Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘वसुली अधिकाऱ्यांना गावबंदी करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, कांदा व इतर शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. बँक, वीज वितरण कंपनी आणि शासकीय वसुली अधिकाऱ्यांना गावबंदी करावी. वसुली अधिकाऱ्यांना गावबंदीचे फलक प्रत्येक गावाच्या वेशीजवळ लावावे असे पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी संघटनेच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. कोणत्याही वसुली अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी आरेरावी केली किंवा जबरदस्ती वसुली करण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्याच्या तोंडास काळे फासण्याचा इशारा पगार यांनी दिला. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचा सात/बारा उतारा कोरा झालाच पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. शेतकरी संघटनेच्यावतीने ३ व ४ एप्रिल रोजी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मोटरसायकल रॅली काढून जनजागॄती करण्यात येणार आहे. १० एप्रिलला दुपारी १२ वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही पगार यांनी स्पष्ट केले. सोमनाथ बोराडे, कडू बापू आहिरे, रमेश आहिरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका दिवाळखोर

$
0
0

भूसंपादन, वेतनासाठी ७० कोटींच्या ठेवी मोडणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीसाठी कंबर कसणाऱ्या नाशिक महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने भूसंपादन व कामगारांच्या वेतनासाठी ७० कोटींच्या ठेवी मोडण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या या आर्थिक स्थितीमुळे विकासकामांसह नगरसेवक निधीला ब्रेक लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकवर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच ठेवी मोडण्याची वेळ आल्याने भाजपच्या मनसुब्यांनाही लगाम लागणार आहे.

मनसेच्या सत्ताकाळात भराभर मंजूर केलेले भूसंपादनाचे प्रस्ताव आणि एलबीटीच्या अनुदानात शासनाने कपात केल्याने महापालिका आर्थिक दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. त्यातच स्पीलओव्हर हा साडेसहाशे कोटींच्यावर पोहोचल्याने आता पालिकेकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने आता एलबीटीपोटी आलेल्या वाढीव अनुदानाच्या ७० कोटींच्या ठेवी मोडण्याची तयारी सुरू केली आहे. यातून २५ कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तर उर्वरित निधी हा भूसंपादनावर खर्च केला जाणार आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाची मर्यादित साधणे, त्यातच जकात पाठोपाठ आलेल्या एलबीटीने पालिकेची आर्थिक अवस्था डामाडोल झाल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. विविध योजनांमधील हिश्शांमुळे पालिकेवर दिवाळखोरी ओढावली आहे. त्यातच राज्य सरकारने जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या एलबीटी अनुदानात ४० कोटींची कपात केली आहे. त्यामुळे पालिकेकडे आता कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पुरेसा पैसा नसल्याचे चित्र आहे. त्यातच मनसेच्या सत्ताकाळात भूंसपादनासाठी ९० कोटींची तरतूद असतांना तब्बल दीडशे कोटींचे अतिरिक्त प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यातच आता स्मार्ट सिटीसाठी पालिकेला आपल्या हिश्शातील ४५ कोटी रुपये कंपनीकडे जमा करायचे आहेत.

निधीची गरज असतांना तिजोरीत मात्र खडखडाट असल्याने आता मुदतठेवी मोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भूसंपादनाचे काही प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासनाने ७० कोटींच्या ठेवी मोडण्याची तयारी सुरू केली आहे. सन २०१५-१६ या वर्षात एलबीटीचे अतिरिक्त ७० कोटींचे अनुदान पालिकेकडे जमा आहे. पालिकेने त्याच्या ठेवी केल्या असून, त्या परत मागण्याची भीती आहे. त्यामुळे या ठेवी मोडून २५ कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तर उर्वरित निधी भूसंपादन आणि स्मार्ट सिटीसाठी दिले जाणार आहेत. त्या संदर्भातील निर्णयावर एक दोन दिवसात आयुक्तांकडूनच शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकवर प्रथमच वेतनासाठी थेट ठेवी मोडण्याची वेळ ओढावली आहे.

भाजपच्या मनसुब्यांना वेसन

महापालिकेत सत्तारूढ झालेल्या भाजपला मोठ्या प्रमाणावर विकासकामे करून मुख्यमंत्र्यांचा शब्द खरा ठरवायचा आहे. परंतु, त्यांनी पदभार घेताच कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी थेट ठेवीच मोडण्याची वेळ ओढावली आहे. स्मार्ट सिटी, मुकणे योजना, अमृत योजनेसाठी आपला हिस्सा देतांनाच पालिकेची परवड होणार आहे. त्यामुळे विकासकामांना ब्रेक लागणार आहे. दुसरीकडे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना येत्या बजेटमध्ये विकासनिधीही मिळण्याची शक्यता कमीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात सातबारा उतारे ऑनलाइनकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारने ई-गव्हर्नन्सला प्राधान्य दिले असून, सातबारा संगणकीकरणासह अनेक दाखलेही आता ऑनलाइन मिळू लागले आहेत. नाशिक जिल्ह्याचे सातबारा ऑनलाइनचे काम ७७.३७ टक्के झाले असून, आदिवासी तालुक्यांमध्ये हे काम ९५ टक्क्यांहून अधिक झाले आहे. नाशिक तालुक्यात ४० टक्केच काम होऊ शकले आहे.

‌डिजिटल इंडियाचे धोरण अवलंबणाऱ्या सरकारने पेपरलेस कारभाराला महत्त्व दिले आहे. सातबारा संगणकीकरणासह बहुतांश दाखले ऑनलाइन देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सातबाऱ्यावरील फेरफारसारखे गैरप्रकार बंद होण्यास मदत होते आहे. जिल्ह्यातील १५ पैकी तीन तालुक्यांमध्ये बहुतांश सातबारा उतारे ऑनलाइन झाले आहेत. जिल्ह्यात एकूण १२ लाख २८ हजार ८८८ सातबारा उतारे आहेत. त्यापैकी ९ लाख ५० हजार ७६० सातबारा एडिट मोड्युलमध्ये तपासून, तसेच आवश्यक दुरुस्त्या करून अंतिम करण्यात आले आहेत. असे सातबारा खातेदार शेतकरी, तसेच मिळकतधारक घरबसल्या मिळवू शकणार आहेत. २ लाख ७८ हजार १२८ सातबाऱ्यांची एडिट मोड्युलमध्ये तपासणी होणे बाकी आहे.

पेठ, सुरगाणा, देवळा आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये ऑनलाइन सातबारा नोंदणीचे काम सुमारे ९८ टक्के झाले आहे, तर पाच तालुक्यांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. चार तालुक्यांचे काम ७५ टक्क्यांपेक्षा कमी झाले असून, नाशिक तालुक्यात अवघे ३९.६१ टक्के काम झाले आहे.

तालुकानिहाय ऑनलाइन झालेले सातबाराची टक्केवारी

पेठ ९९.९६, सुरगाणा ९९.७५, देवळा ९७.९१, त्र्यंबकेश्वर ९७.१४, कळवण ९७.०१, दिंडोरी ९२.९९, बागलाण ९३.३२, चांदवड ९०.३१, सिन्नर ८७.३७, येवला ८६.३७, निफाड ८५.५७, नांदगाव ७७.७३, इगतपुरी ७२.६७, मालेगाव ७१.२३, नाशिक ३९.६१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाघाटावर अवैध वाळू उपशाचे ढिगारे!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदापात्रात ठिकठिकाणी घाट बांधण्यात आले. मात्र, सिंहस्थ कुंभपर्वात भाविकांना स्नान करण्यासाठी वापरात आलेले घाट या पर्वानंतर ओस पडले आहेत. टाळकुटेश्वर पुलापर्यंतच्या भागात या घाटांचा उपयोग कपडे धुण्यासाठी आणि धुतलेले कपडे वाळत टाकण्यासाठी करण्यात येऊ लागला आहे, तर लक्ष्मीनारायण घाटाचा उपयोग गोदापात्रातून अवैधरीत्या काढण्यात आलेली वाळू चाळण्यासाठी होऊ लागला आहे. वाळूला चाळणी मारल्यानंतर आवश्यक वाळू नेण्यात आली असून, उर्वरित अनावश्यक वाळूचे ढीग या घाटावर पडलेले आहेत. जणू काही हा घाट वाळू काढण्यासाठी आणि वाळू चाळण्यासाठी बांधला आहे, या थाटात त्याचा उपयोग करण्यात येत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत नाशिकला गोदापात्राच्या दुतर्फा घाट बांधण्याचे काम करण्यात आले. त्यात लक्ष्मीनारायण पुलाजवळ, तपोवन, नांदूर, मानूर, दसक, पंचक येथे लांबलचक घाट बांधण्यात आले. त्यातील लक्ष्मीनारायण व तपोवन वगळता इतर घाटांचा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाच्या दिवशीही वापर झाला नाही. लांबवर बांधण्यात आलेले हे घाट ओस पडलेले आहेत. कचरा साचलेल्या या घाटांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. या घाटांचा उपयोग कपडे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना या घाटांमुळेत प्रदूषण वाढू लागले आहे, अशी स्थिती सध्या दिसत आहे.

गोदावरी नदी होळकर पुलापासून दक्षिणेकडे वळसा घेते, त्या भागात पाण्याचा प्रवाह वेगाने वाहतो, तसेच ती पुन्हा काझी गढीच्या समोरच्या भागातून पूर्वेला वळता घेते तेथे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहतो. कन्नमवार पुलापर्यंत त्याचा वेग जास्त असतो. कन्नमवार पूल ते लक्ष्मीनारायण पूल या दोन्ही पुलांच्या मधील गोदापात्रात पाणी स्थिर आहे. या भागात वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. त्यामुळे येथील घाटावर मोठ्याप्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याची स्थिती आहे.


घाट आंदणच मिळाल्याची स्थिती

कन्नमवार पूल ते लक्ष्मीनारायण पूल या दोन्ही पुलांच्या परिसरातील लक्ष्मीनारायण घाट अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांना जणू आंदणच मिळाल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे वाळूचा केवळ उपसाच होत नसून, वाळू चाळण्यासाठीही या घाटाचा सर्रास वापर केला जात आहे. या घाटावर नजर फिरवली असता चाळून पडलेल्या अनावश्यक वाळूचे ढिगारे नजरेस पडत आहेत. अशा प्रकारे घाटावर अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोर्डाकडून गुरुजींची गळचेपी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

बदली झालेल्या, तसेच आजारी शिक्षकांनादेखील बोर्डाने दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविल्याने शिक्षकवर्गात बोर्डाच्या कारभाराविषयी नाराजी पसरल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. बोर्डाकडे लेखी स्वरुपात केलेल्या विनंतीस बोर्डाने केराची टोपली दाखवत शिक्षकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मर्जीतील शिक्षकांना वर्षानुवर्षे पेपर तपासणीच्या कामातुन सुटका दिली जात असल्याचाही आरोप होत आहे.

सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, तर बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत. बोर्डाकडून नियामकांना व परीक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. परंतु, शिक्षकांना उत्तरपत्रिका पाठविताना बोर्डाने शिक्षकांच्या विनंत्यांना केराची टोपली दाखवली असल्याचे काही शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले. याशिवाय बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या जुन्याच शाळांवर तपासणीकामी उत्तरपत्रिका आल्याने संबंधित शाळाप्रमुखांसह कस्टोडियनची प्रचंड तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे.

आजारी शिक्षकांनाही जुंपले

आजारी शिक्षकांनी परीक्षेपूर्वीच बोर्डाकडे पत्र पाठवून पेपर तपासणीचे काम न देण्याची विनंती केली होती. परंतु, बोर्डाने यातील बहुतांश आजारी शिक्षकांच्या विनंतीपत्रास केराची टोपली दाखवल्याने त्यांना आजारपणातही पेपर्स तपासावे लागत आहेत. काही शिक्षकांची गंभीर स्वरुपाची ऑपरेशन्स झालेली आहेत. अशा शिक्षकांनाही पेपर तपासणीसाठी जुंपले गेले आहे.

बदली एकीकडे, तर पेपर्स भलतीकडे

काही शिक्षकांच्या बदल्या होऊन दोन-दोन वर्षे झाली असूनही बोर्डाने त्यांच्या नावे जुन्याच शाळेत पेपर्स पाठविले आहेत. त्यामुळे बदली एकीकडे, तर पेपर्स भलतीकडे असा प्रकार शहरात बघायला मिळत आहे. या प्रकारामुळे संबंधित शाळाप्रमुखांसह कस्टोडियनची प्रचंड धांदल उडाली आहे.

जवळच्यांवर मात्र मेहेरबानी

बोर्डाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जवळच्या नातलगांना मात्र पेपर तपासणीच्या कामातून सुटका मिळत आहे. त्यांच्यापैकी काहींचे कुटुंबीय शिक्षक असूनही त्यांना पेपर तपासणीचे काम मिळत नाही. या मर्जीतील शिक्षकांवर मेहेरबान झालेल्या बोर्डाच्या कारभारामुळे मात्र विनातक्रार काम करणाऱ्या शिक्षकांवर कामाचा ताण वाढला आहे. शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह संघटनेत कार्यरत शिक्षकांवरही याबाबतीत बोर्डाकडून मेहेरबानी होताना दिसून येत आहे.

निवृत्तांची अजूनही यादीत नावे

या प्रकरणातील कळस म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची नावे अद्यापही बोर्डाच्या परीक्षकांच्या यादीत झळकत आहेत. परिणामी कस्टोडियन व शाळाप्रमुखांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे काही उत्तरपत्रिका अद्यापही तपासणीच्या प्रतीक्षेत पडून आहेत.

---

बदली झालेल्या शिक्षकांची माहिती बोर्डाकडे नसते. ज्या शिक्षकांकडून आरोग्याचे कारण कळविले जाते त्यांना उत्तरपत्रिका तपासणी कामातून वगळले जाते. प्रथम सत्रातच हे काम केले जाते. काही शिक्षक जाणीवपूर्वक कारणे पुढे करतात.

-राजेंद्रसिंह मारवाडी, सचिव, नाशिक बोर्ड

---

बदली झालेल्या, आजारी शिक्षकांनाही तपासणीकामी पेपर्स आल्याने प्रचंड फजिती झाली आहे. बोर्डाच्या चुका आम्हाला दुरुस्त कराव्या लागत आहेत. महत्त्वाचे काम असल्याने आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत.

-आर. पी. शिंदे, प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉवर प्रकरणी पालिकेला दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मालमत्ताकराच्या विरोधात हायकोर्टात गेलेल्या मोबाइल कंपन्यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. जीटीएल आणि एअरसेल कंपनीला ५० लाख रुपये भरण्याचे आदेश देत पालिकेला बिलासंदर्भातील त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या पाच एप्रिल रोजी महापालिका या दोन्ही कंपन्यांची सुनावणी घेऊन आपला निर्णय देणार आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे पालिकेला मोठा दिलासा दिला आहे.

महापालिकेच्या मालमत्ता कर थकबाकी वसुलीच्या विरोधात जीटीएल व एअरसेल या कंपनीने हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने यांच्या टॉवरवर सील लावण्यास विरोध करत, शुक्रवारी सुनावणी घेतली. त्यात कंपन्यांची बाजू ऐकून घेत, जीटीएल व एअरसेल या कंपन्यांना ५० लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने बिलाची आकारणी जास्त केल्याचा दावा या कंपन्यांनी कोर्टात केला. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महापालिकेने पाच एप्रिल रोजी नव्याने सुनावणी घ्यावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे पालिकेला मोठा दिलासा मिळाला असून, आता अन्य कंपन्यांकडूनही वसुली करता येणार आहे. या कंपन्यांना सुनावणीसाठी पुन्हा नव्याने पालिकेकडे अर्ज करावे लागणार आहेत. महापालिकेने आपला निर्णय कायम ठेवला तर त्यांना पुन्हा कोर्टात दाद मागता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकांना भोवले झेब्रा ‘क्रॉसिंग’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेने सुरू केलेल्या कारवाईदरम्यान शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी जुना गंगापूर नाका येथे कारवाई केली. पोलिसांनी जनजागृती करताना ९० वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईचे शस्त्र उगारले. यातील दोन वाहने जप्त करण्यात आली असून, उर्वरित वाहनचालकांकडून १८ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

ट्रॅफिक सिग्नलवरील बेशिस्त वाहतुकीला चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत त्र्यंबक नाका, जलतरण तलाव सिग्नल येथे कारवाई करण्यात आली. लेन कटिंग, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल जम्पिंग, कॉर्नर पार्किंग अशा प्राथमिक श्रेणीतील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना विशेषतः लक्ष्य करण्यात येत आहे.

पोलिसांनी शुक्रवारी जुना गंगापूर नाका येथे कारवाई केली. आठ कर्मचारी व एका अधिकाऱ्याने नियमाकडे पाठ फिरवणाऱ्या वाहनचालकांना दणका दिला. वरील नियम मोडणाऱ्या ८८ वाहनचालकांकडून १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर नियम तोडून पोलिसांशीच अरेरावी करणाऱ्या दोन वाहनचालकांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की ट्रॅफिक सिग्नल्सवर सर्वाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे वाहतुकीची शिस्त बिघडतेच, मात्र अपघातांसारख्या घटनांना नागरिकांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत तीन सिग्नल्सवर कारवाई झाली. दररोज कुठल्यातरी सिग्नलवर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


स्टिकरसाठी रिक्षाचालकांच्या रांगा

वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त मोहिमेंतर्गत परवाना नसलेल्या रिक्षा जप्त करण्यात येत आहेत. यामुळे अवैध रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांकडून देण्यात येणारे स्टिकर मिळविण्यासाठी वाहतूक शाखेत रांगा लागत असून, विशेष म्हणजे वैधरीत्या व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांकडून या कारवाईचे स्वागत होते आहे. अवैध रिक्षाचालकांमुळे टॅक्स भरणाऱ्या रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची असून, तिला पाठिंबा मिळत असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीकाळाराम जन्मोत्सवाची मंगळवारपासून पर्वणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

श्री काळाराम संस्थानतर्फे मंगळवार (दि. २८)पासून श्री काळाराम जन्मोत्सवास प्रारंभ होणार आहे. पावन कुंभपर्व सरल्यानंतर आलेला यंदाचा श्रीरामनवमी उत्सव संस्मरणीय व्हावा याकरिता वौशिष्टपूर्ण व भक्तिरसाने ओतप्रोत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या प्रांगणातील या वासंतिक नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे अध्यक्षस्थानी राहतील. चंदन पूजाधिकारी आहेत. रथोत्सव शुक्रवार (दि. ७ एप्रिल) रोजी होणार आहे.

जन्मोत्सव अन् व्याख्याने

जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात मंगळवारी (दि. २८) उद्घाटनानंतर मानसी पाटील व सहकारी यांचा भावगीतांचा कार्यक्रम होईल. दि. २९ मार्च ते दि. २ एप्रिल या कालावधीत विवेक घळसासी यांचे ‘राष्ट्रचैतन्य श्रीराम’ या विषयावर व्याख्यान होईल. सोमवारी (दि. ३) रोजी सप्तमीचा महाप्रसाद होईल. मंगळवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल. बुधवार (दि. ५) प्रमोद केणे यांचे गिरणा परिक्रमा, (दि. ६) रोजी तुळशीराम महाराज गट्टे यांचे ‘पसायदान’ व डॉ. अनिता कुलकर्णी यांचे ‘रामायणातील राजस्त्रिया’ या विषयावर व्याख्यान होईल. ही व्याख्याने सायंकाळी ५.३० वाजता होतील.

सांस्कृतिक कार्यक्रम

सांस्कृतिक कार्यक्रमांत दि. २८ रोजी श्रेयसी राय, चेतन थाटसिंगार व संदीप थाटसिंगार यांचा ‘रामरंग’ हा हिंदी-मराठी भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम, दि. २९ रोजी शिल्पा देशमुख यांचा ‘नाचू कीर्तनाचे रंग’ हा नृत्य-गायन-कीर्तनाचा कार्यक्रम, दि. ३० रोजी चंदाताई तिवारी यांचा भजनी भारुड लोकजागर, दि. ३१ रोजी कलानंद कथक नृत्यसंस्थेच्या संजीवनी कुलकर्णी यांची ‘कृष्णकथा’ ही संगीत नृत्यमय नाटिका, दि. १ एप्रिल रोजी आदर्श शिंदे यांचा भक्तिरंग हा भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम, दि. २ रोजी जयंत नाईक यांच्या गुरुकृपा तबला परफार्मिंग अकादमीचा ‘रंग त्रितालाचे’ हा कार्यक्रम, दि. ३ रोजी डॉ. ऋचा देव-हिर्लेकर यांचा ‘राष्ट्रजागरणासाठी गीतरामायण’ हा कार्यक्रम होणार आहे. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ८ वाजता सुरू होतील.

७ एप्रिल रोजी रथयात्रा

दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वंशपरंपरागत पूजाधिकारी व या वर्षाचे मानकरी चंदन पूजाधिकारी यांच्या हस्ते श्री प्रभुरामास तुलसीअर्चन करण्यात येईल. दि. २ रोजी सकाळी ७ वाजता मोहन उपासनी व सहकारी यांचा ‘वेणुमधुरम’ हा कार्यक्रम होईल. दि. ७ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्यात येईल. रास्ते आखाडा तालीम संघ, अहिल्याराम व्यायामशाळा तालीम संघ व काळाराम संस्थान यांच्यातर्फे हा रथोत्सव होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकला आणखी खासदार

$
0
0

गौतम संचेती, नाशिक

‘आमचा बाप आन आम्ही’चे लेखक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगरू, अर्थतज्ज्ञ व राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपल्या निधीचा विनियोग करण्यासाठी नाशिक जिल्हा नोडल डिस्ट्रिक्ट म्हणून निवडला आहे. त्यामुळे नाशिकला राज्यसभेचा पहिल्यांदा खासदार मिळाला आहे. डॉ. जाधव यांचे मूळ गाव ओझर असले तरी ते मुंबईला स्थायिक झालेले आहेत; पण आपल्या मूळ गावाच्या आठवणी ते आजही जोपासत असल्यामुळे त्यांनी नोडल डिस्ट्रिक्ट म्हणून नाशिकची निवड केली आहे. त्यामुळे देशभर त्यांच्या खासदार निधीचा पैसा आता नाशिकहून दिला जाणार आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदारांना देशातील सर्व ठिकाणी निधी देण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्या निधीचा नाशिकच्या बँकेमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी यांनी खाते उघडले आहे.

डॉ. जाधव यांच्या खासदार निधीतून ८५ लाख रुपये नाशिक जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी देण्यात आले आहेत. यापुढे त्यांचा जास्तीत जास्त निधी नाशिकला मिळणार आहे. जिल्ह्याला अगोदर तीन खासदार लाभले आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबरच आता जिल्ह्यात राष्ट्रपती नियुक्त खासदार असणार आहे. डॉ. जाधव यांनी ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकात अर्धे वर्णन नाशिक जिल्ह्याचे केले आहे. त्याप्रमाणे आपली बोली भाषा नाशिकची असल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या पहिल्या पुस्तकालाही कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची प्रस्तावना वजा आशीर्वाद असावे म्हणून त्यांचा आग्रह होता व त्यांनी तो मिळवला. त्यामुळे त्यांचे नाशिकप्रेम अजूनही कायम आहे.

खासदार झाल्यानंतर प्रत्येक खासदारांना त्यांचे नोडल डिस्ट्रिक्ट निवडण्याचा अधिकार असतो. त्यासाठी एक फॉर्म असतो. तो भरून दिल्यानंतर नोडल डिस्ट्रिक्टमधून त्यांच्या निधीचे वाटप खासदारांच्या पत्रानुसार केले जाते. डॉ. जाधव यांनी आतापर्यंत औरंगाबाद, पुणे, जळगाव, पालघर, नागपूर, दिल्ली येथे निधी दिला आहे, तर नाशिक जिल्ह्यासाठी ८५ लाख दिले आहेत. त्यातून विविध विकासकामे होणार आहेत.

डॉ. जाधवांचा प्रवास

राष्ट्रपती नियुक्त खासदार होणे तसे नाशिकच्या भाग्यात आले नाही; पण डॉ. नरेंद्र जाधव यांच्यामुळे ते नाशिकला लाभले. डॉ. जाधव हे मराठी अर्थशास्त्रज्ञ व रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य, तसेच इतर सामाजिक विषयांवर मराठी, इंग्लिश भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. ते नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते. त्यांचा जन्म एका सामान्य दलित कुटुंबात झाला असून, त्यांच्या आत्मचरित्राचे जगातील वीसपेक्षा अधिक भाषांत अनुवाद झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्रोत्सवावरून झाडाझडती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठाचा दर्जा असलेल्या श्री सप्तशृंग गडावरील चैत्रोत्सव जवळ आला असतांनाही उत्सवाची कुठलीच तयारी पूर्ण झालेली नसल्याची बाब शुक्रवारी आढावा बैठकीत निदर्शनास आली. त्यामुळे प्रातांधिकारी डी. गंगाधरन यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येत्या पाच दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश गंगाधरन यांनी दिले आहेत.

येत्या ४ ते ११ एप्रिल दरम्यान चैत्रोत्सव साजरा होत आहे. त्यादृष्टीने प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, गड ग्रामपंचायत यांच्या तयारीला वेग आला असला तरीही अनेक कामे अजून अपूर्ण आहेत. बैठकीत प्रांताधिकारी म्हणाले, दरवर्षी परिवहन महामंडळ हे फक्त उत्पन्न घेण्यासाठी काम करते. त्यांनी ताबडतोब दहा फिरते स्वछतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी. नियोजनात हलगर्जीपणा केल्यास एकही कारण ऐकून घेतले जाणार नाही. त्वरित कडक कार्यवाही केली जाईल. प्लास्टिक बंदीसाठी नियोजन करून पाण्याच्या पाऊच ऐवजी पाणपोईची व्यवस्था करावी. हागणदारी मुक्तीसाठी तातडीने गुडमॅर्निग पथकांची नेमणूक करून संबंधितांवर कडक कार्यवाही करा. पायी येणाऱ्या भाविकांसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून.

भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार होता कामा नये. जर कामे वेळेत पूर्ण केली नाही तर आपत्ती निवारण काद्यानुसार संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला.

गडावर चार एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून प्रांताधिकारी डी. गंगाधरन यांच्या अध्यक्षतेखाली गडावर ट्रस्टच्या हॉलमध्ये तालुक्यातील मुख्य अधिकारी, व्यावसायिक व ग्रामस्थाची आढावा बैठक घेण्यात आली. यात्राकाळात तयार करण्यात येणारे तात्पुरते बसस्थानक लवकर उभारण्यात यावे. बसस्थानक परिसरात दोन कंट्रोल रुम याशिवाय नियोज‌ित बसस्थानकाच्या जागी मुरूम व खडी टाकून व्यवस्था करण्यात यावी. भाविकांसाठी निवारा शेड करण्यात यावे आदी सूचना करण्यात आल्या. बैठकीस तहसीलदार कैलास चावडे, देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, पोलिस उप निरीक्षक विनोद जाधोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता केदार, ग्रा. प. सदस्य राजेश गवळी, भगवान नेरकर, भिकन वाबळे, संदीप बेनके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पाच दिवसांत अहवाल द्या
आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, ट्रस्ट व सप्तशृंग गड ग्रामपंचायत यांना उत्सव काळातील जबाबदारीबाबत अहवाल देण्याचे सांगण्यात आले आहे. उत्सवात पार पाडण्याची कामे, कोणती तयारी झाली याचा आहवाल येत्या पाच दिवसात प्रांत कार्यालयाला पाठवावा लागणार आहे.


भाविकांचा विमा

भाविकांचे सुरक्षा व जीविताच्या रक्षणाच्या दृष्टीने न्यासाने दोन कोटी रकमेचा जनसुरक्षा विमा वर्षभरासाठी उतरविला आहे. त्याअंतर्गत सर्व प्रकारचे अपघात, सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, गर्दीतील चेंगराचेंगरी व दहशतवादी हल्ला या आपत्ती प्रसंगी होणारा मृत्यू व जखमींच्या कौटुंबिक व जीवित सुरक्षिततेसाठी दोन कोटीचा विमा उतरविण्यात आला आहे. त्यात नांदुरी ते सप्तश्रुंग गड साडेतीन हजार पायऱ्यांचा पायी रस्ता नांदुरी ते सप्तश्रुंग गड घाट रस्ता व चंडिकापूर ते सप्तशृंग गड ६० पायऱ्यांचा रडतोंडी घाट यासह गडाचा सर्व परिसर गृहीत धरला आहे.


असे असणार उत्सवाचे नियोजन

मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार

तीन ठिकाणी संपर्क कक्षांची स्थापना

६५ सीसीटीव्ही कॅमेरे, ८० सुरक्षारक्षक, ५ बंदुकधारी सुरक्षारक्षक

दर्शनासाठी १५ बारी लावण्यात येणार

महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी वर्ग तैनात

२४ तास अग्निबंब सुविधा

प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित

अल्पदरात निवास व्यवस्था

यात्रा दरम्यान दोन वेळेचे मोफत अन्नदान

एकूण ११ पाणपोई व २४ तास लॉकरची सोय

पाच जनरेटरद्वारे अखंडित वीजपुरवठा

५० स्वच्छता कर्मचारी तैनात राहणार

१०८ अत्यावश्यक अम्ब्युलन्स सेवा उपलब्ध

वाहन पार्किंग नांदुरी येथे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसभर हाल, सायंकाळी दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारल्याने दिवसभर रुग्णांचे अतोनात हाल झाले. खासगी हॉस्पिटल्समधील डॉक्टर्सही संपात सहभागी असल्याने रुग्णांना सिव्ह‌िल हॉस्पिटलसह सरकारी हॉस्पिटल्सच्या सेवेवर समाधान मानावे लागले. डॉक्टर्स संघटनांची मुख्यमंत्र्यांसमवेतची बैठक यशस्वी झाल्याने सायंकाळी साडेपाचपासून अत्यावश्यक सेवांसह ओपीडीतील कामकाजही पूर्ववत सुरू झाल्याची माहिती आयएमएच्या सुत्रांनी दिली.

संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाल्याचा दावा करीत नाशिक आयएमएने सायंकाळी संप मागे घेतला. सायंकाळी साडेपाचपासून अत्यावश्यक सेवांसह ओपीडीदेखील सुरू करण्यात आल्या. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना दिलासा मिळाला आहे.

औषधांवरच मानले समाधान

तब्येतीच्या कुरबुरींपासून तात्पुरता आराम मिळावा यासाठी रुग्णांनी मेड‌िकल दुकानांकडे धाव घेतल्याचे चित्र शहरात आणि ग्रामीण भागातही होते. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी, जुलाब, मळमळणे यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींवर डॉक्टरांकडून लगेचच उपचार मिळणे शक्य नसल्याने रुग्णांनी औषधांवरच समाधान मानले. मेड‌िकल दुकानांमध्ये औषधे खरेदीसाठी गर्दी असल्याचे पहावयास मिळाले.


आयएमएच्या नाशिक शाखेने दुपारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संप रद्दचा निर्णय घेतला. ओपीडी व अन्य सेवा सायंकाळी साडेपाचपासून सुरू झाल्या आहेत. रुग्णांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

-डॉ. प्रशांत देवरे, सचिव, आयएमए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊंची वाढविण्यासाठी नकली विग लावला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नोकरी मिळविण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, नाशिकमध्ये पोलीस भरती सुरू असताना एका तरुणाने केवळ ऊंचीमुळे नोकरी जाऊ नये म्हणून डोक्यावर केसांचा नकली विग लावला. त्यांची ऊंचीही बसली. पण एका चाणाक्ष हवालदारामुळे त्याचे बिंग फुटले आणि पकडला गेला.

किसन पाटील असे या तरूणाचे नाव आहे. नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून पोलीस भरती सुरू आहे. त्यामुळे किसन पाटील या तरूणाने त्याची ऊंची १७५ सेंटीमीटरच्यावर दिसावी यासाठी हा बनावट विग घातला. तपासणीवेळी त्याची उंचीही जास्त मोजली गेली. मात्र एका पोलीस कॉन्स्टेबलला संशय आल्यानं त्यानं किसनची पुन्हा नीट तपासणी केली. यावेळी त्याच्या डोक्यावर विग आढळला आणि त्याचं बिंग फुटलं. दरम्यान या प्रकारानंतर किसन पाटील या तरुणाला संपूर्ण भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आलं आहे. तसंच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, या तरुणाने नकली विग घालून पोलिसांची फसवणूक केली असली तरी यातून बेरोजगारीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बेरोजगारी प्रचंड असल्यामुळेच नोकरी मिळविण्यासाठी अशी शक्कल लढवावी लागत असल्याचेही या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पुन्हा येरे माझ्या मागल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सतराशे विघ्न ठरलेली नाशिकची विमानसेवा पुन्हा मार्गी लावण्यासाठी एअर इंडियाने आणखी एकदा नाशिक-मुंबई-नाशिक विमानसेवेचा प्रस्ताव दिला आहे. मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध न झाल्याने यापूर्वीच ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा ही सेवा सुरू होणार का आणि सुरू झाली तरी त्यास प्रतिसाद मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक विमान सेवेमागे लागलेले शुक्लकाष्ट काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा प्रतीक्षेतच आहे. किंग फिशरची सेवा काही काळ सुरु राहिल्यानंतर जी सेवा बंद झाली ती अद्याप सुरू झालेली नाही. विमानतळाच्या ठिकाणी पायाभूत सोयी-सुविधा नसल्याचे कारण दाखविले गेले. या सुविधा निर्माण करतानाच अत्याधुनिक टर्मिनलही साकारण्यात आले. त्यासही आता दोन वर्षे होत आली आहेत. सर्वात मोठी धावपट्टीसह अनेक जमेच्या बाजू असतानाही ही सेवा झेप घेत नसल्याने नाशिककर वैतागले आहेत. खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून एअर इंडियाने पुढाकार घेतला. त्यानंतर नाशिक-मुंबई-नाशिक ही सेवा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात मुंबई विमानतळावरील विमानांची गर्दी लक्षात घेता स्लॉट उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे ही सेवा सुरू होण्यापूर्वीच ती बारगळली. यास एक वर्षे लोटत नाही तोच आता पुन्हा याच सेवेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सद्वारे नाशिक-मुंबई-नाशिक ही सेवा सुरू करण्यासाठी मुंबई विमानतळावर वेळ मिळावा, अशी मागणी एअर इंडियाने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या महाव्यवस्थापकांना पाठविले आहे. त्यामुळे नाशिकसेवेसाठी मुंबईत स्लॉट उपलब्ध होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई-आग्रा हायवेचे चौपदरीकरण आणि मुंबईत उड्डाणपुल साकारण्यात आल्याने नाशिक ते मुंबई हे अंतर खूपच कमी झाले आहे. त्यामुळे नाशिककर अवघ्या अडीच ते तीन तासात मुंबईत पोहचू शकतात किंवा तेथून नाशिकला येऊ शकतात. परिणामी, नाशिककरांना मुंबईसाठी विमानसेवा नको असल्याचा सूर उद्योग आणि अन्य वर्तुळातून आळवला जात आहे. नवी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु यासारख्या शहरांसाठी विमानसेवा देण्यात यावी. तसेच, दिल्ली-हैदराबाद जाणारे विमान नाशिकला थांबविण्यात यावे (हॉपिंग फ्लाईट), अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई सेवा सुरू झाली तरी त्यास प्रतिसाद लाभणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेबसाइटवर झळकले मराठीतील गुरुचरित्र

$
0
0



नाशिक ः आजची पिढी ही इंटरनेट व्हॉट्सअॅप, फेसबुक या माध्यमांमध्ये व्यस्त असून, त्यांना धार्मिक, सामाजिक प्रश्नांची जाण नाही, अशी ओरड केली जाते. मात्र, आता तरुणाईसह सर्वांनाच त्यांच्या आवडत्या माध्यमांद्वारे गुरुचरित्राच्या माध्यमातून जीवन जगण्याचे धडे देण्याकामी प्रभा आठवले यांनी पुढाकार घेतला आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी गुरुचरित्र या पोथीची वेबसाइट तयार केली असून, जगातील असंख्य यूजर्सपर्यंत ती पोहोचवली आहे. गुरुचरित्राचे मराठीत भाषांतर करून वेबसाइट बनविणाऱ्या त्या जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.

आपल्या मुलीबरोबर आठवले या गोंदवले या ठिकाणी गेल्या असता, तेथे हाती लागलेली गुरुचरित्राची पोथी चाळून पाहताना त्यांना जाणवले, की यातील ओव्या या ४५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या असून, त्या सामान्य माणसाला समजणाऱ्या नाहीत. ही पोथी कानडी लेखक गंगाधर साखरे यांनी लिहिली असून, ती सर्वांना समजेल यासाठी मराठीत असावी, अशी इच्छा त्यांच्या मनात आली. त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केली आणि मराठीतील भाषांतरानंतर वेबसाईटदेखील साकारली.

७९ व्या वर्षी मराठी टायपिंगचे धडे

गुरुचरित्राचे मराठीतील लिखाण जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी वेबसाइट या माध्यमाचा प्रयोग करण्याचे ठरविले. वेबसाइट तयार करण्याची माहिती नसल्याने यातील तज्ज्ञ दीप्ती नाशिककर व भाग्यश्री केंगे यांच्याकडून माहिती घेऊन गुरुचरित्राची पहिली वेबसाइट त्यांनी www.shrigurucharitra.com या नावाने साकारली. हे करण्यासाठी आठवले वयाच्या ७९ व्या वर्षी युनिकोडमध्ये मराठी टायपिंग शिकल्या.

चार फोल्डर्सचा समावेश

गुरुचरित्राची चार फोल्डर्समध्ये वेबसाइट तयार केली असून, पहिल्या फोल्डरमध्ये गुरुचरित्र, दुसऱ्या फोल्डरमध्ये आशय असून, त्यात आधुनिक काळातील मीमांसा मांडण्यात आली आहे. तिसऱ्या फोल्डरमध्ये यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला आहे. चौथ्या फोल्डरमध्ये प्रत्येक शब्दाविषयी चर्चा करण्यात आली आहे. ही वेबसाइट लॉन्च झाल्यानंतर जगभरातून प्रतिसाद मिळाला. त्यावर उत्तमोत्तम प्रतिक्रिया आल्या. सर्वांत जास्त प्रतिक्रिया अमेरिकेतून आल्या असून, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, जपान आदी देशांबरोबरच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथूनही प्रतिक्रिया आल्या आहेत.

२ अध्याय, ७४९१ ओव्यांचे भाषांतर

दोन वर्षांच्या अथक परिश्रामांनंतर ५२ अध्याय, ७ हजार ४९१ ओव्या यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून त्यांनी गुरुचरित्राचे मराठीत भाषांतर केले. गुरुचरित्रात जगण्याचा मंत्र दिला असून, तो सगळ्यांनी आचरणात आणावा, असे सांगण्यात आले आहे. अनेकांनी त्यांच्याकडून मराठी गुरुचरित्राच्या झेरॉक्स कॉपी घेतल्या. सोप्या भाषेत मराठी असल्याने त्याची मागणी वाढली. अनेक लोकांनी त्याचे पुस्तक करून विकावे, असा सल्लाही दिला. परंतु, मला या माध्यमातून पैसा नको, असे सांगून त्या शेकडो लोकांपर्यंत पोहोचवल्या.


ऑडिओदेखील अपलोड

गुरुचरित्र अंधांना समजावे यासाठी त्याचे ऑडिओदेखील अपलोड करण्यात आले आहे. अनेक लोक रोज एकतरी अध्याय वेबसाइटच्या माध्यमातून ऐकत आहेत. गुरुचरित्रात तुमची वागणूक कशी असावी, याचे मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे दत्तात्रयांनी सांगितलेले त्रिपुरा रहस्य हे मानसशास्त्र वेबसाइटच्या माध्यमातून आणण्याचा त्यांचा मानस आहे. वेबसाइट तयार करण्याचे जे काम तरुणांना येणार नाही ते काम प्रभा आठवले या सहजासहसहजी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंड नाशिकही तापले...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत असून, तापमान चाळिशीकडे चालले आहे. दरवर्षीच हॉट ठरणाऱ्या मालेगावने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. आता उर्वरित जिल्ह्यांची वाटचाल चाळिशीकडे सुरू असून, शनिवारी ३८.४ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली.

यंदाचा उन्हाळा तापदायक असणार असे सर्रास बोलले जात असून, मार्चच्या पहिल्या पंधरवड्यानंतरच त्याचा प्रकर्षाने प्रत्यय येऊ लागला आहे. होळीनंतरच्या उन्हाच्या झळा सोसणेही नाशिककरांना नकोसे वाटू लागले आहे. त्यामुळेच दुपारी बारानंतरच शहरातील अनेक रस्ते ओस पडू लागल्याचे पाहावयास मिळू लागले आहे. गतवर्षात नाशिककरांनी धुव्वाधार पाऊस आणि गारठून टाकणाऱ्या थंडीचा अनुभव घेतला. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, आतापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. त्यामुळेच टोपी, गॉगल यांसारख्या उन्हाच्या झळांपासून आरोग्याचे रक्षण करणाऱ्या वस्तूंना मागणी वाढली आहे. घरोघरी आणि कार्यालयांमध्येही पंख्याची पाती फिरण्यास सुरुवात झाली असून, एसीलाही मागणी वाढली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच एवढा उन्हाचा तडाखा जाणवत असेल तर एप्रिल आणि मे मध्ये किती हाल सोसावे लागणार या विचारानेच नागरिकांना घाम फुटू लागला आहे. गेल्या आठवड्यात ३३ अंशांपर्यंत असलेले कमाल तापमान आठच दिवसांत पाच अंश सेल्सियसने वाढून ३८ अंश सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. शनिवारी कमाल तापमान ३८.४ अंश, तर किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही दिवसांत नोंदविले गेलेले तापमान ः

१५ मार्च ३४.५, १६ मार्च ३३.८, १७ मार्च ३३.८, १८ मार्च ३४.१, १९ मार्च ३३.७, २० मार्च ३३.९, २१ मार्च ३६.०, २२ मार्च ३७.३, २३ मार्च ३८.१, २४ मार्च ३८.१, २५ मार्च ३८.४ जिल्ह्याचे तापमान चाळिशीकडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्तिधामचा कोंडला श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

येथील प्रसिद्ध मुक्तिधाम मंदिराचा जीव अतिक्रमणामुळे गुदमरला आहे. महापालिकेने अतिक्रमणापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी भाविक आणि मंदिर प्रशासनाने केली आहे. अतिक्रमणामुळे मंदिराची सुरक्षाव्यवस्थाही धोक्यात आल्याचा दावा केला जात आहे.

नाशिकरोडला बिटको चौकापासून जवळच मुक्तिधाम हे भव्य मंदिर आहे. विविध देवी देवतांच्या आकर्षक, रेखीव आणि जिवंत मूर्ती यासाठी हे मंदिर भारतात प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसाला सरासरी आठ हजार असून त्यामध्ये भरच पडत आहे. सकाळी महाभिषेक व सायंकाळच्या आरतीवेळी मोठी गर्दी होते. रामनवमी आणि हनुमान जयंतीजवळ आल्यामुळे त्यादिवशी गर्दी वाढणार आहे. कार्तिक स्वामींची मूर्ती मंदिरात आहे.

सुरक्षेला धोका

मुक्तिधामसारख्या मंदिरात ठराविक कालावधीने मॉक ड्रील (सुरक्षा प्रात्यक्षिक) घ्यावीत, अशी भाविकांची मागणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासून ५० वर्षात एकदाच मॉक ड्रील झाले आहे. तेदेखील गांभीर्याने झाले नाही. ड्रील पोलिसांनी नियमित घेतल्यास नागरिक आणि दहशतवाद्यांना योग्य संदेश मिळेल. या अतिक्रमणाचा गैरफायदा घेत दहशतवादी घातपात करू शकतात, असाही धोका संभवतो. भाविकांच्या सुरक्षेसाठी सुमारे पंधरा रक्षक, मेटल डिटेक्टर आहेत. मंदिराच्या आत, बाहेर आणि पार्किंगमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याद्वारे भाविकांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली जाते.

दोन्ही मार्गांवर वेढा

मुक्तिधाम मंदिराला पूर्व आणि दक्षिण असे दोन प्रवेशद्वार आहेत. दोन्ही मार्गावर अतिक्रमणाचा वेढा आहे. खाद्यपदार्थ विक्रेते, व्यावसायिकांची अतिक्रमणे सायंकाळी रस्त्यावर येतात. पे अॅन्ड पार्कही रस्त्यावरच आहे. पादचारी, वाहनांना जाण्यास जागा उरत नाही. मंदिरात पाच भक्त निवासात एक हजार भाविकांची राहण्याची सोय आहे. हे भाविक तसेच दररोजचे भाविक यांना अतिक्रमणाचा प्रचंड त्रास होतो. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नाशिकरोड, जेलरोडची अनेक अतिक्रमणे हटवली. मात्र, मुक्तिधाम परिसराला त्यांनी अभय दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नेते मंडळी अतिक्रमण हटविण्याचे केवळ आश्वासन देतात. परंतु, अतिक्रमण हटविण्याचे धारिष्ट्य ते दाखवत नाहीत.

विश्वस्तांकडून मुक्तिधाम मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर, पोलिस आयुक्त सर्वांना पत्रे देऊन अनेक वर्षे झाली. परंतु, ते हटविण्यात आलेले नाही. अतिक्रमणामुळे भाविकांच्या वस्तू चोरीस जातात. त्यामुळे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विगची शक्कल तरुणाच्या अंगलट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंचीबाबत साशंकता असलेल्या एका तरूणाने चक्क केसांचा विग लावत पोलिस भरतीला समोरे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, या तरुणाची ही चलाखी लागलीच उघडकीस आली. केसाने गळा कापला अशी एक म्हण आहे. मात्र, येथे केसाने दगा दिला असून, यानंतर सदर युवकाला भरतीप्रक्रियेतून बाद ठरवण्यात आले आहे. या प्रकरणाची दिवसभर चर्चा सुरू होती.

नाशिक शहर पोलिस दलासाठी सध्या पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे. दररोज साधारणतः एक हजार उमेदवारांना मैदानी परिक्षेसाठी पाचारण करण्यात येते. आज, शनिवारी त्र्यंबकेश्वर येथील एका युवकाचा क्रमांक आला. भरती प्रक्रियेच्या सुरुवातीला उमेदवारांची उंची तसेच छाती मोजली जाते. सदर युवक या टप्प्यात यशस्वी ठरला. मात्र, हजर झाल्यापासून तो पोलिस कर्मचाऱ्यांच्या संशयाच्या घेऱ्यात पोहचला होता. त्याचे केस जरा विच‌ित्र वाटत असल्याची तक्रार उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली. त्यांनी लागलीच याची खातरजमा करण्यासाठी संबंध‌ित उमेदवाराला बोलावून घेतले. त्याच्या डोक्याची तसेच केसांची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यात, त्याच्या केसांवर खोट्या केसांचा टोप (विग) लावल्याचे निदर्शनास आले. उंचीबाबत शाशंक असलेल्या सदर युवकाने हा उद्योग केल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. पोलिस भरतीसाठी १६५ इंच उंची आवश्यक असून, संबंध‌ित युवकाने विनाकारण हा प्रकार केल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवकास तत्काळ भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले. किंबहुना फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो.

...तर त्याच्यावर बंदी

नोकरी मिळवण्याची तरुणांची धडपड योग्य असते. मात्र, असे गैरप्रकार खपवून घेतले जात नाही. यामुळे उमेदवाराच्या करिअरवरच प्रश्न लागते. गैरप्रकार करून भरती होण्याचा प्रयत्न केल्यास भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास कायमस्वरूपी बंदी येऊ शकते, याची जाणिव ठेऊन काम करावे, असे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश केल्यानंतर चालू आर्थिक वर्षात ९० कोटी तर राज्य सरकारने आपल्या हिश्याचा ४५ कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला आहे. परंतु हा निधी येवून २0 दिवस झाले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी हा पालिकेकडे वर्ग केलेला नाही. परंतु या संदर्भात संसदेत एका तारांक‌ित प्रश्नाच्या माह‌ितीसाठी केंद्रीय सचिवांनी पालिकेकडे माह‌िती मागताच जिल्हाधिकारी कार्यालय जागे झाले आणि १३५ कोटींचा निधी वितरीत करण्याची धावपळ सुरू झाली आहे. पालिकेला येत्या दोन दिवसात १३५ कोटींचा निधी मिळणार आहे.

महापालिकेने स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. योजनेसाठी केंद्राचे ५० तर राज्य व महापालिकेला प्रत्येकी २५ टक्के खर्चाचा वाटा आहे. केंद्र सरकारने ९० कोटी रुपयांचा तर राज्य शासनाने ४५ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्चच्या पहिल्या आठवड्यात वर्ग केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा निधी तातडीने एसपीव्ही या कंपनीकडे वर्ग करायला हवा होता. परंतु नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला १३५ कोटीच्या निधीचे पत्र प्राप्त होवूनही या कंपनीकडे निधी वितरीत झाला नाही. याच संदर्भात केंद्रीय अधिवेशनात स्मार्ट सिटीसाठी आतापर्यंत किती निधी पाठविला व संबधित महापालिकांना किती वितरीत केला याबाबत तारांक‌ित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या प्रश्नासाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाचे सचिव संजय शर्मा यांनी लेखी माहिती मागितली.

यासंदर्भात पालिकेने उपलब्ध निधीचा गोषवारा देण्याची तयारी केल्याची कुणकुण जिल्हाधिकारी कार्यालयाला लागली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने स्मार्ट सिटीसाठी प्राप्त झालेला १३५ कोटी रुपयांचा निधी दोन दिवसात वितरीत करण्याचे आश्‍वासन महापालिकेला दिले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा निधी पुढील आठवड्यात पालिकेच्या पदरात पडणार आहे.

स्मार्टस‌िटीसाठी बॉण्डची तयारी

स्मार्ट सिटीच्या नियोजित प्रकल्पांसाठी महापालिकेने स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र, राज्य व महापालिकेच्या निधीसोबतच या कंपनीलाही आता आपला स्वतंत्र निधी बॉण्डसच्या माध्यमातून उभा करावा लागणार आहे. त्यासाठी कंपनीने बॉण्डस काढण्याची तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी नियुक्त केलेल्या क्रिसिल या संस्थेने नाशिक महापालिकेचा ‘अ’ वर्गात समावेश केला आहे. त्यामुळे कंपनीला तातडीने कर्ज उभारता येणे शक्य आहे. त्याच आधारे आता एसपीव्ही कंपनीसाठी बॉण्डस उभारले जाणार असून, यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय संशोधनास मिळणार चालना

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळावी, या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूदी करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचा रुपये ३७७ कोटी ७७ लाखांचा अर्थसंकल्प शुक्रवारी मंजूर झाला. तसेच अठरावा वार्षिक अहवाल विद्यापीठाच्या सन २०१७मधील पहिल्या अधिसभेमध्ये सादर करण्यात आला.

या अधिसभेसाठी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर हे अध्यक्षस्थानी, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, प्र. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. अजय चंदनवाले यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला. विद्यापीठाच्या सन २०१७-२०१८ अर्थसंकल्प परीक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधनाला चालना मिळण्यासाठी विद्यापीठाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत योजना, विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व गुणवत्ता वाढीस चालना, विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव मिळावा, शिक्षकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाविषयी प्रोत्साहन मिळण्यासाठी शिष्यवृत्ती, शिक्षकांना अपघात सहाय्यता, संपूर्ण प्रशासकीय कामकाजाचे संगणकीकरण, कर्मचायांसाठी कल्याणकारी योजना, विद्यापीठाच्या विकास कामांसाठी भरघोस आर्थिक तरतूदी करण्यात आल्या आहेत.



प्रोत्साहन मिळण्यासाठी तीन कोटींची तरतूद
विद्यापीठ व संलग्नित कॉलेजांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात संशोधन विभाग या स्वतंत्र विभागाची स्थापना करून त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी रुपये ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार असून त्यासाठी रुपये १ कोटी तरतूद केली आहे. विद्यापीठ व विभागीय केंद्राच्या ठिकाणी अद्ययावत संशोधन प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात यावी याकरीता संशोधकांना मानधन, वेतन देण्यासाठी रुपये १ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर संशोधनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक निर्माण करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे यासाठी रुपये २५ लक्ष इतकी तरतूद केली आहे. वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, हा यामागील उद्देश असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नलवरील झेब्रा पट्टे झाले गायब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

प्रादेशिक परिवहन विभागाने नुकतीच झेब्रा पट्टे क्रॉसिंग करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. परंतु, यात शहरात असलेल्या अनेक सिग्नलवरील झेब्रा पट्टेच गायब झाले आहेत. यामुळे सिग्नल यंत्रणेच्या ठिकाणी प्रथम झेब्रा पट्टे बनवावेत नंतरच आरटीओ विभागाने वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. त्यातच अवजड वाहनांची सर्रास वाहतूक रहिवाशी भागात होत असतांना त्यावर कारवाई कोण करणार, असाही सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

नाशिक शहराचा विकास गेल्या काही वर्षांत झपाट्याने झाला आहे. वाढत्या शहरात चारही बाजूंनी लोकवस्तीदेखील वाढली आहे. यामुळे वाहनांची संख्याही वाढलेली पहायला मिळते. त्यातच रहिवाशी भागात सर्रासपणे अवजड वाहनांचा नेहमीच शिरकाव होताना दिसतो. परंतु, याकडे वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभाग नेहमीच दुर्लक्ष करताना दिसतो. दुसरीकडे मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई नेहमीच सुरू असते. यात भर म्हणून आरटीओ विभागाने झेब्रा पट्टे क्रॉसिंग करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. अनेक वाहनचालकांनी हे क्रॉसिंग केल्याने आरटीओ विभागाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असताना मात्र शहरातील अनेक सिग्नलवरील झेब्रा पट्टेच गायब झाल्याने वाहनचालकही सर्रासपणे झेब्रा पट्ट्यांवर उभे राहताना दिसतात. यासाठी अगोदर गायब झालेले झेब्रा पट्टे वाहतूक पोलिस व आरटीओ विभागाने डोळ्याला दिसतील, असे करावेत मगच वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

नाशिक शहरात वाढलेल्या वाहनांमुळे रोजच अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. यात आरटीओ विभागाने झेब्रा पट्टे क्रॉसिंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असली तरी, ती केवळ नावालाच आहे, असाही सवाल उपस्थित होतो. अनेक सिग्नलवर झेब्रा पट्टेच गायब झाले आहेत.

-अनिल चिखलठाणे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images