Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नैसर्गिक नाले गायब

$
0
0

नाले बुजविण्याचे प्रकार कधी थांबणार

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहराचा विकास गेल्या काही वर्षांत झपाट्याने झाला आहे. परंतु, वाढत्या शहराच्या लोकवस्तीत बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक नालेच बुजविण्याचा घाट घातला आहे. यामुळे नैसर्गिक नालेच नाहिसा होत असल्याने नाल्यांना बुजविण्याचे प्रकार कधी थांबणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या यंत्रणेचेदेखील याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. सातपूर भागातदेखील वाढलेल्या लोकवस्तीत अनेक नैसर्गिक नालेच गायब झाले आहेत. पावसाच्या दिवसात नालेच बंदिस्त झाल्याने रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने त्याचा त्रास सर्वांनाच सहन करण्याची वेळ येत असते. महापालिका आयुक्तांनीच याकडे लक्ष घालावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

केंद्र सरकारने नाशिक शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्याने महापालिकेवर नागरी सुविधा पुरविण्याची अधिक जबाबदारी वाढली आहे. परंतु, वाढत्या शहराच्या विकासात नैसर्गिक नाल्यांची जपवणूक करण्याचे काम कोण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोन्यापेक्षाही अधिक भाव शहरात जमिनींचे झाल्याने पारंपरिक स्रोत असलेल्या नैसर्गिक नाल्यांवर अनेकांनी डल्लाच मारला आहे. सातपूर भागात असलेल्या अनेक नैसर्गिक नालेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महापालिकेकडून अनेकदा पावसाळ्याअगोदर नाले सफाईचे काम केली जात होती. परंतु, नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आल्याने नालेसफाईची कामे नेमकी करणार कुठे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंभरावर उद्याने उघडीबोडकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड विभागात सहा प्रभागमिळून महापालिकेच्या मालकीची तब्बल १२२ उद्याने आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या उद्यानांच्या देखभालीकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याने सध्या बहुतांश उद्याने नावापुरतीच उरली आहेत. मोजकीच उद्याने काहीशी सुस्थितीत असून, शहरातील इतर उद्याने भकास झालेली आहेत. अशी कागदोपत्रीच शिल्लक राहिलेली शंभरावर उद्याने ती ‘जोपासण्यासाठी’ जनतेच्या पैशांचा मात्र खोऱ्याने वापर सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

नाशिकरोडला उद्यानांसाठी तब्बल ७० एकर जागा वापरण्यात आलेली आहे. या उद्यानांशिवाय एक नर्सरी, सर्व रोड डिव्हायडर्स व तीन वाहतूक बेटे यांच्या देखभालीची जबाबदारी उद्यान विभागाकडे आहे. २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत यातील दोन-चार उद्यानांशिवाय एकाही उद्यानाची देखभाल महापालिकेने केलेली नाही.परिणामी ही सर्व उद्याने ट्री लेस झाली असून, ती उघडी-बोडकी बनली आहेत.

--

समस्यांचा संपेना फेरा

१२२ उद्यानांपैकी सुमारे १२० उद्याने हिरवळीअभावी पूर्णपणे भकास झाली आहेत. या उद्यानांत वाळलेले गवत, खुरटी झुडपे, कचऱ्याचे ढीग, दगड, उखडलेले पेव्हर ब्लॉक, ढासळलेल्या भिंती, तुटलेले गेट, तुटलेली खेळणी, सुकलेली झाडे, मद्यपींचा वाढलेला वावर असे चित्र सध्या बघायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांकडून जनावरे बांधण्यासाठीही काही उद्यानांचा वापर होताना दिसून येतो. या उद्यानांतील पथदीपही बंद आहेत. त्यामुळे ही उद्याने असून, अडचण नसून खोळंबा ठरत आहेत.

--

खासगी ठेकेदाराचे दुर्लक्ष

नाशिकरोड प्रभागातील उद्यानांच्या दैनंदिन देखभालीचा ठेका पालिकेने अस्मिता मजूर बांधकाम सोसायटीला तीन वर्षांसाठी दिला आहे. हा ठेका जानेवारी २०१७ पासून दिला आहे. मात्र, या खासगी ठेकेदाराकडून या उद्यानांच्या दैनंदिन देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणत्याही उद्यानाचे रुपडे पालटल्याचे अद्यापही दिसून आलेले नाही. परिसरातील मुक्तिधामजवळील सोमाणी गार्डन व लोकमान्य उद्यान या दोन उद्यानांचीच स्थिती बऱ्यापैकी आहे. सोमाणी उद्यानात नव्याने खेळणी बसविली आहेत. पण, ती अपुरी पडत आहेत. येथील स्टेज, बाके यांची दुरवस्था कायम आहे. लोकमान्य उद्यानाची देखभाल काही वर्षांपासून नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांच्या पुढाकारातून होत असल्याने या उद्यानातील हिरवळ टिकून आहे. प्रवेशद्वारावरील नावाची अक्षरे मात्र निखळली आहेत.

--

अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका

नाशिकरोड विभागाचे उद्यान निरीक्षक बी. टी. कटारे यांच्याकडे नाशिकरोडसह महापालिकेच्या सातपूर व नाशिक पूर्व या विभागांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे अर्ध्या शहराचा कारभार त्यांना पाहावा लागत आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सध्या केवळ २९ कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी अशा अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्व उद्याने भकास झाली आहे.

--

येथे होतेय दुर्लक्ष

परिसरातील नेहरू उद्यान, जय भवानीरोडवरील लवटेनगर उद्यान, चेहेडी गाव, अश्विनी कॉलनी, विद्याविहार, वडारवाडी उद्यान आदी उद्यानांत दररोज मद्यपींचा अड्डा जमलेला असतो. शिखरेवाडी उद्यानालाही मद्यपींचा विळखा पडलेला आहे. या व अन्य ठिकाणच्या उद्यानांचा वापर सर्रास कचरा टाकण्यासाठी केला जातो. परिणामी या उद्यानांना कचरा कुंडीचे स्वरूप आलेले आहे. मराठा कॉलनी, नेहरू उद्यान, सोमाणी उद्यानाला अतिक्रमणधारकांचा विळखा पडला आहे. काही उद्यानांत ग्रीन जिम बसविण्यात आल्याने उद्यानांच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. काही उद्यानांना वर्षभर टाळे लावलेले आढळून येते.

--

शहरातील बहुतांश उद्याने कचराकुंडी बनलेले आहेत. गवत, कचरा, झुडपे वाढली असून, महापालिकेने एकाही उद्यानाची काळजी घेतली नसल्याने उद्याने हरविली आहेत.

-विजय बिडवे, नागरिक

--

शहरातील उद्यानांच्या देखभालीसाठी खासगी ठेकेदार नेमले आहेत. काही उद्यानांच्या कामांच्या फायलींना मंजुरी दिली आहे. काही प्रतीक्षेत असल्याने लवकरच उद्यानांची स्थिती बदलेल.

-बी. यू. मोरे, उद्यान अधीक्षक, महापालिका

--

विभागातील चित्र असे

प्रभाग क्रमांक-उद्याने संख्या- एकूण क्षेत्रफळ (एकर)

१७ ३८ २०

१८ १७ ९.९

१९ ०५ ३.२

२० २६ १७

२१ २९ १६

२२ ०७ ०४

एकूण १२२ ७०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ कांदा कोसळला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

लाल कांद्या पाठोपाठ उन्हाळ कांद्याच्या बाजारभावातही घरसण सुरू झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रतिक्विंटलमागे सरासरी साडेचारशेचा भाव हाती देणाऱ्या उन्हाळ कांद्याला येवला बाजार समितीत शुक्रवारी (दि.१२) प्रतिक्विंटल सरासरी अवघे ३२५ रुपयांचा भाव मिळाला. बाजारभाव कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

नगदी पिक समजल्या जाणाऱ्या कांद्याने उत्पादक शेतकऱ्यांचा यंदा मोठा वांधा केला आहे. लाल कांदा बाजारभावाने दगा दिल्यावर आता उन्हाळ कांदाही तोच कित्ता गिरवत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ कांद्याची सातत्याने पडझड सुरू आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांदयाची आवक वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला सातत्याने या कांदा बाजारभावाचा आलेख हा घसरत आहे.

दोन आठवड्यापूर्वी येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० ते कमाल ५८० (सरासरी ४५०) असा बाजारभाव मिळाला होता. गेल्या आठवड्यात आणखी घसरण होत किमान २०० ते कमाल ५२० (सरासरी ३७५) रुपये असा दर हाती आला. तर या आठवड्यात पुन्हा घसरण होत शुक्रवारी किमान २०० ते कमाल ५३१ (सरासरी ३२५) असा बाजारभाव मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व कार्याचे श्रेय विद्यार्थ्यांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोटरी क्लब ऑफ नाशिकने नाशिकभूषण पुरस्कार प्रदान केल्याचा आनंद मला आहे. आयुष्यभर विद्यार्थी देवो भवः हा मंत्र जपतच कार्य केले आहे. त्यामुळे माझ्या सर्व कार्याचे श्रेय विद्यार्थ्यांना देतो, अशी कृतज्ञता गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा शिक्षणमहर्षी डॉ. मो. स. गोसावी यांनी नाशिकभूषण पुरस्कार स्वीकारताना सत्कारास उत्तर देताना व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या वतीने शंकराचार्य न्यास येथे शनिवारी नाशिकभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा पुरस्कार शिक्षणमहर्षी डॉ. मो. स. गोसावी यांना प्रदान करण्यात आला. दर वर्षी विविध क्षेत्रांतील दिग्गजांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र, श्रीफळ व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. इ. वायुनंदन यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नाशिकसोबत भावनिकतेने जोडलो गेलो असल्याचे ते म्हणाले. रोटरीमार्फत जागतिक स्तरावर गरजूंसाठी केल्या जात असलेल्या कार्याचे कौतुक त्यांनी केले. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष अनिल सुकेणकर यांनी प्रास्ताविक केले. धनलक्ष्मी पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. राधेय येवले यांनी आभार मानले. मनीष चिंधडे यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.

--

स्वस्त शिक्षणाची गरज

डॉ. गोसावी म्हणाले, की ज्या कामातून आपण समाजाला समाधान देऊ शकू, असे कार्य केले पाहिजे. शिक्षण हे दर्जेदार असण्याबरोबरच ते स्वस्त व सहज उपलब्ध असणेदेखील आवश्यक आहे. त्यासाठी आदिवासी भागांमध्ये शिक्षण पोहोचविण्यासाठी करीत असलेल्या कार्याविषयी त्यांनी माहिती दिली. येथील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा मिळाल्याने हे विद्यार्थीदेखील पुढे जात असल्याचे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी बाविसाव्या वर्षी प्राचार्यपद मिळाल्याच्या आठवणीपासून कुसुमाग्रज, भाऊसाहेब मोरे, प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाखांची रोकड लांबवली

$
0
0

नाशिक ः पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतील दोन लाख रुपये हातोहात लंपास केले. ही घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात फिर्यादीच्या घराजवळच घडली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

विकास जंगू गावित (वय ५८, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गावित अ‍ॅक्सिस बँकेच्या अंबड शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. तब्बल दोन लाखांची रोकड काढून ते घराजवळ परतले. गावित यांच्याकडे मोठी रक्कम असल्याचे पाहून पाळत ठेवलेल्या दोघे दुचाकीस्वार भामटे त्यांच्या पाठोपाठ आले. गावित घरासमोर आपली मोटरसायकल उभी करीत असताना चोरट्यांनी त्यांना गाठले. पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. गावित त्यांच्याशी बोलण्यात गर्क असताना एक भामटा दुचाकीवरून खाली उतरला. गावित यांचे लक्ष नसल्याची संधी साधत चोरट्याने गावित यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली तब्बल दोन लाख रुपयांची रोकड हातोहात लांबवली. चोरटे निघून गेल्यानंतर डिक्कीत पैसे नसल्याची बाब गावित यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच अंबड पोलिस सेटशनला धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाहतूक सुसाट

$
0
0

लग्नसराईतील वाहतुकीकडे पोलिसांकडून दुर्लक्ष; अपघाताचा धोका

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी/सिन्नर फाटा

लग्नाच्या दाट तिथीमुळे सर्वत्र वऱ्हाडी मंडळींची लगबग सुरू आहे. लग्न स्थळांपर्यंत पोहचण्यासाठी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने सर्रासपणे अवैध वाहतूक होत आहे. शहरी भागात रस्त्यावर रोज वाहनांच्या तपासण्या होत असतात. तरीही या अवैध वाहतुकीला आळा बसलेला नाही. ग्रामीण भागाकडे तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे की काय असे वाटते.

केवळ शहरातच नव्हेतर ग्रामीण भागातही लग्न समारंभासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे लग्न समारंभासाठी मंगल कार्यालये किंवा लॉन्स यांना पर्यायच नाही. वधू आणि वर या दोन्हीकड़ील वऱ्हाडी मंडळींना विवाह स्थळापर्यंत पोहचण्यासाठी जीप, टेम्पो, ट्रक यासारख्या वाहनांचा वापर केला जातो. औरंगाबाद रोडवरील लॉन्सवर पार्किंगसाठी पुरेशी जागा असतानाही रस्त्यावरच वाहने थांबविण्यात येतात. त्यामुळे लग्नसराईच्या दाट तिथीच्या दिवशी या भागात वाहतुकीची कोंडी होते. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक झाल्याने अनेकवेळा वऱ्हाडी मंडळींच्या जिवावर बेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात लाखलगाव-हिंगणवेढे रस्त्यावर वऱ्हाडी मंडळींनी खच्चून भरलेल्या एका टेम्पोला अपघात झाल्याने अठरा जण जखमी झाले. या अपघतानंतरही अवैध वाहतुकीवर पाहिजे तसा परिणाम झालेला नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे, अशी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बाम यांच्या जाण्याने देशाचे नुकसान

$
0
0

मान्यवरांच्या शोकसंदेशातील भावना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामान्य खेळाडूंमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणारे आणि देशाचे नाव अभिमानाने उंचविण्यासाठी अमूल्य योगदान देणारे विख्यात क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भीष्मराज बाम यांच्या जाण्याने देशाचे आणि भावी पिढीचे अतोनात नुकसान झाले आहे, अशी भावपूर्ण श्रध्दांजली डॉ. बाम यांच्यावरील अंत्यसंस्कारांदरम्यान पंचवटीतील अमरधाममध्ये मान्यवरांनी वाहिली.

सुमारे दोन दशकांपासून बामसरांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. त्यांनी दिलेल्या विचारांवर चालत राहू. युवा खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्या नावे क्रीडासंकुल उभारण्याचा प्रयत्न करू.

- बाळासाहेब सानप, आमदार

जीवनात कमाविलेले अमूल्य ज्ञान बामसरांनी समाजाच्या भल्यासाठी मुक्त हस्ते प्रत्येकाला देऊ केले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजाच्या भल्यासाठी झटत राहणारे हे व्यक्तिमत्त्व अव्दितीयच आहे.

- जयवंत जाधव, आमदार

डॉ. बाम यांच्या जाण्याने केवळ क्रीडाक्षेत्रच नाही, तर देशातील नव्या पिढीचे अतोनात नुकसान झाले आहे. कुठल्याही विषयाचे अफाट ज्ञान त्यांच्याकडे होते. इतका व्यासंग करण्यासाठी त्यांनी वेळेचे व्यवस्थापन कसे केले असेल असाही प्रश्न मला पडायचा. ठराविक चौकटीत बसणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्हते. ते खूप व्यापक होते.

- केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

क्रीडासारख्या आव्हानात्मक आणि भल्याभल्यांचा कस लावणाऱ्या क्षेत्रात शून्यातून अस्तित्व निर्माण करण्यासाठी डॉ. बामसरांनी आम्हाला दिलेले शिस्त, संस्काराचे धडे आमच्या पंखात बळ भरून गेले. सरांचे अस्तित्व विचाररूपाने कायम आहे.

- अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

अखेरच्या क्षणापर्यंत अतिशय सकारात्मकतेने कार्यरत असलेले बामसर आज आपल्यात नाहीत. यावर विश्वास बसणे कठीण जाते. त्यांच्या नसण्याचे दु:ख खूपच यातना देणारे आहे. आपण स्वीकारलेल्या कार्यात उच्चदर्जाची कौशल्य प्राप्त करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.

- डॉ. अविनाश धर्माधिकारी, प्रमुख, चाणक्य मंडल परिवार

देशाच्या तळागाळातील खेळाडूंना बामसरांच्या प्रेरक शब्दांनी आणि मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख निर्माण करून दिली. क्रीडाक्षेत्रातील आव्हाने पेलताना मानसशास्त्राचे असणारे अव्दितीय स्थान त्यांच्यामुळे अधोरेखीत झाले. भारतीय खेळाडूंसाठी त्यांनी त्यांना दिलेला सकारात्मक दृष्टिकोन ही सर्वात मोठी देणगी आहे.

- विजेंद्र सिंग, क्रीडा प्रशिक्षक

परिसाच्या स्पर्शाने जसे लोहाचे सोने व्हावे, तसे बामसरांच्या शब्दात मोठी जादू दडली होती. एकदा मला याचा अनुभवही घ्यायला मिळाला. पोलिस अकादमीत अपेक्षित संघबांधणीत अडसर येत असल्याने एकदा त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या व्याख्यानाच्या परिणामी कुठेही नसणारा पोलिस अकादमीचा संघ चक्क चौथ्या क्रमांकावर येऊन पोहचला होता. इतके चैतन्य त्यांच्या शब्दांमध्ये दडलेले होते.

- हरिष बैजल, आयुक्त, एफडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जपुरवठ्याऐवजी कर्मचाऱ्यांची चिंता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक संकटात सापडलेली जिल्हा बँक वाचेल की नाही यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झोप उडाली असताना बँकेचे राखणदार असलेले संचालक मात्र आपल्या कोट्यातील चारशे कंत्राटी कर्मचारी वाचवण्यासाठी धडपडत आहेत. जिल्हा बँकेला वाचवण्याऐवजी नोकरभरती प्रकरणात स्वत:च उखळ पांढरे करून घेण्याचा घाट संचालकांनी बँकेच्या आर्थिक संकटकाळातही घातला आहे.

शुक्रवारच्या बैठकीत बँकेच्या वसुलीच्या नावाखाली बोलविलेल्या मासिक बैठकीत संचालकांनी मागच्या दरवाजाने चक्क कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेत घेण्याच्या अर्जाच्या नोंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे न्यायप्रविष्ठ बाब असतानाही संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करण्याऐवजी कोट्यातील कर्मचाऱ्यांना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. त्यामुळे संचालकांच्या या कृतीचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध करून संताप व्यक्त केला आहे.

नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे आणि संचालक मंडळ हे पदभार घेतल्यापासून विविध कारणांनी चर्चेत आहेत. विविध प्रकारची खरेदी असो की नोकरभरती त्यात बँकेचेच अधिक नुकसान झाले आहे. सध्या तर बँक आर्थिक दृष्टचक्रात सापडली आहे. शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज देण्यासाठी बँकेकडे दमडीही शिल्लक नाही. तर कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनीही कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांना आर्थिक मदतीसाठी शासनाकडे हात पसरावे लागले आहेत. शुक्रवारी संचालकमंडळाची बैठक झाली. त्यात रडकुंडीला आलेल्या ठेवीदारांना, नोकरदारांना त्यांचे हक्काचे पैसे कसे परत द्यायचे, पाच लाख सभासद शेतक-यांच्या खरीपाच्या पीककर्जाचं नियोजन कसं करायचे याबाबत बैठकीत चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र ते करण्याऐवजी संचालक मंडळांनं वादग्रस्त ठरलेल्या आणि न्यायालयीन चौकशीत अडकलेल्या ४०० अंशत: कर्मचा-यांच्या भरतीची नोंद कामकाजात करून घेण्यात धन्यता मानली. बँकेवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता असताना घाईगडबडीत जाताजाता स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी संचालक मंडळाने नोकरभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोट्यासाठी धडपड

प्रत्येक संचालकाला कोटा देऊन गैरव्यवहार करीत ही नोकरभरती झाल्याची तक्रार दोघा आमदारांनी सहकार खात्याकडे केली होती. त्यानंतर त्यास स्थगिती देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रकरण जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, कामगारांना २४० दिवस झाल्याने त्यांनी कायम करण्याचा अर्ज बँकेकडे केला. प्रशासनानेही तत्परतेने हा अर्ज बोर्डाच्या बैठकीत ठेवला मग संचालकांनाही तातडीने त्याची नोंद करून घेतली. ही प्रक्रिया सोपी असली ,तरी यामागे मोठे आर्थिक गणित असल्याची चर्चा आहे. प्रत्येक संचालकाला कोटा देवून ही भरती झाल्याचा आरोपही झाला आहे. ही भरती रद्द झाल्यास संचालकांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामगारांना कायम करण्यासाठी धडपड सुरू आहे.


जिल्हा बँकेने आता कोणतीही भरती केलेली नाही. दीड वर्षापूर्वी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांसाठीची ही नियमित प्रक्रिया आहे. वकिलाच्या सूचनेनुसार केवळ या कर्मचाऱ्यांच्या अर्जाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीचा कोणताच विषय नाही.

- परवेझ कोकणी, प्रवक्ता, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलसंधारणाची स्पर्धा दिलासादायक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भूगर्भातून पाणी उपसा करण्याची जशी स्पर्धा सुरू आहे, तशीच स्पर्धा आता जलसंधारणात करण्याची वेळ आली आहे. मात्र, ही स्पर्धा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे, असा विश्वास जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील जलयुक्त कामांचा शनिवारी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. झोडगे येथे ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ योजनेच शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते. त्याच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे सीइओ दीपककुमार मीना, पंचायत समिती गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, कृषी अधिकारी गोकुळ देवरे, लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता बी. व्ही. देसले, दादाजी शेजवळ, सुवर्णा देसाई आदी उपस्थित होते.

झोडगे येथील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीचे निवेदन शिंदे यांना दिले. प्रगतीशील शेतकरी गुलाबराव देसाई यांच्या शेतानजीक सुरू असलेल्या सिमेंट प्लग बंधारा क्र १ च्या कामाची पाहणी केल्यानंतर शिंदे म्हणाले, जिल्ह्यात एकूण ५९ कामे या योजनेतंगर्त होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोनशे किलो भांग जप्त

$
0
0

धुळे : इंदूरकडून धुळ्याकडे खासगी कारमधून भांगची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वाहनाची तपासणी केली असता सोमवारी (दि. १) सायंकाळी एका इंडिगो (क्र. एमएच ३९ जे १४७८) कारमधून कोरड्या भांगची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या गाडीतून दोनशे किलो कोरडी भांग जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांकडून गाडीसह ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ रवींद्र राणा (रा. माधवपुरा पालाबाजार) आणि त्याचा जोडीदार राजेशभाऊ यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील राजेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला. चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे प्रेमराज पाटील यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर लिपिक बेडसेंचे निलंबन

$
0
0

शिक्षण उपसंचालकांकडून कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र बेडसे यांनी गेल्या काही वर्षापासून खासगी व्यक्तीची कार्यालयातील कामांसाठी नियुक्ती केली होती. तर गेल्या काही वर्षांपासून बनावट दस्तऐवज तयार करून शिक्षक नियुक्तीचे प्रस्ताव मंजूर केले होते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक कागदपत्रांची अफरातफर करून आर्थिक फायदा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपिक बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘मटा’नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच बेडसे यांच्याविरोधात आमदार अनिल गोटेंसह शिक्षक संघटना व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी लिपिक रवींद्र बेडसे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यात लाच प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कार्यालयातील लिपिक रवींद्र बेडसे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील पत्रव्यवहार, आमदार अनिल गोटे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केलेली तक्रार तसेच अनुसूचित जाती जमाती संघटना, नारायण पाटील, परशुराम पाकळे, संग्राम पाटील यांच्या लेखी तक्रारीची दखल घेत लिपीक बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नेमण्यात आले आहे.

बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून जयहिंद शाळेतील शिक्षिका पुष्पा पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणदेखील सुरू केले होते. याप्रकरणी बेडसे यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय खेळाडूंना सवलतीचे गुण मिळावेत

$
0
0

धुळे : सरकार निर्णयानुसार ४२ खेळांव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने याबाबत इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तरी सरसकट सर्व शालेय खेळाडूंनाही सवलतीचे गुण मिळावेत याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा प्रशासनाला खेळाडूंनी दिले आहे.

निवेदनात, इतर खेळाडूंप्रमाणे आम्ही शालेय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले आहे. सरावासाठी अभ्यासाचा वेळ खर्च केला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर इतर मुले आमची अवहेलना करतील, यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.

यावेळी निवेदन देतांना जिल्ह्यातील खेळाडू ममता फटकाळ, दिपाली जोहरी, हर्षदा पाटील, रोहित गायकवाड, अश्विन पाटील, सोनू राजपूत आदी खेळाडू तथा क्रीडा शिक्षक मिनलकुमार वळवी, पंकज पाठक, रविंद्र सोनवणे, राजेश शहा, प्रशिक्षक राकेश माळी, जगदीश वंजारी, जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरपूर नगर परिषदेला ३ कोटींचे बक्षिस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरपूर नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ३ कोटी रुपयांचे बक्षिस देऊन गुरुवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांना मुंबई येथे गौरविण्यात आले.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली जात असून, सुरुवातीस संपूर्ण महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत शिरपूर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातत्याने अतिशय चांगले काम नगर परिषदेमार्फत सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार दि. २० एप्रिलला नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. त्याबाबत पहिल्या

नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट ब वर्ग नगर परिषदांमधून शिरपूर वरवाडे नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते मुंबईला नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. याबद्दल शिरपूर शहरातील समस्त नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी धुळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (दि. १०) बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर धुळ्यात येत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासह पांझरा नदी काठावरील दुतर्फा रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. याशिवाय इतरही कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे.

साक्री रोडलगत सिंचन भवनामागे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच ७५ कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या पांझरा काठावरील दोन्ही बाजूच्या रस्ते कामाचाही शुभारंभ यावेळी करण्यात येणार असल्याचे आमदार गोटे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील डॉ. जगन्नाथ वाणींचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील विधायक चळवळीतील अग्रणी डॉ. जगन्नाथ वाणी (वय ८३) यांचे शनिवारी (दि. ६ मे) कॅनडामध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी १०.२२ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. कॅनडामधील कॅलगरी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ केले यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

खान्देशात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांनी डॉ. वाणी सर्वांना परिचित होते. त्यांना २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता. ‘देवराई’ या मराठी चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली आहे. काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यावर उपचारांनी मात करीत चार ते पाच वर्षे त्यांनी काढली. अशाही अवस्थेत ते मायदेशी येऊन संस्थेचे कामकाज पाहत होते. विविध सार्वजनिक कार्यक्रमांत ते हिरिरीने सहभागी होत असत. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी कमलिनी वाणी यांचे निधन झाले. डॉ. वाणी यांच्या आजारपणात त्यांची बहीण पुष्पलता शिरुडे आणि बंधू चंद्रकांत केले नुकतेच त्यांना कॅनडात जाऊन भेटले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच डॉ. वाणी यांनी जगाचा निरोप घेतला.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले

डॉ. वाणी हे राष्ट्रसेवा दलाचे सैनिक होते. त्यांच्यावर सेवा दलातून झालेल्या संस्काराचे त्यांनी सोने केले. परदेशात स्थायिक असूनही मायदेशाकडे अर्थात धुळ्याकडे त्यांचे नेहमी लक्ष असे. त्यांनी स्थापन केलेली वैशिष्ट्यपूर्ण संस्था ही त्याचीच पावती आहे. डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या रूपाने एक बहुआयामी व विधायक दृष्टीचे व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना खान्देशातून व्यक्त होत आहे.

डॉ. वाणींचा अल्प परिचय

- डॉ. वाणी यांनी शालेय शिक्षण धुळ्यात, उच्चशिक्षण पुण्यात व विद्यावाचस्पती ही पदवी कॅनडात घेतली.

- धुळ्यातील कृषी महाविद्यालय आणि पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधील कालखंड सोडला तर त्यांची प्राध्यापक म्हणून कारकीर्द कॅनडातच गेली.

- १९९६ मध्ये ते कॅलगरी विद्यापीठातून निवृत्त झाले.

- २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या कॅनडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही विमाशास्त्रीय विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी चालना दिली.

- मनोरुग्णांसाठी व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडात अनेक उपक्रम राबविले.

- का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, स्किझोफ्रेनिया सोसायटीची स्थापना त्यांनी पुण्यात केली.

- शारदा नेत्रालय, बधभ्र पुनर्वसन संस्था असे विविध उपक्रम सुरू केले.

- कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी संस्थेची स्थापना केली.

- कॅलगरीत जागतिक संगीत अभ्यासक्रमदेखील त्यांनी सुरू केला.

- कॅनडात महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली.

- जनजागृतीसाठी ‘देवराई’, ‘एक कप च्या’ आदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

- अनेक ग्रंथ प्रकाशन, अनेकविध पुरस्कार हे त्यांचे संचित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसंग्रामचा इशारा

$
0
0

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा उधळून लावणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी निवेदन देऊन दिला. तसेच शहराचे आमदार अनिल गोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसंग्राम पक्षाने प्रसिद्धपत्रक काढून राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे. कोणाला व्यासपीठावर बसवायचे हा आमचा निर्णय असल्याचे त्यात म्ह‌टले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सोमवारी (दि. ८) जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आमदार गोटेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुंडाला व्यासपीठावर बसविल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. याला उत्तर म्हणून लोकसंग्राम पक्षाने एक प्रसिद्धपत्रक काढले आहे. यात व्यासपीठावर कोणाला बसवायचे हा आमचा अधिकार आहे. तुमचा काय संबंध? असे म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोरेंवर निशाणा साधला आहे. ‘सभा उधळायला दोन पायावर याल आणि जाताना कशावर जाल?’ याचा विचार करा, असेही यात म्हटले आहे. पत्रकावर दिलीप साळूंखे, अमोल सूर्यवंशी, प्रशांत भदाणे, डॉ. अनिल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अपघातांत ९ ठार, १७ गंभीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत नऊ जण ठार, तर १७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. साक्री तालुक्यातील साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्याजवळ विचित्र असा तिहेरी अपघात झाला. यात चार जण ठार झाले. तर धुळ्याजवळील गुरुद्वाराजवळ झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी पिंपळनेरहून साक्री जात असताना रस्त्यावर असलेले खड्डे चुकविताना समोरून येणाऱ्या रिक्षावर आदळली. त्याचवेळी पिकअपच्या मागून भरधाव वेगाने आलेली मोटारसायकल आदळली. त्या धडकेने मोटारसायकलच्या टाकीतून पेट्रोल पडून आग लागली. या आगीमु‍ळे मोटारसायकल व पिकअप गाडी जळाली. तर दुसरा अपघात टाटा सुमो ट्रकवर आदळल्याने झाला. या अपघातात सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले. यात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे चुकवणे जीवावर बेतले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्यावर महिन्द्रा पिकअप मालवाहू गाडी (एमएच १८/एए ७५२१) पिंपळनेरहून साक्रीकडे जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना समोरील अॅपे रिक्षावर (एमएच १८/१९३६) वर आदळली. त्याचवेळी पिकअपच्या मागे भरधाव येणारी विनाक्रमांकाची मोटारसायकल पिकअप गाडीवर आदळली.


मोटारसायकलचे पेट्रोल बाहेर आल्याने काही क्षणातच मोटारसायकलसह पिकअपला आगीने वेढले. यात मोटारसायकलवरील संतोष प्रकाश डांबरे (वय २५), एकनाथ अप्पा माळीच (३५, दोन्ही रा. चिकसे ता. साक्री) आणि अॅपे रिक्षामधील संतोष नाना मोरे (६५), वसंत राघो अहिरराव (६८, रा. धाडणे, ता. साक्री) हे मृत्युमुखी पडले. जखमींमध्ये वंदना उत्तम बोरसे (वय ३५), मंगलाबाई वसंत गायकवाड (४०), सयाजी कैलास पवार (१२), उत्तम मन्साराम बोरसे (४५), जिभाऊ मालजी पवार (४०), जंगलू रामजी मालचे (४०), अविनाश भटू भदाणे (३२, सर्व रा. धाडणे ता. साक्री) यांचा समावेश आहे.


वधू-वर जखमी

दुसरी घटना शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ घडली. टाटा सुमो वाहन ट्रकवर आदळल्याने सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले, तर आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वर आणि वधूचा समावेश आहे. या अपघातात साजिदाबानो मुमताज अली (वय१७, रा. अजमेरानगर, चाळीसगाव रोड), जमिनाबानो रज्जब अली (३५, रा. तला मशिदीजवळ वडजाई रोड), रोजीनाबानो युनूस अन्सारी (१२ रा.फिरदोसनगर तिरंगा चौक), आमिन अहमद रज्जब अली (रा.फिरदोसनगर तिरंगाचौक), अदनान कलीम अन्सारी (८, फिरदोसनगर तिरंगाचौक) सर्वजण धुळे शहरातील राहणारे आहेत. जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी (दि. ९) सायंकाळी ओव्हरटेक करताना टाटा सुमो वाहन उभ्या असलेल्या डंपरवर आदळल्याने याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ऐंशी फुटी रोडलगत फिरदोस नगरातील नवविवाहित जोडप्यासह नातेवाईक मंडळी मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पीरबाबा दर्गावर दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झाला. यामध्ये सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर सुमो वाहन आदळले आणि तब्बल शंभर फुटांपर्यंत पलटी घेत गेले.

या अपघातातील सर्व मृत हे धुळे शहरातील राहणारे आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये महिला, मुली आणि मुलांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ हिरे मेडिकल कॉलेज आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी महामार्गावर उभ्या असलेल्या डंपर चालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अट्टल चोरट्यांना अटक

जळगाव : जिल्हा पेठ परिसरातील चोपडा मार्केटमधील सिगारेटच्या गोडावून मधून चोरट्यांनी २६ जानेवारीला ५२ लाख ९६ हजार रुपये किमतीचे ६७ सिगारेटचे बॅाक्स चोरून नेले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी पनवेल येथून तीन संशयितांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंग युनिटमध्ये भ्रष्टाचार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील अपंग युनिट बंद झाल्यानंतर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत सामावून घेण्यासाठी सरकारने आदेश दिले होते. मात्र कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्या करण्यात आलेल्या नाहीत. धुळ्यातील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची हीच परिस्थिती असून, प्रत्यक्षात कोणतेही काम आदेशाप्रमाणे झालेले नाही, असा धुळे जिल्हा परिषदेच्या बैठकीत सदस्य किरण पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी यासंदर्भात चौकशी समिती नियुक्त केल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि. १०) अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती मधुकर गर्दे, नूतन पाटील, लीलावती बेडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जून गुंडे उपस्थित होते.

बैठकीत अपंग युनिटचा विषय सदस्य किरण पाटील यांनी उपस्थित केला. त्यांनी, गतिमंद मुलांच्या बुद्धीमत्तेनुसार त्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्या यासाठी राज्यात अपंग युनिट स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. मात्र कालांतराने हे युनिट बंद झाले. त्यामुळे युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामावून घेण्याच्या सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोप किरण पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे याप्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी त्यांनी केली. बैठकीत तसा ठराव जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारित करून चौकशी समितीमध्ये सदस्य किरण पाटील, मधुकर गर्दे, विलास बिरारी यांचा समावेश केला आहे.



नोकरीसाठी लाखो रुपये

जिल्ह्यातील अपंग युनिट सद्यस्थितीत बंद आहे. मात्र अपंग युनिटमध्ये सामावून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. लाखो रुपये देऊनही युनिट बंद पडलेले आहे. तर कर्मचारी सेवेपासून वंचित झाले. ज्यांनी कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये नोकरीस लावण्यासाठी घेतले ते मालामाल झाले आहेत. त्यामुळे सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी अपंग युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images