Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तिबेटियन मार्केटमध्ये आयटी सेंटर करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात आयटीला प्रोत्साहन देण्यासाठी तिबेटियन मार्केटची जागा आयटी पार्कसाठी द्यावी, अशी मागणी आयटी उद्योजकांनी महापौरांकडे केली आहे. निपमचे श्रीधर व्यवहारे यांनी महापौर रंजना भानसी यांना प्रस्ताव दिला असून, ठाणे येथील वागळे इस्टेटच्या धर्तीवर महापालिकेने आयटी उद्योगांसाठी सवलती द्याव्यात अशी मागणी केली आहे.

शहरात उद्योग स्थिरावण्यासाठी महापालिका हवे ते सहकार्य करेल, असे आश्वासन महापौरांनी दिले आहे. दरम्यान व्यवहारे यांच्या मागणीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एमआयडीसीतील आयटी उद्योजकांनी पालिका मुख्यालयात भानसी यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, आयटी विभागाचे प्रमुख प्रशांत मगर, निपमचे श्रीधर व्यवहारे, मुक्त विद्यापीठाचे आयटी विभागाचे माजी संचालक डॉ. आर. एस. तिवारी, चेतना कामळसकर आदी उपस्थित होते.

व्यवहारे म्हणाले, की आयटी उद्योगासाठी महापालिकेने सवलत दिल्यास रोजगाराला चालना मिळेल. ठाणे महापालिकेने वागळे इस्टेटमध्ये या उद्योगांसाठी सवलत दिल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. शहरातील तिबेटियन मार्केटमध्ये महापालिका शॉपिंग मॉल उभारत आहे. त्याऐवजी महापालिकेने ही जागा आयटी उद्योजकांना दिल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला आहे. ‘मेक इन नाशिक’ या प्रोजेक्टमध्ये त्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे व्यवहारे यांच्या मागणीवरून शहरात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरामुक्तीसाठी पुढाकार...

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छतेच्या बाबतीत देशात १५१ व्या क्रमांकावर असलेल्या नाशिकला अग्रस्थानी नेण्यासाठी आता नाशिककरांनीच पुढाकार घेतला आहे. मटा सिटिझन रिपोर्टर अॅपद्वारे नाशिककरांनी शहराच्या विविध भागातील कचऱ्याच्या ठिकाणांचे सचित्र वृत्त पाठविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी त्याचा प्रत्यय आला.

केंद्र सरकारतर्फे नुकतेच राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात नाशिकचा क्रमांक १५१ वा आहे. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत नाशिककरही आग्रही असून, शहराला स्वच्छ बनविण्याचा निर्धार आता करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या विविध भागातील आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचऱ्याचे फोटो ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ या अॅपद्वारे पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘मटा’नेच पुढाकार घेत ‘माझं नाशिक, स्वच्छ नाशिक’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. पहिल्याच दिवशी नाशिककरांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला आहे. या अॅपद्वारे पाठविल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणांची माहिती संबंधित सिटिझन रिपोर्टरच्या नावासह ‘मटा’मध्ये प्रसिद्ध केली जात आहे. या ठिकाणांबाबत महापालिकेकडेही पाठपुरावा केला जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याची ही ठिकाणे गायब होऊन नाशिक स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे.

--

तुम्हीही पाठवा फोटो...

गुगल प्ले स्टोअरवर ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ हे अॅप विनामूल्य उपलब्ध आहे. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर आपल्या भागातील कचऱ्याचा फोटो आणि त्याची माहिती अगदी व्हॉट्सअॅपप्रमाणे सहजच पाठविणे शक्य होते. विशेष म्हणजे, ही माहिती मराठीत टाइप करून पाठविण्याची सुविधाही अॅपमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा फायदा नाशिककर मोठ्या प्रमाणात घेत आहेत.

--

कचऱ्यामुळे डुकरांचा वावर

नाशिकरोड येथील गांधीनगर भागातील मैदानावर कचरा पसरलेला असून, त्यामुळे डुकरांचा वावर वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने यासंदर्भात पुरेशी दक्षता घेण्याची गरज आहे.

-तेजस शेरताटे

--

फलकालाच कचऱ्याचा वेढा

स्वारबाबानगर, सातपूर येथील हा फोटो आहे. येथे कचरा टाकू नये असा फलक महापालिकेने या ठिकाणी लावलेला आहे. मात्र, या फलकाभोवतीच कचरा टाकला जात आहे. महापालिका याची दखल घेऊन कारवाई का करीत नाही?

-चंद्रकांत महाले

--

चला करूया शहर स्वच्छ...

स्वच्छ व सुंदर शहराचा नाशिकचा लौकिक कायम राखण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन ‘मटा’तर्फे नाशिककरांना केले जात आहे. वाचकांनी ‘मटा सिट‌िझन रिपोर्टर’ या अॅपच्या माध्यमातून शहरातील अस्वच्छतेचे फोटो, त्याचे नेमके ठिकाण व इतर माहितीसह आमच्याकडे पाठवायचे आहेत. हे फोटो, तसेच संबंध‌ित मजकूर ‘मटा’मध्ये प्रसिद्ध केला जाईल. समस्या सोडविण्यासाठीचा पाठपुरावाही महापालिका व संबंध‌ित यंत्रणेकडे केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजीनामे घ्या, पण बँक वाचवा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी बँक वाचविण्यासाठी थेट राजीनाम्याची ऑफर पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांपुढे ठेवली आहे. आमचे राजीनामे घ्या, पण काहीही करून जिल्हा बँक वाचवा असे आर्जव त्यांनी पालकमंत्र्यांना केले आहे. पालकमंत्र्यांनीही रात्री उशिरा संचालक मंडळाची मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, संचालक पुन्हा भेटीविनाच परतले आहेत.
जिल्हा बँकेला आर्थिक स्वरुपात मदत मिळावी, यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह संचालक हे दोन आठवड्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत तीनदा संचालक मुख्यमंत्र्यांच्या भेटीविना माघारी परतले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांची बँक वाचविण्यासाठी संचालक मंडळ आता मेटाकुटीला आले असून, त्यांनी आता संचालकपदाचे राजीनामेही देण्याची तयारी पालकमंत्र्यांकडे दर्शवली आहे. आमचे राजीनामे घ्या, पण बँक वाचवा, अशी विनंती त्यांनी पालकमंत्र्यांना
केली आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अध्यक्ष दराडे यांच्यासह माजी आमदार माणिकराव कोकाटे, गणपतराव पाटील, परवेझ कोकणी मुंबईत तळ
ठोकून होते.

मुख्यमंत्री भेटलेच नाहीत

जिल्हा बँक संचालकांना भेट देण्याचे आश्वासन देऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारीही भेटले नाहीत. चौथ्यांदा जिल्हा बँकेचे संचालक रिकाम्या हातीच परतले आहेत. यामुळे शेतकऱ्यांप्रती मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलता दिसून येत आहे. आज, बुधवारी सुटी असल्याने आता गुरुवारी मुख्यमंत्री भेटीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडच्या रस्त्यांवर मनोरंजनाची पर्वणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोडकरांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ उपक्रम रविवार, १४ मे रोजी नाशिकरोड येथे रंगणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या अनोख्या उपक्रमात डान्स, म्युझिक, खेळ या सगळ्यांची धमाल करता येणार आहे. बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळेपर्यंत तुम्हाला आनंदाचा सर्वोच्च क्षण अनुभवता येणार आहे.

‘हॅप्पी स्ट्रीट्स’ वर सकाळी साडेसहा ते साडेनऊ हे या वेळेत सर्व वयोगटांतील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. आठवडाभराच्या टेन्शनमधून तुम्हाला रिलॅक्स करणारी ही ट्रीट ठरणार आहे. नवीन डान्स अॅकेडमीतर्फे झुम्बा सादर केला जाणार आहे. सकाळी साडेसात वाजता बिटको पॉइंट येथील स्टेजवर डान्सचे सादरीकरण होईल. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची नावनोंदणी करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत जेलरोडवर उपस्थित राहायचे आहे. एकूणच काय टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्ह‌िट‌िजमध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. यावेळेत बिटको सर्कल ते कोठारी कन्या शाळेदरम्यानचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे.

नाशिकरोड येथे होणाऱ्या हॅपी स्ट्रीटमध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉप‌िंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहेत. या वेळी उपस्थितांना हे प्रकार करुन घेता येतील. यावेळचे खास आकर्षण राहुल आंबेकर यांचा रॉक बॅन्ड शो आहे. यावेळी इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकार सादर केले जाणार आहेत. सध्या कॅलिग्राफीकडेही आकर्षण वाढते आहे. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार आहे. त्याचप्रमाणे ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्य़ा साधनांचा वापर करायचा, याची माह‌िती देणार आहे. मोहन उपासनी व रवींद्र जोशी हे बासरीवादन करणार आहेत. अनिकेत जाधव रॉक बँड शो सादर करणार आहे. हर्षल जाधव हे ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहेत. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण यावेळीही गिटार वादन करणार असून यावेळी जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहे. निलेश हे टॅटू आर्टीस्ट उपस्थितांना टेम्पररी टॅटू काढून देणार आहे. निधी अग्रवाल व त्यांच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी स्ट्रीट पेन्टींग करणार आहे. नविन तोलानी यांचा ग्रुप ग्रुप डान्स सादर करणार असून यावेळी वेस्टन व बॉल‌िवूड डान्समधील नवीन प्रकार हे आकर्षणाचे केंद्रब‌िंदू ठरणार आहे. ‘मटा’च्या उपक्रमाला नाशिकरोडच्या वाचकांनी नेहमीच भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यावेळीदेखील असाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ‘मटा’तर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायखेडा पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या ऑगस्ट महिन्यात गोदावरीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या परिसराची वाताहत झाली होती. त्यावेळी गोदाकाठ भागातील २० ते २२ गावे आणि सिन्नरला जोडणारा हा गोदावरी नदीवरील सायखेडा येथील पूल खचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. तेव्हापासून या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली. मात्र असे असूनही या पुलावरून सध्या मालट्रकसारखे अनेक अवजड वाहने रोज ये-जा करीत आहेत. यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या पुलावरील अवजड वाहतुकीकडे पोलिसही दुर्लक्ष करीत आहेत.

सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम १९६५ साली पूर्ण झाले. तेव्हापासून ५२ वर्ष हा पूल सुरू आहे. अनेक महापूर अंगाखांद्यावर घेणारा हा पूल खचल्याचे वास्तव मागील वर्षी महापुरात समोर आले. महाड दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाने या पुलाची पाहणी केली. त्यानुसार हा पूल धोकादायक असून या पुलाची ९ पैकी ३ गाळे तरंगत्या अवस्थेत आहेत.

तेव्हापासून या पुलावरून जड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. परंतु सायखेडा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या पुलावरून जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाने साडेतीन कोटी मंजूर केले आहेत. मागील वर्षी गोदावरीला महापूर आल्यानंतर या पुलाची स्थिती कमकुवत झाली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या पुलाचा पाया वाळूखाली ८ मीटर खोल पूर्ण उघडा पडला असून यातील तीन खांब चक्क पाण्यात तरंगत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष

या पुलाच्या जागी नवीन पूल व्हावा असा प्रस्ताव सरकार दरबारी पाठव‌िण्यात आला होता. सायखेड्याच्या ग्रामस्थानी या प्रश्नावर अनेक निवेदने दिली. प्रत्यक्ष भेट घेतली या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याकामी जागेच्या प्रचंड अडचणी येत असल्याची बाब सरकार दरबारी निदर्शनास आली आहे त्यामुळे हा जुना पूल अत्यन्त चांगल्या बांधणीने दुरुस्त करून त्यास नवीन रूप देणे हाच पर्याय उभा राहताना दिसत असून या पुलाच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर झाले असून, पावसाळ्यापूर्वी या कामाला प्रारंभ झाल्यास या पुलाचा धोका टळू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी रंगणार आज माघारनाट्य

0
0

आज शेवटचा दिवस; ३० पेक्षा अधिक अर्ज अवैध

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अर्जांच्या छाननी प्रकियेनंतर येथील महापालिकेच्या ८४ जागांसाठी एकूण ५३३ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी उशिरापर्यंत सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे छाननी प्रक्रिया पार पडली. छाननी प्रकियेनंतर ३० पेक्षा अधिक अर्ज अवैध ठरले आहेत. निवडणूक रिंगणात एकूण ५३३ उमेदवार राहिले असून बुधवारी (दि.११) होणाऱ्या माघारीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सोमवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्जांवर हरकत घेण्याची मुदत होती. या हरकतींवर सायंकाळी उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. बहुतांश इच्छुकांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरव‌िण्यात आले. तसेच अनेक उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यामुळे उमेदवारांनी लेखी दिलेल्या प्रभागातील अर्ज कायम ठेवून अन्य अर्ज बाद करण्यात आले. दुबार अर्जांची संख्या जास्त असल्याने अर्ज छाननी प्रक्रियेला खूप वेळ लागला. तसेच काही हरकतींवर मंगळवारी सुनावणी होवून निर्णय देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे चुकवणे जीवावर बेतले

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्यावर महिन्द्रा पिकअप मालवाहू गाडी (एमएच १८/एए ७५२१) पिंपळनेरहून साक्रीकडे जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना समोरील अॅपे रिक्षावर (एमएच १८/१९३६) वर आदळली. त्याचवेळी पिकअपच्या मागे भरधाव येणारी विनाक्रमांकाची मोटारसायकल पिकअप गाडीवर आदळली.


मोटारसायकलचे पेट्रोल बाहेर आल्याने काही क्षणातच मोटारसायकलसह पिकअपला आगीने वेढले. यात मोटारसायकलवरील संतोष प्रकाश डांबरे (वय २५), एकनाथ अप्पा माळीच (३५, दोन्ही रा. चिकसे ता. साक्री) आणि अॅपे रिक्षामधील संतोष नाना मोरे (६५), वसंत राघो अहिरराव (६८, रा. धाडणे, ता. साक्री) हे मृत्युमुखी पडले. जखमींमध्ये वंदना उत्तम बोरसे (वय ३५), मंगलाबाई वसंत गायकवाड (४०), सयाजी कैलास पवार (१२), उत्तम मन्साराम बोरसे (४५), जिभाऊ मालजी पवार (४०), जंगलू रामजी मालचे (४०), अविनाश भटू भदाणे (३२, सर्व रा. धाडणे ता. साक्री) यांचा समावेश आहे.


वधू-वर जखमी

दुसरी घटना शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ घडली. टाटा सुमो वाहन ट्रकवर आदळल्याने सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले, तर आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वर आणि वधूचा समावेश आहे. या अपघातात साजिदाबानो मुमताज अली (वय१७, रा. अजमेरानगर, चाळीसगाव रोड), जमिनाबानो रज्जब अली (३५, रा. तला मशिदीजवळ वडजाई रोड), रोजीनाबानो युनूस अन्सारी (१२ रा.फिरदोसनगर तिरंगा चौक), आमिन अहमद रज्जब अली (रा.फिरदोसनगर तिरंगाचौक), अदनान कलीम अन्सारी (८, फिरदोसनगर तिरंगाचौक) सर्वजण धुळे शहरातील राहणारे आहेत. जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खत प्रकल्पावर प्लास्टिकपासून इंधननिर्मिती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराची कोंडी करणाऱ्या खत प्रकल्पाची साडेसाती संपविणाऱ्या मेलहॅम आयकॉस या कंपनीने आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, खत प्रकल्पावरील प्लास्टिकपासून इंधननिर्मितीचा प्रस्ताव पालिकेला दिला आहे. नाशिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या एसपीव्ही कंपनीच्या अंतर्गत हा प्रस्ताव पालिकेला सादर केला आहे. वर्षभरात हा प्रस्ताव कार्यान्वित करून प्लास्टिकपासून निर्मिती होणारे इंधन हे पालिकेच्या डिझेल शवदाहिनीसाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या डिझेल शवदाहिनीवर होणारा खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे यासाठी संबंधित कंपनी पालिकेकडून एक रुपयाही मदत घेणार नाही. त्यामुळे पालिकेच्या खर्चातही बचत होऊन प्लास्टिकपासून होणारे प्रदूषणही कमी होणार आहे.

नाशिकची डोकेदुखी ठरलेला पाथर्डी येथील खतप्रकल्प हा पुण्याच्या मेलहॅम आयकॉस या कंपनीने तीस वर्षांसाठी चालविण्यास घेतला आहे. या कंपनीने खत प्रकल्प पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित केला असून, कचऱ्याचे ढीग कमी होण्यास मदत झाली आहे, तसेच येथे साठलेल्या कचऱ्याचे कॅपिंग करून दुर्गंधी कमी होण्यास मदत होत आहे. या खत प्रकल्पावर कचऱ्यासोबतच मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकही येते. या प्लास्टिकवर येथे प्रक्रिया करता येत नसल्याने कचरावेचक महिला येथील प्लास्टिक गोळा करून ते शहरात विकतात. त्यामुळे शहरातील प्लास्टिकचा कचरा पुन्हा शहरात परत जात असल्याने पालिकेचीच डोकेदुखी वाढली आहे.

प्लास्टिक कचऱ्याची ही डोकेदुखी आता वर्षभरातच कमी होणार आहे. मेलहॅम आयकॉस या कंपनीअंतर्गत तयार झालेल्या नाशिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या एसपीव्ही कंपनीने पालिकेला नवीन प्रस्ताव दिला आहे. खत प्रकल्पावर जमा होणाऱ्या प्लास्टिकपासून इंधन तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून, प्लास्टिकपासून तयार होणारे इंधन पालिकेच्या अमरधाममध्ये असलेल्या डिझेल शवदाहिनीसाठी वापरले जाणार आहे. त्यासाठी कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून, ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या खर्चातही बचत होणार आहे. खत प्रकल्पावर यापूर्वीच ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प जीआयझेड कंपनीकडून साकारला जात आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे.

मानांकन सुधारणार

स्वच्छ शहरांसाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नाशिकचे मानांकन १५१ वर घसरले आहे. खत प्रकल्प बंद असल्याचा फटका बसला होता. मात्र, आता पुढील वर्षात होणाऱ्या सर्वेक्षणात खत प्रकल्पामुळे नाशिकचे मानांकन सुधारणार आहे. त्यासाठीचे नियोजन पालिकेने आतापासूनच केल्याचा दावा आयुक्त कृष्णा यांनी केला आहे.

प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करण्याचा प्रस्ताव नाशिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने पालिकेला दिला आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून, त्यातून तयार होणारे इंधन डिझेल शवदाहिनीसाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भोवऱ्याची धार ते व्याख्यानमाला

0
0

धनंजय गोवर्धने, चित्रकार

लहानपणी मे महिन्याची सुटी म्हणजे आनंद असे. तेव्हा सुटीत मनसोक्त खेळायला मिळणार याचा आनंद असे. तेव्हा फक्त जेवायला घरी जायचो. गोट्या, गिज्या (काड्यापेटीवरची चित्रं), सिगारेटची रिकामी पाक‌िटं, अंपल-चंपल, आंब्याच्या वाळलेल्या कोयी, भोवरे हे खेळ होते. भोवऱ्याला धार लावण्याची कानस माझ्याकडे होती त्यामुळे मित्रांच्या भोवऱ्याला धार लावून देण्याचा कार्यक्रम सुट्टीत ठरलेला. डबे घेऊन मित्रांसह सोमेश्वर, तपोवन किंवा शिवाजी उद्यानात जायचं असं ठरलेलं असे. पण थोडा मोठा झाल्यानंतर म्हणजे सातवीनंतरची सुटी काहीतरी शिकण्यासाठी पर्वणी असा विचार करून दरवर्षी सुटीत काहीतरी नवीन शिकत राह‌िलो. एके वर्षी गंगेवरती अहिल्याराम व्यायामशाळेत दीक्षित गुरूजींकडून सूर्यनमस्कार आणि योगासने शिकलो. लाठी चालविणेही शिकलो. पेठे हायस्कूलमध्ये असतानाही मे महिन्यात खूप नवे शिकायला मिळाले. एके वर्षी मेनरोडवरच्या गाडगीळ ब्रदर्स यांच्या दुकानामागील छापखात्यात बुकबाईंडिंग शिकता आले. मागील वर्षीच्या वह्यांमधील कोरी पाने फाडून त्यांची शिलाई करायची, बाईंडिंग क्लॉथला चरस लावताना त्याचा उग्र वास नाकात शिरायचा, त्रास व्हायचा पण नवे शिकत असल्याचा आनंद मोठा होता. त्यामुळे जुन्या पानांची एक जाडजूड वही शाळेत आणता येई आणि ही रफ वही गणित सोडविताना उपयोगी पडे. तेव्हा सायकल आणि स्टोव्हचा काळ होता. शाळेतल्या कार्यशाळेमध्ये स्टोव्हची दुरूस्ती आणि सायकलचे पंक्चर काढायला आम्हाला शिकविले होते. त्यामुळे आई स्वयंपाक करत असताना स्टोव्हचे नेपल बदलण्यापासून तर वायसर बदलण्यापर्यंतचे काम जमत होते. आईला मदत करायला आनंद वाटे. तेव्हा मे महिन्यात यशवंतराव महाराज पटांगणावर खळाळत्या गोदामाईच्या साक्षीने होणाऱ्या व्याख्यानमालेत तेव्हाचे दिग्गज विचारवंत, लेखक, साहित्यिक, अभिनेते, नेते या सर्वांना समक्ष अगदी जवळून बघण्याची पर्वणी आम्हा मुलांना असे. या सर्व दिग्गजांची छोट्याशा डायरीत स्वाक्षरी घेणे अन् गोड आठवण म्हणून ती जपून ठेवण्याचा आनंदही निराळाच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाला प्रतीक्षा वीज जोडणीची!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागात वीज जोडणीसाठी अर्जधारक ५७ हजार ४४८ पैकी केवळ ९ हजार ६१६ इतक्याच शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने वीज जोडणी दिली आहे. उर्वरित तब्बल ४७ हजार ८३२ शेतकरी वीज पुरवठ्यापासून वंचित आहेत.

विभागीय कृषी सहसंचालकांनी सादर केलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील हजारो शेतकरी वर्षभरापासून अधिकृत वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. नाशिक जिल्ह्यात ३ लाख १२ हजार व नगर जिल्ह्यात ३ लाख ५७ हजार पंप जोडण्यांची संख्या आहे.

विहिरी, बोअरवेलकडे कल

विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये वारंवार पाणीटंचाई निर्माण होत आहे. परिणामी शेतकरी शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी विहिरी व बोअरवेलचा आधार घेत आहे. नव्याने विहिरी व बोअरवेलची संख्या भरमसाट वाढल्याने वीज जोडणीसाठी अर्जांची संख्याही वाढत आहे. परंतु, त्या प्रमाणात वीज जोडण्या देण्यात आलेल्या नाहीत. प्रलंबित अर्जांपैकी तब्बल ३९ हजार ९८९ अर्ज ३१ मार्च २०१६ पूर्वीचे आहेत. यातील १९ हजार ३४ शेतकरी एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत.

विभागातील कृषी पंप वीज जोडणी
विभागातील पाच जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. ३१ मार्च २०१६ पर्यंत १९ हजार ३४ व त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंतचे पाच हजार २२७ अशा एकूण २४ हजार २६१ शेतकऱ्यांनी महावितरणकडे वीज जोडणीसाठीची सुरक्षा अनामत रक्कम जमा केली आहे. मात्र, त्यापैकी केवळ तीन हजार ६९० शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून तब्बल २० हजार ५७१ शेतकरी अजूनही वेटिंगवर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा

0
0



म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाची वाढलेली तीव्रता आणि पाण्याचा कमी झालेला साठा यांच्यामुळे केवळ धरण परिसरातच भाजीपाला पिके घेतली जात आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणारा भाजीपाला त्र्यंबकेश्वर, दिंडोरी व इगतपुरी या तालुक्यातील गावांमधूनच येत आहे. इतर तालुक्यातील फळांच्या बागांसाठीच पाणी पुरविण्याचा वेळ येत असल्याने भाजीपाला उन्हाळी हंगामात पिके घेतली जात नाहीत.

उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासते. नेमक्या याच वेळी विहिरी आणि बोअरवेल यांच्या पाणी कमी पडते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सिंचनाची मोठी समस्या निर्माण होते. कालव्याखाली असलेल्या पिकांना मिळणाऱ्या पाण्याचे आवर्तनांमधील कालावधी मोठा असल्याने कालव्याच्या भरोशावर भाजीपाल्यासारखी पिके घेता येत नाहीत. त्यामुळे धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात उन्हाळ्यात भाजीपाल्याची पिके घेतली जातात.

उन्हाळ्यात तीव्र ऊन आणि वारा यांच्यामुळे फुल आणि कळी यांची गळ वाढते. ही गळ उत्पादनात घट आणते. उत्पादन कमी झाल्यामुळे सहाजिक भाजीपाल्याची आवक घटते. मागणी वाढलेली असल्याने बाजारभावांमध्ये वाढ होते. नाशिक बाजार समितीत शनिवारी फळभाज्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असल्याने शुक्रवार आणि रविवार फळभाज्यांची आवक प्रचंड वाढते. तेव्हा फळभाज्यांच्या दर खाली येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक, मोबाइल चोरीचे सत्र थांबेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

रस्त्यावर लावलेल्या मोटारसायकल बोलता-बोलता गायब होण्याच्या घटना शहरात वाढत आहेत. शिवाय भरधाव येणारे चोरटे गाडीवरून येणारे पादचाऱ्यांच्या मोबाइललाही लक्ष करत असल्याच्या घटना घडत आहेत. शहरात बुधवारी विविध ठिकाणाहून तीन मोटारसायकल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या. महात्मानगर येथे नागरिकांनी एक मोबाइल चोरटा पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

शहरात काही दिवसांपासून चोरट्यांची वरचेवर हातसफाई वेगाने सुरू आहे. विविध ठिकाणाहूंन यात तीन दुचाकी लक्ष्य ठरल्या. उमेश निवळ यांची भद्रकालीतील फाळकेरोड परिसरात उभी केलेली काळ्या रंगाची ‌हिरो होंडा मोटारसायकल रात्री नऊ वाजेदरम्यान चोरट्यांनी चोरून नेली. भद्रकाली पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. तर भाऊसाहेब बोराडे यांचीही हिरो होंडा स्प्लेंडर ही दुचाकी नाशिकरोड येथील साई संचित रुग्णालयातील पार्किंगमधून महिनाभरापूर्वी चोरट्यांनी नेली होती. याप्रकरणी मंगळवारी उपनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. तर पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरातील अमित सुभाष चव्हाण यांची बजाज मोटारसायकल चोरीला गेली. पंचवटी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल चोरटा ताब्यात

महात्मानगर येथील रहिवासी सारंग पाटील हे मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमाराला घराजवळील परिसरात मोबाइलवर बोलत असताना मागून बाइकवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. यावेळी पाटील यांच्यासह काही नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील तुळशीराम काशीनाथ चौधरी (२६, शांतीनगी झोपडपट्टी) हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचा दुसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. तुळशीदासकडून सॅमसंग कंपनीचा मोबाइल व बाइक ताब्यात घेण्यात आली.

कॉम्प्युटर चोरांना कोठडी

देवळाली कॅम्प : शताब्दी पॉलिटेक्निक कॉलेजमधून २५ कॉम्प्युटर्सची चोरी करणाऱ्या पाच तरुणांना कोर्टाने गुरूवारपर्यंतची (दि. ११) पोलिस कोठडी सुनावली. या तरुणांनी यापूर्वीही कॉलेजमध्ये चोरी केली आहे काय, याचा पोलिस शोध घेत आहेत. आकाश शिंदे, सुनील गोरे, किरण सोनवणे, प्रसाद दळवी व विशाल उगले अशी पाचही संशयित तरुणांची नावे आहेत. ते सर्व जण २० वर्षांचे आहेत. यातील प्रसाद वगळता अन्य चौघे जण शताब्दी पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत. प्रसाद सिन्नरमधील विजयनगर येथील रहिवाशी आहेत.

पैशांसाठी विवाहितांचा छळ

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विवाहितांकडे सासरच्या लोकांनी पैशांची मागणी करून त्यांच्याजवळील दागिने व धन काढून घेतले, याप्रकरणी इंदिरानगर आणि अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नवीन नाशिक परिसरातील एका घटनेत जयश्री हंसराज पवार यांनी अंबड पोलिसात फिर्याद दिली आहे. पती हंसराज व सासरच्या सर्व नातेवाइकांनी वेळोवेळी पैशांसाठी शारिरीक व मानसिक छळ करून जवळचे दागिने काढून घेतल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वडाळा गावातील नाझिया परवेझ अन्सारी यांनी इंदिरानगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पती परवेझ व सासरच्या सर्व नातेवाइकांनी किरकोळ कारणांवरून निमित्त शोधत वेळोवेळी नाझिया यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे मिळविण्यासाठी त्यांचा शारिरीक व मानसिक छळही केला. त्यांच्याकडून दागिनेही काढून घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ओव्हरटेक केल्याने काकू-पुतण्यास मारहाण

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव चौफुलीजवळ दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एका इर्टिका कारला पांढऱ्या रंगाच्या मारुती कारने ओव्हरटेक केले. यानंतर इर्टिकामधील चालक आणि इतर सात जणांनी मारुती कारमधील सागर पालवे व त्यांच्या काकूस शिवीगाळ करत गाडीवर हल्ला केला. पालवे व त्यांच्या काकूच्या डोक्यात दगड मारून यांना जखमी केले. काकूंची दहा तोळे तर सागर यांची सहा तोळे अशी एकूण १६ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची तक्रार सागर पालवे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुडणाऱ्या मायलेकाला पोलिसांनी वाचविले

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आवर्तनाचे पाणी पाटाने जात असताना पालखेड पाटात बुडणाऱ्या दोन वर्षाच्या मुलासह आईला गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांनी जिवाची पर्वा न करता वाचवले. पोलिसांच्या या समयसूचकतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून गेल्या आठवड्यात पाच मेपासून येवला शहराला पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. पाणी चोरी होऊ नये, म्हणून पाटावर पोलिसांचा जागता पहारा आहे. दावचवाडी-पालखेड दरम्यान पाटाच्या दुरुस्तीचेही काम सुरू आहे. या कामासाठी पाटालगत तात्पुरता संसार मांडून काही मजूर रोज काम करीत आहेत. सिध्दपिंप्री येथील मजुरांचे कुटुंब या दावचवाडी-पालखेड गटाच्या कामासाठी आले आहे. या मजुरांच्या कुटुंबांपैकी मंगला देवीदास जाधव आपला दोन वर्षांचा ओमसोबत पाटावर पाणी घेण्यासाठी हंडा घेऊन आल्या. हंडा भरत असतांना ओम अचानक पाय घसरून पाटाच्या वाहत्या पाण्यात पडल्याचे मंगला यांच्या लक्षात आले. पोहता येत नसतानाही केवळ मुलाला वाचविण्यासाठी आईने वाहत्या पाण्यात उडी घेतली. मात्र, नंतर त्या मदतीसाठी आक्रोश करू लागल्या. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचारी विकास वाळुंज यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाटात उडी मारली. पाठोपाठ शिरीष गांगुर्डे यांनीही मायलेकाराला वाचविण्यासाठी आपल्या आपल्या सहकाऱ्याच्या मदतीसाठी पाण्यात उडी मारली. त्या दोघांनी मंगला आणि ओम यांना सुखरूप बाहेर काढले.

जणू देवदूतच अवतरले

पोलिसांच्या रूपाने जणू देवदूत मदतीला धावून आल्याची भावना जाधव कुटुंबीयांनी घटनेनंतर व्यक्त केली. पाणीचोरी रोखण्यासाठी ड्युटीवर असलेल्या या कर्मचाऱ्यांनी वेळेचे गांभीर्य ओळखत केलेल्या प्रयत्नांचे परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयुष्याच्या सायंकाळी कौटुंबिक मतभेदांमुळे स्वतंत्र राहणाऱ्या ज्येष्ठाचे सर्वस्व लुटून मुजोरी करणाऱ्या पाच भामट्यांविरोधात अखेरीला तीन वर्षांनंतर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पैकी आरोपीला अटकही करण्यात आली असून त्यास बुधवारी कोर्टात हजर केले होते.

ज्येष्ठाची लाखो रुपयांची फसवणूक करून त्यांना घर, दागिने, पैसे आदी ऐवजांना गंडा घातल्याप्रकरणी दिगंबर भागुजी आव्हाड (अशोका मार्ग, साई मंदिराच्या समोर, नाशिकरोड) मोहिनी मैंद उर्फ नलिनी बहिवाल (उपनगर), जगदीश भोईर, सचिन आबड, पंढरीनाथ गिते या पाच जणांच्या विरोधात गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याबाबत ‘मटा’ने ६ फेब्रुवारी २०१६ रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. याबाबत हकीकत अशी की, गंगापूर रोडवरील नरसिंह नगरमध्ये दामोदर नारायण जोशी (८०) हे ज्येष्ठ कौटुंबिक मतभेदांमुळे एकटे राहतात. ते एलआयसीतून अधिकारी पदावरून निवृत्त झाले. वयोमानामुळे कामे होत नसल्याने त्यांना घरात मदतनीसाची गरज भासली. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रातून जाहीरातीद्वारे ‘घरकामासाठी बाई पाहिजे’ असा मजकूर प्रसिध्द केला. यानंतर कामासाठी काही इच्छुक महिला भेटून गेल्यानंतर एके दिवशी दिगंबर आव्हाड नावाच्या व्यक्तीने जोशी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधत आपल्या जाहिरातीतील अपेक्षांनुसार घरकामास महिला पाठवत असल्याचे सांगितले. त्या महिलेस जोशी यांनी परत पाठविल्यानंतर काही दिवसांनी आव्हाड हा जोशींकडे आला. जेवणाचे निमित्त करून तो त्यांना चारचाकीतून उपनगर येथील एका इमारतीत घेऊन गेला. तेथे त्यांना इतर आरोपींच्या सहाय्याने खोलीत डांबून ठेवत मारहाण सुरू ठेवली. चार महिन्यांच्या कोंडीनंतर एके रात्री दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन जोशी यांनी सुटका करून घेतली. मात्र, दरम्यानच्या कालावधीत त्यांच्याकडून घराच्या चाव्या, घराची कागदपत्रे आदी चीजवस्तू त्यांच्याकडून काढून घेण्यात भामटे यशस्वी झाले. यात १८ लाख ५५ हजार रुपये, दोन लाख रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिणे, २० हजार रुपयांचे चांदीचे भांडे, घराची कागदपत्रे, पॅनकार्ड, पासबुक, आधारकार्ड , एफडीच्या पावत्या आदी वस्तू भामट्यांनी लुबाडल्या. या प्रकरणी पोलिसात आपबिती सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास त्यावेळी टाळाटाळ झाली होती. दरम्यान, या प्रकरणी तपासातून आरोपींचे आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे. तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक पाडवी हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रीचे भारनियमन रद्द

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव गावठाण व शेती शिवार परिसरात महावितरण कंपनीच्या वतीने मध्यरात्री सुरू केलेले भारनियमन रद्द करण्यात आले आहे. या परिसरात महावितरणने मध्यरात्री १२ ते पहाटे साडेपाच या वेळेत भारनियमन केल्याने आडगाववासीय त्रस्त झाले आहे. याबाबत ‘मटा’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची महावितरणने दखल घेतली.

महापालिका हद्दीत २४ तास वीजपुरवठा देण्याचे ध्येय असतांना आडगावमध्ये महावितरणकडून भारनियमन केले जात होते. सोमवार, मंगळवार, बुधवारी असे तीन दिवस रात्री १२ ते पहाटे साडेपाच या यावेळेत वीजपुरवठा खंडित केला जात होता. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. वीज नसल्यामुळे नागरिकांना घरात झोपणे कठीण झाले होते. अनेकजन रात्री झोपण्यापूर्वी घरात फर्शीवर थंड पाण्याचा शिडकावा करतात त्यांनतर अंथरून टाकून झोपत आहेत. तर काही नागरिक घराच्या गच्चीवर तसेच गॅलरीत झोपतात. नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. शिवाय मध्यरात्री चोऱ्या होण्याची भीती असते. त्यामुळे मध्यरात्रीचे भारनियमन बंद करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती. याबाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली. भारनियमन रद्द झाेल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

जेलरोड पुलावर कचऱ्याबाबत फलक

नाशिकरोड : जेलरोडच्या गोदावरी नदीत कचरा टाकण्यास प्रतिबंध आहे, असा फलक महापालिकेने उभारला आहे. नदीत कचरा, मांगल्य टाकले जात असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर हा फलक लावण्यात आला आहे. संत जर्नादन स्वामी पुलाच्या सुरवातीला मुस्लिम कबरस्थान शेजारी हा फलक लावण्यात आला आहे. नदीत कचरा टाकून प्रदूषण करू नये, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचा हिरव्या रंगातील हा फलक लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेतन आयोगावरून श्रेयवादाची लढाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रेसच्या कामगारांना अशक्य असलेला सातवा वेतन आयोग मिळाल्यानंतर श्रेयवादीची लढाई सुरू झाली आहे. यात एकमेकांना शह देण्यासाठी तब्बल ७० फुटांचा शुभेच्छा फलक उभारण्यात आला असून त्यावर थोडे थोडके नव्हे तर ६२१ जणांचे फोटो छापण्यात आले आहेत.

वेतन आयोग मिळाल्याबद्दल प्रेस मजदूर संघाच्या नेत्यांवर अभिनंदनाचा जणू वर्षावच केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या नेत्यांनी करन्सी प्रेससमोर जेलरोडला ७० फूट लांबीचे होर्डिंग्ज लावले आहेत. आजपर्यंत एवढा मोठा शुभेच्छा फलक नाशिकमध्ये अन्य कोणीही उभारला नव्हता. फलकावर खासदार हेमंत गोडसे यांच्यासह संघाचे नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्यासह विविध समित्यांचे सव्वासहाशे फोटो आहेत. वाहनचालक, पादचाऱ्यांचे लक्ष हा फलक वेधून घेत आहे. फलकावर आयोग मिळण्याचे श्रेय कामगारांना देण्यात आले आहे.

फलकातूनच प्रत्युत्तर

सध्या सत्तेत नसलेल्या ‘आपला पॅनल’चे नेते रामभाऊ जगताप आणि अशोक गायधनी यांनीही प्रेस मजदूर संघाच्या या फलकाशेजारी आपल्यामुळेच आयोग मिळाल्याचा दावा करणारा फलक उभारला आहे. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थराज्यमंत्री अरुण राम मेघवाल आणि भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे फोटो आहेत. आपल्यामुळेच प्रेस कामगारांना सातवा आयोग मिळाल्याचा दावा आपला पॅनलने केल्याने जगदीश गोडसे यांच्या सत्ताधारी पॅनलने ७० फुटी फलकावर ‘घशात घातले दात फुकट श्रेय घेणाऱ्यांचे’ असे लिहिले आहे. या पॅनलने शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा फोटो लावला आहे. नाशिकच्या दोन खासदारांना दोन्ही पॅनलेने वाटून घेतले की काय असा प्रश्न या निमित्ताने प्रेस कामगारांसह नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींचा त्राता हरपला...

0
0

दीपक महाजन, कळवण

कळवण विधानसभा मतदार संघाचे तब्बल आठ वेळा प्रतिनिधीत्व करणारे आदिवासी आमदार व माजी मंत्री ए. टी. पवार तथा अर्जुनराव तुळशीराम पवार यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. यामुळे कळवण, पेठ, सुरगाणा तालक्यातील आदिवासी जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला. आदिवासींच्या विकासासाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

एकाच मतदारसंघाचे सातत्याने नेतृत्व करीत विकासकामांसाठी पाठपुरावा करणारे व आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जलसिंचन, आरोग्य, दळणवळण ही महत्त्वाची कामे केवळ ‘हात जोडून’ पूर्ण करून घेणारे ‘एटी’ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. कळवण तालुक्यातील दळवट येथील मूळ रहिवासी असलेल्या ए. टी. पवारांचे एम. ए. पर्यंत शिक्षण झाले होते. आपल्या कुटुंबात त्यावेळी ते एकमेव उच्चशिक्षित होते. त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला. साक्री तालुक्यातील चौधरी कुटुंबातील शकुंतला चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. विकास सोसायटी ते कॅबिनेट मंत्री असा ४५ वर्षांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारे दुर्मिळ राजकारणी म्हणून त्यांनी इतिहास घडवला आहे.

...अन‍् स्वप्न साकार झाले

१९७८ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार ए. टी. पवार भारतीय क्रांती दलातून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यात ‘एटीं’नी बाजी मारली. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असतांना राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम व दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून ‘एटीं’ची वर्णी लागली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद ‘एटीं’कडे चालून आले. तेव्हा पाणी या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांना वेळ नव्हता. कळवण, बागलाण हे तालुके दुष्काळाने होरपळत होती. रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, पुनद धरण झाले पाहिजे, चणकापूर उजवा कालवा काढावा या मागणीसाठी १६ ऑगस्ट १९७८ मध्ये कळवण तहसीलवर ‘एटीं’नी मोर्चा कडून शासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या मोर्चामुळे शासन व प्रशासन खडबडून जागे झाले. पाटबंधारे मंत्र्यांनी मोर्चाची दाखल घेतली. लघुपाटबंधारे योजना, पाझर तलाव यांचे सर्व्हेक्षण झाले. त्याकाळात आदिवासी बांधव सर्वेला विरोध करीत, अधिकारी वर्गाला दगड मारून हाकलून लावायचे. आज त्याच गावांना सिंचन योजना झाल्याने गावांचे रूप बदलले आहे. उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नसे त्यामुळे अशा गावांना मुली द्यायला आदिवासी बांधव तयार होत नसे. १९८० मध्ये ‘एटीं’नी पुनद धरणाच्या कामाचा प्रश्न पुढे केला. तत्कालीन पाटबंधारेमंत्री बी. जे. खताळ यांनी धरणाच्या जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे पाटबंधारे सचिव देऊस्कर यांना आदेश दिले. सुपले दिगर येथील जागा निश्चित करून पुनद धरणाला मंजुरी द्यावी, अशी शिफारस पाटबंधारेमंत्री खताळ यांनी मुख्यमंत्री अंतुले यांना केली. १९८१ मध्ये पुनद धरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली. यात मुख्यमंत्री अंतुले यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. २००४ नंतर पुनदच्या कामास गती आली. शरद पवारांनी केंद्र सरकारकडून निधी मिळवून दिला. २००८ मध्ये पुनदचा घळभरणी कार्यक्रम तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, पाटबंधारेमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पुनदवर पार पडला अन् ‘एटीं’च्या प्रदीर्घ संघर्षांला यश मिळाले. याच प्रकल्पाला एटींचे नाव देण्यात आले असून हा प्रकल्प अर्जुन सागर या नावाने ओळखला जातो.

सोसायटी चेअरमन ते मंत्री

l दळवट आदिवासी वि. का. सोसायटीचे संचालक नंतर चेअरमन

l १९६७ ते १९७२ जिल्हा परिषद सदस्य व नंतर सभापती, शिक्षण आरोग्य, कृषी पशुसंवर्धन

l १९६८- जिल्हा परिषद अध्यक्ष, नाशिक

l ९ वेळा विधानसभा निवडणूक लढवली. १९८५ व २०१४ हे दोन अपवाद वगळता सतत विजय.

l १९७८ मध्ये नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले.

l महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात चार वेळा मंत्रीपद मिळवणारे एकमेव नेतृत्त्व

l युती शासनात व आघाडी शासनातही मंत्रिपद

l १९७८ चार महिने सार्वजनिक बांधकाम व दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री

l १९८३ ते १९८५ राज्यमंत्री आदिवासी विकास, स्वयंरोजगार

l १९९८ ते १९९९ कॅबिनेट मंत्री, आदिवासी विकास विभाग

l १९९९ पशुसंवर्धन, दुग्ध, वन खात्याचे राज्यमंत्री.

l २००४ पासून नाशिक जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.

l फेब्रुवारी २०१० मध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष

l पुनंद (अर्जुन सागर )प्रकल्पासह ३० लघुपाटबंधारे आणि १५० पेक्षा अधिक पाझरतलाव बांधले.

l आदिवासींना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शेकडो आदिवासी आश्रमशाळा सुरू केल्या.

l आदिवासींच्या चौफेर विकासासाठी स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालयाच्या निर्मितीचे श्रेय त्यांनाच जाते.

l आदिवासी आयुक्तालय नाशिकला आणले

l २९ व्या वर्षी दळवट गावाचे सरपंच

l कनाशी गटातून जि. प. निवडणूक लढवली

l जि. प. चे कृषी व पशुसवर्धन समिती सभापती

l काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना पक्षवाढीसाठी योगदान

l १९७२ मध्ये कळवण, सुरगाणा, पेठ या राखीव मतदार संघातून प्रथम विधानसभेवर

l १९८५ आणि २०१४ चा अपवाद वगळता कळवण विधानसभा आणि ए. टी. पवार हे जणू समीकरण तयार झाले.

l ८ वेळा विधानसभेवर, चार वेळा मंत्रीपद, आदिवासी विकास, वन, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम व समाजकल्याण आदी विभागाचे मंत्रिपद. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदही भूषविले.

l समाजकल्याण राज्यमंत्री असताना आदिवासी विकास विभागाची निर्मिती करून नाशिक येथे मुख्य कार्यालय आणले.

l जागतिक बँकेच्या सहाय्याने तत्कालीन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या सहकार्याने ‘एटीं’नी कळवण येथे आधुनिक सोयी असलेले उपजिल्हा रुग्णालय उभारले.

l चणकापूर धरण, अर्जुनसागर(पुनद) प्रकल्प, धनोली प्रकल्प, भेगू, ओतूर, बोरदैवत, चिंचपाडा, गोबापूर, मार्कंडपिंप्री, मळगाव, नांदुरी या लघुपाटबंधारे योजनांसह छोटी मोठी अशी २३ धरणे पाझरतलाव बांधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीं’ची एग्झिट

0
0

आज दळवट येथे होणार अंत्यसंस्कार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी अहर्निश प्रयत्नरत असलेले अन् दुर्गम भागातील सिंचन व दळणवळणाच्या सुविधांसाठी भगीरथ प्रयत्न करणारे अर्जुन तुळशीराम उर्फ ए. टी. पवार (वय ७९) यांचे बुधवारी मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय क्रांती दल, काँग्रेस, भाजप अन् राष्ट्रवादी असा प्रवास करताना तब्बल आठ वेळा आमदारकी व मंत्रिपदे भूषवून ‘एटी’ हाच पक्ष असे समीकरणच त्यांनी नाशिक जिल्ह्यात घडविले होते. आज (ता. ११) सकाळी दळवट (ता. कळवण) या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून ए. टी. पवार यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी अलीकडेच राजकारणातून निवृत्ती घेतली होती. १ डिसेंबर १९३८ मध्ये ए. टी. पवारांचा जन्म झाला. राज्यशास्त्रातील एम. ए. ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दळवटच्या आदिवासी विकास सोसायटीचे अध्यक्ष झाल्यानंतर १९६७ ते १९७२ मध्ये ते जिल्हा परिषदेत सदस्य होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि नंतर शिक्षण, कृषी-पशुसंवर्धन सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ते आमदार म्हणून निवडून आले होते. १९७८ मध्ये त्यांनीकाँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले. काँग्रेस, भाजप आणि नंतर राष्ट्रवादी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांच्या मागे पत्नी शकुंतला, मुलगा नितीन, प्रवीण, स्नुषा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री, डॉ. भारती, कन्या गितांजली व डॉ. विजया, नातवंडे असा परिवार आहे.

‘पाणीदार’ कारकीर्द

आदिवासी विकास, पशुसंवर्धन व दुग्धविकास या खात्याबरोबरच तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. आदिवासी आयुक्तालय पुण्याहून नाशिकमध्ये आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आश्रमशाळांच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये शिक्षण पोचवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्याचे पाणीसंकट टळले!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या उन्हाळ्यातील हंगामात येवला नगरपालिका, ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व इतर काही प्रासंगिक गावांसाठी पालखेडच्या वतीने सोडण्यात आलेले येवला तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोमवारी बंद झाले. या आवर्तनातुन येवला पालिकेच्या शहरातील टप्पा क्रमांक दोन योजनेच्या ५० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या साठवण तलावात ४० दशलक्ष घनफूट इतके पाणी मिळाले आहे. या पाण्यामुळे येवलेकरांची तहान भागणार आहे.

दरम्यान, पाणी आवर्तन बंद झाल्याने आवर्तनातील पाण्यासाठी गेली काही दिवस टाहो फोडणारी तालुक्यातील १६ गांवे वंचितच राहिली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालखेड डाव्या कालव्यामार्फत या महिन्याच्या सुरुवातीला येवला तालुक्यासाठी सोडण्यात आलेले पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन सोमवारी बंद झाले. या आवर्तनातून येवला शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या येवला पालिकेच्या टप्पा क्रमांक २ साठवण तलावात ४० दशलक्ष घनफूट इतके पाणी देण्यात आले. १६ वर्षांपूर्वी निर्मिती झालेल्या येवला पालिकेच्या या साठवण तलावाची एकूण साठवण क्षमता ५० दशलक्ष घनफूट असली तरी जवळपास सध्या या साठवण तलावात ४५ दशलक्ष घनफूट इतकी साठवण क्षमता आहे. मिळालेले पाणी बघता चालू आवर्तनात जवळपास ५ दशलक्ष घनफूट पाणी कमी मिळाले आहे. या पाण्यामुळे उन्हाळ्यातील उर्वरित काळात शहरासमोरील पाणीसंकट दूर टळण्यास मोलाची मदत होणार आहे. शहराला गेल्या अनेक महिन्यांपासून तीन दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. नुकतेच मिळालेले पाणी पुढील काळात अधिक दिवस पुरवता यावे या नियोजनातून तीन दिवसाआड पाणीपुरवठयाचा सध्याचा कालावधीच कायम ठेवला जाणार असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दरम्यान, पालखेडच्या दिल्या गेलेल्या पाणी आवर्तनातून तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजनेस मागणीनुसार पाणी मिळाले नसल्याचे पाणीपुरवठा योजना समितीचे म्हणणे आहे. मूळ योजना ३८ गावांसाठीची असली तरी गेल्या काही वर्षांत योजनेतील गावांची संख्या वाढत आहे. सध्या या योजनेतील ५० गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पालखेडच्या नुकत्याच मिळालेल्या आवर्तनातील पाण्यातून पुढील काळात योजनेतील गावांची तहान भागविण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचेही समिती पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्याच प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

महापौरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग एकमधील मोकळ्या भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने बघत तत्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रभाग एकमधील म्हसरूळ परिसरातील गुलमोहर कॉलनी, हरिहर नगर, वृंदावन नगर, स्वामी समर्थ केंद्र, गणेश नगर, स्नेहनगर येथील मोकळ्या भूखंडांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे अनियमितपणे येणाऱ्या घंटागाड्यांमुळे ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहरांसाठी केलेल्या सर्वेक्षणात गेल्या वर्षी ३१ व्या क्रमांकावर असलेल्या नाशिक शहराची १५१ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे नाशिक शहराबरोबरच प्रभागातील स्वच्छतेचे आव्हान महापौरांना पेलावे लागणार आहे.

म्हसरूळमधील कॉलनी परिसरातील नागरिक अनियमितपणे येणाऱ्या घंटागाडीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे जमा झालेल्या कचऱ्याची आजूबाजूच्या ठिकाणी विल्हेवाट लावतात. परिणामी परिसरात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य पसरते. शिवाय ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. कचरा उचलला जात नसल्याने कुजून दुर्गंधी पसरते. डासांचे प्रमाण व त्यामुळे रोगराई वाढत आहे.

कचरा जाळण्याचे प्रकार

अनेक दिवस कचरा उचलला नाही दुर्गंधी पसरते. परिणामी परिसरातील नागरिक स्वतः पुढाकार घेऊन कचरा जमा करून जाळून टाकतात. त्यामुळे आरोग्य विभागाने व नगररचना विभागाने समन्वय साधून महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर कंपाऊंड करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

डुकरे, मोकाट जनावरांचा सुळसुळाट

म्हसरूळबरोबरच ओंकारनगर परिसरातही अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. कचरा, अन्न उघड्यावर टाकल्यामुळे येथे मोकाट जनावरे, भटके कुत्रे यांचे प्रमाण वाढले आहे. ‌याशिवाय दोन वर्षांपासून या परिसरात अचानकपणे डुकरांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. या मोकाट प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा नागरिक कचऱ्याची विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. डासांचे प्रमाण देखील वाढते आणि रोगराई पसरते. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.

- विशाल भोसले, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images