काँग्रेसने राज्य करताना केवळ देशाला लुटण्याचे काम केले आहे. मोदी सरकार जनतेच्या पैशाची राखण करणारे सरकार आहे. त्यामुळेच सामजिक सुरक्षेच्या योजना देशभरात राबविल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्त्वामुळे भारताची मान उंचावली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. बुधवारीच मालेगाव महापालिकेवर काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. भामरे यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला केला.
केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने मालेगाव येथे ‘सर्वांची साथ सर्वांचा विकास’ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. येथील अमेय लॉन्सवर हे संमेलन झाले. डॉ भामरे हे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हा प्रभारी सुनील बागुल, आमदार डॉ. राहुल आहेर, सुरेश निकम, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, अद्वय हिरे, तालुकाध्यक्ष दीपक पवार, संदीप पाटील उपस्थित होते.
डॉ. भामरे म्हणाले, देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. तसेच काही वेळा कठोर निर्णय देखील घेतले. थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे ९२ योजनांचा थेट लाभ जनतेला होत आहे. भामरे यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने देशावर ६५ वर्ष राज्य केले. मात्र विकासाच्या नावाने केवळ देशाला लुटण्याचे काम या राज्यकर्त्यांनी केले. भामरे यांनी जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक केले.
पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक योजना राज्य शासनाने राबविल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकार आधीपासून सकारात्मक होते. मात्र कर्जमाफी ही केवळ मलमपट्टी असून, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, त्याची शेती शाश्वत झाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच जे शेतकरी सक्षम आहेत त्यांनी स्वतःहून कर्जमाफी घेणार नाही, असे जाहीर करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कर्जमाफीचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून, ते शेतकऱ्यांचे असल्याचे त्याने स्पष्ट केले.
या कार्यक्रमात उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरगुती गॅस वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष दादा जाधव, अद्वय हिरे यांनी नार-पार, जिल्हा बँक, मालेगाव जिल्हा निर्मिती, शेती हमीभाव आदी मुद्द्यांवर विचार व्यक्त केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट