पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच प्रयत्नात तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता देणाऱ्या नाशिकमध्येच मनसेचे अस्तित्व अवघ्या अकरा वर्षांतच क्षीण झाले आहे. महापालिकेत सत्तेनंतर नाशिककरांनी मनसेला विरोधातही शिल्लक न ठेवल्याने या पराभवाचे सावट पक्षाच्या अकराव्या वर्धापन दिनावर दिसून आले. पक्ष कार्यालयात दिवसभर शुकशुकाट पहायला मिळाला, तर पदाधिकारी मुंबईच्या कार्यक्रमासाठी निघून गेले होते. त्यामुळे मनसेच्या अकराव्या वर्धापन दिनी नाशिकमध्येच पक्ष संपला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशकात पक्ष पुन्हा उभा करायचा असेल, तर राज ठाकरेंना तळापासून पक्षाची पुनर्रचना करावी लागणार आहे.
मनसेची स्थापना झाल्यानंतर पक्षाला सुगीचे दिवस आले ते नाशिकमध्येच. पहिल्याच प्रयत्नात नाशिकमध्ये पक्षाचे बारा नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ नाशिककरांनी तीन आमदार निवडून दिले. त्यानंतर गेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल ४० नगरसेवकांचे दान मनसेच्या पदरात टाकले होते. त्यामुळे मनसेची राज्यातील पहिली सत्ता ही नाशिकमध्ये आली होती. एकदा भाजप व एकदा आघाडीच्या मदतीने नाशिकमध्ये दोनदा मनसेचा महापौर झाला. त्यामुळे नाशिकमध्ये मनसे हा पक्ष बहरला. राज ठाकरेंच्या पदरात नाशिककरांनी भरभरून दिले. त्याचप्रमाणे नाशिककरांच्या मोठ्या अपेक्षाही उंचावल्या. गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात राज ठाकरेंनी सीएसआरमधून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा विकास नाशिककरांना आवडला नाही. तीन आमदारांच्या पराभवानंतर महापालिकेतही मनसेचा दारुण पराभव झाला. या पराभवाचे सावट मनसेच्या अकराव्या वर्धापन दिनावर दिसून आले.
पक्षाच्या स्थापनेवेळी असलेले सर्व पदाधिकारी पक्षाला सोडून गेेले आहेत.त्यामुळे पक्षाला पुन्हा नाशिकमध्ये उभारी द्यायची असेल तर, कार्यकर्ता ते पदाधिकारी असा नवा पूल बांधावा लागणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट