जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत ६२.८७ दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ १६.८६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा एक टक्के कमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे ऐन मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील बारा मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी लाटीपाडा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर सुलवाडे या आठ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत उपयुक्त जलसाठा आहे. तर अमरावती, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी या चार प्रकल्पांत उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण नगण्य आहे. अक्कलपाडा वाडीशेवाडी प्रकल्पातून मार्च महिन्यात नदी काठावरील गावांसाठी पाणी सोडण्यात आले होते. अक्कलपाड्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ऐंशीपेक्षा अधिक तर वाडीशेवाडी प्रकल्पातील पाण्यामुळे वीसपेक्षा अधिक गावांची तहान भागली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील गावांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट