चेचा विषय ठरला. या प्रस्तावित कायद्यातील अनेक तरतुदींवर सरकारकडून शिक्कामोर्तब शिल्लक आहे. यातीलच एक बाब म्हणजे बीसीयूडी (महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ) च्या जागी नवे अधिकार मंडळ अस्तित्वात आणणे प्रस्तावित आहे. या कायद्यात अधिसभा व विद्यापरिषदांचे अधिकार कमी करून कुलगुरू व शासनास अधिक अधिकार बहाल करण्यात आले आहेत. अशा अनेक बदलांमुळे हा कायदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहीला.

बीसीयूडी संचालक पदाचा कार्यकाळ अद्याप तीन महिने शिल्लक आहे. मात्र , कर्मभूमी नाशिकमध्ये पुन्हा मविप्र संस्थेने सोपविलेली जबाबदारीही तितकीच महत्वाची वाटते. ‘नॅक’ साठी तयारीसोबत अनेक नवी उद्दिष्ट आहेत. त्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन.

डॉ. व्ही.बी.गायकवाड,
माजी संचालक, बीसीयूडी, पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुभाजकांवरील हिरवळ कोमेजली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नवीन सिंहस्थ मार्गाच्या सुशोभिकरणाच्या माध्यमातून दुभाजकांवर लावण्यात आलेली रोपे कोमेजून सुकून गेली आहेत. पाण्याच्या अभावामुळे वाळलेल्या रोपांमुळे या रस्त्यावरचे सौंदर्यच लोप पावले आहे. लाखो रुपये खर्च करून दुभाजकांवर विविध प्रकारेच्या रोपांची लागवड करण्यात आलेली होती. त्या रोपांना गोदावरीला आलेल्या पुराचा फटका बसला. जी काही रोपे शिल्लक होती, त्यांना पाणीच देण्यात आले नाही, त्यामुळे ते रोपे पाण्याअभावी सुकून गेली आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनेक सुशोभिकरणाची कामे करण्यात आली त्यात गाडगे महाराज पूलापासून ते टाळकुटेश्वर पूलापर्यंतच्या नवीन सिंहस्थ मार्गावरील सुशोभिकरणाचा समावेश करण्यात आला. होता. या मार्गावर पथदीप बसविण्यात आले होते. ते पथदीप ज्या दुभाजकांवर बसविण्यात आले होते.

त्या दुभाजकांना आकर्षक रंग देण्यात आला होता. या दुभाजकांमध्ये माती टाकून त्यावर फुलांच्या रोपांची लागवडही करण्यात आली होती. त्यांना आलेल्या फुलांनी या रस्त्याचे सौंदर्य खुलून गेले होते. मात्र, गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात दुभाजकावरील या रोपांना फटका बसला, तरीही त्यातील काही रोपे तग धरून होती. त्यांच्या देखभालीकडे आणि त्यांना त्यांना वेळेवर पाणी देण्यात आले नसल्यामुळे ही रोपे सूकून गेली. सध्या हा दुभाजकांचा भाग एकदम भकास दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुसज्ज मार्केट वापराविना

$
0
0

दुर्गा गार्डन परिसरातील मार्केट धूळखात; भाजीबाजाराकडे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकीकडे सिन्नर फाटा आणि नाशिकरोड परिसरात भाजीबाजारासाठी जागा नसल्याची बोंब होत असते. तर दुसरीकडे उड्डाणपुलाखाली भाजीबाजार भरवण्यात येतो. याउलट दुर्गा गार्डनजवळील सुसज्ज असे भाजीपाला मार्केट वापराविना पडून आहे. अशा परिस्थितीत याठिकाणी भरणाऱ्या भाजीबाजाराने तयार भाजीबाजाराच्या समस्यांचा बाजारच भरला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

नाशिकरोड परिसरातील उड्डाणपुलाखालील भाजी बाजाराचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून रेंगाळला आहे. या भाजीबाजारामुळे शिवाजी पुतळा ते बिटको चौक या दरम्यान दररोजच वाहतूक कोंडीचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागत आहे. दुसरीकडे महापालिकेनेच लाखो रुपये खर्च करून उभारलेला दुर्गा गार्डनलगतचा भाजीबाजार मात्र वापराविना पडून आहे. त्यामुळे या भाजीबाजारात समस्यांचाच बाजार भरल्याचे दिसून येत आहे.

तब्बल २५० ओटे रिकामे

नाशिक महापालिकेने दुर्गा गार्डनलगत उभारलेल्या भाजीबाजाराचे तत्कालीन महापौर नयना घोलप यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले होते. या भाजीबाजारात सुमारे २५० भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची सोय होणार आहे. परंतु, अद्यापपर्यंत या भाजीबाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी, महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्यासारखे आहे.

लोकप्रतिनिधींची अनास्था

दुर्गा गार्डनलगतच्या भाजीबाजाराचा वापर शहरातील विविध भागात भाजीपाला विक्रेत्यांनी करावा, यासाठी स्थानिक नगरसेवकांनी गेल्या काही वर्षांत कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या अनास्थेमुळे हा भाजीबाजार आज विविध समस्यांचे आगार बनला आहे.

नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा भाजीबाजाराचा प्रश्न असाच ताटकळत पडला असल्याचे यावरून दिसून येते.

स्थलांतरास लागेना मुहूर्त

नाशिकरोडच्या बिटको चौकातील उड्डाणपुलाखालील भाजीबाजार अनधिकृत पार्किंग व वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या समस्येवर तोडगा काढण्यास महापालिका प्रशासनास सुचलेले नाही. वास्तविक बघता उड्डाणपुलाखालील भाजीबाजार दुर्गागा र्डनलगतच्या भाजीबाजारात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. मात्र, त्याप्रमाणे कोणतीही कृती महापालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही. अथवा त्यासाठी अद्याप तरी मुहूर्त लागत नाही, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आवश्यक सुविधा द्या!

दुर्गागार्डन भाजीबाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी बसण्यास नापसंती दर्शविली आहे. याठिकाणी आवश्यक मुलभूत सुविधा नसल्याचा त्यांचा आरोप आहे. तर ओट्यांची संख्या कमी व भाजीपाला विक्रेत्यांची संख्या जास्त असल्यानेही या भाजीबाजाराचा प्रश्न वादात सापडला आहे. त्यामुळे याठिकाणी सुविधा दिल्यास आम्हाला सोयीचे होईल, असे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. दुर्गा गार्डन येथील भाजीबाजारात जाण्यासाठीचा रस्ता पुरेसा नाही. या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची वाहने भाजीबाजारापर्यंत जाऊ शकत नाही. तसेच या भाजीबाजाराला अस्वच्छतेचे ग्रहणच लागलेले आहे. जे काही मोजके व्यावसायिक ओट्यांचा वापर माल साठविण्यासाठी करतात त्यांनाही या समस्यांनी बेजार केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसांमुळे ‌दिग्गजांची वाढली धाकधूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेवर कोणाची सत्ता येईल आणि कोणत्या राजकीय नेत्याचा वारस महापालिकेत एंट्री करेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापालिकेत दिग्गजांसह आमदार व माजी महापौरांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात असून, राजकीय वारसाची लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अर्धा डझनपेक्षा जास्त वारसांच्या भवितव्याचा निकाल आज स्पष्ट होणार असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गजांचे वारसदार आपले नशीब आजमावत आहेत. महापालिकेत वडिलांचा वारस म्हणून एंट्री करायच्या तयारीत आहेत. या नेत्यांनी तिकीट वाटपात घराणेशाही केली असली तरी, मतदार या घराणेशाहीला कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागून आहे. नगरसेवक, महापौर, आमदारकी भूषविल्यानंतर राज्यपातळीवरील राजकारणाकडे झेपावत असतांना या नेत्यांनी आपल्या वारसांना पालिकेच्या राजकाणात प्रवेश करून घराणेशाही सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात माजी महापौरांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात असून, कोण राजकीय वारसाची लढाई जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील, माजी महापौर अशोक दिवे यांचे दोन्ही पुत्र प्रशांत व राहुल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

माजी आमदार व माजी महापौर असलेले वसंत गिते यांचे पुत्र प्रथमशे गिते, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांचे पुतणे कैलास चुंभळे, माजी स्थायी समिती सभापती उत्तम कांबळे यांचे पुत्र समीर कांबळे, शिक्षण सभापती संजय चव्हाण यांची कन्या स्नेहल चव्हाण, भाजपचे उपाध्यक्ष दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील, माजी नगरसेवक केशव अण्णा पाटील यांचा पुत्र राम पाटील, राष्ट्रवादीचे नेते नाना महाले यांचे पुत्र अमोल महाले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल यांच्या मातोश्री भिखुबाई बागूल यांचा समावेश आहे. तसेच माजी आमदार बबन घोलप यांची कन्या नयना घोलप या ही नशीब आजमावत आहेत.


हिरे, आहेरांचा वारस कोण

नाशिकच्या राजकारणात मोलाचे योगदान असलेल्या आहेरांचेही वारस या निवडणुकीत नशीब आजमावत आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या चुलत बहीण हिमगिरी आडके व आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे हे प्रभाग सातमधून नशीब आजमावत आहेत. दोघांसमोर तगडे उमेदवार असल्याने कोण पालिकेत प्रवेश करणार याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीला हिंसक वळण

$
0
0

पोलिसांचा गोळीबार तर आंदोलकांकडून आंधारात दगडफेक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोप प्रत्यारोपातून वाढलेल्या वादानंतर पंचवटीतील प्रभाग तीन मध्ये संध्याकाळनंतर हिंसक आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये फ्री स्टाईल झाली. आंदोलनकर्त्यांना आवरताना पोलिसांना लाठीचार्ज आणि नंतर हवेत तीन ते चार राउंड फायर करावे लागले. आंदोलनकर्त्यांच्या दगडफेकीत एका पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. रात्री उशिरा हा गोंधळ आवरण्यात पोलिसांना यश आले.

भाजपचे शहराध्यक्ष, तसेच आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुत्राच्या उमेदवारीमुळे लक्ष लागलेल्या प्रभाग तीनच्या मतमोजणीतील गोंधळ उशिरापर्यंत सुरू राहिला. दोन इव्हीएम मशिन टाकण्यात आले, निवडणूक अधिकारी आणि पर्यवेक्षक अधिकारी मद्य पीऊन आले, मेमरी कार्ड बदलण्यात आले असे डझनभर आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आले. या प्रश्नांना पुरक उत्तरे देण्यात निवडणूक अधिकारी अपयशी ठरल्याने कार्यकर्त्यांमधील असंतोष वाढत गेला. त्यातच भाजपाच्या तीन तर सेनेच्या अवघ्या एका उमेदवारास विजय मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातच शहरात सर्वत्र भाजपाला बहुमत मिळाल्याची वार्ता पुढे आल्याने असंतोष निर्माण झाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांसह निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली.
पोलिसांनी सुरूवातीस लाठीचार्ज करीत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी यानंतर हवेत गोळीबार केला. मीनाताई ठाकरे स्टेडीयमच्या आजुबाजुस असलेल्या काळोखाचा फायदा घेत लपलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले. या बाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आंदोलकाचा जोर वाढला. त्यानुसार आम्ही सुरूवातीस समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लाठचार्ज व शेवटी हवेत गोळीबारा झाला. आता परिस्थिती नियंत्रणात असून, संबंधीतांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.

काही समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला केला होता. माझ्यासह आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे - डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी मंत्री घोलपांच्या दोन्ही कन्यांचा पराभव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या व विद्यमान आमदार योगेश घोलप यांच्या भगिनी नयना व तनुजा यांना पराभवाचा धक्का बसला. तनुजा घोलप या प्रभाग क्रमांक २१ मधून, तर नयना घोलप या प्रभाग क्रमांक २२ मधून रिंगणात होत्या.

शिवसेनेत घराणेशाहीला स्थान नाही, हे पुन्हा एकदा मतदारांनी घोलपांच्या कुटुंबाला बाजूला सारून दाखवून दिले. माजी महापौर नयना घोलप यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीविषयी मतदारांमध्ये नाराजी होती. स्वतःच्या प्रभागातील कामे त्या मार्गी लावू न शकल्याचे त्यांच्या प्रभागातील मतदारांचे म्हणणे होते. ही अस्वस्थता मतदारांनी मतपत्रिकेतून दाखवून दिली.

माजी महापौर विनायक पांडे यांच्या मुलाला व भावजयींना पक्षातूनच झालेला विरोध सर्वश्रुत आहे. पांडेच्या कुटुंबीयांना तिकीट नाकारल्याने मोठा गदारोळ झाला होता. पांडे कुटुंबीयांना एक न्याय व घोलप कुटुंबीयांना एक न्याय यामुळेदेखील शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. घोलपांनी आपले राजकीय वजन वापरुन कुटुंबीयांना उमेदवारी मिळवली असल्याचे मतदारांचे म्हणणे होते.

घोलप स्वतः माजी मंत्री, मुलगा योगेश हा आमदार व दोन्ही मुलींना शिवसेनेची उमेदवारी त्यामुळे पक्षातदेखील त्यांच्या कर्तृत्वाबाबत नाराजीचा सूर होता. घोलपांनीही मध्यंतरी वादग्रस्त विधान केल्याचे मतदारांच्या लक्षात होते. ही नाराजी मतदारांनी मतपत्रिकेद्वारे दाखवून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात दाम्पत्यांपैकी सहा घरी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणूक रिंगणात नशीब आजमवणाऱ्या एकूण सात दाम्पत्यांपैकी केवळ बडगुजर दाम्पत्याच्याच पदरात यश पडले आहे. उर्वरित सहा दाम्पत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

२०१२मध्ये एकूण ३ दाम्पत्ये महापालिकेत निवडून आली होते. त्यात सुधाकर व हर्षा बडगुजर, दिनकर व लता पाटील आणि शिवाजी व कल्पना चुंभळे यांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीत एकूण ७ दाम्पत्यांनी रणांगणात उडी घेतली होती. प्रभाग २५मधून शिवसेनेच्या तिकिटावर विद्यमान नगरसेवक दाम्पत्य सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर हे रिंगणात होते. या दोघांनाही मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. महापालिकेच्या सभागृहात पुन्हा निवडून जाण्याचा मान त्यामुळे त्यांना मिळाला आहे. याच प्रभागात भाजपकडून इच्छुक असलेले, पण त्यानंतर बंडखोरी केलेले दाम्पत्य प्रकाश व चित्रा अमृतकर हे क आणि ड गटातून रिंगणात होते. मात्र, अपक्ष राहून त्यांनी घातलेली साद मतदारांनी नाकारली आहे. शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांचे पुतणे रविकिरण घोलप यांनी प्रभाग २०मधून दावेदारी केली होती, तर त्यांच्या पत्नी सुषमा यांनी रविकिरण यांची चुलत बहीण व माजी महापौर नयना घोलप यांच्याविरोधात प्रभाग २२मधून अपक्ष उमेदवारी केली होती. या घोलप दाम्पत्यालाही मतदारांनी साथ दिलेली नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना त्याचा फायदा झाला आहे.

प्रभाग २२ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार स्नेहल देशमुख आणि त्यांचे पती चैतन्य यांनी अपक्ष उमेदवारी केली. या दोघांनाही या ठिकाणी यश प्राप्त करता आलेले नाही. प्रभाग ३ मध्ये सचिन शिवाजी अहिरे आणि रोहिणी अहिरे या दाम्पत्याने अधिकृत पक्षाच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. हे दोघेही पराभूत झाले. त्यामुळे गेल्या वेळच्या तुलनेत यंदा केवळ एकच दाम्पत्य महापालिकेत प्रतिनिधीत्व करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीला हिंसक वळण; पोलिसांचा गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आरोप प्रत्यारोपातून वाढलेल्या वादानंतर पंचवटीतील प्रभाग तीनमध्ये संध्याकाळनंतर हिंसक आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. आंदोलनकर्त्यांना आवरताना पोलिसांना लाठीचार्ज आणि नंतर हवेत तीन ते चार राऊंड फायर करावे लागले. आंदोलनकर्त्यांच्या दगडफेकीत एका पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. रात्री उशिरा हा गोंधळ आवरण्यात पोलिसांना यश आले.
भाजपचे शहराध्यक्ष, तसेच आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुत्राच्या उमेदवारीमुळे लक्ष लागलेल्या प्रभाग तीनच्या मतमोजणीतील गोंधळ उशिरापर्यंत सुरू राहिला. दोन ईव्हीएम टाकण्यात आले, निवडणूक अधिकारी आणि पर्यवेक्षक अधिकारी दारू प‌िऊन आले, मेमरी कार्ड बदलण्यात आले असे डझनभर आरोप विरोधकांकडून करण्यात आले. या प्रश्नांना पूरक उत्तरे देण्यात निवडणूक अधिकारी अपयशी ठरल्याने कार्यकर्त्यांमधील असंतोष वाढत गेला. त्यातच भाजपच्या तीन तर सेनेच्या अवघ्या एका उमेदवारास विजय मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातच शहरात सर्वत्र भाजपाला बहुमत मिळाल्याची वार्ता पुढे आल्याने असंतोष निर्माण झाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांसह निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. पोलिसांनी सुरुवातीला लाठीचार्ज करीत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी यानंतर हवेत गोळीबार केला. मीनाताई ठाकरे स्टेड‌ियमच्या आजूबाजूस असलेल्या काळोखाचा फायदा घेत लपलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले.
अंधारातून दगडफेक
या बाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आंदोलकांचा जोर वाढला. त्यानुसार आम्ही सुरूवातीस समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लाठीचार्ज व शेवटी हवेत गोळीबारा झाला. आता परिस्थिती नियंत्रणात असून, संबंध‌ितांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.
काही समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला केला होता. माझ्यासह आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
- डॉ. रवींद्रकुमार सिंघल,
पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मुंबईनाका परिसरातील दीपालीनगर येथील शर्मा मंगल कार्यालयात अखेरच्या टप्प्यात मतमोजणी करणारे कर्मचारी आणि मनसेचे उमेदवार व कार्यकर्ते यांच्यात उडालेल्या शाब्द‌िक चकमकीचे रुपांतर अल्पावधीतच तुफान गोंधळात झाले. यादरम्यान मनसेसह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवारांनी ईव्हीएममध्येच घोळ असल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करीत आक्षेप घेतला. परिणामी, तणावाच्या बनलेल्या वातावरणानंतर सुमारे एक ते दीड तास येथील मतमोजणी प्रक्र‌िया रखडली होती.
या केंद्रावर १६, २३ आणि ३० या तीन प्रभागांच्या मतमोजणीस सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. अतिशय संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्र‌ियेत क्रमानुसार तिसऱ्या प्रभागाची मोजणी सुरू होण्यास दुपारचे ४.३० वाजले. पहिल्या दोन फेऱ्यांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी विजय भांगरे यांनी जाहीर केली होती. या दोन्हीही फेऱ्यांमध्ये प्रभागात चारही जागांवर भाजपाच्या उमेदवारांची आघाडीची मते होती. निर्णायक अवस्थेकडे ही मोजणी चालली असताना मनसेचे उमेदवार निक‌ितेश धाकराव यांनी ईव्हीएममध्ये गोंधळ जाणवत असल्याची शंका उपस्थित करत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली. यावर मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, अगोदर तुम्ही झोपेत होता का? असा सवाल केल्याची तक्रार केली. यापाठोपाठ ईव्हीएम मशीनमध्येच फेरफार करण्यात आल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी मतमोजणीवर बहिष्कार टाकल्याच्या जोरदार घोषणा दिल्या. मनसेला साथ देत इतरही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी गोंधळ घालत केंद्र डोक्यावर घेतले. काही कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ करत असहकाराची भूमिका घेतली. कर्मचाऱ्यांनाही धमक्या देत मतमोजणी थांबवून ठेवली. येथील तणाव वाढत चालल्याने अखेर बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. यावेळी दोन्हीही बाजूंमध्ये समन्वय साधत लोकशाहीच्या मार्गाने तक्रार दाखल करण्याचे आवाहन त्यांनी नेते व कार्यकर्त्यांना करत परिस्थिती नियंत्रणात आणली. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पुन्हा मतमोजणीला प्रारंभ झाला तरीही वातावरणातील तणाव कायमच होता.
ईव्हीएममध्ये घोळ करून एकतर्फी विजय मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न या केंद्रावर उघड झाला आहे. याबाबत रीतसर तक्रार निवडणूक लढवत असलेले सर्वच उमेदवार निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. याप्रकरणी कायदेशीर मार्गाने लढा देऊ.
-संजय चव्हाण, शिवसेना पुरस्कृत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा झंझावात

$
0
0

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत; शिवसेनेला धक्का, मनसेची वाताहत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका निवडणुकीत सर्व अंदाज फोल ठरवत भाजपने एकहाती विजय खेचून आणत स्पष्ट बहुमत मिळवले. शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते देण्याबरोबरच नाशिककरांनी मनसेला भुईसपाट करीत गोदावरी काठावर प्रथमच कमळ फुलविले. भाजपच्या झंझावाती लाटेत शिवसेना बचावली असली तरी मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुरती वाताहात झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेवटच्या सभेने नाशिकच्या निकालाला कलाटणी दिली असून, शहराचे संपूर्ण चित्रच फिरल्याने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शहरातील सर्वच भागात भाजपने घौडदौड करीत सेनेला पिछाडीवर टाकले. विशेष म्हणजे नऊ प्रभागांमध्ये सर्व जागा जिंकत तब्बल 66 जागांवर विजय मिळवल्याने महापालिकेवर भाजपचाच महापौर बसणार हे निश्चित झाले आहे.

अपेक्षेपेक्षा महापालिकेचे निकाल धक्कादायक ठरले असून, शिवसेना नंबर वन राहील या राजकीय धुरिणांच्या दाव्याला खोटे ठरवत आपणच नंबर वन असल्याचे भाजपने सिद्ध केले आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच घेतलेली आघाडी भाजपने शेवटपर्यंत कायम राखली. त्यामुळेच बहुमताचा जादुई आकडा गाठता आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप व पाच आमदारांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत. उमेदवारी वाटपावेळी झालेले आरोप व पक्षातील बंडाळीने भाजप पिछाडीवर जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, हे अंदाज भाजनपे खोटे ठरवले.

दत्तकविधान पावले

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सभेनंतर नाशिककर भाजपला प्रतिकूल झाले असे वाटत होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या सभेत संपूर्ण चित्र फिरवले. त्यांनी नाशिकला दत्तक घेण्याचा शब्द दिल्याने परिवर्तन झाले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णायकी सभेमुळेच भाजपला गोदाकाठावर प्रथमच कमळ फुलवता आले आहे. गेल्यावेळेस सत्तेवर असलेल्या मनसेचे पानिपत होऊन संख्याबळ 40 वरून थेट पाचवर उतरले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या विकासाला मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसला दोन अंकी संख्याही गाठता आलेली नाही.

मतमोजणीला गालबोट; चकमकीत चार जखमी

सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतमोजणीला सांयकाळी गालबोट लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि गोळीबार करावा लागला. प्रभाग ३ मध्ये बॅलेट मशिनमध्ये गडबड केल्याचा आरोप भाजप वगळता अन्य पक्षांनी करीत मतमोजणीच थांबवली. तसेच भाजपवर गंभीर आरोप केले. त्यामुळे संतप्त जमावाने निकाल जाहीर करणाऱ्या प्रशासनासह पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार केला. त्यात चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्रभाग ३० मध्ये मनसेच्या उमेदवाराने गोंधळ घालत मतमोजणी बंद पाडली होती. आकडेवारीत गोंधळ असल्याने ही मतमोजणी बऱ्याच वेळ रखडली होती. परंतु, भाजपचे तीन उमेदवार निवडून आल्यानंतर विरोधी उमेदवारांनी थेट महापालिकेसमोर आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाचे दिवस दूर नाहीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या आवाहनाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद देत, भाजपला घवघवीत यश देत महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवून दिले आहे. नाशिकचा विजय हा सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा विजय असून, आता नाशिकच्या विकासाचे दिवस दूर नसल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विजयानंतर दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर विश्वास प्रकट करून भाजपच्या बाजूने कौल दिल्याने आपण नाशिककरांचे ऋणी राहू, अशा शब्दांत त्यांनी आभार मानले आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिकचा विकास करू, असे आश्वासन त्यांनी नाशिककरांना दिले आहे.

पालकमंत्री महाजन म्हणाले, की नाशिकच्या विजयानंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी जनतेने आमच्यावर दाखविलेल्या विश्वासास आम्ही नक्कीच पात्र ठरणार असून, विकास काय असतो ते आम्ही दाखवणार आहोत. नाशिकच्या जनतेने विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या बाजूने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास प्रकट करीत दिलेला हा कौल आहे. त्यासाठी मी नाशिकच्या जनतेचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी शहर दत्तक घेणे या विधानाला खूप महत्त्व आहे. पुढच्या काळात याचा प्रत्यय जनतेला निश्चितपणे येईल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्याच्या प्रमुखाचे पाठबळ मिळणे ही मोठी गोष्ट आहे. नाशिकच्या विकासासाठी जमेची बाजू आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचा सर्वांगीण विकास करण्यावर, एक आदर्श शहर म्हणून या शहराची ओळख करण्यावर आमचा भर राहणार आहे. आम्ही आमची भूमिका निवडणुकीपूर्वीच स्पष्ट केली होती, की कुणावर टीका करण्याऐवजी आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन ‘स्मार्ट नाशिक’ची कल्पना घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही आमच्या विकासाच्या कल्पना प्रचारादरम्यान मांडल्या. जनतेला त्या भावल्या, असेच म्हणावे लागेल.

निवडणुकीपूर्वी अनेक आरोप करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. नाशिकची जनता सुसंस्कृत आणि तितकीच सुजाण आहे. त्यांनी या आरोपाला जराही किंमत न देता भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे. माझी भूमिका कार्यकर्त्याची आहे आणि जनसेवेचा माझा पिंड आहे. त्यामुळे हा विजय मोठा जरी असला तरी ती जनतेने टाकलेली जबाबदारी म्हणून मी नम्रपणे स्वीकारतो. नाशिकच्या जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवीत आमच्या ध्येयनाम्यातील कामे मूर्त रूपात आणण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहील. पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्वांना सेाबत घेऊन नाशिकचा विकास हेच उद्दिष्ट आता समोर आहे. मी इतरही पक्षांना आवाहन करतो, की त्यांनीदेखील विरोधी पक्षाची भूमिका बजावताना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र यावे. शेवटी जनतेने विकासाच्याच बाजूने कौल दिला आहे. या विजयासाठी सर्व आमदार, पदाधिकारी, तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न केले, असेही महाजन म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला नाशिककरांनी भरभरून साद दिली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हा विजय असून, सगळ्यांनी या विजयासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे नाशिककरांचा आभारी असून, त्यांना अपेक्षित विकास आम्ही करू.
- आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप

नाशिककर एखाद्याला डोक्यावर घेतात आणि पायाखालीही आणतात हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. यापुढे आम्ही सर्व नाशिकच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणार आहोत.
- वसंत गिते, उपाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉँग्रेसला पक्षांतराचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील नगरसेवकांनी इतर पक्षांत स्थलांतर केल्याने त्याचा मोठा फटका कॉँग्रेसला बसला. मागील निवडणुकीत असलेले १५चे बलाबल घसरून सहावर आले आहे.

नाशिक महापालिका २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेसला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महापालिकेत कॉँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या चांगली होती. मात्र, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका कॉँग्रेसला बसला. या पक्षातील अनेक नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरला. नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षांत जाऊ लागले. कॉँग्रेसशी अनेक वर्षे निष्ठावान असलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यासारखे नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने त्याचाही परिणाम झाला. यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये मरगळ दिसून येत होती. मुलाखतीदरम्यान असलेला गोंध‍ळ अनेकांनी पाहिला होता, तसेच शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते येऊन सभा घेतील, असा अंदाज होता. मात्र, राज्यातील नेत्यांनीही नाशिककडे पाठ फिरवली. के‍वळ अशोक चव्हाण यांची सभा झाली. इतर पक्षांचा जाहीरनामा येऊन गेल्यानंतर आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. आघाडी असतानाही दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र्य जाहीरनामे प्रकाशित केले. यामुळे कॉँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.

मतदारांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. या वेळी झालेल्या चुकांची पुढच्या वेळी निश्चित सुधारणा केली जाईल. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करून मताधिक्य मिळवले आहे. मतदारयाद्यांमध्ये घोळ करण्यात आले, तसेच मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला. त्यामुळे भाजपला जागा मिळाल्या. विरोधात राहून जनतेच्या प्रश्नांची तड लावू.
- शरद आहेर, अध्यक्ष नाशिक शहर कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमळाच्या लाटेत राष्ट्रवादीचे पानिपत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गतवेळी सत्ताधारी मनसेच्या खालोखाल संख्याबळ गाठणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे यंदा कमळाच्या लाटेत पानिपत झाले आहे. गतवेळी महापालिकेतील २० जागांवर हक्क सांगून मनसेशी राष्ट्रवादीने हातमिळवणी करून सत्तेचे सिंहासन काबीज केले होते. यंदाच्या निवडणुकीत एकूण १२२ जागांपैकी राष्ट्रवादीच्या पदरात अवघ्या ६ जागा पडल्या आहेत.

इतर सर्वच पक्षांप्रमाणे यंदाही नाशिकसाठी राष्ट्रवादीने जोरदार फिल्डिंग लावली होती. गतवेळी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या सावलीखाली वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादीने निवडणुकीला जाताना अंतर्गत समीकरणेही बदलवली होती. अजित पवारांसारख्या पक्षनेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याने नवी समीकरणे मांडतानाच राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, पक्षातील कारवाईच्या फेऱ्यात भुजबळ अडकल्यानंतर स्थानिक स्तरावर दमदार पक्षनेतृत्वाची उणीव, बोगस नोटांच्या प्रकरणात पक्षाचे पदाधिकारी छबू नागरे, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देविदास पिंगळे यांच्यासारख्या नेत्यांची अडकलेली नावे याही परिस्थितीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतरही पक्षातील अंतर्गत वर्तुळात समन्वय दिसून आला नाही. आघाडी होणार की नाही, या प्रश्नापासून तर जाहीरनामे प्रत्यक्षात येईपर्यंत काहीच चित्र कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट नव्हते. जाहीरनामे प्रत्यक्षात आले तेही वेगवेगळे. दरम्यान, ज्या सहा जागांवर यंदा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले, तेथे बहुतांश मुस्लिम मतदारांनीच राष्ट्रवादीला साथ दिल्याने हा पक्ष थोडीशी प्रतिष्ठा राखू शकला. पक्षातील नामांकित नेत्यांच्या घरातीलही उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली, यावरून या राष्ट्रवादीच्या दारुण पराभवाची कल्पना यावी, अशा चर्चांनी सायंकाळी शहरात जोर धरला होता. मात्र, या पराभवाचे विश्लेषण करताना राष्ट्रवादीने भाजपवर तोफ डागत सत्तेच्या गैरवापरावर त्यांनी ही निवडणूक खिशात घातल्याचा आरोप केला आहे.

निवडणुकीत भाजपने पैशांचा वारेमाप वापर केला होता. अनेक मतदान केंद्रांवर गडबड करून मोठा घोळ केला आहे. एकूणच भाजपने सत्तेचा गैरवापर करून निवडणुकीत फायदा उचलला आहे.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images