Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राजीनामा सत्रातील मंत्री आले एकत्र

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद व पंचायत समितीत मंत्र्यांच्याच मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाकडे राजीनामा देणारे ग्रामविकास खात्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे व राज्यमंत्री दादा भुसे हे बचत गटाच्या कार्यक्रमानिमित्त नाशिकला एकत्र आले होते. दोन्ही मंत्र्याचे पक्ष वेगवेगळे पण खाते एकच असल्यामुळे त्यांनी बचावात्मक पवित्रा घेत राजकीय भाष्य टाळले.

ग्रामविकास खात्याशी निगडीत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीत या नेत्यांना यश मिळणे अपेक्षित असतांना त्यांच्या पक्षाला मात्र पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे हे नेते कमालीचे नाराज झाले व

त्यांनी थेट राजीनामा देण्याची घोषणा केली. पण पक्षाने त्यांचे राजीनामे स्विकारले नाही. दोन्ही मंत्र्यांनी शनिवारी डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर हजेरी लावली व कानात गुजगोष्टी केल्या. आता या कानातल्या गोष्टी आपल्या खात्याबद्दल होत्या की शिवसेना-भाजपाच्या सुरु असलेल्या

तणावाबद्दल हे मात्र गुलदस्त्यातच राहिले असले तरी या गुजगोष्टीमुळे कार्यकर्त्यांमध्ये व उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

परळी नगरपरिषदेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीत पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे पंकजा मुंडे कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या. विशेष म्हणजे या पराभवापेक्षा धनजंय मुंडे वरचढ ठरल्यामुळे ते त्यांना जिव्हारी लागले होते. तर दादा भुसेंना सुध्दा त्यांचे राजकीय विरोधक असलेले हिरेंचे समर्थक भाजपाच्या साथीने जिंकल्यामुळे ते सुध्दा अस्वस्थ होते. पण नाशिकच्या मेळाव्यात जमलेली गर्दी बघून दोघेही समदु:खी मात्र हरखून गेले.

युतीतील तणावाबाबत बोलणे टाळले

पंकजा मुंडे व दादा भुसे यांनी जाहीर कार्यक्रमात कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. त्यानंतर मुंडे यांनी पत्रकार परिषदेतही त्यावर बोलणे टाळले. पत्रकारांनी त्यांना शिवसेना- भाजपाच्या तणावाबद्दल विचारल्यानंतर त्यांनी कोअर कमिटी निर्णय घेईल. वरिष्ठ नेते बोलतील, असे सांगून वेळ मारुन नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अबब! सहा हजार जागांसाठी १९ हजारांवर अर्ज!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (आरटीई)अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील १३ हजार पालकांनी तब्बल १९ हजार ९७८ अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे. एकापेक्षा जास्त शाळांसाठी प्रवेश अर्ज दिल्याने ६,३८० जागांसाठी तिप्पट अर्ज प्राप्त शिक्षण विभागाकडे आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने लॉटरी पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे भविष्य ठरणार आहे.

नर्सरी व पहिलीसाठी आरटीई प्रक्रिया राबविण्यात येते. गरजू व वंचित बालकांसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना सामावून घेण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. गेल्या वर्षी जिल्हाभरात ५,९०० जागांसाठी ही प्रवेशप्र्रक्रिया ३७३ शाळांमध्ये राबविण्यात आली. यंदा शाळा नोंदणी संख्येत वाढ झाल्याने प्रवेशांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत. राज्यभरात नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम शाळा नोंदणी पूर्ण झाल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक अग्रेसर ठरला आहे.

आज पहिली सोडत

आरटीई प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी शिक्षण विभाग सोडत पद्धतीचा अवलंब करणार आहे. त्यानुसार सोमवारी (६ मार्च) शासकीय कन्या विद्यालयात दुपारी एक वाजता पहिली सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीत नाव आलेल्या पालकांनी साइटवरूनच अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून प्रिंट काढून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रवेशाबाबत पालकांना काही तक्रार असल्यास महापालिका प्रशासन अधिकारी व ग्रामीण क्षेत्रात गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा निर्यातीचा विक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाने कृपादृष्टी केल्याने वर्ष २०१६-१७ मध्ये कांदा निर्यातीने उच्चांक गाठला आहे. नोव्हेंबर २०१६ च्या आकडेवारीनुसार २० लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त कांदा निर्यात झाली असून, निर्यातीचा आतापर्यंतच हा विक्रम ठरला आहे. यावर्षी कांदा निर्यात ३० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. मात्र निर्यात वाढूनही वाढलेल्या उत्पादनामुळे कांदा दर सरासरी ५०० रुपये क्विंटलवर ‌स्थिरावल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही.

यंदा पाऊस चांगल्या झाल्याने कांदा उत्पादन तिप्पटीने वाढले आहे. बाजारात मागणीपेक्षा आवक जास्त होत असल्याने कांदादर घसरले आहेत. विक्रमी निर्यात होऊनही उत्पादनाच्या तुलनेत निर्यात न वाढल्याने कांदादरात वाढ होऊ शकलेली नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. सन २००९-१० मध्ये १८.७३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाली होती. निर्यातीचा हा उच्चांक होता. मात्र यावर्षी हा विक्रमही मोडीत निघाला आहे. नोव्हेंबर २०१६ पर्यंत २०.१० लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाली आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व चालू मार्च महिन्यात सरासरी दोन ते लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे गृहित धरल्यास वर्ष २०१६-१७ मध्ये कांदा निर्यात २५ ते ३० लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचणार आहे.

यावर्षी सुमारे गतवर्षापेक्षा २५ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन वाढले आहे. निर्यातीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास यावर्षी पहिल्या आठ महिन्यांतच विक्रमी निर्यात झाली आहे. मात्र अजूनही कांद्याची भरमसाठ आवक होत असल्याने निर्यात वाढणार आहे. असे असूनही याचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगणवाडी सेविकांवर जिल्हाभर करण्यात येत असलेली लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची सक्ती बंद करावी, कामासाठी सेविकांचे खर्च झालेले पैसे सेविकांना तातडीने मिळावेत यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

शहरातील विविध मार्गांवरुन हा मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहचला. तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी मिल‌िंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले. तुमच्या मागण्या मंत्रालय स्तरावर पोहचवल्या जातील, असे आश्वासन शंभरकर यांनी दिले. यावेळी अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्याने या मार्गावरची वाहतूक खोळंबली होती. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांना लाइन लिस्टिंगचे काम करण्याची जिल्हाभर सक्ती केली जात आहे. या कामासाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी आतापर्यंत दोन हजार रुपये पदरचे खर्च केले आहेत. लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची अंगणवाडी सेविकांना सक्ती करू नये, असे आयुक्त कार्यालयाने आदेश दिले असतानाही वरिष्ठांकडून कामावरुन काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. नाशिक जिल्हा परिषद व प्रकल्प कार्यालय आयुक्तालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही. अधिकारी आपल्या अधाकराचा गैरवापर करुन अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत. या कामाच्या सक्तीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची सक्ती काढून टाकण्यात यावी, सेविकांचा व कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत झालेला खर्च त्वरित देण्यात यावा, आयुक्तालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. प्रलंब‌ित मागण्यांसाठी १० मार्च रोजी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद व नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानसेवी न समजता प्रत्यक्ष कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, अंगणाडी कर्मचाऱ्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करण्यात यावे, केंद्र सरकारच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्माचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कायदा लागू करण्यात यावा. टीएचआरचे सेवन लाभार्थी करीत नसल्याने महाराष्ट्रात कुपोषण व बाल मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. म्हणून टीएचआर बंद करुन सर्व लाभार्थींना ताजा शिजवलेला आहार देण्यात यावा, आजारपणासाठी १५ दिवसांची रजा देण्यात यावी, सेवा समाप्त होण्याच्या दिवशी सेवासमाप्तीचा लाभ देण्यात यावा. अंगणवाडी सेविकांना व मिनी अंगणवाडी सेविकांना समान मानधन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन, टीए-डीए आहार बिलाचे पैसे देण्यात यावे, दरमहा मोबाइल खर्च देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमाल हत्याप्रकरणी चार संशयित ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अनैतिक प्रेम संबंधातून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवल झालेल्या दीपक दगडू अहिरे या हमालाचा शनिवारी (दि. ४) रात्री खून झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी सोमवारी चार संशयितांना ताब्यात घेतले, असून त्यातील दोघे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून या खून प्रकरणी आणखी तपास सुरू आहे.

पालेभाज्यांच्या बाजारात साईनाथ व्हेजिटेबल कंपनीत हमालीचे काम करणाऱ्या दीपक अहिरे हा युवकाचा शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घरी जात असताना न्यू उत्तम हिरा या हॉटेलजवळ जुन्नरे अॅग्रो ब्रदर्ससमोर त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. खून करून आरोपी फरार झाले होते. सीसीटीव्ही फूटेज व खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे रविवारी मयूर किरण पगारे (२०, रा. इंद्रकुंड दर्गाजवळ, पंचवटी) आणि दिगंबर किशोर वाघ (१८, रा. शनिमंदिरमागे, नवनाथ नगर, सिद्धी विनायक चाळ, पंचवटी) या दोघांना संशयितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांवर या आधी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. हे संशयित अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी दोघांन ताब्यात घेण्यात आले. ते दोघे अल्पवयीन आहेत. या प्रकरणात अजून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेची पहिली सोडत सोमवारी काढण्यात आली. यामध्ये तीन हजार १३७ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना १५ मार्चपर्यंत संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. शासकीय कन्या विद्यालयात ही सोडत काढण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातील ४५८ शाळांमध्ये ही प्रक्रिया सहा हजार ३८० जागांसाठी राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षापर्यंत ही प्रक्रिया जून महिन्यात सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना अर्धे शैक्षणिक वर्ष उलटून गेल्यावर प्रवेश मिळत होता. त्यामुळे यंदा ही प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यातच सुरू करण्यात आली. दोन मार्चपर्यंत पालकांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी पहिली सोडत काढण्यात आली. यात तीन हजार १३७ विद्यार्थ्यांचा क्रमांक आला असून त्यांचे या योजनेंतर्गत प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी २०७ विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त शाळांमध्ये सोडत लागली आहे. त्यांना त्यांच्या पसंतीनुसार हवी ती शाळा निवडता येणार आहे.

असा घेता येणार प्रवेश!
आरटीईच्या वेबसाइटवरून अॅडमिट कार्ड डाउनलोड करून पालकांना ते सर्व आवश्यक कागदपत्रांसह ते शाळेत सादर करायचे आहे. वेबसाइटवर कागदपत्रांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. एखाद्या शाळेने कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारल्यास वेळीच तक्रार निवारण समितीकडे दाद मागावी. दुसरी सोडत २० मार्चला काढण्यात येणार आहे. तोपर्यंत पहिल्या सोडतीतील सर्व प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, असे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

ठराविक शाळांना पालकांची पसंती
आरटीईची अर्जप्रक्रिया सुरू झाल्यापासून पालकांनी ठराविक शाळांनाच पसंती दिल्याचे दिसून आले. यामध्ये सिम्बॉयसिस स्कूलमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८३२ अर्ज, गुरू गोविंद सिंग स्कूलमध्ये ६० जागांसाठी ७७८ अर्ज, नाशिक केंब्रिज स्कूलमध्ये १०० जागांसाठी ७७३ अर्ज दाखल झाले आहेत. तर ६५ शाळांमध्ये एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. यंदा अनेक नवीन शाळाही या प्रक्रियेत समाविष्ट झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५०० जागांची वाढ झाली. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधाराने नाशिकरोड परिसरात सोमवारी ४० लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याने भरलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला असून गुटखा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

‘एफडीए’चे सह आयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी व अन्य सहकाऱ्यांनी कारवाई केली. राज्य सरकारने गुटखा उत्पादन व विक्रीवर बंदी घातली असतांना शहरात सर्रासपणे गुटख्याची खरेदी विक्री केली जाते. याबाबत ‘एफडीए’कडे अनेक तक्रारी येत असतात. सोमवारीही अश‌ीच गुप्त माहिती ‘एफडीए’ला कळविण्यात आली.

‘एफडीए’चे सह आयुक्त वंजारी व अन्न सुरक्षा अधिकारी पाटील यांनी सहकाऱ्यांसह नाशिकरोडच्या मालधक्का परिसरात संशयित असलेला ट्रक तपासणीसाठी ताब्यात घेतला. त्या ट्रकमध्ये तब्बल ४० लाख ४३ हजारांचा प्रतिबंधिक गुटखा आढळून आल्याचे पाटील यांनी ‘मटा’ला सांगितले. संबंधित गुटखा परराज्यातून महाराष्ट्रात आला. गुटखा बाळगण्यासह विक्री केल्याबद्दल लोहिया ट्रेडर्सचे संचालक रामविलास शिवनारायण लोहिया यांच्यावर ‘एफडीए’कडून कारवाई करण्यात आली आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कारवाईनंतर पुन्हा साठा
‘एफडीए’ने यापूर्वीही लोहिया ट्रेडर्सवर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा गुटखा विक्री होत असल्याचे या निमित्ताने उघडकीस आले आहे. सर्वसामान्य नागरीकांनीही गुटख्याचा साठा बाळगणाऱ्यांची माहिती द्याावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

उत्पादनस्थळी कारवाई कधी?
‘एफडीए’कडून अनेकदा लाखोंचा गुटखा जप्त केला जातो. परंतु, प्रत्यक्ष गुटखा उत्पादनाच्या ठिकाणी एफडीए कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सापडलेला गुटखा साठा ताब्यात घेण्याची कारवाई झाल्यानंतर पुन्हा पुढे काहीही होत नसल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन होत असेल तर त्यावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गांधीहत्या आणि मी’ द्वितीय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

५६ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातील मेनली अमॅच्युअर्स या संस्थेच्या ‘गांधीहत्या आणि मी’ या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला. ‘गांधीहत्या आणि मी’ नाटक अतिशय संवेदनशील असून ते योग्य पध्दतीने हाताळण्यात आले.

अंतिम स्पर्धेत रंगभूषेचे द्वितीय पारितोषिक माणिक कानडे यांना तर संगीत दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक तेजस बिल्दिकर यांना मिळाले. उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक महेश डोकफोडे यांना तर स्त्री कलाकार सुरभी पाटील यांना मिळाले. अभिनयासाठी गुणवत्ता प‍्रमाणपत्रे अक्षय मुडावदकर यांना मिळाले.

नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या केल्यानंतर जे वादळ उठले, त्याचा इतिहास सर्वसामान्यांना माहीत नाही. परंतु, त्यातून जे निभावून गेले त्यांच्यावर काय आपबिती झाली याचा उहापोह करणारे ‘गांधीहत्या आणि मी’ हे नाटक होते. नथुराम गोडसेच्या गांधीहत्येनंतर जे घडते ते दाखविण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. नथुरामचे बंधू गोपाळ गोडसे शिक्षा भोगत आहेत. त्यांना भेटायला त्यांची पत्नी सिंधू येते आणि तिच्या हाती ते ‘गांधीहत्या आणि मी’ हे पुस्तक ठेवतात. येथून प्लॅशबॅक दाखविण्यात आला आहे. गांधीजींचे मृत्युच्या दिवशी प्रार्थनेला निघण्या अगोदरचे सिंग साहेबांचे कृपाणवरून त्यांच्याशी भांडण दाखविण्यात आले. त्यानंतर नथुरामचे गांधींना मारणे, स्वत:ला अरेस्ट करून देणे आणि इतर बाबींतून या सर्व प्रकारावर प्रकाश टाकण्यात आला.

या नाटकात महेश डोकफोडे, प्रफुल्ल लेले, माधुरी जोशी, अक्षय मुडावदकर, डॉ. प्राजक्ता लेले, आशिष चंद्रचूड, अनिकेत कुलकर्णी, डॉ. प्रसाद धर्माधिकारी, सिमरपाल सिंग, सुरभी पाटील, प्रितम नाकील हर्षल भट, अमेय कुलकर्णी, अश्विनी शिरसाठ, स्वरूप बागूल, कैवल्य एखंडे यांनी भूमिका केल्या. नेपथ्य सुनील परमार यांचे होते. प्रकाशयोजना ईश्वर जगताप यांची होती. संगीत तेजस बिल्दिकर यांचे तर

वेशभूषाडॉ. प्राजक्ता लेले, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकाचे दिग्दर्शन महेश डोकफोडे यांनी केले. प्रा. रवींद्र कदम यांची नाटकाची निर्मिती केली. ‘गांधीहत्या आणि मी’ने नाशिक केंद्रातून दिग्दर्शनासह प्रकाशयोजना, रंगभूषा, उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक तसेच अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रही मिळवले होते.

या यशाने खूप आनंद झाला आहे. संस्था स्थापन व्हायला आता २० वर्षे झाली. परंतु, पहिल्यांदाच अंतिम फेरीत गेलो होतो. नाटक द्वितीय आल्याने ती लढाई जिंकलो आहोत. त्याचा आनंद आहे. तो शब्दात व्यक्त करू शकत नाही. स्वप्न पूर्ण झाले आहे.

- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, मेनली अमॅच्युअर्स संस्था

मी भरून पावलो आहे. पाहिलेल स्वप्न पूर्ण झाले. दोन स्पर्धेत तब्बल २१ बक्षिसे मिळवली. आताही चार लाखांचं बक्षिस मिळालं. हे आम्हाला आर्थिक पाठबळ देणारं आहे. नथुराम, गोपाळ गोडसे लोकांपर्यंत पोहोचवल्याचं व त्यांना ते समजल्याचा खूप आनंद आहे.
- महेश डोकफोडे, लेखक व दिग्दर्शक, ‘गांधीहत्या आणि मी’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मुक्त’च्या कुलगुरुपदी डॉ. ई. वायुनंदन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पंधराव्या कुलगुरुपदी डॉ. ई. वायुनंदन यांची निवड करण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी राज्यपाल भवनात ही निवड केली.

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी प्रमोद येवले, मोहन काशिकर आणि ई. वायुनंदन या तिघांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. प्रमोद येवले यांच्या नावाची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र ई. वायुनंदन यांचा अॅकॅडेमिक बायोडाटा वजनदार भरल्याने त्यांची या पदावर निवड झाली. डॉ. ई. वायुनंदन हे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ऑगस्ट १९८७ पासून कार्यरत आहेत. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयात पदविका घेतलेली असून, सामान्य प्रशासन विषयात एम. ए. केलेले आहे. ते एमफिल व पीएचडीदेखील आहेत. त्यांना २५ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून, त्यांनी संशोधनदेखील केलेले आहे. कुलगुरूपदाच्या निवडीसाठी तीन जणांची समिती नेमण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत ‘नीट’चे संचालक अजयकुमार शर्मा, सीताराम कुंटे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: सत्ता येताच गुजराती भाषेतले बोर्ड झळकले

$
0
0

नाशिक : महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळताच गुजराती भाषेला अच्छे दिन येऊ लागले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम संपताच रामकुंडावर गुजराती भाषेचे सूचनाफलक झळकायला लागल्याने पर्यटकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात मराठीऐवजी गुजराती भाषेचा वापर अचानक वाढल्याने मुंबईकरांनी नुकतेच आंदोलन केले होते. त्याची लागण नाशिकला झाली असून, पंचवटीतील अनेक धार्मिक स्थळे आणि रस्त्यांवर अचानक गुजराती भाषेतील बोर्ड लागल्याने यात्रेकरू आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व की गुजराथी माणसाचे असा अनेक वर्षांपासून वाद आहे. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आवाज उठवला होता. मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतील वातावरण अचानक बदलले असून, अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांचे बोर्ड मराठीबरोबरच गुजराती भाषेतून तयार केले असून, महाराष्ट्र सरकाराचे नियम धाब्यावर बसवले आहेत. मध्य रेल्वेने उपनगरीय गाड्या व आरक्षण तिकिटांवर गुजराती भाषेचा वापर केला आहे. महाराष्ट्रातून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या तसेच, ज्यांचे प्रवासी हे हिंदी भाषिक आहेत त्यांनाही गुजराथी भाषेची तिकिटे दिली जात असून, अनेक रेल्वे स्टेशनवरचे दिशादर्शक बोर्डही गुजराथी भाषेत नव्याने तयार केले आहेत. बेस्टकडून व रिलायन्सकडून देण्यात येणाऱ्या विजेचे बिल गुजराथी भाषेत देण्यास सुरुवात झाली असून, महाराष्ट्रात अचानक गुजराथी भाषेचे बोर्ड चमकू लागल्याने असे परिवर्तन कसे झाले? याचा अनेकांना प्रश्न पडला आहे.

एचडीएफसी बँकेने आपल्या वेबसाईटवर मुंबईची प्रमुख भाषा म्हणून गुजराथीचा उल्लेख केला होता. मात्र मुंबईच्या नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर हा उल्लेख काढून टाकण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने रामकुंडावर गुजराती भाषेतील बोर्ड लावले आहेत. हे बोर्ड मराठी, गुजराथी व इंग्रजीतून लावण्यात आले आहेत.

केवळ गुजराती भाषेचेच बोर्ड का?

रामकुंडावर देश-विदेशातून लोक येत असतात. येथे हिंदीचा वापर केल्यास अनेकांना ही भाषा समजू शकेल. गुजराती भाषेत बोर्ड लावून ती किती लोकांना समजेल असा प्रश्न आहे. नाशिक महापालिकेने बोर्ड लावताना केवळ गुजराथी भाषेचीच का निवड केली? इतर भाषांनी काय घोडं मारलं असा सवाल नागरिक विचारत आहेत. या भाषा बदलामागे काय दडलं आहे हे तपासण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदी भानसी, प्रथमेश गिते उपमहापौर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नव्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक १४ मार्च रोजी होत असून, भाजपतर्फे महापौरपदासाठी रंजना भानसी, तर उपमहापौरपदासाठी प्रथमच निवडून आलेल्या प्रथमेश गिते यांची निवड होण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे या दोन नावांची शिफारस केली असून, त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

भानसी या अकराव्या महापौर होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रभारी वसंत गितेंच्या मुलाला उपमहापौरपदाचे पक्षाकडून बक्षीस देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता सभागृह नेता आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु, मुंबईत भाजपने महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता कमीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरला घरफोडीत तीन लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीतील एका इमारतीच्या सर्वच घरांना बाहेर कडी लावून या इमारतीतील फ्लॅट नंबर एकमधील सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पोलिसकडून रात्री गस्ती कमी होत असल्याने अशा चोऱ्या होत असल्याचा आरोप इंदिरानगरवासीयांनी केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद भाऊसाहेब जाधव (रा. बी - १२ फ्लॅट नं. १, राजसारथी सोसायटी, इंदिरानगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. जाधव हे कुटुंबीयांसह चार मार्चपासून बाहेरगावी गेले होते. जाधव यांना सोमवारी (दि. ६) त्यांच्यासह शेजारील फ्लॅटचे कुलूप तोडण्यात आल्याचे समजले. त्यानुसार जाधव यांनी तातडीने नाशिकला धाव घेत घराची पाहणी केली. त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यांनी पोलीसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून श्वानपथकाकडून चोरट्यांचा तपास करण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्वानपथकाने राजसारथी सोसायटीच्या मागील बाजूपर्यंत मार्ग दाखविल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरट्यांनी इमारतीत प्रवेश केल्यावर सर्वच फ्लॅटच्या दारांना बाहेरून कड्या लावल्याचेही नागरिकांनी सांगितले. फ्लॅट नंबर दोनमध्ये कोणताही ऐवज मिळून आला नसला तरी फ्लॅट नंबर एकमध्ये २२,५०० रुपये रोखसह सुमारे दोन लाख ८४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पोलिस कुंभकर्णी झोपेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांचा ऐवज सुरक्षित राहील यासाठी उपायोजना करण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी ती पार पाडण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरते आहे. चोऱ्या आणि घरफोड्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून पोलिस स्टेशन्सचे कारभारी आणि त्यांच्या हाताखालची यंत्रणा आणखी किती दिवस कुंभकर्णी झोप घेणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटना वाढल्या आहेत.

घरे बंद करून बाहेरगावी जाणे नागरिकांना भितीदायक वाटू लागले आहे. कुलप लावलेली घरे चोरट्यांसाठी निमंत्रण ठरत असून कष्टाने कमावलेला लाखोंचा ऐवज नागरिकांना गमवावा लागतो आहे. नागरिकांच्या मालमत्तांचे रक्षण ही पोलिसांचीही जबाबदारी असून ती पार पाडण्यास पोलिस असमर्थ ठरू लागल्याची टीका नागरिक उघडपणे करीत आहेत.

सिडको, इंदिरानगर, पंचवटी, नाशिकरोडसह दाट लोकवस्तीच्या परिसरांकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला आहे. दररोज कोठे ना कोठे कुणाचे ना कुणाचे घर फोडले जात असून लाखो रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार होत आहेत. गतवर्षी शहरात रात्री २३४ तर दिवसा ४९ घरफोड्यांच्या घटना घडल्या होत्या. अशा

गुन्ह्यांपैकी केवळ २५ टक्केच गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ७५ टक्के गुन्ह्यांमधील आरोपी मोकाट असून त्यांना पकडणे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. नववर्षातही चोरी आणि घरफोड्यांच्या घटनांचा आलेख उंचावतोच आहे. जानेवारीत २६ आणि फेब्रुवारीत घरफोडीच्या २८ घटना घडल्याची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे.

डीबी पथक करते काय?
प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे शोध पथक कार्यान्वित असते. पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांचा शिताफीने तपास करून आरोपींना गजाआड करण्याची जबाबदारी या पथकावर आहे. सहायक पोलिस निरीक्षक किंवा पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी या पथकाचा प्रमुख असतो. स्वत:ची ओळख लपवून पोलिसांना कामगिरी बजावावी लागत असल्याने या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणवेश परिधान न करण्याची मुभा आहे. परंतु, शहरातील अनेक पोलिस स्टेशन्समधील डीबी पथक कामगिरी बजावण्यात अपयशी ठरत असून त्यांना झोपेतून उठविण्याची वेळ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

बंद घरांवर चोरांचा डोळा
बंद घरे दिसताच ती फोडली जात आहेत. त्यामुळे रात्री पोलिस गस्त घालतात की फेरफटका मारतात? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. चोरट्यांना गजाआड करणे पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य असले तरी ते पार पाडण्यात त्यांना अपयश येऊ लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन बांधकाम ठेकेदारांकडे प्राप्तिकर विभागाचा सर्व्हे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील दोन नामांकित बांधकाम ठेकेदारांकडे आयकर विभागाने सर्व्हे करून त्यांच्या व्यवहाराची तपासणी केल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या सर्व्हेमध्ये बी. पी. सांगळे व हर्ष कन्सस्ट्रक्शनचा समावेश आहे. या सर्व्हेत काय मिळाले किंवा त्यांच्यावर काय कारवाई केली याबाबत प्राप्तिकर विभागाने गोपनीयता पाळली आहे. सराफानंतर आता प्राप्तिकर विभागाने शहरातील बिल्डरांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने जोरदार कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर थोडीशी विश्रांती घेत हा विभाग आता पुन्हा सक्रिय झाला आहे. प्राप्तिकर विभागाने शनिवारी (दि. ४) हा सर्व्हे केल्यानंतर सोमवारी त्याबाबत सर्व कागदपत्रे व माहिती ही एकत्रित करून पुढील कारवाईसाठी पुणे येथील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे. या सर्व्हेमुळे शहरातील ठेकेदार व बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहे. सर्व्हे करण्यात आलेले दोन्ही ठेकेदार मोठे असून प्राप्तिकर खात्याच्या वेगवेगळ्या चमूने दिवसभर हा सर्व्हे केला. आर्थिक व्यवहाराच्या हिशेबातील काही व्यवहाराचा संशय आल्याने ‘प्राप्तिकर’ने ही धडक दिली असल्याचे बोलले जात आहे. या सर्व्हेत अनेक कागदपत्रांची पाहणी केली असून संशयास्पद गोष्टींची माहिती घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योगी’ पोलिसांची कुंडली बनवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मलाईदार पदांवर वर्षानुवर्षे गोचिडासारखे चिकटून बसणाऱ्या वसुली पंटर पोलिस कर्मचाऱ्यांची कुंडली बनवा, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच अशा कर्मचाऱ्यांची उचलबांगडी होणार असून, काही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सिंघल यांनी दिली. या प्रकरणाला वाचा फुटल्याने पोलिस वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

पैशाचा माज आणि पोलिस असल्याची मस्ती काही पोलिसांच्या डोक्यात भिनली असून, त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होत आहे. परिणामी प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा विश्वास ढेपाळत असून, त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचा उद्रेक अलिकडेच एका पत्रातून झाला. काही कर्मचाऱ्यांनी थेट पोलिस आयुक्तांनाच पत्र लिहून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची कैफियत मांडली. महाराष्ट्र टाइम्सने

या पत्राला रविवारी वाचा फोडली. ‘सीपी साहेब एक झटका द्याच!’ या शिर्षकाखाली रविवारी, ५ मार्च रोजी वृत्त प्रसिध्द करण्यात आले. क्राइम राइटर, हजेरी मास्तर, ठाणे अंमलदार, डीबी कर्मचारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे राइटर, बीट मार्शल अशा विशिष्ट जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वर्षानुवर्षे गोंजारण्याचे काम शहरात सुरू असल्याकडे या वृत्तातून लक्ष वेधण्यात आले. या वृत्ताची पोलिस वर्तुळात चर्चा सुरू झाली असतानाच पोलिस आयुक्तांनीही त्याची गंभीर दखल घेतली आहे.

सिंघल यांनी खास या विषयाला अनुसरून पोलिस आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. पोलिस प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या वसुली पंटर कर्मचाऱ्यांची माहिती द्या, असे आदेश यावेळी देण्यात आले. अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्यास गय केली जाणार नाही, असा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहर पोलिस दलातील काही कर्मचारी केवळ वसुली पंटर म्हणूनच काम करीत असल्याचे सिंघल यांच्या निदर्शनास आले आहे. वर्षानुवर्षे काही कर्मचाऱ्यांची मलाईदार पदावरच वर्णी लागत असल्याचेही स्पष्ट झाले असून, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सिंघल यांनी दिला आहे.

‘त्या’ अधिकाऱ्यांवरील कारवाईकडे लक्ष

पोलिस आयुक्तांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा निर्णय घेतला ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. परंतु, असे डॅमेज कंट्रोल तात्पुरते न करता आयुक्तांनी कारवाईद्वारे आदर्श वस्तुपाठ घालून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. पोलिस स्टेशन्समधील ज्या अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी कर्मचारी ‘उद्योग’ करतात त्यांच्यावरही पोलिस आयुक्त काय कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

काही कर्मचाऱ्यांचे पत्र मला मिळाले असून, याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस दलास बदनाम करणाऱ्या वसुली पंटर कर्मचाऱ्यांची यादी बनविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये डीबीसह अनेक बेशिस्त व बेजबाबदार कर्मचारी असून, त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल.
- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विसरवाडीत कॉप्यांचा पाऊस

$
0
0

धुळे : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे माजीमंत्री माणिकराव गावित विद्यालयात मंगळवारी, दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉप्याचा पाऊस पडला. या परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी सुरू असल्याचे समजताच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण विभागातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सकाळी अकरा वाजता विसरवाडी येथील गावित विद्यालयात अचानक कॉपी पुरविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली तर गाईड, झेरॉक्स प्रती व इतर साधनाचा आधार घेत वर्गात पेपर सोडविण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस व शिक्षण विभागातील यंत्रणेने मात्र बघ्याची भूमिका घेतली. हा सर्व प्रकार परीक्षा केंद्रात सुरू असताना शाळेतील पथक आणि भरारी पथक नेमके काय करत होते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानाच्या वादावर निवडणुकीचा उतारा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावणेदोनशे वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिकचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. २ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ३ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. ५ मार्च रोजी विद्यमान कार्यकारिणीचा कालावधी संपला असल्याने निवडणूक अधिकारी माधव भणगे यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. गैरव्यवहाराच्या आरोपाने सावाना चर्चेत आले आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूकही गाजण्याची चिन्हे आहेत.

सावानाचे एकूण ८५०० सभासद असून, पैकी १७२४ आजीव व १८५६ सर्वसाधारण मतदारांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. एकूण ३५८० मतदार मतदान करतील. ज्यांनी फेब्रुवारी २०१७ पर्यंतची फी भरलेली आहे आणि सभासद होऊन ज्यांना एक वर्ष पूर्ण झाले आहे अशांनाच मतदानाचा अधिकार असल्याने ही संख्या रोडावलेली दिसत आहे. मंगळवारी, ७ मार्च रोजी अंतिम सभासद, मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज, विक्री व स्वीकृती सुरू झाली असून, ती १३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. गुरुवार, १६ मार्च रोजी उमेदवार अर्ज छाननी होणार असून, शुक्रवार १७ मार्च रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवार, १७ मार्च ते रविवार, १९ मार्च हे तीन दिवस उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून, सोमवारी २० मार्च रोजी उमेदवारांची माघारीनंतरची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. मंगळवार २१ मार्च रोजी चिन्हवाटप होतील. रविवार २ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून, सोमवारी ३ मार्च रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

ही तर अध्यक्षांची पराभूत मानसिकता

सर्व प्रकारचे बेकायदेशीर मार्ग वापरून आम्हाला निवडणुकीपासून दूर ठेवण्यात अध्यक्ष विलास औरंगाबादकर यशस्वी ठरले आहेत आणि तो त्यांना त्यांचा अंतिम विजय वाटतो आहे. सुज्ञ नाशिककरांना औरंगाबादकरांचा खरा चेहरा या सर्व प्रकरणात जवळून पाहायला मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मिलिंद जहागीरदार, स्वानंद बेदरकर आणि प्रा. विनया केळकर यांनी व्यक्त केली आहे. जहागीरदार म्हणाले, की आमची नावे मतदारयाद्यांमध्ये येऊ नयेत यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान करून घाईघाईने निवडणूकप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातून अध्यक्षांची पराभूत मानसिकता स्पष्ट दिसून येते. कायदेशीर मार्गाने लढण्यापेक्षा आमच्यासारखे चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीत वार करण्यात ज्या औरंगाबादकरांना पुरुषार्थ वाटतो, त्यांच्याकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा काय ठेवणार? निवडणूकप्रक्रिया मंगळवारी घोषित झाल्यावर मतदारयाद्या मिळणे अपेक्षित होते. मात्र, आज तीन वाजेपर्यंतच याद्या मिळतील, असे सांगितले होते आणि रात्री ७ पर्यंत याद्याच उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. वाचनालयाला बुधवारी सुटी आहे. तेव्हा मतदारांनी करायचे काय, असा सवालही जहागीरदार यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक- पुणे महामार्गावर तिहेरी अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक- पुणे महामार्गावर पळसे गावाजवळील बंगालीबाबा बस थांब्याजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालेले नसले तरी सिन्नरच्या दिशेने जाणारी रिट्झ कार (एमएच १५/ईएक्स ७८७६) या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

रिट्झ कार सिन्नरच्या दिशेने जात असताना पळसे गावाजवळील बंगालीबाबा बस थांब्याजवळ या कारला मागून येणाऱ्या गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यामुळे कार पुढे बसवर जाऊन आदळली. यात बस व कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्रवासी बचावले. अपघातानंतर कारचालक कार सोडून पसार झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल कंपन्या नरमल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेला मालमत्ता कर भरण्यास नकार देणाऱ्या मोबाइल कंपन्यांचे टॉवर सील करण्याच्या नोटिसा दिल्यानंतर मोबाइल कंपन्या अखेरीस नरमल्या आहेत. शहरातील इमारतींवर अनधिकृतपणे मोबाइल टॉवर्स उभे करणाऱ्या कंपन्यांनी पालिकेच्या दणक्यानंतर कर भरण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत मागितली आहे. या कंपन्यांनी पालिकेला लेखी हमी देत, टॉवर सील न करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पालिकेचा आता चार कोटींच्या वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने थेट मोबाइल सेवा बंद करण्याचा इशारा दिला होता.

महापालिका क्षेत्रातील इमारतींवर काही मोबाइल कंपन्यांनी अनधिकृतपणे टॉवर्स उभारून सेवा सुरू केली आहे. शहरात जवळपास २०० टॉवर्स अनधिकृत असतानाही त्यांच्याकडून कर मिळत नव्हता. महापालिकेचा कर आम्हाला लागू होत नसल्याचे सांगत त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने या कंपन्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे या मोबाइल कंपन्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. गेल्या महिन्यातच सुप्रीम कोर्टाने मोबाइल कंपन्यांची याचिका फेटाळत महापालिकांना कर भरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे करवसुलीसाठी महापालिका आक्रमक झाली होती. आता राज्य सरकारने महापालिकांना शंभर टक्के थकबाकी वसूल करण्याचे आदेश काढल्यानंतर महापालिकेने या कंपन्यांना कर भरण्यासाठी १० मार्चचा अल्टिमेटम दिला होता.

आयडिया, जीटीएल इन्फ्रा, रिलायन्स, जिओ, टी-२४ या कंपन्यांकडे महापालिकेची जवळपास चार कोटींची थकबाकी आहे. वसुलीसाठी महापालिकेने शनिवारी या सर्व कंपन्यांना अंतिम नोटिसा बजावल्या होत्या. कर न भरल्यास १० तारखेपासून मोबाइल टॉवर सील करण्याचे फर्मान काढले होते. त्यामुळे मोबाइल सेवा महागण्याच्या भीतीने अखेरीस मालमत्ता कर भरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी १५ मार्चची मुदत मागितली असून, तशी लेखी हमी दिली आहे. त्यामुळे पालिकेने तूर्तास कारवाईला स्थगिती दिली आहे.

जीटीएलचे प्रयत्न असफल

महापालिकेला कर न भरण्यावर अडून असलेल्या जीटीएल इंफ्रा या कंपनीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पुन्हा अंतरिम स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या बेंचपुढे अर्ज केला. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या बेंचने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता मालमत्ता कर भरल्याशिवाय पर्याय उरला नसल्याने कंपनीने अखेरीस कर भरण्याची तयारी दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीच्या ढोलवर थकबाकीदारांनी धरला ताल...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिकेने थकबाकीदारांकडून मालमत्ता करवसुलीसाठी मंगळवारीही ढोलताशांची मदत घेतली. शहरात वसुलीच्या ढोलची मात्रा थकबाकीदारांना चांगलीच लागू पडली आहे. ढोल बडवण्यापूर्वीच थकबाकीदार चेक पुढे करीत असल्याचे चित्र आहे. पंचवटीत महापालिकेला ११ लाख रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे या वसुलीच्या ढोलवर थकबाकीदारांनी चांगलाच ताल धरल्याचे चित्र आहे.

पंचवटी परिसरात ढोलताशांसह महापालिकेचे वसुली पथक येताच अनेक थकबाकीदारांनी धनादेश देण्यात तत्परता दाखविली. पंचवटीतील पेठ रोड, नवनाथनगर, रामवाडी, तळेनगर, क्रांतीनगर आदी परिसरात नऊ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. त्यात ११ लाख रुपयांची वसुली झाली.

पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांच्यासह पंचवटीतील कर्मचाऱ्यांचा ताफा पंचवटी परिसरात ढोलताशांसह फिरू लागल्याने अनेकांच्या नजरा या पथकाकडे वळत होत्या. मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांना महापालिकेतर्फे यापूर्वीच नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. स्मरणपत्रही देण्यात आले होते. तरीही महापालिकेच्या नोटिसांकडे दुर्लक्ष करीत थकबाकी भरण्यास टाळाटाळ करीत असलेल्या मोठ्या थकबाकीदारांनी ढोलताशांचा चांगलाच धसका घेतलेला दिसत आहे. वसुलीसाठी पथक दारासमोर हजर होताच ढोल वाजविण्याच्या अगोदर थकबाकीच्या रकमेचे चेक देण्याची लगबग करण्यात येत होती.

महापालिकेतर्फे मार्च महिन्यात वसुलीची मोहीम राबविण्यात येत असते. मात्र, यंदा ढोलताशांचा नवा फंडा आणल्याने ढोलचा आवाज हा थकबाकीदारांची अब्रु चव्हाट्यावर आणणारा ठरू लागल्याने थकबाकी वसुलीसाठी हा चांगला मार्ग निघाल्याचे अधिकारी आणि कर्मचारी सांगत आहेत. या वसुली मोहिमेत ५० हजारांपेक्षा जास्त रकमेची थकबाकी असणाऱ्या वसुलीवर अगोदर लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यानंतर ५० हजारांपेक्षा कमी रकमेच्या थकबाकीदारांकडे ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ए. पी.वाघ यांनी सांगितले.

नाशिकरोडमधून १५ लाख वसूल

सिन्नर फाटा ः नाशिकरोड प्रभागात मंगळवारी थकबाकीदारांकडून तब्बल १५ लाख ६२ हजार रुपयांची वसुली झाली. पालिका उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, सहाय्यक अधीक्षक नामदेव जाधव यांच्या पथकाने जेलरोडवरील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोल बडवले. यावेळी उपायुक्त दोरकुळकर यांनी राजराजेश्वरी मंगल कार्यालय सील करण्याचे आदेशही दिले. मात्र, मंगल कार्यालयाचे मालक राठोड यांनी ११ लाख ६८ हजार रुपये तीन टप्प्यांत धनादेशाद्वारे तत्काळ भरणा केल्याने कारवाई टळली. आनंदनगर येथे डावखर यांनीही थकबाकीपोटी ७७ हजार रुपयांचा धनादेश जमा केला. आयसीआयसीआय बँकेकडील २४ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे अधिकारी गेले असता, त्यांनी दोन दिवसांची मुदत मागून घेतली.

७० लाखांची वसुली!

महापालिकेच्या नोट‌िसांना केराची टोपली दाखवणाऱ्या थकबाकीदारांवर ढोल-ताशांची मात्रा कामी येत असून, मंगळवारी तब्बल ७० लाख ६८ हजारांची वसुली झाली आहे. या मोहिमेत महापालिकेने सात मिळकती जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मिळकतींमध्ये नामवंत बिल्डरांसह निवासी मिळकतींचाही समावेश आहे. प्रत्येक विभागात तीन अशा सहा विभागांत १८ ढोलपथके पालिकेने वाढवले आहेत. ढोलताशांच्या भीतीने मिळकतधारक आता आढेवेडे न घेता रक्कम जमा करण्याची तयारी दर्शवत आहेत.

नाशिकरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या मालकाने ढोल वाजवण्यापूर्वीच ११ लाख २० हजारांचा चेक पालिका पथकाच्या स्वाधीन केला. बिटको चॅरिटेबल ट्रस्टने ३ लाख १७ हजार, अलय कन्स्ट्रक्शन (रुपी बँक) ६ लाख ८५ हजार, स्पार्क इंफ्रा १ लाख ८६ हजार, हकीम कांचवाला १ लाख ३ हजार, नरहरी खंडू नवले यांनी ४ लाख रुपये जमा केले. दिवसभरात जवळपास ६० मिळकतींकडे पालिकेच्या ढोलपथकांनी जाऊन ढोल बडवले. त्यातून पालिकेच्या पदरात ७० लाख ६८ हजार रुपयांची वसुली झाली आहे, तर सात मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवारच्या कारवाईत ६८ लाख ५२ हजारांची वसुली करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी वसुलीत वाढ झाली आहे.

या मिळकती केल्या जप्त

शहा पूर्णिमाबेन अशोक (शॉप), विनायककुमार पांडे (शॉप), एस. एम. करवंदे (शॉप), महेंद्र पवार (निवासी), मोहन वायखंडे (निवासी), आरीफ मोहंमद (शॉप), वैतरा बिल्डर्स (शॉप).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images