जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेला आता राजकीय घडामोडीला वेग आला असून पालकमंत्री गिरीश महाजन व विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर नाशिकला सोमवारी (दि. १३) येणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्येच भाजपाची रणनिती ठरणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर युतीमधील दोन्ही पक्षांचे मतभेद कमी झाल्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा शिवसेनेबरोबर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ही २१ मार्चला असून पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक १४ मार्चला आहे. त्यामुळे येथील सत्ता समीकरणात एकमेकांची गरज लक्षात घेऊन सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर या दोन्ही पक्षांधील दूरावा कमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर निवडणूक लढवण्यामुळे त्यांच्यातील दूरावा कायम होता. त्यामुळे निकालानंतर या दोन्ही पक्षात सत्ता स्थापननेबाबत कोणतीच बोलणी झाली नाही. महापालिकेत बहुमत मिळवल्याने भाजपला शिवसेनेची गरज नाही. पण जिल्हा परिषद व पंचायत समितीत दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज असल्यामुळे पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थित शिवसेनेबरोबर चर्चा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक २५ तर भाजपाला १५ जागा मिळाल्या. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांना सत्ता स्थापने सोपे होते. पण दोन्ही पक्षांनी राज्यात विरोधात असलेल्या पक्षांशी संधान बांधून आपली रणनीती ठरवली. पण गेल्या दहा-पंधरा दिवसात राजकीय दोन्ही पक्षातला दुरावा कमी झाल्यामुळे जिल्ह्यातही शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. पालकमंत्री महाजन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेऊन सदस्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेत शिवसेनेबरोबर युती करून सत्तेची समीकरण मांडले जाण्याची शक्यता आहे. तर पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी शिवसेनेची मदत काही तालुक्यात शिवसेनेकडून घेण्याचे समजते.
आज मुदत संपणार
जिल्हाभरातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची मुदत सोमवारी, १३ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे येथे नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून नूतन सभापती व उपसभापती निवड मंगळवारी, १४ मार्च रोजी होणार आहे. पंचायत समितीत ६० सदस्य शिवसेनेकडून निवडून आले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ३२ तर भाजपाचे २७ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेकडे ७ ठिकाणी बहुमत आहे. तर राष्ट्रवादी व भाजपाला तीन ठिकाणी संधी आहे. तसेच माकपला दोन ठिकाणी सभापती मिळण्याची चर्चा आहे.
जि. प. निवडणूक २१ मार्चला
जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या पदाची २० मार्च रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी २१ मार्चला निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वात जास्त सदस्य शिवसेनेचे २५ निवडून आले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेस १८, भाजपा १५, कॉँग्रेस ८, माकपा ३ व अपक्ष ४ असे एकूण ७३ सदस्य आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बहुमत हे ३७ सदस्यांचे आवश्यक आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी नाशिकला येणार असून यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर निर्णय घेतले जातील.
- किशोर काळकर, विभागीय संघटनमंत्री, भाजप
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट