Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एमआयडीसीला गरज ‘थर्ड पार्टी ऑडिट’ची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर व अंबड येथे दिलेल्या भूखंडांचे गैरप्रकार चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. एकीकडे नवीन उद्योग नाशिकला यावे यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे सातपूर येथील ११८१ व अंबड औद्योगिक वसाहतीतील १६०१ भूखंडात नेमके चाललेय काय हे सांगण्यासाठी आता थर्ड पार्टी ऑडिट करण्याची वेळ आली आहे.

एमआयडीसीने ज्या उद्देशासाठी भूखंड दिले त्याचा वापर काही उद्योजक करीत नसल्याची बाब समोर आली आहे. या भूखंडांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणावरूनच भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला असून, त्याची माहिती आता एमआयडीसी गोळा करीत आहे. दुसरीकडे हाच प्रश्न उद्योजक इंदरपालसिंग साहनी यांनी उपस्थित करून एमआयडीसीकडून भूखंड वाटपात अनियमिततेचे आरोप केला. त्यानंतर उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी त्यावर पलटवार करीत साहनी यांनी केलेल्या गैरप्रकारचे पितळ उघडे पाडले. त्यानंतर उद्योजक राजेंद्र छाजेड यांनीही काही उद्योजकांनी पैशाच्या बळावर १५ ते २० भूखंड खोटे प्रकल्प अहवाल सादर करून पदरात पाडून घेतल्याचा आरोप केला आहे. त्यात त्यांनी हेच भूखंड आज दरमहा भाडे आकारून लहान उद्योजकांना दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एमआयडीसी आहे त्याच प्लॉटमध्ये जर असे उद्योग चालत असतील, तर नवीन उद्योगांसाठी सरकार कोणत्या तोंडाने नवीन जागा देईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारवाईचा अभाव

कोणताही विषय एमआयडीसी गांभीर्याने घेत नसल्याचे अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. एमआयडीसीमधून कागदपत्र गहाळ झाल्यानंतर एमआयडीने पोलिस स्थानकात केवळ पूर्तता म्हणून तक्रार केली, पण पुढे याप्रकरणात कोणतीच कारवाई केली नाही. त्याचप्रमाणे साहणी प्रकरणातही नोटीस पाठवून एमआयडीसीने दीड कोटीची नोटीस पाठवली पण पैसे न भरल्यानंतर तो भूखंड ताब्यात घेतला नाही.

पारदर्शकता हवी

मुंबईत मेमध्ये होणाऱ्या मेक इन नाशिक कार्यक्रमात नाशिकचे औद्योगिक महत्त्व सांगण्यासाठी एमआयडीसीने प्रेझेन्टेशन तयार केले आहे. पण त्याअगोदरच प्लॉट गैरवापरच्या विषयावर तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला जाताना एमआयडीसीने पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे.

एमआयडीसीची भूमिका बोटचेपी

विशेष म्हणजे एमआयडीसीने घेतलेली बोटचेपी भूमिकासुध्दा नाशिकच्या विकासाला पुरक नसल्याचा रोष व्यक्त होतांनाचे चित्र आहे. या प्लॉटबाबत असलेली अनियमितता दूर करण्यासाठी एमआयडीसीला सर्व्हे करून अहवाल तयार करण्याचे आदेश दिल्यानंतरही गेल्या महिनाभरात पुरेसे सर्व्हअर नसल्याचे कारण देत हा अहवाल लांबवला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्याने मागितली इच्छामरणाची परवानगी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या महिन्यात शेतातील उभा कांदा जाळणारे नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी आता सरकारच्या अनास्थेमुळे मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. नुकसानभरपाई, शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल तर इच्छामरणाला तरी परवानगी द्यावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

नगरसूल येथील शेतकरी डोंगरे यांनी गेल्या महिन्यात कांदा भावाच्या घसरणीमुळे उभे काढणीला आलेला पाच एकर कांदा पेटवून दिला होता. या घटनेनंतरही सरकारकडून कांद्याच्या भावाबाबत दखल घेतली जात नसल्याने सरकारच्या आडमुठेपणाच्या धोरणाला कंटाळून त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. डोंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे, की लहानपणी वडिलांची अचानक दृष्टी गेली, तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आहे. नांदगाव तालुक्यातील कोरडवाहू शेतीत उदरनिर्वाह होत नसल्याने डोंगरे कुटुंब सुमारे वीस वर्षांपूर्वी नगरसूल येथे नातेवाइकांच्या आश्रयाला आले. नगरसूल येथे नातेवाइकांची असलेली जमीन वाट्याने व काही शेतकऱ्यांची शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन शेतीव्यवसाय सुरू केला. सततचा दुष्काळ, नैसर्गिक हानी यामुळे शेती व्यवसायात फारसे उत्पन्न मिळाले नाही. मात्र, उदरनिर्वाहासाठी शेती हाच एक पर्याय असल्यामुळे शेतीवरच उदरनिर्वाह भागवत आहोत. मात्र, कधी दुष्काळ तर कधी गारपीट, तर कधी कोसळलेल्या शेतमालाचे बाजारभाव यामुळे मी व माझे कुटुंब कर्जबाजारी झालो. गेल्या वर्षी येवले तालुक्यात दुष्काळ पडल्याने पोटा पाण्यासाठी कन्नड तालुक्यात जाऊन भाड्याने जमीन घेऊन आठ एकर उन्हाळ कांदा लागवड केली. निसर्गाच्या कृपेने कांदा पीक चांगले येऊन उत्पादनही १०० टक्के निघाले. मात्र, कांदा बाजारात नेण्यापूर्वीच भाव घसरले. त्यामुळे संपूर्ण कांदा चाळीतच सडला व सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. गेल्या महिन्यात कांदा पेटवून दिला. इतके घडूनही राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील किंवा पक्षातील एकही पदाधिकारी धीर देण्यासाठी आला नाही. नुकसानभरपाई, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नसेल तर मला इच्छामरण घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी याचना डोंगरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, गोदावरीश्‍ाी नाते जोडूया...

$
0
0

‘मटा’तर्फे १९ मार्चला तपोवन मल-जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीला लाभलेल्या पौराणिक व धार्मिक महत्त्वामुळे नाशिककरांचे गोदेशी एक वेगळचं नातं जडलं आहे. मात्र गोदेत सांडपाणी व मैलापाणी मोठ्या प्रमाणात मिसळले जात असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. हे लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र टाइम्स’ने जागतिक पाणी दिनानिमित्त १९ मार्चला, रविवारी ‘सांडपाण्याचे नेमके काय होते’ हे समजून घेण्यासाठी तपोवनातील मलशुद्धीकरण केंद्राला भेटीचे आयोजन केले आहे. यावेळी महापालिकेचे अधिकारी व पाण्याशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींशी संवादही साधता येणार आहे.

‘गोदावरीशी नाते जोडूया’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र टाइम्स, नाशिक महापालिका व इंडियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, मोहाली यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोहाली येथील इंडियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या संस्थेच्या विद्यार्थीनी शिल्पा डहाके म्हणाल्या, शहरातील नदी-नाल्यांमध्ये गेल्या काही दिवसात मलजलचा प्रश्न गंभीर होत असताना महापालिका पाण्याच्या पुनर्वापरावर भर देत आहे. नदी-नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा वापरात यावे यासाठी नाशिक महापालिका प्रयत्नशील आहे. मात्र ही जबाबदारी फक्त महापालिकेची नाही. गोदावरीच्या प्रदूषणाची समस्या फक्त नदीपात्रापुरती मर्यादीत आहे असा आपला समज असतो. मात्र गोदावरीच्या प्रदूषणाचा आपल्या प्रत्येकाच्या घराशी संबंध आहे. घरातील सांडपाणी व मैलापाणी नदी पात्रात थेट जाऊ नये म्हणून महापालिकेतर्फे शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना समजून घेतल्यास शुद्धीकरण प्रकल्पांवर होणार खर्च व आपल्या घरातून बाहेर पडणारे सांडपाणी कमी कसे करता येईल याबाबत जनजागृती होण्याची गरज या भेटीतून समजून घेतली जाणार आहे.’ कमीत कमी सांडपाणी घरातून बाहेर पडल्यास तसेच नाशिककरांमध्ये पाण्याचा वापर व प्रदूषणाबाबत जनजागृती झाल्यास अनेक समस्या सुटू शकतात, असेही डहाके यांनी सांगितले.

जलशुद्धीकरणाची प्रक्रिया

तपोवनातील मलजलशुद्धीकरण प्रक्रियेचा प्रकल्प पाहण्याची संधी या उपक्रमातून मिळणार असून, घरातून जाणारे सांडपाणी कसे एकत्रित केले जाते. त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रकल्पात कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते, या प्रक्रियेचे टप्पे, त्यातून तयार होणारा मिथेन वायूचा वापर, शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर तसेच साठलेल्या गाळाचा वापर याबाबत माहिती व प्रकल्पाचे सादरीकरण महापालिकेचे अधिकारी करणार आहेत.

यूएन-वॉटर पोर्टलवर नाशिक

‘द युनायटेड नेशन’च्या यूएन-वॉटरची यंदाच्या जागतिक पाणी दिनानिमित्त सांडपाणी व त्यावरील प्रक्रिया ही संकल्पना आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या ‘सांडपाण्याचे नेमके काय होते’ या उपक्रमाची यूएन-वॉटर पोर्टलवर नोंद केली जाणार आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनात नाशिक महापालिका व विविध संस्था संघटनांकडून सुरू असलेल्या कामाची नोंदही या पोर्टलवर होणार असल्याचे शिल्पा डहाके यांनी सांगितले.

भेट कधी व कुठे ?

तपोवनातील मल-जलशुद्धीकरण प्रकल्प

वेळ : सकाळी ९ वाजता.

नाव नोंदणीसाठी संपर्क : ७०८७१९०७३८ / ८३८००९८१०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्या अखेर जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झाला. त्यामुळे खडांगळी- वडांगळी परिसरातील नागरिकांनी निःश्वास सोडला आहे. अनेक दिवसांपासून तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले होते. बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले होते. या प्रकरणी वन विभागाने खडांगळी येथील शेतात पिंजरा लावला होता. भक्ष्याच्या आमिषाने आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सोमवारी सकाळी हा पिंजरा मोहदरी येथील उद्यानात ठेवण्यात येणार असून, त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशान्वये त्याची रवानगी करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.त शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषेदच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी सोमवारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचे वृत्त असून, यात आघाडीचे सूत्र ठरवण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर जाण्याचे संकेत दिल्यानंतर राजकीय घडामोडी वेगवान झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे २५ व राष्ट्रवादीचे १८ सदस्य निवडून आल्यामुळे दोन्ही पक्षांचे सदस्य एकत्र आल्यास ही संख्या ४३ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री नाशिकमध्ये येण्याच्या आत शिवसेनेने ही संधी साधत राष्ट्रवादीशी बोलणी केल्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरण बदलल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवडणूक झाल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे १८ व भाजपचे १५ सदस्य एकत्र येण्याची शक्यता होती. त्यानंतर माकप व अपक्षांशी बोलणी करण्यात आली होती, तर दुसरीकडे शिवसेनेने काँग्रेसबरोबर बोलणी करून सत्ता स्थापण्याचे संकेत दिले होते. शिवसेनेचे २५ व काँग्रेसच्या ८ सदस्यांबरोबरच अपक्ष व माकपच्या सदस्यांची व्यूहरचना आखण्यात आली होती. या दोन्ही घडामोडी झाल्यानंतर मुंबईत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला, तर अर्थसंकल्पीय अधिवशेनात भाजपशी जुळून घेतल्यामुळे पुन्हा भाजप व शिवसेनेच्या आघाडीची चर्चा सुरू झाली; पण या तिन्ही शक्यतेला छेद देत जिल्हा परिषदेतील दोन्ही मोठ्या पक्षांनीच आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी अधिकृतपणे त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

असे आहे बलाबल

शिवसेना २५

राष्ट्रवादी कॉँग्रेस १८

भाजप १५

कॉँग्रेस ०८

माकप ०३

अपक्ष ०४

एकूण ः ७३

संभाव्य समीकरणे

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड २१ मार्च रोजी

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बहुमतासाठी हवेत ः ३७ सदस्य

शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आल्यास ः ४३ सदस्य

भाजपचे काय आहेत मनसुबे?

एकीकडे राष्ट्रवादी व शिवसेनेचे एकत्र येण्याचे संकेत मिळाल्यानंतर भाजपनेही राष्ट्रवादीला बरोबर घेण्यासाठी थेट मुंबईत वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधत राष्ट्रवादीला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. यात राष्ट्रवादी व भाजप एकत्र आल्यास राष्ट्रवादीला सभापती व भाजपकडे उपसभापती देण्याचे सूत्रही देण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन मंगळवारी दिवसभर नाशिकमध्ये तळ ठोकून असतील. त्यामुळे ते काय डावपेच आखतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काहीही होऊ शकते

जिल्हा परिषदेत एकाही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे रोज नवनवीन गणिते मांडली जात असून, आघाडी व बोलणी होत आहे. त्यामुळे शेवटपर्यंत काहीही होऊ शकते असे संकेतही एका राजकीय नेत्याने दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळांमधील भ्रष्टाचाराला चाप

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

आदिवासी आयुक्तालयाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शालेय साहित्यासह वस्तूंची थेट खरेदी आता बंद होणार आहे. या वस्तूंच्या बदल्यात एकत्रित रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा केली जाणार आहे. १५ जूनला शाळेत प्रवेशोत्सव होणार असून, त्याच दिवशी या सर्व वस्तू शाळेत आणणे विद्यार्थी व पालकांना बंधनकारक करण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे. पैसे खात्यात देऊनही वस्तू खरेदी न करणाऱ्या विद्यार्थ्याला थेट प्रवेश नाकारण्याचाही इशारा विभागाने दिला आहे. या निर्णयामुळे विभागातील जवळपास तीनशे कोटींच्या खरेदीतील भ्रष्टाचाराला चाप लागणार आहे.

आदिवासी विभाग आणि भ्रष्टाचार असे समीकरण झाले असून, कोणत्याही योजना असो वा खरेदी असो, त्यात भ्रष्टाचार हा ठरलेलाच असतो. लोकप्रतिनिधी, ठेकेदार व बाबूंमधील संगनमतामुळे या योजना व त्यांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहोचतच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध खरेदीमुळे आदिवासी विभाग राज्यभर गाजत असतो. विविध योजनांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता थेट अनुदान हे लाभार्थ्याच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पहिली अंमलबजावणी आदिवासी विभागाने पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विभागाच्या ५३७ शासकीय आश्रमशाळा असून, त्यात जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दरवर्षी विभागाकडून जवळपास तीनशे कोटींच्या आसपास खर्च केला जातो.

या तीनशे कोटींतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश, स्वेटर, रेनकोट, बूट, मोजे या वस्तूंची थेट खरेदी केली जाते. या वस्तूंच्या खरेदीत दरवर्षी मात्र मोठा घोळ केला जातो. ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून संगनमताने यात मोठा गैरव्यवहार केला जातो. त्यामुळे दरवर्षी खरेदींमधील भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर वस्तू, तसेच सुविधा मिळत नाहीत. काही वेळेस तर न्यायालयाच्या वादात या खरेदी अडकून दोन ते तीन वर्षे विद्यार्थ्यांना साहित्यही मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदरी निधी असूनही वनवास येतो. त्यामुळे आदिवासी विभागाने या सर्व वस्तूंची खरेदी थेट न करता त्यांच्या बँक खात्यात देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आदिवासी आयुक्तालयाने हा प्रस्ताव तयार करून मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला असून, त्याला मंजुरी मिळणार आहे. या निर्णयाने भ्रष्टाचाराची साखळीच तुटून पडणार असून, विद्यार्थ्यांना वेळेवर साहित्य, तसेच वस्तू मिळणार असून, विभागाची बदनामीही थांबणार आहे.

खरेदीची नियमावली

एक मे रोजी आश्रमशाळांचा निकालाच्या दिवशी पालकांना शाळेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या शालेय साहित्य व वस्तूंची यादी दिली जाणार आहे. त्यानंतर एक जून रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर सर्व वस्तूंचे एकत्रित पैसे थेट जमा केले जाणार आहेत. पालकांनी १५ दिवसांत आपल्या पसंतीच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. त्यानंतर १५ जून रोजी प्रत्येक आश्रमशाळेत प्रवेशोत्सव होणार असून, त्या दिवशी या सर्व वस्तूंच्या खरेदीचे पुरावे मुख्याध्यापकांकडे सादर करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना या वस्तू आणल्या नाहीत तर प्रवेश नाकारला जाईल, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आढळली पुरातन रहाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात असलेल्या राहाडींमध्ये यंदा तांबट गल्लीतील पुरातन रहाड सुरू करण्यात येणार असून, ३९ वर्षानंतर ही रहाड खुली होणार आहे. त्यामुळे शनी चौक, गाडगे महाराज पूल, तिवंधा या रहाडींव्यतिरिक्त तांबट गल्लीतील चौथी रहाड सुरू होणार आहे.

तांबट गल्लीत पुरातन रहाड असल्याची माहिती परिसरातील कार्यकर्ते मनोज अंबादास लोणारी यांना मिळाली. अनेक पुरातन कागदपत्रे तपासून पाहिल्यानंतर या गल्लीत रहाड असल्याची त्यांची खात्री पटली. त्यानुसार जागेचा शोध सुरू केला. या ठिकाणी जुन्या जाणकार व्यक्ती राहत नसल्याने अनेकांच्या सांगण्यात तफावत येत होती. जागेविषयी संभ्रम होता. अनेकांकडून माहिती घेतल्यानंतर रहाड खोदण्याची जागा निश्च‌ित करण्यात आली व त्या ठिकाणी रहाडीचा शोध घेण्याचे ठरले. या कामासाठी अर्थिक पाठबळ आवश्यक होते. ही रहाड अनेक वर्षांनतर खोदली जाणार असल्याने सुरुवातीला जड जाणार होते. मनोज लोणारी यांनी रहाडीची माहिती या प्रभागातील नगरसेवक गजानन शेलार यांच्या कानावर घातली. त्यांनीही ही रहाड शोधण्यासाठी जो काही खर्च लागेल, तो करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार रविवारी सकाळी रहाड खोदण्यास सुरुवात झाली. अनेक फूट खाली गेल्यानंतरही रहाडीचा शोध लागत नव्हता. शेवटी १८ फुटांवर रहाडीचा शोध लागला. डांबरीकरणाची अनेक कामे झाल्यानंतर हा रस्ता उंच झाला होता. त्यामुळे रहाड शोधण्यास विलंब झाला. पेशवेकालीन रहाड सापडल्यानंतर येथील नागरिकांनी जल्लोष केला. ही १८ फूट लांबी, १८ फूट रुंद व १६ फूट खोल रहाड आहे. या रहाडीला दोन पायऱ्या आहेत. ४० ते ४५ वर्षांपूर्वी ही रहाड खोदण्यात आल्याचे जुने कार्यकर्ते सांगतात.

विधिवत पूजा होणार

मनोज लोणारी म्हणाले की, यंदाच्या वर्षापासून ही रहाड नियम‌ित उघडली जाणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी या रहाडीची विधीवत पूजा होईल. त्यानंतरच रहाडीत रंग खेळाखला सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे शहरातील रहाडींवरदेखील गर्दी होणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. दुपारच्या सुमारास रहाडीच्या मानकऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजन करुन रंग खेळायला सुरुवात होणार आहे.

रहाडपूजेचा मान

पंचवटीच्या शनिचौकातील रहाडीचा मान रास्ते आखाडा तालिम संघाला, गाडगे महाराज पुलाजवळील रहाडीचा मान रोकडोबा तालिम संघाला तर तिवंध्यातील रहाडीचा मान मधली होळी तालिम संघाला आहे. येथील पदाधिकारी व मानकऱ्यांच्या हस्ते पूजन होऊन रंग खेळण्यास सुरुवात होईल. रंगपंचमीसाठी लागणारे रंग बाजारात उपल्बध झाले असून, पर्यावरणपूरक रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक मंडळांनी फुलांपासून तयार करण्यात येणाऱ्या रंगाला प्राधान्य दिले आहे. दांगट गल्लीत केशरी रंगाची परंपरा आहे. त्यामुळे या ठिकाणी अष्टगंध वापरुन रंग तयार केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीचे सत्र थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात घरफोड्यांपाठोपाठ दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकींची चोरी झाल्याची बाब समोर आली असून, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोमनाथ बाळू पवार (रा. जुना कथडा) हा युवक १ मार्च रोजी पंचवटी कॉलेजमध्ये गेला होता. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची पल्सर (एमएच १५ डीक्यू ३४१७) चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.

सिडकोतील पवननगर भागात राहणारे योगेश रामचंद्र परदेशी यांची दुचाकी २ मार्च रोजी सकाळी गोळे कॉलनी येथून चोरीला गेली. अतुल अकौटन्सी या क्लासेसच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी (एमएच १५ सीबी ३९९८) चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

वाहनचोरीची तिसरी घटना नाशिकरोड उड्डाणपुलाखाली घडली. पळसे येथील गोरक्षनाथ बाबाजी सरोदे २९ जानेवारी रोजी कामानिमित्त नाशिकरोड येथे आले होते. उड्डाणपुलाखालील सुयोग टायर या दुकानासमोर त्यांनी लावलेली दुचाकी (एमएच १५ सीक्यू ७२१९) चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

चोरीची नोंद १५ दिवसांनी

वाहनचोरीच्या घटनांची तब्बल १५ दिवसांनी नोंद होत असून, क्राईम रेट कमी ठेवण्याचा पोलिस प्रयत्न करीत असल्याचे यामुळे स्पष्ट होते. गुन्हा दाखल नसल्याने तपास होत नाही. १५ दिवस चोरट्यांना मिळत असल्याने चोरीला गेलेली दुचाकी पुन्हा केव्हा परत मिळेल, याची शाश्वती दिसून येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन वाळू घाटांसाठी आज होणार लिलाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गौण खनिजद्वारे मिळणाऱ्या महसुलाचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करता यावे, यासाठी जिल्ह्यातील नवीन चार वाळू घाटांचे मंगळवारी (दि. १४ मार्च) लिलाव होणार आहेत. या लिलावातून जिल्हा प्रशासनाला ४० लाख रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

ई टेंडर आणि ई ऑक्शन प्रक्रियेद्वारे राबविल्या जाणाऱ्या वाळू लिलावांकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याचे यापूर्वी वारंवार निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील १५ पैकी नऊ घाटांचेच लिलाव झाले असून, सहा घाटांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली. त्यामध्ये निफाड तालुक्यातील तामसवाडी, सायखेड्यातील दोन, जळगाव एक आणि दोन, बागलाण तालुक्यातील धांद्री आणि मालेगाव तालुक्यातील वडनेर या घाटांचा समावेश आहे.

यंदा प्रथमच नाशिक तालुक्यातील लहवित येथील दारणा नदीपात्रातील ७०७ ब्रास वाळू घाटासाठी प्रशासनाने चार लाख ९४ हजार ९०० रुपये किंमत ठेवली आहे. माडसांगवी येथील वाळू घाटासाठी ५ लाख ५६ हजार ५०० रुपये बोली रक्कम ठेवली आहे. या घाटावर ७९५ ब्रास वाळूचा उपसा करता येईल असा प्रशासनाचा दावा आहे. कळवण तालुक्यातील गोसारणे येथील गिरणा नदीपात्रातील ५३० ब्रास वाळू उपशासाठी ३ लाख ७९ हजार ४८० रुपये रक्कम मिळणे प्रशासनाला अपेक्षित आहे. तर देवळा तालुक्यातील लोहणेर येथील गिरणा नदीपात्रातील १ हजार ६४३ ब्रास वाळू घाटाकरिता ठेकेदाराला २४ लाख ६७ हजार ७८६ रुपये प्रशासनाला द्यावे लागणार आहेत. या चारही वाळू घाटांच्या लिलावातून ३८ लाख ९८ हजार ६६६ रुपये रक्कम मिळेल, अशी प्रशासनाला आशा असून, ठेकेदार कितपत प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पर्यावरण विभागाच्या अटी आणि शर्थींना अनुसरून ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत ठेकादारांना वाळूचे उत्खनन करता येणार आहे.

वाळूचे घाट आणि बोली रक्कम

लहवित - ४ लाख ९४ हजार ९००, माडसांगवी - ५ लाख ५६ हजार ५००, गोसारणे - ३ लाख ७९ हजार ४८०, लोहणेर - २४ लाख ६७ हजार ७८६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना औरंगाबाद हायवेवरील तपोवन क्रॉसिंग रोड येथे घडली. या प्रकरणी परप्रांतीय ट्रक चालकाविरुध्द पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ पंढरीनाथ शिंदे (वय ६१, रा. चेतनानगर, राणेनगर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिंदे दिंडोरीरोडकडून हिरावाडीमार्गे द्वारकाकडे जात असताना अपघाताची घटना घडली. हायवेवरून दुचाकीने (एमएच १९ एजे ४०८९) जाणाऱ्या शिंदे यांना तपोवन क्रॉसिंग येथे आडगावकडून नाशिककडे भरधाव येणाऱ्या मालट्रकने (एमएच १८ एसी ७७८७) जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार शिंदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भूषण शिंदे यांच्या तक्रारीवरून ट्रकचालक इम्रानखान जब्बार खान (रा. सोमखेडी, जि. खरगोन, मध्य प्रदेश) याच्याविरुध्द पंचवटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीखत न देणाऱ्या बिल्डरला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सदनिकेचा ताबा देऊनही हस्तांतरण न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला दणका देत दोन महिन्यांत खरेदी खत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिले आहेत. त्याचप्रमाणे सेवेत कमतरता केल्याचा ठपका ठेवत शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व तक्रार अर्जाचा खर्च पाच हजार असा एकूण १५ हजारांचा दंडही ठोठावला.

मालेगाव येथील रवींद्र मत्सागर व लोकश्वरी रवींद्र मत्सागर यांनी प्रेमसुख मिश्रीलाल चोरडिया, जिनेंद्र चोरडिया, जितेंद्र चोरडिया यांच्याविरुध्द ग्राहक न्यायमंचात तक्रार केल्यानंतर हा निकाल देण्यात आला. या तक्रारीत मत्सागर यांनी म्हटले आहे, की मी ४३ लाखांला फ्लॅट विकत घेतला. त्याचा विक्री करारनामा दुय्यम निबंधकांकडे नोंदवण्यात आला. करारनाम्यानुसार चोरडिया यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. पार्किंगसाठी दीड लाख इतकी वाढीव रक्कम घेतलेली आहे. त्याचप्रमाणे १४८० चौरसफूट इतके क्षेत्र न देता ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोडिंग देऊन प्रत्यक्षात १३३२ क्षेत्र देऊन ५ लाख ६५ हजार ७२ रुपयांची रक्कम जादाची वसूल केली आहे. स्टॉप गॅप अॅरेजमेंट म्हणून १० लाख ६ हजार रक्कमदेखील स्वत.च्या सोयीसाठी घेतली. मात्र त्यानंतर ती परत केली नाही. सदनिकेचा ताबा देऊनही हस्तांतरण केले नाही. त्यामुळे जादाची वसूल केलेली १७ लाख २१ हजार ७२ रुपये परत मिळावे व एक महिन्याच्या आत अंतिम हस्तांतरण दस्त मिळावे, अशी मागणी केली.

या तक्रारीनंतर युक्तिवाद करताना चोरडियांर्फे सांगण्यात आले, की आम्ही बांधकाम व्यावसायिक नाही. आमच्या प्लॉटवर सदनिका बांधून त्यांच्या वापरासाठीच्या सदनिकांव्यतिरिक्तच्या सदनिका विकलेल्या आहेत. सदनिकेची किंमत ४३ लाख ठरली होती. ती मत्सागर यांनी एकरक्कमी दिलेली नाही. त्याचप्रमाणे अतिरिक्त सुविधा हव्या म्हणून त्यांनी सात लाखांचा स्वतंत्र करारनामा केला आहे. पार्किंगसाठी दीड लाख रक्कम घेतली नाही. तसेच विक्री केलेल्या सदनिकेच्या व्यवहारात कोणतीही फसवणूक केलेली नाही. या दोन्ही बाजू ऐकून ग्राहक न्यायमंचाने निकाल दिला. चोरडिया यांनी दोन महिन्यांच्या आता खरेदीखत करून द्यावे व शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व तक्रार अर्जाचा खर्च पाच हजार असे एकूण १५ हजार अदा करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाई निवारणासाठी वॉटर सिक्युरिटी प्लॅन

$
0
0

नाशिक विभागातील ४४५६ गावांचा समावेश

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पाणीटंचाईतून मुक्तता मिळविण्यासाठी राज्याच्या पाणीपुरवठा खात्यामार्फत जलस्वराज्य अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक टंचाईग्रस्त गावांचा शोध घेऊन त्या गावांसाठी येत्या वर्षभरात वॉटर सिक्युरिटी प्लॅन तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. नाशिक विभागातील ४४५६ विहिरींना निरीक्षण विहिरी म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने मान्यता दिली असून, या विहिरींचे वॉटर ऑडिट प्रत्येक महिन्याला केले जाणार आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दरवर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण होते. अशा गावांना शासन टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरवते. त्यामुळे शासनाने जलस्वराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच गावांतील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर शास्त्रीय पद्धतीने उतारा शोधण्याचे निश्चित केले आहे.

तालुकास्तरावर प्रशिक्षण

निरीक्षण विहिरींच्या पाण्याचे ऑडिट करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात विभागातील ५४ तालुक्यांतील प्रत्येक गावातील जलसुरक्षकाला निरीक्षण विहिरीच्या पाण्याच्या पातळीची नोंद घेण्याची पद्धती, त्याची विहित रजिस्टरमध्ये करावयाची नोंद व हा संपूर्ण डाटा जिल्हास्तरावर पाठविणे, या कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

वस्तुस्थिती होणार उघड

निरीक्षण विहिरींची संख्या वाढल्याने आता पाण्याच्या उपलब्धतेची खरी माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे टंचाई असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. शिवाय नंतरच्या काळात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर वॉटर सिक्युरिटी प्लॅनही तयार केला जाणार आहे.

एक गाव एक निरीक्षण विहीर

प्रत्येक गावात कमीतकमी एक निरीक्षण विहीर असे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक विभागात ४४५६ इतक्या निरीक्षण विहिरी भूजल सर्वेक्षण विभागाने निश्चित केल्या आहेत.

निरीक्षण विहिरींच्या कमी संख्येमुळे अडचण

भूजल पातळी निश्चित करण्यासाठी नाशिक विभागात आतापर्यंत केवळ ७२१ विहिरींना मान्यता होती. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या निरीक्षणांती काढलेले निष्कर्ष व प्रत्यक्ष स्थिती यात मोठी तफावत निर्माण होत असे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवितांना नियोजनापेक्षा जास्त खर्च होत असे. या ७२१ विहिरींना १९७५ साली मान्यता दिलेली होती.

नाशिक विभागातील निरीक्षण विहिरींची संख्या केवळ ७२१ होती. आता ही संख्या ४४५६ इतकी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील वॉटर ऑडिट करणे सोपे जाणार आहे. नेमकी वस्तुस्थिती समजून गावनिहाय वॉटर सिक्युरिटी प्लॅनही तयार करता येईल. त्यासाठीचे प्रशिक्षण तालुकास्तरावर येत्या महिन्यात दिले जाणार आहे.”

- अनिल वाघमारे, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस वर्षांनी महापौर-उपमहापौर बिनविरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या आतापर्यंत सहा पंचवार्षिक निवडणुका झाल्या असून, गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौर व उपमहापौरपदाची निवडणूकही बिनविरोध होण्याची ही पहिलीच घटना घडली आहे.
आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत कुठल्याच पक्षाला मिळालेले नाही. २००२ मध्ये भाजप व शिवसेना युती अपवाद वगळता एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची संधी प्रथमच भाजपला लाभली आहे. आतापर्यंत शहराला चौदा महापौर मिळाले आहेत. पंधरावे महापौर व उपमहापौरपदासाठी बिनविरोध झालेली निवड ही या निवडणुकीचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत झालेल्या सहा पंचवार्षिक निवडणुकांमध्ये प्रथमच असे झाले आहे. १९९२ मध्ये काँग्रेसच्या कै. शांताराम बापू वावरे यांच्या विरोधात त्यावेळी भाजपचे कै. बंडोपंत जोशी यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर दुसऱ्या वर्षी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे डी. जी. पेखळे यांनी निवडणूक लढविली होती. काँग्रेसच्या पंड‌ितराव खैरे यांच्या विरोधात भाजपचे कै. बंडोपंत जोशी व शिवसेनेचे शिवाजी निमसे यांनी निवडणूक लढविली होती. शहर विकास आघाडीचे कै. उत्तमराव ढिकले यांच्या विरोधात प्रकाश मते यांनी निवडणूक लढवली होती. १९९६ मध्ये काँग्रेसचे प्रकाश मते यांच्या विरोधात कै. उत्तमराव ढिकले यांनी निवडणूक लढवत त्यांना एकतर्फी आव्हान दिले होते. सन १९९७ मध्ये शिवसेनेच्या वसंत गिते यांच्या विरोधात काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील निवडणूक लढवली होती.
शिवसेनेच्या पाठिंब्यावर महापौरपदाची निवडणूक लढविलेले अशोक दिवे यांच्या विरोधात काँग्रेसचे राजेंद्र जाधव मैदानात होते. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेखा भोसले यांनी महापौर पदाची निवडणूक लढविली होती. २००२ मध्ये शिवसेनेचे दशरथ पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे त्र्यंबकराव गायकवाड यांनी निवडणूक लढविली होती. २००५ मध्ये बाळासाहेब सानप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार यांनी महापौर पदाची निवडणूक लढविली होती.
शिवसेनेच्या पाठिंब्यावर महापौर पदाची निवडणूक लढविलेल्या विनायक पांडे यांच्या विरोधात काँग्रेसचे उत्तमराव कांबळे यांनी निवडणूक लढविली होती. सन २००९ मध्ये शिवसेनेच्या नयना घोलप यांच्या विरोधात काँग्रेसच्या माया दिवे उभ्या होत्या. २०१२ मध्ये मनसेचे अॅड. यतीन वाघ यांच्या विरोधात माकपचे अॅड. तानाजी जायभावे उभे होते. तर अशोक मुर्तडक यांच्या विरोधात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढविली होती.
यंदा प्रथमच महापौर पदावर विराजमान झालेल्या भाजपच्या रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या इतिहास नव्या इतिहासाची नोंद झाली आहे.

जिंदाबाद’च्या घोषणा

राधाकृष्णन् बी. यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. दहा वाजता भाजपचे सर्व नगरसेवक पंचवटीतील स्वामी नारायण मंदिरात एकत्र जमले. तेथे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना पारदर्शक कारभाराचे धडे दिल्यानंतर महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांसह सर्व नगरसेवक बसने रामायण बंगल्यावर दाखल झाले. अकरा वाजता भाजपचे सर्व नगरसेवक ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा देत सभागृहात दाखल झाले.

पदभारापूर्वीच राजीनामे

महापौर व उपमहापौरपदावर विराजमान होण्याआधीच भाजपने भानसी व गिते यांचे राजीनामे घेतले आहेत. महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाचाच असल्याचे सांगत, पालकमंत्री महाजन यांनी दोघांकडून शंभर टक्के पारदर्शी कारभाराची अपेक्षा असल्याचे सांगून त्यांच्या कामात कुचराई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी दोघांनी राजीनामे दिल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी माध्यमांसमोरच राजीनामे फडकवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओळख नव्या महापौरांची...

$
0
0


• नाव- रंजना पोपटराव भानसी
•पत्ता- नाथकृपा, केतकी हौसिंग सोसायटी, दिंडोरी रोड म्हसरूळ, नाशिक
•जन्मतारीख- १९ जून १९६४
•जन्मस्थळ- पंचवटी, नाशिक
•शिक्षण- एस. एस. सी
•शाळा- श्रीराम विद्यालय पंचवटी

कौटुंबिक माहिती
•पती- पोपटराव बुधा भानसी (सेवानिवृत्त उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ )
•मुलगा- अतुल भानसी (पदवीधर)•मुली-
१. नीलिमा नवनाथ महाले (माजी आमदार धनराज महाले यांच्या पुतण्याशी विवाह)
२. पूनम उद्धव चौधरी (उध्दव चौधरी हे केंद्राच्या ह्युमन रिसर्च डिपार्टमेन्टमध्ये शास्त्रज्ञ आहेत)
•वडील- (कै.) कचरूभाऊ राऊत
•आई- (कै.) गंगूबाई राऊत
•बंधू-
१. विजय राऊत (माजी सरपंच, चेअरमन निगडोळ विविध कार्यकारी सोसायटी, दिंडोरी)
२. शांताराम राऊत (हेड मॅकेनिक, एसटी महामंडळ)
३. दिलीप राऊत (भाजप शहर उपाध्यक्ष, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता-सार्वजनिक बांधकाम विभाग)

आतापर्यंतचे महापौर
शांतारामबापू वावरे (१९९२- ९४)
पंडितराव खैरे (१९९४ ते ९५)
उत्तमराव ढिकले (१९९५ ते ९६)
प्रकाश मते (१९९६ ते ९७)
वसंतराव गिते (१९९७ ते ९८)
अशोक दिवे (१९९८ ते ९९)
डॉ. शोभा बच्छाव (१९९९ ते ०२)
दशरथ पाटील (२००२ ते ०५)
बाळासाहेब सानप (२००५ ते ०७)
विनायक पांडे (२००७ ते १०)
नयना घोलप (२०१० ते १२)
अॅड. यतीन वाघ (२०१२ ते १४)
अशोक मुर्तडक (२०१४ ते १७)
रंजना भानसी (२०१७)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहे दुरुस्त झालीच पाहिजेत!

$
0
0

नाट्यगृहे दुरुस्त झालीच पाहिजेत!

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने सुरू असलेल्या ‘मटा कॅम्पेन’मध्ये शहरातील नाट्यगृहांची सद्यःस्थिती असा विषय घेऊन रोजच एका नाट्यगृहाच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिराची दुरवस्था याद्वारे उघड झाल्यानंतर लगेचच त्याच्या कामाचे टेंडरही निघाले. त्याचप्रमाणे रावसाहेब थोरात सभागृह दुरुस्तीच्या मार्गावर आहे, इतरही सभागृहे लवकरच दुरुस्त केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. या कॅम्पेनविषयी सामान्य नागरिकाला काय वाटते, याविषयी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया...!

दुरुस्तीचा केला जावा ठराव

नाट्यगृहे हा विषय शहराच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यांची दुरुस्ती झालीच पाहिजे. महापालिकेने तसा ठरावा मंजूर करावा. कारण, शहरातील नागरिकांचे मनोरंजनाचे प्रमुख ठिकाण म्हणजे नाट्यगृह असते. त्याची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे.

-दिगंबर देवढे

नाट्यगृहे म्हणजे जणू आत्माच

नाट्यगृहे हा शहरातील कला-संस्कृतीचा जणू आत्माच असतो. नाटक किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम बघणे ही लोकांची गरज असते, त्याशिवाय मनोरंजन होईलच कसे? त्यामुळे त्यांची दुरुस्ती तत्काळ केली पाहिजे. ‘मटा’ने हा विषय हाती घेतल्याबद्दल धन्यवाद.

-प्रदीप साळुंके

‘मटा कॅम्पेन’ सडेतोड

‘महाराष्ट्र टाइम्स’मार्फत नेहमीच नागरिकांच्या विषयाला हात घातला जातो. जेथे समस्या किंवा काही अडचण येते, तेथे बातमीच्या माध्यमातून ‘मटा’ उभा ठाकतो, हा नेहमीचा अनुभव आहे. आताही नाट्यगृहांची मालिका मी पाहतोय. हे कॅम्पेन सडेतोड झाले असून, नाट्यगृहे दुरुस्त करावीच लागतील.

-सागर पाटील

अपूर्णता मनाला खटकते

महाकवी कालिदास कलामंदिर हा आमच्या जवळचा विषय आहे. कारण, काही ना काही सादरीकरणाच्या निमित्ताने आम्ही नेहमी तेथे येत असतो. परंतु, येथील अपूर्णता मनाला खटकते. मात्र, आता ‘मटा कॅम्पेन’मुळे बदल होईल, असे वाटते.

-कैलास सलादे

‘त्यांच्या’ डोळ्यात घातले अंजन

नाशिक शहरातील नाट्यगृहे हा तसा संवेदनशील विषय आहे. कारण, सांस्कृतिक क्षेत्राकडे महापालिकेचे नेहमीच दुर्लक्ष होत असते. कलाकारांना काही सुविधा हव्या असल्यास अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. परंतु, ‘मटा’ने त्यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे.

-आकाश बर्वे

मिनी थिएटर्सचा मुद्दा उचलावा

‘मटा’ने हे ‘कॅम्पेन’ हाती घेतले हे स्वागतार्ह आहे. मात्र, आता शहरात काही मिनी थिएटर्सची गरज आहे. त्यासाठी नव्याने आंदोलन करण्याची गरज आहे. प्रत्येक विभागात एक मिनी थिएटर असेल, तर त्या विभागातील रसिकांची भूक भागू शकेल.

-अमोल महाजन

आता परिस्थिती बदलेल

नाशिक शहरातील नाट्यगृहांचा प्रॉब्लेम मोठा होता. कारण, आम्ही जेव्हाही नाटक पाहण्यासाठी तेथे गेलो, तेव्हा केवळ दुरवस्थाच नजरेस पडली. कालिदास कलामंदिरही खराब स्थितीत आहे. मात्र, नाट्यगृहांची दुरवस्था या ‘मटा कॅम्पेन’मुळे आता परिस्थिती बदलेल.

-सचिन नवघिरे

शहरात नाट्यगृहे गरजेचीच

नाट्यगृहे ही शहराची गरज असते. कारण, शहरात कलाकार राहतात, मनोरंजनासाठी रसिकही राहतात. त्यामुळे शहरात नाट्यगृहे हवीच असतात. आपल्या शहरातील नाट्यगृहांची अवस्था सध्या फारशी चांगली नाही. परंतु, हा मुद्दा ‘मटा’ने उचलल्यामुळे यात बदल नक्कीच घडेल.

-उमेश नवघिरे

‘कॅम्पेन’मुळे दुरवस्था प्रकाशात

पं. पलुस्कर नाट्यगृहाची अवस्था अत्यंत खराब आहे. विशेष म्हणजे येथे शेजारीच शौचालय उभारण्यात आले आहे. अनेक मद्यपी येथे अंगणात पहुडलेले असतात. त्यांचा काही बंदोबस्त करायला हवा. ‘मटा कॅम्पेन’मुळे या नाट्यगृहाच्या विविध समस्या प्रकाशात आल्या आहेत.

-विजय कदम

बदल आहेत अपेक्षित

मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकची नाट्यगृहे आहेत कुठे? तिकडे बटणांवर सगळा खेळ आहे, आपल्याकडे अजूनही दोऱ्यांवरच पडदे उघडझाप करतात. किमान ‘मटा’मुळे ही अवस्था समोर तरी आली आहे. आता त्यात तातडीने महत्त्वाचे बदल होणे अपेक्षित आहे.

-प्रशांत हाडोळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यात भाजपने साधली संधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला असून, सभापत‌िपदासाठी भाजपच्या विमलबाई सोनवणे यांनी काँग्रेसच्या संजय जोपळे यांचा अकराविरुद्ध एक असा पराभव केला. तर उपसभापत‌िपदासाठी भाजपच्या शीतल कोर यांनी शिवसेनेचे कान्हू आहिरे यांचा अकराविरुद्ध एक असा पराभव केला. दोन्हीवेळा हात उंचावून झालेल्या मतदानादरम्यान उपस्थितांपैकी दोन सदस्य तटस्थ राहिले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या बाजूने कौल दिला.

येथील पंचायत समितीसाठी भाजपाच्या सर्वाधिक सात जागा निवडून आल्या आहेत. भाजपने बहुमतासाठी आदिवासी आघाडीच्या दोन्ही सदस्यांचा पाठिंबा घेवून एकत्रित गटनोंदणी केली. त्यामुळे सभापती, उपसभापत‌िपदी भाजपाच्याच उमेदवारांची वर्णी लागेल हे निश्चित होते. सभापतीपदासाठी विमलबाई मांगू सोनवणे यांनी तर काँग्रेसचे संजय जोपळे व अंतापूर गणाचे रामदास सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले. उपसभापत‌िपदासाठी भाजपच्या शितल जिभाऊ कोर यांनी आणि शिवसेनेचे ब्राह्मणगाव गणातील कान्हू आहिरे या दोघांनी अर्ज दाखल केले. माघारीच्या मुदतीत सभापत‌िपदासाठी रामदास सूर्यवंशी यांनी माघार घेतली. त्यांनतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यावेळी सभापत‌िपदासाठी भाजपच्या सोनवणे यांना अकरा मते मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईएसआयसी’त अपुरे कर्मचारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील औद्योगिक वसाहतींत काम करणाऱ्या लाखाभर कामगारांसाठी कामगार विमा योजना रुग्णालयात केवळ १५६ कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे या रुग्णालयात अनेक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने कामगारांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. शंभर बेडच्या कामगार विमा रुग्णालयात क्लास वन पोस्टचे केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी असून, सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच आहेत. ‘ईएसआयसी’कडून वेळोवेळी रुग्णालयात मंजूर असलेली पदे भरण्याबाबत मागणी करण्यात येते. परंतु, शासनाकडून त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक आमदार व खासदारांनादेखील येथील वस्तुस्थिती कळविण्यात आली आहे. (सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधाच ‘ईएसआयसी’मध्ये उपलब्ध नसल्याने नेहमीच रुग्णांच्या रोषाला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु, मंजूर पदे भरण्यात येत नसल्याने इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्याचा भार सहन करावा लागतो.) येथील गैरसोय टाळण्यासाठी कामगार विमा योजना रुग्णालयात मंजूर असलेली १६८ पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी अपेक्षा डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र शासनाने कामगार विमा योजना रुग्णालयाची सुविधा दिली आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून ‘ईएसआयसी’मध्ये डॉक्टर व डॉक्टरांना मदतनीस असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती झाली नसल्याने त्याचा अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कामगार रुग्णालयात लाखाच्यावर कामगार सभासद आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामगार सभासद असतानाही केवळ १५६ कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम करावे लागत आहे. त्यातच महत्त्वाच्या पदावर असलेले डॉक्टर सुटीवर गेल्यास त्याचाही ताण दुसऱ्या डॉक्टरांना सहन करावा लागतो. येथे मंजूर असलेली १६८ पदे भरण्यात येत नसल्याने कामगारांना अनेकदा सुविधा देताना येथील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे.मात्र, तरीही आहे त्या कर्मचाऱ्यांकडून ‘ईएसआयसी’मध्ये कामगारांना आरोग्य सुविधा दिली जात आहे. डॉक्टरांवर अतिरिक्त भार येत असूनही एखाद्या कामगाराला वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला जातो. त्याचा त्रास डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याच्या संबंधितांच्या तक्रारी आहेत.

अतिदक्षता विभागच नाही

कामगार विमा योजना रुग्णालयात अतिमहत्त्वाचा असलेला अतिदक्षता विभागच (आयसीयू) उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर दुखापत झालेल्या कामगाराला खासगी रुग्णालयात हलविण्याची वेळ येते. यात एखाद्या वेळी संबंधित कामगाराकडे कागदपत्रांची पूर्तता नसल्याने खासगी रुग्णालयाकडून नाकारले जाते. अशावेळी कामगार व त्यांचे आप्तेष्ट कामगार रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरत असतात. शंभर बेडच्या या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

१८ वर्षांपासून एकच अॅम्ब्युलन्स

या रुग्णालयासाठी १८ वर्षांपासून केवळ एकच अॅम्ब्युलन्स कार्यरत आहे. विशेष म्हणजे संबंधित अॅम्ब्युलन्सची अनेकदा दुरुस्तीदेखील करून झाली आहे. परंतु, तिचा कार्यकाळ पूर्ण होऊनही नवीन अॅम्ब्युलन्सला शासनाने मान्यताच दिलेली नाही. किमान सामाजिक संस्थांनी तरी पुढाकार घेत येथे अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कामगारवर्गातून होत आहे.

प्रमुख रिक्त पदे अशी

कामगार विमा योजना रुग्णालयाची भव्य इमारत सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत आहे. परंतु, अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा अतिरिक्त भार इतरांवर येत असतो. यात वैद्यकीय अधिकारी क्लास वन यांची ६ पदे तत्काळ भरण्याची गरज आहे. ईसीजी, एक्स-रे, लॅब आदी टेक्निशियनची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. वर्ग ३ मध्ये १२६ पदांची गरज आहे. परंतु, केवळ ४५ पदे भरण्यात आली असून, ८१ पदे रिक्त अाहेत. सफाई कर्मचारी व पहारेकरी यांचीही अनेक पदे रिक्त आहेत. क्लास ४ च्या १५६ पदांपैकी केवळ ७१ पदे भरण्यात आली असून, ८५ पदे रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांकडूनच मिळाले राजकारणाचे बाळकडू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
भारतीय जनता पक्षाकडून सलग पाच वेळा महापालिकेत निवडून येण्याचा मान मिळविलेल्या रंजना भानसी या एकमेव ज्येष्ठ सदस्य आहेत. महापालिकेत पहिल्यांदाच महापौरपद मिळालेल्या भाजपच्या त्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या या निष्ठेचे बक्षीस म्हणूनच पक्षाने त्यांना महापौरपदाच्या खुर्चीवर बसविले आहे.
सन १९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ मधील महापालिका निवडणुकीत भानसी भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यांना कुटुंबातूनच राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील (कै.) कचरूभाऊ राऊत हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून १९९२ आणि १९७२ या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसतर्फे विधानसभेत निवडून गेले होते. १९९७ ला मालेगाव लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपतर्फे लोकसभेची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. माहेरी घरातच राजकीय वातावरण असल्याने शालेय शिक्षण घेत असताना त्यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. राऊत यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत भानसी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. निवडणूक जिंकण्यासाठी कसब त्यांना याच टप्प्यावर शिकायला मिळाले होते.
आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक पोपटराव भानसी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर गृहिणी म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना १९९७ मध्ये पहिल्यांदा नाशिक महापालिका निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. म्हसरुळ परिसरातील वॉर्ड क्रमांक एक हा अनुसूचित जमाती, महिला गटासाठी आरक्षित झाला होता. तेव्हा भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष (कै.) बंडोपंत जोशी आणि (कै.) दौलतराव आहेर यांनी म्हसरुळच्या जागेसाठी खासदार राऊत यांना घरातील महिला उमेदवार देण्याचा आग्रह धरला. राऊत यांची मुले सरकारी नोकरीत असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत होत्या. त्यामुळे घरातील महिला उमेदवार देणे शक्य होणार नाही, हे लक्षात
घेऊन मुलगी रंजना या लग्नानंतर म्हसरूळ परिसरातील केतकी सोसायटीत वास्तव्यास असल्याने त्यांना या भागातून उमेदवारी देण्यास हरकत नसावी, असा मुद्दा (कै.) राऊत यांनी मांडला आणि रंजना भानसी यांची उमेदवारी निश्चित झाली.
महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत तसेच पोटनिवडणुकीत काँग्रेसने यश मिळविले होते. त्यामुळे हा वॉर्ड काँग्रेसचा बालेकिल्ला ठरलेला होता. त्यामुळे काँग्रेसला मानणाऱ्या भागातून भाजपची उमेदवारी करणे तसेच अवघड होते. हे शिवधनुष्य पेलण्याचा विडा त्यांनी उचलला आणि या भागात पहिल्यांदाच भानसी यांच्या रुपाने भाजपचा उमेदवार विजय झाला. त्यानंतर त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत त्या अरुण पवार आणि राजेंद्र नवले यांच्यासोबत भाजपकडून विजयी झाल्या. २००७ मध्ये एकसदस्यीय वॉर्ड रचनेत त्यांची लढत आमदार ए. टी. पवार यांच्या कन्या गीतांजली पवार यांच्याशी झाली. या अटीतटीच्या लढतीतही त्यांनी विजयश्री खेचून आणली. २०१२ च्या दोन सदस्यीय प्रभाग रचनेतही त्यांनी विजय मिळविला. चार सदस्यीय प्रभाग रचनेत त्यांनी पुन्हा विजय मिळवित सलग पाचव्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून येण्याचा विक्रम केला. भानसी यांनी यापूर्वी तीन वेळा स्थायी समितीचे सदस्यपद, एकदा पंचवटी प्रभाग समितीचे सभापतीपद तसेच एकदा महिला बालकल्याण समितीचे सदस्यपद भूषविलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारदर्शक राहा; अन्यथा घरी जा!

$
0
0

पालकमंत्र्यांचा नूतन महापौर, उपमहापौरांना इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिककरांनी महापालिका निवडणुकीत भाजपवर जनतेने जो विश्वास दाखवला आहे, तो आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पालिकेचा कारभार शंभर टक्के पारदर्शकपणे करण्यासाठी आम्ही कट‌िबध्द राहणार आहोत. महापौर-उपमहापौरांच्या कामात कुचराई दिसली किंवा पारदर्शकपणाचा अभाव दिसला तर, त्यांचे राजीनामे विभागीय आयुक्तांना सादर करू, असा सज्जड दमच दिला.
भाजपच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक असून, नाशिककरांनी भाजपवर विश्वास टाकल्याने त्यांचे आपण आभारी असल्याचे महाजन यांनी यावेळी सांग‌ितले. महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल विरोधी पक्षांचेही त्यांनी आभार मानले. मुख्यमंत्री स्वतः नाशिकच्या विकासात लक्ष घालतीलच, परंतु आपणही पालकमंत्री म्हणून नाशिकमध्ये पूर्णवेळ बसून लक्ष असल्याचे ते म्हणाले.
महापालिका कारभार भ्रष्टाचारमुक्त असावा ही पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने नगरसेवकांना बैठकीत सूचना दिल्या आहेत. विमानतळाचा मुद्दा असो वा उद्योग वाढीसाठीचे धोरण, शहर स्वच्छता असे अनेक प्रश्न हाती घेऊन ते सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल. शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीबाबत महाजन यांनी कपाटसह प्रमुख मुद्दे सुटल्याचा दावा केला. परंतु, शहराच्या वाहतुकीचा प्रश्न बिकट आहे. त्यामुळे विकास हवा असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्याच लागतील, असे ते म्हणाले. त्यामुळे टीडीआर धोरणात बदल होण्याच्या अपेक्षा आता मावळल्या असून, कपाट आणि टीडीआरचे प्रश्न प्रलंबित राहण्याचीच शक्यता आहे. कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा देण्याचा भाजपचा प्रयत्न असून, साडेतीनशे एकर जागा कायमस्वरुपी मिळणार असल्याचे ते म्हणाले.

आजचा दिवस ऐतिहासिक असून, नाशिककरांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, त्याप्रमाणे पारदर्शक कारभाराला आमचे प्राधान्य असणार आहे. मी स्वतः पूर्णवेळ नाशिकमध्ये लक्ष घालणार असून, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची नवी संकल्पना नाशिकमध्ये राबवू.
- गिरीश महाजन, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तरीतील ‘तरुणा’ची अविरत सेवेची धडपड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

वृद्धापकाळात पित्याने आराम करावा, अशी मुलांची इच्छा, आमच्याकडे येऊन विश्रांती घ्यावी, असा बहीण आणि भाचे यांचा आग्रह. मात्र, असे असले, तरी आराम हराम आहे असे मानत वयाच्या ७१ व्या वर्षीही दररोज तब्बल १४ तास सायकलवरून किराणा माल पोहोचविण्याचे काम पंचवटीतील स्वरूपचंद बरडिया करीत आहेत. ही अनोखी सेवा करताना त्यांचा असलेला दांडगा उत्साह तरुणांना लाजवणारा ठरत आहे.

स्वरूपचंद बरडिया हे मूळचे मुंगसरे या गावचे. या गावात त्यांचे वडील फुलचंद बरडिया यांचे किरणा दुकान आणि शेती होती. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मुंगसरे गाव सोडले. २५ वर्षे त्यांनी गिरणारे रस्त्यावरील ब्राह्मणवाडे (यशवंतनगर) येथे किराणा दुकान चालविले. या किराणा दुकानासाठी लागणारा किराणा नाशिकहून सायकलवरून घेऊन जाण्याचे काम ते करीत होते. तेथील किराणा दुकान बंद करून ते २५ वर्षांपासून नाशिकला सायकलवरून हॉटेल, दुकाने, घरगुती ठिकाणी किराणा माल पोहोचविण्याचे काम करीत आहेत. सध्या त्यांचे वय ७१ वर्षे असून, या वयातही दररोज सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडून रात्री ११ वाजताच ते घरी परत जातात. पंचवटीतील दत्तनगर येथे भाड्याची खोली घेऊन तेथे ते राहत आहेत.

साईनाथ ट्रेडिंग, कहाणे हिरालाल आणि केतन मिरची-मसाले यांच्याकडून किराणा माल, मिरची-मसाले घेऊन पंचवटी, मेनरोड आणि भद्रकाली या भागात पोहोचविण्याचे काम ते रोज करीत आहेत. दुकाने, घरे, हॉटेल अशा नेहमीच्या ठिकाणी ते मागणीप्रमाणे किराणा पोहोचवतात. यातील बहुतांश ग्राहक त्यांच्याकडून उधारीत खरेदी करतात आणि थोडी थोडी उधारी चुकती करतात. उधारी वसुलीसाठी कधीही ते कुणाकडे तगादा लावत नाहीत. प्रत्येकाशी दिवसभरातून भेट होतच असते. व्यवसाय करताना चांगले-वाईट अनुभवही येत असतात. ज्या ग्राहकांना किराणा देतो, त्यात प्रामाणिकपणे पैसे देणाऱ्यांची संख्या जास्त आहेत. काहींनी पैसे बुडविले आहेत, त्यांना किराणा देणे बंद करतो, असे ते सांगतात.

कुटुंबीयांनाही नकार

बरडिया यांना तीन मुलगे आहेत. एक मुलगा शिर्डी येथील साई निर्माण बँकेत, दुसरा नगर येथील इटलीच्या चॉकलेटच्या मार्केटिंग कंपनीत आणि तिसरा नगरच्या मार्केट यार्डमधील गूळ आणि मिरचीच्या व्यापाऱ्याकडे कामाला आहे. हे तिघेही आपल्या वडिलांचा सांभाळ करण्यास तयार आहेत, तसेच त्यांची बहीण व भाचे हे जळगाव येथील चांदीचे होलसेल व्यापारी आहेत, त्यांचादेखील आग्रह आहे. मात्र, बरडियांना आराम करणे पसंत नाही. कामात वेळ जातो, रोज लोकांच्या भेटी होतात. कष्ट करण्यात आनंद वाटतो, रात्री सुखाची झोप लागते, असे ते म्हणतात.


कामाच्या सवयीने तंदुरुस्त

सायकलच्या हॅण्डलच्या दोन्ही बाजूंना आठ-दहा पिशव्या, कॅरिअरला गोणी अडकवून त्यात किराणा घेऊन ते निघतात. दररोज सुमारे १५० ठिकाणी ते किराणा देतात. दोन ते अडीच हजार रुपयांचा किराणा देऊन त्याची व्यवस्थित नोंद ठेवतात. या त्यांच्या अविरत सेवेत ऊन, वारा, पाऊस, थंडी असतानाही कधी खंड पडलेला नाही. त्यांच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले, तेव्हापासून ते सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण मेसमध्ये घेतात. सकाळी थंड पाण्याने अंघोळ करायची, दुपारी मेसमध्ये सात्विक भोजन करायचे आणि आपले काम करायचे, अशा दिनचर्येमुळे या वयातही कोणताच आजार नाहीत. सायकल चालवीत असल्यामुळे तंदुरुस्त आहे, असे ते सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images