येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी माघारीची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. एक जागेवर काँग्रेसच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे आता ८३ जागांसाठी ३७३ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली.
सकाळी ११ ते ३ यावेळेत सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना त्या-त्या पक्षाचे चिन्ह मिळाले. अपक्ष उमेदवारांना त्यांनी नामनिर्देशन पत्रात मागितलेली चिन्हे देण्यात आली. एका प्रभागात एक चिन्ह दोन अपक्षांना मागितल्यास त्यासाठी चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. चिन्ह वाटप झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे.
बॅटला मागणी, नारळ नकोसे!
चिन्ह वाटपसाठी आयोगाकडून देण्यात आलेल्या चिन्हांचा चार्ट लावण्यात आला होता. अपक्ष उमेदवारांनी आपल्या पसंतीचे चिन्ह अर्ज दाखल करतांना नमूद केले होते. त्यात अनेकांनी बॅट, शिट्टी, कपबशी या चिन्हांना पसंती दिली. नारळ या चिन्हाला अनेकांनी नापसंती दर्शवली होती.
काँग्रेसचे उमेदवार जास्त
माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून, कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर उमेदवार देता आले नाही. सर्वाधिक ७३ उमेदवार काँग्रेसने दिले असून, गेल्या निवडणुकीत भाजपचा एक ही उमेदवार नव्हता. यावेळी भाजपने ५६ उमेदवार दिले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी ५२, एमआयएम 3५, शिवसेना २६, जनता दल १०, इतर ८, तसेच १०१ अपक्ष उमेदवार रिंगणात कायम आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट