सध्या शहरात प्रमुख समस्या आहे ती रस्त्यांच्या मधोमध उभ्या असलेल्या झाडांची. या झाडांमुळे अनेक अपघात होत असून, गेल्या काही वर्षांत अनेक व्यक्तींचा नाहक बळी गेला आहे. शहराच्या सर्वच भागात ही समस्या असून, ‘मटा’ या विषयी सातत्याने आवाज उठवीत आहे. रस्त्यातील झाडांची सर्वांत मोठी समस्या गंगापूररोडवरील जेहान सर्कल ते गंगापूर गाव या रस्त्यावर आहे. या ठिकाणी अपघात नित्याचेच झाले असून, महापालिकेला जाग यावी हीच यामागची भूमिका आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम करीत आहे. जनतेच्या समस्या मार्गी लावून त्या सोडविण्यासाठी ‘मटा’द्वारे सरकारदरबारीही प्रयत्न केले जातात. काही दिवसांपूर्वी शहरातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत ‘मटा’ने आवाज उठविला होता. त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत नाशिककरांना पाहायला मिळेल. नाट्यगृहांमध्ये अामुलाग्र बदल झाल्याचे अनुभवास येईल.
--
उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांचा भाग असलेला गंगापूररोड गेल्या काही वर्षांत मृत्यूमार्गच बनल्याची स्थिती आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांमुळे गेल्या सव्वाचार वर्षांत या रस्त्यावर तब्बल १३४ अपघात झाले आहेत. त्यात ३० जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे, तर १०४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये या रस्त्याविषयी धास्ती निर्माण झाली आहे. हे चक्र कधी थांबणार, असाच प्रश्न या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून गंगापूररोड ओळखला जातो. हा मार्ग म्हणजे एज्युकेशन हबचा आत्मा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी येथील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार रुंदीकरणसाठी ४४ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. परंतु, या मार्गावर झाडे येत असल्याने ती तोडण्यास काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, तरीही रुंदीकरण व्हावे यासाठी झाडांचा विषय बाजूला ठेवून तत्कालीन महापौर अॅड. यतीन वाघ व आयुक्त संजय खंदारे यांच्या कार्यकाळात या मार्गावरील जागांचे संपादन करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परिणामी या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली झाडे रस्त्याच्या मधोमध आली. महापालिका ती काढून घेण्यास तयार होती, परंतु वृक्षप्रेमी नागरिकांनी ती काढण्यास विरोध केला. या झाडांचे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्याने महापालिकेला काहीही कार्यवाही करता आली नाही. रस्त्याच्या मधोमध झाडे येत असल्याने या झाडांवर आदळून होणाऱ्या अपघातांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले व अनेक कुटुंबेदेखील उद््ध्वस्त झाली आहेत.
जेहान सर्कलपासून विचार केल्यास या मार्गावर भोसला मिलिटरी स्कूलचे गेट परिसर अपघातांचे केंद्रबिंदू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याच ठिकाणी बसस्टॉप असल्याने येथीस रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी, वाहनांची वर्दळ, फेरीवाल्यांचे अतिक्रमण अशा तिहेरी समस्येतून नागरिकांना वाट काढावी लागते. महापालिकेच्या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणात भोसला मिलिटरी स्कूलची जागा गेली आहे. परंतु, या संस्थेने ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित न केल्याने जेहान सर्कल ते श्री गुरुजी रुग्णालय हा मार्ग अत्यंत अरुंद झाला आहे.
आनंदवली गाव ते मंडलिक मळा या रस्त्यावर महापालिकेची शाळा आहे. त्याचप्रमाणे चांदशीकडे जाणारा रस्ता याच चौकातून जात असल्याने या ठिकाणी सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी रस्त्यातच झाडे असल्याने वाहने वळविणेदेखील कठीण होते. अशीच परिस्थिती पाइपलाइनरोडलगत असलेल्या चौकाची होते. येथेही वाहतूक कोंडीचा प्रकार नित्याचा झाला आहे. नवश्या गणपती चौक, सोमेश्वर मंदिर, बारदान फाटा, गंगापूर गावापर्यंत काहीअंशी अशीच परिस्थिती आहे.
तब्बल साडेचारशे झाडे
या मार्गावर कडुनिंब, बाभुळ, गुलमोहर, आंबा, शेवगा, जांभुळ, पपई, सुबाभुळ अशा प्रकाराची ४७५ झाडे आहेत. यातील १८ सुकलेली झाडे मध्यंतरी एका अपघातानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार तोडण्यात आली. त्याही वेळी काही पर्यावरणप्रेमी व्यक्तींनी आक्षेप घेतला होता. सुकलेली झाडे अंगावर पडल्याने झालेल्या अपघातांत दोन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले होते. नागरिकांच्या ठाम भूमिकेनंतर पर्यावरणप्रेमींनी ही झाडे तोडण्यास परवानगी दिली.
झाडांवर रिफ्लेटरचा अभाव
जेहान सर्कल ते गंगापूर गाव या रस्त्यावर असलेल्या झाडांना लावलेले बहुतांश रिफ्लेक्टर निघाले आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पत्रे लावण्यात आले होते, तेदेखील अपघातांमुळे निघाले आहेत. परिणामी रात्री गाडी चालवताना झाडे दिसत नसल्याने झाडांवर वाहने आदळून अपघात होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत झाडे काढण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत झाडांना रिफ्लेटर लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
झाडांचा आधार घेऊन अतिक्रमण
या रस्त्यावर अनेक हॉकर्सने झाडांचा आधार घेऊन बस्तान बसविले आहे. या अतिक्रमणांमुळेदेखील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही झाडाखाली बसलो आहे, तुम्हाला झाडांचा त्रास होतो, की आमचा असा उलट सवाल ते विचारत आहेत. महापालिकेचा अतिक्रमण विभाग यांना उठवण्याची कारवाई करतो, परंतु तो केवळ फार्स ठरत आहे.
हॉटेल्सच्या पार्किंगचा प्रश्न
या रस्त्यावर अनेक हॉटेल्स आहेत. त्यातील बहुतांश हॉटेल्सना स्वतःचे पार्किंग नसल्याने या हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने कुठे लावायची हा प्रश्न रस्त्यावरील पार्किंगमुळे आपोआप सुटतो. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या भागात कार्यवाही होऊ नये, यासाठी कारस्थान रचले जाते. त्यामुळे ही झाडे काढू नयेत, यासाठी संबंधित घटकदेखील यामागे असल्याचे बोलले जाते.
२२० खेडी जोडणारा रस्ता
परिसरातून पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता असल्याने अनेक लोक येथून सातत्याने प्रवास करीत असतात. तब्बल २२० खेडी जोडणाऱ्या या रस्त्यावरून गुजरातकडे जाणारी काही खासगी वाहनेही रवाना होतात, तसेच या ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्थाही आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसही या मार्गावरून धावतात. त्याचप्रमाणे शहरातून सातपूर एमआयडीसीत कामाला जाणारे अनेक कर्मचारी याच मार्गावरून जातात. मुक्त विद्यापीठ व परिसरातील वायनरींना भेट देण्यासाठी हाच रस्ता सोयीस्कर आहे. त्यामुळे हा रस्ता कायमच वर्दळीचा राहिला आहे.
२१ हजार झाडे लावली
या ठिकाणची झाडे तोडण्यासाठी महापालिकेने शहरात २१ हजार झाडे लावावीत, असा आदेश महापालिकेला दिला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ती झाडे लावली आहेत. ही झाडे लावून ठराविक उंचीपर्यंत जगवल्याचा दाखला मुख्य वनसंरक्षक यांच्याकडून घेऊन तो न्यायालयाला सादर करायचा होता. त्यानंतर न्यायालय ही झाडे तोडण्यास परवानगी देणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पर्यायी मार्गात अडचणी
या मार्गावरील वाहतूक कमी व्हावी यासाठी महापालिकेन दोन पर्याय तयार केले आहेत. परंतु, या ठिकाणची कामे अर्धवट असल्याने ते वापरात येऊ शकत नाहीत. पहिला मार्ग हा बापू पुलाशेजारून नदीला समांतर रस्ता तयार करण्यात आला आहे. येथे अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत आहेत. हा रस्ता तातडीने तयार झाल्यास हा पर्याय ठरू शकतो. त्याचप्रमाणे संत कबीरनगर येथील पाटाला लागून असलेल्या नवीन रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. या रस्त्याचे काम झाल्यास नाशिक शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या लोकांना चांगला पर्याय निर्माण होईल व सध्याच्या असलेल्या गंगापूररोडला चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकेल.
झाडांमुळे अंधार
या ठिकाणी झाडांच्या फांद्यांमुळे पथदीप झाकले गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर दिवे असूनही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे अंधार व रस्त्यात झाडे यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरची झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांच्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. परंतु, तिलाही केराची टोपली दाखविण्यात आली.
अपघाताची आकडेवारी
अपघाताचे वर्ष ...घटनास्थळी झालेले मृत्यू....जखमी....अपघातांची संख्या
२०१३ ६ २६ ३२
२०१४ ७ २२ २९
२०१५ १० १६ २६
२०१६ ५ २८ ३३
२०१७ २ १२ १४
एकूण...३०......१०४...१३४
अपघातप्रवण ठिकाणे
जेहान सर्कल
भोसला मिलिटरी गेट
हिराबाग
बेंडकुळे मळा
बॉबी हॉटेल
कडलग मळा
बळवंतनगर चौक
नवश्या गणपती रस्ता
हॉटेल विकी गार्डन
प्रशासनाची उदासीनता
ही झाडे काढावीत यासाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. स्थानिक नगरसेवक विक्रांत मते व विलास शिंदे यांनी सभागृहात हा प्रश्न वेळोवेळी मांडला. परंतु, त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. कायमच प्रशासनाकडून हेटाळणी केली गेली.
दुभाजक काढल्याने घटले अपघात
महापालिकेने गंगापूररोड रस्त्यावर दुभाजकांसाठी जागा सोडली. मात्र, परिणामी वाहने चालविणे चालकांना कठीण झाले. त्यामुळे भीक नको, पण कुत्रा आवार अशी काहीशी परिस्थिती गंगापूररोडवर झाली. याबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारही केली. त्याची दखल घेत महापालिकेने रस्ता दुभाजकासाठी सोडण्यात आलेल्या जागेवर पुन्हा डांबरीकरण केले. त्यामुळे वाहनचालकांचा त्रास कमी झाला आहे.
मानवी साखळी अभियान
या रस्त्यावरची झाडे तोडावीत यासाठी गंगापूररोड कृती समितीतर्फे मानवी साखळी आंदोलन छेडण्यात आले. तरीही प्रशासनाला फरक पडलेला नाही. एकीकडे असंख्य जीव जात असताना प्रशासन मात्र मूग गिळून आहे. या आंदोलनाच्या वेळी अनेक आयुक्त येऊन गेले, परंतु त्यांना या ठिकाणी अपघाताने होणाऱ्या मृत्यूंचे सोयरसुतक नसल्याचे आरोप होत आहेत.
पर्यावरणरक्षण महत्त्वाचे की, नागरिकांचे जीव?
महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर रुंदीकरणात बाधित होणारी झाडे तोडण्याची तयारी केली होती. केवळ जेहान सर्कल ते गंगापूर गाव या मार्गावरील साडेतीनशे झाडे तोडावी लागणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने झाडे तोडण्यास केलेली मनाई आणि त्यानंतर घातलेल्या अटी-शर्ती, तसेच विशिष्ट झाडे तोडण्यास नाकारलेली परवानगी यामुळे आजही गंगापूररोडचे रुंदीकरण पूर्ण झालेले नाही.
उच्च न्यायालयाला पाच हजार पत्रे
शहरातील गंगापूररोडसह अन्य ठिकाणी रस्ता रुंदीकरणात बाधित आणि अपघातांना कारणीभूत ठरलेली झाडे तोडावीत, यासाठी गंगापूररोड रस्ता कृती समितीतर्फे सुमारे पाच हजार पत्रे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पाठवून अभिनव आंदोलन करण्यात आले. गंगापूररोडसह अनेक भागात रस्ता रुंदीकरणातील काही प्रजातींची झाडे तोडण्यास मनाई केल्याने विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ता रुंदीकरण पूर्ण होत नाही, त्यातच झाडांमुळे अपघात होत असल्याने अशी अडथळा ठरणारी झाडे तोडावीत, यासाठी गंगापूररोड कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. मुख्य न्यायमूर्तींना म्हणणे पटवून देण्यासाठी पाच हजार पोस्ट कार्ड पाठविण्याचे समितीने ठरविले होते. त्यानुसार मुख्य टपाल कार्यालयात टपाल पाठवा आंदोलन करण्यात आले.
---
या मार्गावर रोज सरासरी दोन अपघात होत आहेत. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. महापालिकेचे उदासीन धोरण, पर्यावरणवाद्यांचा आडमुठेपणा त्यामुळे लोकांचे हकनाक जीव जात आहेत. पर्यावरणवाद्यांना झाडे महत्त्वाची, की लोकांचे जीव हेच समजत नाही.
-विलास शिंदे, नगरसेवक
--
गंगापूररोड कृती समितीतर्फे या प्रश्नावर अनेकदा आंदोलने छेडण्यात आली. महासभेत आवाज उठवण्यात आला. प्रत्येक वेळी न्यायालयाचा बागुलबुवा पुढे करण्यात आला. न्यायालयाने धोकादायक वृक्ष काढून टाकण्याचे आदेश दिले असतानाही कार्यवाही होत नाही. याविरुद्ध मोठे आंदोलन छेडणार आहोत.
-विक्रांत मते, माजी नगरसेवक
--
या ठिकाणी अपघात होऊन शेकडो बळी गेले आहेत. आणखी किती बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे, हे समजत नाही. झाडांच्या त्रासामुळे लोक नवीन झाडे लावायलासुद्धा तयार नाहीत. काही पर्यावरणवाद्यांनी एक प्रकारची दहशत निर्माण केली आहे.
-मिलिंद कुलकर्णी, नागरिक
--
झाडांची फारच अडचण आहे. काही अपघात रेकॉर्डला येतात, काही येत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहोत. त्याला अद्याप यश आलेले नाही. आम्हालाही वृक्षप्रेम आहे. आम्ही कॉलनीत भरपूर झाडे लावली आहेत. ही झाडे काढण्याबाबत कुणी आडकाठी आणू नये असे मला वाटते.
-मंगल देवरे, गृहिणी
--
दररोजचे अपघात पाहून मन उद्विग्न होते. एखाद्या गोष्टीचा किती पाठपुरावा करावा यालाही मर्यादा असतात. गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनाला जाग येत नाही, याला काय म्हणावे समजत नाही. त्यामुळे या समस्येसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
अंजली बिवलकर, गृहिणी
--
महापालिकेची निवडणूक असल्याने हा विषय काही काळासाठी मागे पडला होता. या रस्त्यावरची झाडे काढण्याबाबत कोर्टाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे. संबंधित यंत्रणांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
-सचिन मोरे, नागरिक
--
ही बाब न्यायप्रविष्ट आहे. मी माझे म्हणणे कोर्टात मांडले आहे. त्यामुळे जो निर्णय कोर्ट घेईल तो मला मान्य आहे. माझ्या म्हणण्यात तथ्य आहे, म्हणूनच गेल्या दहा वर्षांपासून कोर्ट माझे म्हणणे ऐकून घेत आहे. ज्याला जे म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी ते कोर्टात मांडावे.
-ऋषीकेश नाझरे, याचिकाकर्ते
--
गंगापूररोडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाडे लावण्यात आली आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात करणार आहोत. ८.५० लाख झाडांची गणतीदेखील पूर्ण झाली आहे.
-बी. यू. मोरे, उद्यान अधीक्षक, महापालिका
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट