म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्याच्या मधोमध येणारी झाडे काढण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने नाशिक महापालिकेला दिली आहे. या संधीचा फायदा घेत महापालिकेने रस्त्याच्या दुभाजकांमधील झाडेसुध्दा तोडण्याचा सपाटा लावला आहे. सिटीसेंटर मॉलसमोर दुभाजकांना लागून असलेले डेरेदार वृक्ष महापालिकेने काढले असून, याबाबत परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. त्यामुळे महापालिकेचे हे नेमके काय चाललेय, अशी विचारणा नागरिकांमधून विचारणा होत आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सर्वत्र रुंदीकरण करण्यात आले. शहराच्या बाहेरुन रिंग रोड साकारण्यात आले. हे रुंदीकरण करित असताना रस्त्याच्या मधोमध येणारी झाडे काढण्यास वृक्षप्रेमींकडून विरोध करण्यात आला. त्याबाबत कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे काढली जावीत अशी महापालिकेच्यावतीने कोर्टाला विनंती करण्यात आली. रस्त्याच्या मध्ये किती झाडे आहेत, याची माहीती घेऊन ती कोर्टाला सादर करावी, असे आदेश महापालिका आणि पर्यावरणवादी संस्थांना देण्यात आले. १ हजार १४५ झाडे रस्त्यात येत असून, ती काढावीत असे आदेश महापालिकेला देण्यात आले. या आदेशानुसार गंगापूर रोड, पेठरोड परिसरातील अनेक झाडे काढण्यात आली. याच संधीचा फायदा घेत सिटीसेंटर मॉलसमोरील दुभाजकांमध्ये असलेली झाडे रविवारी काढण्यात आली. ही झाडे काढली नसती, तरी चालू शकले असते. परंतु, उद्याचे दुखणे आजच काढून टाकू, असे म्हणत महापालिकेने या वृक्षांवरही घाव घातला. ही झाडे दोन्ही रस्त्यांच्या मध्ये असलेल्या दुभाजकांना लागून होती. याचा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. या वृक्षतोडीचा फायदा नागरिकांना नाही मात्र परिसरातील काही व्यावसायिकांना होणार असल्याने ही झाडे काढून टाकल्याची चर्चा परिसरात होती. या झाडांप्रमाणेच त्र्यंबकरोडवर असलेली काही झाडेदेखील कोणताही त्रास नसताना काढण्यात येत आहेत. सिंहस्थाच्या कालावधीत त्र्यंबकरोडचे रुंदीकरण करण्यात आले. यावेळी हा पूर्ण परिसर ओसाड करण्यात आला होता. उरलीसुरली काही झाडे रविवारी काढण्यात आली. या वृक्षतोडीबाबत नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. सध्या नाशिकचे तापमान ४१ अंश सेल्सियस इतके गेले आहे. या वृक्षतोडीचा फटका नागरिकांना बसणार असून, शहरातील तापमान आणखी जास्त वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील विविध मुख्य रस्ते, रिंगरोड इत्यादीच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे करताना काही रस्त्यांच्या दुतर्फा रुंदीकरणामध्ये सुमारे एक हजार १४५ झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे काढण्यासाठी प्रस्ताव सादर केला असता, ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. महापालिकेने यातील ७७० वृक्ष तसेच ठेऊन ३७५ झाडे काढण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
उच्च न्यायालयात नाशिक नागरी कृती समिती यांनी नाशिक महानगरपालिका व अन्य विभाग यांचे विरुध्द जनहीत याचिका (४१/२००६) दाखल केली होती. या जनहीत याचिकेत उच्च न्यायालयाने २ मे २०१४ रोजी नाशिक महानगरपालिकेस काही निर्देश दिले होते. त्यानुसार रस्त्याच्या दुतर्फा बाधित होणारी झाडे काढण्यासाठी उच्च न्यायालयात परवानगी करीता सिव्हिल अॅप्लिकेशन (क्र. ९६/२०१४) सादर केले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशांनुसार नाशिक महानगरपालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीचे गठण केले आहे. त्याचबरोबर रुंदीकरणातील काढावयाच्या झाडांच्या बदल्यात सुमारे २१ हजार इतक्या १० फूट उंचीच्या वृक्षांची लागवड केली आहे. उच्च तंत्रज्ञान वापरुन संगणकीय पध्दतीने मनपा क्षेत्रातील वृक्षांच्या गणनेचे काम प्रगतीपथावर असून सुमारे ८.५० लक्ष वृक्षांची गणना पूर्ण करण्यात आली आहे. याबाबत मनपाच्या nashik municipalcorporation या वेबसाईटवरील Tree census या लिंकवरून वृक्ष गणनेबाबत नागरिकांना माहिती मिळवता येणार आहे. तसेच सुमारे २३२ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. सहा सदस्य संख्या असलेली तज्ञ समिती गठीत केलेली आहे. अशाप्रकारे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची पूर्तता नाशिक मनपाने केलेले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये प्रत्याक्षात १ हजार १४५ झाडे बाधीत होऊन तोडणे प्रस्तावित होते. तथापि उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार फेरसर्वेक्षण करून यापैकी ७७० वृक्ष वाचविण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत ३७५ इतकीच झाडे काढण्यास सुरुवात केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट