बेशिस्त वाहनचालकांना आवर घालण्यासाठी वाहतूक शाखेने व्हिडीओग्राफीचे अस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये बेशिस्त वाहनचालकांचे थेट शूटिंग घेऊन पुरावा आणि पावतीच वाहनचालकांच्या घरी धाडण्यात येणार आहे. शहरात प्रथमच असा प्रयोग राबवला जाणार आहे.
बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांमार्फत सतत दंडात्मक कारवाई केली जाते. वर्षभरात अगदी दोन ते अडीच कोटी रुपये यातून वसूल केले जातात. मात्र, वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता त्याचा तितका फायदा होताना दिसत नाही. रस्ते वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने अपघात आणि वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना शहरवासीयांना तोंड द्यावे लागते. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की बेशिस्त वाहनचालकांना अटकाव घालण्यासाठी व्हिडीओ शूटिंगचा पर्याय वापरण्याचे ठरवले आहे. विशेषतः सिग्नल्स, तसेच काही महत्त्वपूर्ण चौकात याचा वापर केला जाणार आहे. पोलिसांतर्फे नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी या ठिकाणी व्हिडीओ शूट करतील. विशेषतः वाहनांचा क्रमांक आणि शक्य असल्यास चालकाचा चेहरा शूटिंगमध्ये येईल, याची काळजी घेण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास संबंधित वाहनाच्या क्रमांकावरून त्याचा पत्ता शोधण्यात येईल. प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने वाहन क्रमांकावरून चालकांच्या पत्त्यावर चलन पाठवले जाईल. चलनाची रक्कम वाहनचालकाने ठराविक दिवसात जमा केली नाही तर पुढील कार्यवाही केली जाईल, असे पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले. यामुळे ट्रिपल सीट, लेन कटिंग, सिग्नल जम्पिंग, झेब्रा क्रॉसिंग, ओव्हर स्पीड अशा अनेक प्रकारांना आळा बसू शकतो.
सीसीटीव्हींची रेंज दूरच!
शहरात मे महिन्याच्या सुरुवातीला सीसीटीव्ही कार्यान्वित होतील, असा दावा शहर पोलिसांकडून काही महिन्यांपूर्वी केला जात होता. मे महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असून, सीसीटीव्ही बसवण्याबाबत हालचाली दिसून येत नाहीत. सीसीटीव्ही कार्यान्वित झाल्यास वाहतूक समस्याच नाही तर थेट गुन्हेगारी घटनांवर फरक पडू शकतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट