म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
मुंबईहून सुटणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना नाशिकला थांबाच दिला जात नसल्याने नाशिककरांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नव्याने सुरू झालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसलाही नाशिकला थांबा देण्यात आलेला नाही. नाशिकवर होणारा हा अन्याय थांबवावा, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तेजस, हमसफर, सुविधा आणि अंत्योदय या वेगवेगळ्या श्रेणींतील सुपरफास्ट लांबपल्ल्याच्या गाड्या नुकत्याच सुरू केल्या आहेत. या गाड्या मुंबईहून सुटल्यानंतर नाशिकला थांबत नाहीत. अंत्योदय ही सुपरफास्ट ट्रेन असून, त्यात कोणतेही आरक्षण नाही. ती सामान्यांसाठीच आहे. मुंबई-टाटानगर या नाशिकमार्गे सुरू केलेल्या लांबपल्ल्याच्या गाडीला नाशिकरोडसारख्या महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लांबपल्ल्याच्या अशा दहा गाड्यांना नाशिकरोडला थांबा नसल्याने नाशिककर प्रवाशांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या गाड्या पकडण्यासाठी नाशिककरांना एकतर मनमाड, भुसावळ किंवा इगतपुरी या स्टेशन्सवर जावे लागत आहे.
या गाड्यांना नाही थांबा
मुंबईहून सुटणाऱ्या परंतु, नाशिकरोडला न थांबणाऱ्या दहा तरी गाड्या आहेत. त्यामध्ये अलाहाबाद दुरांतो, हावडा दुरांतो, नागपूर दुरांतो या तीन गाड्या आहेत. याशिवाय मुंबई-पुरी एक्स्प्रेस ही ओरिसाला जाते. मुंबई-आसनसोल पश्चिम बंगलला जाते. मुंबई-गोरखपूर संत कबीरधाम एक्स्प्रेस, मुंबई-गोरखपूर जनसाधारण आणि गोदान या तीन वेगवान गाड्या उत्तर प्रदेशात जातात. मुंबई-राक्सोल बिहारला, मुंबई-भोपाळ हबीबगंज मध्य प्रदेशात आणि हजरत निजामुद्दिन-एलटीटी सुपरफास्ट गाडी दिल्लीला जाते. या गाड्यांना नाशिकरोडसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा देण्याची गरज आहे. निजामुद्दिन ही गाडी दर मंगळवारी मुंबईहून नाशिकमार्गे दिल्लीला जाते. ही गाडी पूर्ण एसी आहे. ही गाडी नियमित सुरू करावी आणि नाशिकला थांबवावी, अशी मागणी होत आहे. मुंबईहून अंत्योदय सुरू करण्यात आली असून, ती नाशिकरोडला न थांबता झारखंडला टाटानगर येथे जाते.
फायदा रेल्वेचाच
नाशिक हे सुमारे वीस लाख लोकसंख्येचे शहर आहे. मात्र, येथून दिल्ली, नागपूर, कोलकात्यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी महत्त्वाची गाडी नाही. नागपूरला जाण्यासाठी मुंबईनंतर नाशिक हेच महत्त्वाचे शहर आहे. येथे देशभरातून नागरिक तीर्थाटन व पर्यटनासाठी येतात. तरीही लांबपल्ल्याची महत्त्वाची एकही रेल्वे प्रवासी गाडी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर थांबत नाही, यावरून रेल्वेची उदासीनता लक्षात येते. नाशिक हे धार्मिक, औद्योगिक, शिक्षण आणि कृषी आदी क्षेत्रांत आघाडीचे शहर आहे. तेजस, हमसफर, सुविधा, अंत्योदय या लांबपल्याच्या एक्स्प्रेस गाड्या येथे थांबल्यास रेल्वेचाच फायदा होईल. सध्या मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ही गाडी इगतपुरी आणि भुसावळ येथे थांबते. ही गाडी नाशिकला थांबल्यास रेल्वेचा आर्थिक लाभ होईल. विदर्भाची कनेक्टिव्हिटी वाढेल. दुरांतोशिवाय राजधानी एक्स्प्रेसही नाशिकमार्गे सोडावी, तिला नाशिकरोडला थांबा द्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
 मुंबईहून लांबपल्ल्याच्या गाड्या नाशिकरोडमार्गे धावतात. दुरांतोसारख्या एसी गाड्यांना नाशिकरोडला थांबा नाही. या गाड्यांचे भाडे हजारांमध्ये आहे. तरीही त्या मनमाड, इगतपुरी, चाळीसगावसारख्या स्टेशनवर प्रवासी नसताना थांबतात. यात विषमता आहे. नाशिकला थांबा केल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल.
-नितीन शुक्ल, प्रवासी
-------------------------------
दिल्ली, नागपूर, कोलकातासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्यासाठी मुंबईहून रेल्वेगाड्या आहेत. परंतु, नाशिकरोडहून थेट गाड्या नाहीत. मुंबईहून सुटणाऱ्या अंत्योदयला इगतपुरीनंतर थेट चाळीसगावला थांबा आहे, पण नाशिकला नाही. अधिकाऱ्यांचे आर्थिक गणित कसे असते याचे गूढच उकलत नाही.
-राहुल सोनवणे, प्रवासी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट