म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा बँकेच्या विरोधात फसवणुकीचा खटला दाखल करणाऱ्या महावितरण कंपनीलाच शॉक देण्याची तयारी बँकेने सुरू केली आहे. जिल्हा बँकेकडे जमा होणारा वीजबिलांचा भरणा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असतानाही महावितरणने जिल्हा बँकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कराराचा भंग झाला नसतानाही महावितरणने जिल्हा बँकेची बदनामी केली असल्याचा ठपका जिल्हा बँकेने ठेवला असून, आता महावितरणविरोधातच कारवाईची तयारी सुरू केली आहे. महावितरणने जिल्हा बँकेची बदनामी केली म्हणून जिल्हा बँकेकडून मानहानीचा खटला दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरण आणि जिल्हा बँकेतील संघर्ष वाढणार आहे.
नाशिक जिल्हा बँक सध्या आर्थिक अडचणीत असून, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासही पैसा नाही. जिल्हा बँकेकडे खाते असलेल्या शिक्षकांचे पगारही थकले आहे. त्यातच महावितरणच्या ग्राहकांचा वीजबिल भरणा जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये केला जातो. आर्थिक अडचणींमुळे जिल्हा बँकेकडे जमा झालेला ३३ कोटींचा वीजबिल भरणा बँकेला महावितरणाला वेळेत देता आला नाही. मार्च व एप्रिल अशा दोन महिन्यांची रक्कम थकल्याने महावितरण कंपनीने जिल्हा बँकेविरोधात थेट पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारेच जिल्हा बँक अध्यक्षांसह तिघांवर फसवणुकीचे दोन गुन्हे मुंबई नाका पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अडचणींत वाढ झाली आहे.
महावितरण आणि जिल्हा बँकेत झालेल्या करारानुसार महावितरणाचा भरणा जिल्हा बँकेला भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असल्याचा दावा जिल्हा बँकेने केला आहे. त्यामुळे करारानुसार पैसे चुकविण्यासाठी जिल्हा बँकेला अजून मुदत असतानाही महावितरणने उतावळेपणा करीत जिल्हा बँकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची बदनामी झाल्याचे सांगत अध्यक्ष नरेंद्र दराडे आणि सीईओ यशवंत शिरसाट यांनी बैठक घेऊन महावितरणविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महावितरणच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे.
...तर वसुली थांबवणार
जिल्हा बँकेने जिल्ह्यातील ७३ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत. एक हजार शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाईही सुरू केली आहे. जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी केला आहे. राज्य सरकारने जिल्हा बँकेला काही प्रमाणात आर्थिक मदत केली, तर शेतकऱ्यांकडील वसुली थांबवली जाईल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. त्यामुळे शासनाकडे आमचा पाठपुरावाही सुरू असल्याचा दावा दराडे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांची मंगळवारी भेट
जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळविण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ आतापर्यंत तीनदा मुुख्यमंत्र्यांकडे जाऊन आले. परंतु, मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ मिळत नसल्याने संचालक माघारी फिरले. संचालकांना भेटण्यासाठी शनिवारचा वेळ दिला होता. परंतु, शनिवारीही बोलावणे आले नाही. आता जिल्हा बँकेच्या संचालकांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंगळवारचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
०००
शिक्षकांचे उपोषण स्थगित
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सुमारे चार ते पाच महिन्यांपासून जिल्हा बँकेत शिक्षकांचे अडकून पडलेले वेतन मिळावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांतर्फे जिल्हा बँकेसमोर सुरू असणारे बेमुदत उपोषण आश्वासनाअंती अखेर स्थगित करण्यात आले आहे.
आमदार सुधीर तांबे यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनाही ते भेटले. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी येत्या आठ दिवसांत रखडलेले वेतन राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी हे उपोषण सध्या स्थगित केले आहे.
शिक्षक कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या या वेतनामुळे आयकर विभागाचे चेक, पॉलिसी, गृहकर्ज आदींचे हप्ते, शालेय पोषण आहाराची रक्कम आदी व्यवहार ठप्प झाले आहेत. घरातील आजारपण, लग्नकार्य, शालेय प्रवेश आदी गरजेच्या कामांसाठीही शिक्षकांची परवड होते आहे. या मुद्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही शिक्षकांच्या हाती केवळ आश्वासनेच पडली आहेत. त्यामुळे ४ एप्रिलपासून विविध संघटनांनी एक होत बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, शनिवारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या भेटीनंतर शिक्षकांनी हे उपोषण स्थगित केले आहे. यावेळी आमदार डॉ. तांबे यांच्यासह कोंडाजीमामा आव्हाड, फिरोज बादशहा, सायली कुलकर्णी, तारा घोटेकर, स्नेहल आपटे, संजय पाटील, बी. के. सानप, किशोर पालखेडकर, आर. टी. जाधव आदी उपस्थित होते.
या उपोषणात शशांक मदाने, आर. डी. निकम, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, दिनेश अहिरे, नीलेश ठाकूर, सुभाष भामरे, अरुण जाधव आदींनी सहभाग घेतला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट