टीम मटा
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी शहरातून वाहणाऱ्या गोदावरी, नंदिनी, वाघाडी आणि वालदेवी या नद्यांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागातर्फे विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
होळकर पूल, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर पूल, लक्ष्मीनारायण घाट, तपोवन, टाकळी पूल व घाट, दसक, नांदूर, मानूर परिसर येथे गोदापात्राची, आयटीआय पूल, उंटवाडी, तिडके कॉलनी, मुंबई नाका भागात नंदिनी नदीपात्राची, लक्ष्मण झुला परिसरात वाघाडी, तर रोकडोबावाडी, विहितगाव भागात वालदेवी नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली.
---
तब्बल १६० टन कचरा संकलन
आडगाव ः पंचवटी परिसरातील तपोवन, लक्ष्मीनारायण घाट, होळकर पूल, टाळकुटेश्वर पूल आदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तपोवनातील कपिला संगम येथे महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक दिनकर पाटील, अरुण पवार, जगदीश पाटील यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
या मोहिमेंतर्गत हजारो स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी, तसेच १६ जेसीबी, १४ डंपर आणि २० ट्रॅक्टर्सच्या साहाय्याने १६० टन कचरा संकलित करण्यात आला. गोदावरी नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाडी नदीच्या हत्तीपूल परिसरात साफसफाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून वाघाडीला अस्वच्छतेचा विळखा पडला होता. या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे विविध विभागांचे कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते. परिसरात स्वच्छता झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या स्वच्छता मोहिमेमध्ये अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मात्र, अनेक नगरसेवकांनीही या मोहिमेकडे पाठ फिरविली.
--
‘वालदेवी’झाली निर्मळ
सिन्नर फाटा ः रोकडोबावाडी, विहितगाव भागात रविवारी सकाळी सात वाजता वालदेवी नदीपात्रात स्वच्छता राबविण्यात आले. या मोहिमेत सुमारे तीन टन कचऱ्याचे संकलन झाले.
या अभियानाप्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधी, नागरिक, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातील गाळ उपसण्यात आला. उघड्या नाल्यातील गाळ साफ करण्यात आला. दशक्रिया विधी शेडजवळील हौदाचीही स्वच्छता करण्यात आली. मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत फवारणी करण्यात आली.
या उपक्रमात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरोज आहिरे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, कोमल मेहरोलिया, पंडित आवारे आदी लोकप्रतिनिधींसह विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय स्वच्छता अधिकारी संजय दराडे आदी सहभागी झाले. याशिवाय शिवकल्याणी महिला मंडळ, जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचालित महिला जलपंचायत, लायन्स क्लब ऑफ देवळाली आदींसह स्थानिक नागरिक सहभागी झाले.
--
स्वच्छतेची शपथ
नाशिकरोड ः स्वच्छ भारत अभियान आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे रविवारी सकाळी जेलरोड येथील गोदावरी नदीची स्वच्छता करण्यात आली. सुमारे पाच टन कचरा घंटागाडीद्वारे उचलण्यात आला.
दसक येथे सकाळी कर्मचारी व अधिकाऱ्यांना नदी स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली. नदीपात्रातील प्लास्टिक, कचरा, कपडे, निर्माल्य आदी गोळा करण्यात आले. मलेरिया विभागामार्फत फवारणी करण्यात आली. बांधकाम विभागामार्फत जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातील गवत व गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला.
प्रभाग सभापती सुमन सातभाई, नगरसेवक विशाल संगमनेरे, शरद मोरे, अंबादास पगारे, दिनकर आढ़ाव, रंजना बोराडे, मीरा हांडगे, सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, रमेश धोंगडे, कोमल मेहरोलिया, सरोज अहिरे, पंडित आवारे, जयश्री खर्जुल, महापालिकेचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संयुक्त ग्रुप, शिवकल्याणी महिला मंडळ, जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचालित महिला जलपंचायत, लायन्स क्लब ऑफ देवळाली आदी या उपक्रमात सहभागी झाले. महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे ११२ कर्मचारी, चार स्वच्छता निरीक्षक, बारा मुकादम असे १६८ महापालिका कर्मचारी, तसेच २०० स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला.
--
सातपूर, सिडकोमध्ये नंदिनीपात्राची स्वच्छता
सातपूर ः सातपूर, तसेच सिडको परिसरात नंदिनी नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिकेसह विविध संस्था व नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन करण्यात आले.
सातपूर परिसरात सभापती माधुरी बोलकर यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका डॉ. वर्षां भालेराव, हेमलता कांडेकर व महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेत केवळ आरोग्य व मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांनीच साफसफाई केली. विद्युत, बांधकाम, ड्रेनेज व विविध कर विभागांतील अधिकारी व कर्मचारी केवळ नावालाच स्वच्छता मोहिमेवेळी उपस्थित असल्याचे दिसून आले. स्वच्छता मोहीम केवळ फोटो काढण्यासाठीच राबविण्यात आली का, असा सवाल उपस्थित करून कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा मागणी नागरिकांनी केली आहे.
--
(संकलन ः डॉ. बाळकृष्ण शेलार, नवनाथ वाघचौरे, नामदेव पवार, अभिजित राऊत)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट