इंदिरानगर येथील बोगद्यातील वाहतूक पोलिसांनी एकतर्फी करण्याचा निर्णय जाहीर केल्याने सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली वाहतूक व्यवस्थाच कायमस्वरूपी राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बोगद्यातील वाहतूक एकतर्फी केल्याने दुचाकीस्वारांची अडचण झाली असली, तरी या नवीन नियमामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे फुटली असून, वाहतुकीच्या बदलामुळे या ठिकाणी अपघातांची संख्या कमी होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, प्रशासनाने या नवीन वाहतूक मार्गाबरोबर सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे ये-जा करण्यासाठी उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या बोगद्यातून ही वाहतूक होत होती. पूर्वी हा बोगदा सर्वच वाहनांसाठी दुतर्फा सुरू होता. त्यानंतर अपघात व वाहतुकीचे नियोजन होत नसल्याने पोलिसांनी हा बोगदाच बंद केला होता. राजकीय आंदोलनांनंतर हा बोगदा कार्यान्वित करण्यात आला. मात्र, त्यातून गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येताना फक्त दुचाकींनाच प्रवेश होता. दुचाकींव्यतिरिक्तच्या वाहनांना प्रकाश पेट्रोलपंपाजवळून यू टर्न घेऊन इंदिरानगरकडे यावे लागत होते. मात्र, यामुळेसुद्धा बोगद्याजवळ सकाळी व सायंकाळी खूपच गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत होती.
पाहणीनंतर निर्णय
ही परिस्थिती बदलण्यासाठी पोलिसांनी गेल्या आठवड्यात अचानकपणे प्रायोगिक तत्त्वावर इंदिरानगरकडून गोविंदनगरला जाण्यासाठी सर्व गाड्यांना हा बोगदा खुला केला, तर गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येण्यासाठी सर्वच वाहनांना हा बोगदा बंद केला. आठवडाभर या वाहतुकीच्या बदलाची पाहणी केल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी याबाबतची अधिसूचना अधिकृतपणे जाहीर केली.
...तर होणार कारवाई
ही अधिसूचना जाहीर केल्यामुळे आता या अधिसूचनेचा भंग केल्यास व अपघात झाल्यास त्यास कोणतीही नुकसानभरपाई मिळत नसल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अधिसूचनेचा भंग करून कोणीही हा नियम मोडू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले
आहे. पोलिसांच्या नियमाची अंमलबजावणी न करता कोणत्याही वाहनाने या नियमाचा भंग केला, तर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही स्पष्ट केले आहे.
अशा प्रकारे होणार वाहतूक
नव्या अधिसूचनेमुळे आता हा बोगदा ‘वन वे’साठीच खुला राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातच पोलिसांनी प्रकाश पेट्रोलपंपाकडून आल्यावर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडे जाण्यासाठी बोगद्याच्या पूर्वीच पंक्चर तयार केल्याने बोगद्याच्या चौफुलीवरील वाहतूक कोंडीत घट होत असल्याचा
प्रशासनाचा दावा आहे. या नवीन अधिसूचनेमुळे गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येताना प्रकाश पेट्रोलपंपाजवळून वळण घेऊन यावे लागणार आहे. इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाताना बोगद्याचा वापर करता येणार असून, बोगद्यातील वाहतूक एकतर्फीच राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबई नाका ते लेखानगर व लेखानगर ते मुंबई नाका हे दोन्ही सर्व्हिसरोड दुतर्फा वाहतुकीसाठी राहणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
सिग्नल, सीसीटीव्हीची निकड
बोगद्यातील वाहतुकीत बदल केला असला, तरी येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिग्नल यंत्रणा उभारल्यास वाहतुकीस त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मतही व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनाच येथे थांबावे लागत असते. रात्री पोलिस नसताना वाहनचालक सर्रासपणे नियम मोडत असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून बोगद्यात सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट